Showing posts with label सहज सुचलं...... Show all posts
Showing posts with label सहज सुचलं...... Show all posts

Tuesday, September 2, 2025

डाकिया डाक लाया

 डाकिया डाक लाया 

 


“पत्र लिही पण नको पाठवू शाई मधून काजळ गहिरे, 

लिपी रेषांच्या जाळीमधूनि, नको पाठवू हसू लाजरे. 

चढण लाडकी भुवई मधली, नको पाठवू वेलांटीतून, 

नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या  बिंदूतून.” 

इंदिरा संत यांची ही कविता वाचताना, आपण (अर्थातच मध्यमवयीन पिढी) भूतकाळात केव्हा प्रवेश करतो हे समजतही नाही. आणि पत्रांच्या त्या अनोख्या, जादुई  विश्वात हरवून जातो.पत्रव्यवहार…हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजुक आणि भावनाप्रधान असा जतन केलेला एक कोपरा असतो.आजही कित्येकांच्या कपाटात, जपून ठेवलेल्या जुन्या पत्रांची चळत सापडेल यांची मला खात्री आहे.

         एक सप्टेंबर हा विश्व पत्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पत्रव्यवहार या लोप पावत चाललेल्या एका जिव्हाळ्याच्या संदेश वहनाला उजाळा   देण्याचा एक प्रयत्न. 

       मानवी जीव हा संवादाशिवाय राहू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे संवाद ही त्याची प्राथमिक गरज आहे. आदिमानवाच्या हाळी देणाऱ्या संवादापासून तर आजच्या इन्स्टाग्राम पर्यंतचा संदेशवहनाचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. पण यात सगळ्यात सहज सोपे, लोकप्रिय, प्रभावी व अनेक शतकांपासून अविरत सुरू असलेले माध्यम म्हणजे पत्रलेखन.. अर्थातच टपाल सेवा. टपाल सेवेच्याही आधी पत्र लेखन होतेच. पण पोस्टखाते नसल्याने निरोप्यांच्या हाती पत्र पोचविले जात असे. पौराणिक काळात रुक्मिणीने कृष्णाला आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी पत्र लिहिले अशी नोंद आहे. चांगदेवाने तर ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठविले. ज्याचा अर्थ मुक्ताबाईला समजला आणि चांगदेवांना मुक्ताबाई सारखा गुरु लाभला. व चांगदेव पासष्टीची निर्मिती झाली.  पत्रातील ‘ध’ चा ‘मा’ केल्यामुळेच पेशवाईत अनर्थ घडला. थोडक्यात काय, मानवी जीवनात पत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे .

            ईस्ट इंडिया कंपनीने १६८८साली मुंबई व चेन्नई येथे टपालसेवा सुरू केली व १७७४ मध्ये संपूर्ण देशात ती सुरू झाली. १८७८ मध्ये जागतिक पातळीवर युनिव्हर्सल पोस्टल युनियन ची स्थापना झाली व जास्तीत जास्त देश या युनियनचे सभासद असणारी ही एकमेव संघटना आहे.भारतात २५० वर्षांपासून तर पाश्चात्त्य देशात त्याही आधीपासून पत्र लेखनाची परंपरा आहे. अनेक थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, साहित्यिक, लोकनेते, शासनकर्ते यांनी पत्रलेखनाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, मार्टिन ल्युथर किंग, अब्राहम लिंकन, थोरो, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर..अशा अनेक महानुभावांनी पत्र लेखनातून अमूल्य अशा साहित्यिक, वैचारिक , मार्गदर्शक  समाजप्रबोधनाची निर्मिती केली. त्यामुळेच  या पत्रसंपदेच्या

संग्रहाची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि अशा असामान्य पत्रांना साहित्याचा दर्जा देऊन त्याला पत्रवांग्ङमय म्हटले आहे. हा एक ऐतिहासिक दस्तऐवज असून त्या काळच्या संस्कृतीचा, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा, लेखकाच्या मनोवृत्तीचा, व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा त्यातून घेता येतो .अनेक विद्यापीठांमध्ये या पत्रवाङमयाला संदर्भ ग्रंथ म्हणून जतन केले आहे. इतिहास संशोधकांना तर पत्र वाङ्मयातून अनेक महत्त्वाचे दुवे हाती लागतात. अलीकडच्या साहित्यात ‘लोकहितवादींची शतपत्री’ ‘विश्रब्ध शारदा’ नरहर कुरुंदकरांची समीक्षात्मक पत्रे, जीए कुलकर्णी व ग्रेस, सुनीताबाई देशपांडे व जी ए कुलकर्णी… यांच्या पत्रांनी  साहित्यात मोलाची भर टाकली आहे. 

