Showing posts with label वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव. Show all posts
Showing posts with label वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव. Show all posts

Tuesday, November 4, 2025

अंदरकी बात

 अंदरकी बात 

रात्रीचे ११ वाजले. नेहमीप्रमाणे अंथरुणावर बसून मी हात जोडले आणि देवाला विनवणी केली की आजतरी सलग सात तास झोप मिळू दे.  डिलीव्हरी च्या कळा मध्यरात्रीच का सुरू होतात?  बरं. दिवसाढवळ्या  कळा सुरु झाल्या तरी जास्तीतजास्त डिलिव्हरी मध्यरात्रीच का होतात?- हा माझा यक्षप्रश्न.  आठवड्यातून चार वेळा हमखास झोपेचं खोबरं व्हायलाच हवं…. हा माझ्या पत्रिकेतच योग असावा. शिकत असताना गायनॅकॉलॉजिस्ट मॅडमचं येवढं आकर्षण वाटायचं. त्यांचा तो रुबाब, त्यांच्याभोवती असणारं वलय,काम करण्याची पद्धत, ऑपरेशन्स,यांचं मी बारकाईनं निरीक्षण करित असे. अर्थातच पुढे मी ' स्त्री रोग प्रसूती' हीच शाखा निवडली पण…. तो रुबाब, ते वलय आजपर्यंत तरी माझ्या आसपास फिरकलेलं नाहीय. किंवा, “बच्चा और मां इन दोनो मे एक ही बच सकता है” -  असं परंपरागत, ‘बाॅलीवुड विरचितम् ब्रम्हवाक्य’  फेकायची  तर कधीच वेळ आली नाही.

            एकतर, चोवीस तास हाँस्पिटलच्या क्वार्टर मधे रहात असल्याने  कोणतीही इमर्जन्सी आली की हातातील काम सोडून पळायचं हाच खाक्या.सण असो, ठरवलेला कार्यक्रम असो,नाटक सिनेमा असो की बीसी असो, आमच्या पेशंटला कोणती सिद्धी होती देवजाणे. माझ्या कार्यक्रमाच्या मुहूर्तावर ती कळा देत हजर होणार.म्हणजे ‘कळा’ तिच्या आणि माझ्या आनंदाची कायम ‘उतरती कळा’ ….’कळायोग’- हा सुद्धा पत्रिकेतलाच. कसला रुबाब आणि कुठली ऐट ? असो.  मी झोपले..... आणि मध्यरात्री काॅलबेल वाजलीच. दोन वाजले होते. 

' चला! आपला दिवस सुरू झाला' - असं म्हणत मी दार उघडलं.

 ‘मॅडम, पेशंट  फुल डायलेटेशनमधेच आली आहे. ज्युनियर मॅडम नी तुम्हाला बोलावलंय कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे’

' आलीया भोगासी असावे सादर' - असं म्हणून मी वॉर्डमध्ये शिरले. लेबर रुममध्ये पेशंट विव्हळत होती.

 ‘मॅम, सेकंडपॅरा आहे. पहिली डिलीव्हरी नॉर्मल आहे.  पेशंट फुल डायलेटेशन मधेच आली. घरीच मेम्ब्रेन गेलंय आणि ब्रीच प्रेझेंटेशन आहे.’

  ती सांगत असतानाच पेशंटला एक जोरात कळ आली आणि बाळाची पावलं दिसू लागली.

इतक्या वेळेवर येणाऱ्या पेशंटची ‘आधी सुटका' आणि नंतर विचारपूस’ असा उलटा प्रवास करावा लागतो. सोनोग्राफी, हिमोग्लोबीन, शुगर, ब्लडप्रेशर, अंगावरची सूज हे सगळं बाजूला सारून आधी पेशंटला मोकळं करायचं. आणि बाळाला व आईला काही काॅम्प्लिकेशन झाले तर त्याचं खापर डॉक्टरवरच फुटणार…हा सुद्धा माझ्या पत्रिकेतील योग बरं. असो. 

      ‘ब्रीच’ ऐकताक्षणी माझी छाती धडधडू लागली. आता' ब्रीच' म्हणजे पायाळू. अशी पेशंट जर नियमित तपासणीसाठी आली तर  तिला सिझेरियनची कल्पना दिली जाते. कारण पायाळू बाळाचं डोकं वर असल्यामुळे आईचं पेल्व्हिस व बाळाचं डोकं यांचे परस्पर आकारमान जुळतं की नाही हे ठरवणं कठीण असतं .अशा वेळेस डोकं अडकण्याची शक्यता असते.  डोकं अडकलं तर बाळ गुदमरतं.बाळाला ऑक्सीजन मिळाला नाही तर सेकंदागणिक धोका वाढू लागतो. एका क्षणात हे सगळे विचार मनात येऊन गेले.आता सध्या या केसमधे  सगळ्या शास्त्रीय बाबी गुंडाळून लवकरात लवकर डिलिव्हरी करणं हाच पर्याय होता. मी गाऊन आणि  ग्लोव्हज् चढवले.

          अशा तणावपूर्ण परिस्थितीत  नातेवाईकांना सगळी परिस्थिती समजावून त्यांची ‘हाय रिस्क कन्सेन्ट' घ्यायला  सिस्टरला पाठवले. ओटी   तयार  ठेवण्यास सांगितली. ॲनस्थेटिस्ट, पेडियाट्रिशियन, आणि सीनियर मॅडम ला  केसबद्दल कल्पना दिली आणि  रणभूमीवर सज्ज झाले.

