Tuesday, July 11, 2023

बाईपणाचं दळण थांबव रे देवा

  




 जवळपास चाळीस पन्नास वर्षांपूर्वी  जो विषय ज्वलंत होता,ज्या विषयाचा चघळून चघळून चोथा झाला आहे तोच विषय आकर्षक स्वरुपात,कसलेल्या अभिनेत्रींना घेऊन, चुरचुरीत विनोदाची फोडणी देऊन,  तिन्ही त्रिकाळ प्रसिद्धीचा, प्रमोशनचा मारा करुन महाराष्ट्रातील स्त्री प्रेक्षकांवर थोपवलेला सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'.थोडक्यात काय, चित्ताकर्षक वेष्टनात गुंडाळलेली जुनी पुराणी वस्तू.किंवा नव्या बाटलीत जुनी दारु म्हणजे ' बाईपण भारी देवा '.

       बाई असल्यामुळे, सर्वसाधारणतः  कौटुंबिक,  भावनिक गुंत्यात अडकणं हा तिच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतोच.त्यात नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या बाईची तर तारेवरची कसरतच असते.  अशाच सहा सख्ख्या बहिणींच्या आयुष्यातले गुंते ही सिनेमाची मुख्य कथा.आणि त्यातून सुटण्यासाठी या सहा बहिणी जो भन्नाट (अजिबातच न पटणारा, अवास्तव) मार्ग निवडतात , तो म्हणजे 'बाईपण भारी देवा'. 

       मुळात या बहिणीं समोरचे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत.फक्त सुचित्रा बांदेकरच्या घटस्फोटाचा प्रश्न सोडून. त्यातही शिल्पा नवलकर,वंदना गुप्ते आणि रोहिणी हट्टंगडी यांची घुसमट ( जी अतिशय वरवरची आहे) त्यांनी स्वतःच निर्माण केली आहे.खरंतर काहीही कारण नसतांना चोवीस तास चेहऱ्यावर बारा वाजलेल्या रोहिणी हट्टंगडीच्या नवऱ्याचीच घुसमट व्हायला हवी होती.त्याचं पुरुष पण भारी रे देवा! या बहिणींची दु:खं म्हणजे तूप साखरेत घोळवून, लाडावून कुरवाळून मोठी केलेली दु:खं आहेत.अशा दु:खांना फारसं महत्त्व न देता आजची बाई जगण्याचा आनंद घ्यायला शिकली आहे. अशी फालतू दुःखें आम्ही आणि आसपासच्या बायकांनी अनेकदा अनुभवली आहेत आणि त्यातून लीलया बाहेर पडलो आहोत. बाईपणाच्या वास्तव दुःखांच्या आणि कोंडमाऱ्याच्या जवळपासही हा सिनेमा पोचत नाही.नुकतंच बाईपणातून बाहेर निघून एक माणूस म्हणून जगण्याच्या आजच्या काळात बाईला या सिनेमाने परत बाईपणात ढकललं आहे. शिकलेल्या,नोकरी करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या या सहा बहिणी इतक्या दुबळ्या का असाव्यात की, मंगळागौर स्पर्धेचा त्यांना आधार घ्यावा लागावा आणि तो ही एकत्रितपणे? आज समाजात ,भयंकर संकटांना एकटीने सामोरं जाऊन जीवनाच्या लढ्यात यशस्वी झालेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी बाईपण भारी आहे हे सिध्द केलं आहे.अशावेळी हा उथळ सिनेमा निव्वळ हास्यास्पद वाटतो.

    मुलांचा वाढदिवसाचा सोहळा सुरु असताना कोणती आई प्रेग्नंसी टेस्ट करेल हो?आणि मेनोपॉज आला म्हणजे आभाळ कोसळलं की काय?(आम्हाला तर हायसं वाटलं बुवा) चिनूच्या ऑपरेशनच्या वेळेस तिचा नवरा आणि सासू कुठे होते? कडक अण्णा एकाएकी मऊ कसे झाले? स्टेशनवरचा नाच म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा कळस.

       असो.कलाकार सगळेच कसलेले आहेत.वंदना गुप्ते कितीही आवडत असली तरी तिला आता बघवत नाही.  ती स्वतःच्याच प्रेमात आहे."मी- वंदना गुप्ते" याच ऍटिट्युड ने तिने काम करु नये. सुकन्या कुलकर्णी जबरदस्त .तिची बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरचे हावभाव  अप्रतिम. पण नोकरी करणारी बाई इतकी बावळट?असो.

