Showing posts with label आयुर्वेद. Show all posts
Showing posts with label आयुर्वेद. Show all posts

Monday, September 9, 2024

पक्षाघात पुनर्वसन - एक आव्हान


 पक्षाघात पुनर्वसन - एक आव्हान

    पक्षाघात हा आजार ४० वर्षांपूर्वी साधारणतः जेष्ठवयीन व्यक्तींमध्ये आढळत असे. पण आज परिस्थिती विलक्षण बदलली आहे . आज तरुण व्यक्तींना म्हणजे तिशी चाळीशीच्या वयातही पक्षाघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षाघाताचा अत्यंत दुर्दैवी परिणाम म्हणजे कायमस्वरूपी येणारे अपंगत्व. या अपंगत्वावर मात करण्याचे अनेक उपाय आहेत. काही रुग्ण त्यात यशस्वी होतात. पण बरेचसे रुग्ण संपूर्ण आयुष्य एकाच जागी अंथरुणावर व्यतीत करतात. आज पक्षाघाताचे वाढते प्रमाण हे व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर अत्यंत भयावह आणि निराशाजनक चित्र निर्माण करणारे आहे.. जेव्हा एक व्यक्ती पक्षाघातामुळे अपंग होऊन अंथरुणाला खिळते तेव्हा त्या व्यक्तीचे उत्पादक मूल्य शून्य होते. ही व्यक्ती कुटुंबप्रमुख व अर्थार्जन करणारी असेल तर कुटुंबाची आर्थिक बाजू कोलमडून पडते.परिणामी पीडित व्यक्तीचे मानसिक व शारीरिक  स्वास्थ्य खालावत जाते. कुटुंबावर पण  औषधोपचाराचा आर्थिक बोजा वाढतो. रुग्णाची शुश्रुषा करण्यासाठी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला गुंतून राहावे लागते किंवा एखादा मदतनीस ठेवावा लागतो. रुग्णाचे कार्यालयीन  योगदानही बंद पडल्यामुळे ऑफिसचे /संस्थेचे/ वा कार्यालयाचेही नुकसान होते. पक्षाघात हा आजार केवळ रुग्णापुरता मर्यादित रहाणारा नाही . तसेच यातून पूर्णतः बरे होण्याचा कालावधीही निश्चित नाही. ज्यामुळे स्वतः रुग्ण, त्याचे कुटुंब आणि समाज यांच्याही स्वास्थ्यावर परिणाम होतो.यासाठी पक्षाघात व्याधी बद्दल जनजागरण करणे ही काळाची गरज आहे. आता हे जनजागरण तीन प्रकारे करायला हवे.
१ .पक्षाधात होऊ नये होऊ नये यासाठी काय करावे?
ब्लड प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार व व्यसनाधीनता यामुळे पक्षाघाताची शक्यता वाढते. म्हणून योग्य आहार, विहार, व्यायाम व नैसर्गिक जीवनशैली....या बाबी आज अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.वास्तविक आज सगळ्याच व्याधी टाळण्यासाठी आयुर्वेदोक्त जीवनशैली हेच एकमेव उत्तर आहे . 
 निसर्गाविरुद्ध असणारी जीवनशैली आणि आजकाल प्रामुख्याने घडणारे अपघात यामुळे पक्षाघाताचा धोका वाढलेला आहे. ही कारणे टाळण्याचा पूर्णतः प्रयत्न करणे ही आजच्या काळाची गरज आहे. 
. पक्षाघात झाल्याबरोबर काय करावे ?
 यासाठी पक्षाघाताची लक्षणे सामान्य व्यक्तीलाही माहित हवीत. यासाठी  'रिमेंबर रेकग्नाईज अँड ऍक्ट फास्ट 'हे वाक्य नेहमी लक्षातअसावे .
F- face- रुग्णाला हसण्यास सांगावे. जर ओठांची एक बाजू खाली झुकत असेल, 
A- Arm-  दोन्ही हात वर करताना निरिक्षण करावे. कोणताही एक हात आपोआप खाली येत असेल,
 S - Speech- एकाएकी बोलण्यात फरक पडला असेल ,
T- Time- म्हणजे  वरिल लक्षणे दिसल्यास, एक क्षणही वाया घालवू नये. पक्षाघाताच्या चिकित्सेत प्रत्येक सेकंदाला महत्त्व आहे. चिकित्सेला जितका उशीर तितकी परिस्थिती गंभीर आणि आटोक्याबाहेर जाते. म्हणून पक्षाघाताच्या रुग्णाला ताबडतोब आयसीयु मधे हलविणे हा योग्य निर्णय असतो. 
  'रिकॉम्बिनंट टिशू प्लासमिनोजिन ऍक्टिव्हेटर' हे औषध मेंदूतील रक्ताच्या गुठळीला विरघळवून टाकते. फक्त हे औषध पहिल्या चार ते पाच तासातच द्यावे लागते. हे अत्यंत प्रभावी औषध असून रुग्ण पूर्णतः बरा होतो.पण त्यासाठी वेळ फार महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने अनेक रुग्ण वेळेत पोहोचू शकत नाही व या उपचारापासून वंचित रहातात.  तरीसुद्धा सुरुवातीचे 12 ते 24 तास हे गोल्डन अवर्स मानले जातात. या कालावधीत योग्य चिकित्सा झाली तर रुग्ण पूर्णतः बरा होतो. 
        पक्षाघाताची चिकित्सा तीन टप्प्यांमध्ये केली जाते. 
. आत्ययिक चिकित्सा 
२.  रुग्णाचे पुनर्वसन 
३. अपुनर्भव चिकित्सा. 
          दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची ठरते. रुग्णाचे पुनर्वसन  कसे करावे हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात वेळेवर दिलेल्या योग्य चिकित्सेवर पुनर्वसन अवलंबून असते. हा कालावधी कितीही लांबू शकतो. किंबहुना रुग्णाच्या मृत्यूपर्यंत तो अस्तित्वात असतो. हा सगळ्यात आव्हानात्मक असा कालावधी आहे. 
