Showing posts with label वैचारिक व प्रासंगिक. Show all posts
Showing posts with label वैचारिक व प्रासंगिक. Show all posts

Sunday, October 22, 2023

दसरा - गरज वैचारिक सीमोल्लंघनाची

 


हल्ली मोबाईल किंवा टीव्हीवर, ' द ग्रेट इंडियन फेस्टिवल' ही एमेझाॅन सेल ची जाहिरात दिसायला लागली की समजावे - सणासुदीचे दिवस आलेत.म्हणजे सण आले की खरेदी करायचीच हे समीकरण बाजारपेठेने आपल्या मेंदूवर कोरुन ठेवलेय.नखशिखांत दागिन्याने मढलेल्या,उंची तलम वस्त्रे ल्यायलेल्या अत्यंत देखण्या स्त्रिया चुटकीसरशी विविध प्रकारच्या मिठाया स्वतः तयार करुन घरच्यांना आग्रह करुन खाऊ घालणारी जाहिरात दिसली की समजावे सण आलेत.(अशा महान स्त्रिया शोधा आणि हजार रुपये मिळवा.....अशी माझी फार दिवसांची...असो) मुद्दा हा की सध्या समाजात दोन प्रकारचे समूह प्रामुख्याने दिसतात. सण असले की निर्बुद्ध मालिकेत़ बघितलेल्या सणांचे  उत्सवी , पोषाखी अनुकरण करणारा एक समूह.... हे म्हणे संस्कृतीचे (?) जतन करतात. आणि दुसरीकडे कायम अर्ध्या चड्ड्या घातलेला,दाढीचे खुंट वाढलेला, वर्षभरात कंगवा न लागलेले विस्कटलेले केस असणारा , सदैव लॅपटॉप बडवणारा समूह.यांना  दिवस,रात्र, आंघोळ,जेवण, झोप, सणवार....यांच्याशी कवडीचेही देणेघेणे नसते. ओटीटीवर आवडत्या सीरियलचा सीझन येई दुसरा / तिसरा... तोची दिवाळी दसरा......असेच असावे कदाचित.

      आणि या दोन टोकांच्या मधे असणारी आमची मध्यमवयीन पिढी. एकीकडे लहानपणी साजरे केलेल्या सणांचा सात्विक आनंद शोधण्याची धडपड तर दुसरीकडे सणांचे श्रेयस पकडून ठेवण्याची असमर्थता.

      हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकताच येऊ घातलेला दसरा.दसरा दिवाळीची चाहूल हीच मुळात ऊर्जादायक  असते पण ती केव्हा? जेव्हा बदललेला ऋतू याची हळूवारपणे जाणीव करून देतो तेव्हा.

                    सोन पावलांनी येणारा अश्विन महिना येतानाच भक्ति आणि शक्तीचा संदेश घेऊन येतो. अश्विनातले लख्ख केशरी ऊन, मोकळी हवा, निरभ्र आकाश, टिपूर चांदणे, पिवळ्या- नारिंगी झेंडूंनी रंगलेला निसर्ग..... सगळेच कसे मेंदूला  चेतवणारे असते. अश्विनाच्या हवेतच ऊर्जा असते. नऊ दिवस जगदंबेची केलेली उपासना आणि दहाव्या दिवशीचा दसरा...हे सगळेच दिवस  चैतन्याने रसरसलेले असतात.            

          त्यात मनुष्यप्राणी हा उत्सवप्रिय आहे. भारतीय संस्कृतीत अत्यंत कल्पकतेने आणि  योजकतेने या सण उत्सवांची रचना केली आहे. प्रत्येक सणामागे एक निश्चित विचारांची बैठक आढळून येते आणि त्याचवेळी येणाऱ्या ॠतूचे स्वागत केल्या जाते आणि सोबतच आरोग्याचा एखादा नियमही जोडला जातो.जीवनप्रणाली, विचारप्रणाली ,आणि उपासनाप्रणाली  या तिन्हींचे उन्नयन या सणामुळे व्हावे हे अपेक्षित असते. शुष्क उपदेश सांगितले असते तर ते टाळण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते पण सणावारांच्या माध्यमातून आणि प्रतिकांचा उपयोग करून ही संस्कृती आपल्या जीवनात रुजवली गेली आहे.सण उत्सवांद्वारे मन प्रसन्न होते,कौटुंबिक संबंध  दृढ होतात, सामाजिक जाणीवा व्यापक होतात तर प्रतिकांद्वारे बुद्धीचा विकास होतो. भारताचा  सांस्कृतिक इतिहास हा पुस्तकांच्या पानात नाही ,तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिला आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व शास्त्रीय माहात्म्य आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण सणांचा संबंध देहाच्या आणि मनाच्या आरोग्याशी तर आहेच पण आत्मिक समाधानाशीही आहे.मानवी जीवन कौटुंबिक,मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक समृद्ध करायचे असेल तर सण उत्सवा मागचा दृष्टीकोन लक्षात घ्यायला हवा.काळ आणि परिस्थितीनुसार कालबाह्य आणि निरुपयोगी प्रथा मोडीत काढून सणांमागचे तत्व व विज्ञान शाबूत ठेवणे गरजेचे आहे.

     या दृष्टीने दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव आहे. या सणासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराजय करण्यासाठी लंकेवर स्वारी केली आणि अश्विन महिन्यातल्या दशमीला रावणाला ठार मारले म्हणून या दिवसाला विजयादशमी असं म्हणतात. 

            दुसरी कथा महिषासुरमर्दिनी देवीची आहे पृथ्वीवरील जनतेचा छळ करणाऱ्या  महिषासुराचा नि:पात करण्यासाठी देवाने अष्टभुजा देवीचे रूप धारण करून, दहा दिवस युद्ध करून त्या राक्षसाचा वध केला म्हणूनही या दशमीला विजयादशमी म्हणतात.म्हैसूरला याच देवीला चामुंडेश्वरी या नावाने संबोधतात. 

