' मनाचा आहार' - आयुर्वेदाची अभिनव संकल्पना
देहाच्या आहाराबद्दल आपण फार जागरूक असतो. रोज सकाळी उठून न्याहारी , दोन्ही वेळच्या जेवणाचं पद्धतशीर नियोजन आपण करतो. भोजनातल्या पदार्थांमधे वैविध्य, चव, स्वाद कसा निर्माण होईल याची आपण दक्षता घेतो. काही आजार झाल्यास लगेच खाण्या-पिण्यात बदल करतो. अपचन झाल्यास हलके भोजन, सर्दी खोकला झाल्यास आंबट,थंड वर्ज्य करतो. डायबिटीस असल्यास शुगर फ्री भोजन..... हे सगळं आपण निगुतीने करतो. पण मग आपल्या शरीरात सर्वशक्तिमान आणि अत्यंत क्रियाशील असणारं जे मन आहे त्याच्यासाठी आपण काय करतो??
या मनाचा आहार आहे 'विचार' आणि 'भावना' . मग या विचार आणि भावनांचं प्रमाण आमच्या मनासाठी किती असावं, हे आपण कधी ठरवतो का???
वाटेल तसे भावनांचे चढ-उतार आपल्या मनासाठी किती घातक आहे याचा विचार आपण करतो का ??
'आज मी चांगलेच विचार आणि सद्भावना हाच मनाचा आहार घेणार'- असं कधी ठरवतो का??
उपवासाच्या दिवशी कितीही आवडता पदार्थ समोर आला तरी तो नाकारण्याचा निग्रह आपल्यात असतो. तसंच नकारात्मक विचार आणि वाईट भावना आपण कितीदा ठरवून आणि निग्रहाने नाकारतो?? आपण मनाला कायम गृहीत धरलेलं असतं. या मनाला आयुर्वेदशास्त्रात 'सत्व' असंही म्हटलं आहे. शास्त्रानुसार 'प्रवर सत्व' , 'मध्यम सत्व' आणि 'अवर सत्व' हे मनाचे व्यवहारातले तीन प्रकार आहेत. शास्त्रामध्ये, रुग्ण तपासणीसाठी आला की त्याची 'सत्वपरीक्षा' सुरुवातीलाच करण्याचे निर्देश दिले आहेत कारण त्यामुळे उपचार करण्याची दिशा आधीच निश्चित होते.
प्रवर सत्व म्हणजे
कोणत्याही परिस्थितीत संतुलित आणि स्थिर व्यक्तिमत्व असणारे,आजार व्यवस्थित समजून घेऊन उपचारांना पूर्ण सहकार्य करणारे,आजाराचा मनावर कोणताही वाईट परिणाम होऊ न देणारे आणि सकारात्मकता आणि तीव्र इच्छाशक्ती असणारे असतात.
मध्यम सत्व म्हणजे एरवी स्थिर आणि संतुलित ,पण प्रतिकूल परिस्थितीत अवसान गळणारे,आजाराची सतत चिंता करणारे पण योग्य उपचार घेणारे , आजाराला मनात ठेवून गोंजारणारे, सकारात्मकता आणि इच्छाशक्ती साठी एखाद्या सपोर्ट सिस्टीम वर अवलंबून असणारे असतात .
अवर सत्व म्हणजे
नेहमीच अस्थिर आणि शंकेखोर व्यक्तिमत्व ,आजार आहे त्यापेक्षा अधिक गंभीर भासवणारे,कायम आजाराचे रडगाणे गात राहणे व उपचारांवर अविश्वास दाखवणारे, नकारात्मक प्रवृत्ती आणि इच्छाशक्तीचा अभाव असणारे असतात .
आता यापैकी आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचं परिक्षण करणं ही पहिली पायरी. कुटुंबातील प्रत्येकाचं सत्व एकदा समजलं की त्यानुसार विचारांचा आणि भावनांचा आहार ठरवायचा.
प्रवर सत्वाचे रुग्ण जीवघेण्या आजारातूनही सहज बरे होतात.पण कधीकधी अति आत्मविश्वासामुळे.....'मला काहीही होणार नाही'...अशी बेफिकिरी त्यांच्यात असते.अशावेळी त्यांना तर्कशुद्ध विचारांचा आहार योग्य मात्रेत देणं गरजेचं असतं.
