Saturday, January 23, 2021

 जाने कहां गये वो दिन......                                                                  


     मी कॉलेजमध्ये शिकत असतानाचा तो काळ. चाळीस वर्षांपूर्वीचा. ते दिवसच वेगळे होते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन डोसा खाणं ही एन्जॉयमेंट ची परमावधी होती. हो.डोसाच.कारण  सिनेमा आणि डोसा येवढीच चैन आर्थिकदृष्ट्या परवडायची.शिवाय पावभाजी,बर्गर,पिझ्झा या भावंडांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळी.

   बहुचर्चित असलेला सिनेमा रिलीज झाला की लवकरात लवकर तो थिएटर मध्ये जाऊन बघणं... यातली गंमत...अर्थातच 'थ्रील' आणि 'एक्साईटमेंट'... आजच्या पिढीला कळू शकणार नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा बघण्याचा रेकॉर्ड असणारी अनेक थोर व्यक्तिमत्वं आमच्या पिढीने बघितली आहेत. विशेषतः अमिताभ बच्चनचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं हे तरुण पिढीच्या अनेक ध्येयां पैकी एक महत्त्वाचं ध्येय होतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.

   परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की सेंटर वरून डायरेक्ट थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची परंपराच होती त्यावेळी.  एखाद्या टुकार किंवा सामान्य सिनेमाचीच तेव्हा निवड व्हायची कारण अख्खा वर्ग एकत्र असल्यावर   सिनेमा बघण्यापेक्षा हुल्लडबाजीलाच चेव यायचा.परीक्षा  सुरू असतानाच, अभ्यास सोडून सिनेमाच्या तिकीटांची तजवीज करणारे  काही खंदे सिनेमावीर आमच्यात होते ज्यांचा मला आजही कमालीचा आदर वाटतो.

    सिनेमाची तिकिटं रांगेत उभं राहुन काढण्याचे ते दिवस होते. आणि हाउसफुल सिनेमांसाठी दोन-दोन तास रांगेत उभे राहण्याची आमच्यात  धमकही  होती. काही सुपरहिट सिनेमांचं  तर अॕडव्हान्स बुकिंग असायचं. अशी तिकिटं मिळविण्यासाठी जीवन-मरणाच्या पातळीवर जाऊन जो संघर्ष केलाय ना आम्ही त्याला तोड नाही.  प्रत्येक थिएटरच्या  मॅनेजर पासून डोअरकीपर पर्यंतच्या साखळीतल्या एका एका दुव्याचा सखोल अभ्यास करणारी काही  व्यासंगी,  संशोधक वृत्तीची मित्रमंडळी आम्हाला  माहित होती.वेळप्रसंगी  त्यांना हाताशी धरून ठेवण्याचं कसबही  आम्ही आत्मसात केलं होतं. तिकिटांचा काळाबाजारही त्यावेळी खूप चालत असे पण त्या भानगडीत मात्र आम्ही कधी पडलो नाही. आपला मध्यमवर्गीय पापभिरु बाणा हो.           

      फर्स्ट डे फर्स्ट  शो चा रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवणारा,  उज्वल भवितव्य असणारा ,शूर-वीर लढवय्या - -- असा  आमचा एक वर्गमित्र होता.  सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पाहिला तर त्याच्या मागच्या आणि पुढच्या पाच पिढ्या नरकात जाणार होत्या बहुतेक. 'सिलसिला' रिलीज झाला त्यावेळी महिनाअखेर होती. तिकिटाचे पंचवीस रुपये ही त्याच्याकडे शिल्लक नव्हते. (तिकिटाची किंमत पंचवीस रुपये हा आज विनोद वाटू शकतो पण ते खरं  आहे.)  घरापासून दूर राहणाऱ्या मुलांचा महिनाअखेर पॉकेटमनी संपूर्ण संपणं ही त्याकाळी नित्याची बाब होती. त्यावेळी ही आर्थिक ओढाताण मुलांनी कधीही पालकांच्या कानावर घातली नाही हे विशेष.आणि पालकही त्याबद्दल चौकशी करित नसत- हे त्याहून विशेष .घरुन मनीऑर्डर येईपर्यंत ही मुलं काय काय युक्त्या करीत हे जर लिहून काढलं तर आजच्या काळातलं बेस्टसेलर पुस्तक होऊ शकतं.असो. पंचवीस रुपये जमवण्यासाठी आमच्या बहाद्दर मित्राने  'मदत करा'- असं लिहून वर्गात एक  वही फिरवली. त्या  काळानुसार अवघे  पाच ते दहा रुपये वजन असणाऱ्या आमच्या पाकिटातून आम्ही प्रत्येकाने चार आणे,आठ आणे, एक रुपया, दोन रुपये पर्यंतची त्याला मदत केली आणि त्याचं फर्स्ट डे फर्स्ट शो चं व्रत सुफळ संपूर्ण झालं.

     एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी 'अभिमान' बघायला गेलो. अर्थातच गर्दी, धक्काबुक्की, खेचाखेची- यातून खिंड लढवून आम्ही तिकीटं मिळवलीत पण या लढाईत 'हाऊसफुल्ल'चा मोठा लाकडी बोर्ड मैत्रिणीच्या पावलावर पडला. जखम नव्हती पण पाऊल चांगलंच दुखावलं होतं. पण 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस'..... असा ध्यास असल्याने पायाकडे दुर्लक्ष करून ,आम्ही तहान भूक हरपून, अभिमान बघितला. सिनेमा संपल्यावर उभं राहिल्यावर जाणवलं की तिच्या  पावलावर प्रचंड सूज आली होती. डॉक्टरांनी पावलाच्या फ्रॅक्चरचं  निदान करून दीड महिना तिचा पाय प्लास्टरमध्ये बांधून ठेवला होता. आज सुद्धा, 'फ्रॅक्चर असतानाही मी सिनेमा बघितला'..... हा 'अभिमान' ती बाळगून आहे .

     'उमरावजान' मधल्या रेखाच्या नृत्यासाठी,'निकाह'मधल्या 'चुपके चुपके रातदिन' या गुलाम अलीच्या गझलेसाठी,'शक्ती' मधे राखीचा मृत्यू झाल्यावर दिलीपकुमार आणि अमिताभचा अबोल आणि चटका लावणारा सीन बघण्यासाठी, 'अंगूर'च्या शेवटच्या सीनमधली आजी बघण्यासाठी,'शोले' मधला प्रत्येकच सीन बघण्यासाठी .....आणि कशाकशा साठी एकाच सिनेमाचा वारंवार झिजवलेला उंबरठा...........अशी समर्पण वृत्ती असणारे भाविक आमच्यात खूप  होते.

त्याकाळी बाल्कनी आणि बॉक्स मधे बसणारी मंडळी उच्चभ्रू असायची.आम्ही  'रिझर्व्ह क्लास'चे वाटसरू  होतो. 

गच्च भरलेलं थिएटर .....

थर्ड क्लास मधली टपोरी पब्लीक......                                                              


थिएटर मधला काळोख ....

भारतीय सरकारची फिल्म डिव्हीजन प्रस्तुत  ब्लॕक अँड व्हाईट डॉक्युमेंटरी....

विको टर्मेरिक ची जाहिरात....

आणि सिनेमाला सुरुवात .....

हे सगळं  जादुई आणि उत्तेजित करणारं वातावरण असायचं. पुढच्या तीन तासात वेळप्रसंगी पडद्यावरची दुःख आपल्या काळजात ओढून घेऊन आम्ही घळाघळा रडत ही होतो.  जया भादुरी- मनोज कुमारचा 'शोर ',अमिताभ -जया भादुरी चा 'मिली' ,पद्मिनी कोल्हापुरेचा, 'आहिस्ता आहिस्ता', राजेश खन्नाचा 'आनंद ',रेखाचा 'जीवनधारा'.....अशा अनेक सिनेमांमध्ये -  प्रत्यक्ष जीवनातही जेवढं रडणार नाही तेवढं धो धो  रडून झालेलंय आमचं.  