       रघु राजाने विश्वजीत यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. अशात चौदा विद्या पारंगत असलेला कौत्स त्याच्याकडे दान मागायला आला.  याचकाला विन्मुख पाठवणे ही रघु राजाची संस्कृती  नव्हती.  म्हणून द्रव्य संग्रहासाठी त्याने इंद्रावर स्वारी केली .रघु राजाच्या अचाट पराक्रमाची कल्पना असल्यामुळे इंद्राने युद्धाचे कारण जाणून घेतले व कुबेराला रात्री  शमी व आपट्याच्या वृक्षांवर सुवर्ण मोहरांचा वर्षाव करण्याची आज्ञा दिली. रघुराजांनी या संपत्तीचे कौत्साला दान दिले. आवश्यकतेपेक्षा एकही सुवर्णमोहोर जास्त घेणार नाही हा कौत्साचा निश्चय होता तर या द्रव्याने मी माझी तिजोरी भरणार नाही हा रघु राजाचा आग्रह होता. शेवटी हे सोने लुटून घेण्याचा आदेश त्याने जनतेला दिला. लोकांनी त्या झाडाची पूजा करून  ते सोने लुटून घरी आणले, तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमीचा. तेव्हापासून या झाडाची पाने सोने म्हणून लुटण्याचा प्रघात आहे .

             पांडवांनी देखील अज्ञातवासात असताना आपली अस्त्रे शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. इतिहासाचा मागवा घेतल्यास विजयादशमी चा मुहूर्त स्वारी करण्यासाठी किंवा मोहीम सुरू करण्यासाठी फार महत्त्वाचा होता हे दिसून येते. शिवाजी महाराज, पेशवे याच मुहूर्तावर कूच करीत असत अशी इतिहासात नोंद आहे.                     

         हा सण साजरा करीत असताना सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. ईशान्य दिशेला असलेल्या शमी किंवा आपट्याच्या  वृक्षाची पूजा करताना, 

    'शमी शमयते पापम् 

    शमी लोहित कंटका |

    धारिण्य अर्जुनं बाणानाम्      

     रामस्य प्रिय वादिनी |

तसेच, 

'अश्वंतक महावृक्ष, 

महादोष निवारणम् |

इष्टानां दर्शनम् देहि, 

कुरु शत्रुविनाशनम् | 

अशी प्रार्थना म्हणून नंतर शमी तसेच आपट्याची पाने आणायची असतात. ही पाने म्हणजे सुवर्ण मोहरांचे प्रतीक आहे. ही पाने आपण देवाला वाहतो, वडीलधाऱ्यांना, मित्रांना देतो. मला हे जे वैभव मिळाले आहे, त्याचा उपभोग मी एकटा घेणार नाही तर सगळ्यांना वाटून या आनंदाचा गुणाकार करायचा..... ही कल्पनाच किती उदात्त आहे. मित्रांबरोबर शत्रूशी ही प्रेमाचे नाते जोडायचे हा दसऱ्याचा संदेश आहे. या दिवशी शस्त्र लेखणी, वाहनांची पूजा करतात. म्हणजे ज्या साधनांनी आपली शक्ती वाढते त्या साधनांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही किती अभिनव कल्पना आहे.या दिवशी रावण दहन करतात.याद्वारे  मनातली दुष्ट वृत्ती नष्ट होऊन रामप्रवृत्तीचा उदय होण्याची प्रेरणा मिळावी हे अपेक्षित आहे. या सगळ्या पद्धती प्रतिकात्मक आहेत.पौराणिक  कथा या कपोलकल्पित असतीलही. पण लहानपणी अशा कथांवर विश्वास बसतो आणि त्यातून मिळणारा संदेश नकळतपणे संस्काररुपात खोलवर रुजत जातो. हे बालवयात झालेले संस्कार मनाला संयमी आणि विवेकी करतात आणि पुढील आयुष्यात सण साजरे करताना कधी वावगे वागू देत नाहीत. 

आश्विन महिना म्हणजे शरद ऋतू .आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील पित्त प्रभावी असते. पित्त म्हणजे बुद्धी, साहस, पराक्रम. अशावेळी प्रत्येकानेच एका चौकटीत बंदिस्त न राहता

 सीमोल्लंघन  करावे अशी अपेक्षा आहे. महिषासूरमर्दिनीचा पराक्रम, रामाने रावणावर केलेली मात,रघुराजाचे दातृत्व, पर धनाबद्दल विरक्ती,कौत्साची निर्मोही वृत्ति.....यातून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे.

  आजच्या युगात वैचारिक सीमोल्लंघन आणि त्यानुसार  केलेली कृती अपेक्षित आहे. या सणातला उत्साह, उल्हास ,आनंद, प्रेम हे जीवनाचे प्रेयस आहे तर,वैचारिक सीमोल्लंघन  हे आत्मशक्ती, संघटन शक्ती, अन्यायनिवारण यासाठी पोषक ठरणारे म्हणजेच या सणातील श्रेयस आहे. उत्सव साजरा करताना श्रेयस आणि प्रेयसाचा योग्य समन्वय हवा.

दसरा विजयाचा सण असल्यानं षड्रिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे सामर्थ्याचे, मैत्रीचे,परस्पर सामंजस्याचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

सण म्हणजे 'धम्माल ', 'मज्जामस्ती ' हे नक्कीच खरे आहे पण त्याचे रूपांतर   'धांगडधिंगा' व 'उन्मादात ' होऊ नये ..हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची तीव्र निकड आहे.

