Showing posts with label पुलं साहित्य - मुक्त मुशाफिरी. Show all posts
Showing posts with label पुलं साहित्य - मुक्त मुशाफिरी. Show all posts

Sunday, June 13, 2021

"एक शून्य मी" - पुलंचं निराळेपण


      १२ जून. पुलंचा स्मृतिदिन. पुलंना आठवायला स्मृतिदिन कशाला हवा? ते तर रोजच कुठे ना कुठे तरी भेटतातच. - - हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य असलं तरी ते वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण त्यामुळे स्मृतिदिनाचं महत्त्व कमी होत नाही. या दिवशी या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या आठवणींना,साहित्याला, कर्तृत्वाला व्याख्यानाद्वारे, लेखाद्वारे, काही नियोजित कार्यक्रमाद्वारे उजाळा मिळतो आणि त्या व्यक्तिमत्त्वाची परत नव्याने ओळख होते. नवीन पिढीला  प्रेरणा मिळते. मनात आनंद आणि अभिमानाची भावना जागृत होते.आपल्या श्रद्धेय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक निमित्त असतं.  त्यासाठीच हा लेखन प्रपंच. 

     


योगायोगाने १२ जून २०२१ ला पुलंच्या "एक शून्य मी" या पुस्तकालाही वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुलंच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृतिदिनी मौज प्रकाशनाने हे पुस्तक १२ जून २००१ साली प्रसिद्ध केलं.  अनेक नियतकालिकांमधून  प्रसिद्ध झालेल्या पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात अगदी १९६२, ६४आणि ६९ साली लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे तर काही लेख हे १९९२, ९६ आणि ९९ सालातले आहेत. उर्वरित लेख हे १९७० ते ९० या कालावधीतले आहेत. 

      खरंं तर "एक शून्य  मी" हे पुलंच्या पुस्तकाचं शीर्षक वाचूनच मनात प्रश्न निर्माण होतो आणि यात नेमकं काय असेल ही उत्सुकता ताणल्या जाते.  पुलंचं साहित्य ढोबळमानानं विभागायचं ठरवलं तर, - विनोदी, वैचारिक, व्यक्तीचित्रणात्मक आणि नाटकं -- असं होऊ शकेल. त्यातल्या त्यांच्या वैचारिक आणि व्यक्ती चित्रणाच्या लिखाणाचा बाज नेहमीच सकारात्मक आणि कौतुकाचा आणि गुणग्राहकतेचा राहिलेला आहे. व्यक्तिंविषयी, सामाजिक कार्याविषयी,संस्थांविषयी लिहितांना पुलंनी उत्तम, उदात्त उन्नत, सुंदर  अशा बाजूंवर प्रकाश टाकलेला आहे त्यामुळे ते लिखाण अत्यंत टवटवीत , ऊर्जस्कर  आणि दिशादर्शक झालं आहे. यावर अर्थातच मधून मधून विनोदाचा  तडका असल्यामुळे ते परत परत वाचावंसं वाटतं. त्यांच्या लेखनात कुठेही नकारात्मकता, वैफल्य, निराशा, वैताग असा सूर कधीच नसतो. मग ते कोणतेही लिखाण असो. अशा वेळी "एक शून्य मी" या पुस्तकातून पुलंना नेमकं काय सांगायचं असेल, ही उत्कंठा होतीच.खरंतर, "एक शून्य मी" पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत.आजवर अनेक वाचकांनी त्याची पारायणंही केली असतील. पण या पुस्तकातला "एक शून्य मी" हा लेख नेहमीच मला व्यथित करुन जातो.त्यातून एका निराळ्या पुलंचं दर्शन होतं. स्मृतिदिनाच्या निमित्तानं 'त्या' पुलंचं स्मरण............

      आजच्या या अतिवेगवान तांत्रिक युगामुळे माणसांमधील बोथट होत जाणाऱ्या संवेदना आणि खिळखिळ्या झालेल्या  जाणिवांमुळे पुलं व्यथित झालेले आहेत आणि ती खंत त्यांनी विविध लेखांद्वारे व्यक्त केली आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. 

    आपल्या अनेक व्यथा, विवंचना, वैताग तसंच उदासीनतेवर उत्तर मिळवण्यासाठी किंवा निखळ मनोरंजनासाठी पुलंच्या साहित्याचा आधार घेण्याची सवय लागलेल्या वाचकांना "एक शून्य मी" या पुस्तकात प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं दिसतात, तेव्हा मन खिन्न होतं.  "एक शून्य मी" हा या पुस्तकातील एक लेख आहे आणि  तेच नाव पुस्तकाला दिलेलं आहे.  अर्थात पुस्तकातील  सगळेच  लेख खिन्न करणारे नाहीत.पण "एक शून्य मी" हा लेख अस्वस्थ करतो. 