       बाळाची पावलं हळूच दोन बोटांनी  धरली. . तितक्यात पेशंट ने कळ दिली आणि बाळ कमरेपर्यंत बाहेर आलं. आता त्याचं डोकं सुस्थितीत बाहेर येणं, ही फार मोठी परीक्षा. कमी वजनाचं बाळ सहज बाहेर येतं. पण गुबगुबीत बाळाची मात्र पंचाईत. आणि पर्यायाने  डॉक्टरांचीही पंचाईत.इकडे बाळाचं डोकं अडकलं तर डॉक्टरचाही श्वास अडकतो. मला ब्रीच डिलीव्हरीच्या तंत्राची पुस्तकातली आकृती डोळ्यासमोर आली.एक एक क्षण महत्वाचा होता. बाळाची कंबर धरुन हळूच पोटा पर्यंतचं शरीर बाहेर काढलं. दोन्ही हातांनी त्याला वरच्या दिशेने उभं धरलं आणि पेशंटच्या पोटाच्या दिशेने तिरपं केलं. याच पोझिशन मध्ये बाळाला धरून ठेवण्याची असिस्टंट ला सूचना दिली. माझे दोन्ही हात मोकळे झाले.  डावा हात बाळाच्या खांद्यापाशी नेऊन  हळूच त्याचा एक हात बाहेर काढला. दुसराही हात  बाहेर काढून बाळाचे हात मोकळे केले. आता बाळाचं तोंड हाताने चाचपलं. उजव्या हाताची दोन बोटं त्याच्या तोंडात घातली व डाव्या हाताने त्याच्या मानेला आधार दिला. तोंडात घातलेल्या दोन बोटांनी त्याचा जबडा आणि पर्यायाने हनुवटी हलकेच समोर ओढली. डाव्या बोटांनी मान आणि उजव्या बोटांनी हनुवटीला धरून त्याच्या डोक्याला हळूच हलवणं आणि समोर ओढणं- ही क्रिया सुरू ठेवली आणि अलगदपणे बाळाला बाहेर काढण्यात मी यशस्वी झाले. बाहेर येता क्षणी बाळाने ठणाणा केला . ज्यामुळे ते गुदमरलं नाही याची खात्री पटली.  बाळाला धरून सरळ बाहेर ओढलं तर कोणत्याही भागाचं फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळे तंत्रशुद्धता गरजेची असते. पण बरेचदा परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शास्त्र- तंत्र गुंडाळून ठेवावं लागतं. सुदैवाने हे बाळ ठणठणीत होतं. पुढचे सगळे सोपस्कार  आटोपले आणि मी निवांतपणे डिलीव्हरी च्या नोट्स लिहू लागले.

‘ मॅडम नमस्कार. ओळखलं नाही का?’ 

  असा आवाज येताक्षणी मी वर बघितलं. मला कसलाच संदर्भ लागत नव्हता. मी  प्रश्नार्थक चेहे-याने समोरच्या व्यक्तीकडे बघू लागले.

‘हे बघा मॅडम ‘- असं म्हणून त्या व्यक्तिने   मळकट पिशवीतून एक पिवळ्या रंगाचं जीर्ण  कार्ड काढलं..

‘अरे, हे तर आमच्या हॉस्पिटलचं डिसचार्ज कार्ड दिसतंय.’

‘हो मॅडम. याच दवाखान्यात माझी पत्नी   2 वर्षापूर्वी डिलीव्हरीसाठी भरती झाली होती. त्यावेळी ती सीरियस झाली आणि दोन बाटल्या रक्त  द्यावं लागलं होतं’.

डिसचार्ज कार्डवर माझंच अक्षर होतं. जसे माझे डोळे त्या अक्षरांवरून फिरत होते, माझ्या समोर सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं.

वर्षानुवर्ष वैद्यकीय व्यवसाय करित असल्यानं प्रत्येक पेशंट ओळखणं शक्यच नसतं. नाव, चेहेरा लक्षात राहणं ही अशक्य कोटीतली बाब असते. मात्र  ‘विशिष्ट केसेस’ या मेंदूतून कधीच डीलीट होत नाहीत. कारण त्यांना  स्वतः हाताळून कधी यश, अपयश,चुका…. अनुभवल्या असतात. त्यामुळे अशा केसेस कायम मेमरी त असतात.

      मी चटकन उठून पेशंट जवळ गेले. रुक्मिणीबाई श्रांत क्लांत अवस्थेत निपचित पडून होती. माझी चाहूल लागताच तिने डोळे उघडले आणि हात जोडून नमस्कार केला. '

‘ अगं, तू आहेस हे मला कळलंच नाही. तू सुद्धा ओळख दिली नाहीस’.

‘येळच कुठे भेटला मॅडम? माझ्याकडे बघाले तुमाले कोठे फुरसत होती? तुमी तुमच्या घोरात. आन मले तं काईच सुदरत नवतं’.

‘धन्य आहे तुझी रुक्मिणी बाई . तूच संकटात टाकतेस आणि त्यातून बाहेरही काढतेस.’

मी कोपरापासून हात जोडत म्हणाले.

ही रुक्मिणी बाई दोन वर्षापूर्वी आमच्या दवाखान्यात भरती झाली. पहिलटकरीण होती. बारिक कळा सुरु झाल्या होत्या. नऊ महिन्यात नियमित तपासणी, ब्लडप्रेशर, हिमोग्लोबीन, शुगर, सोनोग्राफी या  भानगडीत न  पडणारी ,  कळा सुरू झाल्यावरच डायरेक्ट दवाखान्यात येणारी एक अघोषित संघटना असते. रुक्मिणी त्यांचीच सदस्य. 

तपासणी केल्यावर सगळं काही नॉर्मल असल्याने काळजीचं  काहीही कारण नव्हतं. साधारणतः दहा बारा तासात तिची नॉर्मल डिलीव्हरी होणं अपेक्षित होतं . अर्थात, ‘होप फॉर द बेस्ट अँन्ड प्रिपेअर फॉर द वर्स्ट .’.... हा मंत्र नेहमी लक्षात  ठेवायचा हे माझं तंत्र. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गोंधळ होत नाही. नॉर्मल पेशंटला ज्युनियर डॉक्टर्स  व्यवस्थित सांभाळत असल्याने मला प्रत्येक पेशंटला अटेंड करण्याची गरज नसायची. रुक्मिणी बाईचीची रात्री एक वाजता नॉर्मल डिलिव्हरी  होऊन मुलगी झाली. आता प्लॅसेंटा पडण्याची वाट होती. प्लॅॅसेंटा हा ठराविक वेळेत पडणं आवश्यक असतं. कधी कधी पोटावर हलकासा दाब देऊन त्याला बाहेर पडण्यास मदत करावी लागते. रुक्मिणी बाईच्या बाबतीतही असंच झालं.थोडा उशीर झाल्यामुळे पोटावर दाब देण्यात आला आणि भलतंच घडलं. प्लॅसेंटा बरोबर गर्भाशय ही बाहेर आलं. याला ‘इनव्हर्शन ऑफ युटेरस’ असं म्हणतात.  यात गर्भाशयाची आतली बाजू बाहेर येते.एखादी पिशवी उलटी केल्याप्रमाणे. ही अत्यंत दुर्मिळ अशी अवस्था आहे. अनेक बाळंतपणं, अनेकदा गर्भपात, काही गंभीर आजार..... ज्यामुळे गर्भाशयाचे स्नायू कमकुवत होतात - अशा स्त्रियांमध्ये बाळंतपणाच्या वेळी गर्भाशया वर अतिरिक्त दाब दिला, तर असं चित्र दिसू शकतं. रुक्मिणी तर वयाने २४ वर्षाची व पहिलटकरीण होती. तिला  कोणत्याही आजाराचा इतिहास नव्हता. पोटावर दिलेल्या दाबाबद्दल  सिस्टर आणि ज्युनियरला खोदून खोदून विचारलं . पण  ज्युनिअर अनुभवी असल्याने ती अशी चूक करणं शक्यच नव्हतं.

