Showing posts with label विनोद. Show all posts
Showing posts with label विनोद. Show all posts

Sunday, March 16, 2025

Gen baby boomer

 जेन बेबी बुमर आणि लग्न    

        बहिणीच्या मुलाचं लग्न पाच दिवसांवर आलंय. आजपासून रोज भरगच्च कार्यक्रम - साॅरी- 'इव्हेन्ट्स' ठरवले आहेत. त्यानुसार ठराविक ड्रेस - साड्या - दागिने घालून हजर राहायचं आहे. आज कुळाचार असल्याने नऊवारी व धोतर - अशी थीम होती. नऊवारी जांभळ्या रंगाची म्हणजे मस्तानीने  'पिंगा ग पोरी' नाचतांना घातलेला जांभळा रंग बरं का. त्याला जांभळा नाही 'बर्गंडी' म्हणायचं असं हळूच माझ्या कन्येनं कानात ज्ञान ओतलं.

"मावशी, मज्जा आली की नाही? आता सगळ्या थीम्स फॉलो करायच्या बरं " नवरदेवाचा लाडिक? (अट्टाहास) हट्ट.

"तुझ्या थीम्स फॉलो करताना माझा बँक बॅलन्स 'हाॅलो' होतोय त्याचं काय? अरे मी स्वतः च्या लग्नातही इतक्या साड्या घेतल्या नव्हत्या."

"मावशी तुझं लग्न आता हिस्टाॅरिकल इव्हेन्ट  झालंय. त्या १८५७ च्या गोष्टी आणि आमची जनरेशन यात खूप फरक पडलाय."

खरंच. आमची 'बेबी बुम जनरेशन' (४६ ते ६४ मधे जन्म) कुठे     आणि या मुलांची 'जेन वाय' (७७ ते ९५ मधे जन्म) कुठे? जमीन अस्मानाचा फरक आम्ही स्वतःच अनुभवला आहे. नकळत मी इतिहासात शिरले आणि 'जेन बे बु' ची(आमची हो.) लग्नं डोळ्यासमोर आली.

                 त्या काळातील लग्नात कसल्या आल्या थीम्स? त्यावेळी आमच्या जगण्याचीच एक थीम ठरली होती. ती म्हणजे 'जेन सायलेंट' चे आज्ञापालन करणं.

"सदासर्वदा बोध अमुचाच घ्यावा।"

"विरोधाचा सूर कधी ना निघावा॥"

  असं आमच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंगच करून ठेवलं होतं. (गरीब बिच्चारी आमची पिढी) अपत्य संगोपनाचा  सार्वत्रिक अजेंडा म्हणजे मुलांना धाकात ठेवणं,मुलांचं कौतुक न करणं,त्यांचं ऐकून  न घेणं.......अशा या 'जेन सायलेंटच्या' (२८ ते ४५ मधे जन्म ) धाकात, आमच्या लग्नाबाबत काय बोलावं? लग्न या विषयाची आमची प्रश्नपत्रिका कितीही सोपी वा कठीण असो - सोडवणार कोण? तर वडिलधारे. लग्नसमारंभ म्हणजे मज्जा, धमाल, आनंद, एन्जॉयमेन्ट अशा भलत्याच संकल्पना त्याकाळी नव्हत्या. विशेषतः मुलीचं लग्न असेल तर दडपण, ताण, भिती आणि कष्ट - हीच थीम असायची.  "वरपक्ष हा कायम वरचढ असतो" , "पसंती - नापसंती ठरविण्याचा अधिकृत अधिकार वरपक्षाचा असतो." हे आमच्या मेंदूवर कोरलेलं ब्रम्हवाक्य. त्यामुळे घरात मुलीच्या लग्नाच्या हालचाली सुरु झाल्या की आया बायांच्या डोळ्यातून प्रसंगी टिपं गाळण्याची थीम सुरू व्हायची. एरवी समंजस, सुस्वभावी, सुसंस्कृत असलेली मंडळी 'वरपक्षाची' असली की त्यांची छाती ५६ इंच झालीच समजा.

             कांदेपोह्यांच्या प्रसंगी मुलीनं मान वर करून बघायचं नाही तर पायाच्या अंगठ्याकडे बघावं अशी आवर्जून सूचना दिली जाई. 'पायाच्या अंगठ्याने माती उकरणं ' ही संस्कारी परंपरा, फरशी किंवा टाईल्समुळे कठीण होऊ लागली होती.  तरी सुद्धा  "प्रयत्ने फरशी रगडता मातीही निघे" असा बाणा असलेल्या मुलींच्या अंगठ्याला नाहक इजा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे अंगठ्याकडे केवळ बघावं....  अशी सूचनेत तरतूद करण्यात आली. तसंच मुलीला हसण्याची बंदी असे. मख्ख, गंभीर किंवा तणावात असलेला चेहेरा 'जेन सायलेंटला' फारच सोयीचा वाटे. 

              एकदाचा होकार आला की दोन्ही कुटुंबातील वृध्द, वृध्दतर वृद्धतम ('जेन ग्रेटेस्ट' हो) व्यक्तींचा अचानक  भाव वाढत असे. हुंडा, सालंकृत कन्यादान, मानपान, देणीघेणी, मुलामुलीचा कपडा, जाण्यायेण्याचं भाडं,वरात,घोडा,.......ही  अस्त्रं , शस्त्रं केव्हा व कशी चालवायची... यात ही मंडळी अनुभवी . त्यांच्या उपस्थितीतच मंडळींची व्यवहाराची बोलणी होत. आणि कुटुंबाच्या जाज्वल्य इतिहासात वृद्धतम खापर पणजोबांच्या खाती नववं लग्न जमवण्याचा विक्रम सुवर्णाक्षरात नोंदविला जाई.

             असो. तर  लग्न जमताक्षणी नवरीसाठी खास आचारसंहिता लावली जाई. हल्ली ' प्री वेडिंग फोटोशूट 'असतं म्हणे.....( हे नेमकं काय? आणि कशासाठी?) . 'जेन बे.बु'.तील भावी वधुवरांमध्ये  जरासंही 'खुट्ट' झालं की 'शूट’असायचं.’शूट बाय साईट' हो........ म्हणजे 'जेन सायलेंटची' जळजळीत नजर!!

        'लग्नाचा बस्ता' ही महत्त्वपूर्ण घटना. दोन्ही पक्षातील महत्वाचे आणि मानाचे - अर्थातच ' जेन ग्रेटेस्ट'...... असा वीस- पंचवीस जणांचा जथ्था 'लग्नाचा बस्ता' खरेदीला जाई कारण विवाह समारंभात 'मानापमान नाट्य ' घडू नये म्हणून . नवरीसाठी फक्त पाच (अरेरे!!) साड्या. त्यापैक दोन घरी नेसायला(अरेरेरेरेरे!!!) आणि तीन लग्नाच्या. त्यावेळी शालूला फार महत्व. समोरच्या ढिगातून नेमका शालूचा रंग कोणता घ्यावा? यावर सासूबाईंचं निळ्याकडे तर , सासरेबुवांचं हिरव्याकडे बोट . आणि  डोळ्याच्या कोपऱ्यातून मुलीनं हळूच मुलाच्या बोटाकडे  बघावं तर ते सद्गृहस्थ शालूंच्या किंमतीचे लेबल बघण्यात गुंतलेले. बाकी मंडळी चहाच्या वाटेकडे डोळे लावून , जांभया दाबत बसलेली. आचारसंहितेमुळे वधुपक्षाला  'ब्र' काढायची परवानगी नसे. चाणाक्ष नोकराला परिस्थितीचा नेमका अंदाज आल्याने  शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे हे समजे. 'ताईला गुलाबी रंग किती खुलतो ' असं म्हणत गुलाबी शालू बाजूला ठेवी. ठराविक रंग, ‘ताईला 'शोभतो ’- हा जप करित कमीत कमी वेळात तो ताईची खरेदी निपटून टाकी. त्यानंतर पोटझाकणी, नणंददुरडी, आजीबोंद्री अशा 'जेन सायलेंटच्या' अगम्य विधीसाठी साड्या खरेदी होई . खरेदी संपल्यावर नेमक्या कोणाच्या पसंतीच्या  साड्या घेतल्या हे कधीच कुणीच सांगू शकत नसे. 