 'आला आश्विन आश्विन, 

 जाती सीमा उल्लंघून,

 लुटा समतेचं सोनं ,

गात मानव्याचं गाणं '

असा समानतेचा,वैचारिक उन्नतीचा,परस्पर सौहार्दाचा दसरा साजरा करु या.मोबाईलवर 'हॅपी दसरा' हा संदेश जगभरात पाठवणाऱ्या मेंढरांच्या कळपात सामील व्हायचे की नाही हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ. साधना कुलकर्णी

9422939510

drsadhana.k@gmail.com


Tuesday, September 12, 2023

यावे गणराया

 


         


यावे देवा महाराजा.गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुझे हार्दिक स्वागत. आपल्या राज्यात तुझ्या आगमनाची रीतसर आणि जय्यत तयारी झाली आहे. शहराकडून गावाकडे जाणाऱ्या रेल्वे ,बस ,खाजगी गाड्यांचं आरक्षण कधीचंच 'फुल्ल' झालेलं आहे. खाजगी वाहनांचे दर नेहमीप्रमाणे प्रचंड वाढले आहेत. तुझ्या विविध मनमोहक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या भव्य, आकर्षक मूर्ती वाजत गाजत, विजेच्या, केबलच्या तारा तोडत आपापल्या  मंडळात डेरेदाखल झाल्या आहेत. ढोल, ताशा लेझीमची प्रॅक्टिस टिपेला म्हणजेच कानाचे पडदे फाटेस्तोवर पोचली आहे. आधीच खड्डे असलेल्या जमिनीवर आणखी खड्डे खोदून  बाप्पा तुमच्यासाठी ठिकठिकाणी भव्य व्यासपीठे उभारली आहेत. खंडणीच्या वसुलीप्रमाणे  वर्गणीही सगळ्या मंडळांनी 'शिस्तीत' जमवली आहे. आपण यावे गणराया.... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

                      बाप्पा तुझ्या उत्सवात बंदोबस्तासाठी पोलिसांची प्रचंड फौज तैनात केली आहे. आता दहा दिवस त्यांना पाणी प्यायला ही सवड नसणार.तुझ्यासारखे व्हीव्हीआयपी आले की सगळी कामं सोडून कायदा आणि सुव्यवस्था योग्य राखण्यात  पोलिसांची काय अवस्था होते हे तुला सांगायची  गरज आहे? सुरळीत वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे.पण हरकत नाही. तुझ्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची योजना केली आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी झाला त्यामुळे पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे.शिवाय निर्माल्य पाण्यात शिरवण्याची आपली परंपरा.असो. आपण यावे गणराया..... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

          महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस पुरेसा नसल्याने पिके करपून चालली आहेत. शेतकरी हवालदिल झालाय.पण बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजली आहे. तिथे दुष्काळाचा मागमूसही नाही बरं बाप्पा. तुझे दागिने ,तुझी रेशमी वस्त्र, तुझं मखर, तुझी आरास, तुझ्यासाठी फुले, हार, दुर्वा, नारळ, फळफळावळ यांनी बाजार ओसंडून वाहतोय. दुचाकी चारचाकी वाहनांची खरेदी तुझ्या आशीर्वादाने व्हावी म्हणून अनेकांनी आगाऊ पैसे भरून ठेवले आहेत.सोने खरेदी पण तुझ्या आगमनाप्रित्यर्थ भक्तांनी केली आहे.  तुझ्या साग्रसंगीत  आणि षोडशोपचार पूजेसाठी समस्त ब्रह्मवृंद सज्ज आहे .हल्ली त्यांची वेळ  चार महिने आधीपासून घ्यावी लागते . नाही  तर ऑनलाईन गुरुजींचा पर्याय आहेच की. त्यामुळे सारं काही 'सुशेगात' आहे.आपण यावे गणराया......तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

           ही झाली सार्वजनिक मंडळाची तयारी. पण आम्ही घरी सुद्धा जय्यत तयारी केलीय बरं बाप्पा. अहो ,दोनशे रुपयांनी सिलेंडर स्वस्त झालाय. मग काय विचारता? घर चकाचक स्वच्छ केलं आहे.तांदूळ धुऊन, वाळवून, दळून उकडीच्या मोदकांची तयारी केली आहे. यूट्यूब वरून चीज मोदक, केक मोदक, पनीर मोदक, चायनीज मोदक, मिलेट्स मोदक यांच्या रेसिपीज डाऊनलोड करून ठेवल्या आहेत. अथर्वशीर्षाची पुस्तकं आणून ठेवली आहेत. दहा दिवसांच्या दहा-साड्या आणि पारंपारिक दागिने ठरवले आहेत. आणि यावर्षी ना बाप्पा, माझ्या मैत्रिणीने सरळ चांदीच्या २१ दुर्वा आणि चांदीचे जास्वंदीचे फुल खरेदी केले आहे. म्हणजे रोज दुर्वा तोडायची कटकटच नाही. त्यामुळे आपण यावे गणराया...... तुझं स्वागत घरोघरी दणक्यातच आणि भक्ती भावाने होणार. 

          बाप्पा तू महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहेस. अग्र पूजेचा मान असल्याने तुझी पूजा तर नेहमी आम्ही करतोच पण भक्तीभावाच्या पलीकडेही तुझं आणि आमचं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं आहे. तुझी घरात प्रतिष्ठापना झाली की आख्खी वास्तू चैतन्यमय होते.घरात तुझ्याशी  हितगुज करता येतं, संवाद करता येतो, मनासारखी पूजा करता येते. घरातल्या हवेला मांगल्य आणि पावित्र्याचा गंध येतो. 