       पण दिग्दर्शक केदार शिंदे खरंच हुशार.त्यांनी आजच्या मध्यमवर्गीय,मध्यमवयीन बायकांची मनोवृत्ती अचूक हेरली आहे. "मज्जा" आणि "एन्जॉय" हा प्राधान्य क्रम असणाऱ्या बायकांची नस त्यांनी बरोबर पकडली आहे. सिनेमातल्या वरवरच्या झगमटाला बाईपणाचं लेबल लावलं आणि त्याला नाव देतांना "भारी" या  जरीची झालर लावली.झालं. तमाम महिला वर्ग खुळावलाच की हो.  थिएटरला तीर्थयात्रेचं स्वरुप आलंय चक्क. बायका झुंडीने सिनेमाला ड्रेस कोड करुन जाताहेत,रील,फोटो काढताहेत. थिएटर मधून बाहेर निघताना आपण "कसल्या भारी" आहोत या आनंदात न्हाऊन निघताहेत. सगळ्याच बायकांचा आत्मविश्वास वाढलाय म्हणे हा सिनेमा बघून - अर्थातच... जमत नसेल, सोसत नसेल तरी सार्वजनिक ठिकाणी नाच करण्याचा हो. हा केदार शिंदे च्या यशाचा फॉर्म्युला. 

      खरंतर "बाईपण किती उथळ देवा"...असा समज या सिनेमामुळे होतोय.पण झापडं बांधूनच वावरायचं असेल तर देव त्यांना सद्बुद्धी देवो !!  असो. डोकं न वापरता सिनेमा डोक्यावर घ्यायचा हे ठरवूनच टाकलं असेल तर प्रेक्षक स्त्रियांचंही "बाईपण भारीच भारी" हो देवा.

     

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

#बाईपणभारीदेवा

Saturday, July 1, 2023

यथा पेशंट: तथा डॉक्टर': ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

   


     


  माझी रोजची ओपीडी. सकाळी नऊ पासून सुरू होणारी. आमचे निमसरकारी आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय. त्यामुळे पेशंटचा प्रचंड ओघ. कॉर्पोरेट  हॉस्पिटल सारखे 'एसी केबिन', 'रिसेप्शनिस्ट', 'अपॉइंटमेंट'.. असे चोचले आम्हाला परवडणारे नाहीत. पेशंट स्वतःच आपली लाईन लावणार, मध्येच घुसणार, भांडणं होणार... हे रोजचंच चित्र. एक पेशंट केबिनमध्ये तपासायला आत शिरला की दुसरा पेशंट एक पाय आत एक पाय बाहेर असा उभा राहणार. तिसरा पेशंट मधूनच पडदा बाजूला करून डोकावणार .चौथा पेशंट खिडकीतून आत बघणार हे नित्याचंच. त्यादिवशी बारा वाजत आले होते. जवळजवळ ४० पेशंट पासून झाले होते. १२ नंतरची वेळ फारच आणीबाणीची असते. तपासण्याचा, बोलण्याचा, ऐकून घेण्याचा.... सगळाच वेग मंदावला असतो. एक ज्येष्ठ   गृहस्थ बराच वेळ पासून मला बाहेर उभे दिसत होते. त्यांना आत येण्याची काही घाई दिसत नव्हती.ते सारखे आत डोकावून बघत होते. सगळे पेशंट आटोपल्यावर मी लांब श्वास घेऊन उठले. आता भूकही लागली होती. तेवढ्यात ते आजोबा आत आले. 

   "या दवाखान्यात तुम्ही पोटदुखीवर औषध देता का हो?"

    त्यांचा हा प्रश्न ऐकून, 'नाही हो. मी इथे भुवया कोरून देते'- - असं सणसणीत उत्तर द्यायची इच्छा मला झाली पण मी स्वतःला आवरलं. डोक्यात जाणाऱ्या पेशंटशी - तेही विशेषतः बारा वाजल्यानंतर, कमीत कमी मनस्ताप करून कसं बोलायचं याचा माझ्याजवळ फॉर्म्युला तयार असतो. उत्तरा दाखल मी फक्त मान हलवली - होकारार्थी. "पोटदुखीवर पंचकर्म पण करतात का हो?" 

  परत माझी होकारार्थी मान हलली. 

  "पंचकर्माचा खर्च किती येतो?" 

  आता मात्र माझ्या श्वासाची गती वाढू लागली. मी डोळ्यांनी इशारा करून नॉन स्ट्रायकर एन्डवर उभ्या असलेल्या माझ्या हाऊस ऑफिसर कडे बॅटिंग दिली.

हाऊस ऑफिसर तरुण, उत्साही आणि अननुभवी असल्याने,त्याने आजोबांचे बॉल दणादण हाणायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात मी एक ते शंभर आकडे मनात मोजून दीर्घ श्वास घेतले.आजोबांच्या ज्ञानात कितपत भर पडली देव जाणे. आता आजोबांनी माझ्याकडे बॉल टाकला. 