             वधूपक्षाकडे आता 'रुखवत' अंगात येई. नवरी मुलगी सर्वगुणसंपन्न आहे याचं प्रमाण म्हणजे रुखवत. युद्धपातळीवर चादरी, उशा, पडदे, टेबल क्लाॅथ, रुमाल, साडी यावर भरतकाम, कापसाचा ससा, पेपरमिंटचे तुळशी वृंदावन, आईस्क्रीमच्या काड्यांची होडी,  पैशाच्या नाण्यांचं देऊळ .... अशा कलात्मकतेशी फारकत घेणाऱ्या, व  प्राथमिक शाळेतील  प्रोजेक्टप्रमाणे बाळबोध कलाकृती  तयार होत. गोळाफेकीतल्या गोळ्या प्रमाणे अगडबंब लाडू, कासवछाप काॅईलशी स्पर्धा करणार्‍या चकल्या, आणि एका हातात न मावणार्‍या  महाकाय करंज्याही रुखवतासाठी सज्ज होत.

                हळदीच्या दिवशी नवरीचा खरा रंग ओळखू येणार नाही आणि पुढील पंघरा दिवस  पिवळा रंग पक्का राहील याची काळजी घेत  घरातील तमाम माऊल्या तिला मुक्तहस्ते हळद लावत. माझ्याच लग्नात माझ्या डोळ्यात,नाकात,कानात गेलेल्या हळदी मुळे मला पंधरा दिवस पिवळ्या रंगाचीच  स्वप्नं पडत होती.

          लग्नाचं कार्यालय म्हणजे एक मोठ्ठा हॉल.  वरपक्षाला दोन , वधूपक्षाला दोन खोल्या व कोठीघर. अशा चार खोल्या. वऱ्हाडी मंडळींची संख्या व शौचालय, बाथरूम, गाद्या, उशा , चादरी, पंखे यांच्या संख्येचे गुणोत्तर  कायम व्यस्त. त्यामुळे इकडे सीमांतपूजन तर दुसरीकडे पंगतीतली जागा आणि पंख्याखालची गादी एकाच वेळी आरक्षित करण्यासाठी  मंडळींच्या कोलांट्या, सूरपारंब्या, लांब उडी, उंच उडी, यांची प्रात्याक्षिकं . जेवावं तर गादी निसटणार. गादी पकडणार तर उपाशी रहाणार- अशी अटीतटीची परिस्थिती. बरं, सीमांत पूजनाचं जेवण तरी कसलं हो? फोडणीचं आंबटगोड वरण, भाजी, पोळ्या, भात. असलाच तर घासभर साखरभात किंवा शिरा. दीड वितीच्या पोटाची खळगी भरणं आणि देहासाठी  साडेतीन हाताची गादी......लागतंच काय माणसाला शेवटी? असा साक्षात्कारही( तात्पुरता !) काही पुण्यवान जीवांना त्याप्रसंगी होत असे. पण काहीही म्हणा. हल्लीच्या ' संगीत' पेक्षा हा रिअँलिटी शो नक्कीच 'अस्सल' असे .

.                लग्नाचा दिवस. लग्नाच्या प्रत्येक विधीत 'जेन बे.बु.' नवरा नवरी जास्तीत जास्त हतबल , केविलवाणे आणि विनोदी कसे होतील ही थीम 'जेन सायलेंट' कटाक्षाने पाळत.'मेकअप,   हेअरस्टाईल' हे शब्द डिक्शनरीतच नसल्यामुळे एखादी चुणचुणीत ( आगाऊ) मैत्रिण नवरीला तयार करायला येई. हळदीचा पिवळा रंग झाकण्यासाठी,  गुलाबी पावडरचा थर फासला जाई. अनेक नवर्‍यांनी वापरलेल्या लिपस्टिकच्या थोटकाने ओठ रंगवले जात. नवऱ्या मुलीने हसू नये अशी थीम असल्याने  वेळोवेळी टिपं गाळण्याचा लघु कार्यक्रम होई. त्यामुळे पावडरच्या थरामधून ओघळांचे निसर्गचित्र तयार होई. लग्न लागलं की नवरदेव अक्षतांची ओंजळ  नवरीच्या डोक्यावर रिकामी करून निसर्गचित्रात जिवंतपणा आणित असे.

      आयुष्यात पहिल्यांदाच घातलेला सूट, गळा आवळणारा टाय , त्यावर टोपी आणि मुंडावळ्या या विसंगतीच्या ' थीम' मध्ये नवरदेव 'विदुषक'  दिसे.त्यात उन्हाळा असल्याने घामाच्या धारा वाटेल तिथून वहात. नंतर 'सुलग्न'. यात नवरा नवरीची डोकी एकमेकांवर आपटण्याचा एक अश्मयुगीन लोकप्रिय कार्यक्रम असे. ही प्रथा का? कशी? कुणी?  सुरू केली याचं सूतभरही गम्य नसणारी मंडळी सुलग्न लावतांना, डोकी आपटायचं परमकर्तव्य करून जात. काही तरुण मित्रमंडळी तर शक्ती पणाला लावून डोक्यांची टक्कर करित. मध्येच काही महिलावर्ग हळदी कुंकवाची बोटं नवरीच्या कपाळावर (  बायकांचं कपाळ हे केवळ हळदीकुंकू लावण्यासाठीच देवानं निर्माण केलं आहे!!!)  टेकवून नवरीच्या हातात एखादं  स्टीलचं भांडं सरकवीत.नवरीच्या अंगावर किती आणि कसं सोनं घातलं हे बारकाईनं बघताना, नवरीचे हात , मान ,कान कसेही ओढण्याचा , त्यांना जन्मसिद्ध अधिकार असे. वडीलधा-यांना वाकून नमस्कार..  आणि डोक्यांच्या टक्करेमुळे नवदांपत्याची कंबर व डोकं हमखास ठणकू लागे.  त्यात नवरीच्या मुंडावळ्या घसरून नाकावर येत ,केसांच्या पिसार्‍यात  लोंबकळलेले गजरे ,कपाळावर मळवट, घामाच्या धारा....... नवरदेवाची टोपी उत्तर - दक्षिण, अशी एकंदरित  "आपण यांना पाहिलंत का" ही थीम आपोआप निर्माण होई. नवऱ्याची बहिण आपलं दोन वर्षाचं कारटं नवरीच्या मांडीवर ठेवून, ‘नवीन मामीजवल कोन बशनार?’असं म्हणून निघून जाई. ते बाळ मामीचे केस आणि मुंडावळ्या ओढून तिच्या देखणेपणात भर घाली. महत्वाचं म्हणजे,वधुवरांच्या भुकेची कुणालाही पर्वा नसे.कारण सगळी मंडळी चिवडा लाडूच्या ताटावर ‘आक्रमण’ करण्यासाठी रणांगणात उतरली असत. हो.आमच्या काळात ‘फ्याशनेबल’ नाश्त्याची भानगड नव्हती. ताटं भरुन चिवडा लाडू कोठी घरातून मांडवात पाठवला जाई. पुढची जबाबदारी ही सर्वस्वी वऱ्हाडींची. ताटांभोवती गटागटानं बसून मंडळी ताटं ‘साफ’ करित.  कुणीतरी  कुटुंबवत्सल व्यक्ति एखादी गरम झालेली कोल्ड्रिंकची एक बाटली व दोन पुंगळ्या आणून देई. एकाच बाटलीतून दोघांनी पेय पिण्याचा तो एक तरल, अतिरोमॅंटिक क्षण अनुभवावा तर एक पुंगळी चेपलेली असे. पण पोकळ पुंगळीतून जे बेचव,कोमट पेय तोंडात येई त्यापेक्षा चेपलेली पुंगळी बरी......असं होई. एकूणच नवदांपत्याचं पूर्णतः मानसिक व प्रेक्षणीय खच्चीकरण म्हणजे 'जेन बे बु 'चे लग्नसमारंभ.

              त्यानंतर होम आणि सप्तपदी मध्ये उरल्यासुरल्या अवयवाची - अर्थातच डोळ्यांची आग होऊन डोळे  आपोआप मिटले जात. तसंही बाजूच्या जोडीदाराचा 'आधार कार्डावरील फोटोप्रमाणे' अवतार असल्याने डोळे मिटणं ही इष्टापत्तीच असे. हे सगळं कमी असे की काय तर अजून शारीरिक ऊर्जेच्या खच्चीकरणाचा प्रकार म्हणजे 'विहीणीची पंगत.' पोटात भुकेने कावळे कोकलत असताना, पानात अन्न वाढलं असतांना, विहिणबाईंचा षोडशोपचार मानसन्मान निवांतपणे केला जाई. मग जरा एखादा घास पोटात जात नाही तोच 'घास भरवा, उखाणा घ्या' हा खेळ सुरू होई. त्यावेळी तर उखाणा ऐकल्यावरच मोक्षप्राप्ती होणार .... या आविर्भावात  दोन्ही कुटुंबांच्या यच्चयावत पिढ्यांचे जीव कानात गोळा होत. आतातरी ते गारगोटी झालेले पदार्थ गिळावे म्हटलं तर कुणीतरी विलक्षण बेसूर आवाजात 'विहीण' म्हणू लागे.जेवण आणि  गाणं या दोन्ही संकटांना सामोरं जाताना पंगतीच्या घशात घास अडकत असे आणि  नवरीच्याही डोळ्यातून गंगा यमुना. आता नवरदेवालाही या करुण भावनोत्कट प्रसंगात भोजनावर आडवा हात मारणं शक्यच नसे. एकंदरित दोघेही अर्धपोटी रहात.शेवटी काय, लग्न हा आनंदी, उत्साही समारंभ नसून डोकं गहाण ठेवून स्वतःचं अप्रेक्षणीय असं प्रदर्शन आहे.... हे अर्थात लग्नानंतरच कळतं.

