Tuesday, May 18, 2021

बाबा - तुमच्या साठी...

     आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांच्या वारसांचा जसा हक्क असतो तसाच  त्यांच्या गुणांवर, प्रतिभेवर, वैशिष्ट्यांवर, सामर्थ्यावर, कौशल्यांवर हक्क असता तर?? पण असं नसतंच. कधी आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये अपत्यांमध्ये जशीच्या तशी उतरतात. कधी थोडी थोडी  झिरपतात तर कधी अजिबात उतरत नाही. याला कोणताही नियम किंवा तर्क लागू होत नाही. यावर काही इलाजही नाही.

      मी लिहीत असताना  कायम मला माझ्या वडिलांची - डॉ म.बा.कुंडले - यांची  आठवण येत असते. ते उत्तम लेखक , प्रभावी वक्ता, हाडाचा शिक्षक  आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ होते. त्यांचं चौफेर वाचन, व्यासंगी लेखन आणि मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व यापैकी   काही थेंब तरी माझ्यात झिरपलेत का अशी शंका  मला येते. असो. एका समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या पोटी माझा जन्म झाला हे ही नसे थोडके.

     आज दिनांक १९ मे. आज त्यांचा वाढदिवस. आज ते असते असते तर ९४ वर्षांचे झाले असते.  ते २०१४ साली आमच्यातून  निघून गेले.  माझ्या कोणत्याही 'लिंबू टिंबू' लेखनाचं - वडील म्हणून त्यांना खूप कौतुक होतं. पण त्यांना अपेक्षित असणारं लेखन माझ्या कडून होतं आहे की नाही देव जाणे.  न सांगता येण्यासारखं आणि  न दाखवता येण्यासारखं - पण माणूस म्हणून समृद्ध करणारं असं खूप काही, आम्हा तिघी बहिणींना त्यांच्याकडून मिळालं आहे. आणि त्या भक्कम पायावरच आज आमची वाटचाल सुरु आहे. 

      आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय  करावं ,याचा मी बराच विचार केला.आणि  माझ्या  एका जबाबदारीची मला जाणीव झाली. बाबांनी अमूल्य असं अक्षरधन समाजातील शिक्षकांसाठी निर्माण करून ठेवलं आहे . ते अक्षरधन  यानिमित्ताने समाजातल्या नवीन शिक्षकांसमोर आणण्याचं काम तर मी नक्कीच करू शकते.कितीतरी शिक्षकांच्या पिढ्या बाबांच्या  पुस्तकांमुळे समृद्ध झाल्या आहेत.पण आजच्या गुगल युगातल्या ,अर्धवट माहितीवर विद्वान होणाऱ्या पिढीला, बाबांच्या पुस्तकांमुळे  जर अस्सल ज्ञान मिळालं,  तर बाबांच्या  लिखाणाचं सार्थक होईल असं मला वाटतं. 

   विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण महाविद्यालयात (एम एड कॉलेज) बाबा प्रोफेसर होते. आणि आई बीएड कॉलेज मध्ये अध्यापक होती.एकत्र कुटुंब असतानाही त्या काळात ,मॕट्रिक झालेल्या आईला, बाबांनी बीए,एमए,बीएड,एमएड ते पीएचडी पर्यंत शिकण्यासाठी उत्तेजन दिलं.आम्ही तिघीही बहिणींनी आपल्या पायावर उभं राहिल्यावरच आमच्या  लग्नाचा विचार करायचा,आणि त्या दृष्टीने, हवं ते शिक्षण पूर्ण करायचं,हे त्यांचं आधीच ठरलं होतं आणि तसं त्यांनी केलंही.


बाबांचं पहिलं पुस्तक म्हणजे 'अध्यापन शास्त्र आणि पद्धती'. १९६२ साली व्हीनस प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलं होतं. त्यावेळी बाबा ३५ वर्षाचे होते. या पुस्तकाच्या आजवर नऊ आवृत्या निघाल्या आहेत. त्या काळात ते बीएड कॉलेजमध्ये शिकवत असत. 'अध्यापन शास्त्र'( Principles of Teaching Methods) यावर मराठी भाषेत पुस्तक नसल्यामुळे बाबांनी हे पुस्तक लिहिलं. शिक्षकांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं.                                                                                                                                       

