Thursday, September 19, 2024

जागतिक आरोग्य दिन

 आज जागतिक आरोग्य दिन.या वर्षाची थीम आहे...'माझे आरोग्य माझा अधिकार '.आता हा अधिकार म्हणजे नेमकं काय? 'मुळात आरोग्य म्हणजे काय रे भाऊ?'...हा एक यक्षप्रश्न... प्रत्येक डॉक्टरच्या कुंडलीत ठाण मांडून बसला असतो.जिथे डॉक्टरच गोंधळलेला..तिथे पेशंट बद्दल काय बोलावं ? ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'..अशा आवेशात अनेक पेशंट्स येतात आणि रॅपिड फायर राऊंड सारख्या प्रश्नांनी डॉक्टरांची तब्येत बिघडवतात.आणि शेवटी जाताना एक कळीचा प्रश्न टाकून, अर्धमेल्या डॉक्टरवर प्राणांतिक वार करतात.

'किती दिवसात बरं वाटेल?'...

 बॅटिंग ला निघालेल्या विराट कोहलीला विचारतो का आपण,की किती रन काढून आऊट होणार म्हणून?

               असो.परवा राजधानी ने दिल्ली ला चालले होते. एकटी आणि निवांत होते.

डोक्याखाली उशा, अंगावर ब्लॅंकेट आणि एसी या अत्यंत अनुकूल?? वातावरणात मी प्रचंड सकारात्मकतेने आणि लढाऊ बाण्याने मेडिसीन च्या पुस्तकाचं वाचन सुरु केलं. चक्क दोन चॅप्टर्स वाचून झाले. मी माझी पाठ थोपटली.यापुढे प्रवासात अशीच पुस्तकं वाचण्याचा संकल्प पण सोडला.आणि मस्त आळस दिला.

    नेमका हाच क्षण माझ्या शेजारच्या बर्थ वरील बाईनं अचूक पकडला.

"तुम्ही डॉक्टर आहात ना?" 

तिनं अनपेक्षित बाउन्सर टाकला.मी कन्फ्युज्ड. हिनं कसं ओळखलं? टिपीकल डाॅक्टरसारखा स्मार्ट,अॅटिट्युड असणारा माझा चेहेरा दिसतोय की काय? जवळपास आरसा ही नव्हता.पण लगेचच लक्षात आलं की माझ्या पुस्तकानं घात केलाय.माझी जुजबी चौकशी करून त्या माऊलीने बॅटिंग सुरु केली.

"माझ्या टाचा खूप दुखतात हो. ४ पोळ्या पण लाटू शकत नाही मी"

"हे बघा माझ्या पाठीवर पुरळ आलंय. घामोळं नाहीय ते"

"मानेच्या हालचाली केल्या की चक्कर येते हल्ली"

मी गाडीच्या डब्यात दवाखाना तर थाटला नाही ना,अशी माझीच मला शंका आली. आता माझ्या समोर तीन पर्याय होते.तिचे बाऊन्सर्स आक्रमकपणे परतवायचे, सोडून द्यायचे नाहीतर टाईमपास टोलवाटोलवी करायची.मी तिसरा पर्याय निवडला कारण पुढचे ७/८तास तरी हा शेजारधर्म नाईलाजाने मला पाळणं भाग होतं.

  थातुरमातुर उत्तर देऊन मी पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं.पण समोरची बाई खिंड सोडायला तयार नव्हती.बाजी प्रभू देशपांडेंच्या वंशातली होती की काय देव जाणे.जरा पुस्तकातून माझी नजर जरा वळली की केलाच तिनं प्रश्नाचा वार.

"राईस ब्रॅन चांगलं की करडईचं?"

"शेवगा रोज खावा का?"

"खजूर चांगला की मनुके?"

बाई काहीही खा पण माझं डोकं खाऊ नको- -- -असं मला म्हणता आलं असतं तर????

  डॉक्टर या प्राण्याची छळवणूक आणि पिळवणूक करणारी एक जमात असते आणि तिचा योग माझ्या कुंडलीत वारंवार का येतो हे मला न सुटलेलं कोडं आहे.

   कुणाच्याही घरात, अंगणात, देवळात, मॉलमध्ये, रिसेप्शनमध्ये, थिएटरमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर.....फक्त दवाखाना सोडून कुठेही एखादी जुजबी ओळखीची व्यक्ति जेव्हा

"मला नेहमी सर्दी होते हो,काय करायला पाहिजे त्यासाठी?" किंवा

"हल्ली माझे केस फार गळतात हो, काय करावं त्यासाठी?"............

"किडनी स्टोन साठी आयुर्वेदिक औषधे आहेत का हो?"......

आता 'माझे आरोग्य माझा अधिकार '....हे मान्य आहे हो पण या अधिकाराचा गैरवापर होत असेल तर त्या दीन, पीडित डॉक्टरच्या आरोग्याची पातळी खालावते त्याचं काय???

आणि वरुन हेच पेशंट आम्हाला ' काळजीने' विचारतात.....'अरे, तुम्ही पण आजारी पडता? डॉक्टर असून सुद्धा???


असो.जागतिक आरोग्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा.