"अहो पंचकर्म करायला आठ दिवस लागतात? आम्हाला तर परवाच पुण्याला जायचं आहे." 

आता तर माझ्या हृदयाची गती पण वाढू लागली. त्यांचा बॉल मी न टोलवता सोडून दिला आणि जास्तीत जास्त मख्ख चेहरा करून बसले. 

"मॅडम सांगा ना, काय करायचं ?"-आजोबा. 

आता मात्र त्यांच्या बाॅलवर सीमापार फटका मारायची वेळ होती. 

"अहो पोटदुखीवर पंचकर्मच करायचं, हे तुम्ही कसं काय ठरवता? आधी पेशंटची हिस्ट्री, तपासणी, आजाराचं निदान, गरजेनुसार चाचण्या हे सगळं झाल्यावरच आम्ही ठरवू औषध द्यायचं की पंचकर्म करायचं"

" मॅडम, सगळ्या तपासण्या झाल्या आहेत. सोनोग्राफी, एक्सरे झाले आहेत. पोटदुखीचं निदानही झालं आहे औषधेही खूप दिवस घेतली. काही फायदा नाही. आता ठरवलं , पंचकर्मच करायचं. अहो कित्येक वर्षापासून मी याच भागात राहतोय पण मला माहीतच नव्हता हा दवाखाना"- आजोबा. 

आता मात्र सीतेसारखं मला या दवाखान्यासकट जमिनीत गडप व्हावं असं क्षणभर  वाटून गेलं. गेल्या तीस वर्षाची रुग्णसेवा आजूबाजूंच्या खिजगणतीतही नसावी? 

"हे बघा आजोबा, आधी तुम्ही टेबलवर झोपा .तुमची लक्षणं, हिस्ट्री सांगा. मग काय ते ठरवू ."आता मी अंपायरच्या भूमिकेत शिरले. 

   "नाही हो. मी फक्त चौकशी करायला आलो होतो. माझ्या मिसेसला पोट दुखीचा त्रास आहे. तिला केव्हा आणू?" 

   आजोबांनी गुगली टाकला आणि मी ताडकन उठून थर्ड अंपायर म्हणजे सिस्टर कडे ती केस सोपवून केबिन बाहेर पडले.

      एकदा तर गंमतच झाली .तीव्र कंबर दुखीमुळे उभे राहणे, चालणे कठीण झालेला एक पेशंट पंचकर्म करण्यासाठी दवाखान्यात भरती झाला. उपचार सुरू झाल्यावर त्याची लक्षणे हळूहळू कमी होऊ लागली. रोज राउंड घेताना तो कंबरेचं दुखणं सोडून इतर बऱ्याच तक्रारी सांगायचा.

अंगाला खाज, डोकेदुखी, छातीत जळजळ वगैरे लक्षणांवर त्याला आम्ही औषध देत होतो. त्यातली खाजेची, डोक्याची कोणती गोळी आहे हे तो  हाऊस ऑफिसरला विचारत असे. आठ दिवसाच्या पंचकर्माने त्याची कंबर दुखी पूर्ण नाहीशी झाली. तो उभा राहून चालू लागला. पण अंगाला खाज, डोकेदुखी, जळजळ काही कमी होईना. त्यामुळे तो दवाखान्यातून सुट्टी घ्यायला तयार नव्हता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. मी सिस्टरला त्याच्यावर बारीक नजर ठेवायला सांगितली. तेव्हा हे महाशय डोकेदुखीच्या गोळ्या बायकोसाठी, खाजेच्या गोळ्या आईसाठी आणि छातीत जळजळीच्या गोळ्या मित्रासाठी जमा करून स्वतः 'प्रॅक्टिस' करत होते. दुसऱ्या दिवशी राऊंडच्या वेळेस त्याचं तेच डोकेदुखी खाजेचं रडगाणं सुरू झालं. मी म्हटलं, 

"हे बघा, तुम्ही कमरेच्या दुखण्यासाठी भरती झालात ते दुखणं बंद झालं ना? आता बाकी लक्षणांसाठी औषध देऊनही जर आराम होत नसेल तर

आपण आता डोकेदुखीसाठी सिटीस्कॅन, जळजळीसाठी एंडॉस्कॉपी आणि खाजेसाठी एलर्जी टेस्ट करूया. मी चिठ्ठी लिहून देते तुम्हाला." 

  ही माझी मात्रा अचूक लागू पडली आणि माझ्या राउंड नंतर पेशंट लगेच गाशा गुंडाळून घरी परतला.