बाबांचं दुसरं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक समाजशास्त्र'. हे पुस्तक १९७३ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या वेळच्या बीएडच्या  अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. हे पुस्तक बीएड साठी, एक टेक्स्ट बुक म्हणून इतकं उपयुक्त ठरलं की त्याची तेरावी आवृत्ती निघाली आहे. त्या काळात या पुस्तकाला बीएडचा 'दासबोध' असं म्हणायचे. या पुस्तका संदर्भात एक गमतीशीर आठवण आहे. माझी लहान बहीण पुण्याच्या बीएड कॉलेज मध्ये नुकतीच रुजू झाली होती. त्यावेळेस तिची मुलगी लहान होती. तिला सांभाळून कॉलेजचं काम व्यवस्थित जमेल की नाही, हा तिच्या समोर प्रश्न होता. तिची सहाध्यायी तिला म्हणाली, 'अगं टेन्शन घेऊ नकोस, सरळ डॉ. म.बा. कुंडले यांचं शैक्षणिक तत्वज्ञान हे पुस्तक वर्गात न्यायचं आणि वाचून दाखवायचं. मी असंच करते.'  बहिणीनं तिला शांतपणे उत्तर दिलं, '

   'मी त्यांचीच मुलगी आहे'.        



बाबांचं तिसरं पुस्तक म्हणजे 'मराठीचे अध्यापन'. हे १९७४ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या 'युगवाणी' या मासिकात बाबांची  या विषयावर  लेखमाला प्रसिद्ध होत असे . त्यात काही फेरबदल करून हे पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकाच्या ही सहा आवृत्त्या निघालेल्या आहेत.
   बाबांच्या मराठी प्रेमावरुन आठवलं.... आमच्या शाळेतले सगळे शिक्षक  बीएड झाले असल्याने, त्यांना 'कुंडले सर' हे जवळून परिचयाचे. मी - सरांची मुलगी. त्यामुळे माझ्यावर सगळ्यांचं बारीक  लक्ष . माझ्या हातून मराठी लिखाणात थोडी जरी चूक झाली तर, 
"तू कुंडले सरांची मुलगी ना? तुझ्याकडून भाषेच्या चुका?" असे टोमणे नेहमीचेच.


      चवथं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक समस्यांचा इतिहास' हे पुस्तक १९७८ साली , श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत.   या पुस्तका पासूनच्या पुढील लिखाणाची मी साक्षीदार आहे. त्याआधी लहान असल्याने,बाबा सतत  काहीतरी लिहीत असतात, एवढंच समजायचं. बाबांना पोटदुखीचा कायम त्रास व्हायचा. त्यामुळे ते जास्त वेळ बसून लिहू शकत नसत. त्यासाठी  त्यांनी डाव्या कुशीवर झोपून लिहीण्याचं कसब आत्मसात केलं होतं. डोक्याखाली उंच लोड घेऊन, डाव्या हाताने रायटिंग पॅड हलू नये म्हणून आधार देत, ते दीड दोन तास सहज लिहू शकत . मी मोठी झाल्यावर  मला जशी मराठी भाषेची आणि शुद्धलेखनाची समज आली, बाबा मला डिक्टेट करित असत. हॉलमध्ये फेऱ्या मारत, एक हात पोटावर ठेवून ते सांगायचे आणि मी लिहायचे. हे लिखाण कशासाठी, कुणासाठी, हा विचार त्यावेळी मला करण्याची गरजच वाटली नाही. पण त्याही वयात बाबांचं एक वैशिष्ट्य  जाणवलं, की खाडाखोड, फेरफार, दुरुस्ती,रफ-फेअर -  हे प्रकार त्यांच्या लिखाणात कधी नव्हतेच. त्यांच्या डोक्यातून थेट फायनल कॉपीच उतरायची. आता विचार केला की आश्चर्य वाटतं-  पुस्तकांची सॉफ्ट कॉपी त्यांच्या डोक्यात कशी काय तयार असायची? कारण  माझी पंधरा वीस पानं लिहून झाली की त्यावर फक्त नजर फिरवून ,ते लिखाण थेट धंतोलीतल्या बनहट्टी प्रेस मधे जायचं.प्रेसमधे लिखाण पोचवणं आणि प्रुफं आणणं - ही आमचीच कामं.