Monday, September 9, 2024

पक्षाघात पुनर्वसन - एक आव्हान


 पक्षाघात पुनर्वसन - एक आव्हान

    पक्षाघात हा आजार ४० वर्षांपूर्वी साधारणतः जेष्ठवयीन व्यक्तींमध्ये आढळत असे. पण आज परिस्थिती विलक्षण बदलली आहे . आज तरुण व्यक्तींना म्हणजे तिशी चाळीशीच्या वयातही पक्षाघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षाघाताचा अत्यंत दुर्दैवी परिणाम म्हणजे कायमस्वरूपी येणारे अपंगत्व. या अपंगत्वावर मात करण्याचे अनेक उपाय आहेत. काही रुग्ण त्यात यशस्वी होतात. पण बरेचसे रुग्ण संपूर्ण आयुष्य एकाच जागी अंथरुणावर व्यतीत करतात. आज पक्षाघाताचे वाढते प्रमाण हे व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर अत्यंत भयावह आणि निराशाजनक चित्र निर्माण करणारे आहे.. जेव्हा एक व्यक्ती पक्षाघातामुळे अपंग होऊन अंथरुणाला खिळते तेव्हा त्या व्यक्तीचे उत्पादक मूल्य शून्य होते. ही व्यक्ती कुटुंबप्रमुख व अर्थार्जन करणारी असेल तर कुटुंबाची आर्थिक बाजू कोलमडून पडते.परिणामी पीडित व्यक्तीचे मानसिक व शारीरिक  स्वास्थ्य खालावत जाते. कुटुंबावर पण  औषधोपचाराचा आर्थिक बोजा वाढतो. रुग्णाची शुश्रुषा करण्यासाठी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला गुंतून राहावे लागते किंवा एखादा मदतनीस ठेवावा लागतो. रुग्णाचे कार्यालयीन  योगदानही बंद पडल्यामुळे ऑफिसचे /संस्थेचे/ वा कार्यालयाचेही नुकसान होते. पक्षाघात हा आजार केवळ रुग्णापुरता मर्यादित रहाणारा नाही . तसेच यातून पूर्णतः बरे होण्याचा कालावधीही निश्चित नाही. ज्यामुळे स्वतः रुग्ण, त्याचे कुटुंब आणि समाज यांच्याही स्वास्थ्यावर परिणाम होतो.यासाठी पक्षाघात व्याधी बद्दल जनजागरण करणे ही काळाची गरज आहे. आता हे जनजागरण तीन प्रकारे करायला हवे.
१ .पक्षाधात होऊ नये होऊ नये यासाठी काय करावे?
ब्लड प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार व व्यसनाधीनता यामुळे पक्षाघाताची शक्यता वाढते. म्हणून योग्य आहार, विहार, व्यायाम व नैसर्गिक जीवनशैली....या बाबी आज अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.वास्तविक आज सगळ्याच व्याधी टाळण्यासाठी आयुर्वेदोक्त जीवनशैली हेच एकमेव उत्तर आहे . 
 निसर्गाविरुद्ध असणारी जीवनशैली आणि आजकाल प्रामुख्याने घडणारे अपघात यामुळे पक्षाघाताचा धोका वाढलेला आहे. ही कारणे टाळण्याचा पूर्णतः प्रयत्न करणे ही आजच्या काळाची गरज आहे. 
. पक्षाघात झाल्याबरोबर काय करावे ?
 यासाठी पक्षाघाताची लक्षणे सामान्य व्यक्तीलाही माहित हवीत. यासाठी  'रिमेंबर रेकग्नाईज अँड ऍक्ट फास्ट 'हे वाक्य नेहमी लक्षातअसावे .
F- face- रुग्णाला हसण्यास सांगावे. जर ओठांची एक बाजू खाली झुकत असेल, 
A- Arm-  दोन्ही हात वर करताना निरिक्षण करावे. कोणताही एक हात आपोआप खाली येत असेल,
 S - Speech- एकाएकी बोलण्यात फरक पडला असेल ,
T- Time- म्हणजे  वरिल लक्षणे दिसल्यास, एक क्षणही वाया घालवू नये. पक्षाघाताच्या चिकित्सेत प्रत्येक सेकंदाला महत्त्व आहे. चिकित्सेला जितका उशीर तितकी परिस्थिती गंभीर आणि आटोक्याबाहेर जाते. म्हणून पक्षाघाताच्या रुग्णाला ताबडतोब आयसीयु मधे हलविणे हा योग्य निर्णय असतो. 
  'रिकॉम्बिनंट टिशू प्लासमिनोजिन ऍक्टिव्हेटर' हे औषध मेंदूतील रक्ताच्या गुठळीला विरघळवून टाकते. फक्त हे औषध पहिल्या चार ते पाच तासातच द्यावे लागते. हे अत्यंत प्रभावी औषध असून रुग्ण पूर्णतः बरा होतो.पण त्यासाठी वेळ फार महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने अनेक रुग्ण वेळेत पोहोचू शकत नाही व या उपचारापासून वंचित रहातात.  तरीसुद्धा सुरुवातीचे 12 ते 24 तास हे गोल्डन अवर्स मानले जातात. या कालावधीत योग्य चिकित्सा झाली तर रुग्ण पूर्णतः बरा होतो. 
        पक्षाघाताची चिकित्सा तीन टप्प्यांमध्ये केली जाते. 
. आत्ययिक चिकित्सा 
२.  रुग्णाचे पुनर्वसन 
३. अपुनर्भव चिकित्सा. 
          दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची ठरते. रुग्णाचे पुनर्वसन  कसे करावे हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात वेळेवर दिलेल्या योग्य चिकित्सेवर पुनर्वसन अवलंबून असते. हा कालावधी कितीही लांबू शकतो. किंबहुना रुग्णाच्या मृत्यूपर्यंत तो अस्तित्वात असतो. हा सगळ्यात आव्हानात्मक असा कालावधी आहे. 
       या काळात  युक्तीव्यपाश्रय, सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा एकाच वेळी पद्धतशीर करावी लागते. किंबहुना सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा जितक्या क्षमतेने केली जाईल, तितक्याच क्षमतेने रुग्ण औषधे व फिजिओथेरपी ला प्रतिसाद देतो असा माझा अनुभव आहे.
        मोटर नाडीसंस्था व सेन्सरी नाडी संस्था या दोन्हींवरही पक्षाघाताचा कमी जास्त परिणाम झाल्यामुळे रुग्ण खचतो, निराश होतो व त्याची वृत्ती नकारात्मक होते.त्यामुळे चिकित्सेला प्रतिसाद देण्याइतके मनोबल रुग्णात शिल्लक रहात नाही. 
      बाह्य स्नेहन, स्वेदन, नस्य, शिरोधारा, मात्राबस्ती या उपक्रमामुळे रुग्ण शरीराच्या मांसधातू व वातनाड्यांना बल तर मिळतेच त्याबरोबरच मनोबलही उंचावते कारण पंचकर्म उपक्रमामुळे वैद्य व रुग्णाचा प्रत्यक्ष व स्पर्शाद्वारे संपर्क होतो, संवाद होतो - जी अत्यंत महत्त्वाची कृती आहे .
       पण रुग्णात सुधारणा होण्याची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होत असते अशावेळी रुग्णाचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, रुग्णाचा उत्साह वाढवणे, सकारात्मकता  कायम ठेवणे....ही जबाबदारी कुटुंबातील सदस्यांवर येऊन पडते. ही जबाबदारी फार मोठी आणि  गरजेची आहे . 
     पण बरेचदा असे दिसते की रुग्ण आजारामुळे कंटाळला असतो, परावलंबित्वामुळे असहाय्य असतो आणि कुटुंबावर आपला भार होतो आहे या जाणिवेने कुढत असतो. अशात कुटुंबियांची होणारी चिडचिड, वैताग, रस्सीखेच, वैफल्य....या सगळ्या भावना बरेचदा रुग्णाच्या उपेक्षेत , अवहेलनेत ,कटू शब्द बोलण्यात व्यक्त होतात.आणि परिस्थिती अधिकच चिघळत जाते.आणि विश्वास बसणार नाही, पण अशावेळी नात्यांच्या बंधनांपेक्षा,  'यातून सुटका ' ..ही भावना रुग्णाच्या आणि कुटुंबियांच्या मनात वरचढ ठरते... हे कटू सत्य मी अनेकदा डॉक्टर या भूमिकेतून अनुभवले आहे जे फार विदारक आहे.
     यासाठी कुटुंबाचेही समुपदेशन करणे अत्यावश्यक ठरते.रुग्णाच्या मनाची उभारी टिकवून ठेवणे, आजारातून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती जागृत करणे, अवतीभवती आनंदी वातावरण कायम ठेवणे, लहानसहान घरगुती कामांची जबाबदारी देणे, ऑनलाईन कामे करवून घेणे - अशा वागण्याने रुग्णाचे मन गुंतून राहते.वाचनाची आवड असल्यास प्रेरणादायी पुस्तके वाचायला देणे,घरी लहान मुले असल्यास त्यांचा अभ्यास घेण्यास सांगणे, संगीत, टीव्ही यात मन रमविणे - यामुळे रुग्णाचा उत्साह वाढतो , सकारात्मकता वाढते व कुटुंबाला उपयोगी पडल्याने समाधान वाटते. कोणतेही रचनात्मक काम रोज केले तर मेंदूला सकारात्मक संदेश जातात आणि मेंदू उपचाराला प्रतिसाद देऊ लागतो.अपंग शरीर पेशींना पुर्ववत करण्याची मेंदूला सतत आज्ञा देणे ही वृत्ती औषधोपचारापेक्षाही प्रभावी ठरते .मनाची शक्ती ही शरीरावर राज्य करीत असते त्यामुळे मानसिक स्तरावर जो रुग्ण स्थिर असतो तो या आजारातून नक्कीच बाहेर पडण्यास यशस्वी ठरतो.फक्त हे मानसोपचार प्रत्येक रुग्ण आणि कुटूंबानुसार भिन्न असतात.व ते कुटुंबातील सदस्यच करु शकतात.
    त्यानंतर महत्त्वाची चिकित्सा म्हणजे आत्मबळ वाढविणे. हे आत्मबळ दैवव्यपाश्रय चिकित्सेने वाढविण्यास मदत होते. आपल्या आराध्य देवतेची उपासना, नामस्मरण,जप, स्तोत्रपठन केल्यामुळे शांती, समाधान , श्रद्धा या वृत्ती वृद्धिंगत होतात. त्यामुळे शरीरातील 'सेल्फ हीलिंग' म्हणजेच 'स्व उपचार' प्रक्रिया कार्यान्वित होते. जपामुळे बोटांचा व्यायाम तर स्तोत्राने स्पीच थेरपी हा दुहेरी फायदा होतो.
      पुनर्वसनासाठी मानसिक आणि आत्मिक शक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. रुग्णाला एकटेपणा, निराशा, हतबलता यातून बाहेर काढणे हे  मानसोपचारतज्ज्ञापेक्षाही कुटुंबावर सर्वस्वी अवलंबून आहे.  औषधोपचार, फीजियोथेरपी याबरोबरच जेव्हा रुग्णाच्या 'प्रसन्न आत्मेंद्रिय मनः' याकडे चिकित्सा  उपक्रम म्हणून अंमलात आणले जाते त्यावेळी रुग्णाची प्रतिसादक्षमता अनेक पटीने वाढते हा माझा अनुभव आहे. 
    पक्षाघाताच्या दुसऱ्या टप्प्यात शरीर,मन व आत्मा सुदृढ करण्यासाठी आपल्या शास्त्रात प्रभावी उपाय आहे हे खात्रीने आपण सांगू शकतो. सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा यांचे सुद्धा एक वेळापत्रक तयार करून वेळोवेळी त्यात बदल करावे म्हणजे रुग्णालाही त्यांचे महत्त्व जाणवते.आपल्या शास्त्रातील चिकित्सा  लोकप्रिय, मौल्यवान, महत्वपूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. पक्षाघाताच नव्हे तर अनेक आजारांवर  त्रिविध चिकित्सा आपणच प्रचलित करायला हवी.

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी
प्रोफेसर, काय चिकित्सा
आर.टी.आयुर्वेद महाविद्यालय, अकोला.
9422939510
#पक्षाघात
#पक्षाघातपुनर्वसन
#आयुर्वेदपक्षाघातपुनर्वसन

 *कहे कबीर सुनो भाई साधो*

प्रगत देशांचे आपल्याला विलक्षण आकर्षण असते.परदेशात गेल्यावर सतत भारताशी तुलना केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही.तिकडची समृद्धी बघून आपले डोळे दिपतात. पण तेव्हा विसर पडतो की एक समृद्ध संत परंपरा आपल्याला लाभली आहे. या संतांच्या लेखणीतून स्फुरलेले साहित्य - हा आपला वैचारिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा आहे. जो अक्षय आहे. युगानुयुगे  हे संत साहित्य समाजाचे मानसिक आणि अध्यात्मिक पोषण करीत आले आहे. संतांनी आपल्या साहित्यातून अमूल्य आणि आजही कालसुसंगत असणारे जीवन तत्वज्ञान आपल्याला प्रदान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान कोणीही विद्यापीठातून वा भरमसाठ पदव्या मिळवून घेतलेले नाही. संतांची अंगभूत शहाणीव व प्रज्ञा यांची आपल्यावर कायम कृपा असते हे भाग्यच आहे.

     ‌‌ ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीरदास यांची जयंती असते. कबीराचे दोहे अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेकांना ते मुखोद्गत आहेत. शिक्षित, अशिक्षित, विचारवंत बुद्धिवंत समाजाला संत कबीरांचे  साहित्य अवगत आहे.पण विरोधाभास असा की कबीरदासांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल कमालीची संदिग्धता आहे. त्यामुळे अनेक खऱ्या खोट्या कथा त्यांच्या धर्माबद्दल, जन्माबद्दल, गुरुं बद्दल सांगितल्या जातात. संत कबीरांचा जन्म हा वाराणसी येथील एका गावात झाला. साधारणतः पंधराव्या शतकात, चौदाशे चाळीस साली त्यांचा जन्म झाला असावा. पण यातही मत मतांतरे आहेत.  निरू आणि निमा या मुसलमान जोडप्याने, एका तळ्यात कमळाच्या फुलावर बाल कबीरला तरंगताना बघितले. हे जोडपे निपुत्रिक असल्याने, त्यांनी या बाळाला घरी आणले. नामकरणाचे वेळी मौलवींना  पाचारण करण्यात आले. मौलवींनी त्यासाठी कुराण शरीफ उघडले. पण आश्चर्याची बाब अशी की त्यांनी ज्या ज्या नावावर बोट ठेवले, ते नाव कबीर होते.  कबीर याचा अर्थ ईश्वर असल्याने मौलवींनी नाईलाजानेच हे नाव ठेवले. 