       या काळात  युक्तीव्यपाश्रय, सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा एकाच वेळी पद्धतशीर करावी लागते. किंबहुना सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा जितक्या क्षमतेने केली जाईल, तितक्याच क्षमतेने रुग्ण औषधे व फिजिओथेरपी ला प्रतिसाद देतो असा माझा अनुभव आहे.
        मोटर नाडीसंस्था व सेन्सरी नाडी संस्था या दोन्हींवरही पक्षाघाताचा कमी जास्त परिणाम झाल्यामुळे रुग्ण खचतो, निराश होतो व त्याची वृत्ती नकारात्मक होते.त्यामुळे चिकित्सेला प्रतिसाद देण्याइतके मनोबल रुग्णात शिल्लक रहात नाही. 
      बाह्य स्नेहन, स्वेदन, नस्य, शिरोधारा, मात्राबस्ती या उपक्रमामुळे रुग्ण शरीराच्या मांसधातू व वातनाड्यांना बल तर मिळतेच त्याबरोबरच मनोबलही उंचावते कारण पंचकर्म उपक्रमामुळे वैद्य व रुग्णाचा प्रत्यक्ष व स्पर्शाद्वारे संपर्क होतो, संवाद होतो - जी अत्यंत महत्त्वाची कृती आहे .
       पण रुग्णात सुधारणा होण्याची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होत असते अशावेळी रुग्णाचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, रुग्णाचा उत्साह वाढवणे, सकारात्मकता  कायम ठेवणे....ही जबाबदारी कुटुंबातील सदस्यांवर येऊन पडते. ही जबाबदारी फार मोठी आणि  गरजेची आहे . 
     पण बरेचदा असे दिसते की रुग्ण आजारामुळे कंटाळला असतो, परावलंबित्वामुळे असहाय्य असतो आणि कुटुंबावर आपला भार होतो आहे या जाणिवेने कुढत असतो. अशात कुटुंबियांची होणारी चिडचिड, वैताग, रस्सीखेच, वैफल्य....या सगळ्या भावना बरेचदा रुग्णाच्या उपेक्षेत , अवहेलनेत ,कटू शब्द बोलण्यात व्यक्त होतात.आणि परिस्थिती अधिकच चिघळत जाते.आणि विश्वास बसणार नाही, पण अशावेळी नात्यांच्या बंधनांपेक्षा,  'यातून सुटका ' ..ही भावना रुग्णाच्या आणि कुटुंबियांच्या मनात वरचढ ठरते... हे कटू सत्य मी अनेकदा डॉक्टर या भूमिकेतून अनुभवले आहे जे फार विदारक आहे.
     यासाठी कुटुंबाचेही समुपदेशन करणे अत्यावश्यक ठरते.रुग्णाच्या मनाची उभारी टिकवून ठेवणे, आजारातून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती जागृत करणे, अवतीभवती आनंदी वातावरण कायम ठेवणे, लहानसहान घरगुती कामांची जबाबदारी देणे, ऑनलाईन कामे करवून घेणे - अशा वागण्याने रुग्णाचे मन गुंतून राहते.वाचनाची आवड असल्यास प्रेरणादायी पुस्तके वाचायला देणे,घरी लहान मुले असल्यास त्यांचा अभ्यास घेण्यास सांगणे, संगीत, टीव्ही यात मन रमविणे - यामुळे रुग्णाचा उत्साह वाढतो , सकारात्मकता वाढते व कुटुंबाला उपयोगी पडल्याने समाधान वाटते. कोणतेही रचनात्मक काम रोज केले तर मेंदूला सकारात्मक संदेश जातात आणि मेंदू उपचाराला प्रतिसाद देऊ लागतो.अपंग शरीर पेशींना पुर्ववत करण्याची मेंदूला सतत आज्ञा देणे ही वृत्ती औषधोपचारापेक्षाही प्रभावी ठरते .मनाची शक्ती ही शरीरावर राज्य करीत असते त्यामुळे मानसिक स्तरावर जो रुग्ण स्थिर असतो तो या आजारातून नक्कीच बाहेर पडण्यास यशस्वी ठरतो.फक्त हे मानसोपचार प्रत्येक रुग्ण आणि कुटूंबानुसार भिन्न असतात.व ते कुटुंबातील सदस्यच करु शकतात.
    त्यानंतर महत्त्वाची चिकित्सा म्हणजे आत्मबळ वाढविणे. हे आत्मबळ दैवव्यपाश्रय चिकित्सेने वाढविण्यास मदत होते. आपल्या आराध्य देवतेची उपासना, नामस्मरण,जप, स्तोत्रपठन केल्यामुळे शांती, समाधान , श्रद्धा या वृत्ती वृद्धिंगत होतात. त्यामुळे शरीरातील 'सेल्फ हीलिंग' म्हणजेच 'स्व उपचार' प्रक्रिया कार्यान्वित होते. जपामुळे बोटांचा व्यायाम तर स्तोत्राने स्पीच थेरपी हा दुहेरी फायदा होतो.
      पुनर्वसनासाठी मानसिक आणि आत्मिक शक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. रुग्णाला एकटेपणा, निराशा, हतबलता यातून बाहेर काढणे हे  मानसोपचारतज्ज्ञापेक्षाही कुटुंबावर सर्वस्वी अवलंबून आहे.  औषधोपचार, फीजियोथेरपी याबरोबरच जेव्हा रुग्णाच्या 'प्रसन्न आत्मेंद्रिय मनः' याकडे चिकित्सा  उपक्रम म्हणून अंमलात आणले जाते त्यावेळी रुग्णाची प्रतिसादक्षमता अनेक पटीने वाढते हा माझा अनुभव आहे. 
    पक्षाघाताच्या दुसऱ्या टप्प्यात शरीर,मन व आत्मा सुदृढ करण्यासाठी आपल्या शास्त्रात प्रभावी उपाय आहे हे खात्रीने आपण सांगू शकतो. सत्वावजय व दैवव्यपाश्रय चिकित्सा यांचे सुद्धा एक वेळापत्रक तयार करून वेळोवेळी त्यात बदल करावे म्हणजे रुग्णालाही त्यांचे महत्त्व जाणवते.आपल्या शास्त्रातील चिकित्सा  लोकप्रिय, मौल्यवान, महत्वपूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. पक्षाघाताच नव्हे तर अनेक आजारांवर  त्रिविध चिकित्सा आपणच प्रचलित करायला हवी.