    आपल्या देशातली ढासळत चाललेली मूल्यं बघून,  

"कधी कधी वाटते,की हे संगीत, साहित्य, नाटके- आनंदनिधाने शोधण्याची हौस आपल्याला मुळातच नसती तर फार बरे झाले असते"- असं पराकोटीचं निराश  विधान  त्यांनी या लेखात केलेलं आहे.

" कारण असल्या क्षणांची झपाझप वजाबाकी होत असते. आणि बाकीचे जे जे काही पाहायला लागते ते मात्र कमालीचे विसंवादी असते."  असं त्यांनी लिहिलेलं आहे. जे वाचतांना पुलंचा कधीही न दिसलेला निराशेचा सूर काळजात कळ आणतो. 

   ज्या श्रद्धास्थानांच्या बळावर  पुलंनी आयुष्यात जगण्याची  दिशा ठरवली होती त्यांच्याबद्दलही कमालीच्या विषण्णतेनं त्यांनी  लिहिलं आहे.

     "कधी कधी  मनापासून चिनी भोजनाचा आनंद लुटल्यावर नेमकं लक्ष रस्त्यावरच्या एखाद्या   चिंध्यांनी अब्रु लपवलेल्या भिकारणीकडे आणि तिच्या अस्थिपंजर पोराकडे का जावं? सगळ्या चैनीची क्षणात वजाबाकी होते. अशा वेळी राग येतो तो फुले, आगरकर, टिळक,  गांधी, साने गुरुजी ह्यांसारख्या मला सतत फसवत गेलेल्या  लोकांचा! मनाचे आणि बुद्धीचे नाही ते कोपरे उजळून जायला ह्या लोकांना कोणी सांगितलं होतं?"                 

        प्रत्येकालाच आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अनेकदा  वैफल्य  येतं, निराशा दाटून येते.  पुलंनाही असे अनुभव   असणारच. पण मनातली ती खळबळ, वाचकांसमोर खुल्या दिलानं मांडण्यासाठी, या प्रसिद्ध लेखकाला काही पायऱ्या उतरुन खाली यावं लागलं - - जे त्यांनी सहजपणे  केल्यामुळे, "एक शून्य मी" हे पुस्तक, पुलंचं एक पारदर्शक रुप वाचकांसमोर घेऊन आलेलं आहे .

     प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं उत्तर शोधताना, "एक शून्य मी" या लेखात लिहितात, 

 "प्रश्नांचे भुंगे जन्मालाच कशाला येतात? डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे. कुणाचीच नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हा देखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच  निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामचिन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती." 

   स्वतःला शून्य म्हणून घेण्याची ही पुलंची अस्वस्थता आणि सच्चेपणा वाचकांनाही व्याकूळ आणि अंतर्मुख करून सोडते.त्यांचं, हे असं परखड  आत्मपरीक्षण शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवणं किती धाडसाचं आहे - हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य .  अर्थातच या अस्वस्थतेचे मूळ कारण म्हणजे पुलंची टोकदार संवेदनशीलता आणि जीवनातल्या चांगुलपणावरची  प्रबळ निष्ठा. 

     "एक शून्य मी" हा लेख १९७४ साली लिहिलेला आहे. आज ४७ वर्ष उलटली आहेत.  आज परिस्थिती बदललीय पण छळणारे प्रश्न आजही तसेच आहेत. आजही हा लेख कुठेही कालबाह्य वाटत नाही.आजही त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीतच.

 याच पुस्तकात विनोबांबद्दल लिहिताना पुलं म्हणतात,    "विनोबांनी तीन प्रकारच्या संततीचे वर्णन केले आहे. औरस, दत्तक आणि मानस. मानस संतती सर्वात उत्तम कारण ही संतती आपल्या मानलेल्या बाबांच्या विचारांचा आणि आचारांचा वारसा घेऊन तो वाढीला लावते. विनोबांना बाबा म्हणण्याचा अधिकार या मानस संततीचा. हा अधिकार मला नाही"

    विनोबांचा विलक्षण  प्रभाव पुलंवर  होता.विनोबांचं साहित्य हे त्यांचं श्रद्धास्थान. पण त्यांना  बाबा म्हणण्याचा अधिकार मला नाही हे कबूल करण्याचा पुलंचा  मोठेपणा  त्यांच्या स्वभावाची उंची दाखवून देतो. 