       निरू आणि निमा यांच्या घरात  कबीर यांचे संगोपन झाले. ते दोघेही विणकर असल्यामुळे सहाजिकच कबीर देखील हेच काम करू लागले. त्यावेळी देशातली स्थिती अतिशय ढासळलेली होती. मोगलांचे वर्चस्व होते.अराजक, जुलमी राजवट, हिंसा ,अन्याय अत्याचार अशा परिस्थितीत समाज भरकटलेला होता. ही परिस्थिती अनुभवतच कबीरदास लहानाचे मोठे झाले . कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी ,परंपरा या विषयीही त्यांना नेहमीच प्रश्न पडत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांच्या उपजत आध्यात्मिक प्रतिभेला धुमारे फुटू लागले. आणि शाली, चादरी विणता विणता दोहे व कवितांमधून ते परिस्थितीवर भाष्य करू लागले.त्यावर मार्गदर्शन करू लागले. 

      कबीरदासांच्या या अलौकिक, दैवी व्यक्तिमत्त्वाची जनमानसात प्रसिद्धी होऊ लागली. अनेकांना त्यांच्या प्रतिभेचे आकर्षण होते. पण ते हिंदू की मुसलमान हा प्रश्न समाजासाठी फार महत्त्वाचा ठरला. कबीरदासांचे विचार आणि तत्वे, त्यावेळच्या भरकटलेल्या, गोंधळलेल्या समाजाला पेलले नाहीत.कारण ते काळाच्या  कितीतरी पुढे होते.त्यावेळी सिकंदर लोधीचे राज्य होते. हिंदूंना राज्यातून बहिष्कृत कराण्याचे त्याचे धोरण होते. त्यामुळे कबीरदासांनाही धर्मद्रोही ठरवून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले. पण त्यामुळे विचलित न होता ,अहिंसा, प्रेम, मानवता, नैतिकता यांची शिकवण देऊन समाज परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकत हे कार्य कबीरदासांनी अविरत सुरू ठेवले. 

*जाती न पूछो साधो की,*    

*पूछ लिजिए ज्ञान,।* 

*मोल करो तरवार का*, *पडा रहने दो म्यान।।* 

धर्म ,जात,पंथ यापलीकडे पोचलेले, मानवतेचे पुजारी असलेले  कबीरदास हे बंडखोर व क्रांतिकारक विचारांचे होते. दोह्यांमध्ये सिद्धांत आणि उदाहरण शब्दबद्ध करणे, ही त्यांची विशिष्ट शैली होती. निर्गुण भक्ती यावर त्यांचा विश्वास होता. 

*हरी को ढूंढन मै चला,*  *जा पहुचा हरिद्वार।* 

*पग थके ना हरी मिले*, *क्यूं की हरी थे मेरे द्वार।।*        मूर्ती पूजेला त्यांनी नेहमीच विरोध केला. कर्मकांड, अंधश्रद्धा यापासून दूर राहण्यासाठी त्यांनी समाजाला शाब्दिक फटकारे दिले. त्यांचे दोहे समजून घेण्यासाठी शब्दार्थ भावार्थ  (तात्पर्य) व गूढार्थ  (प्रतिकात्मक) लक्षात घेणे गरजेचे आहे. 

*राम राम सब कोई कहे,*  *दशॠत कहे ना कोई ।*

*एकवार दशॠत कहे*, *कोटी यज्ञ फल होय।।* 

 यात अनेक ठिकाणी 'दशरथ' हे चुकीचे लिहिले जाते.कबीरदासांचे दैवत श्री राम आहे असा अनेकांचा समज आहे. परंतु निर्गुण राम म्हणजेच 'आत्माराम' हे त्यांचे दैवत आहे.  वरिल दोह्यात  दशरथ आणि राम हाच  अर्थ समजला जातो. 'दशॠत' म्हणजे दहा अपराधांपासून मुक्त होऊन  रामाचे नामस्मरण करावे. 

    सोप्या - साध्या भाषेत, कमीत कमी शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे व तेही व्यवहारातील उदाहरणे देऊन.... त्यामुळे संत कबीर तळागाळापर्यंत सहज पोचले आणि भक्तांच्या हृदयात विराजमान झाले. त्यांच्या उपासनेची पद्धत परंपरागत नसल्याने, त्यांनी धर्म आणि समाजाकडे बघण्याचा आपला स्वतःचा मार्ग विकसित केला. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. आणि भाषा तरी कोणती? अरबी, फारसी, पंजाबी, बुंदेलखंडी आणि खडीबोली यांचे मिश्रण. म्हणून कबीरांच्या भाषेला पंचमेल खिचडी म्हणतात 

    बीजक आणि साकी हे त्यांचे महत्त्वाचे दोन साहित्य प्रकार. याशिवायही अनेक   प्रकारांमधून त्यांचे शब्दधन समाजाला दिशा देत असते.   महत्त्वाचे म्हणजे कबीरदासांनी स्वतःबद्दल काहीही लिहिले नाही. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, त्यांच्या गुरुंबद्दल संदिग्धता आहे. श्री रामानंद त्यांचे गुरु होते असे म्हटले जाते.संत कबीरांचे छायाचित्र सुद्धा काल्पनिक आहे.कुणी त्यांना टोपी घातली आहे तर कुणी त्यांना मोरपीस लावले आहे.स्वतःबद्दल ते म्हणतात, 

*मसी कागद छुओ नही,* *कलम गही  नहि हाथ।* 

*चारिक जूग को महातम*  *मुखही जनाई बात।।* 

 कबीरदास निरक्षर होते. त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी हे अक्षरधन त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवलेले आहे. आणि कबीर पंथाची स्थापना केली. बाबू शाम सुंदर दास यांनी संपादन करुन १९३० मध्ये कबीरांच्या पूर्ण रचना हिंदीत प्रथम प्रकाशित केल्या. तसेच 'वन हंड्रेड पोएम्स ऑफ कबीर' हे मॅकमिलन लंडन येथे १९१५ मध्ये प्रकाशित झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे .डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी कबीरदासांना आपले गुरु मानले होते. कबीरांच्या शिकवणीमुळे मला आत्मिक शक्ती मिळाली आहे असे आंबेडकर म्हणतात. 

कबीरांची सुखाची कल्पना म्हणजे ,

*चाह मिटी चिंता मिटी*, *मनवा  बेपरवाह।* 

*जिसको कुछ नहि चाहिये*, 

   *वह शहनशाह।।* 

संत कबीरांचा निर्गुणवाद हा स्वर्ग ,नरक, पुनर्जन्म, मोक्ष, अवतार, पूजा, तीर्थयात्रा आणि उपवास या संकल्पना नाकारणारा आहे. त्यांचा भर केवळ प्रेमावर आहे. प्रेमाशिवाय  समता, स्वातंत्र्य, बंधुत्व असूच शकत नाही असं ते म्हणतात. 

  *कबीर बादल प्रेम का,* *हमपर बरसा आई।* 

*अंतरी भिगी आतमा*,

  *हरीभरी वनराई।।* 

      कबीरांचे विचार काल, सांस्कृतिक व भौगोलिक सीमा ओलांडून विश्वभर प्रसारित झाले आहेत. त्यांचे पंढरपूरच्या विठ्ठलावर  पण अतिशय प्रेम होते. त्यांनी यावर अभंगही लिहिले आहेत. 

*छोड दिया वैकुंठ*, 

*हरि भाव भगतका भूका।* 

*कहत कबीर हरी से मीठा,* 

*लागत तुलसी का  बुक्का।।*. 

   त्याकाळी किंवा आजही अशी समजूत आहे की काशीला मृत्यू आला की मोक्ष मिळतो. ही अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी कबीरदास काशीतून मगहर या ठिकाणी आले आणि तिथेच त्यांचे महानिर्वाण 

 झाले. 

 *सकल जनम शिवपुरी गंवाया।*

*मरतो बार मगहर उठि आया।।*

अशी स्वतः उक्ती आणि कृती करणारे ते समाज सुधारक होते. 

   वास्तविक आज त्यांच्या विचारांची समाजाला खूप गरज आहे. आम्हाला दोहे पाठ आहेत.पण ते अंगीकारण्याचे, आत्मसात करण्याचे धाडस आजही नाही. आम्ही व्यक्तिपूजेतच समाधानी असतो. व्यक्तिगत, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे वागावे याचे नीतीपूर्ण ज्ञान संत कबीरांच्या साहित्यातून मिळते. त्यांच्या अनेक दोह्यांमधून  *कहे कबीर सुनो भाई साधो* .. असे म्हटले असते.. इथे या   'साधोचा' शब्दार्थ म्हणजे साधू. म्हणजेच शुद्ध मनाने ऐका. भावार्थ हा 'साधक'  आहे. आणि गूढार्थ असा आहे की  'साध्य करा.'कबीर वाणी ऐका आणि साध्य करा.

       माझी कणभरही पात्रता नसताना मी संत कबीर जयंती निमित्त लिखाण केले आहे. त्याबद्दल आधीच मी वाचकांची क्षमा मागते. कारण कबीर हा विषय सामान्यांच्या आवाक्यातला अजिबात नाही.  तूर्त त्यांचा, 

*बुरा जो देखन मै चला*,

 *बुरा न मिलिया कोय।*

*जो दिल खोजा आपणा,* 

*मुझसे बुरा ना कोय।।*

हा एक जरी दोहा आपण आत्मसात केला तरी सुद्धा आपले कल्याण होऊन जीवनाचे सार्थक होऊ शकते.