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी
प्रोफेसर, काय चिकित्सा
आर.टी.आयुर्वेद महाविद्यालय, अकोला.
9422939510
#पक्षाघात
#पक्षाघातपुनर्वसन
#आयुर्वेदपक्षाघातपुनर्वसन

Sunday, October 31, 2021

पोषणावर बोलू काही

आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने......



   दरवर्षी दिवाळी आपल्याला तिमिराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देत असते. नेहमीप्रमाणे आपणही दिवे, आकाशकंदील, पणत्या लावून प्रकाशाचा उत्सव साजरा करतो .वास्तविक मनातील अज्ञानाचा अंधःकार ज्ञानाच्या प्रकाशानं उजळणं... ही खरी दिवाळी. एरवीचं ठीक आहे पण यंदाच्या दिवाळीला कोरोना ची पार्श्वभूमी आहे. 'आरोग्य' हे गृहीत धरून बेभानपणे वागणाऱ्या समाजाला कोरोनाने  'जोर का झटका' दिला आहे. त्यामुळे या दिवाळीत मौजमजे  बरोबर चिंतनही करणं गरजेचं आहे.

      धनत्रयोदशीला भगवान  श्री धन्वंतरी जयंती असते. याच दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' साजरा केला जातो. यंदाचं हे सहावं वर्ष आहे. आणि या वर्षीची संकल्पना आहे- 'आयुर्वेद फॉर पोषण'. धन्वंतरी देवतेचं पूजन करतांना आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजावून घेणं आणि ती आचरणात आणणं हा उद्देश प्रत्येकाच्या मनात असावा अशी अपेक्षा आहे.अत्यंत समर्पक आणि समयोचित अशी ही संकल्पना आहे.