          अशी केस कधीच बघितली नसल्याने ज्युनियर डॉक्टर आणि सिस्टर ला काहीच समजलं नाही. हे नक्की काय आहे, यावर त्यांचे आडाखे बांधणं सुरु होतं.. फायब्राॅइड ? ट्युमर?...वेगवेगळे तर्क करत त्यांनी मला कॉल पाठवला. मी सुद्धा अशी केस पहिल्यांदाच बघत होते. ‘इन्व्हर्शन ऑफ युटेरस’ असावं का, ही शंका माझ्या मनात  डोकावताक्षणी हृदयाचा ठोका चुकला. कारण बाळंतपणानंतर गर्भाशय हे क्षतिग्रस्त असतं. प्लॅसेंटा गर्भाशयाला चिकटला असतो.  हा चिकटून बसलेला प्लॅसेंटा सुटल्यावर त्या ठिकाणी आतून जखम झाली असते, जी भरून येण्यास सव्वा महिना लागतो. असं हे गर्भाशय शरीराबाहेर आलं आहे, त्यातून रक्तस्त्राव होतो आहे. म्हणजे पेशंट शॉक मध्ये जाऊ शकते. या विचारांनी मला धडकी भरली. मी ताबडतोब बीपी -पल्स चा रेकॉर्ड बघितला. बीपी कमी झालं होतं.पेशंट अर्धवट शुद्धीत होती. .ताबडतोब सलाईन, ऑक्सीजन लावलं.  सीनियर मॅडम, ॲनस्थेटिस्ट 

 यांना अर्जंट कॉल केला.  बाहेर आलेल्या गर्भाशयाचा रक्तस्त्राव व इन्फेक्शन नियंत्रणात राहण्यासाठी गर्भाशयाला तात्पुरतं पॅकिंग केलं.पेशंटला ओटीत हलवलं. हिमोग्लोबिन तपासल्यावर ते पाच ग्रॅम  निघालं. नातेवाईकांना रक्ताची सोय करायला सांगितली. ' हाय रिस्क कन्सेन्ट ' घेतली. अशा या केसमध्ये लवकरात लवकर गर्भाशयाला जागच्या जागी बसवणं हे महत्त्वाचं.  हाच एकमेव उपाय आहे . त्याचंही एक तंत्र आहे, ज्यासाठी पेशंटला भूल द्यावी लागते . नंतर ओटी मध्ये पद्धतशीर सगळ्या प्रक्रिया पार पडल्या.   रक्ताच्या तीन बाटल्या लागल्या.४८ तास डोळ्यात तेल घालून पेशंटवर लक्ष ठेवलं. तिसऱ्या दिवशी सकाळी पेशंट धोक्याबाहेर आली. आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

          पेशंट आमच्या दवाखान्यात ३ आठवडे राहिली. कारण  संपूर्ण विश्रांती ही , तिचं गर्भाशय पूर्ववत होण्यासाठी आवश्यक होती. तिला, तिच्या आईला, सासूला, नवऱ्याला रोज आम्ही पुढची काळजी कशी घ्यायची हे समजावून सांगत होतो. तिच्या डिसचार्ज  कार्ड वर मोठ्या अक्षरात सूचना पण लिहिल्या होत्या. ‘दुसऱ्या मुलाची घाई करू नये. चार ते पाच वर्षांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भधारणेचा विचार करावा. समजा गर्भधारणा झालीच तर प्रत्येक महिन्यात वैद्यकीय तपासणी करावी. दुसरे बाळंतपण हे सिझेरियनच होईल याची कल्पना आताच देण्यात येत आहेे.’

इतकं ठासून सांगण्याचा उद्देश हाच, की पेशंट ला त्याचं गांभिर्य उमजावं. 

      पण इतकं ‘ प्रबोधन ‘करुनही ही ‘महान माऊली’ जेमतेम दोन वर्षांनी आमच्याकडे दाखल झाली - ती सुद्धा अगदी वेळेवर. त्यातही आधीची हिस्ट्री सांगण्याच्या परिस्थितीत ' माता' नव्हती तर पिताश्रींना त्याची गरजच वाटली नाही. नशीब हे की आधीचं डिस्चार्ज कार्ड फाटकं का असेना पण शाबूत होतं ज्यामुळे तिची हिस्ट्री तरी कळली -  अर्थात ती ही उशीराच .आणि माझ्या ‘प्रबोधनपर लिखाणाचा’ शून्य उपयोग होतो’- हा मला साक्षात्कारही झाला.

      आता मात्र मी चिंतन (विचारांच्या वरची पातळी हो.) करु लागले. रुक्मिणीबाई आमच्या सल्ल्यानुसार वागली असती तर???  लगेच होणाऱ्या गर्भधारणेपासून आम्ही तिला परावृत्त केलं असतं. चार वर्षानंतर गरोदरावस्थेचे शेवटचे तीन महिने तिला  भरती करून सक्तीची विश्रांती दिली असती. आणि एखादा योग्य दिवस ठरवून तिचं सिझेरियन केलं असतं.

         पण  वैद्यकीय सल्ला धुडकावूनही, तिचं सिझेरियन टळून नैसर्गिक प्रसूती झाली. बाळ गुटगुटीत निरोगी. बाळंतीण टुणटुणीत. याला काय म्हणायचं? म्हणजे आमच्या सल्ल्याला काही अर्थच नाही का? थोडक्यात काय,आमचं न ऐकल्यानं तिचा फायदाच झाला. पण मग आमचा सल्ला चुकीचा होता ???

 रुक्मिणीचा राऊंड घेताना मी चिडून जाब विचारलाच.

  ‘ मॅडम, आमाले बाबूच पायजे होता तं पयली पोट्टीच झाली.पन घरचा बुढा, बाबू साठी आस लावून बशेल होता. तुम्ही म्हनत का चार वरीस गॅप ठेवतो. पन मले तं काईच तरास नवता.रोज वावरात दन काम करत जावो मी. बाकी बाया बी इमारत, का येका पोरीत डंगरी होत अस्ते का माय? आमाला तं चार पाच पोरं होऊनबी आमी टनटन हावो. आता  घरचा बुढा ‘बाबू बाबू’ म्हनता मधीच गचकला तर मलेच बोल लागला अस्ता की नाय?’ 

   आणि मग मला उत्तर मिळालं .मी रुक्मिणीबाईची दुसरी डिलिव्हरी करत असताना

 मी तिला ओळखलंच नव्हतं .त्यामुळे तिची तिच्या हिस्ट्रीचंही विस्मरण झालं. फक्त हिस्ट्री अर्थातच विस्मरणात. मी‘ब्रीच’ वर लक्ष केंद्रित करूनतिची सुटका. केली. तिचं व्यवस्थित बाळंतपण केलं.   तात्पर्य हे, की ‘विस्मरण’ अनेकदा फायदेशीर असतं ते असं.