 

त्यांचं पाचवं पुस्तक हे 'टेस्ट ऑफ लिटररी क्रिएटिविटी'. १९७९ मध्ये, साहित्य प्रसार केंद्र नागपूर येथून प्रकाशित झालं. सर्जनशीलतेवर बाबांचा पीएचडीचा प्रबंध - पुस्तक रुपात काढला होता. या पीएचडी च्या प्रबंधासाठी, सायन्स शाखेच्या,दहावीच्या विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेतली सर्जनशीलता किती प्रमाणात आहे,हे संशोधन केलं होतं.

 

सहावं पुस्तक, 'सर्जनशीलता'. हे १९९१ मध्ये नूतन प्रकाशन,पुणे, यांनी प्रकाशित केलं.सर्जनशीलता हा बाबांचा आवडीचा आणि प्रभुत्व  असलेला विषय. या विषयावर मराठीतून एकही पुस्तक उपलब्ध नसल्याने, मराठी विद्यार्थ्यांची ही अडचण या पुस्तकामुळे बऱ्याच अंशी दूर झाली.

सातवं  पुस्तक हे, 'शैक्षणिक  पत्रकारिता'. १९९६ मध्ये, शिक्षण समीक्षा प्रकाशन,  नागपूर, यांनी प्रकाशित केलं.  पत्रकारितेमध्ये शैक्षणिक पत्रकारिता या एका नवीन संकल्पनेचा अंतर्भाव  होणं गरजेचं आहे असा त्यांचा आग्रह होता. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा,उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा  पुरस्कार मिळाला आहे.                                                           


                                                
आठवं पुस्तक हे, 'शिक्षणोपनिषद. २००८ साली प्रकाशित झालं. यात, भगवद्गीतेतील,ज्ञानेश्वरीतील, संत 
वाङमयातील शिक्षणाचा धांडोळा घेतला आहे. धर्मशास्त्रातील शिक्षणाचा ऊहापोह केला आहे. या पुस्तकाच्या आधीपासूनच बाबांची तब्येत बिघडत चालली होती .तब्येतीमुळे हळूहळू ते लेखन, वाचनापासून दूर होत गेले.                                                            

'
शिक्षण समीक्षा' नावाचं द्वैमासिक त्यांनी सुरू केलं  होतं.ते त्यांचं चौथं अपत्यच होतं. चाळीस वर्षे त्यांनी ते निष्ठेनं,जीव ओतून चालवलं. बरेचदा अंक काढण्यासाठी लेख कमी पडायचे. त्यावेळेस स्वतःच एखाद दुसरा लेख दुसऱ्याच्या नावाने लिहून, त्यांनी अंक प्रकाशित केलेला आहे .

ही सगळी बाबांची पुस्तकं, आजच्या पिढीच्या शिक्षकांपर्यंत जायला हवीत असं मला वाटतं.  बाबांची शिक्षणाबद्दल, शिक्षणपद्धती बद्दल  शिक्षकाबद्दल, मराठी भाषेबद्दल असणारी विलक्षण तळमळ  या पुस्तकांमध्ये उतरली आहे. अध्यापन क्षेत्रात सतत प्रयोगशील राहून, नवनवीन संकल्पना  शिक्षकांसमोर मांडण्याची त्यांची पराकोटीची सर्जनशीलता  या पुस्तकांद्वारे व्यक्त झाली आहे.शिक्षण क्षेत्रातील बाबांच्या कार्याची दखल घेऊन 'नगरकर प्रतिष्ठान',पुणे तर्फे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 

     हा लेख आजच्या दिवशी, मी माझ्या बाबांना समर्पित करते आहे. त्यांनी आम्हा बहिणींना सद्विचारांची, तत्वनिष्ठेची,श्रद्धेची,विनम्रतेची अक्षय संपदा प्रदान केलीय.त्याचबरोबर त्यांचं ज्ञानप्रचुर  अक्षरधन  ही समाजातल्या शिक्षकांसाठी त्यांनी निर्माण केलेली  संपत्ती आहे. 


      एक मुलगी म्हणून , मी त्यांना काय देऊ शकले, हा प्रश्न मला नेहमीच छळत आलेला  आहे .आता हा लेख, मी त्यांच्या हयातीत का लिहिला नाही, या प्रश्नाचाही समावेश या छळवादात झाला आहे.शेवटी बाबांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ,

 न्यूनते पुरते,

करुनि घ्येयावे तुम्हाते.