       शरीराचं पोषण उत्तम असेल तर आजार होणार नाहीत. आणि झालेच तर ते लवकर बरे होतील, हा आधीच माहीत असलेला धडा- कोरोनानं  क्रूर पद्धतीनं आपल्याला शिकवलेला आहे. त्यामुळे योग्य पोषण ही काळाची गरज आहे. 'पोषण आणि आयुर्वेद'- या संकल्पनेला समजून घेताना, 'शरीर पोषण' म्हणजे देह, इंद्रिये ,मन आणि आत्मा यांचे पोषण हे स्पष्ट आहे. त्यामुळे फक्त देह पोषणाचा विचार हा आयुर्वेदानुसार मर्यादित विचार आहे.

     आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरांचा आणि आहाराचा पुरातन काळापासूनचा इतिहास बघितला तर त्यांचा पाया हा  आयुर्वेदावर आधारित आहे हे लक्षात येतं. आजवर आपल्या देह, इंद्रिय, मन, आत्म्याचं पोषण हे संस्कृती, परंपरा, कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, सणवार, प्रचलित आहार द्रव्ये, आणि भोजन व्यवस्था यामुळे झालेलं आहे. आजही आपल्या दैनंदिन जगण्याची प्रक्रिया बरीचशी आयुर्वेद शास्त्रानुसार आहे. पण ती जाणीवपूर्वक नाही तर अंगवळणी पडल्यामुळे आहे. पण आज   विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे , चंगळवाद, हॉटेल संस्कृती मुळे आयुर्वेद आधारित जीवनशैली मागे पडू लागली आहे. त्याचे परिणामही आपण भोगतो आहोतच. मधुमेह ,हृदयविकार, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, संधिवात,पीसीओएस.. इत्यादी आजार घरोघरी मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजून घेणं अगत्याचं आहे.

         खरं तर हा विषय फार व्यापक आहे . आहारासंबंधी विस्तृत विवेचन शास्त्रामध्ये केलेलं आहे .दोन प्रकारचं आपल्याला यात मार्गदर्शन मिळतं. आहार द्रव्यांचे गुणधर्म  आणि आहार कशा पद्धतीने घ्यावा याचे नियम. आहार सेवनाचे नियम जरी आपण काटेकोरपणे पाळले तरी उत्तम पोषणाचा मार्ग सुकर होत असतो. त्यामुळे प्रथम नियमांचा विचार करू. 

    'यत् पिंडी तत् ब्रम्हांडी'- हा पहिला नियम. निसर्गाचं घड्याळ हे कायम अचूकपणे चालत असतं. त्यानुसार शरीरातलं जैविक घड्याळ ही फिरत असतं. या दोन्ही घड्याळांची लय सारखी ठेवली की आपोआप शरीरातील संप्रेरकं योग्य वेळी पाझरू लागतात. उत्सर्जन- विसर्जन क्रिया योग्य वेळी  होतात. सूर्योदयाच्या वेळी उठणं आणि सूर्यास्तानंतर लगेच भोजन करून लवकर झोपणं - ही खरी आदर्श पद्धत. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य याचं पालन करावं हल्ली असं वागणाऱ्यांची- 'बुरसटलेले' म्हणून  खिल्ली उडवली जाते.मात्र हेच अक्षय कुमारने सांगितलं की पटतं.

      दुसरा अत्यंत साधा पण तेवढाच कठीण नियम म्हणजे भूक लागली असतानाच खाणं. पशु पक्षी आणि लहान बाळं  हा नियम पाळतात पण आपलं काय?? केव्हाही आणि काहीही खाण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. पथ्य (हितकर) आणि अपथ्य (अहितकर) एकत्र करून खाणे म्हणजे - 'समशन'. भोजन झाल्यावरही  खाणे म्हणजे -'अध्यशन'. भोजनाची वेळ नसतानाही भोजन करणे म्हणजे - 'विषमाशन'. विरुद्ध  गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे- 

 'विरुद्धाशन'. समशन, अध्यशन, विषमाशन आणि विरुद्धाशन- ही अनेक व्याधींना निर्माण  करणारी कारणं आहेत. या चुका   अनेकदा कळत नकळत आपण करतोच. ही कारणं जर आपण विचारपूर्वक टाळली तर बऱ्याच आजारांना अटकाव होऊ शकतो.

     तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे पोटभरून ,तडस लागेपर्यंत जेवू नये. जेवणानंतर जर सुस्ती, जडपणा, दम लागणे- ही लक्षणं निर्माण होत असतील तर आपलं जेवण प्रमाणापेक्षा जास्त झालं आहे हे समजावं. प्रत्येकाला आपल्या पोटाचा अंदाज असतो. आपल्या पोटाचे आपण चार भाग करावे. दोन भाग- घन आहार, एक भाग- द्रवपदार्थ आणि एक भाग वायूच्या संचारासाठी मोकळा ठेवावा असं शास्त्र सांगतं. 'सावकाश जेवा'- असं म्हणण्याची आपली परंपरा आहे. 'सावकाश' म्हणजे स+अधिक अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी .सावकाश याचा अर्थ -पोकळी सह. म्हणजे पाहुणचार करतानाही आयुर्वेदाचा नियम पाळण्याची परंपरा आहे. पण आपण 'सावकाश' चा अर्थ आपल्या सोयीने घेतला आहे.