            असो. पण आजचे लग्नसमारंभ बघतांना, नवरा - नवरी खिदळतांना, फोटोशूटच्या वेळी नको ते चाळे करतांना - प्रत्येक विधीला 'थीममध्ये' बसवलेलं बघताना, संगीतमध्ये आख्ख्या कुटुंबाचं 'न भूतो न भविष्यति' नाचकाम बघतांना........... खरंतर एखादी केविलवाणी विनोदी   एकांकिकेची आठवण येते. वरवर बघतांना आमच्या पिढीतली लग्नं हास्यास्पद नक्कीच होती पण त्यात सच्चेपणा होता.  आजचं लग्न हा एक आभासी आनंदाचा खर्चिक मुखवटा आहे. आणि त्यातली मेख अशी की आपण हा आनंद ओढूनताणून मुठीत पकडून आपलीच फसवणूक करतोय....  समजून उमजूनही....! हाही खरंतर एक केविलवाणा विनोदच!!! विवाह समारंभ हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात अतिमहत्त्वाचा दिवस असतो.पण समस्त लग्न विधींना साग्रसंगीत समाजमाध्यमांवर प्रसिद्धी देण्याइतका तो अभिनव  ही नसतो. अगदी पांढऱ्याशुभ्र घोड्यावरून एखादा देखणा राजकुमार हलकेच प्रगट ह्वावा.....हे स्वप्न अर्थातच प्रत्येक लग्नेच्छु तरुणीचं असतं ,यात वावगं काहीच नाही. अशक्य असणारं स्वप्न बघायला काय हरकत आहे? पण ज्या स्वप्नांचा भविष्यात सुतराम संबंध नाही, ती स्वप्नं एका दिवसा करिता प्रत्यक्षात आणण्यासाठी किती आटापिटा? किती खर्च?, बॉलिवूडच्या,टीव्ही सीरियल मधल्या, किंवा अब्जोपती उद्योगसम्राटांच्या विवाह समारंभांचं अनुकरण आपण सामान्यांनी का करावं? त्यामुळे नेमकं काय सिद्ध होतं? कुणी करेल का विचार???

#marriageceremony

#genbabybumer




__________________________


डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

 ९/१३५, केला प्लॉट, जठारपेठ, अकोला 

४४४००५

९४२२९३९५१०







Monday, January 6, 2025

 ब्रेन रॉट की बुद्धीबळ??




जानेवारीने पहिला आठवडा ओलांडला आहे.... पण नववर्षाचा संकल्प काही ठरत नाहीय.त्यामुळे माझी लेक प्रचंड अस्वस्थ झालीय. अत्यंत फुटकळ, सामान्य संकल्प (उदा० पहाटे उठणे, रोज ५ ० ० ० पावलं चालणे, रोज पुस्तकाची पाच पानं वाचणे, प्राणायाम करणे, सोयीनुसार दीक्षीत - दिवेकर डाएट पाळणे ).. वगैरे, वगैरे तिच्या मते सोऽऽऽऽऽ मिडलक्लास आहेत. याशिवाय प्लॅस्टिकबंदी, वृक्षारोपण, कचरानिर्मूलन, ध्वनिप्रदूषण, पर्यावरणरक्षण या ज्वलंत सामाजिक समस्यांवर देखिल सामूहिक संकल्प यशस्वीपणे तिच्या गृपने राबवले आहेत अशी इतिहासात (तिच्या हो.) नोंद आहे.  कोणत्याही संकल्पाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून इतिहासाचा धांडोळा घेणं गरजेचं होतं. आता संकल्प नाही केला तर तिच्या व देशाच्या  इतिहासात पोकळी निर्माण होईल अशी आमच्या  सात पिढ्यातही शक्यता नाही- - असं माझं ठाम मत. त्यावरून संकल्प न करण्याचाच संकल्प करावा अशी अवसानघातकी सूचना करून मी तिच्या तळपायाची आग मस्तकात पोचवण्याचा घोर अपराध केला . शिवाय हा संकल्प सुरक्षित, निरुपद्रवी, सोयीस्कर आहे - अशी री ओढून पिताश्रींनी  त्यात पळीभर तडक्याची आहुती घातली .आता हे होमकुंड शांत करण्याची जबाबदारी माझीच.

        तिच्या वयाची असताना आम्हा मैत्रिणींना पण संकल्पाचे दरवर्षी डोहाळे लागायचे. एक गंमत असायची त्यात. आता नुकतंच ' मी पुन्हा येईन’ या संकल्प सिध्दीची कहाणी याची देही याची डोळा अनुभवली आहे. ‘केल्याने होत आहे रे - आधी केलेचि ( संकल्प ) पाहिजे.’ यातल्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे. नाही म्हटलं, तरी यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली की नाही? खोटं कशाला बोलायचं? शिवाय जो संकल्प करतो -त्याचं मन जिवंत असतं असं म्हणतात (कोण???) आणि सगळ्यात  महत्वाचं म्हणजे लेकीच्या पिढीसाठी तर ' शास्त्र असतं ते'.

     आजकाल  'शास्त्र पाळणं'  हा राष्ट्रीय  कुळाचार झाला आहे  . हे नवशास्त्र संगणकयुगातील माध्यम व तरुणलोकसंस्कृती वर आधारित आहे . या शास्त्राची परंपरा आजचा समाज कसोशीने पाळताना दिसतो. या परंपरेत कमालीचा आनंद तर आहेच पण अभ्यास, विचार तर्क, विवेकबुद्धी असल्या अंगभूत बाबींना यात थारा नसल्याने प्रत्येकाला त्यात उच्च स्थानी पोचण्याची सारखीच संधी असते . . त्यामुळे नवीन पिढी तर सोडूनच द्या पण जुनी पिढीही आपली व्रत वैकल्ये बासनात गुंडाळून , माळ्यावर टाकून , कोरी पाटी घेऊन या परंपरेत सहभागी झालेली दिसते.

        तर मूळ मुद्दा हा संकल्पाचा आहे. हल्लीच्या नवशास्त्रात केवळ संकल्प करित नाही. तो एक  समारंभ असतो. ३१ डिसेंबरला रात्री एकत्र जमायचं. आधी जाणाऱया वर्षाचा निरोप घ्यायचा. मग  येणा- या वर्षाचं स्वागत करायचं. नाच, गाणी, धिंगाणा करून केक कापायचा . विशेष म्हणजे समारंभ कोणताही असो केकशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. वाढदिवस आणि केक- हे आपलं (माझ्या पिढीचं) समीकरण आता इतिहासात गेलंय. नंतर 'काँटिनेंटल' खादाडी करायची. आणि मग प्रत्येकाने आपला संकल्प जाहीर करायचा. या सोहळ्याचा व्हिडीओ करायचा. तो कमीत कमी पन्नास मित्रांना पाठवायचा. आणि लाईक्स मिळाले की त्यानंतरच ही कहाणी सुफळ संपूर्ण होते. असा वसा या नवशास्त्रात घ्यावाच लागतो. मग ट्रीप असो, वेगवेगळे ' डेज' असो, गॅदरींग  असो, बारसं, डोहाळजेवण लग्न, मुंज, वास्तू बीसी काहीही असो - केक, फोटो व्हीडिओ शिवाय समारंभ होऊच शकत नाही.  समाजमाध्यमावर पाठवून त्यांना लाईक्स आणि कॉमेंट्स मिळाले की त्यानंतरच पुण्य पदरात पडतं."जसे इतरांना लाईक्स मिळाले तसे तुम्हा आम्हाला मिळो. उतायचं नाही मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही " असा शांतीमंत्र शेवटी म्हणून प्रदक्षिणा घातली जाते. 