          तसंच आम्ही लहान असताना, आमच्या  जोशीवाडीत तुझी स्थापना व्हायची. मग ठरल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी वाडीतील प्रत्येक घराला ठराविक काम असायचं. एक दिवस हार करायचा. मग त्यासाठी पहाटे उठून फुलं तोडायची आणि चोरायची सुद्धा. आपला हार ,आपला नैवेद्य, आपली रांगोळी सगळ्यात चांगली व्हावी म्हणून सगळी घरं मनापासून आणि आनंदानं तयारी करीत. नैवेद्य रुचकर व्हावा यासाठी आईच्या मागे लावलेली भुणभुण, मी काढलेली मोठी रांगोळी लगेच पावसाने वाहून गेली म्हणून कोसळलेलं रडू, तुझ्यासमोर लहानशा स्टेजवर केलेले बाळबोध नाच, नाटकं, नाट्यछटा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत आणि त्यानंतर मिळणारी छोटी छोटी बक्षीसं.... हे सगळंच खूप गोड, लोभस, सात्विक आणि भाबडं होतं. आजूबाजूच्या मंडळांमध्ये परिसंवाद, व्याख्यानमाला, कीर्तन,तीन अंकी नाटकं...असे दर्जेदार उपक्रम असायचे.थोडक्यात काय, उत्सवाचे दहा दिवस हे आमचं संस्कार शिबीरच होतं.

                    पण....पण आता त्यातलं काहीच उरलं नाही. सार्वजनिक मंडळात तुझी रेखीव, सुंदर, सजवलेली महाकाय मूर्ती असते, तुझ्या अंगावर दागिने असतात, दिव्यांची रोषणाई असते, नयनरम्य देखावा असतो, दानपेटीत देणाऱ्यांचा ओघ असतो, वाद्यांचा दणदणाट असतो. सगळं खूप छान असतं पण बाप्पा, तुझी मूर्ती बघून परकं वाटतं. बरेचदा ती मूर्ती  अलिप्त, तटस्थ वाटते. तू नसतो का तिथे? खरं सांग बाप्पा, तू तिथे नसतोच ना?? 

                    खरंतर, गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. प्रादेशिक उत्सव हे भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करित असतात.हा उत्सव बघायला परदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे अत्यंत प्रगल्भ, परिपक्व ,सात्विक आचार विचारांचं प्रदर्शन होणं गरजेचं असतं. पण सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात शिरलेलं अर्थकारण, राजकारण ,गुंडगिरी ,झुंडशाही, कंपूशाही बघून हा गणेशोत्सव नको असं वाटायला लागलं आहे बाप्पा. तुझ्या उत्सवाचं बाजारीकरण झालं. तुझ्या उत्सवात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होऊ लागली. तुझ्या मंडळात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होऊ लागला. तुझा उत्सव म्हणजे प्रतिष्ठेचं आणि शक्तीचं प्रदर्शन होऊ लागलं .भक्तीची जागा उन्मादाने घेतली. उत्साहाची जागा धिंगाण्याने घेतली .श्रद्धेची जागा अभिमानाने घेतली आणि तुझ्या उत्सवाचा 'इव्हेंट' झाला बाप्पा. 

                        सध्या विलक्षण अस्थिर परिस्थितीत आहे आजचा समाज. एकीकडे  चांद्रयान, विक्रम लँडर, आदित्य एल-वन च्या प्रक्षेपणाने देशाची बौद्धिक उंची वाढते आहे तर दुसरीकडे महिलांना निर्वस्त्र करून, त्यांच्यावर बलात्कार करून, त्यांची धिंड काढणाऱ्या समाजाचा हिंस्र आणि भयंकर चेहरा दिसतो आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे झालेला विकास दिसतो आहे त्याचवेळी त्या महामार्गावर रोज घडणारे अपघात मन सुन्न करताहेत. ज्या देशातले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळवून देशाची मान उंचवतात त्याच देशातल्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार होऊनही त्यांना न्याय मिळत नाहीय. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, नापिकी, प्रदूषण, कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार या सगळ्या विळख्यात आजचा समाज अडकत चालला आहे. बाप्पा, तरीही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आम्ही तुझं जंगी स्वागत करणार आहोत.आपण यावं गणराया...... कारण तुझा उत्सव ही अस्वस्थ समाजाला दिलेली अफूची गोळी आहे. 

                        बाप्पा, तू बुद्धीची देवता आहेस ना? 'त्वं ज्ञानमयो, विज्ञानमयोसि 'असं तुला म्हणतात ना? पण तुला माहित आहे का, सध्या या बुद्धीला कोणीही विचारत नाही, आम्हाला बुद्धी आहे रे पण आम्ही तिचा वापर करित नाही किंबहुना तिचा योग्य वापर केला तर खिल्ली उडविली जाते. आमच्या बुद्धीला गंज चढतो आहे पण आम्हाला त्याचं  काहीही सोयर सुतक नाही .अरे ,आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आता 'बुद्धिमान', 'मठ्ठ', 'ढ' ही विशेषणं निकालात निघालेली आहेत. पुढे मागे, 'बुद्धी म्हणजे काय रे देवा?' असा प्रश्न तुला विचारला, तर वाईट वाटून घेऊ नकोस. आता तुझ्यासमोर हात जोडून कोणीही ,'चांगली बुद्धी दे देवा'... असं म्हणणार नाही, हे लक्षात ठेव आणि आपण बुद्धीची देवता आहोत या भ्रमात राहू नकोस.         

                        शेवटी काय, काहीही झालं तरी तुझं दणक्यात स्वागत होणारच. त्यामागे भक्ती, श्रद्धा, पावित्र्य नसलं तरीही. तेव्हा बाप्पा, आता तूच ठरवायचं आहेस की यायचं की नाही? 

  ' त्वमेव केवलम् कर्तासि|     त्वमेव केवलम् धर्तासि| 

त्वमेव केवलम् हर्तासि|'.. असं तुला म्हणतात ना? मग तूच आता निर्णय घे. पण तोपर्यंत आम्ही जयघोष करणारच... 'यावं गणराया'.... आणि हळूच म्हणणार, 

         'गणपती बाप्पा मोरया.... 

         पुढच्या वर्षी नक्की काय ते ठरवा'.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

 #गणेशोत्सव

#गणपतीबाप्पा

 



Sunday, August 13, 2023

जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?