       चौथा अगदी साधा नियम म्हणजे- तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं. शरीराला गरज असेल त्यावेळी शरीर पाणी मागतं. हल्ली तासातासाला पाणी पिण्याचं प्रमाण फार वाढलं आहे, ज्यामुळे हे अतिरिक्त पाणी शरीराबाहेर काढताना अवयवांवर ताण वाढून ते कमकुवत होऊ लागतात.

    आतापर्यंत सांगितलेले चार नियम हे सामान्य नियम आहेत जे सगळ्यांनीच आचरणात आणणं आवश्यक आहे. पाचवा नियम हा व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे आजच्या भाषेत तो 'पर्सनल डायट प्लॅन' आहे. याला आहारविधि विशेषायतन  म्हणतात. हे आठ प्रकारचे आहेत. 'प्रकृती'- म्हणजे आहार द्रव्यांचे गुणधर्म . 'करण'- म्हणजे द्रव्यावर होणाऱ्या  प्रक्रिया.  'संयोग'- म्हणजे पदार्थात योग्य द्रव्यांचं मिश्रण. 'राशी'- म्हणजे भोजनातील प्रत्येक पदार्थांची मात्रा. 'देश'- म्हणजे आहारद्रव्यांचं उत्पत्ती स्थान. 'काल'- म्हणजे भोजनाचा योग्य काळ.'उपयोग संस्था'- म्हणजे भोजनाचा अपेक्षित परिणाम बघणे. 'उपयुक्तता'-

 म्हणजे भोजन घेणार्‍या व्यक्तीची प्रकृती. अत्यंत सूक्ष्म विचार करून हे अष्ट आहारविधी विशेषायतन ठरविले आहे. आहाराबद्दलचा पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तिचं आहार नियोजन केल्यास व्याधीप्रतिकारक क्षमतेचा स्तर निश्चितच  उंचावेल.

          आहार सेवनाचे महत्त्वाचे नियम बघितल्यावर, 'काय खायचं?' हा विषय ओघानेच येतो,जो शास्त्रात अत्यंत विस्तृतपणे मांडला आहे. आहार द्रव्यांचं 12 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. 'शुकधान्य', 'शिंबी धान्य', 'मांसवर्ग', 'शाकवर्ग', 'हरितवर्ग', 'मद्यवर्ग', 'अंबुवर्ग', 'फलवर्ग','दुग्धवर्ग, 'ईक्षुवर्ग', 'कृतान्नवर्ग आणि 'आहार योग्य वर्ग'- अशा स्वरूपात, प्रत्येक वर्गात असणाऱ्या समस्त द्रव्यांचे गुणधर्म शास्त्रात लिहून ठेवले आहेत. या प्रत्येक वर्गावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. उदाहरणादाखल शुकधान्य म्हणजे- गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राळ, निवार, वरई, शामाक....., इत्यादी. यापैकी बाजरी नंतरची शूकधान्ये ही अनेक व्याधीं मध्ये परिणामकारक आहेत.व्याधीनाशनासाठी त्यांचे अनेक उपयोग लिहून ठेवले आहेत. या अनेक धान्यांची नावं ही आपल्याला माहीत नाही. वापरणं तर दूरच. पण संशोधनाअंती हे स्पष्ट झालंय की, ही धान्ये 'मिलेट्स' या वर्गातली  असून त्यात भरपूर चोथा आहे. ती वर्षानुवर्ष साठवता येतात. आणि गहू तांदळा प्रमाणेच त्यात पोषणमूल्ये आहेत पण ती वजन वाढवत नाही व पचायला हलकी आहेत.ही धान्ये मधुमेह,लठ्ठपणा यावर वापरावीत असं आयुर्वेदानं हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवलंय आणि आजचं संशोधनही तेच सांगतं आहे.विस्मृतीत गेलेल्या  या शूकधान्यांची लागवड, उत्पादन करून ती बाजारात लोकप्रिय करणं - हा विचार करणं आज गरजेचं आहे.