        त्यामुळे लेकीच्या मनावरचा ताण आणि मी समजू शकले. खरं तर संकल्प ठरविणं आणि ते सिद्ध करणं ही एक कठीण अशी मनोवैज्ञानिक प्रक्रिया असते. संकल्प हा मोठ्यानं म्हणून दाखविण्याचा आणि माध्यमावर जाहीर करण्याचा पोरकटपणा अजिबात नाही. संकल्प हा शरीर, मन, भावना आणि आत्मा या चारही स्तरांना स्पर्श करून,त्यांना उत्तेजित करित असेल तरच तो साध्य होऊ शकतो. पण मी हे काय सांगतेय? अशी भाषा आजकाल कुणालाच समजत नाही किंबहुना असलं अगम्य कुणी वाचण्याची तसदीही घेत नाही. . आजकाल इमोजी, फोटो, व्हीडिओचीच भाषा प्रमाण होऊ लागली आहे. गंमत म्हणजे, या माध्यमयुगाने सगळ्यांना एकाच पठडीत आणून बसवलं आहे. सगळे वागतात म्हणून आपणही तसंच करायचं ही चुकीची परंपरा रूढ होत चालली आहे. सायबर सायकॉलॉजी चे जनक जॉन सुलर म्हणतात, ,”आपण समाजमाध्यमांचा हुषारीने उपयोग केला नाही तर नक्कीच समाजमाध्यम आपला हुषारी ने उपयोग करून घेईल यात शंका नाही.” आणि म्हणूनच ‘शास्त्र असतं ते'- - हा जो प्रकार आहे, तो म्हणजे आपल्याला खेळवलं जात आहे. आणि दुर्दैव हे, की आम्हाला याचं काहीही सोयर सुतक नाही उलट प्रौढी वाटते. याला आम्ही जीवनातला आनंद समजून त्यात सुखैनेव डुंबतो आहोत.

   आणि......... एकाएकी ती धक्कादायक बातमी समोर आली. नेहमीप्रमाणे डिसेंबर महिन्यात ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०२४ वर्षातील लोकप्रिय शब्द जाहीर केला आहे - तो म्हणजे ' बुद्धिमांद्य’.- Brain Rot.  १८५४ साली हा शब्द हेन्री थोरो याने एका पुस्तकात वापरला आहे.  जगातल्या एकूण वर्षभरातील वातावरणाचे, घडामोडींचे, समाजमनाचे प्रतिबिंब दृगोच्चर करणारा' बुद्धिमांद्य’ हा शब्द आमच्या ‘नसलेल्या’ बुद्धीवरही आघात करिता झाला.आता खुद्द ऑक्सफर्डने ( from horse’s  mouth) जाहीर केल्यावर  पण/परंतु/शंका/ कुशंका….संभवतच नाही.त्यामुळे बुद्धीमांद्याचं बिरुद मिरवून नववर्षाचं स्वागत करण्याचा अनवस्था प्रसंग ओढवला आहे. पण बरं झालं की सोनारानेच कान टोचले.

        ब्रेन रॉट च्या या सावटातून कसंबसं सावरत असताना भारतात एकाएकी लखलखीत सुवर्ण किरण उगवला आणि बघताबघता त्याने संपूर्ण जगाचे डोळे दिपवून टाकले. डी. गुकेश या १८ वर्षाच्या भारतीय मुलाने बुद्धीबळातील ग्रँडमास्टर हा सर्वोच्च किताब जिंकला .....  एकीकडे ब्रेनरॉट आणि दुसरीकडे बुद्धीबळ? खरे काय? १८ वर्षाचा गुकेश आपली तल्लख बुद्धी वापरून बुद्धीबळात अव्वल स्थानी येऊ शकतो? मोबाईलची, गुगलची मदत न घेता? असं खरंच घडू शकतं? म्हणजे आमच्या नवशास्त्र पंथाचे अनुयायी ज्या हुषारीच्या भरवशावर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होते, तो भ्रम आहे?? रेडीमेड बुद्धीवर अंगभूत बुध्दी मात करू शकते? 

      मला आठवलं. महिनाभरा पूर्वी मी भारतीय टपाल खात्याच्या ‘ ढाई आखर’ या पत्रलेखन स्पर्धेबद्दल वाचलं होतं. सध्या लोप पावलेल्या पत्रलेखन कलेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी गेल्या 3/ ४ वर्षापासून टपाल खाते प्रयत्न करित आहे. संपूर्ण भारतात' ‘ढाई आखर’ हे अभियान राबवले जाते. शाळांमधून विद्यार्थ्यांना पत्रलेखनास उद्युक्त केलं जातं.  डिजीटल माध्यमाच्या आहारी जाऊन इमोजी, हॅशटॅग शॉटफॉर्म - वापरतांना कसलं भारी वाटतं ना आम्हाला? आपण 'स्मार्ट' आहोत हे जाणवून गुदगुल्या होत असतात.- पण त्याचवेळी आपल्या विचारांची, शब्दसंपदेची , लिखाणातून व्यक्त होण्याची क्षमता, ही खालावत चालली आहे याची जाणीवही झाली नाही.

     मोबाईल येण्याआधी जुने फोन नंबर लक्षात रहात कारण मेंदूच्या स्मृती केन्द्राला चालना मिळत असे. दुकानात पैसे देताना चटकन तोंडी हिशोब करता येई कारण मेंदूला आकडेमोडीची सवय  होती. पत्र लिहितांना, विचार - भावना शब्दात मांडताना सर्जनशीलतेचा कस लागायचा. नवीन तंत्रज्ञान हे कितीही सोयीस्कर, वेळ वाचवणारं, प्रभावी आणि अचूक असलं तरी तो जगण्याचा भाग असू शकत नाही.मोबाईलमुळे जर अंगभूत कौशल्यं (सॉफ्ट स्किल्स)  नष्ट होत असतील तर ते अतिशय गंभीर आहे. विचार, भावना आणि कृती या मेंदूच्या प्राथमिक क्षमता आहेत. सध्या आज विचारांना फाटा देऊन केवळ भावनांवर स्वार होऊन त्यानुसार अविवेकी कृति करण्याचं प्रमाण वाढलंय. याचा अर्थ आपण उत्क्रांतीच्या उलट्या दिशेने प्रवास करित  आहोत. आदिम काळात केवळ भावनांच्या आधारे वागणार्या आदिमानवा च्या मेंदूत विचारकेंद्राचा विकास झाला नव्हता. त्यामुळे तो लिंबीक सिस्टीमचा उपयोग करित असे.आज मेंदू विकसित असूनही  त्याला जर चालनाच दिली नाही, त्याला  सक्रिय केलं नाही तर विकसित मेंदूचं रुपांतर आदिम मेंदूत व्हायला वेळ लागणार नाही. ब्रेन रॉट म्हणजे दुसरं काय? ऑक्सफर्ड प्रेसने हा लाल सिग्नल दिला हे फार चांगलं केलंय. 

    'ब्रेन रॉट' मुळे नाही पण 'डी गुकेश'मुळे मात्र जादूची कांडी फिरली कारण लेक नाचत म्हणाली, “ठरलं. बुद्धीबळ खेळण्याचा संकल्प केला”. तिला टाळी देत मी म्हटलं….”आणि मी पत्र लिहिण्याचा”.

#ब्रेनरॉट

#नववर्षसंकल्प



.

 









 

Sunday, June 2, 2024

तीनशे शब्दांचा निबंध

 


तीनशे शब्दांचा निबंध

"तीनशे शब्दांचा निबंध" या घटनेनं अल्पवयीन, अपराधी बालकांच्या सुधारणा प्रक्रियेला एक अभिनव आयाम मिळाला आहे.निबंध लिहिण्याची 'शिक्षा' या घटनेचं किती बरं कौतुक करावं? आम्ही शाळेत असताना इंग्रजी हिंदी, मराठी या विषयात 'निबंध' हा एक अनिवार्य भाग असायचा. 'मी केलेला प्रवास', 'एक अविस्मरणीय घटना', 'माझा आवडता सण', 'माझा आवडता प्राणी/ पक्षी... असे विषय सामान्यतः असायचे.मग 'गाय' या विषयावर निबंध लिहिताना......'गाय हा पाळीव प्राणी आहे. गाईला चार पाय व एक शेपूट असते.या शेपटीने ती स्वतः च्या अंगावरच्या माशा हाकलते. गाय गवत खाते....'असे अनेक माहितीपूर्ण निबंध आमच्या लेखणीतून उतरलेले आहेत.निबंधात म्हणी आणि वाक्प्रचार टाकायचे असतात ...हा एक अनिवार्य नियम. ' चोर सोडून संन्यासाला सुळी ', 'उथळ पाण्याला खळखळाट फार ' , 

' कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' , 'आपलेच दात आणि आपलेच ओठ', 'आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी'...... अशा म्हणींनी आम्ही निबंधाची उंची वाढवित असू ..   अर्थात हे माझ्या पिढीचे अनुभव बरं का. हल्लीच्या मुलांचा आणि निबंध या शब्दाचा  काही संबंध असतो का याबद्दल मी अनभिज्ञ आहे.असो. मग जरा वरच्या वर्गात गेलं की 'विज्ञान शाप की वरदान?', 'एका वृक्षाचे आत्मवृत्त', 'माझे ध्येय', 'जिच्या हाती पाळण्याची दोरी' वगैरे वैचारिक आणि बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारे निबंध असायचे. 