         वैयक्तिक पत्र व्यवहाराची तर गोष्टच वेगळी. हा एक हळवा, आनंददायी व स्नेह वृद्धिंगत करणारा अनुभव असतो. ही पत्रे  औपचारिक व अनौपचारिक असतात. औपचारिक पत्रे, नोकरी- व्यवसाय , शासकीय, कार्यालयीन संबंधित असतात  आणि  त्यात स्वहस्ताक्षर नसते. मात्र अनौपचारिक पत्र लिहिणे व घरी आलेले पत्र वाचणे…. ही प्रक्रिया मनाला आनंद देणारी असते. आपल्या संबंधित व्यक्तिला पत्र लिहिण्यासाठी कागद पेन घेऊन विचार करणे, भावनांना शब्दांची जोड देऊन प्रत्यक्ष कागदावर  लिहिणे…. ही रचनात्मक प्रक्रिया आहे. पत्र म्हणजे साचेबंद उत्तर किंवा निबंध नसतो. तो दोन व्यक्तिंमधला संवाद असतो. त्यामुळे मनातले विचार मेंदूतून हृदयाद्वारे ,बोटामध्ये येतात व शाईच्या साह्याने शब्दांमध्ये प्राण फुंकले जातात. कागदाला, पेनला जिवंत माणसाचा स्पर्श होणे, जे बोलणे शक्य नाही ते पत्रात लिहिणे, त्यातून डोकावणारी मनस्थिती, संस्कार ,व्यक्तिमत्व, स्वभाव… हे सगळे विलक्षण जिवंत व चैतन्यपूर्ण असते.  पत्राची वाट पाहण्यात  हुरहुर, उत्कंठा, अधीरता याबरोबरच संयम सुद्धा असतो. प्रत्येक टप्प्यावर जिवंतपणाच्या स्पर्शाची खूण  बाळगत.. अखेर पोस्टमनच्या हातून पत्र आपल्याला मिळते. त्यामुळे या जिवंत संदेशवहनाची तुलना कोणत्याही माध्यमाशी होऊ शकत नाही. 

    पत्रामधील हस्ताक्षर हे आठवण, 

प्रेम ,मनाची घालमेल, मनातील आंदोलने अशा अनेक बाजू स्पष्ट करीत असते. हस्ताक्षर ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असल्याने पत्र वाचताना लिहिणारी व्यक्ती आपल्यासमोर साकार होत असते. पत्रलेखनामुळे  विचार, भावना, बुद्धी, भाषाशैली, हस्ताक्षर, शब्दसंपदा.. या  अंगभूत कौशल्यांना वाव मिळत असतो. कागदावर हाताने, पेनाच्या मदतीने लिहिणे ही एक संपूर्ण वैयक्तिक क्रिया आहे जी एकाग्रता वाढवते. ही समाधान देणारी, स्वनिर्मितीची एक कृती असते ज्याची तुलना कीबोर्डवर लिहिलेल्या लेखनाशी होऊ शकत नाही. पत्र लिहिण्यासाठी अक्षर ओळख व कागद पेन एवढीच सामग्री लागते व तिच्या मदतीने जगातली कोणतीही व्यक्ति पत्र लिहू शकते.पत्र डिलीट होत नाहीत. इकडची पत्रे तिकडे फॉरवर्ड करण्याची सोय पत्रव्यवहारात नाही. ही सर्वात मोठी ताकद पत्रलेखनात आहे . वैयक्तिक पत्रातही नवनिर्मिती सर्जनशीलता असते आणि साहित्यिक मूल्य नसले तरी त्यात वाचणाऱ्याचा दिवस उजळून टाकण्याची क्षमता  असते. 

      वैद्यकीय दृष्टिकोनातून पत्रलेखन ही एक उपचार पद्धती आहे. पत्र लिहिण्याच्या विचारानेच व्यक्तिला उत्साह वाटू लागतो. मनात सकारात्मकता  निर्माण होते. मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात. कागद  पेनाचा स्पर्श हाताला होताक्षणी विचार व भावनांच्या निर्मितीला चालना मिळते. या भावनांना शब्दरूप देण्यासाठी बुद्धी कार्यान्वित होते. प्रत्यक्ष लिखाण करताना बोटे, हात, पाठीचा कणा, मान, डोळे व मेंदू यांचा समन्वय होऊन एकाग्रता साधली जाते.  ही संपूर्ण प्रक्रिया शरीराला आणि मनाला एक सकारात्मक ऊर्जा देते. सेन्सरी आणि मोटाॅर या दोन्हीही मज्जासंस्थेला सक्रियता देण्यासाठी पत्रलेखन ही एक उपचार पद्धती  आहे ज्याला ‘मेंटल वर्कआउट’ म्हणतात. डिप्रेशन व एकाकीपणा पत्रलेखनामुळे कमी होतो. मनात साचलेले विचार कागदावर उतरवले की उदासीनता कमी होते. थोडक्यात काय.. वैयक्तिक, सामाजिक, वैद्यकीय,  व्यावसायिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांना पत्रव्यवहाराने समृद्ध केले आहे.