     आज जग जवळ आल्यामुळे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाणं हे 'प्रतिष्ठेचं'मानलं जातं.वास्तविक  हे पदार्थ 'संयोगविरुद्ध,' आणि  'देशविरुद्ध' असतात.   आयुर्वेदातील आहार द्रव्यांच्या संपत्तीला आणि पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लाह्या, सातू ,हळीव,राजगिरा,मुरमुरे फुटाणे,शिंगाडे... इत्यादी स्वस्त पण उच्च पोषणमूल्ये असणाऱ्या पदार्थांना आपण अडगळीत टाकलं आहे. त्याऐवजी ओट्स,केलॉग्ज,आॕलिव्ह आॕईल अशी बरीचशी पाहुणेमंडळी स्वयंपाकघरात विराजमान झाली आहेत.

     देहाच्या पोषणा बद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. मनाच्या पोषणासाठी योगसाधना अत्यंत परिणामकारक आहे. आयुर्वेदात देहाच्या रसायना बरोबर सुदृढ मनासाठी 'आचार रसायन'-  (कोड ऑफ कण्डक्ट) ही सांगितलं आहे. 'सत्वावजय चिकित्सा'- हा मनाच्या पोषणाचा एक उपचार असून त्यामध्ये रोग्याला त्याच्या व्याधि नुसार काय योग्य अयोग्य आहे  हे सांगितलं जातं.

    इंद्रियांच्या पोषणाचा आज विचार केला तर सध्या त्यांचं 'अतिपोषण' होतंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. बाह्य  जग आणि शरीर या मधला दुवा म्हणजे ज्ञानेन्द्रिये असतात .आपण ज्या काही चुका करतो, त्या चुका सर्वप्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांना झेलाव्या लागतात. आज दहा महिन्याच्या बाळाला ही जेवू घालताना व्हिडिओ दाखविण्याची महाभयंकर चूक आम्ही सर्रास करतो आहे. इंद्रियांचं योग्य पोषण केलं पाहिजे- हा विचार ही आज पचणारा नाही इतके आम्ही भरकटलेले आहोत.

     मन आणि इंद्रिये यांचं योग्य पोषण करण्यास जर आम्ही असमर्थ असू तर आत्म्याच्या पोषणा बद्दल काय बोलावं? आत्मपोषणासाठी सगळ्या बाह्य प्रवृत्ती  आत खेचून घ्याव्या लागतात. निदान रोज दहा मिनिटे  शांत बसून आपल्या आत डोकावून बघावं आणि आपलाच आतला आवाज ऐकावा. कुणी सांगावं, एखाद्या दिवशी आपल्या 'या' आवाजाची ओढ आपल्याला लागेल आणि आत्म्याच्या पोषणाची ही सुरुवात होईल.

    धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने, आयुर्वेद दिनाच्या मुहूर्तावर आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर - आपण डोळसपणे आयुर्वेद आणि पोषणाचा विचार करूया आणि ते आचरणात आणू या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ साधना कुळकर्णी,अकोला.

#आयुर्वेदफॉरपोषण

#आयुर्वेददिन

#आहारविधीविशेषायतन

Sunday, April 25, 2021

मनाचा आहार' - आयुर्वेदाची अभिनव संकल्पना

 ' मनाचा आहार' - आयुर्वेदाची    अभिनव संकल्पना 


देहाच्या आहाराबद्दल आपण फार जागरूक असतो. रोज सकाळी उठून न्याहारी , दोन्ही वेळच्या जेवणाचं पद्धतशीर नियोजन आपण करतो. भोजनातल्या पदार्थांमधे  वैविध्य, चव, स्वाद कसा निर्माण होईल याची आपण दक्षता  घेतो. काही आजार झाल्यास लगेच खाण्या-पिण्यात बदल करतो. अपचन झाल्यास हलके भोजन, सर्दी खोकला झाल्यास आंबट,थंड वर्ज्य करतो. डायबिटीस असल्यास शुगर फ्री भोजन..... हे सगळं आपण निगुतीने करतो. पण मग आपल्या शरीरात सर्वशक्तिमान आणि अत्यंत क्रियाशील असणारं जे मन आहे त्याच्यासाठी आपण काय करतो??

    या मनाचा आहार आहे 'विचार' आणि 'भावना' . मग या विचार आणि भावनांचं प्रमाण आमच्या मनासाठी किती असावं, हे आपण कधी ठरवतो का???

   वाटेल तसे भावनांचे चढ-उतार आपल्या मनासाठी किती घातक आहे याचा विचार आपण करतो का ??

  'आज मी  चांगलेच विचार आणि सद्भावना हाच मनाचा आहार घेणार'- असं कधी ठरवतो का??