 विनवतु असे' .

 अशी बाबांना विनवणी करते. कारण आम्हा लेकरांमधली न्यूनता वडील समजून घेणार नाहीत असं घडू शकेल कधी??




#अध्यापनशास्त्रआणिपद्धती

#शैक्षणिकतत्वज्ञानआणिशैक्षणिकसमाजशास्त्र

#मराठीचेअध्यापन

#शैक्षणिकसमस्यांचाइतिहास

#Atestofliterarycreativity

#सर्जनशीलता

#शैक्षणिकपत्रकारिता

#शिक्षणोपनिषद

#शिक्षणसमिक्षा







Thursday, May 13, 2021

देव तारी त्याला कोण मारी


त्यादिवशी ओपीडीत बसले असताना, समोर एक मध्यमवयीन स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या संपूर्ण चेहर्‍यावरुन हास्य ओसंडत होतं. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात येणाऱ्या पेशंटच्या चेहऱ्यावर  इतकं निर्मळ हास्य बघण्याची  सवय नसल्यानं मी क्षणभर दचकलेच आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघू लागले.

' मला ओळखलं नाही मॅडम? मी शांताबाई भिसे -(नाव बदललंय) - बार्शीटाकळी. हा बघा माझा मुलगा. वीस वर्षाचा झालाय.' 

'शांताबाई भिसे ,बार्शीटाकळी' म्हणताक्षणी मेंदूत पटापटा दिवे लागले आणि सगळं लख्ख आठवलं.

' अगं काय शिकतो तुझा मुलगा? किती छान दिसतोय.' मी विचारलं. 

' मॅडम, काॕम्प्युटर चा डिप्लोमा घेतला आणि  आता नोकरी करतोय. अरे पाया पड मॅडमच्या'. हे शेवटचं वाक्य मुलासाठी होतं .

'अगं,किती वर्षाने भेटते आहेस तू?'- मी.

 थोडावेळ हालहवाल सांगून  शांताबाई निघून गेली. ती निघून गेली पण मी वीस वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगात जाऊन पोचले.                         

        वीस वर्षापूर्वी जेव्हा मी आरएमओ म्हणून काम करीत होते, तेव्हाचा हा एक विलक्षण अनुभव. काही काही अनुभव मनात पक्के  रुतून बसतात, त्यापैकीच हा एक.

 त्यावेळी मी हॉस्पिटलच्या क्वार्टरमधे राहत होते. आणि माझा विभाग म्हणजे प्रसुती विभाग . त्यामुळे रात्री ,बेरात्री, अवेळी वाॕर्डमधून कॉल येणं हे नेहमीचंच होतं. त्या दिवशीही असंच मध्यरात्री दोन वाजता दारावरच्या थापांनी आणि 'मॅडम- मॅडम' या हाकेने मी ताड्कन उठले. आताशा मला दारावरच्या थापांवरून पेशंटच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला होता. कॉलबेल एकदाच  सौम्यपणे वाजली, की नुकत्याच हलके हलके कळा सुरू झालेली  पेशंट असणार. 

कॉलबेल न थांबता  वाजत राहिली, की पेशंट च्या प्रसूती कळा वाढलेल्या असणार. 

कॉलबेल न वाजवता दारावर जोरजोरात थापा पडू लागल्या, की - 'मॅडम, चला. पेशंटला टेबलवर घेतलं आहे' हा निरोप असणार. 

दारावर थापांबरोबरच हाका सुद्धा  असल्या, की नक्कीच काहीतरी इमर्जन्सी असणार.  

त्या रात्री तसंच झालं. मी ताड्कन उठून दार उघडलं. 'मॅडम, लवकर चला. पेशंटची रस्त्यात ऑटोतच डिलिव्हरी झाली. खूप ब्लीडिंग होतंय. पेशंट अर्धवट शुद्धीत आहे.' सिस्टर एका दमात बोलल्या.

'पेशंट रजिस्टर्ड आहे का?'- मी.

'हो.दोनवेळा येऊन गेलीय तपासायला'.- सिस्टर.

 'आणि बाळ कसं आहे  ग?'- मी चपला घालता घालता विचारलं. 'मॅडम, ते बाळ गेलेलंच होतं, असं त्या पेशंटची सासू आणि नवरा सांगताहेत.