#कबीरदोहे

#संतकबीर


Sunday, June 2, 2024

तीनशे शब्दांचा निबंध

 


तीनशे शब्दांचा निबंध

"तीनशे शब्दांचा निबंध" या घटनेनं अल्पवयीन, अपराधी बालकांच्या सुधारणा प्रक्रियेला एक अभिनव आयाम मिळाला आहे.निबंध लिहिण्याची 'शिक्षा' या घटनेचं किती बरं कौतुक करावं? आम्ही शाळेत असताना इंग्रजी हिंदी, मराठी या विषयात 'निबंध' हा एक अनिवार्य भाग असायचा. 'मी केलेला प्रवास', 'एक अविस्मरणीय घटना', 'माझा आवडता सण', 'माझा आवडता प्राणी/ पक्षी... असे विषय सामान्यतः असायचे.मग 'गाय' या विषयावर निबंध लिहिताना......'गाय हा पाळीव प्राणी आहे. गाईला चार पाय व एक शेपूट असते.या शेपटीने ती स्वतः च्या अंगावरच्या माशा हाकलते. गाय गवत खाते....'असे अनेक माहितीपूर्ण निबंध आमच्या लेखणीतून उतरलेले आहेत.निबंधात म्हणी आणि वाक्प्रचार टाकायचे असतात ...हा एक अनिवार्य नियम. ' चोर सोडून संन्यासाला सुळी ', 'उथळ पाण्याला खळखळाट फार ' , 

' कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' , 'आपलेच दात आणि आपलेच ओठ', 'आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी'...... अशा म्हणींनी आम्ही निबंधाची उंची वाढवित असू ..   अर्थात हे माझ्या पिढीचे अनुभव बरं का. हल्लीच्या मुलांचा आणि निबंध या शब्दाचा  काही संबंध असतो का याबद्दल मी अनभिज्ञ आहे.असो. मग जरा वरच्या वर्गात गेलं की 'विज्ञान शाप की वरदान?', 'एका वृक्षाचे आत्मवृत्त', 'माझे ध्येय', 'जिच्या हाती पाळण्याची दोरी' वगैरे वैचारिक आणि बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारे निबंध असायचे. 

         आता मला प्रश्न पडला आहे की परवाच्या घटनेच्या  त्या अल्पवयीन बाबुला निबंधाचा कोणता विषय  दिला असेल हो? 'मी केलेला अपघात', 'दारू पिण्याचे दुष्परिणाम', 'महागड्या गाडीचे वर्णन',  'एक अविस्मरणीय प्रसंग',माझे वाहन - माझा वेग'..... या प्रश्नानं माझा अक्षरशः  छळवाद मांडला आहे.. पण दुसऱ्या आणखी एका बाबीने माझा मेंदू  वैचारिक आवर्तात गरगरतो आहे....तो म्हणजे ही शिक्षा देणारे अधिकारी नेमके कोण आहेत? अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे की आदरणीय अधिकाऱ्यांच्या डोक्यातून या शिक्षेचा उगम झालेला आहे?  निबंध लिहिणे या शिक्षेमागचा त्यांचा नेमका दृष्टिकोन काय असावा बरं? हे महाशय पूर्वी शिक्षक तर नसावेत ना? नाही तर शिक्षण मंडळावर तर नक्कीच असतील.

    परवा घडलेल्या अपघाताच्या घटनेवर असंख्य प्रतिक्रिया आल्या. जोपर्यंत काही भयानक घटना घडत नाही तोपर्यंत सारं काही आलबेल असतं.पण जेव्हा काही घडतं तेव्हा समस्त जनतेची  तत्वनिष्ठा, नीतिमत्ता , विद्वत्ता , वक्तृत्व  शिगेला पोचतं.....मी पण त्यातलीच की. 

       परवा होर्डिंग कोसळलं आणि मग आम्ही तोंडसुख घ्यायला मोकळे झालो.आपलं कसं आहे ना, प्रश्न निर्माण झाल्यावर जागं व्हायचं.... तोपर्यंत झोपेचं सोंग घ्यायचं.आणि दुसरं म्हणजे अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांमध्ये आपली शक्ती, बुद्धी पणाला लावायची आणि खर्च करायची. यातच आम्ही गुंतलेले.तसंही 'निवडणूक' या विषयावर बोलून, ऐकून, चर्चा करुन जरा अजीर्णच झालं होतं.


     असो. अपघाताच्पा घटनेवर प्रतिक्रिया देण्याचा जन्मसिध्द अधिकार असल्याने  जनता (म्हणजे  आपणच हो.) एकदमच जागृतावस्थेत पोचली. आणि आमच्यातले संस्कार, संस्कृती, नीतिमूल्यं, कायदे, वाहतूक नियम.. सगळंच सरसरून उफाळून आलं.

      यात  कोणी पालकांना दोषी ठरवलं . काहींच्या मते अती संपत्त्तीच याला कारणीभूत आहे.  कुणी आरटीओवर हल्लाबोल केला तर काहीनी वाहतूक  पोलीसांवर ताशेरे झाडले.. तरुण पिढीचा उद्धार तर यातला महत्त्वाचा मुद्दा  होता.आयुष्यात 'पब'चं  तोंडही न  पाहिलेल्यांनी पबच्या कायदे , नियमावलींचे वाभाडे काढले  . काहींना तर एक मुलगा आणि मुलगी इतक्या रात्री बाईकवरून कुठे जात होते हा प्रश्न पडला. त्यांच्या दृष्टीनं  हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, की ही   दोघेजणं मध्यरात्री नेमकं काय करत होती? त्या दोघांचं एकमेकात काही नातं होतं का? आता पुण्यातील संस्कृतीचं काय?     

              ही घटनाच अशी होती की प्रत्येक संवेदनशील मनाला  अस्वस्थता येऊन काहीतरी व्यक्त करावसं वाटलं. मला मात्र या भयानक प्रसंगातही एक आशेचा किरण दिसला.निबंधाचा मुद्दा मला इतका आश्वासक आणि  महत्त्वाचा वाटला ,(कुणाचं काय, नि कुणाचं काय) की बाकी तपशील जरा नजरेआडच झाला.एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, महागडी गाडी अत्यंत वेगाने चालवून मध्यरात्री अपघात केला. त्यात बाईकवरचे दोघे  घटनास्थळी मृत्युमुखी पडले. आपल्या सल्लूभाईंच्या बाबतीतही असं झालंच होतं की. दिवसागणिक अपघात होतात. लोक प्राणाला मुकतात.  पण सगळ्या घटना आपल्यासमोर येतातच असंही नाही.                 

         त्यामुळे  शिक्षा म्हणून '300 शब्दांचा निबंध' हा माझ्यासाठी या घटनेतील अनपेक्षित, अकल्पित आणि अभिनव असा ट्विस्ट अर्थातच वळण आहे. म्हणूनच हा शिक्षेचा अभिनव प्रकार इतिहास घडविणार याची मला खात्री वाटते.

          मी एक हाडाची (ऑर्थो नाही हो) शिक्षिका आहे. आणि अधून मधून  कागदावर खरडण्याची 'खाज' असल्याने  निबंध, शब्द याबद्दल मला कमालीचं ममत्व आहे. शाळेत असताना बरेचदा शिक्षा म्हणून आम्हाला चूक लिहिलेला शब्द शंभर वेळा परत लिहायला सांगायचे.(पुन्हा  तेच.आमच्या काळातलं हो.) पण अपघात  केला म्हणून आजच्या काळातल्या अल्पवयीन मुलाला चक्क निबंध लिहायची शिक्षा करणं, ते ही स्वतः शिक्षक नसतांना? हे दिव्य दूरदृष्टीचे एक उदाहरण आहे असं मला वाटतं.

      आजच्या कॉपी पेस्ट च्या जगात, मुलांनी निबंध लिहायचा- हे आव्हान अपघात करण्यापेक्षाही भारी आहे हो. निबंध लिहायचा म्हणजे विचार करणे आले. आता हल्लीच्या पिढीचा विचार करण्यावर विश्वास नाही. यांच्या मेंदूत विचार करण्याची प्रणाली विकसित झालेलीच नाही . कारण त्यांना विचार करण्याची संधी पालक आणि आपली शिक्षण व्यवस्था देत नाही .  ही  पिढी न कळत्या वयापासून सतत काहीतरी ऍक्शनपॅक्ड  प्रसंग बघत असते.त्यामुळे ही मुले डायरेक्ट कृती करणारी आहेत .मग निबंधासाठी मनातले विचार कागदावर उतरवण्याची शक्यता तर दूरच. तसंहीआता ही Gen -Z मुलं, कागदावर लिहिण्याची निर्बुद्ध कामं अजिबातच   करत नाही हो. ते टाईपतात . शब्दांऐवजी ईमोजी टाकतात.  आता अशा परिस्थितीत  विचार करुन, कागदावर    ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या प्रक्रियेतून ....सदरहू अल्पवयीन बाबू जेव्हा जाईल. ,तेव्हा त्याच्या बालमेंदूत किती वैचारिक वादळं आणि केमिकल लोच्या होईल याचा विचार संबंधित अधिकारी यांनी केला नाही का? याशिवाय  निबंध लेखनाबरोबर शुद्धलेखन,  व्याकरण, आणि चांगलं अक्षर हे ओघाने आलंच की हो. म्हणजे किती मानसिक ताण? यापेक्षा गाडी चालवून लोकांना मारणं किती बरं सोप्पंय.