उपवासाच्या दिवशी कितीही  आवडता पदार्थ समोर आला तरी तो नाकारण्याचा निग्रह आपल्यात असतो. तसंच नकारात्मक विचार आणि वाईट भावना आपण कितीदा ठरवून आणि निग्रहाने नाकारतो?? आपण मनाला  कायम गृहीत धरलेलं असतं. या मनाला आयुर्वेदशास्त्रात 'सत्व' असंही म्हटलं आहे. शास्त्रानुसार 'प्रवर सत्व' , 'मध्यम सत्व' आणि 'अवर सत्व' हे मनाचे व्यवहारातले तीन प्रकार आहेत. शास्त्रामध्ये, रुग्ण  तपासणीसाठी आला की त्याची 'सत्वपरीक्षा' सुरुवातीलाच करण्याचे निर्देश दिले आहेत कारण त्यामुळे उपचार करण्याची दिशा आधीच निश्चित होते.

 प्रवर सत्व म्हणजे 

कोणत्याही परिस्थितीत संतुलित आणि स्थिर व्यक्तिमत्व असणारे,आजार व्यवस्थित समजून घेऊन उपचारांना पूर्ण सहकार्य करणारे,आजाराचा मनावर कोणताही वाईट परिणाम होऊ न देणारे आणि  सकारात्मकता आणि तीव्र इच्छाशक्ती असणारे असतात.

    मध्यम सत्व म्हणजे एरवी स्थिर आणि संतुलित ,पण प्रतिकूल परिस्थितीत अवसान गळणारे,आजाराची सतत चिंता करणारे पण योग्य उपचार घेणारे , आजाराला मनात ठेवून गोंजारणारे,  सकारात्मकता आणि इच्छाशक्ती साठी एखाद्या सपोर्ट सिस्टीम वर अवलंबून असणारे असतात . 

     अवर सत्व म्हणजे 

नेहमीच अस्थिर आणि शंकेखोर व्यक्तिमत्व ,आजार आहे त्यापेक्षा अधिक गंभीर  भासवणारे,कायम आजाराचे रडगाणे गात राहणे व उपचारांवर अविश्वास दाखवणारे, नकारात्मक प्रवृत्ती आणि इच्छाशक्तीचा अभाव असणारे असतात .

   आता यापैकी आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचं परिक्षण करणं ही पहिली पायरी. कुटुंबातील प्रत्येकाचं सत्व एकदा समजलं की त्यानुसार विचारांचा आणि भावनांचा आहार ठरवायचा.

 प्रवर सत्वाचे रुग्ण जीवघेण्या आजारातूनही सहज बरे होतात.पण  कधीकधी अति आत्मविश्वासामुळे.....'मला काहीही होणार नाही'...अशी बेफिकिरी त्यांच्यात असते.अशावेळी त्यांना  तर्कशुद्ध विचारांचा आहार  योग्य मात्रेत देणं गरजेचं असतं.

 मध्यम सत्वाच्या रुग्णांना मनोबल टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.त्यांच्या आहारातून भीतीची भावना वर्ज्य करुन सकारात्मक विचार अधिक मात्रेत दिले तर मध्यम सत्वाच्या व्यक्ती  यशस्वी होतात. पण देहाचा आजार त्यांच्या मनात ठाण मांडून बसला असतो त्यामुळे आजाराचा एकही विचार आहारात नसणे- ही खबरदारी घेणं हे गरजेचं असतं.

 हीन सत्वाच्या रुग्णांना बरे होण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात- त्यांना स्वतःलाही आणि डॉक्टरांनाही. देह निरोगी असला तरी त्यांचं मन आजारीच असतं. त्यांची नकारात्मक वृत्ती ही व्याधीमुक्ती मधला महत्वाचा अडथळा असतो.त्यामुळे सकारात्मक,आश्वासक विचार, आणि सुरक्षित भावना यांचा  रतीबच त्यांच्या आहारात ठेवावा लागतो.

    व्याधी निर्माण होण्याचं पहिलं सामान्य कारण 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' यावर मागील लेखात आपण चर्चा केली आहे- जी इंद्रियांशी संबंधित आहे. आता शास्त्रात सांगितलेलं, दुसरं सामान्य कारण म्हणजे 'प्रज्ञापराध'. आता प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान अधिक शहाणपणा.( इंटेलिजन्स आणि  अंडरस्टँडिंग). ही प्रज्ञा ज्यावेळी बिघडते , त्यावेळी व्याधी निर्माण होण्याची दाट शक्‍यता असते.  आता हा प्रज्ञापराध नेमका कसा होतो???

   तर मनाच्या तीन वृत्ती असतात. 'धी', 'धृति' आणि 'स्मृती' .या तीन वृत्तींच्या योग्य समन्वयाने मन काम करीत असतं. 

 'धी' म्हणजे बुद्धी. 'जी निर्णय देते ती बुद्धी'- अशी बुद्धीची व्याख्या आहे. ज्यावेळेस 'धीभ्रंश' होतो त्यावेळी हितकर आणि अहितकर यातला फरक समजत नाही. काय नित्य  (परमनंट) आणि काय अनित्य (टेम्पररी) यातला फरक समजत नाही.आज समाजात कोविडचे नियम न पाळणारे सगळे 'धीभ्रंश झालेले आहेत त्यामुळे संसर्गाचा आलेख उंचावतोय.