    अगदी लहानपणी घराघरातून, वर्षातून दोन-तीनदा घरातल्या सगळ्या बच्चेकंपनीला पौराणिक किंवा ऐतिहासिक सिनेमा दाखवून आणायचा एक भव्य कौटुंबिक कार्यक्रम असायचा. त्यावेळी  'भक्त प्रल्हाद' बघतांना प्रल्हादाचा होणारा छळ बघून आम्हा सर्व भावंडांनी थिएटरमध्ये भोकाड पसरलं होतं -अशी एक वदंता आहे.....

    'माहेरची साडी'बघतांना तर रडून रडून बाया बापड्यांचे डोळे सुजत होते. गर्दी खेचण्यासाठी त्या सिनेमात ईंटरव्हल मधे लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला एक माहेरची साडी भेट मिळत  होती.

     सिनेमे आजही बघितले जातात. पण ते घरच्या होम थिएटर मधे नेटफ्लिक्स वर किंवा ॲमेझॉन प्राईम वर. मल्टीप्लेक्स मधे जाताना आॕनलाईन बुकींग केल्या जातं.   त्यामुळे  तिकीटं काढण्यासाठी रांग नाही , धडपड नाही इंटरवल मधला कोल्ड्रिंक च्या बाटल्यांचा आवाज नाही. गर्दी नाही, धक्काबुक्की नाही.त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.

 आमच्या काळातील तरुणाईला व्यक्त व्हायला आजच्या सारखी मोकळीक नव्हती आणि तशी साधनंही नव्हती .मग मनातलं खूपसं साचलेलं,बरचसं अव्यक्त असं त्या रुपेरी पडद्यावर जिवंत व्हायचं .पडद्यावरचं उमलून येणारं प्रेम,जीवघेणा संघर्ष , पिळवटून टाकणारं दुःख ,तनामनाला नाचवणारा आनंद आमचाच होऊन जायचा.

तो आमच्यासाठी केवळ सिनेमा नसायचाच मुळी.ते तर  स्वतःचंच जगणं  होतं- - औटघटकेचं का होईना पण .......ते स्वतःचंच जगणं होतं.

         आज पूर्वीसारखे सिनेमाभक्तही आढळत नाहीत .  

'होऊनिया वारकरी,पाहिली आज तुझी पंढरी'.....या ओढीनं थिएटरच्या दिशेनं वळणारी पावलं आता अभावानंच सापडत असतील.

      मला वाटतं ज्यांनी सिनेमावर मनापासून प्रेम केलंय, त्यांना अध्यात्माच्या वाटेवरून चालताना फारशी अडचण येत नाही. कारण अध्यात्मातल्या पायऱ्या - -

 मन निर्विचार करणं......

 'मी' ला विसरणं ......

तहानभूक हरपून समोरच्या पडद्याशी एकरुप होणं...... 

पडद्यावरच्या प्रसंगांमधे समर्पित होऊन.....

समाधी अवस्थेत जाणं......  हे सगळं सिनेमाभक्तांचं अनुभवून झालं असतं. 

'आता कोठे धावे मन', तुझे चरण देखिलेया' अशा ध्यासानं आमच्या पिढीतल्या अनेकांचं या  सिनेमा हॉलमध्ये भावजीवन समृद्ध झालेलं आहे. खूप तरल आणि आनंददायी अशा आठवणींचा तो खजिना आहे ज्यामुळे  आजही मन तेवढंच टवटवीत होतं आणि  म्हणतं- - - 'जाने कहां गये वो दिन........

Saturday, January 2, 2021

 कोविड डायरी...

        एका अस्वस्थ मनाची....

जानेवारी 2020 ....

31 डिसेंबर 2019 ला निरोप आणि जानेवारी 2020 चं स्वागत  रीतसर साजरं झालं. तशी व्यक्तिशः मी असल्या सेलिब्रेशनच्या फंदात फारशी पडत नाही पण राष्ट्रीय कुळाचार असल्याप्रमाणे या उत्सवात थोडं का होईना,नाईलाजास्तव ओढल्या जातेच. मग दरसाल दरवर्षी प्रमाणे  नववर्षाचे थातूरमातूर संकल्पही करून झाले . .........अहो,शास्त्र असतं ते....