 'गेलेलंच बाळ?' माझ्या मनात शंका आली. काय कारण असू शकेल?

'बाळ बघितलं तुम्ही?'

'नाही मॕडम.ते गेलेलंच आहे म्हणून ......'

हे बोलणं होईपर्यत पर्यंत आम्ही वाॕर्ड मध्ये पोचलो.

पेशंटचे नातेवाईक डोक्याला हात लावून बसलेले दिसले.पेशंटला बघूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं .  आत टेबलवर शांताबाईला झोपवलं होतं. सगळी  साडी रक्ताने भिजली होती. माझ्या  हाऊस ऑफिसरने बीपी,पल्स बघून सलाईनची तयारी करुन ठेवली होती.  

'शांताबाई , कसं वाटतंय आता?काय त्रास  होतोय?' - तिच्या डोक्यावर थोपटत,नाडीवर हात ठेवत,तिचे डोळे बघून तिच्या हिमोग्लोबिनचा अंदाज घेत, तिला विचारलं.  अर्धवट डोळे उघडणं - एवढाच तिचा प्रतिसाद होता. रस्त्यात होणारी डिलिव्हरी आणि त्यानंतर होणारा रक्तस्त्राव घेऊन येणारा पेशंट  आम्हाला नवीन नव्हता. एक तर, अशा वेळेला प्रसूती मार्ग वेडावाकडा फाटला जातो किंवा प्लॕसेंटा चा एखादा तुकडा  गर्भाशयातच  राहतो. ही दोन मुख्य कारणं रक्तस्रावाची असू शकतात. शांताबाईचं  यापैकीच एक कारण असावं हा माझा अंदाज  होता. पण त्याआधी  तब्येत गंभीर असल्याची लेखी संमती ,आयव्ही सलाईन लावून तिचं पल्स, बीपी नॉर्मल च्या जवळपास आणणं - हे आणि बरेच काही सोपस्कार महत्त्वाचे असतात.  सगळ्या  स्टाफला ही कामं सरावाची असल्यानं,ती लगेचच हातावेगळी झाली. मला प्रामुख्याने रक्तस्त्रावाचं कारण  शोधायचं होतं. सिस्टर ने पेशंट स्वच्छ केल्यावर मी तपासलं तेव्हा तिचा प्रसूती मार्ग  वेडावाकडा फाटलेला आहे, हे लक्षात आलं. त्यासाठी आत पर्यंत व्यवस्थित टाके घालणं आणि ॲनस्थेशिया आवश्यक होता. स्टाफला सगळ्या सूचना देऊन तयारी करण्यास सांगितलं आणि ॲनस्थेटिस्ट ला फोन केला. परत एकदा पेशंटची  अवस्था बघितली आणि ती आपल्या आटोक्यात येणारी आहे हे लक्षात आल्यामुळे जवळजवळ १०मिनीटांनी एक शांत आणि  दीर्घ श्वास घेतला.  

 मी तिच्या नातेवाईकांशी बोलायला बाहेर आले.सासू आणि नवरा खूप  घाबरले होते. तिच्या तब्येतीविषयी सगळी कल्पना तिच्या नवऱ्याला आणि सासूला दिल्यावर  मी बाळाबद्दल चौकशी करु लागले.

' बाळ पूर्ण दिवसाचं होतं की  अपुऱ्या दिवसाचं?आणि ते पोटातच गेलं  होतं की जन्म झाल्यावर लगेच गेलं?आॕटोमधे डिलीव्हरी झाल्यावर कुठे लागलं होतं का बाळाला?'

' मॅडम डिलीव्हरी कधी झाली हे पण समजलं नाही. बार्शीटाकळीहून आॕटोत बसलो.रस्त्याने अंधार होता.शांताची शुद्ध  हरपली म्हणून तिला आम्ही आडवं केलं तेव्हा लक्षात आलं. बाळाचा रडायचा आवाज पण आला नाही. बाळ निपचित होतं. श्वासही घेत नव्हतं. म्हणून आम्हाला वाटलं पोटातच गेलं असेल'.- सासू .