          “यद् पिंडी तद् ब्रम्हांडी” …. या न्यायाने प्रत्येक शरीरातही एक निसर्ग असतो - जो कधीही चुका करित नाही . उलट आपल्या चुकांवर पांघरूण घालून शरीराला सांभाळत असतो. प्रत्येकाची शरीररचना आणि शरीरक्रिया ही समान असली तरी स्वभाव आणि आतला निसर्ग वेगवेगळा असतो .  

     रुक्मिणीबाईचा जीवनस्तर बघता आरोग्य ही तिची प्राथमिकता कधीच नव्हती. म्हणून आमच्या सूचनांचं तिला आणि तिच्या कुटुंबियांना शून्य महत्व होतं. ती मोकळ्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून शारीरिक कष्ट करणारी.अशा लोकांची तब्येत नैसर्गिक वातावरणातच सुधारते. माझ्या पुस्तकी सल्ल्यापेक्षा ‘बुढ्याले नातू दाखवणं’, ‘इतर आयाबायांचे उपदेश’ …  हे तिच्या साठी जास्त महत्वाचं होतं.नैसर्गिक, अभावग्रस्त परिस्थितीत जगणारे हे जास्त निरोगी असतात कारण बाह्य निसर्ग त्यांच्या शरीरातील निसर्गावर परिणाम करित असतो.

       इथे रुक्मिणीबाई ऐवजी एखादी सुशिक्षित, संपन्न  आर्थिक स्थितीतली स्त्री असती तर तिने अजून चार डॉक्टरांचे सल्ले घेतले असते. मग शरीरमनाला फुलासारखं जपत ती ‘ व्हीआयपी’ पेशंट झाली असती आणि स्वतः बरोबर आम्हालाही तिनं वाचवलं असतं.

             शरीरावर उपचार आणि शरीरानुसारच सल्ले हे डॉक्टरचं काम. पण त्याहीपेक्षा प्रभावी शरीरातला ‘निसर्ग’ असतो जो  शरीराच्या संरक्षक आणि उपचारात्मक प्रणालीचं काम करतो..पेशंटमधल्या या प्रणालीचा अंदाज नसल्याने  शास्त्रीय वैद्यकीय आडाखे बरेचदा चुकतात. म्हणूनच ९९% ब्लॉक असणाऱे एखादे आजोबा बायपास सर्जरी नाकारतात आणि पुढची दहा वर्षे मजेत जगतात. त्याचवेळी चाळीशीचा तरुण छाती दुखते म्हणून ॲंजिओप्लास्टी करतो आणि तणावात राहून दोन वर्षांतच बायपासला सामोरा जातो.

     आज वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झालं, कृत्रिम गर्भधारणेचं तंत्र कितीही विकसित झालं तरी गर्भधारणा,   गर्भपात आणि प्रसूती  हे  हुकुमी एक्के शरीरातील निसर्गाने स्वतःच्या हातात ठेवले आहेत. विज्ञानाला शरीरातील  हा निसर्ग आजही अगम्य आहे.कारण तो  कोणत्याही प्रयोगशाळेत तपासता येत नाही. म्हणूनच पेशंटला (आणीबाणीची परिस्थिती नसेल तर) कधी कधी  त्याच्या आतल्या निसर्गाच्या हवाली करावं……    हा निसर्ग डॉक्टरांपेक्षा तल्लख असतो.  तो त्याचं काम चोख करतो.पण ही ‘अंदरकी बात’ आहे बरं का.पेशंटला याची अजिबात कल्पना नसावी.हे ही एक तंत्र आहे जे पेशंटला कळू न देता केव्हा आणि कसं वापरायचं ….हे  मात्र मी का सांगू? “डॉक्टरांच्या हाताला गुण आहे हो”.... हे वाक्य ऐकून माझा आतला निसर्ग सुदृढ होतो की.मग? ये अंदरकी बात है!!!









Thursday, September 19, 2024

जागतिक आरोग्य दिन

 आज जागतिक आरोग्य दिन.या वर्षाची थीम आहे...'माझे आरोग्य माझा अधिकार '.आता हा अधिकार म्हणजे नेमकं काय? 'मुळात आरोग्य म्हणजे काय रे भाऊ?'...हा एक यक्षप्रश्न... प्रत्येक डॉक्टरच्या कुंडलीत ठाण मांडून बसला असतो.जिथे डॉक्टरच गोंधळलेला..तिथे पेशंट बद्दल काय बोलावं ? ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'..अशा आवेशात अनेक पेशंट्स येतात आणि रॅपिड फायर राऊंड सारख्या प्रश्नांनी डॉक्टरांची तब्येत बिघडवतात.आणि शेवटी जाताना एक कळीचा प्रश्न टाकून, अर्धमेल्या डॉक्टरवर प्राणांतिक वार करतात.

'किती दिवसात बरं वाटेल?'...

 बॅटिंग ला निघालेल्या विराट कोहलीला विचारतो का आपण,की किती रन काढून आऊट होणार म्हणून?

               असो.परवा राजधानी ने दिल्ली ला चालले होते. एकटी आणि निवांत होते.

डोक्याखाली उशा, अंगावर ब्लॅंकेट आणि एसी या अत्यंत अनुकूल?? वातावरणात मी प्रचंड सकारात्मकतेने आणि लढाऊ बाण्याने मेडिसीन च्या पुस्तकाचं वाचन सुरु केलं. चक्क दोन चॅप्टर्स वाचून झाले. मी माझी पाठ थोपटली.यापुढे प्रवासात अशीच पुस्तकं वाचण्याचा संकल्प पण सोडला.आणि मस्त आळस दिला.

    नेमका हाच क्षण माझ्या शेजारच्या बर्थ वरील बाईनं अचूक पकडला.

"तुम्ही डॉक्टर आहात ना?" 

तिनं अनपेक्षित बाउन्सर टाकला.मी कन्फ्युज्ड. हिनं कसं ओळखलं? टिपीकल डाॅक्टरसारखा स्मार्ट,अॅटिट्युड असणारा माझा चेहेरा दिसतोय की काय? जवळपास आरसा ही नव्हता.पण लगेचच लक्षात आलं की माझ्या पुस्तकानं घात केलाय.माझी जुजबी चौकशी करून त्या माऊलीने बॅटिंग सुरु केली.

