आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांच्या वारसांचा जसा हक्क असतो तसाच त्यांच्या गुणांवर, प्रतिभेवर, वैशिष्ट्यांवर, सामर्थ्यावर, कौशल्यांवर हक्क असता तर?? पण असं नसतंच. कधी आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये अपत्यांमध्ये जशीच्या तशी उतरतात. कधी थोडी थोडी झिरपतात तर कधी अजिबात उतरत नाही. याला कोणताही नियम किंवा तर्क लागू होत नाही. यावर काही इलाजही नाही.
मी लिहीत असताना कायम मला माझ्या वडिलांची - डॉ म.बा.कुंडले - यांची आठवण येत असते. ते उत्तम लेखक , प्रभावी वक्ता, हाडाचा शिक्षक आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ होते. त्यांचं चौफेर वाचन, व्यासंगी लेखन आणि मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व यापैकी काही थेंब तरी माझ्यात झिरपलेत का अशी शंका मला येते. असो. एका समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या पोटी माझा जन्म झाला हे ही नसे थोडके.
आज दिनांक १९ मे. आज त्यांचा वाढदिवस. आज ते असते असते तर ९४ वर्षांचे झाले असते. ते २०१४ साली आमच्यातून निघून गेले. माझ्या कोणत्याही 'लिंबू टिंबू' लेखनाचं - वडील म्हणून त्यांना खूप कौतुक होतं. पण त्यांना अपेक्षित असणारं लेखन माझ्या कडून होतं आहे की नाही देव जाणे. न सांगता येण्यासारखं आणि न दाखवता येण्यासारखं - पण माणूस म्हणून समृद्ध करणारं असं खूप काही, आम्हा तिघी बहिणींना त्यांच्याकडून मिळालं आहे. आणि त्या भक्कम पायावरच आज आमची वाटचाल सुरु आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय करावं ,याचा मी बराच विचार केला.आणि माझ्या एका जबाबदारीची मला जाणीव झाली. बाबांनी अमूल्य असं अक्षरधन समाजातील शिक्षकांसाठी निर्माण करून ठेवलं आहे . ते अक्षरधन यानिमित्ताने समाजातल्या नवीन शिक्षकांसमोर आणण्याचं काम तर मी नक्कीच करू शकते.कितीतरी शिक्षकांच्या पिढ्या बाबांच्या पुस्तकांमुळे समृद्ध झाल्या आहेत.पण आजच्या गुगल युगातल्या ,अर्धवट माहितीवर विद्वान होणाऱ्या पिढीला, बाबांच्या पुस्तकांमुळे जर अस्सल ज्ञान मिळालं, तर बाबांच्या लिखाणाचं सार्थक होईल असं मला वाटतं.
विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण महाविद्यालयात (एम एड कॉलेज) बाबा प्रोफेसर होते. आणि आई बीएड कॉलेज मध्ये अध्यापक होती.एकत्र कुटुंब असतानाही त्या काळात ,मॕट्रिक झालेल्या आईला, बाबांनी बीए,एमए,बीएड,एमएड ते पीएचडी पर्यंत शिकण्यासाठी उत्तेजन दिलं.आम्ही तिघीही बहिणींनी आपल्या पायावर उभं राहिल्यावरच आमच्या लग्नाचा विचार करायचा,आणि त्या दृष्टीने, हवं ते शिक्षण पूर्ण करायचं,हे त्यांचं आधीच ठरलं होतं आणि तसं त्यांनी केलंही.
बाबांचं दुसरं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक समाजशास्त्र'. हे पुस्तक १९७३ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या वेळच्या बीएडच्या अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. हे पुस्तक बीएड साठी, एक टेक्स्ट बुक म्हणून इतकं उपयुक्त ठरलं की त्याची तेरावी आवृत्ती निघाली आहे. त्या काळात या पुस्तकाला बीएडचा 'दासबोध' असं म्हणायचे. या पुस्तका संदर्भात एक गमतीशीर आठवण आहे. माझी लहान बहीण पुण्याच्या बीएड कॉलेज मध्ये नुकतीच रुजू झाली होती. त्यावेळेस तिची मुलगी लहान होती. तिला सांभाळून कॉलेजचं काम व्यवस्थित जमेल की नाही, हा तिच्या समोर प्रश्न होता. तिची सहाध्यायी तिला म्हणाली, 'अगं टेन्शन घेऊ नकोस, सरळ डॉ. म.बा. कुंडले यांचं शैक्षणिक तत्वज्ञान हे पुस्तक वर्गात न्यायचं आणि वाचून दाखवायचं. मी असंच करते.' बहिणीनं तिला शांतपणे उत्तर दिलं, '
'मी त्यांचीच मुलगी आहे'.
