Monday, September 9, 2024

 *कहे कबीर सुनो भाई साधो*

प्रगत देशांचे आपल्याला विलक्षण आकर्षण असते.परदेशात गेल्यावर सतत भारताशी तुलना केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही.तिकडची समृद्धी बघून आपले डोळे दिपतात. पण तेव्हा विसर पडतो की एक समृद्ध संत परंपरा आपल्याला लाभली आहे. या संतांच्या लेखणीतून स्फुरलेले साहित्य - हा आपला वैचारिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा आहे. जो अक्षय आहे. युगानुयुगे  हे संत साहित्य समाजाचे मानसिक आणि अध्यात्मिक पोषण करीत आले आहे. संतांनी आपल्या साहित्यातून अमूल्य आणि आजही कालसुसंगत असणारे जीवन तत्वज्ञान आपल्याला प्रदान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान कोणीही विद्यापीठातून वा भरमसाठ पदव्या मिळवून घेतलेले नाही. संतांची अंगभूत शहाणीव व प्रज्ञा यांची आपल्यावर कायम कृपा असते हे भाग्यच आहे.

     ‌‌ ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीरदास यांची जयंती असते. कबीराचे दोहे अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेकांना ते मुखोद्गत आहेत. शिक्षित, अशिक्षित, विचारवंत बुद्धिवंत समाजाला संत कबीरांचे  साहित्य अवगत आहे.पण विरोधाभास असा की कबीरदासांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल कमालीची संदिग्धता आहे. त्यामुळे अनेक खऱ्या खोट्या कथा त्यांच्या धर्माबद्दल, जन्माबद्दल, गुरुं बद्दल सांगितल्या जातात. संत कबीरांचा जन्म हा वाराणसी येथील एका गावात झाला. साधारणतः पंधराव्या शतकात, चौदाशे चाळीस साली त्यांचा जन्म झाला असावा. पण यातही मत मतांतरे आहेत.  निरू आणि निमा या मुसलमान जोडप्याने, एका तळ्यात कमळाच्या फुलावर बाल कबीरला तरंगताना बघितले. हे जोडपे निपुत्रिक असल्याने, त्यांनी या बाळाला घरी आणले. नामकरणाचे वेळी मौलवींना  पाचारण करण्यात आले. मौलवींनी त्यासाठी कुराण शरीफ उघडले. पण आश्चर्याची बाब अशी की त्यांनी ज्या ज्या नावावर बोट ठेवले, ते नाव कबीर होते.  कबीर याचा अर्थ ईश्वर असल्याने मौलवींनी नाईलाजानेच हे नाव ठेवले. 

       निरू आणि निमा यांच्या घरात  कबीर यांचे संगोपन झाले. ते दोघेही विणकर असल्यामुळे सहाजिकच कबीर देखील हेच काम करू लागले. त्यावेळी देशातली स्थिती अतिशय ढासळलेली होती. मोगलांचे वर्चस्व होते.अराजक, जुलमी राजवट, हिंसा ,अन्याय अत्याचार अशा परिस्थितीत समाज भरकटलेला होता. ही परिस्थिती अनुभवतच कबीरदास लहानाचे मोठे झाले . कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी ,परंपरा या विषयीही त्यांना नेहमीच प्रश्न पडत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांच्या उपजत आध्यात्मिक प्रतिभेला धुमारे फुटू लागले. आणि शाली, चादरी विणता विणता दोहे व कवितांमधून ते परिस्थितीवर भाष्य करू लागले.त्यावर मार्गदर्शन करू लागले. 

      कबीरदासांच्या या अलौकिक, दैवी व्यक्तिमत्त्वाची जनमानसात प्रसिद्धी होऊ लागली. अनेकांना त्यांच्या प्रतिभेचे आकर्षण होते. पण ते हिंदू की मुसलमान हा प्रश्न समाजासाठी फार महत्त्वाचा ठरला. कबीरदासांचे विचार आणि तत्वे, त्यावेळच्या भरकटलेल्या, गोंधळलेल्या समाजाला पेलले नाहीत.कारण ते काळाच्या  कितीतरी पुढे होते.त्यावेळी सिकंदर लोधीचे राज्य होते. हिंदूंना राज्यातून बहिष्कृत कराण्याचे त्याचे धोरण होते. त्यामुळे कबीरदासांनाही धर्मद्रोही ठरवून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले. पण त्यामुळे विचलित न होता ,अहिंसा, प्रेम, मानवता, नैतिकता यांची शिकवण देऊन समाज परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकत हे कार्य कबीरदासांनी अविरत सुरू ठेवले. 