      पण काहीही असो. निबंध लिहिण्याची शिक्षा हा भारतीय इतिहासात एक मैलाचा दगड ठरावा.  अल्पवयीन गुन्हेगारांचं मनपरिवर्तन  व मतपरिवर्तन घडवून  आणणाऱ्या वैचारिक क्रांतीची ही रुजवात आहे.  ही साधीसुधी कारवाई नाही तर अल्पवयीन अपराधींच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडवणारी एक प्रक्रिया आहे.बालसुधारगृहांच्या कार्यपद्धतीला एक वैशिष्ट्यपूर्ण , बौद्धिक कलाटणी मिळण्याचे हे संकेत आहेत. ज्या साहेबांनी ही शिक्षा ठोठावण्याचा विचार केला ते नक्कीच अभिनंदनाला पात्र आहेत. यात मला एक सूचना करण्याची खुमखुमी (मुलभूत प्रेरणा) आली आहे, ती म्हणजे अल्पवयीन भावी गुन्हेगारांच्या पालकांनाही १००० शब्दांचा निबंध लिहिण्याचा या शिक्षेत अंतर्भाव करावा. विषय मी सुचवू शकेन हे ही इथेच सुचवून टाकते हो.

         जो परिणाम आरटीओ कारवाई मुळे होणार नाही, वाहतूक पोलीसांच्या दट्ट्या मुळे होणार नाही, पब बंद केल्याने होणार नाही, तो परिणाम एका निबंधाने साध्य होईल. निबंध लिहिण्याच्या शिक्षेची दहशतच येवढी भयंकर असणार आहे की कुणाची बिशाद आहे हो गुन्हा करण्याची?

     वाईटातून चांगलं घडतं ते हेच!!!

Sunday, May 12, 2024

आई, तू कशाला काही करते?


        परवा वर्तमानपत्रात एका खटल्याच्या निकालाची बातमी वाचली. खटल्याच्या तपशिलात  शिरायची गरज नाही. एका पतीने पत्नीकडून आपल्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वर्षभरापूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हापासून मुलगी आईजवळ राहत होती. पतीच्या बाजूने जेष्ठ कायदेतज्ञ व मानवी हक्क कार्यकर्ता इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद केला. 'मुलीच्या आईचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे मुलीला आईच्या ताब्यात देणे योग्य नाही '..असे मत त्यांनी युक्तिवादात मांडले. यावर उच्च न्यायालयाने दिलेले उत्तर असे की, 'चांगली पत्नी नसणे, याचा अर्थ संबंधित महिला चांगली 'आई 'नाही असा नव्हे.   व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण असू शकते. परंतु अपत्याचा ताबा आईकडे न देण्याचे ते कारण असू शकत नाही.' असे निरीक्षण नोंदवून मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला.

    आता मुद्दा असा आहे की 'आई 'असणारी आणि 'व्यभिचार करणारी' व्यक्ति तर एकच आहे. इंदिरा जयसिंग यांनी महिलेच्या 'वागणुकीचा' निकष लावला तर उच्च न्यायालयाने 'आई' हा निकष लावला. म्हणजे फक्त आई असणे हे एक असामान्य गुणवैशिष्ट्य आहे का?

        यासंदर्भात महाभारतातील कुंतीची कथा आठवणे हे अपरिहार्य आहे .दुर्वास ऋषींनी शिवसेन राजाच्या कन्येवर -  कुंतीवर प्रसन्न होऊन वर दिला होता. ज्या देवाचे स्मरण केले , तो देव वश होईल अशी ती शक्ती होती. लग्नापूर्वी कुंतीने सहज सूर्य देवाचे स्मरण केले. सूर्य देव प्रगट झाले आणि त्यांनी कुंतीच्या नाभीला बोट लावले. 'माझ्याप्रमाणेच तेजस्वी पुत्र तुला होईल'.. असा आशिर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. आणि खरोखरच कुंतीला सूर्यपुत्राचा लाभ झाला. या  अनपेक्षित  घटनेने कुंती घाबरून गेली. समाजाच्या भीतीने तिने सूर्यपुत्राला नदीत  सोडून दिले व हे सत्य दडवून ठेवले. आता या प्रसंगी कुंतीने कशाला प्राधान्य दिले- हे तर सर्वश्रुतच आहे. म्हणजे एका स्त्रीच्या व्यक्तिमत्वात आई असण्याबरोबरच अनेक गुण अवगुण एकवटले असतात. मग केवळ ती आई आहे म्हणून श्रेष्ठ ठरते का?

 आपल्या  संस्कृतीने  मातेचा नेहमीच गौरव केला आहे किंबहुना मातेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. (ओव्हर रेटेड - मराठीत हो).

 •'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी|'

    •'न मातु :परदैवतम् | ' 

 • 'कुपुत्रो जायते  क्वचिदपि, माता कुमाता न भवति|

 •'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.'

 •'देवाला प्रत्येक  ठिकाणी जन्म घेणे शक्य नव्हते म्हणून  त्याने आई निर्माण केली'.

     अशा  आणि  यासारख्या असंख्य वाक्प्रचार ,सुभाषिते श्लोकांनी  प्रत्येक भारतीय मनाचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे. उपरोक्त ही जी ब्रह्मवाक्ये आहेत, ती शाळेत निबंधात लिहून, पाठ करून , आई बद्दल अतिउदात्त धारणा प्रस्थापित झाल्या आहेत .आई म्हटले की ममतेचा सागर, त्यागमूर्ती, आदर्श, वात्सल्य,करुणा  इत्यादी घासून गुळगुळीत झालेले शब्द वापरलेच पाहिजेत असा असा एक अलिखित नियम आहे. याशिवाय चित्रपट, मालिकांमध्ये दाखवलेली आई तर अतिरंजित स्वरूपात असते. ऐन कसोटीच्या, जीवन मरणाच्या प्रसंगात ही सिनेमातली आई मुलासमोर भात्यातले एक ब्रह्मास्त्र सोडते. 'नौ महिने मैने तुम्हे अपने पेट मे पाला है....'

  प्रत्यक्ष ब्रम्हदेवाला आव्हान देणारे हे 'भावनिक ब्रम्हास्त्र'..मुलाला क्षणात गारद करणारे!!!


      वास्तविक नऊ महिने बाळाला पोटात सांभाळणे हा काही विश्वपराक्रम नाही किंवा  जन्मणाऱ्या बाळावर केलेले उपकार तर नाहीच नाही. ही अत्यंत नैसर्गिक अशी शारीरिक घटना आहे, ज्यात भावी आईचे काहीही कर्तृत्व नाही. उठसुठ, 'तुला नऊ महिने पोटात वाढवले आणि तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या'... हे वाक्य हुकमी एक्क्यासारखे का म्हटले जाते, हे अनाकलनीय आहे. 'गाजर का हलवा' खाऊ घालणारी, सतत टिपे गाळणारी, मशीन वर कपडे शिवणारी, डोक्यावर घमेले घेऊन  दगड उचलणारी, स्वतः उपाशी राहणारी..... अशा ठराविक साच्यातील आईची प्रतिमा चित्रपटात रंगवली जाते.

 पण आई ही सुद्धा एक हाडामांसाची जिवंत व्यक्ती आहे. तिला चांगल्या वाईट संवेदना आहेत . तिचा ठराविक स्वभाव आहे. तिला आवडीनिवडी आहेत. ही वस्तुस्थिती महत्त्वाची नाही का ?  प्रत्येक आई आपल्या कुवतीनुसार ,बुद्धीनुसार आपल्या अपत्यांची काळजी घेत असते. संगोपन करते. कुठेही गेली तरी तिचा जीव लेकरांमध्ये गुंतला असतो .अपत्याच्या सुखासाठी ती जे जे शक्य असेल ते ती करते. आई व मुले हे एकमेकांचे सर्वस्व असतात. निरपेक्ष प्रेम हे आईचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे मायलेकांचे नाते हे सर्वोत्कृष्ट मानले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी, भविष्यातील सुरक्षित जीवनासाठी ती वैयक्तिकरित्या अनेक तडजोडी करते.ही प्रत्येक आईची गुणवैशिष्ट्ये आहेत..जी सर्वसामान्य आहेत, अंगभूत आहेत. (बाय डिफॉल्ट - मराठीत हो.)

        पण अनेकदा, ती मुलांच्या अती लाडापोटी चुकते सुद्धा. 'सुपर कीड' ची 'सुपर मॉम' बनण्याच्या हव्यासापोटी ती भरकटतेही .मुलांवर आपल्या अपेक्षांची ओझी लादून, त्यांचे बाल्य हिरावल्या जाते आहे , याचेही तिला भान नसते. मुलांचे बोट धरून चालताना,त्यांना वाढवताना ती सक्षम झाल्यावर, एक क्षण असा येतो की अलगद पणे मुलांचे बोट सोडून त्यांना स्वातंत्र्य द्यायचे असते. मुलांचे विवाह झाले की आईच्या भूमिकेतून हलकेच अंग काढून घ्यायचे असते. पण ही समयोचित वागणूक अनेक आयांना जमतेच असे नाही.

  .'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे'...( कोणी लिहिले आहे देव जाणे) हे ब्रह्मवाक्य सुद्धा आईवर लादले जाते. मातेच्या भूमिकेतून तिने कधी बाहेरच येऊ नये असा 'सोयिस्कर बहुमान' तिच्या गळी उतरवला जातो. आणि या अपेक्षांच्या दडपणाखाली, 

'पुत्राचे सहस्त्र अपराध ,माता काय मानी तयाचा खेद'..      असे म्हणत ती अपत्याचे लाड करते. त्याच्या चुका पोटात घालते. स्वतः झिजत राहते. मग ज्यावेळी या आईचे काळीज प्रेयसी कडे घेऊन जाताना मुलगा ठेचकाळतो, तेव्हा.. 'तुला लागले तर नाही ना बाळा?'.. असा त्या आईच्या काळजातून हुंकार येतो. हे तर आईच्या उदात्तीकरणाचे अतिरेकी उदाहरण आहे.त्यावर अजून तडका मारणारी लोकप्रिय मालिका...' आई कुठे काय करते?' यातल्या अरुंधतीला 'महाराष्ट्रभूषण' नक्की मिळणार बघा.सध्याची मालिकेची लांबण बघता, 'आई तू कशाला काही करते?'...असे म्हणावेसे वाटते.