चवथं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक समस्यांचा इतिहास' हे पुस्तक १९७८ साली , श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत. या पुस्तका पासूनच्या पुढील लिखाणाची मी साक्षीदार आहे. त्याआधी लहान असल्याने,बाबा सतत काहीतरी लिहीत असतात, एवढंच समजायचं. बाबांना पोटदुखीचा कायम त्रास व्हायचा. त्यामुळे ते जास्त वेळ बसून लिहू शकत नसत. त्यासाठी त्यांनी डाव्या कुशीवर झोपून लिहीण्याचं कसब आत्मसात केलं होतं. डोक्याखाली उंच लोड घेऊन, डाव्या हाताने रायटिंग पॅड हलू नये म्हणून आधार देत, ते दीड दोन तास सहज लिहू शकत . मी मोठी झाल्यावर मला जशी मराठी भाषेची आणि शुद्धलेखनाची समज आली, बाबा मला डिक्टेट करित असत. हॉलमध्ये फेऱ्या मारत, एक हात पोटावर ठेवून ते सांगायचे आणि मी लिहायचे. हे लिखाण कशासाठी, कुणासाठी, हा विचार त्यावेळी मला करण्याची गरजच वाटली नाही. पण त्याही वयात बाबांचं एक वैशिष्ट्य जाणवलं, की खाडाखोड, फेरफार, दुरुस्ती,रफ-फेअर - हे प्रकार त्यांच्या लिखाणात कधी नव्हतेच. त्यांच्या डोक्यातून थेट फायनल कॉपीच उतरायची. आता विचार केला की आश्चर्य वाटतं- पुस्तकांची सॉफ्ट कॉपी त्यांच्या डोक्यात कशी काय तयार असायची? कारण माझी पंधरा वीस पानं लिहून झाली की त्यावर फक्त नजर फिरवून ,ते लिखाण थेट धंतोलीतल्या बनहट्टी प्रेस मधे जायचं.प्रेसमधे लिखाण पोचवणं आणि प्रुफं आणणं - ही आमचीच कामं.
त्यांचं पाचवं पुस्तक हे 'टेस्ट ऑफ लिटररी क्रिएटिविटी'. १९७९ मध्ये, साहित्य प्रसार केंद्र नागपूर येथून प्रकाशित झालं. सर्जनशीलतेवर बाबांचा पीएचडीचा प्रबंध - पुस्तक रुपात काढला होता. या पीएचडी च्या प्रबंधासाठी, सायन्स शाखेच्या,दहावीच्या विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेतली सर्जनशीलता किती प्रमाणात आहे,हे संशोधन केलं होतं.
सहावं पुस्तक, 'सर्जनशीलता'. हे १९९१ मध्ये नूतन प्रकाशन,पुणे, यांनी प्रकाशित केलं.सर्जनशीलता हा बाबांचा आवडीचा आणि प्रभुत्व असलेला विषय. या विषयावर मराठीतून एकही पुस्तक उपलब्ध नसल्याने, मराठी विद्यार्थ्यांची ही अडचण या पुस्तकामुळे बऱ्याच अंशी दूर झाली.
सातवं पुस्तक हे, 'शैक्षणिक पत्रकारिता'. १९९६ मध्ये, शिक्षण समीक्षा प्रकाशन, नागपूर, यांनी प्रकाशित केलं. पत्रकारितेमध्ये शैक्षणिक पत्रकारिता या एका नवीन संकल्पनेचा अंतर्भाव होणं गरजेचं आहे असा त्यांचा आग्रह होता. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा,उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
ही सगळी बाबांची पुस्तकं, आजच्या पिढीच्या शिक्षकांपर्यंत जायला हवीत असं मला वाटतं. बाबांची शिक्षणाबद्दल, शिक्षणपद्धती बद्दल शिक्षकाबद्दल, मराठी भाषेबद्दल असणारी विलक्षण तळमळ या पुस्तकांमध्ये उतरली आहे. अध्यापन क्षेत्रात सतत प्रयोगशील राहून, नवनवीन संकल्पना शिक्षकांसमोर मांडण्याची त्यांची पराकोटीची सर्जनशीलता या पुस्तकांद्वारे व्यक्त झाली आहे.शिक्षण क्षेत्रातील बाबांच्या कार्याची दखल घेऊन 'नगरकर प्रतिष्ठान',पुणे तर्फे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
हा लेख आजच्या दिवशी, मी माझ्या बाबांना समर्पित करते आहे. त्यांनी आम्हा बहिणींना सद्विचारांची, तत्वनिष्ठेची,श्रद्धेची,विनम्रतेची अक्षय संपदा प्रदान केलीय.त्याचबरोबर त्यांचं ज्ञानप्रचुर अक्षरधन ही समाजातल्या शिक्षकांसाठी त्यांनी निर्माण केलेली संपत्ती आहे.
एक मुलगी म्हणून , मी त्यांना काय देऊ शकले, हा प्रश्न मला नेहमीच छळत आलेला आहे .आता हा लेख, मी त्यांच्या हयातीत का लिहिला नाही, या प्रश्नाचाही समावेश या छळवादात झाला आहे.शेवटी बाबांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ,
न्यूनते पुरते,
करुनि घ्येयावे तुम्हाते.
विनवतु असे' .
अशी बाबांना विनवणी करते. कारण आम्हा लेकरांमधली न्यूनता वडील समजून घेणार नाहीत असं घडू शकेल कधी??
#अध्यापनशास्त्रआणिपद्धती
#शैक्षणिकतत्वज्ञानआणिशैक्षणिकसमाजशास्त्र
#मराठीचेअध्यापन
#शैक्षणिकसमस्यांचाइतिहास
#Atestofliterarycreativity
#सर्जनशीलता
#शैक्षणिकपत्रकारिता
#शिक्षणोपनिषद
#शिक्षणसमिक्षा