*जाती न पूछो साधो की,*    

*पूछ लिजिए ज्ञान,।* 

*मोल करो तरवार का*, *पडा रहने दो म्यान।।* 

धर्म ,जात,पंथ यापलीकडे पोचलेले, मानवतेचे पुजारी असलेले  कबीरदास हे बंडखोर व क्रांतिकारक विचारांचे होते. दोह्यांमध्ये सिद्धांत आणि उदाहरण शब्दबद्ध करणे, ही त्यांची विशिष्ट शैली होती. निर्गुण भक्ती यावर त्यांचा विश्वास होता. 

*हरी को ढूंढन मै चला,*  *जा पहुचा हरिद्वार।* 

*पग थके ना हरी मिले*, *क्यूं की हरी थे मेरे द्वार।।*        मूर्ती पूजेला त्यांनी नेहमीच विरोध केला. कर्मकांड, अंधश्रद्धा यापासून दूर राहण्यासाठी त्यांनी समाजाला शाब्दिक फटकारे दिले. त्यांचे दोहे समजून घेण्यासाठी शब्दार्थ भावार्थ  (तात्पर्य) व गूढार्थ  (प्रतिकात्मक) लक्षात घेणे गरजेचे आहे. 

*राम राम सब कोई कहे,*  *दशॠत कहे ना कोई ।*

*एकवार दशॠत कहे*, *कोटी यज्ञ फल होय।।* 

 यात अनेक ठिकाणी 'दशरथ' हे चुकीचे लिहिले जाते.कबीरदासांचे दैवत श्री राम आहे असा अनेकांचा समज आहे. परंतु निर्गुण राम म्हणजेच 'आत्माराम' हे त्यांचे दैवत आहे.  वरिल दोह्यात  दशरथ आणि राम हाच  अर्थ समजला जातो. 'दशॠत' म्हणजे दहा अपराधांपासून मुक्त होऊन  रामाचे नामस्मरण करावे. 

    सोप्या - साध्या भाषेत, कमीत कमी शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे व तेही व्यवहारातील उदाहरणे देऊन.... त्यामुळे संत कबीर तळागाळापर्यंत सहज पोचले आणि भक्तांच्या हृदयात विराजमान झाले. त्यांच्या उपासनेची पद्धत परंपरागत नसल्याने, त्यांनी धर्म आणि समाजाकडे बघण्याचा आपला स्वतःचा मार्ग विकसित केला. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. आणि भाषा तरी कोणती? अरबी, फारसी, पंजाबी, बुंदेलखंडी आणि खडीबोली यांचे मिश्रण. म्हणून कबीरांच्या भाषेला पंचमेल खिचडी म्हणतात 

    बीजक आणि साकी हे त्यांचे महत्त्वाचे दोन साहित्य प्रकार. याशिवायही अनेक   प्रकारांमधून त्यांचे शब्दधन समाजाला दिशा देत असते.   महत्त्वाचे म्हणजे कबीरदासांनी स्वतःबद्दल काहीही लिहिले नाही. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल, त्यांच्या गुरुंबद्दल संदिग्धता आहे. श्री रामानंद त्यांचे गुरु होते असे म्हटले जाते.संत कबीरांचे छायाचित्र सुद्धा काल्पनिक आहे.कुणी त्यांना टोपी घातली आहे तर कुणी त्यांना मोरपीस लावले आहे.स्वतःबद्दल ते म्हणतात, 