      वास्तविक भारतीय संस्कृतीने 'मातृत्वाचा' गौरव केला आहे. 'आई' या मर्यादित व्यक्तिमत्त्वाचा नाही. मातृत्व ही एक उदात्त, उन्नत वृत्ती आहे. जी मानवी जीवनाची  परमोच्च,उत्कट  भावना    आहे. सगळ्या संतांना त्यांचे परमभक्त 'माऊली' म्हणतात. 

"विठु माझा लेकुरवाळा" या संत जनाबाईच्या अभंगातून किंवा... "बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई"- या संत एकनाथांच्या अभंगातून जे सर्वव्यापी, निरपेक्ष निर्मळ मातृत्व प्रतित होते, ते उच्च कोटीच्या संतांमध्ये प्राधान्याने दिसून येते.राणी कौसल्येला आदर्श मातृत्वाचे प्रतिक समजले जाते.पण हा बहुमान कैकेयीला का मिळाला नाही ? कारण तिच्या मातृत्वाला स्वार्थ आणि मत्सराची किनार होती.

महानायक श्रीकृष्णाची आई देवकी.पण श्रीकृष्ण वाढला तो यशोदेच्या वत्सल छायेत.

अगदी प्रसिद्ध उदाहरणे बघायची तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल, मदर टेरेसा, माता जिजाबाई, सिंधुताई सपकाळ... यांचे वंदनीय मातृत्व कायम प्रेरणा देणारे आहे.आणि महत्त्वाचे म्हणजे ही मातृत्व वृत्ती पुरुषातही असते तसेच आई होऊ न शकलेल्या स्त्रीतही असते.

      थोडक्यात काय, आई आणि मातृत्व वृत्ती यांच्यात गल्लत होऊ नये.स्त्री ही व्यक्ती म्हणून उत्तम असेल तर ती आई म्हणूनही उत्तमच असते.अविवेकी,अविचारी स्त्री असेल तर ती आईही तशीच असू शकते.स्त्री व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगिण मूल्यमापन केल्यानंतरच तिच्या 'आईपणाला' जोखणे गरजेचे आहे. म्हणूनच केवळ 'आई होणे ' हे  जीवनाचे सार्थक नाही तर जिजामातेसारखी मातृत्व वृत्ती असेल तरच शिवाजी घडतात .मुलांना सतत उपदेश देऊन,त्यांची तुलना करून , अनेक क्लासेस ला पाठवून संस्कार होत नसतात. पालकांची दैनंदिन, प्रासंगिक वागणूक आणि कौटुंबिक वातावरण....यातून संस्कार आपोआप झिरपतात.म्हणूनच म्हणावेसे वाटते.....'आई तू कशाला काही करते?'


#मदर्सडे

#आई

Sunday, April 14, 2024

मर्यादा पुरुषोत्तमाची जडणघडण

 


सध्या प्रभू श्रीरामाचे नवरात्र सुरू आहे. जो तो आपल्या परीने श्रीरामाची उपासना करीत आहे. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची पार्श्वभूमी यावर्षीच्या रामनवमीला लाभली आहे. त्यामुळे या रामजन्मोत्सवाला ऊर्जा, भक्ती, पूजन यांचा परमोच्च आविष्कार समाजात दिसून येईल यात शंका नाही.

 प्रभू श्रीरामाला भारतीय जनमानसात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची प्रचिती अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी आलेली आहेच.      रामायण या महाकाव्याची निर्मिती  त्रेतायुगात  झाली आहे. त्यानंतर द्वापार युग सुरू झाले आणि आता आपण कलियुगात आहोत. पण आजही रामायणाचे गारुड तसेच आहे किंबहुना ते वाढतानाच दिसते आहे. याचे काय कारण असावे?      

            प्रामुख्याने भारतीय संस्कृतीची मशागत होण्यामध्ये रामायणाचा सिंहाचा वाटा आहे. दुसरे असे की ही विजय गाथा आहे. धर्माचा अधर्मावर, सद्गुणाचा दुर्गुणावर, सन्नितीचा अनितीवर - विजय तर रामायणात आहेच पण तो केवळ  शस्त्र सामर्थ्याने नाही तर तो श्रेष्ठ सदाचरणाने प्राप्त झाला आहे.  त्यामुळे युगानुयुगे सदाचरणाची प्रेरणा रामायणातून मिळत आलेली आहे. तिसरे कारण म्हणजे रामायणातील पात्रांनी आदर्शांचे मापदंड प्रस्थापित  केलेले आहेत. हे आदर्श व सिद्धांत काळाच्या प्रत्येक लाटेच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. त्यामुळे रामकथा आजही काल सुसंगत आहे. चवथे कारण म्हणजे रामराज्य हे मूल्यांचे राज्य आहे. कर्तव्याच्या तुलनेत वैयक्तिक मोह, भावना, प्रेम यांना महत्त्व न देता, केवळ प्रजाहिताला या राज्या प्राधान्य दिले आहे. आजच्या काळात अशा रामराज्याच्या स्मरणानेही समाजाला आत्मिक समाधान लाभते. पाचवे कारण म्हणजे प्रभू श्रीराम ही एक व्यक्ती किंवा ईश्वर नाही. तर राम ही वृत्ती आहे, विचार आहे, आचरण आहे. एवढेच नाही तर राम हे तत्व आहे. असा हा राम प्रत्येकाच्या हृदयात असतो. रामकथेत तो 'आत्माराम' जागृत करण्याची शक्ती आहे. त्यामुळे रामायण हे भारतीयांच्या रक्त मांसपेशीत रुजले आहे. आणि पिढी दर पिढी ते त्याच उत्कटतेने झिरपते आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, 'माझा राम आधी विश्वनंदन आहे.आणि मागाहून तो दशरथनंदन आहे.

        रामायणातील सगळी पात्रे आपल्याला खूप जवळची वाटतात. यातील राजस्त्रियांच्या चरित्रात डोकावून बघितले तर स्त्रीशक्तीची असामान्य रूपे आपल्याला स्तिमित करतात. मातृशक्ती, त्याग, समर्पण, निष्ठा, संयम इत्यादी गुणांचा उत्तुंग आविष्कार म्हणजे रामायणातील स्त्रिया. रघुकुलातील राजांनी रणभूमीवर आपल्या शस्त्र सामर्थ्याने विजय मिळवला आहे. त्याचवेळी या राजस्त्रियांना देखिल अनेक लढ्यांना सामोरे जावे लागले आहे - तेही राजमहालाच्या चार भिंतीत आणि शस्त्रांशिवाय. कुणी वासनांध वृत्तीशी, कुणी विश्वासघाताशी, कुणी संशय पिशाच्चाशी , कुणी उपेक्षेशी तर कुणी नियतीच्या अगम्य खेळीशी लढा दिला आहे. ही लढाई त्यांना कधी आप्तस्वकीयांशी तर कधी स्वतःशीही करावी लागली आहे. आणि या युद्धात धैर्य, संयम, विवेक, मर्यादा, पातिव्रत्य ,श्रद्धा या शस्त्रांनी त्यांनी यश मिळवले आहे. या विजयाची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रामायणाची उत्तुंगता या राजस्त्रियांमुळे कमालीची उंचावली आहे. वास्तविक या प्रत्येक राजस्त्रियेच्या ललाटावर नियतीने एका अटळ व्यथेचा शिक्का मारून ठेवला आहे. प्रत्येकीच्या राजवैभवी जीवनाला वेदनेची किनार आहे. 

         राणी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रेला सुरुवातीला अपत्यहीनतेचे शल्य उरात बाळगून, जगण्याला सामोरे जावे लागले आहे .यात नियतीचा काय हेतू असावा? पुढे स्वतःच्या गुणांनी रमविणारा आणि योगी जिथे रमतात- असा राम, सुलक्षणांनी युक्त लक्ष्मण, विश्वाचे भरण पोषण करणारा भरत आणि आणि शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघ्न- अशा चार अलौकिक आणि दिव्य पुत्रांची प्राप्ती तीनही राण्यांना झाली. हे चारही पुत्र यथावकाश राजनीती, युद्धनीती, प्रजा धर्म, कर्तव्यनिष्ठा यांचे धडे ऋषीवरांच्या मार्गदर्शनात गिरवीत होते. त्याचवेळी त्यांच्यातला ॠजू ,समंजस, सात्विक, प्रेमळ ,संयमी, निश्चयी- असा माणूस घडत होता तो  त्यांच्या तीनही मातांच्या संस्कारांमुळे. सद्गुणांनी परिपूर्ण अशा पुत्रांची जडणघडण - ज्यांना आज आपण भावनिक बुद्ध्यांक किंवा 'सॉफ्ट स्कील्स' म्हणतो त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे . बालवयात पुत्रांवर या उन्नत भावनांचे रोपण  करण्याचे श्रेय हे या तीनही मातांचे आहे. रामायणातला हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.वाल्मिकी रामायणात रामाचे ७२ गुण सांगितले आहेत.