      डिजिटल माध्यमाच्या आहारी जाऊन आम्ही आज पत्रव्यवहार बंद केलेला आहे. परंतु त्यामुळे पत्रव्यवहाराचे महत्त्व कमी होत नाही. म्हणूनच ऑस्ट्रेलियन लेखक रिचर्ड सिंपकीन याने २०१४ पासून, एक सप्टेंबर हा जागतिक पत्रलेखन दिवस साजरा करण्याचे सुरू केले आहे. तसेच पत्रलेखनाला  चालना देण्यासाठी, भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी पत्रलेखन स्पर्धा आयोजित होत असते. ‘ढाई आखर’ हे या स्पर्धेचे नाव असून,  त्यात अठरा वर्षाखालील व अठरा वर्षावरील असे दोन वयोगट केले आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असते. विशेषतः शालेय मुलांमध्ये पत्र लेखनाला उत्तेजन देण्यासाठी, शाळांमधून हा उपक्रम राबवला जातो. दरवर्षी एक अभिनव विषय या पत्रलेखनासाठी दिला जातो.

      आज तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन मध्यमवयीन पिढी स्वतः हाताने लिहिण्याचे विसरत चालली आहे व पत्रलेखन तर ‘आउटडेटेड’ समजले जाते.हस्ताक्षर व पत्रलेखन ही आपली कौशल्ये आहेत.यांचा वापर केला नाही तर हे कौशल्य अस्तंगत  होईल.आज अनेक मध्यमवयीन लोकांमध्ये लिहिण्याचा सराव नसल्याने ते लिहू शकत नाहीत - हे किती गंभीर आणि भयावह आहे.डिजीटल युगाचा वेग, संदेशवहनातील सहजता,क्षणात जगभरात पोहचण्याचे सामर्थ्य… हे सर्व मान्य आहे.काळाची ती गरज आहे.पण त्यासाठी पत्रव्यवहार  या समृद्ध , लोकप्रिय, सांस्कृतिक, दीर्घकालीन संदेशवहनाचा बळी देण्याची काहीच गरज नाही.पुन्हा मी इंदिरा संतांच्या कवितेचाच आधार घेते.

“‘नको पाठवू अक्षरातुनि,शब्दांमधले गहिरे स्पंदन,

कागदातुनि  नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण, 

नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टी पण, 

पाठविसी ते सगळे सगळे, पहिल्या ओळी मध्येच मिळते. 

पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते .” 

अशी शब्दातीत संवेदना मेसेज मधून मिळेल का हो?

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

९४२२९३९५१०

Wednesday, April 14, 2021

 थोडंसं खटकलेलं.......

 मी रोज सकाळी ६ वाजता फिरायला जात असते. माझ्या फिरण्याच्या  रस्त्यावर श्री गजाननमहाराजांचं मंदिर आहे. तिथे दर्शनासाठी मी  हमखास थांबतेच. तिथे ठराविक भक्त मंडळी आरतीसाठी जमली असतात . तीन मध्यमवयीन महिला तिथे न चुकता असतातच. त्यापैकी एक महिला खूप व्यवस्थित तयार झालेली असते.  रोज नवीन साडी, मॅचिंग बांगड्या,मॕचिंग हेअर क्लिप, हलकासा मेकअप. सगळं अगदी नीटनेटकं आणि टापटीप.  ती महिला मारवाडी असावी असं समजून मी तिचं अग्रवाल भाभी हे नावही ठेवलेलं आहे. तिच्या दोघी मैत्रिणी अगदी साध्या असतात.  त्यांची खूप घट्ट मैत्री आहे असा माझा अंदाज आहे कारण   गेल्या वर्षभरापासून मी  रोज त्यांना बघतेय आणि  त्यांचे काही ना काही संवाद कानावर  पडत असतात . मला त्यांच्या मैत्रीचं  खूप अप्रूप वाटतं. दुसरं म्हणजे अग्रवाल भाभींचं प्रचंड कौतुक वाटतं. इतक्या पहाटे इतकं व्यवस्थित तयार होऊन निघणं, सात जन्मातही  माझ्याकडून होणार नाही. किंबहुना अग्रवाल भाभींकडे बघताना मला माझ्या 'अवताराची' प्रकर्षानं जाणीव होते. सकाळी उठल्यावर तोंडावर मारलेलं पाणी, केसांवरून फिरवलेला हात- (कंगवा नाही), आणि समोर दिसणारा कोणताही कुर्ता चढवला की माझी तयारी पूर्ण होते. नाही म्हणायला, अधून मधून, चांगलं तयार होऊन फिरायला जाण्याचे संकल्प असतातही माझे.... पण सकाळी ते रीतसर ढासळतातच. असो. तर रोज भेटूनही, आमची ओळख फक्त 'स्माईल' पर्यंतच होती कारण मी नेहमी घाईत. आणि त्या तिघीजणी मस्त निवांत.