 




१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला  दर वर्षी मला एकच प्रश्न पडतो की या दिवशी सार्वजनिक सुट्टी का असते ? याचे उत्तरही मला अनेकांनी दिले की हे राष्ट्रीय सण आहेत म्हणून. धार्मिक सणांना सुट्या असतात कारण प्रत्येकाच्या घरी सण साजरे केले जातात. काही धार्मिक विधी पार पाडले जातात, विशिष्ट पूजा असते, नैवेद्य असतो, अन्नदान असते. पण राष्ट्रीय सणाला आपण काय करतो? यावर्षी तर १५ ऑगस्टला मंगळवार आहे. १६ ऑगस्टला पारसी न्यू इयर ची सुटी.१२ ला दुसरा शनिवार तर १३ ला रविवार. म्हणजे सोमवारी १४ ला एक सुटी टाकली की आपोआपच पाच सुट्ट्या पदरात पडणार.हा अगदी मणीकांचन योगच. या योगाची पर्वणी साधून  पावसाळी सहलींना या पाच दिवसात नक्की ऊत येणार. सगळी पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून  जाणार.अशा क्वचितच लाभलेल्या संधीचा फायदा न घेणारा करंटाच.ही सगळी मज्जा फक्त एका १५ ऑगस्ट च्या सुट्टीमुळे. आणि आमच्यासारखे सहलीला न जाणारे  - झेंडावंदन करणार. त्यासाठी आठवडाभरापासून कोणता ड्रेस, कोणती साडी, कोणती थीम, यावर गहन चर्चा घडणार. त्यासाठी वेळप्रसंगी नवीन खरेदी ही होणार. झेंडावंदना नंतर फोटो आणि रिल्स काढण्याचा अत्यावश्यक राष्ट्रीय कार्यक्रम होणार आणि मग आपापल्या घरी जाऊन आराम करणार नाही तर मज्जा करणार.

           देशाच्या स्वातंत्र्यदिनी एक  राष्ट्रगीत म्हणण्याशिवाय दुसरं काय करतो आम्ही? नाही म्हणायला काही उपक्रम राबवलेही जातात पण त्यात देशप्रेमाशिवाय प्रसिद्धीचाच हव्यास दिसून येतो. नवरात्रात अंगात देवी येते त्याचप्रमाणे अनेकांच्या अंगात या दिवशी देशभक्तीचा संचार होतो .अचानक  स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांबद्दल उमाळा दाटून येतो. आणि संध्याकाळपर्यंत हे उसने अवसान जिरले की रीतसर श्रमपरिहाराचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडतो.

            दीडशे वर्षाच्या गुलामगिरीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या तन मन धनाची आहुती देऊन लढा दिला त्यांच्यासाठी १५ ऑगस्ट ला आम्ही  वाट्टेल तशी 'धमाल' करतो, 'धांगडधिंगा' करतो, 'एन्जॉय' करतो.......हे खटकतं. कशाला हवी ही सुटी? सकाळी झेंडावंदन करून नेहमीसारखं कामाला लागायचं.म्हणजे निदान राष्ट्रीय सणाचा धिंगाणा तरी होणार नाही. पण मग  देशप्रेम दाखवण्याची अधिकृत संधीच हातची जाईल की हो. 'देशभक्ती म्हणजे काय रे भाऊ?'असा प्रश्न आज सहज पडू शकतो.  समाजाची प्रासंगिक देशभक्ती उफाळून येण्याचे प्रसंग घडतातही अधूनमधून. नुकतेच झालेले चांद्रयानाचे अंतराळातील प्रक्षेपण ,भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पटकावलेली पदके, भारतीय चित्रपटाचे ऑस्कर मध्ये झालेले नामांकन, सर्जिकल स्ट्राईक.. या आणि यासारख्या अनेक प्रसंगात आपली देशभक्ती उफाळून येत असते. अर्थात ती यायलाच हवी पण ही देशभक्ती प्रासंगिक असते आणि  केवळ भावनेच्या स्तरावर असते. देशभक्ती ही केवळ भावना नाही तर ती एक विचारधारा आहे आणि त्यानुसार केले जाणारे आचरण आहे. आणि या देशभक्तीच्या भावना, विचार, कृतीचे एकत्रित रसायन ज्यांच्या नसांमधून नेहमी वहात असते.. तो खरा देशभक्त. 

आज अनेक मंडळी, अनेक संस्था देशासाठी निस्वार्थी वृत्तिने अथक कार्य करताहेत.त्यांच्यामुळे देशाची मान उंचावली आहे.पण लेखाचा हा विषय नाही.                                                    आज  आपला देश ७६ वर्षाचा झाला आहे. आमच्या साठीच्या पिढीने एकोणिसाव्या शतकातली वर्षोनुवर्षे न बदलणारी आणि कष्टाळू जीवनशैली जगली आहे. त्याचवेळी विसाव्या  शतकातली तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत बदलणारी, वेगवान आणि सुखसोयींनी युक्त अशी जीवनपद्धती आज आम्ही अनुभवत आहोत. वयाच्या या टप्प्यावर किंबहुना कोणत्याही वयात, मी देशासाठी काय केले आहे? किंवा काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला निदान राष्ट्रीय सणाच्या दिवशी तरी विचारायला हवा. 

            'आम्ही नियमित मतदान करतो. नोकरी व्यवसाय करतो. सामाजिक कायदे पाळतो. नियमित कर भरतो. कुटुंब व्यवस्था अबाधित राखतो. आपल्या धर्म संस्कृतीचं पालन करतो .आणखी देशासाठी सामान्य नागरिक वेगळं काय करणार?' असेच उत्तर बहुतांशी  दिले जाण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकाची जबाबदारी आम्ही पाळतो या भ्रमात आपण असतो आणि देशातील अराजकता,अव्यवस्था, हिंसाचारादि बाबींना सरकारला दोषी ठरवतो.डोळे उघडून बघितले तर सामान्य नागरिक ही खूप काही करु शकतो. 