 दरम्यान वुहानमध्ये कोरोना नामक नवीनच एका साथीच्या उद्रेकाच्या भीषण बातम्या बघितल्या......

 चीनमधे ना??आपल्याला काय त्याचं ???

शेवटी परदुःख शीतलम्.......

आपल्या झोपेचं खोबरं कशाला?

 फेब्रुवारी 2020...

इटलीमध्ये कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.. स्मशानभूमीत जागा कमी पडते आहे....

 पोटात गोळा उठला जबरदस्त!

 पण भारतातल्या 45 डिग्री सें. तापमानात हा विषाणू कसला तगतोय??

 जीव शांतवला जरासा.

नेहमीसारखीच गाढ  झोप लागली .

 मार्च 2020 ....

पुण्यात पहिला कोरोना रुग्ण.. मुंबईत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू.......

 जीव धास्तावला आहे....

 बुद्धीला जरा बाजूला ठेवून थाळीनाद केला.

 दिवे उजळले .

सामूहिक कर्फ्यू .....

थोडासा दिलासा मिळाला.

 होईल सगळं व्यवस्थित.....

साथीचे रोग येतातच की आणि जातातही......

 शांत  झोप लागली.

 एप्रिल 2020....

भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढली.

 जिल्हाबंदी ,शाळा, कॉलेज, ऑफिस, कारखाने, दुकानं, बसेस, रेल्वे, सगळं बंद.

 फक्त आमचे दवाखाने सुरू.. "ऑन ड्युटी डॉक्टर" हे लेबल गाडीवर शौर्य पदका सारखं लावताना ऊर नक्कीच भरुन आला.

 आटोक्यात येणार ही साथ........

फ्लूचा मोठा भाऊ हो......

 उत्साहानं शासनाचे कोविड१९चे ऑनलाईन ट्रेनिंग्ज घेतले. 

सात लेव्हल्सचे सर्टिफिकेट्स जमा झाले.

 कोविडची वैद्यकीय आणि वैज्ञानिक बाजू क्लियर झाल्यामुळे हिरीरीने समाजात ज्ञानवाटप आणि  जनजागरण सुद्धा केलं.

काढे,वाफ,नस्य- दिनक्रमात जोडल्या गेले.

 एसी, कुलर, थंड पाणी, आईस्क्रिम, सरबत, पन्हं,ई. नसतानाही  रात्रीची झोप मात्र निवांत  होती.

  मे -जून-.जुलै 2020 ...

कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतोय.... 

मृत्युदर वाढत चाललाय...

 बरे झालेल्या रुग्णांच्या मोठ्या  संख्येपेक्षा  मृतांचा आकडा कमालीचा छळतोय....

 हा विषाणू आता मनात आलाय वस्तीला ....

कुठेतरी कुणाचा तरी --  श्वासासाठी संघर्ष ......

कुठेतरी भुकेल्यांचा- - अन्नासाठी संघर्ष........

 कुठेतरी एकाकी असहाय व्यक्तिचा- - आधारासाठी संघर्ष....

 सर्व स्तरातील कोविड योद्ध्यांचा - --  कामासाठी घरदार सोडतानाचा संघर्ष......

फॉरिन टूर रद्द झाल्यामुळे कुणाचा तरी- - पंचतारांकित,कोमट संघर्ष ..... 

 आम्ही सुरक्षित आहोत. सगळं कुटुंब एकत्र आहे ..... हा स्वार्थी दिलासा खुपत होता कुठेतरी.. 

आज आश्वस्त वाटतंय पण उद्या?????

 आता रात्री दचकून जाग येतेय.. भीषण सावट आलंय मनावर.. काही लक्षणं नसतानाही, घरातल्यांच्या नकळत  पल्सऑक्सीमीटर उशीखाली लपवून झोपणाऱ्या डॉक्टरांची ही संख्या वाढते आहे.......

ऑगस्ट-सप्टेंबर 2020.... 

आता तर कोरोना विषाणू मनातून अंतर्मनात ही शिरलाय...