"माझ्या टाचा खूप दुखतात हो. ४ पोळ्या पण लाटू शकत नाही मी"

"हे बघा माझ्या पाठीवर पुरळ आलंय. घामोळं नाहीय ते"

"मानेच्या हालचाली केल्या की चक्कर येते हल्ली"

मी गाडीच्या डब्यात दवाखाना तर थाटला नाही ना,अशी माझीच मला शंका आली. आता माझ्या समोर तीन पर्याय होते.तिचे बाऊन्सर्स आक्रमकपणे परतवायचे, सोडून द्यायचे नाहीतर टाईमपास टोलवाटोलवी करायची.मी तिसरा पर्याय निवडला कारण पुढचे ७/८तास तरी हा शेजारधर्म नाईलाजाने मला पाळणं भाग होतं.

  थातुरमातुर उत्तर देऊन मी पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं.पण समोरची बाई खिंड सोडायला तयार नव्हती.बाजी प्रभू देशपांडेंच्या वंशातली होती की काय देव जाणे.जरा पुस्तकातून माझी नजर जरा वळली की केलाच तिनं प्रश्नाचा वार.

"राईस ब्रॅन चांगलं की करडईचं?"

"शेवगा रोज खावा का?"

"खजूर चांगला की मनुके?"

बाई काहीही खा पण माझं डोकं खाऊ नको- -- -असं मला म्हणता आलं असतं तर????

  डॉक्टर या प्राण्याची छळवणूक आणि पिळवणूक करणारी एक जमात असते आणि तिचा योग माझ्या कुंडलीत वारंवार का येतो हे मला न सुटलेलं कोडं आहे.

   कुणाच्याही घरात, अंगणात, देवळात, मॉलमध्ये, रिसेप्शनमध्ये, थिएटरमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर.....फक्त दवाखाना सोडून कुठेही एखादी जुजबी ओळखीची व्यक्ति जेव्हा

"मला नेहमी सर्दी होते हो,काय करायला पाहिजे त्यासाठी?" किंवा

"हल्ली माझे केस फार गळतात हो, काय करावं त्यासाठी?"............

"किडनी स्टोन साठी आयुर्वेदिक औषधे आहेत का हो?"......

आता 'माझे आरोग्य माझा अधिकार '....हे मान्य आहे हो पण या अधिकाराचा गैरवापर होत असेल तर त्या दीन, पीडित डॉक्टरच्या आरोग्याची पातळी खालावते त्याचं काय???

आणि वरुन हेच पेशंट आम्हाला ' काळजीने' विचारतात.....'अरे, तुम्ही पण आजारी पडता? डॉक्टर असून सुद्धा???


असो.जागतिक आरोग्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा.

Saturday, July 1, 2023

यथा पेशंट: तथा डॉक्टर': ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

   


     


  माझी रोजची ओपीडी. सकाळी नऊ पासून सुरू होणारी. आमचे निमसरकारी आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय. त्यामुळे पेशंटचा प्रचंड ओघ. कॉर्पोरेट  हॉस्पिटल सारखे 'एसी केबिन', 'रिसेप्शनिस्ट', 'अपॉइंटमेंट'.. असे चोचले आम्हाला परवडणारे नाहीत. पेशंट स्वतःच आपली लाईन लावणार, मध्येच घुसणार, भांडणं होणार... हे रोजचंच चित्र. एक पेशंट केबिनमध्ये तपासायला आत शिरला की दुसरा पेशंट एक पाय आत एक पाय बाहेर असा उभा राहणार. तिसरा पेशंट मधूनच पडदा बाजूला करून डोकावणार .चौथा पेशंट खिडकीतून आत बघणार हे नित्याचंच. त्यादिवशी बारा वाजत आले होते. जवळजवळ ४० पेशंट पासून झाले होते. १२ नंतरची वेळ फारच आणीबाणीची असते. तपासण्याचा, बोलण्याचा, ऐकून घेण्याचा.... सगळाच वेग मंदावला असतो. एक ज्येष्ठ   गृहस्थ बराच वेळ पासून मला बाहेर उभे दिसत होते. त्यांना आत येण्याची काही घाई दिसत नव्हती.ते सारखे आत डोकावून बघत होते. सगळे पेशंट आटोपल्यावर मी लांब श्वास घेऊन उठले. आता भूकही लागली होती. तेवढ्यात ते आजोबा आत आले. 

   "या दवाखान्यात तुम्ही पोटदुखीवर औषध देता का हो?"

    त्यांचा हा प्रश्न ऐकून, 'नाही हो. मी इथे भुवया कोरून देते'- - असं सणसणीत उत्तर द्यायची इच्छा मला झाली पण मी स्वतःला आवरलं. डोक्यात जाणाऱ्या पेशंटशी - तेही विशेषतः बारा वाजल्यानंतर, कमीत कमी मनस्ताप करून कसं बोलायचं याचा माझ्याजवळ फॉर्म्युला तयार असतो. उत्तरा दाखल मी फक्त मान हलवली - होकारार्थी. "पोटदुखीवर पंचकर्म पण करतात का हो?" 

  परत माझी होकारार्थी मान हलली. 

  "पंचकर्माचा खर्च किती येतो?" 

  आता मात्र माझ्या श्वासाची गती वाढू लागली. मी डोळ्यांनी इशारा करून नॉन स्ट्रायकर एन्डवर उभ्या असलेल्या माझ्या हाऊस ऑफिसर कडे बॅटिंग दिली.

हाऊस ऑफिसर तरुण, उत्साही आणि अननुभवी असल्याने,त्याने आजोबांचे बॉल दणादण हाणायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात मी एक ते शंभर आकडे मनात मोजून दीर्घ श्वास घेतले.आजोबांच्या ज्ञानात कितपत भर पडली देव जाणे. आता आजोबांनी माझ्याकडे बॉल टाकला. 

"अहो पंचकर्म करायला आठ दिवस लागतात? आम्हाला तर परवाच पुण्याला जायचं आहे." 

आता तर माझ्या हृदयाची गती पण वाढू लागली. त्यांचा बॉल मी न टोलवता सोडून दिला आणि जास्तीत जास्त मख्ख चेहरा करून बसले. 

"मॅडम सांगा ना, काय करायचं ?"-आजोबा. 

आता मात्र त्यांच्या बाॅलवर सीमापार फटका मारायची वेळ होती. 

"अहो पोटदुखीवर पंचकर्मच करायचं, हे तुम्ही कसं काय ठरवता? आधी पेशंटची हिस्ट्री, तपासणी, आजाराचं निदान, गरजेनुसार चाचण्या हे सगळं झाल्यावरच आम्ही ठरवू औषध द्यायचं की पंचकर्म करायचं"

" मॅडम, सगळ्या तपासण्या झाल्या आहेत. सोनोग्राफी, एक्सरे झाले आहेत. पोटदुखीचं निदानही झालं आहे औषधेही खूप दिवस घेतली. काही फायदा नाही. आता ठरवलं , पंचकर्मच करायचं. अहो कित्येक वर्षापासून मी याच भागात राहतोय पण मला माहीतच नव्हता हा दवाखाना"- आजोबा. 