         आता मला प्रश्न पडला आहे की परवाच्या घटनेच्या  त्या अल्पवयीन बाबुला निबंधाचा कोणता विषय  दिला असेल हो? 'मी केलेला अपघात', 'दारू पिण्याचे दुष्परिणाम', 'महागड्या गाडीचे वर्णन',  'एक अविस्मरणीय प्रसंग',माझे वाहन - माझा वेग'..... या प्रश्नानं माझा अक्षरशः  छळवाद मांडला आहे.. पण दुसऱ्या आणखी एका बाबीने माझा मेंदू  वैचारिक आवर्तात गरगरतो आहे....तो म्हणजे ही शिक्षा देणारे अधिकारी नेमके कोण आहेत? अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे की आदरणीय अधिकाऱ्यांच्या डोक्यातून या शिक्षेचा उगम झालेला आहे?  निबंध लिहिणे या शिक्षेमागचा त्यांचा नेमका दृष्टिकोन काय असावा बरं? हे महाशय पूर्वी शिक्षक तर नसावेत ना? नाही तर शिक्षण मंडळावर तर नक्कीच असतील.

    परवा घडलेल्या अपघाताच्या घटनेवर असंख्य प्रतिक्रिया आल्या. जोपर्यंत काही भयानक घटना घडत नाही तोपर्यंत सारं काही आलबेल असतं.पण जेव्हा काही घडतं तेव्हा समस्त जनतेची  तत्वनिष्ठा, नीतिमत्ता , विद्वत्ता , वक्तृत्व  शिगेला पोचतं.....मी पण त्यातलीच की. 

       परवा होर्डिंग कोसळलं आणि मग आम्ही तोंडसुख घ्यायला मोकळे झालो.आपलं कसं आहे ना, प्रश्न निर्माण झाल्यावर जागं व्हायचं.... तोपर्यंत झोपेचं सोंग घ्यायचं.आणि दुसरं म्हणजे अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांमध्ये आपली शक्ती, बुद्धी पणाला लावायची आणि खर्च करायची. यातच आम्ही गुंतलेले.तसंही 'निवडणूक' या विषयावर बोलून, ऐकून, चर्चा करुन जरा अजीर्णच झालं होतं.


     असो. अपघाताच्पा घटनेवर प्रतिक्रिया देण्याचा जन्मसिध्द अधिकार असल्याने  जनता (म्हणजे  आपणच हो.) एकदमच जागृतावस्थेत पोचली. आणि आमच्यातले संस्कार, संस्कृती, नीतिमूल्यं, कायदे, वाहतूक नियम.. सगळंच सरसरून उफाळून आलं.

      यात  कोणी पालकांना दोषी ठरवलं . काहींच्या मते अती संपत्त्तीच याला कारणीभूत आहे.  कुणी आरटीओवर हल्लाबोल केला तर काहीनी वाहतूक  पोलीसांवर ताशेरे झाडले.. तरुण पिढीचा उद्धार तर यातला महत्त्वाचा मुद्दा  होता.आयुष्यात 'पब'चं  तोंडही न  पाहिलेल्यांनी पबच्या कायदे , नियमावलींचे वाभाडे काढले  . काहींना तर एक मुलगा आणि मुलगी इतक्या रात्री बाईकवरून कुठे जात होते हा प्रश्न पडला. त्यांच्या दृष्टीनं  हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, की ही   दोघेजणं मध्यरात्री नेमकं काय करत होती? त्या दोघांचं एकमेकात काही नातं होतं का? आता पुण्यातील संस्कृतीचं काय?     

              ही घटनाच अशी होती की प्रत्येक संवेदनशील मनाला  अस्वस्थता येऊन काहीतरी व्यक्त करावसं वाटलं. मला मात्र या भयानक प्रसंगातही एक आशेचा किरण दिसला.निबंधाचा मुद्दा मला इतका आश्वासक आणि  महत्त्वाचा वाटला ,(कुणाचं काय, नि कुणाचं काय) की बाकी तपशील जरा नजरेआडच झाला.एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, महागडी गाडी अत्यंत वेगाने चालवून मध्यरात्री अपघात केला. त्यात बाईकवरचे दोघे  घटनास्थळी मृत्युमुखी पडले. आपल्या सल्लूभाईंच्या बाबतीतही असं झालंच होतं की. दिवसागणिक अपघात होतात. लोक प्राणाला मुकतात.  पण सगळ्या घटना आपल्यासमोर येतातच असंही नाही.                 

         त्यामुळे  शिक्षा म्हणून '300 शब्दांचा निबंध' हा माझ्यासाठी या घटनेतील अनपेक्षित, अकल्पित आणि अभिनव असा ट्विस्ट अर्थातच वळण आहे. म्हणूनच हा शिक्षेचा अभिनव प्रकार इतिहास घडविणार याची मला खात्री वाटते.

          मी एक हाडाची (ऑर्थो नाही हो) शिक्षिका आहे. आणि अधून मधून  कागदावर खरडण्याची 'खाज' असल्याने  निबंध, शब्द याबद्दल मला कमालीचं ममत्व आहे. शाळेत असताना बरेचदा शिक्षा म्हणून आम्हाला चूक लिहिलेला शब्द शंभर वेळा परत लिहायला सांगायचे.(पुन्हा  तेच.आमच्या काळातलं हो.) पण अपघात  केला म्हणून आजच्या काळातल्या अल्पवयीन मुलाला चक्क निबंध लिहायची शिक्षा करणं, ते ही स्वतः शिक्षक नसतांना? हे दिव्य दूरदृष्टीचे एक उदाहरण आहे असं मला वाटतं.

      आजच्या कॉपी पेस्ट च्या जगात, मुलांनी निबंध लिहायचा- हे आव्हान अपघात करण्यापेक्षाही भारी आहे हो. निबंध लिहायचा म्हणजे विचार करणे आले. आता हल्लीच्या पिढीचा विचार करण्यावर विश्वास नाही. यांच्या मेंदूत विचार करण्याची प्रणाली विकसित झालेलीच नाही . कारण त्यांना विचार करण्याची संधी पालक आणि आपली शिक्षण व्यवस्था देत नाही .  ही  पिढी न कळत्या वयापासून सतत काहीतरी ऍक्शनपॅक्ड  प्रसंग बघत असते.त्यामुळे ही मुले डायरेक्ट कृती करणारी आहेत .मग निबंधासाठी मनातले विचार कागदावर उतरवण्याची शक्यता तर दूरच. तसंहीआता ही Gen -Z मुलं, कागदावर लिहिण्याची निर्बुद्ध कामं अजिबातच   करत नाही हो. ते टाईपतात . शब्दांऐवजी ईमोजी टाकतात.  आता अशा परिस्थितीत  विचार करुन, कागदावर    ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या प्रक्रियेतून ....सदरहू अल्पवयीन बाबू जेव्हा जाईल. ,तेव्हा त्याच्या बालमेंदूत किती वैचारिक वादळं आणि केमिकल लोच्या होईल याचा विचार संबंधित अधिकारी यांनी केला नाही का? याशिवाय  निबंध लेखनाबरोबर शुद्धलेखन,  व्याकरण, आणि चांगलं अक्षर हे ओघाने आलंच की हो. म्हणजे किती मानसिक ताण? यापेक्षा गाडी चालवून लोकांना मारणं किती बरं सोप्पंय.