   आज या  स्मृतिदिनाच्या निमित्ताने "एक शून्य मी" या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटला कारण त्यातून पुलंचं स्वतःचं परखड मूल्यमापन करणारं  "माणूसपण" पानापानातून डोकावत राहतं.प्रसिद्धीची,मोठेपणाची,लाडकेपणाची झूल उतरवून,सामान्य माणसाच्या पातळीवर उतरुन, समाजातल्या छोट्या छोट्या प्रश्नांचा शोध घेणं.आणि त्याबरोबरच स्वतःचाही शोध  घेणं - म्हणजे "एक शून्य मी". सामाजिक बांधिलकी जपण्याचं तत्व आयुष्यभरासाठी अंगिकारल्यावर,  जगण्यातल्या चांगूलपणावर असलेला विश्वास   जेव्हा डळमळीत होऊ लागतो तेव्हा प्रांजळपणे दिलेला कबुलीजबाब म्हणजे "एक शून्य मी".

पुलंच्या याच उन्नत प्रांजळ स्वभाववैशिष्ट्यांना आज आपण वंदन करु या.




#एकशून्यमी

#पुलदेशपांडे

#मौजप्रकाशन

#विनोबाभावे

Thursday, November 5, 2020

आज ८ नोव्हेंबर.
 आज पुलंची जयंती.

माझ्या भावविश्वाला आणि  विचारांना समृद्ध करणाऱ्या 'पुलसाहित्याला' कोटी कोटी प्रणाम!!!

पुलंच्या नेमक्या कोणत्या साहित्याची आज उजळणी करायची......हा माझ्या समोर गहन प्रश्न .............

विनोदी की व्यक्तीचित्रण की वैचारिक ??

पुलंच्या बालपणातच जाऊ या आपण....

लहानपणी शाळेत असताना .... तुमच्या आमच्या मनात जे काही विचार  यायचे ना,अगदी तसेच ........

पण शब्द मात्र  पुलंचे.........मिष्किल, खोडकर आणि व्रात्य.

हसवणूक पुस्तकातील .....

     बिगरी ते मॕट्रिक......

माझ्या  शालेय जीवनात गणित, भाषा, इतिहास, भूगोल, ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू. त्यातला गणित हा बलाढ्य, पण मला सगळे सारखे होते. मी यापैकी एकाही विषयात गचकलो नाही, पण कोणाशीही मैत्री जमली नाही. एखाद्या  दुबळ्या राष्ट्राने सर्वांशी मित्रभाव  ठेवून असावे ,तसा राहिलो. पण ह्या सार्‍या विषयांची माझ्या बालपणाला वाळवी लागली होती. रात्रंदिवस ती माझे बाल्य पोखरीत होती. मी पाढे धडाधड म्हणत असे ,पण घाबरून. त्यातल्या तेरा,स"तरा, एकोणीस,तेवीस  आणि एकोणतीस या पाढ्यांना मी आजही भितो. त्या संकटातून सुटत सुटत विसाच्या किंवा तिसाच्या पाढ्यावर आलो की आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे, आणि त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर गार वाटते, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे .मॅट्रिक नावाच्या जिवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर पुन्हा माझा कधीही या तेरा,सतरा,तेवीस,एकोणीसशी संबंध आला नाही. पाऊणकी, सवायकी, औटकी यातली प्रत्येक गतजन्मीची चेटकी आहे यावर माझा नितांत विश्वास बसायचा.चेटक्या लहान पोरांना पळवतात म्हणे. ह्या चेटक्यांनी माझे बाल्य पळवले.

आम्हाला डोक्याबरोबर डोळे  बिघडवणार्या बारिक टायपात छापलेले गोखल्यांचे अंकगणित असे.इतके कुरुप पुस्तक  त्यानंतर माझ्या  पाहण्यात नाही.गणित वाले गोखले हेच गोपाळ कृष्ण गोखले हे कळल्यावर पुढच्या सर्व पिढ्या त्यांना सोडून गांधींच्या मागे का गेल्या ,हे गणित मला अचानक सुटले."........


हसवणूक पुस्तकातील शब्द न् शब्द वाचकांना विनोदाच्या झोक्यावर अलवारपणे झुलवत ठेवतो आणि मनावरचं मळभ कधी नाहीसं होतं हे कळतही नाही.

हीच  पुलंची शैली  महान व्यक्तींचं वर्णन करतेवेळी अचूक  विश्लेषणात्मक होते - तेही साध्या सहज शब्दात .


एक शून्य या पुस्तकात गांधीजींबद्दल ते लिहीतात.......