आता मात्र सीतेसारखं मला या दवाखान्यासकट जमिनीत गडप व्हावं असं क्षणभर  वाटून गेलं. गेल्या तीस वर्षाची रुग्णसेवा आजूबाजूंच्या खिजगणतीतही नसावी? 

"हे बघा आजोबा, आधी तुम्ही टेबलवर झोपा .तुमची लक्षणं, हिस्ट्री सांगा. मग काय ते ठरवू ."आता मी अंपायरच्या भूमिकेत शिरले. 

   "नाही हो. मी फक्त चौकशी करायला आलो होतो. माझ्या मिसेसला पोट दुखीचा त्रास आहे. तिला केव्हा आणू?" 

   आजोबांनी गुगली टाकला आणि मी ताडकन उठून थर्ड अंपायर म्हणजे सिस्टर कडे ती केस सोपवून केबिन बाहेर पडले.

      एकदा तर गंमतच झाली .तीव्र कंबर दुखीमुळे उभे राहणे, चालणे कठीण झालेला एक पेशंट पंचकर्म करण्यासाठी दवाखान्यात भरती झाला. उपचार सुरू झाल्यावर त्याची लक्षणे हळूहळू कमी होऊ लागली. रोज राउंड घेताना तो कंबरेचं दुखणं सोडून इतर बऱ्याच तक्रारी सांगायचा.

अंगाला खाज, डोकेदुखी, छातीत जळजळ वगैरे लक्षणांवर त्याला आम्ही औषध देत होतो. त्यातली खाजेची, डोक्याची कोणती गोळी आहे हे तो  हाऊस ऑफिसरला विचारत असे. आठ दिवसाच्या पंचकर्माने त्याची कंबर दुखी पूर्ण नाहीशी झाली. तो उभा राहून चालू लागला. पण अंगाला खाज, डोकेदुखी, जळजळ काही कमी होईना. त्यामुळे तो दवाखान्यातून सुट्टी घ्यायला तयार नव्हता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. मी सिस्टरला त्याच्यावर बारीक नजर ठेवायला सांगितली. तेव्हा हे महाशय डोकेदुखीच्या गोळ्या बायकोसाठी, खाजेच्या गोळ्या आईसाठी आणि छातीत जळजळीच्या गोळ्या मित्रासाठी जमा करून स्वतः 'प्रॅक्टिस' करत होते. दुसऱ्या दिवशी राऊंडच्या वेळेस त्याचं तेच डोकेदुखी खाजेचं रडगाणं सुरू झालं. मी म्हटलं, 

"हे बघा, तुम्ही कमरेच्या दुखण्यासाठी भरती झालात ते दुखणं बंद झालं ना? आता बाकी लक्षणांसाठी औषध देऊनही जर आराम होत नसेल तर

आपण आता डोकेदुखीसाठी सिटीस्कॅन, जळजळीसाठी एंडॉस्कॉपी आणि खाजेसाठी एलर्जी टेस्ट करूया. मी चिठ्ठी लिहून देते तुम्हाला." 

  ही माझी मात्रा अचूक लागू पडली आणि माझ्या राउंड नंतर पेशंट लगेच गाशा गुंडाळून घरी परतला.

         असे मजेदार अनुभव आणि अफलातून किस्से समस्त डॉक्टरांच्या पोतडीत भरपूर जमा झालेले असतात. माझ्या 30 वर्षाच्या अनुभवानुसार कोणत्याही पेशंटशी पाच मिनिटं बोलल्यावर त्याची वृत्ती लक्षात येते. मग त्याच्याशी कसं, किती,कोणत्या स्वरात, कोणत्या भाषेत,कशा पद्धतीनं बोलायचं हे लगेच ठरवता येतं.                                                       आजकाल डॉक्टरांच्या नावानं खूप ओरड केली जाते. पूर्वी डॉक्टर हे देवाप्रमाणे होते. आजकाल असे डॉक्टर्स अभावानेच आढळतात असे अनेकांचे मत असते. परंतु पेशंट सुद्धा पूर्वीसारखे कुठे राहिलेत? हल्लीचे पेशंट गुगल विद्यापीठातून अर्धवट माहिती घेऊन येतात. कशा पद्धतीचे उपचार करायचे हे डॉक्टरच्या ऐवजी तेच ठरवतात.तपासण्या करण्याचा अट्टाहासही अनेक पेशंटचा असतो.  

         खरं तर चरक महर्षींनी सांगितल्या प्रमाणे, 'विद्या, वितर्क,विज्ञान, स्मृती,तत्परता आणि क्रिया '.. या षड्गुणांनी युक्त असे डॉक्टर वास्तवात असतातच.पण हल्ली पेशंट हे  'इंपेशन्ट' झाले आहेत.त्यामुळे बरेचदा डॉक्टरांना ' विद्या, वितर्क' गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.

          आमच्या चरक संहितेत  तर उत्तम रुग्णाचे पण गुण सांगितले आहेत.

  " स्मृती निर्देशकारित्वं अभिरुत्वमथापि च ।  ज्ञापकत्वं च रोगाणां आतुरस्य गुणा:  स्मृता:।।"

उत्तम रोग्याला त्याच्या रोगाच्या कारणांची, पथ्य अपथ्यांची, औषधं घेण्याची आणि वैद्याने दिलेल्या सल्ल्याची पूर्ण आठवण असावी. वैद्याच्या आदेशाचे पालन करणे, न घाबरणे व वैद्यापासून आपल्या रोगाविषयी काहीही न लपवणे ही उत्तम रुग्णाची लक्षणे आहेत. 

       गंमत अशी की संधिवातासाठी गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी सांगितली की हा वैद्यकीय सल्ला न ऐकता, पेशंट धावत पळत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येतो.त्यावेळेस ऑपरेशन चा सल्ला आमच्या पासून लपवून ठेवतो आणि पंचकर्माने माझे गुडघे बरे करून द्या अशी ताकीदच देतो. पुणे, मुंबई अगदी परदेशात राहणारे बरेच जण दिवाळीत आपल्या घरी अकोल्याला येतात .आता दहा दिवस सुट्टी आहे तर पंचकर्म करून द्या. मग नंतर आम्हाला वेळ नाही असं स्वतःच ठणकावून सांगणारे पेशंट खूप वाढले आहेत. ब्लड प्रेशर, मधुमेहाची औषधं स्वतःच्या मनाने बंद करणारे, वाटेल तेव्हा सुरू करणारे, औषधांचे डोस  सोयीनुसार कमीजास्त करणारे, एकाच वेळी एलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषध घेणारे, स्वतःच्या मनाने डायट आणि अघोरी व्यायाम करणारे पेशंट  वाढतांना दिसत आहेत. दोन वर्ष एलोपॅथी ,एक वर्ष होमिओपॅथी घेऊनही आराम न पडल्यामुळे आता आयुर्वेद करून बघूया असा विचार करून पेशंट माझ्याकडे येतात आणि येताक्षणी  पहिला प्रश्न विचारतात,

  ' किती दिवसात बरं वाटेल मॅडम?'