     परवा मात्र अग्रवाल भाभींची  साडी मला फारच आवडली. न राहवून मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटलं ,

  'भाभी मी रोज तुमच्या कडे बघते. खरंच, खूप सुरेख साड्या असतात तुमच्या .आणि तुम्ही किती व्यवस्थित तयार झालेल्या  असता. मस्त वाटतं तुम्हाला बघून.'

     मी बोलत होते आणि माझ्या शब्दागणिक अग्रवाल भाभींचा चेहरा आनंदाने फुलत चालला होता. माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी ओठांची हालचाल केली तोच त्यांच्या दोन मैत्रिणी  हसत हसत म्हणाल्या,

 ' तिला काय काम आहेत घरी? नुसती बसली असते. इकडची काडी तिकडेही करत नाही. सुना आहेत कामं करायला. रात्रीच, उद्याची साडी , बांगड्या, क्लिप, पर्स काढून ठेवते. तुमच्या माझ्यासारखी मरमर कुठे  करावी लागते तिला घरात?'

  माझ्या रोजच्या  अवतारावरून 'मरमर' हा शब्द त्यांना सुचला असणार नक्कीच .असो.पण  त्या बोलत असतांना अग्रवाल भाभींच्या चेहऱ्यावरुन, आनंद अक्षरशः झरझर उतरतांना मी बघितला.

यावर मी फक्त हसले आणि  माझ्या दिशेने चालू लागले . पण  भाभींचा तो उतरलेला चेहेरा माझ्या  डोळ्यासमोरुन जाईना.    मी त्यांना तशी परिचित नव्हते. त्यांच्या  घरगुती बाबींमधे मला काडीचाही रस नव्हता.माझ्या अगदीच वरवरच्या पण अस्सल प्रतिक्रियेवर त्या दोन्ही मैत्रिणींनी फक्त दुजोरा दिला असता तर काय हरकत होती? 

   जवळच्या-मैत्रिणींमध्ये चिडवणं, थट्टा करणं हे अपेक्षित असतं अणि त्या मैत्रिणी गंमतीनंच ते बोलल्या असाव्यात .भाभींनीही ते बोलणं मजेतच घेतलं असणार.

  पण  एखाद्याला सहजपणे ,अगदी चिमूटभर आनंद मिळत असेल तर त्यावर विरजण घातलंच पाहिजे का?असं विरजण घेऊन फिरणार्या भरपूर व्यक्ती आपल्या आसपास असतात मात्र त्याची जाणीव त्यांना स्वतःलाही नसते. आपण करत नसलेली  एखादी  चांगली कृती दुसरा कुणी करत असेल तर त्याचं कौतुक  करण्याची पद्धतच आपल्यात नाही.उलट ती चांगली कृती करण्यासाठी दुसऱ्या कडे कशी अनुकूल परिस्थिती आहे आणि त्याने ती चांगली कृती करणं म्हणजे 'फार काही विशेष नाही'...असं बेधडक म्हणताना आम्ही काहीही विचार करत नाही. 

आम्हा प्राध्यापकांची हल्ली बरीच प्रशिक्षणं होत असतात.त्यात स्वतःचं आणि सहकारी प्राध्यापकांचं मूल्यमापन करण्याचे अनेक प्रसंग येतात.अशावेळी बोलतांना सुरुवातीला सकारात्मकच बाजू मांडायची व नंतर नकारात्मक बाजूचं मूल्यमापन करायचं अशा कडक सूचना आम्हाला असतात.म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल व्यक्त होताना आधी सकारात्मक चष्मा लावण्याचा तो धडा असतो.दुर्दैवानं समाजात तसं घडत नाही आणि  

  त्या दिवशी अग्रवाल भाभींचा उतरलेला चेहेरा बघून मला ही वृत्ती प्रकर्षाने  खटकली , एवढंच.........

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...