मध्यम सत्वाच्या रुग्णांना मनोबल टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.त्यांच्या आहारातून भीतीची भावना वर्ज्य करुन सकारात्मक विचार अधिक मात्रेत दिले तर मध्यम सत्वाच्या व्यक्ती यशस्वी होतात. पण देहाचा आजार त्यांच्या मनात ठाण मांडून बसला असतो त्यामुळे आजाराचा एकही विचार आहारात नसणे- ही खबरदारी घेणं हे गरजेचं असतं.
हीन सत्वाच्या रुग्णांना बरे होण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात- त्यांना स्वतःलाही आणि डॉक्टरांनाही. देह निरोगी असला तरी त्यांचं मन आजारीच असतं. त्यांची नकारात्मक वृत्ती ही व्याधीमुक्ती मधला महत्वाचा अडथळा असतो.त्यामुळे सकारात्मक,आश्वासक विचार, आणि सुरक्षित भावना यांचा रतीबच त्यांच्या आहारात ठेवावा लागतो.
व्याधी निर्माण होण्याचं पहिलं सामान्य कारण 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' यावर मागील लेखात आपण चर्चा केली आहे- जी इंद्रियांशी संबंधित आहे. आता शास्त्रात सांगितलेलं, दुसरं सामान्य कारण म्हणजे 'प्रज्ञापराध'. आता प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान अधिक शहाणपणा.( इंटेलिजन्स आणि अंडरस्टँडिंग). ही प्रज्ञा ज्यावेळी बिघडते , त्यावेळी व्याधी निर्माण होण्याची दाट शक्यता असते. आता हा प्रज्ञापराध नेमका कसा होतो???
तर मनाच्या तीन वृत्ती असतात. 'धी', 'धृति' आणि 'स्मृती' .या तीन वृत्तींच्या योग्य समन्वयाने मन काम करीत असतं.
'धी' म्हणजे बुद्धी. 'जी निर्णय देते ती बुद्धी'- अशी बुद्धीची व्याख्या आहे. ज्यावेळेस 'धीभ्रंश' होतो त्यावेळी हितकर आणि अहितकर यातला फरक समजत नाही. काय नित्य (परमनंट) आणि काय अनित्य (टेम्पररी) यातला फरक समजत नाही.आज समाजात कोविडचे नियम न पाळणारे सगळे 'धीभ्रंश झालेले आहेत त्यामुळे संसर्गाचा आलेख उंचावतोय.
'धृती' म्हणजे धैर्य. 'धृतिभ्रंश' म्हणजे धीर सुटणं किंवा मनावर नियंत्रण न राहणं.आज कोविडमधून बरे होत असणाऱ्या रुग्णांचीही अचानक मृत्यू ची बातमी येते.हे सगळे 'धृतिभ्रंशाचे' रुग्ण असतात.
'स्मृति' म्हणजे स्मरण किंवा अनुभव. स्मृतिभ्रंश म्हणजे ज्या उपयुक्त स्मरणीय बाबी आहेत त्या वेळेवर न आठवणं.. आज कोविडच्या बातम्या वाचताना,ऐकताना केवळ दुर्घटना लक्षात ठेवणं आणि रुग्ण बरे होण्याचा दर,लसीकरणाचे फायदे,ई. विसरणारे ८० टक्के लोक आहेत.अशांची मानसिक खंबीरता कमी होऊन ते सहजतेने कोणत्याही आजाराला बळी पडतात.अशा प्रकारे 'धीधृतीस्मृतिभ्रंश' झालेल्या समाजात व्याधि निर्मिती होणं अटळ असतं. त्यामुळे आज मनाचं आरोग्य व्यवस्थित राखणं ही पहिली प्राथमिकता आहे .आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबीयांचं सत्व परीक्षण केल्यास नेमकी सुधारणा कुठे आणि कशी करायची आहे याची दिशा स्पष्ट होते. तसंच धी, धृती, स्मृती या मनाच्या वृत्ति उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी, मनाच्या आहारावर नियंत्रण, उत्तम विचारांचा स्वीकार, संयमित भावना.... असा रोज मनासाठी मेनू ठरवणं आवश्यक आहे. तर्कशुद्ध विचार आणि सद्भावनांच्या आहारासाठी प्रार्थना ,योग,प्राणायाम,ध्यान जप,छंद,संगीत ,वाचन,सत्संग अशा कितीतरी पाककृती भारतीय संस्कृतीत आहेत ज्यामुळे मनाला संतुलित विचार ,भावनांचा आहार मिळतो . आपल्या संस्कृतीतच सुदृढ आणि निरोगी मनाचं संवर्धन होण्याची व्यवस्था आहे.येवढंच काय,आपल्या कुटुंबव्यवस्थेतील दैनंदिन आचरण देखिल मनासाठी कमालीचं पोषक आहे .