            ताजे उदाहरण घ्यायचे तर समान नागरी कायदा . २०१६ साली हा कायदा लागू करावा का यासाठी आयोगाने जनमताची मागणी केली होती. त्यावेळी जनतेकडून ७५३७८ सूचना आल्या. त्या आधारे विधी आयोगाने १८५ पानांचा अहवाल सादर करून समान नागरी कायदा लागू करू नये

 हा निकाल दिला होता. हे सामान्य नागरिकाच्या शक्तीचे उदाहरण आहे. आताही परत या कायद्यावर विचार मंथन सुरू झाले आहे .आणि आयोगाने १४ जून २०२३ पासून जनतेला आपल्या सूचना देण्याचे आवाहनही केले होते.आपल्या लोकसंख्येचा विचार करता अगदी अत्यल्प प्रमाणात जनतेने ही मत /सूचना देण्याची जबाबदारी  पार पाडली आहे.                       

              'गिव्ह इट अप' ही मोदी सरकारने आवाहन केलेली योजना. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर विकत घेतल्यावर ग्राहकाच्या खात्यात सरकारकडून सबसिडी जमा होत असते. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटाने ही सबसिडी न स्वीकारता सरकारला परत केली तर समाजातील गरीब वर्गाला त्याचा फायदा होतो. ही संकल्पना 'गिव्ह इट अप' कॅम्पेनची आहे. २३ एप्रिल २०२३ पर्यंत सबसिडी नाकारणाऱ्यांची संख्या जवळजवळ १.१३ करोड झाली आहे. संपन्न गटाचा विचार करता, वरिल संख्या नगण्य आहे.

              भारतीय संविधानात भारतीयांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांची नोंद आहे हे आपल्याला माहित आहेच पण ३ जानेवारी १९७७ पासून 'कलम ५१-क' द्वारे 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' विशद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे ३ जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळण्यात येतो. किती नागरिकांना याबद्दल माहिती आहे? 

              उदाहरणादाखल, 'ड'- हे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे  -  हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आणि नुकतीच मणिपुर मध्ये घटलेली घडलेली घटना काय सुचवते? 

        'ज' - हे कर्तव्य म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,मानवतावाद ,शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे - हे आहे. या संदर्भात, मध्य प्रदेशातील सिहोर या गावी रुद्राक्ष मिळवण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली व काही भाविक मृत्युमुखी पडले. ही घटना काय दर्शविते?

 'जनहित याचिका' दाखल करण्याचे धाडस किती नागरिकांमध्ये असते? राजस्थान मधील एका खेड्यात भंवरीदेवी या महिलेने एका वर्षाच्या मुलीच्या विवाहाला विरोध केला त्यामुळे स्थानिक लोकांकडून धमक्या व तिच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला. २२ सप्टेंबर १९९२ ला पाच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. भंवरीदेवीने न्यायालयात धाव घेऊनही ती न्यायापासून वंचितच राहिली. यासंदर्भात भंवरीदेवीच्या वतीने नयना कपूर या वकील महिलेने सुप्रीम कोर्टात राजस्थान सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे भंवरीदेवीला न्याय तर मिळालाच पण या निकालामुळे स्त्रियांच्या हक्कांविषयी उच्च न्यायालयीन स्तरावर देखील सुधारणा झाली . स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल या जनहित याचिकेचा निकाल हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

 आज आपण सामान्य नागरिक हे, 'कळते पण वळत नाही' या परिस्थितीत आहोत. अवतीभवती ची परिस्थिती आणि सत्तेचे गलिच्छ राजकारण यामुळे अस्वस्थता सगळ्यांमध्येच आहे .पण संवेदनशील व बुद्धिमान वर्गाने आपल्या मनाच्या खिडक्या बंद करुन स्वतः च्या कोषात जगणे सुरु केले आहे हे फार गंभीर आहे .आणि या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी हा सामान्य नागरिक दृकश्राव्य माध्यमाच्या आहारी गेला आहे. अन्नावाचून तडफडणारे लोक, रस्त्यावर घडलेला अपघात, डोळ्यासमोर होणारी महिलेची विटंबना..... याकडे दुर्लक्ष करून तो आभासी आनंदात रमला आहे, कायम पार्टी मूडमध्ये राहू इच्छित आहे हे तर अत्यंत भयावह आहे.वाढत जाणारा हा कोडगेपणा पुढच्या पिढीवर काय परिणाम करेल याची कल्पनाही करवत नाही.   

 प्रसिद्ध पोर्तुगाल लेखक 'सारामागो' यांच्या प्रचंड गाजलेल्या ' द इयर ऑफ द डेथ ऑफ रिकार्डो रिस' या पुस्तकात सध्याच्या सामान्य माणसाच्या मनोवृत्तीवर अचूक भाष्य केले आहे. ते लिहितात,  

'वी स्लीप व्हेन वी शुड बी ऑन अवर गार्ड'

 'वी डिपार्ट व्हेन वी शुड बी अरायव्हिंग' 

 'वी क्लोज द विंडो व्हेन वी शुड लीव्ह इट ओपन'

       ‌‌    आजच्या जगातल्या सामान्य समाजाचे हे यथार्थ वर्णन आहे .आज  तांत्रिक प्रगती व आर्थिक सुबत्तेमुळे माणूस सुखी झाला आहे पण नागरिक म्हणून तो आत्मकेंद्रित आणि निष्क्रिय झाला आहे. चंगळवादी वृत्ती आणि निबर मनाचा जबरदस्त पगडा असल्यामुळे मानवी मेंदूच्या सारासार विवेकाची क्षमता कमी होत चालली आहे.    