   पूर्वी मी शास्त्रशुद्ध , प्रामाणिकपणे , सविस्तर समजावून सांगत असे. आता मात्र 

   "ऍलोपॅथीला दोन वर्ष, होमिओपॅथीला एक वर्ष दिलेत ना?मग आयुर्वेदाला तीन वर्षे लागणारच "असं ठामपणे सांगून देते. 

    शेवटी काय,कालाय तस्मै नमः.'यथा पेशंट तथा डॉक्टर' हाच आजकालचा मंत्र. रुग्णसेवेचा उदात्त व्यवसाय करतांना आनंदाचे,समाधानाचे क्षण येतातच. पण बरेचदा पेशंटपेक्षा डाॅक्टरच 'बिच्चारा'

    होतो. ही डॉक्टरांची बाजू समजून घेण्यासाठीच हा लेखन प्रपंच.

    ********************************

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी, अकोला

९४२२९३९५१०

#डॉक्टर्सडे

Thursday, May 13, 2021

देव तारी त्याला कोण मारी


त्यादिवशी ओपीडीत बसले असताना, समोर एक मध्यमवयीन स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या संपूर्ण चेहर्‍यावरुन हास्य ओसंडत होतं. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात येणाऱ्या पेशंटच्या चेहऱ्यावर  इतकं निर्मळ हास्य बघण्याची  सवय नसल्यानं मी क्षणभर दचकलेच आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघू लागले.

' मला ओळखलं नाही मॅडम? मी शांताबाई भिसे -(नाव बदललंय) - बार्शीटाकळी. हा बघा माझा मुलगा. वीस वर्षाचा झालाय.' 

'शांताबाई भिसे ,बार्शीटाकळी' म्हणताक्षणी मेंदूत पटापटा दिवे लागले आणि सगळं लख्ख आठवलं.

' अगं काय शिकतो तुझा मुलगा? किती छान दिसतोय.' मी विचारलं. 

' मॅडम, काॕम्प्युटर चा डिप्लोमा घेतला आणि  आता नोकरी करतोय. अरे पाया पड मॅडमच्या'. हे शेवटचं वाक्य मुलासाठी होतं .

'अगं,किती वर्षाने भेटते आहेस तू?'- मी.

 थोडावेळ हालहवाल सांगून  शांताबाई निघून गेली. ती निघून गेली पण मी वीस वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगात जाऊन पोचले.                         

        वीस वर्षापूर्वी जेव्हा मी आरएमओ म्हणून काम करीत होते, तेव्हाचा हा एक विलक्षण अनुभव. काही काही अनुभव मनात पक्के  रुतून बसतात, त्यापैकीच हा एक.

 त्यावेळी मी हॉस्पिटलच्या क्वार्टरमधे राहत होते. आणि माझा विभाग म्हणजे प्रसुती विभाग . त्यामुळे रात्री ,बेरात्री, अवेळी वाॕर्डमधून कॉल येणं हे नेहमीचंच होतं. त्या दिवशीही असंच मध्यरात्री दोन वाजता दारावरच्या थापांनी आणि 'मॅडम- मॅडम' या हाकेने मी ताड्कन उठले. आताशा मला दारावरच्या थापांवरून पेशंटच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला होता. कॉलबेल एकदाच  सौम्यपणे वाजली, की नुकत्याच हलके हलके कळा सुरू झालेली  पेशंट असणार. 

कॉलबेल न थांबता  वाजत राहिली, की पेशंट च्या प्रसूती कळा वाढलेल्या असणार. 

कॉलबेल न वाजवता दारावर जोरजोरात थापा पडू लागल्या, की - 'मॅडम, चला. पेशंटला टेबलवर घेतलं आहे' हा निरोप असणार. 

दारावर थापांबरोबरच हाका सुद्धा  असल्या, की नक्कीच काहीतरी इमर्जन्सी असणार.  

त्या रात्री तसंच झालं. मी ताड्कन उठून दार उघडलं. 'मॅडम, लवकर चला. पेशंटची रस्त्यात ऑटोतच डिलिव्हरी झाली. खूप ब्लीडिंग होतंय. पेशंट अर्धवट शुद्धीत आहे.' सिस्टर एका दमात बोलल्या.

'पेशंट रजिस्टर्ड आहे का?'- मी.

'हो.दोनवेळा येऊन गेलीय तपासायला'.- सिस्टर.

 'आणि बाळ कसं आहे  ग?'- मी चपला घालता घालता विचारलं. 'मॅडम, ते बाळ गेलेलंच होतं, असं त्या पेशंटची सासू आणि नवरा सांगताहेत.

 'गेलेलंच बाळ?' माझ्या मनात शंका आली. काय कारण असू शकेल?

'बाळ बघितलं तुम्ही?'

'नाही मॕडम.ते गेलेलंच आहे म्हणून ......'

हे बोलणं होईपर्यत पर्यंत आम्ही वाॕर्ड मध्ये पोचलो.

पेशंटचे नातेवाईक डोक्याला हात लावून बसलेले दिसले.पेशंटला बघूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं .  आत टेबलवर शांताबाईला झोपवलं होतं. सगळी  साडी रक्ताने भिजली होती. माझ्या  हाऊस ऑफिसरने बीपी,पल्स बघून सलाईनची तयारी करुन ठेवली होती.  