         असे मजेदार अनुभव आणि अफलातून किस्से समस्त डॉक्टरांच्या पोतडीत भरपूर जमा झालेले असतात. माझ्या 30 वर्षाच्या अनुभवानुसार कोणत्याही पेशंटशी पाच मिनिटं बोलल्यावर त्याची वृत्ती लक्षात येते. मग त्याच्याशी कसं, किती,कोणत्या स्वरात, कोणत्या भाषेत,कशा पद्धतीनं बोलायचं हे लगेच ठरवता येतं.                                                       आजकाल डॉक्टरांच्या नावानं खूप ओरड केली जाते. पूर्वी डॉक्टर हे देवाप्रमाणे होते. आजकाल असे डॉक्टर्स अभावानेच आढळतात असे अनेकांचे मत असते. परंतु पेशंट सुद्धा पूर्वीसारखे कुठे राहिलेत? हल्लीचे पेशंट गुगल विद्यापीठातून अर्धवट माहिती घेऊन येतात. कशा पद्धतीचे उपचार करायचे हे डॉक्टरच्या ऐवजी तेच ठरवतात.तपासण्या करण्याचा अट्टाहासही अनेक पेशंटचा असतो.  

         खरं तर चरक महर्षींनी सांगितल्या प्रमाणे, 'विद्या, वितर्क,विज्ञान, स्मृती,तत्परता आणि क्रिया '.. या षड्गुणांनी युक्त असे डॉक्टर वास्तवात असतातच.पण हल्ली पेशंट हे  'इंपेशन्ट' झाले आहेत.त्यामुळे बरेचदा डॉक्टरांना ' विद्या, वितर्क' गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.

          आमच्या चरक संहितेत  तर उत्तम रुग्णाचे पण गुण सांगितले आहेत.

  " स्मृती निर्देशकारित्वं अभिरुत्वमथापि च ।  ज्ञापकत्वं च रोगाणां आतुरस्य गुणा:  स्मृता:।।"

उत्तम रोग्याला त्याच्या रोगाच्या कारणांची, पथ्य अपथ्यांची, औषधं घेण्याची आणि वैद्याने दिलेल्या सल्ल्याची पूर्ण आठवण असावी. वैद्याच्या आदेशाचे पालन करणे, न घाबरणे व वैद्यापासून आपल्या रोगाविषयी काहीही न लपवणे ही उत्तम रुग्णाची लक्षणे आहेत. 

       गंमत अशी की संधिवातासाठी गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी सांगितली की हा वैद्यकीय सल्ला न ऐकता, पेशंट धावत पळत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येतो.त्यावेळेस ऑपरेशन चा सल्ला आमच्या पासून लपवून ठेवतो आणि पंचकर्माने माझे गुडघे बरे करून द्या अशी ताकीदच देतो. पुणे, मुंबई अगदी परदेशात राहणारे बरेच जण दिवाळीत आपल्या घरी अकोल्याला येतात .आता दहा दिवस सुट्टी आहे तर पंचकर्म करून द्या. मग नंतर आम्हाला वेळ नाही असं स्वतःच ठणकावून सांगणारे पेशंट खूप वाढले आहेत. ब्लड प्रेशर, मधुमेहाची औषधं स्वतःच्या मनाने बंद करणारे, वाटेल तेव्हा सुरू करणारे, औषधांचे डोस  सोयीनुसार कमीजास्त करणारे, एकाच वेळी एलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषध घेणारे, स्वतःच्या मनाने डायट आणि अघोरी व्यायाम करणारे पेशंट  वाढतांना दिसत आहेत. दोन वर्ष एलोपॅथी ,एक वर्ष होमिओपॅथी घेऊनही आराम न पडल्यामुळे आता आयुर्वेद करून बघूया असा विचार करून पेशंट माझ्याकडे येतात आणि येताक्षणी  पहिला प्रश्न विचारतात,

  ' किती दिवसात बरं वाटेल मॅडम?'

   पूर्वी मी शास्त्रशुद्ध , प्रामाणिकपणे , सविस्तर समजावून सांगत असे. आता मात्र 

   "ऍलोपॅथीला दोन वर्ष, होमिओपॅथीला एक वर्ष दिलेत ना?मग आयुर्वेदाला तीन वर्षे लागणारच "असं ठामपणे सांगून देते. 

    शेवटी काय,कालाय तस्मै नमः.'यथा पेशंट तथा डॉक्टर' हाच आजकालचा मंत्र. रुग्णसेवेचा उदात्त व्यवसाय करतांना आनंदाचे,समाधानाचे क्षण येतातच. पण बरेचदा पेशंटपेक्षा डाॅक्टरच 'बिच्चारा'

    होतो. ही डॉक्टरांची बाजू समजून घेण्यासाठीच हा लेखन प्रपंच.

    ********************************

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी, अकोला

९४२२९३९५१०

#डॉक्टर्सडे

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...