 वृत्तपत्र वाचन बंद केलंय..

 बातम्या बघणं बंद केलंय... तरीही येतेच ती दुष्ट, क्रूर बातमी- निकटवर्तीयाच्या मृत्यूची.... 

मृत्यूनं मन हेलावणं हे स्वाभाविकच .

पण या कोरोनानं मृत्यूची थरकाप उडवणारी निष्ठूर बाजू  दाखवली.

प्लास्टिक मध्ये गुंडाळून, एकटेपणाला सोबत घेऊन येणारं मृत्यूचं विदारक रुप..... 

दुःखाला बधीर करणारं....

कुठे आई वडिल दवाखान्यात ...

छोटी मुलं घरी एकाकी.......

वारंवार गळ्याशी आवंढा दाटून येणं वाढलंय आताशा.

मनातला कोरोना धुमाकूळ घालतोय......

 ऑनलाइन गाणी, नाच, रेसिपीज,समुपदेशन, लेक्चर्स योग साधना..... यांनी कसाबसा थोपवलेला हा मनातला विषाणू उचल खातोय परत परत......

हाऊसिंग सोसायट्यांच्या गार्डन मधला शुकशुकाट, स्तब्ध झोपाळे आणि एकाकी  घसरगुंड्या बघून पोटात गोळा  उठतोय.....

 मनातल्या विषाणू साठी कसा करावा लाॕकडाऊन???

मध्यरात्री झोप उघडली की परत डोळा लागतच नाहीय...

आॕक्टोबर - नोव्हेंबर २०२०

.... वरवर तसं सुरळित चाललंय..

मन मात्र धास्तावलेलंच आहे.  दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येणार????

  सण-उत्सव घरच्या घरी होताहेत साजरे.अवतीभोवती बरचसं सकारात्मक,रचनात्मक घडतंय.......

मनातल्या विषाणुचा जोर कमी झाल्यागत वाटतोय..

 पण मनाच्या  चिंधड्या व्हायच्या त्या झाल्याच. 

पण नाही.

आता हतबल व्हायचं नाही.

 डिसेंबर 2020 .....

भारतातील कोविडचं चित्र दिलासादायक... कोरोनाची लस ही येणार........  विषाणूच्या थैमाना पुढे माणसाची जगण्याची धडपड वरचढ ठरली हे निश्चित.

 पण या दहा महिन्यातल्या मनाच्या पडझडीचं काय?? मनात वस्तीला आलेल्या विषाणूला कसं हद्दपार करायचं???

 मानसिक कोविड मधून बरं होणाऱ्यांचं प्रमाण किती टक्के???

मनाच्या कोविडवर आहे का हो लस??? 

नाही....अशा विचारांच्या गुंत्यात अजिबात अडकायचं नाही.

शंभर क्षण  सावरण्याचे आणि  एकच क्षण कोसळण्याचा आहे..

झटकायचा तो क्षण .......

जानेवारी २०२१....

असो.....

 प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार असतेच.मनाच्या कोविडची लस आपली आपल्या जवळच आहे ,हे जाणवतंय... फक्त ती शोधण्याची दृष्टी आणि  वृत्ती  पाहिजे...

.कोविडनंच शिकवलंय ना हे???? पाय रोवून उभं राह्यला....

  "दुःखेष्वनुद्विग्नमनाः 

सुखेषु विगतस्पृहः/

वीतरागभयक्रोधः

स्थितधीर्मुनिरुच्यते//"

ही गीतेतली लस रोज समजून,उमजून स्वतःला टोचत राहणं......हा संकल्प करावा का

 नवीन  वर्षाचा??? 

जमेल???

कारण संकल्प अल्पजीवी असतात ...

असू दे.तो विचार आता  नाहीच करायचा.

पंतप्रधान मोदींच्याच शब्दात सांगायचं तर,


"न अपना न पराया

न तेरा न मेरा,

सबका तेज बनकर

अभी तो सूरज उगा है".

"विकृतिने प्रकृतिको दबोचा

अपनोंसे ध्वस्त होती आज है,

कल बचाने और बनाने

अभी तो सूरज उगा है.

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...