      पण काहीही असो. निबंध लिहिण्याची शिक्षा हा भारतीय इतिहासात एक मैलाचा दगड ठरावा.  अल्पवयीन गुन्हेगारांचं मनपरिवर्तन  व मतपरिवर्तन घडवून  आणणाऱ्या वैचारिक क्रांतीची ही रुजवात आहे.  ही साधीसुधी कारवाई नाही तर अल्पवयीन अपराधींच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडवणारी एक प्रक्रिया आहे.बालसुधारगृहांच्या कार्यपद्धतीला एक वैशिष्ट्यपूर्ण , बौद्धिक कलाटणी मिळण्याचे हे संकेत आहेत. ज्या साहेबांनी ही शिक्षा ठोठावण्याचा विचार केला ते नक्कीच अभिनंदनाला पात्र आहेत. यात मला एक सूचना करण्याची खुमखुमी (मुलभूत प्रेरणा) आली आहे, ती म्हणजे अल्पवयीन भावी गुन्हेगारांच्या पालकांनाही १००० शब्दांचा निबंध लिहिण्याचा या शिक्षेत अंतर्भाव करावा. विषय मी सुचवू शकेन हे ही इथेच सुचवून टाकते हो.

         जो परिणाम आरटीओ कारवाई मुळे होणार नाही, वाहतूक पोलीसांच्या दट्ट्या मुळे होणार नाही, पब बंद केल्याने होणार नाही, तो परिणाम एका निबंधाने साध्य होईल. निबंध लिहिण्याच्या शिक्षेची दहशतच येवढी भयंकर असणार आहे की कुणाची बिशाद आहे हो गुन्हा करण्याची?

     वाईटातून चांगलं घडतं ते हेच!!!

Sunday, May 12, 2024

आई, तू कशाला काही करते?


        परवा वर्तमानपत्रात एका खटल्याच्या निकालाची बातमी वाचली. खटल्याच्या तपशिलात  शिरायची गरज नाही. एका पतीने पत्नीकडून आपल्या मुलीचा ताबा मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वर्षभरापूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हापासून मुलगी आईजवळ राहत होती. पतीच्या बाजूने जेष्ठ कायदेतज्ञ व मानवी हक्क कार्यकर्ता इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद केला. 'मुलीच्या आईचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे मुलीला आईच्या ताब्यात देणे योग्य नाही '..असे मत त्यांनी युक्तिवादात मांडले. यावर उच्च न्यायालयाने दिलेले उत्तर असे की, 'चांगली पत्नी नसणे, याचा अर्थ संबंधित महिला चांगली 'आई 'नाही असा नव्हे.   व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण असू शकते. परंतु अपत्याचा ताबा आईकडे न देण्याचे ते कारण असू शकत नाही.' असे निरीक्षण नोंदवून मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला.

    आता मुद्दा असा आहे की 'आई 'असणारी आणि 'व्यभिचार करणारी' व्यक्ति तर एकच आहे. इंदिरा जयसिंग यांनी महिलेच्या 'वागणुकीचा' निकष लावला तर उच्च न्यायालयाने 'आई' हा निकष लावला. म्हणजे फक्त आई असणे हे एक असामान्य गुणवैशिष्ट्य आहे का?

        यासंदर्भात महाभारतातील कुंतीची कथा आठवणे हे अपरिहार्य आहे .दुर्वास ऋषींनी शिवसेन राजाच्या कन्येवर -  कुंतीवर प्रसन्न होऊन वर दिला होता. ज्या देवाचे स्मरण केले , तो देव वश होईल अशी ती शक्ती होती. लग्नापूर्वी कुंतीने सहज सूर्य देवाचे स्मरण केले. सूर्य देव प्रगट झाले आणि त्यांनी कुंतीच्या नाभीला बोट लावले. 'माझ्याप्रमाणेच तेजस्वी पुत्र तुला होईल'.. असा आशिर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. आणि खरोखरच कुंतीला सूर्यपुत्राचा लाभ झाला. या  अनपेक्षित  घटनेने कुंती घाबरून गेली. समाजाच्या भीतीने तिने सूर्यपुत्राला नदीत  सोडून दिले व हे सत्य दडवून ठेवले. आता या प्रसंगी कुंतीने कशाला प्राधान्य दिले- हे तर सर्वश्रुतच आहे. म्हणजे एका स्त्रीच्या व्यक्तिमत्वात आई असण्याबरोबरच अनेक गुण अवगुण एकवटले असतात. मग केवळ ती आई आहे म्हणून श्रेष्ठ ठरते का?

 आपल्या  संस्कृतीने  मातेचा नेहमीच गौरव केला आहे किंबहुना मातेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. (ओव्हर रेटेड - मराठीत हो).

 •'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी|'

    •'न मातु :परदैवतम् | ' 

 • 'कुपुत्रो जायते  क्वचिदपि, माता कुमाता न भवति|

 •'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.'

 •'देवाला प्रत्येक  ठिकाणी जन्म घेणे शक्य नव्हते म्हणून  त्याने आई निर्माण केली'.

     अशा  आणि  यासारख्या असंख्य वाक्प्रचार ,सुभाषिते श्लोकांनी  प्रत्येक भारतीय मनाचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे. उपरोक्त ही जी ब्रह्मवाक्ये आहेत, ती शाळेत निबंधात लिहून, पाठ करून , आई बद्दल अतिउदात्त धारणा प्रस्थापित झाल्या आहेत .आई म्हटले की ममतेचा सागर, त्यागमूर्ती, आदर्श, वात्सल्य,करुणा  इत्यादी घासून गुळगुळीत झालेले शब्द वापरलेच पाहिजेत असा असा एक अलिखित नियम आहे. याशिवाय चित्रपट, मालिकांमध्ये दाखवलेली आई तर अतिरंजित स्वरूपात असते. ऐन कसोटीच्या, जीवन मरणाच्या प्रसंगात ही सिनेमातली आई मुलासमोर भात्यातले एक ब्रह्मास्त्र सोडते. 'नौ महिने मैने तुम्हे अपने पेट मे पाला है....'

  प्रत्यक्ष ब्रम्हदेवाला आव्हान देणारे हे 'भावनिक ब्रम्हास्त्र'..मुलाला क्षणात गारद करणारे!!!


      वास्तविक नऊ महिने बाळाला पोटात सांभाळणे हा काही विश्वपराक्रम नाही किंवा  जन्मणाऱ्या बाळावर केलेले उपकार तर नाहीच नाही. ही अत्यंत नैसर्गिक अशी शारीरिक घटना आहे, ज्यात भावी आईचे काहीही कर्तृत्व नाही. उठसुठ, 'तुला नऊ महिने पोटात वाढवले आणि तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या'... हे वाक्य हुकमी एक्क्यासारखे का म्हटले जाते, हे अनाकलनीय आहे. 'गाजर का हलवा' खाऊ घालणारी, सतत टिपे गाळणारी, मशीन वर कपडे शिवणारी, डोक्यावर घमेले घेऊन  दगड उचलणारी, स्वतः उपाशी राहणारी..... अशा ठराविक साच्यातील आईची प्रतिमा चित्रपटात रंगवली जाते.

 पण आई ही सुद्धा एक हाडामांसाची जिवंत व्यक्ती आहे. तिला चांगल्या वाईट संवेदना आहेत . तिचा ठराविक स्वभाव आहे. तिला आवडीनिवडी आहेत. ही वस्तुस्थिती महत्त्वाची नाही का ?  प्रत्येक आई आपल्या कुवतीनुसार ,बुद्धीनुसार आपल्या अपत्यांची काळजी घेत असते. संगोपन करते. कुठेही गेली तरी तिचा जीव लेकरांमध्ये गुंतला असतो .अपत्याच्या सुखासाठी ती जे जे शक्य असेल ते ती करते. आई व मुले हे एकमेकांचे सर्वस्व असतात. निरपेक्ष प्रेम हे आईचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे मायलेकांचे नाते हे सर्वोत्कृष्ट मानले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी, भविष्यातील सुरक्षित जीवनासाठी ती वैयक्तिकरित्या अनेक तडजोडी करते.ही प्रत्येक आईची गुणवैशिष्ट्ये आहेत..जी सर्वसामान्य आहेत, अंगभूत आहेत. (बाय डिफॉल्ट - मराठीत हो.)

        पण अनेकदा, ती मुलांच्या अती लाडापोटी चुकते सुद्धा. 'सुपर कीड' ची 'सुपर मॉम' बनण्याच्या हव्यासापोटी ती भरकटतेही .मुलांवर आपल्या अपेक्षांची ओझी लादून, त्यांचे बाल्य हिरावल्या जाते आहे , याचेही तिला भान नसते. मुलांचे बोट धरून चालताना,त्यांना वाढवताना ती सक्षम झाल्यावर, एक क्षण असा येतो की अलगद पणे मुलांचे बोट सोडून त्यांना स्वातंत्र्य द्यायचे असते. मुलांचे विवाह झाले की आईच्या भूमिकेतून हलकेच अंग काढून घ्यायचे असते. पण ही समयोचित वागणूक अनेक आयांना जमतेच असे नाही.