'बाई,तुम्ही बाळ दाखवा बरं'- असं म्हणताच  तिचा नवरा ऑटो जवळ गेला आणि एक कापडी पिशवी घेऊन आला. त्या पिशवीत त्यांनी त्या बाळाचं मुटकुळं ठेवलं होतं. ती पिशवी  बघून मला अक्षरशः ढवळून आलं. सिस्टरने ते बाळाचं गाठोडं बेबी ट्रे मधे ठेवलं.त्याला वरवर पुसून स्वच्छ केलं. पांढरंफट्ट पडलेलं, निपचित झालेलं पण  गुटगुटीत असलेलं बाळ बघून मनातला शंकासुर जागा झाला. बाळाच्या मृत्यूचं नेमकं काय कारण असावं??

       मी सहज त्याच्या छातीवर हात ठेवला. त्या थंडगार स्पर्शाने अंगावर काटा आला. पण  क्षणभरातच त्याच्या हृदयाचा एक मंद ठोका मला जाणवला आणि माझ्या छातीचे ठोके वाढले.स्टेथोने आणखी दोन क्षीण ठोके मला ऐकू आले आणि .........'सिस्टर' - मी जोरात  ओरडले . माझ्या ओरडण्याने  सिस्टर आणि हाऊस ऑफिसर काय समजायचं ते समजल्या. बाळाला उलटं पकडणं, त्याचं सक्शन करणं,त्याच्या पोट/पाठीवर थंड/गरम पाण्याचे सपकारे मारणं, त्याला ऑक्सीजन लावणं, आणि आवश्यक ती इंजेक्शन देणं - - या सगळ्या स्टेप्स आम्ही भराभरा करायला सुरुवात केली आणि लगेच जवळ असणाऱ्या एनआयसीयु मधे  फोन करुन कल्पना देऊन ठेवली. सातव्या मिनिटाला त्या बाळाचा रंग बदलायला लागला. बाळाचे पंजे गुलाबी दिसायला लागले. त्याची छातीची धडधड क्षीण का होईना पण  सुरू झाली. आणि बाळाने डोळे अर्धवट उघडले. बाळाचा सकारात्मक प्रतिसाद बघून त्या बाळाला व्यवस्थित दुपट्यात गुंडाळून एनआयसीयुत भरती करण्यासाठी  नातेवाईकांच्या  सुपूर्द केलं. एनआयसीयु मध्ये  लगेच त्याची ट्रीटमेंट ही सुरू झाली. तोपर्यंत अॕनस्थेटिस्ट आले. पेशंटला व्यवस्थित टाके घातले गेले ज्यामुळे  रक्तस्त्राव नियंत्रित झाला. आणि सलाईन सुरु असल्यामुळे शांताबाई ची तब्येत व्यवस्थित होऊ लागली . हे सगळं आटोपेपर्यंत सकाळचे सहा वाजले . एनआयसीयु मधून निरोप आला की बाळाचा धोका अजून टळलेला नाही. पण आशा आहे की ट्रीटमेंटला  चांगला प्रतिसाद मिळेल. आणि तेव्हा कुठे आम्ही सगळे आमच्या नॉर्मल स्थितीमध्ये आलो.

     संध्याकाळपर्यंत बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित झाले. बाळाला पाच दिवस एनआयसीयु  मध्ये ठेवून मग त्याला सुट्टी दिली.आता मला  भीती ही होती की जन्मानंतर बराच वेळ बाळ रडलं नाही. त्यामुळे त्याच्या मेंदूवर सूज येऊन सेरेब्रल पाल्सी होईल की काही व्यंग निर्माण होईल का? पण याचं उत्तर काळाच्याच हातात होतं. बाळ तर वाचलं होतं .त्यानंतर जवळ जवळ वर्षभर, शांताबाई दर महिन्याला बाळाला घेऊन तपासायला येत असे. त्या वर्षभरात बाळाची वाढ व्यवस्थित होती. नंतर मात्र शांताबाई  कधीच आली नाही. आणि परवा  तो वीस वर्षाचा धडधाकट  मुलगा बघून मला अक्षरशः  भरून आलं. त्यावेळी त्या नातेवाईकांवर विश्वास ठेवून मूल गेलेलंच आहे या समजूतीत मी बाळाला मी हातही लावला नसता तर???

पण "देव तारी त्याला कोण मारी" हेच खरं.त्या मुलाच्या आयुष्याची दोरी बळकट होती  म्हणून देवानं मला त्याला हात लावून तपासण्याची बुद्धी दिली असंच म्हणावं लागेल.

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...