 "गांधीजींच्या लेखी एखादा वैज्ञानिक आणि केवळ अंगमेहनत करणारा भंगी ही दोन टोके नव्हती. समाज पुरुषाच्या शरीरातील समान महत्त्वाची घटके होती .शौचकूप गलीच्छ झाल्यावर मायक्रोस्कोप ऐवजी झाडू हवा आणि मलरोग तपासायला मायक्रोस्कोप वापरता यायला हवा. त्या त्या वेळी ती ती कामे समान महत्त्वाची. म्हणूनच गांधींनी लेखणी,टकळी आणि झाडू एकाच तोलाने वापरला .गांधीजी खरे कर्मयोगी होते. प्रार्थनेची जागा आणि शौचाचा संडास या दोन्ही स्थानांविषयी त्यांनी  तितक्याच उत्कटतेनं विचार  केला."

गांधीजींच्या स्वभाववैशिष्ट्याविषयी लिहिताना ,पुलंनी कुठेही जडपणा येऊ न देता,रंजकशैलीत गांधीजी उभे केले आहेत.पुलंच्या लेखामुळे गांधीजींच्या साहित्याकडे वळणारी बरीच मंडळी आहेत.

        पुलंची निरीक्षण शक्ती अफाट तर आहेच पण ते निरीक्षण खुसखुशीत ढंगानं मांडण्याची सिद्धी तर अलौकिकच आहे.

"पानवाला" या लेखात ते लिहितात...............

" महात्माजींचे उघडया अंगाचे फोटो कुठेही दिसतात परंतु नेहरू सदरा घालून ,गांधी टोपी घातलेले गांधी अजूनही आमच्या पानवाल्यानेच जतन करून ठेवले आहेत .गांधी जवाहरलालजींच्या मागे शिवाजी महाराज ,राणा प्रताप,कानात  लांब इयरिंग्ज आणि लांब बाह्यांचे पोलके घातलेल्या इ.स.एकोणीसशे सोळातल्या सरोजिनीदेवी - -यांच्यापुढे मारुती आणि  तोसुद्धा छाती फाडून आतला रामपंचायतनाचा सीन दाखवणारा!!इतिहास ,राजकारण ,धर्मकारण यांचा इतका आटोपशीर आविष्कार !! अजून सूर्योदयाचा देखावा तर विचारायलाच नको.आकाशात विमान  आहे ,विमानातून बाहेर डोकावणारा व डोळ्यांपेक्षा रुंद काळा चष्मा लावलेला पायलट आहे .पुलावर आगगाडी आहे .पुलाखाली गलबत आहे ,गलबताखाली खाडी आहे .खाडीत कमळे आहेत.खाडीच्या बाजूला राजवाडा आहे .त्याच्या कमानीवर 'वेलकम' असा बोर्ड आहे .राजवाड्यासमोर बाग आहे .बागेत भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतो आहे आणि  राधाबाला मुग्ध होऊन आगगाडीकडे पहात आहे!!! स्थल,काल,विषय - कसल्याही जुलमी मर्यादा न मानणारे हे कलेचे प्रात्यक्षिक फक्त पानवाल्याच्याच काचेवर दिसू शकते!"

 अशी पुलंची नर्मविनोदी शैली आणि त्यामुळे अजरामर झालेल्या असंख्य व्यक्तिरेखा.

     वुडहाऊस हे पुलंचं दैवत .वुडहाऊस बद्दल लिहिताना ते कमालीचे हळवेही होतात.

"१६फेब्रु.१९७५.सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो  होतो.वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे .त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार नाहीत .माझ्या  प्रवासी बॕगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हा हवाच.तेवढ्यात दाराच्या फटीतून 'सकाळ' सरकला.पहिल्या पानावर वुडहाऊसच्या निधनाची बातमी.एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हातात ९४व्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा  'सकाळ'.त्या क्षणी मला वुडहाऊसच्याच एका उद्गाराची आठवण झाली .'लेओनारा' ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर ६३वर्षाचा वुडहाऊस  उद्गारला होता - - 'आय थॉट शी वॉज इम्माॕर्टल'.आपली  लाडकी  लेओनारा आणि तिचा मृत्यू या  दोन घटना वुडहाऊसच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या .

'मला वाटलं की ती अमर आहे ' - या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणार्या निर्घृण घावाला एखाद्या शोकसूत्रासारखी वाचा फुटली आहे.वुडहाऊसच्या निधनानंतर त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच म्हटलं असेल की,अरे,आम्हाला वाटलं होतं की तो अमर आहे!"..........

पुलं, आम्हीही तुम्हाला असंच  म्हटलंय.......आणि तुम्ही आहातच की.....आमच्या रक्तात ,स्पंदनात आणि श्वासात.कायमचे !!!



#पुलंवाढदिवस

#एकशून्यमी

#हसवणूक

#पानवाला

#बिगरीतेमॕट्रिक

#महात्मागांधी

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...