  .'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे'...( कोणी लिहिले आहे देव जाणे) हे ब्रह्मवाक्य सुद्धा आईवर लादले जाते. मातेच्या भूमिकेतून तिने कधी बाहेरच येऊ नये असा 'सोयिस्कर बहुमान' तिच्या गळी उतरवला जातो. आणि या अपेक्षांच्या दडपणाखाली, 

'पुत्राचे सहस्त्र अपराध ,माता काय मानी तयाचा खेद'..      असे म्हणत ती अपत्याचे लाड करते. त्याच्या चुका पोटात घालते. स्वतः झिजत राहते. मग ज्यावेळी या आईचे काळीज प्रेयसी कडे घेऊन जाताना मुलगा ठेचकाळतो, तेव्हा.. 'तुला लागले तर नाही ना बाळा?'.. असा त्या आईच्या काळजातून हुंकार येतो. हे तर आईच्या उदात्तीकरणाचे अतिरेकी उदाहरण आहे.त्यावर अजून तडका मारणारी लोकप्रिय मालिका...' आई कुठे काय करते?' यातल्या अरुंधतीला 'महाराष्ट्रभूषण' नक्की मिळणार बघा.सध्याची मालिकेची लांबण बघता, 'आई तू कशाला काही करते?'...असे म्हणावेसे वाटते.

      वास्तविक भारतीय संस्कृतीने 'मातृत्वाचा' गौरव केला आहे. 'आई' या मर्यादित व्यक्तिमत्त्वाचा नाही. मातृत्व ही एक उदात्त, उन्नत वृत्ती आहे. जी मानवी जीवनाची  परमोच्च,उत्कट  भावना    आहे. सगळ्या संतांना त्यांचे परमभक्त 'माऊली' म्हणतात. 

"विठु माझा लेकुरवाळा" या संत जनाबाईच्या अभंगातून किंवा... "बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई"- या संत एकनाथांच्या अभंगातून जे सर्वव्यापी, निरपेक्ष निर्मळ मातृत्व प्रतित होते, ते उच्च कोटीच्या संतांमध्ये प्राधान्याने दिसून येते.राणी कौसल्येला आदर्श मातृत्वाचे प्रतिक समजले जाते.पण हा बहुमान कैकेयीला का मिळाला नाही ? कारण तिच्या मातृत्वाला स्वार्थ आणि मत्सराची किनार होती.

महानायक श्रीकृष्णाची आई देवकी.पण श्रीकृष्ण वाढला तो यशोदेच्या वत्सल छायेत.

अगदी प्रसिद्ध उदाहरणे बघायची तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल, मदर टेरेसा, माता जिजाबाई, सिंधुताई सपकाळ... यांचे वंदनीय मातृत्व कायम प्रेरणा देणारे आहे.आणि महत्त्वाचे म्हणजे ही मातृत्व वृत्ती पुरुषातही असते तसेच आई होऊ न शकलेल्या स्त्रीतही असते.

      थोडक्यात काय, आई आणि मातृत्व वृत्ती यांच्यात गल्लत होऊ नये.स्त्री ही व्यक्ती म्हणून उत्तम असेल तर ती आई म्हणूनही उत्तमच असते.अविवेकी,अविचारी स्त्री असेल तर ती आईही तशीच असू शकते.स्त्री व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगिण मूल्यमापन केल्यानंतरच तिच्या 'आईपणाला' जोखणे गरजेचे आहे. म्हणूनच केवळ 'आई होणे ' हे  जीवनाचे सार्थक नाही तर जिजामातेसारखी मातृत्व वृत्ती असेल तरच शिवाजी घडतात .मुलांना सतत उपदेश देऊन,त्यांची तुलना करून , अनेक क्लासेस ला पाठवून संस्कार होत नसतात. पालकांची दैनंदिन, प्रासंगिक वागणूक आणि कौटुंबिक वातावरण....यातून संस्कार आपोआप झिरपतात.म्हणूनच म्हणावेसे वाटते.....'आई तू कशाला काही करते?'


#मदर्सडे

#आई

Sunday, June 4, 2023

आभासाशी जडले नाते

 आभासाशी जडले नाते....    


सकाळ झाली. डोळे उघडले.  हातपाय ताणून आळस दिला आणि प्रातर्विधीसाठी उशी खालचा मोबाईल हातात घेतला.  दचकलात ना ? पण तरुण पिढी नाही दचकणार. कॉलेजमध्ये एकदा निरोगी जीवनशैली विषयी बोलत असताना 'प्रातर्विधी' हा शब्द ऐकल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उमटलं .

       'सकाळी उठल्याबरोबर काय करायचं असतं?' मी सोप्या शब्दात विचारलं.  

       'उठल्याबरोबर आधी आम्ही मोबाईल बघतो मॅम' - - डोक्यावर केसांचा उभा तुरा असलेल्या एका मुलाने उत्तर दिलं. तुरा कसला, त्याच्या ताठ उभ्या केसांनी बाथरूम घासता येईल का? हा भलताच विचार माझ्या डोक्यात आला.  डोक्याच्या वरच्या भागात ब्रश सारखे उभे केस आणि खालच्या भागात नाममात्र हिरवळ असणाऱ्या या मुलाला 'प्रातर्विधी' हा शब्द उच्चारण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल ही मला खात्री पटली आणि मी विषय आवरता घेतला. 

        असो. तर थोडक्यात काय की हल्ली पूर्वीच्या व्याख्या.... चुकलं - काॅन्सेप्ट बदलत चाललेय.

 'प्रातर्विधी' म्हणजे सकाळी डोळे उघडल्याबरोबर 'कराग्रे वसते लक्ष्मी' सारखं 'प्रभाते मोबाईल दर्शनम् अशी प्रथा रुढ झाली आहे. शिवाय 'आमच्या पिढीने (साठीच्या)  तर काळाच्या बरोबर चालायला हवं'... अशी येता-जाता तरुण पिढी आमच्यावर पिंक टाकून मोकळी होत असते. तात्पर्य हेच की मी पण प्रातर्विधीसाठी मोबाईल उघडला. वाढदिवस ,लग्न वाढदिवस, निधन वार्ता, गुड मॉर्निंग, सुविचार, विनोद,देवदर्शन ,रेसिपीज ,कविता ,लेख ,प्रवचन...... 

 अबब!!! मोबाईल ओसंडून वाहत होता .या सगळ्यांना उत्तर देणं, हा कार्यक्रम हल्ली जीवनावश्यक कृतींमध्ये मोडत असल्याने खऱ्याखुऱ्या प्रातर्विधीची वाट लागणार नाही तर  दुसरं काय होणार?

      या व्हाॅट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम नामक अक्राळविक्राळ  राक्षसाने जेव्हापासून घराघरात प्रवेश केला तेव्हापासून माणसाचं आयुष्यच बदललंय.अन्न,वस्त्र, निवारा यापेक्षाही मोबाईल च्या गरजेला जास्त प्राधान्य दिलं जातंय. या मोबाईलमुळे माणसांच्या मेंदू मधे बदल व्हायला लागले आहेत.ज्याप्रमाणे उत्क्रांती नंतर माणसाचं शेपूट गळून पडलं तसंच या तांत्रिक युगात मेंदू मधलं बुद्धी आणि विवेकाचं केंद्र गळून त्या जागी मेंढरांच्या मेंदू तील केंद्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की काय, असं मला नेहमी वाटतं. (Herd mentality)

      हल्ली माणसांचे भलतेच समूह निर्माण झालेले आहेत. एक समूह आहे तो अंगठे बहाद्दरांचा. कोणीही, कोणतीही, कसलीही पोस्ट टाका - यांचा अंगठा कायम तयार असतो .बरेचदा पोस्टमध्ये वाचनीय मजकूर असतो जो वाचायला किमान पाच मिनिटं लागणार असतात. पण या अंगठे बहाद्दरांच्या दिव्यदृष्टीची कमाल!! पोस्ट टाकल्यावर अर्ध्या सेकंदात यांचा अंगठा आलाच पाहिजे. या अंगठ्या मागचं मानसशास्त्र नक्की काय असेल हे मी शोधायचा खूप प्रयत्न करतेय पण अजूनही मला त्यात यश आलेलं नाही. हा अंगठेबहाद्दर समूह एखाद्या 'अंगठे बाबाचा' भक्त संप्रदाय तर नसेल ना? बाबांनी अंगठे टाकायचा आदेश दिला असावा, त्यामुळे हे भक्तगण जपमाळे प्रमाणे दररोज किमान 108 अंगठे देत असतील अशी मला दाट शंका येते.