आणखी महत्वाचं म्हणजे ,आपलं मन दोन पद्धतीनं काम करतं.पहिलं म्हणजे इंद्रियांशी संलग्न होऊन काम करणं.त्यामुळे आपल्याला वातावरणातील शब्द ,स्पर्श ,रुप,रस,गंधाचं ज्ञान होतं.आता इथे आपण चूक अशी करतो की इंद्रियांच्या आहारी जाऊन त्या मनाला कायम इंद्रियांसोबत गुंतवून ठेवतो.इंद्रियांवर तर अतिरेक होतोच परिणामी मनावरही नको तो आहार थोपविला जातो.
मनाची काम करण्याची दुसरी पद्धत ही की मन जेव्हा इंद्रियांपासून मुक्त असतं त्यावेळी ते अत्यंत पद्धतशीर वागतं.चिन्त्य,विचार्य,ऊह्य,ध्येय आणि संकल्प या पायऱ्यांद्वारे मन निर्णयापर्यंत पोचत असतं.
चिन्त्य म्हणजे विचारांची योग्य/अयोग्यता ठरविणे.विचार्य म्हणजे तर्कानुसार त्या विचारांमुळे होणारी लाभ/हानी ठरविणे.ऊह्य म्हणजे उहापोह करुन शक्यतांचा विचार करणे.ध्येय म्हणजे गुण दोषांचा विचार करुन कोणती शक्यता ग्राह्य आहे हे ठरविणे आणि संकल्प म्हणजे निर्णयाप्रत जाणे.इतकं सुसंगत असं आपल्या मनाचं साॕफ्टवेअर आहे.....अट हीच की ते इंद्रियांपासून मुक्त असावं.हे असं इंद्रिय निरपेक्ष मन अंगिकारणं व्यावहारिक दृष्ट्या कठीण असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही.हा सवयीचा आणि अभ्यासाचा भाग आहे.या अभ्यासामुळे मन स्थिर,शांत आणि सशक्त होतं.
पण आपल्याला आपल्याच अंतरंगात असणाऱ्या संपत्तीचं भानच नसतं. आपण मनाला देतो कधी मुक्ती? उलट आज आम्ही आमच्या मनाला विकृत विचारांचा आणि बटबटीत भावनांचा अति प्रमाणात आहार देऊन अजीर्णाची स्थिती निर्माण केलीय. त्यामुळे या कोविड महामारीत तर आपल्या विचार आणि भावनांना अक्षरशः चाळणी (फिल्टर्स) या लावायची वेळ आलीय. कोविडबाधितांची आकडेवारी रोज जाहीर होत असते.त्यावरून सांख्यिकीय निष्कर्ष काढले जातात. पण कोविडग्रस्त मनांची आकडेवारी कोण काढणार? कोविडबाधित मनाला कोणती टेस्ट लावणार? आजमितीला कोविडबाधित मनांची संख्या ही कोविड रुग्णांपेक्षा कितीतरी जास्त आहे,जे खरोखरच भयावह आहे. त्यामुळे आपल्या मनाला योग्य आहार देऊन त्याची शक्ती ,क्षमता वाढवणं आणि योगसाधना, ध्यान, स्वसंवाद याद्वारे मनाला इंद्रियांपासून रोज अलग करण्याची जास्तीत जास्त सवय लावणं हे ही लसीकरणा इतकंच प्रभावी आहे यात शंकाच नाही.
#प्रज्ञापराध
#धीधृतिस्मृति
#धीधृतिस्मृतिभ्रंश
#प्रवरमध्यमअवरसत्व
#चिन्त्यविचार्यऊह्यध्येयसंकल्प