'शांताबाई , कसं वाटतंय आता?काय त्रास  होतोय?' - तिच्या डोक्यावर थोपटत,नाडीवर हात ठेवत,तिचे डोळे बघून तिच्या हिमोग्लोबिनचा अंदाज घेत, तिला विचारलं.  अर्धवट डोळे उघडणं - एवढाच तिचा प्रतिसाद होता. रस्त्यात होणारी डिलिव्हरी आणि त्यानंतर होणारा रक्तस्त्राव घेऊन येणारा पेशंट  आम्हाला नवीन नव्हता. एक तर, अशा वेळेला प्रसूती मार्ग वेडावाकडा फाटला जातो किंवा प्लॕसेंटा चा एखादा तुकडा  गर्भाशयातच  राहतो. ही दोन मुख्य कारणं रक्तस्रावाची असू शकतात. शांताबाईचं  यापैकीच एक कारण असावं हा माझा अंदाज  होता. पण त्याआधी  तब्येत गंभीर असल्याची लेखी संमती ,आयव्ही सलाईन लावून तिचं पल्स, बीपी नॉर्मल च्या जवळपास आणणं - हे आणि बरेच काही सोपस्कार महत्त्वाचे असतात.  सगळ्या  स्टाफला ही कामं सरावाची असल्यानं,ती लगेचच हातावेगळी झाली. मला प्रामुख्याने रक्तस्त्रावाचं कारण  शोधायचं होतं. सिस्टर ने पेशंट स्वच्छ केल्यावर मी तपासलं तेव्हा तिचा प्रसूती मार्ग  वेडावाकडा फाटलेला आहे, हे लक्षात आलं. त्यासाठी आत पर्यंत व्यवस्थित टाके घालणं आणि ॲनस्थेशिया आवश्यक होता. स्टाफला सगळ्या सूचना देऊन तयारी करण्यास सांगितलं आणि ॲनस्थेटिस्ट ला फोन केला. परत एकदा पेशंटची  अवस्था बघितली आणि ती आपल्या आटोक्यात येणारी आहे हे लक्षात आल्यामुळे जवळजवळ १०मिनीटांनी एक शांत आणि  दीर्घ श्वास घेतला.  

 मी तिच्या नातेवाईकांशी बोलायला बाहेर आले.सासू आणि नवरा खूप  घाबरले होते. तिच्या तब्येतीविषयी सगळी कल्पना तिच्या नवऱ्याला आणि सासूला दिल्यावर  मी बाळाबद्दल चौकशी करु लागले.

' बाळ पूर्ण दिवसाचं होतं की  अपुऱ्या दिवसाचं?आणि ते पोटातच गेलं  होतं की जन्म झाल्यावर लगेच गेलं?आॕटोमधे डिलीव्हरी झाल्यावर कुठे लागलं होतं का बाळाला?'

' मॅडम डिलीव्हरी कधी झाली हे पण समजलं नाही. बार्शीटाकळीहून आॕटोत बसलो.रस्त्याने अंधार होता.शांताची शुद्ध  हरपली म्हणून तिला आम्ही आडवं केलं तेव्हा लक्षात आलं. बाळाचा रडायचा आवाज पण आला नाही. बाळ निपचित होतं. श्वासही घेत नव्हतं. म्हणून आम्हाला वाटलं पोटातच गेलं असेल'.- सासू .

'बाई,तुम्ही बाळ दाखवा बरं'- असं म्हणताच  तिचा नवरा ऑटो जवळ गेला आणि एक कापडी पिशवी घेऊन आला. त्या पिशवीत त्यांनी त्या बाळाचं मुटकुळं ठेवलं होतं. ती पिशवी  बघून मला अक्षरशः ढवळून आलं. सिस्टरने ते बाळाचं गाठोडं बेबी ट्रे मधे ठेवलं.त्याला वरवर पुसून स्वच्छ केलं. पांढरंफट्ट पडलेलं, निपचित झालेलं पण  गुटगुटीत असलेलं बाळ बघून मनातला शंकासुर जागा झाला. बाळाच्या मृत्यूचं नेमकं काय कारण असावं??

       मी सहज त्याच्या छातीवर हात ठेवला. त्या थंडगार स्पर्शाने अंगावर काटा आला. पण  क्षणभरातच त्याच्या हृदयाचा एक मंद ठोका मला जाणवला आणि माझ्या छातीचे ठोके वाढले.स्टेथोने आणखी दोन क्षीण ठोके मला ऐकू आले आणि .........'सिस्टर' - मी जोरात  ओरडले . माझ्या ओरडण्याने  सिस्टर आणि हाऊस ऑफिसर काय समजायचं ते समजल्या. बाळाला उलटं पकडणं, त्याचं सक्शन करणं,त्याच्या पोट/पाठीवर थंड/गरम पाण्याचे सपकारे मारणं, त्याला ऑक्सीजन लावणं, आणि आवश्यक ती इंजेक्शन देणं - - या सगळ्या स्टेप्स आम्ही भराभरा करायला सुरुवात केली आणि लगेच जवळ असणाऱ्या एनआयसीयु मधे  फोन करुन कल्पना देऊन ठेवली. सातव्या मिनिटाला त्या बाळाचा रंग बदलायला लागला. बाळाचे पंजे गुलाबी दिसायला लागले. त्याची छातीची धडधड क्षीण का होईना पण  सुरू झाली. आणि बाळाने डोळे अर्धवट उघडले. बाळाचा सकारात्मक प्रतिसाद बघून त्या बाळाला व्यवस्थित दुपट्यात गुंडाळून एनआयसीयुत भरती करण्यासाठी  नातेवाईकांच्या  सुपूर्द केलं. एनआयसीयु मध्ये  लगेच त्याची ट्रीटमेंट ही सुरू झाली. तोपर्यंत अॕनस्थेटिस्ट आले. पेशंटला व्यवस्थित टाके घातले गेले ज्यामुळे  रक्तस्त्राव नियंत्रित झाला. आणि सलाईन सुरु असल्यामुळे शांताबाई ची तब्येत व्यवस्थित होऊ लागली . हे सगळं आटोपेपर्यंत सकाळचे सहा वाजले . एनआयसीयु मधून निरोप आला की बाळाचा धोका अजून टळलेला नाही. पण आशा आहे की ट्रीटमेंटला  चांगला प्रतिसाद मिळेल. आणि तेव्हा कुठे आम्ही सगळे आमच्या नॉर्मल स्थितीमध्ये आलो.

     संध्याकाळपर्यंत बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित झाले. बाळाला पाच दिवस एनआयसीयु  मध्ये ठेवून मग त्याला सुट्टी दिली.आता मला  भीती ही होती की जन्मानंतर बराच वेळ बाळ रडलं नाही. त्यामुळे त्याच्या मेंदूवर सूज येऊन सेरेब्रल पाल्सी होईल की काही व्यंग निर्माण होईल का? पण याचं उत्तर काळाच्याच हातात होतं. बाळ तर वाचलं होतं .त्यानंतर जवळ जवळ वर्षभर, शांताबाई दर महिन्याला बाळाला घेऊन तपासायला येत असे. त्या वर्षभरात बाळाची वाढ व्यवस्थित होती. नंतर मात्र शांताबाई  कधीच आली नाही. आणि परवा  तो वीस वर्षाचा धडधाकट  मुलगा बघून मला अक्षरशः  भरून आलं. त्यावेळी त्या नातेवाईकांवर विश्वास ठेवून मूल गेलेलंच आहे या समजूतीत मी बाळाला मी हातही लावला नसता तर???

पण "देव तारी त्याला कोण मारी" हेच खरं.त्या मुलाच्या आयुष्याची दोरी बळकट होती  म्हणून देवानं मला त्याला हात लावून तपासण्याची बुद्धी दिली असंच म्हणावं लागेल.

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...