     राणी कौसल्या ही मातृत्वाचे प्रतिक म्हणून नेहमीच गौरविली जाते. तिरुपती बालाजी मंदिरात देवाला जागे करताना 'कौसल्या सुप्रजा रामा, पूर्वा संध्या प्रवर्तते'- या भूपाळीत प्रथम उल्लेख कौसल्या मातेचा आला आहे. वनवासाला जाणाऱ्या रामाला बघून ती कोसळते, उन्मळून पडते पण रामानेच  तिची समजूत घालून तिला शांत केले आहे.राजधर्म आणि कुलधर्माचे भान ठेवून ती कमालीच्या धैर्याने या प्रसंगाला सामोरी गेली आहे.कैकेयीचा अपराध तिने शांतपणे पोटात घातला आहे.संतप्त झालेल्या भरताला तिने आत्मीयतेने,प्रेमाने त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.१४ वर्षे रामाला तिने आपल्या नजरेत साठवून ठेवले आहे. आणि वनवासातल्या रामाला तिच्या दिव्यदृष्टीतून प्रेम आणि बळ मिळाले आहे. म्हणूनच 'कौसल्येयो दृशो: पातुं'.. असे रामरक्षेत म्हटले जाते.

            राणी कैकेयी ही युद्धनिपूण, बुद्धिमान आणि निग्रही आहे.राजा दशरथाला तिने अनेकदा राज्यकारभारात योग्य सल्ला दिला आहे. .श्रीरामावर तिचे भरता पेक्षाही अधिक प्रेम आहे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वार्तेने ती आनंदून गेली आहे. अशावेळी या असामान्य राजस्त्रीला मत्सराची बाधा कशी होऊ शकते? हा प्रश्न नेहमीच पडतो. पण याचे उत्तर कैकेयीच्या आई मध्ये तर दडले नसावे?? राजा अश्वपती व शुभलक्षणा यांची ही कन्या. राजा अश्वपतीला पक्षांची भाषा अवगत होती. पण या पक्षांचे संभाषण कोणालाही सांगण्याची त्याला अनुमती नव्हती. हे संभाषण सांगितले तर अश्वपतीचा मृत्यू अटळ होता. एकदा राणी शुभलक्षणाने हे संभाषण सांगण्याचा हट्ट राजाजवळ धरला. या हट्टापायी माझा मृत्यू होऊ शकतो - असे राजाने तिला समजावून सांगितले. तेव्हा राणीचे उत्तर होते -

' मग तुम्ही मरा, पण मला संभाषण सांगा '. अशा राणीचा अश्वपती राजाने त्याग केला आहे. त्यामुळे कैकेयीला  मातृसुख मिळाले नाही. पण कदाचित आईचा आततायी, अविवेकी स्वभाव तिच्यात उतरला असावा का? अर्थातच रामायण घडण्यासाठी कैकेयीचा मत्सरभाव जागृत होणे हे विधीलिखितच होते. पण नंतर काही काळाने आपल्या कृत्याचा तिला पश्चातापही झालेला आहे.महत्वाचे हे, की या प्रसंगामुळे भरताने कैकेयीची निर्भर्त्सना केली आहे .मात्र रामाच्या मनातील  तिचे स्थान अजिबात डळमळीत झालेले नाही.

      कायम सन्मार्गाने जाणारी- ती राणी सुमित्रा. सौमित्र तिचा पुत्र. पण त्याआधी तो रामाचा उजवा हात, रामाचा बहिश्चर प्राण आणि रामाची सावली आहे, हे ती जाणून आहे. त्यामुळे रामासोबत वनवासात जाण्याच्या निश्चयापासून ती लक्ष्मणाला परावृत्त करित नाही. रामाचे संरक्षण करण्याची क्षमता लक्ष्मणातच आहे हे तिला पक्के ठाऊक आहे‌. कर्तव्य आणि ममता यांच्यात निवड करायची झाल्यास, ममतेला मागे सारणे- हा सुमित्रेचा स्वभाव लक्ष्मणातही पूर्णतः उतरला आहे. विवेकी आणि खंबीर असलेली सुमित्रा राजमहालाच्या एका अभेद्य भिंतीप्रमाणे कुटुंबियांना आधार देत राहिली. पुत्र वियोगाने राजा दशरथाचे प्राण गेले पण तीनही राण्या मात्र पुत्रवियोग व पतीवियोग होऊनही चिवटपणे झुंज देत राहिल्या आहेत. श्रीरामांच्या अस्तित्वातून स्वतःची शक्ती एकवटत राहिल्या आहेत.

            लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही सीतेची लहान बहिण आहे. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यातील अद्वैत समजून घेणे आणि ते पचविणे हे उर्मिलेतील पत्नीला किती अवघड झाले असेल? सीतेप्रमाणे ती देखील वनवासात जाण्याचा हट्ट करू शकली असती पण तिने तसे केले नाही. वनवासात श्रीराम आणि सीतेचे रक्षण करण्याचे लक्ष्मणाचे कर्तव्य आहे, हे ती जाणून आहे. व त्या कर्तव्याच्या आड येण्याचे संस्कार तिच्यावर नाहीत. लक्ष्मणाला उर्मिलाच्या मूकसंमतीची खात्री असल्यामुळे  तिचा पाठिंबा हे त्याचे बळ आहे. लक्ष्मण आणि उर्मिले मधील अव्यक्त असे परस्पर सामंजस्य हे खरे त्यांच्या नात्याचे बलस्थान आहे .उर्मिलेने महालात राहून  वनवास भोगला आहे. शांत तेवणाऱ्या ज्योती प्रमाणे तिने १४ वर्षे अखंड जळून वनवासातल्या  स्वकीयांना आश्वस्त केले आहे.

             रामायणाची महानायिका म्हणजे सीता. 'सहचारिणी' हे नाते तिने सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले आहे.श्रीरामा बरोबर सीता ही काया,वाचा ,मन आणि आत्म्याच्या स्तरावर एकरुप झाली आहे.श्रीराम वनवासाला निघाले त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी सीतेला राजगादी वर बसण्याची सूचना केली होती - यावरुनच तिचे सामर्थ्य लक्षात येते. वनवासात सीता आणि श्रीरामाच्या अनेक तात्विक मुद्द्यांवर चर्चा झाल्या आहेत. अशोक वनात असलेल्या सीतेच्या जवळपासही रावण फिरकू शकला नाही याला कारण सीतेचे  प्रखर तेज.पती श्रीराम आणि राजा श्रीराम यात सीतेने कधीही गल्लत केलेली नाही.पती आणि राजा यातील सीमारेषेची तिला अचूक जाण आहे. 'प्रजेसाठी निर्णय घेताना राजा श्रीरामांनी माझ्यावर अन्याय केलाही असेल कदाचित.. पण पती श्रीरामांनी मला एक क्षणही अंतर दिले नाही '..असे म्हणणारी सीता ही कायम वंदनीय आहे.

      रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांचेही स्मरण करणे गरजेचे आहे कारण 'रामलल्ला' ते  'पुरुषोत्तम' या प्रवासात राजस्त्रियांच्या भूमिकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव - हा पुरुषोत्तमाच्या व्यक्तिमत्वासाठी नक्कीच साह्यभूत ठरला आहे. बालवयात रामाच्या जडणघडणीला तीन मातांनी आकार दिला तर पुढे श्रीरामांनी आपल्या आचरणातून या स्त्रियांना समृद्ध केले.परस्पर पूरक अशी ही नाती आहेत.

    या स्त्रियांच्या आयुष्यात अनेक संकटे, वादळे आलीत.पण त्यावर धैर्याने, निष्ठेने, श्रद्धेने मात करण्याची शक्ती ही पुरुषोत्तमाच्या प्रभावाने त्यांना प्राप्त झाली आहे.त्यांच्या अलौकिक चरित्राचा कालप्रवाहावर पडलेला अमीट ठसा आजही वंदनीय, चिंतनीय आणि मार्गदर्शक आहे.


#रामायण

#रामायणातीलस्त्रीपात्रे

Sunday, November 26, 2023

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी


 

मध्यंतरी आमचा अंगणातला बगीचा साफसूफ करण्यासाठी एक माळी जोडपं आलं होतं.संपूर्ण बगीचा त्यांनी व्यवस्थित ,नीटनेटका केला पण इकडे तिकडे अनेक तुळशीची झाडं कशीही वाढली होती,ती त्यांनी तशीच ठेवली होती.त्याबद्दल मी त्यांना हटकलं तर ती बाई म्हणाली.

    'माऊली ला नाई तोडत आमी.देवी हाय  ती.तुमच्या दारी आली ना ती, मंग राहू द्या नं तिले.रायचं तितके दीस राहील ती.' असं म्हणून तुळशीला हात जोडून ती दोघं निघून गेली.

    का कुणास ठाऊक पण त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला.मला माझीच लाज वाटली.त्यांच्या प्रगाढ श्रद्धेचा मला हेवा वाटला. एक तुळशीवृंदावन पुरेसं आहे की रोज पाणी घालायला आणि दिवा लावायला.... इतपतच माझी भूमिका कम श्रद्धा होती. पण आत खोलवर मला खूप हलवून गेलं त्यांचं बोलणं.मी राहू दिली तशीच ती झाडं.

    आणि नुकतीच बातमी आली की महाराष्ट्रात प्रदूषणाचं प्रमाण कमालीचं वाढलंय आणि त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.मला एकदम तुळस आणि पर्यावरण रक्षण यांचा संबंध आठवला. तुळशीला नैसर्गिक हवा शुद्धीकारक समजलं जातं. दिवसातून बारा तास तुळस ऑक्सिजन सोडत असते.आणि वातावरणातील कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड हे घातक वायू शोषून घेत असते.तसंच तिच्यात असलेलं यूजेनॉल हे संयुग डास,कीटकांना दूर ठेवतं.आणि त्यामुळेच तुळस प्रत्येकाच्या घरासमोर असते.

    भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र मानतात,त्याचं कारण पर्यावरणाशी संबंधित असावं का? कारण आपले पूर्वज अत्यंत खुबीने वैज्ञानिक गोष्टींवर धार्मिकतेचं पांघरूण घालून आपल्या कडून योग्य ते करवून घेण्यात तरबेज होते.

    पौराणिक कथा बघितल्यास, तुळशीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आढळतात. प्राधान्याने त्यात तुळशीच्या वाट्याला दुःखच आले आहे .कथा आणि कथानायक वेगवेगळे आहेत पण तुळशीची वेदना मात्र तशीच आहे. कसल्या ना कसल्या व्यथेपोटीच तुळशीची उत्पत्ती झाली आहे. पतीच्या आधी भोजन केले म्हणून एका ऋषी पत्नीला राक्षसी होण्याचा शाप भोगावा लागला. या राक्षसी अवतारात ती ऋषी पत्नी अनेक वर्ष जगत राहिली. सुटकेची वाट बघत आयुष्य कंठत राहिली. अखेर एका भक्ताने केलेल्या कृष्णाच्या नामस्मरणाला ऐकून तिला मृत्यू आला. पण तिचा देह तब्बल वर्षभर जळतच राहिला. शंकर-पार्वतीने  जेव्हा ही चितान बघितली तेव्हा ते स्तिमित झाले. मृतावस्थेतही ही इतकी शोभायमान आहे. 'मृता लसती- सा एव तुलसी' अशी ही तुलसी आहे. म्हणून त्यांनी तिला स्पर्श केला आणि भूतलावर कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रातःकाळी ती उगवली. भगवान विष्णू ने तिला वर दिला की तुळशी शिवाय माझी पूजा संपूर्ण होणार नाही. तुळशीला मिळालेल्या या मोठेपणामागे तिने सोसलेल्या दुःखाचा डोह जाणवल्याशिवाय राहत नाही. 

    दुसऱ्या कथेत तर या तुळशीचा देवांनी

 उपयोग करून घेतलेला आहे .वृंदा नावाच्या राजकन्येचा पती जालंधर हा प्रचंड शक्तिमान होता .त्याच्यापासून देवांना धोका निर्माण झाला होता. कपटाने देवांनी जालंधरच्या शरीराचे हुबेहूब दोन तुकडे करून वृंदेला दाखविले. वृंदा शोकसागरात बुडून गेली. मग देवांनीच साधू वेष घेऊन जालंधरला जिवंत करण्याचे नाटक केले. हा जालंधर म्हणजे भगवान विष्णूच होते. भोळी वृंदा आनंदली. प्रेमभराने तिने जालंधरला मिठी मारली. देवांचं कपट तिच्या लक्षात आलं नाही. आपल्या पतीशी पूर्ण एकनिष्ठ असलेली वृंदा परपुरुषाच्या स्पर्शामुळे भ्रष्ट तर झालीच पण खऱ्याखुऱ्या जालंधराने तिला हे कृत्य करताना बघितले. जालंधर क्रुद्ध झाला. भ्रष्ट झाल्यामुळे वृंदेची पुण्याई संपली आणि खरा जालंधर मरण पावला. संतापानं आणि दुःखानं वृंदेने विष्णूला शाप दिला. तिच्या शापामुळे भगवान विष्णू अस्वस्थ झाले. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंं साठी भूतलावर तुळस लावली. तिलाच वृंदा किंवा विष्णुप्रिया म्हणतात. 

           अशा अनेक कथा पुराणात सांगितलेल्या आहेत.स्त्रीरुपात भोगलेली अपरिमित दुःखे आणि परिणामी निर्माण झालेली तुळस.....हे सगळ्या कथांचं सार. म्हणूनच तुळशीचं आणि वेदनेचं  अतूट नातं आहे. 

           या कथा वाचताना आणि तुळशीची वेदना समजून घेताना मला प्रसिद्ध लेखिका श्रीमती दुर्गा भागवतांच्या  'निसर्गोत्सव' पुस्तकाची प्रकर्षाने आठवण आली. तुळशीबद्दल त्या लिहितात, 

           


'अगदी साधी ही तुळस. कधीच डोळ्यात न भरणारी. झाडाची नैसर्गिक शोभा एवढीच की ते नाजूक आहे. मंजिऱ्या तर विचारूच नका. निळी- जांभळी अशी ती अर्धी देठाच्या संपुटात लपलेली फुले  - त्यांचा गंधही वाऱ्यावर पारिजातकाप्रमाणे भिरभिरणारा नाही. झाडाची सळसळ नाही. काही नाही. ना या झाडावर भुंगे झेपावत की पाखरे घरकुल करीत. मग असे काय मनोवेधक या तुळशीच्या रोपट्यात आहे? हातात खुडून घेतले तरच त्याचा गंध येतो. आणि हा गंध मात्र जागच्या जागी बसणारा असला तरी ह्रुद्य असतो मादक नसतो. मंजिरीतले प्रत्येक फूल न्याहाळले तर ते थरथरलेले दिसते. लाजेने लपलेले वाटते. प्रत्येक उमललेले फुल अति नाजुक व निखोड रंगछटांनी नटलेले असते.  घरातल्या वृंदावनाचे सोडा पण रोपही एरवी कधी एकटे दुकटे नसते. त्याचे बी किती काळेभोर व सुंदर असते वाऱ्याच्या लहरी बरोबर ते सहज उडून जाते आणि पहिल्या सरी बरोबरच उगवते. आणि मग तुळशीचे बनच्या बनच उगवते. अनिवार साधेपणाचे तुळशीचे लहानखोरे रूप भारतीय मनात प्रांतोप्रांती वसलेले आहे. विष्णूच्या प्रणयिनीत ही नायिका  लाजाळू असते. ही तुळस हाडामासाची स्त्री नाही तर ते एक झाड आहे. हा  झाडरुपी देह असा आहे की त्याचा कायीक संपर्क कुणाही पुरुषाशी होणारच नाही. तिचे बारोमास फुलणारे पुष्पमय ह्रुदय मात्र प्रियकराचे अखंड सांनिध्य शोधत असते. तुळशीचे लग्नही बाळकृष्णाशी होते. ही सुद्धा तिच्या भोगरहित सौभाग्याची आणि अखंड कौमार्याचीच खूण आहे . लग्नाशिवाय स्त्रीने राहू नये. जी राहील ती पतिव्रता असायची नाही, असे मत पुराणात स्वच्छ दिलेले आढळते म्हणून तुळशीच्या लग्नाचा हा पसारा मांडण्यात आला आहे. तुळस ही उत्कंठित प्रेमला असली तरी ती चिरकुमारी आहे हेच या प्रथेचे अंतिम सार आहे. ही कल्पना महाराष्ट्रात पूर्वापार रुढ आहे. उदाहरणार्थ, कुमारिकेच्या चोळीवर तुळशी शिवाय दुसरा कोणताही कशिदा काढायचा नाही असा नियमच महाराष्ट्रात नागपूरच्या बाजूला अजून पर्यंत रूढ होता. तुळशीबद्दलच्या सर्व कथांचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की त्या भीषण कारुण्याने भरलेल्या कथा आहेत.'    तुळशीबद्दल दुर्गाबाई भागवतांचं हे भाष्य वाचल्यावर मला तुळशीची वेदना मुळापासून जाणवली. किती अवघड दिव्य पार केल्यावर तिला भारतीय संस्कृतीत मानाचं स्थान मिळालं आहे. मला लोकगीतातल्या दोन ओळी आठवल्या. 

तुळशी गं बाई, 

काय तुझं हे जीणं,   गोविंदाच्या संगे, 

वरसा वरसाला लगीन'   दुसऱ्या स्त्रियांची दुःखं ऐकून घेणारी ही तुळस स्वतःच वेदनांचं एक मूर्तिमंत रूप आहे. तुळशीचा विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमे पर्यंत केला जातो.ऊस हा मामा म्हणून तिच्या पाठी उभा असतो. तुळशी विवाहा नंतरच लग्नाचे मुहूर्त काढण्याची पद्धत आहे.

    आयुर्वेदात अनेक औषधात तुळशीचा वापर केला जातो. सर्दी, खोकला,ताप या औषधात तुळस असतेच.त्वचारोग व कृमींवर तुळस अतिशय परिणामकारक आहे. तिच्यात असणारं, 'थायमॉल' हे तत्व डास, कीटकांना दूर ठेवतं.

    अशी ही बहुगुणी तुळस.  तिच्या पानाशिवाय नैवेद्य परिपूर्ण होत नाही.मृत व्यक्तीच्या मुखातही तुलसी पत्र ठेवण्याची प्रथा आहे. धार्मिक, पौराणिक, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी असणारी आणि स्त्री ची सखी असणारी ही तुळस सगळ्यांच्या घरी प्रवेशद्वारीच असते.

   पूजने कीर्तने ध्याने, 

रोपणे धारणे कलो। 

तुलसी दहते पापं, 

स्वर्गं मोक्षं ददातिच ।।

   अशा या तुळशीचे पूजन प्रत्येक घरात व्हावं असं शास्त्र सांगतं .

श्रीकृष्णासारख्या महानायकाच्या पत्नीचं पद तिला मिळालं आहे पण पूर्वायुष्यात चारित्र्यहीनतेच्या  आरोपातून गेल्यावरच. दरवर्षी विवाह वेदीवर चढून आपलं पत्नीत्व सिद्ध करण्याचं दिव्य तिला करावं लागतं तरीसुद्धा श्रीकृष्ण पत्नीचा पहिला मान रुक्मिणीचा असतो. अशा या तुळशीच्या व्यथा समजून घेऊन प्रत्येक भारतीय स्त्रीने तिला योग्य तो सन्मान देऊन जास्तीत जास्त रोपांचं संगोपन करावं हीच काळाची गरज आहे.

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...