          पारतंत्र्यात असताना अनेक महान नेतृत्वांनी जनतेमध्ये एक विचारधारा रुजवली,जागरुक केले. पण आज या स्वतंत्र भारतातल्या  बेजबाबदार नागरिकांना योग्य मार्ग दाखविणारे एकही नेतृत्व नाही ही खरी शोकांतिका आहे. आज लोकमान्य टिळक असते तर,'जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?'असे त्यांनी खडसावून विचारले असते.आणि त्यांच्या या शब्दांनी नक्कीच जादूची कांडी फिरली असती.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी,

अकोला, ९४२२९३९५१०

#स्वातंत्र्यदिन

#भारतीयनागरिक

#गिव्हइटअप

Monday, September 5, 2022

लाभले आम्हास भाग्य..... शिक्षक असण्याचे


  


          मध्यंतरी एका व्यासंगी आणि सुप्रसिद्ध व्यक्तिचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. व्याख्यानाच्या आरंभी ते म्हणाले,  'आज मी तुमच्या समोर जो उभा आहे त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना जातं'.....आता या वाक्यात वेगळं असं काहीच नाही. सामान्यतः अनेक विद्वान कर्तृत्ववान व्यक्तींच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतोच. पण खरी मेख पुढेच आहे. वरचं विधान करून दोन क्षण वक्‍त्यांनी विराम घेतला आणि म्हणाले, 'मी त्या शिक्षकांना माझ्या यशाचं श्रेय देतो... ज्यांनी मला कधीच शिकवलं नाही. ज्यामुळे मी स्वतः अध्ययन करण्यास प्रवृत्त झालो'.

          आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला हा प्रसंग आठवला. मी स्वतः एक शिक्षक असल्याने वरिल विधानाचा सगळ्या बाजूंनी सांगोपांग विचार केला. खरंतर प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण करावे असे हे विधान आहे. एक सुसंस्कारित, सुशिक्षित, संवेदनशील नागरिक घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता आपल्यात आहे का? हे आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने अवश्य करायला हवे.

           पण हल्लीच्या 'स्मार्ट' शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही 'स्मार्ट' असल्याने हे आत्मपरीक्षणही स्मार्ट नाही झालं तरच नवल. हे कसे काय??? प्रश्न पडला असेल ना? सोप्पंय. 'ओटीडी' द्वारे हो .आम्हा महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रत्येकाचा एक 'ऑनलाइन टीचर डाटाबेस' असतो. त्यात आपली इत्यंभूत कुंडली मांडलेली असते. वेळोवेळी आपण केलेले उपक्रम - उदा. लेखन, व्याख्यान, प्रकल्प इत्यादी त्यात 'अपलोडायचे'  असतात. जितके जास्त अपलोड तितका शिक्षक भारी. 'ओटीडी' हा शिक्षकाचा आत्माच की हो...'स्मार्ट' आत्मा बरं का.

           खरंच डिजिटल युगाने, वेगवान काळाने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. मग शैक्षणिक क्षेत्र त्याला अपवाद कसे राहणार? शिक्षक केंद्रित शिक्षण आता जुने झाले आहे. त्याऐवजी विद्यार्थी केंद्रित शिक्षण हे योग्य मानले जाते. त्याही पुढे जाऊन आजचे शिक्षण हे परीक्षा केंद्रित शिक्षण आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रचंड संख्येत वाढलेल्या खाजगी शाळा - महाविद्यालये, मोठ मोठ्या शिक्षणसंस्था, संस्था पूरक ध्येयधोरणे, बदललेली शिक्षण पद्धती, शाळांचे कॉर्पोरेट स्कूल आणि पब्लिक स्कूल मध्ये झालेले रूपांतर, सतत चालणाऱ्या परीक्षा, वारेमाप शिक्षणशुल्क, शिकवण्या  व्यतिरिक्त राबवले जाणारे असंख्य उपक्रम...... या सगळ्यांमुळे आजचा शिक्षक हा ओझे वाहणारा भारवाही झालेला आहे. त्याच्यातला खरा प्रामाणिक शिक्षक अर्धमेला होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक विद्यार्थी हे नाते कोरडे आणि रुक्ष होत चालले आहे. शालेय शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात तुलनेने आपुलकी आणि जिव्हाळा आजही टिकून आहे. पण  कोरोनाच्या धुमाकूळामुळे ऑनलाइन शिक्षणाचा शाळेत प्रवेश झाला आणि नात्यातली ही ओलही आता आटते की काय अशी भीती वाटतेय. 'गुगल' सरांनी शालेय शिक्षणातही चंचुप्रवेश केलाय.  महाविद्यालयीन विद्यार्थी तर 'गुगल विद्यापीठच' खिशात घेऊन फिरत असतात. त्यांना शिक्षकाची गरजच नसते. महाविद्यालयीन शिक्षक तर बरेचदा -'उरलो सह्या पुरता' अशा स्थितीत असतात.पूर्वीसारखे शिक्षक आणि पूर्वीसारखे विद्यार्थी आता राहिलेच नाही अशी ओरड हल्ली नेहमीच होत असते.    

            ही वस्तुस्थिती खरी असली तरी सगळेच चित्र नकारात्मक नक्कीच नाही. आजही असंख्य हाडाचे शिक्षक आपलं विद्यादानाचे कार्य तळमळीने करत आहेत. आणि असंख्य विद्यार्थी आयुष्यभर अशा शिक्षकांच्या ऋणात राहत आहेत. शिकवण्याच्या, शिकण्याच्या पद्धती बदलल्या, तंत्र बदलले तरीही शिक्षकाची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. शिक्षण ही एक चैतन्य पूर्ण अशी  सजीवां कडून सजीवांवर घडून येणारी विकासाची प्रक्रिया आहे. तत्व, पद्धती, तंत्र, साधन, साहित्य, पुस्तके या सगळ्या निर्जीवच  गोष्टी. शिक्षक आपल्या स्पर्शाने त्यात चैतन्य निर्माण करीत असतो. त्यामुळे शिक्षकाचे स्थान नेहमीच अनन्यसाधारण होते आणि राहील.