 किंवा दुसरी शक्यता म्हणजे हे अंगठे बहाद्दर नक्कीच पगारी असावेत. जितके अंगठे तितकी कमाई.

        दुसरा जो समूह आहे तो खरंतर आजारी असतो. आता मी डॉक्टर असल्यामुळे हे विधान ठामपणे करण्याचा अधिकार नक्कीच मला आहे. या समूहाला 'फोटोरिया' हा आजार झाला असतो. जसा डायरिया असतो ना तसा 'फोटोरिया 'बरं का. हा समूह कोणत्याही प्रसंगाचे किलोभर फोटो तरी टाकतोच. आणि यांच्या स्टेटस  वर किमान पावभर फोटो असतातच.असं  वाटतं की फोटोसाठी हे ट्रीपला जातात, फोटोसाठी पूजा घालतात, फोटोसाठी सणवार साजरे करतात, फोटोसाठी नाचतात,गातात.घरी केलेली रेसिपी पोटाऐवजी आधी फोटोत जाते. अंगठे बहाद्दरांपेक्षा या समूहाची परिस्थिती गंभीर असते. अंगठे बहाद्दर तसे निरूपद्रवी असतात.पण फोटोरिया झालेला समूह गेल्या जन्माचा सूड उगवतात असं म्हणतात. 'फोटोरीया' झालेल्यांना रोज फोटो टाकल्याशिवाय झोप येत नाही. या फोटोंचेच बहीण भाऊ म्हणजे रिल्स आणि व्हिडिओ असतात. या फोटोरिया समूहाला जेव्हा रिल्स आणि व्हिडिओची लागण होते तेव्हा त्यांची केस हाताबाहेर जाते.फोटोरिया समूहाकडे बघून मला पुलंच्या 'हसवणूक' मधल्या 'माझा शत्रूपक्ष' या लेखाची नेहमीच आठवण येते. 

        तिसरा समूह जरा अध्यात्म मार्गी असतो. त्यांचा वयोगट साधारणतः साठीच्या पुढचा असतो. ही मंडळी फेसबुक, व्हाॅट्सअप ला पूर्णपणे शरण गेली असते. 'उरलो उपकारापुरता' याप्रमाणे 'उरलो फॉरवर्ड पुरता' अशी त्यांची जीवनातली भूमिका  असते .सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र - - या मंडळींचा 'अहर्निशम् सेवामहे' यानुसार आलेल्या कोणत्याही,कशाही पोस्ट  फॉरवर्ड करणं - हे त्यांचं परम कर्तव्य असतं.आणि हे परम कर्तव्य ते कुठेही म्हणजे दुकानात, भाजीबाजारात,सिनेमा बघताना,अगदी व्यासपीठावर असताना सुध्दा बजावत असतात.  'सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ ' ही गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यांच्या ठायी असतात.

         भुलाबाई चं गाणं असतं ना, 'एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू '....या चालीवर - - 'एक फॉरवर्ड करू बाई, दोन फॉरवर्ड करू, दोन फॉरवर्ड करू बाई तीन फॉरवर्ड करू....' असं आजच्या काळातलं गाणंही या समूहाने जन्माला घातलंय असं ऐकिवात आहे.

          चौथा समूह प्रसिद्धीला हपापलेला असतो. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे. 

  'घटम् भिंद्यात पटम् भिंद्यात कुर्यात रासभरोहणात,   येनकेन प्रकारेण प्रसिद्धं पुरुषो भवेत्.' 

  एखादं वैशिष्ट्यपूर्ण काम केल्यानंतर प्रसिद्धी मिळवणं हे नैसर्गिक आहे. पण मडके फोडून, कपडे फाडून, प्रसंगी गाढवावर बसून अर्थातच काहीही करून प्रसिद्धी मिळवणारा समूह हा खरोखरच पुलंच्या हसवणूक मधला शत्रूपक्ष असतो.जगण्यातल्या सामान्य दैनंदिन गोष्टी समाज माध्यमावर टाकून ' फोमो 'ची स्वतःचीच लढाई लढत असतो.

  या समाज माध्यमाच्या आहारी गेलेले बरेच  विक्षिप्त,नादावलेले  समूह आज निर्माण झालेले दिसतात. खरंतर या समाज माध्यमाद्वारे कितीतरी चांगली रचनात्मक, सकारात्मक,महत्त्वाची कामं होत असतात आणि अशी समाजोपयोगी कामं करणारे समूह सुद्धा भरपूर आहेत.कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, गाजावाजा न करता ही कामं सुरू असतात.

       पण आजचा समाज हा मेंढरांचा कळप झाला आहे. इतर जसे वागतात तसंच आपण वागायचं हे एक चुकीचं मानक  प्रस्थापित होतं आहे, जे फार गंभीर आहे. आजच्या आत्मकेंद्रीत आणि मोबाईलवर पडीक व्यक्तीला सतत इतरांकडून कौतुक, इतरांकडून  मान्यता, लाईक्स.. यांची सारखी गरज असते. सतत  पोस्ट वाचून इतरांशी तुलना करण्याची सवय हल्ली वाढत चालली आहे. स्वतःविषयीचं मत  हे लोक इतरांच्या नजरेतून ठरवतात. त्यामुळे आपण चांगलं कसं ठरु यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू असते. आणि म्हणूनच असे समूह तयार होतात. सदोदित काहीतरी पोस्टायला हवं, ही मनोवृत्ती वाढत चालली आहे. जिंकलेल्यास टाळ्या पाहिजे, हरलेल्याला खांदा पाहिजे, लिहिणाऱ्याला कमेंट पाहिजे, कवितेला दाद पाहिजे, फोटोंना इमोजी पाहिजे ,विनोदाला स्मायली पाहिजे, वाढदिवसाला जीबीयु -एचबीडी पाहिजे आणि मेल्यावर आरआयपी पाहिजे.

  मार्क्सवादी एरिक फ्रॉम म्हणतो, 'जगताना एक मोठा पर्याय आपल्यासमोर असतो तो म्हणजे, टू हॅव ऑर टू बी. मॅन इज द वन हू इज मच, नॉट द वन हू हॅज मच'.

 पण आम्ही सुशिक्षित, जाणते असून 'टू हॅव' च्या मायाजालात इतके गुरफटत चाललोय की त्यामुळे मेंदूत निर्माण होणाऱ्या डोपॅमिनची चटक लागलेली आहे. ही एक प्रकारची नशा असते.या नशेत असतांना , वास्तवात अराजकता आहे,अती महत्वाचे प्रश्न आहेत,भावना भडकताहेत,लहान मुलांवर विपरीत संस्कार होताहेत.... याकडे आपलं लक्षच जात नाही.आपण आपल्या आभासी आटपाट नगरात सुखाने नांदतो. आणि आनंदात गातो,

 सासू म्हणते,

 ' माझ्या फोटोला लाईक कर गं सुने कर गं सुने.

 मग जा अपुल्या माहेरा, माहेरा.

 सून म्हणते,

 चार चार ईमोजी टाकल्या हो सासूबाई,टाकल्या हो सासूबाई. 

 आता तरी जाऊ द्या माहेरा,माहेरा."

   शहाणी ,जाणती,विचारी,परिपक्व जनता जेव्हा या आभासी मायाजालात अडकत जाते , तेव्हा भय वाटतं ते पुढच्या पिढीचं. विकसित मेंदूची परत अविकसित मेंदू कडे होणारी वाटचाल ही या युगातील उत्क्रांती ची नांदी तर नसावी ? कारण सतत या गॅजेट्सचा अनाठायी आणि अन् प्राॅडक्टिव्ह उपयोग होत राहिला तर मानवी विचार,भावना व वर्तमानावर परिणाम होतो आहे. याचा अभ्यास करण्यासाठी 'इंटरनेट सायबर सायकाॅलाॅजी '- या मानसशास्त्राच्या नविन शाखेने जन्म घेतला आहे. या शाखेचे जनक 'जाॅन सुलर' हे म्हणतात, "आपण जर इंटरनेटचा हुषारीने वापर केला नाही तर निश्चितच इंटरनेट आपला हुषारीने वापर करुन घेईल यात शंका नाही'.

त्यामुळे,

"सदा सर्वदा योग फेसबुकचा घडावा....

तुझे कारणी वेळ माझा सरावा..

उपेक्षू नको मज माध्यमा तू आता...

इंटरनेट देवा मागणे हेचि आता'

    अशी शरणागती पत्करली तर भविष्यात विनाश अटळ आहे आणि त्याला कारणीभूत आपणच असणार आहोत.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

अकोला, ९४२२९३९५१०

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...