*मसी कागद छुओ नही,* *कलम गही  नहि हाथ।* 

*चारिक जूग को महातम*  *मुखही जनाई बात।।* 

 कबीरदास निरक्षर होते. त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी हे अक्षरधन त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवलेले आहे. आणि कबीर पंथाची स्थापना केली. बाबू शाम सुंदर दास यांनी संपादन करुन १९३० मध्ये कबीरांच्या पूर्ण रचना हिंदीत प्रथम प्रकाशित केल्या. तसेच 'वन हंड्रेड पोएम्स ऑफ कबीर' हे मॅकमिलन लंडन येथे १९१५ मध्ये प्रकाशित झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे .डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी कबीरदासांना आपले गुरु मानले होते. कबीरांच्या शिकवणीमुळे मला आत्मिक शक्ती मिळाली आहे असे आंबेडकर म्हणतात. 

कबीरांची सुखाची कल्पना म्हणजे ,

*चाह मिटी चिंता मिटी*, *मनवा  बेपरवाह।* 

*जिसको कुछ नहि चाहिये*, 

   *वह शहनशाह।।* 

संत कबीरांचा निर्गुणवाद हा स्वर्ग ,नरक, पुनर्जन्म, मोक्ष, अवतार, पूजा, तीर्थयात्रा आणि उपवास या संकल्पना नाकारणारा आहे. त्यांचा भर केवळ प्रेमावर आहे. प्रेमाशिवाय  समता, स्वातंत्र्य, बंधुत्व असूच शकत नाही असं ते म्हणतात. 

  *कबीर बादल प्रेम का,* *हमपर बरसा आई।* 

*अंतरी भिगी आतमा*,

  *हरीभरी वनराई।।* 

      कबीरांचे विचार काल, सांस्कृतिक व भौगोलिक सीमा ओलांडून विश्वभर प्रसारित झाले आहेत. त्यांचे पंढरपूरच्या विठ्ठलावर  पण अतिशय प्रेम होते. त्यांनी यावर अभंगही लिहिले आहेत. 

*छोड दिया वैकुंठ*, 

*हरि भाव भगतका भूका।* 

*कहत कबीर हरी से मीठा,* 

*लागत तुलसी का  बुक्का।।*. 

   त्याकाळी किंवा आजही अशी समजूत आहे की काशीला मृत्यू आला की मोक्ष मिळतो. ही अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी कबीरदास काशीतून मगहर या ठिकाणी आले आणि तिथेच त्यांचे महानिर्वाण 

 झाले. 

 *सकल जनम शिवपुरी गंवाया।*

*मरतो बार मगहर उठि आया।।*

अशी स्वतः उक्ती आणि कृती करणारे ते समाज सुधारक होते. 

   वास्तविक आज त्यांच्या विचारांची समाजाला खूप गरज आहे. आम्हाला दोहे पाठ आहेत.पण ते अंगीकारण्याचे, आत्मसात करण्याचे धाडस आजही नाही. आम्ही व्यक्तिपूजेतच समाधानी असतो. व्यक्तिगत, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे वागावे याचे नीतीपूर्ण ज्ञान संत कबीरांच्या साहित्यातून मिळते. त्यांच्या अनेक दोह्यांमधून  *कहे कबीर सुनो भाई साधो* .. असे म्हटले असते.. इथे या   'साधोचा' शब्दार्थ म्हणजे साधू. म्हणजेच शुद्ध मनाने ऐका. भावार्थ हा 'साधक'  आहे. आणि गूढार्थ असा आहे की  'साध्य करा.'कबीर वाणी ऐका आणि साध्य करा.

       माझी कणभरही पात्रता नसताना मी संत कबीर जयंती निमित्त लिखाण केले आहे. त्याबद्दल आधीच मी वाचकांची क्षमा मागते. कारण कबीर हा विषय सामान्यांच्या आवाक्यातला अजिबात नाही.  तूर्त त्यांचा, 

*बुरा जो देखन मै चला*,

 *बुरा न मिलिया कोय।*

*जो दिल खोजा आपणा,* 

*मुझसे बुरा ना कोय।।*

हा एक जरी दोहा आपण आत्मसात केला तरी सुद्धा आपले कल्याण होऊन जीवनाचे सार्थक होऊ शकते.


#कबीरदोहे

#संतकबीर


No comments:

Post a Comment

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...