          "The art of giving shape to human powers and  adapting them to social service is the  supreme art of education "  असे प्रख्यात शिक्षण तज्ञ 'जॉन ड्युई' ने म्हटले आहे. मानवी शक्तींना वळण लावून त्यांना समाज कार्यासाठी सक्षम करणे हे शिक्षणाचे सर्वोच्च उद्दिष्ट लक्षात घेण्याची गरज आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने नव्याने समजून घ्यायला हवी.फक्त अभ्यासक्रमाला बांधून न घेता,चौकटीबाहेरच्या शिक्षणालाही अंतर्भूत केले पाहिजे. कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षकाने सकारात्मक राहून, "Successful teaching is a teaching that brings  about effective learning"  या 'मर्सेल' च्या व्याख्येवर विश्वास ठेवून शिक्षक असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे.

         शिक्षक हा राष्ट्रपती पेक्षाही मोठा असतो याचे भान दिले ते 'सर्वपल्ली राधाकृष्णन' यांनी .उत्कृष्ट अध्यापन, इंग्रजी वरील असाधारण प्रभुत्व, अलौकिक वक्तृत्व, तत्त्वज्ञानाचा प्रगाढ व्यासंग असणाऱ्या डॉ.

 राधाकृष्णन यांनी अध्यापनाचा आरंभ मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेज पासून केला. त्या नंतर म्हैसूर, कलकत्ता येथेही त्यांनी विद्यादानाचे कार्य केले. आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू ते १९३१ते १९३५  पर्यंत होते. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात 'स्पाॅडलिंग प्रोफेसर' या पदावर त्यांची नियुक्ती झाली. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होत. १९३८ ते १९४७ पर्यंत त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारून या विद्यापीठाला उंचीवर नेऊन ठेवले. डॉ. राधाकृष्णन हे नुसतेच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते. त्यांची मर्मदृष्टी व त्यांचे मूलग्राही चिंतन त्यांच्या विविध देशांमधल्या व्याख्यानांमधून आणि ग्रंथसंपदेमधून निर्विवाद सिद्ध झाले आहे.

 "मी परदेशात शिकायला जाणार नाही तर शिकवायला जाईन"... हे विद्यार्थी दशेतील त्यांचे उद्गार त्यांनी सिद्ध केले. १९४९ साली ते रशियात राजदूत म्हणून गेले. १९५२ सालापासून दहा वर्षे ते उपराष्ट्रपती होते. १९६२ साली ते राष्ट्रपती पदावर आरूढ झाले. राष्ट्रपती झाल्यावर आपला जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून मानला जावा अशी त्यांनी राष्ट्राला सूचना केली. अत्युच्च पदावर असतानाही स्वतःमधल्या शिक्षकाचे विस्मरण त्यांना झाले नाही. चाळीस वर्षे 'शिक्षक' म्हणून आपण केलेले कार्य सर्वात श्रेष्ठ व मौलिक आहे अशी त्यांची धारणा होती .'पाच सप्टेंबर रोजी माझे गुणगान न करता शिक्षकांचा सन्मान करा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा'..... असा संदेश देऊन त्यांनी शिक्षक व शिक्षण व्यवसाय यांना उदात्त ,श्रेष्ठ पातळीवर नेऊन बसविले.

            आज अनेकदा माझ्यातल्या शिक्षकाचे खच्चीकरण होईल असे बरेच प्रसंग येतात.शिकवणं निरर्थक वाटू लागतं.पण अशावेळेस मला माझ्या शाळेतल्या मराठे बाई आठवतात. कॉलेजमधले जोशी सर आठवतात. शिकवतानाची त्यांची तळमळ आताही तीव्रतेने जाणवते. मनातले वैफल्य, उदासीनता नष्ट करण्याची शक्ती त्यांनी केलेल्या संस्कारात आहे याची प्रचिती येते. अगदी पुलंचे चितळे मास्तर ही येतात मदतीला....

 "पहिली, दुसरीच्या वर्गा बाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणत आहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती,  'आय?'  'गो'.  'यू ?'  'गो'. 'वुई?' 'गो'.

 ' ही?'  'गोऽऽऽज' !!.... ची चाल आठवते. मास्तर इंग्रजी साभिनय शिकवायचे. तुरूतुरू चालत , 'आय अ‍ॅम??'..की

 पोरे 'वॉऽऽकिंग'.. म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून, डोळे मिटून पडत आणि म्हणत , 'आय अ‍ॅम??'... 'स्लीऽऽपिंग'... अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून,  'गाढवांनो, माझी झोप मोडलीत ?' म्हणत."

        आजही अनेक शाळांमध्ये असे अनेक चितळे मास्तर आहेत जे जीव तोडून शिकवत आहेत आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या ह्रदयात जिवंत आहेत,आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याने कायम बांधले आहेत.  

      श्रेष्ठ   शिक्षणतज्ञ 'प्लेटो' म्हणतात, " If you ask me what is education,  the answer is easy, that which makes good  men and good men act nobly".

          या महान शिक्षणतज्ञांचा  शिक्षणाविषयीचा व्यापक दृष्टिकोन आज आपल्याला स्वतःमध्ये रुजवायचा आहे.   मी शिक्षक आहे. परीक्षेच्या पलीकडे, अभ्यासक्रमाच्या पलीकडे, पुस्तकांच्या, तंत्रांच्या 

पलीकडे माझ्याजवळ बरंच काही आहे, जे मी माझ्या विद्यार्थ्यांना, प्लेटोच्या व्याख्येनुसार देऊ शकते..... हा आत्मविश्वास आजच्या दिवशी आपण समस्त शिक्षकांनी मनात रुजवू या आणि हा पवित्र व्यवसाय करण्याची जी संधी मिळाली आहे,त्याचे सोने करु या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ.साधना आशुतोष कुळकर्णी

अकोला

९४२२९३९५१०

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...