 'धृती' म्हणजे धैर्य. 'धृतिभ्रंश' म्हणजे धीर सुटणं किंवा मनावर नियंत्रण न राहणं.आज कोविडमधून बरे होत असणाऱ्या रुग्णांचीही अचानक मृत्यू ची बातमी येते.हे सगळे 'धृतिभ्रंशाचे' रुग्ण असतात.

   'स्मृति' म्हणजे स्मरण किंवा अनुभव. स्मृतिभ्रंश म्हणजे ज्या उपयुक्त स्मरणीय बाबी आहेत त्या वेळेवर न आठवणं..  आज कोविडच्या बातम्या वाचताना,ऐकताना केवळ दुर्घटना लक्षात ठेवणं आणि रुग्ण बरे होण्याचा दर,लसीकरणाचे फायदे,ई. विसरणारे ८० टक्के लोक आहेत.अशांची मानसिक खंबीरता कमी होऊन ते सहजतेने कोणत्याही आजाराला बळी पडतात.अशा प्रकारे 'धीधृतीस्मृतिभ्रंश' झालेल्या समाजात व्याधि निर्मिती होणं अटळ असतं. त्यामुळे आज मनाचं आरोग्य व्यवस्थित राखणं ही पहिली प्राथमिकता आहे .आपलं स्वतःचं आणि  आपल्या कुटुंबीयांचं सत्व परीक्षण केल्यास नेमकी सुधारणा कुठे आणि कशी करायची आहे याची दिशा स्पष्ट होते. तसंच धी, धृती, स्मृती या मनाच्या वृत्ति उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी, मनाच्या आहारावर नियंत्रण, उत्तम विचारांचा स्वीकार, संयमित भावना.... असा रोज मनासाठी मेनू ठरवणं आवश्यक आहे.  तर्कशुद्ध विचार आणि  सद्भावनांच्या आहारासाठी प्रार्थना ,योग,प्राणायाम,ध्यान जप,छंद,संगीत ,वाचन,सत्संग अशा कितीतरी पाककृती भारतीय संस्कृतीत आहेत ज्यामुळे मनाला संतुलित विचार ,भावनांचा आहार मिळतो . आपल्या  संस्कृतीतच सुदृढ आणि निरोगी मनाचं संवर्धन होण्याची व्यवस्था  आहे.येवढंच काय,आपल्या कुटुंबव्यवस्थेतील दैनंदिन आचरण देखिल मनासाठी कमालीचं  पोषक आहे . 

आणखी महत्वाचं म्हणजे ,आपलं मन दोन पद्धतीनं काम करतं.पहिलं म्हणजे इंद्रियांशी संलग्न  होऊन काम करणं.त्यामुळे आपल्याला वातावरणातील शब्द ,स्पर्श ,रुप,रस,गंधाचं ज्ञान  होतं.आता  इथे आपण चूक अशी करतो की इंद्रियांच्या आहारी जाऊन त्या मनाला कायम इंद्रियांसोबत गुंतवून ठेवतो.इंद्रियांवर तर अतिरेक होतोच परिणामी मनावरही नको तो आहार थोपविला जातो. 

मनाची काम करण्याची दुसरी पद्धत ही की मन जेव्हा  इंद्रियांपासून मुक्त असतं   त्यावेळी ते अत्यंत पद्धतशीर वागतं.चिन्त्य,विचार्य,ऊह्य,ध्येय आणि संकल्प या पायऱ्यांद्वारे मन निर्णयापर्यंत पोचत असतं.

चिन्त्य  म्हणजे विचारांची योग्य/अयोग्यता ठरविणे.विचार्य म्हणजे  तर्कानुसार त्या विचारांमुळे होणारी लाभ/हानी ठरविणे.ऊह्य म्हणजे उहापोह करुन शक्यतांचा विचार करणे.ध्येय म्हणजे गुण दोषांचा विचार करुन कोणती शक्यता ग्राह्य आहे हे ठरविणे आणि  संकल्प म्हणजे निर्णयाप्रत जाणे.इतकं सुसंगत असं आपल्या मनाचं साॕफ्टवेअर आहे.....अट हीच की ते इंद्रियांपासून मुक्त असावं.हे असं इंद्रिय निरपेक्ष मन अंगिकारणं व्यावहारिक दृष्ट्या कठीण असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही.हा सवयीचा आणि अभ्यासाचा भाग आहे.या अभ्यासामुळे मन स्थिर,शांत  आणि सशक्त होतं.

पण आपल्याला आपल्याच अंतरंगात असणाऱ्या संपत्तीचं भानच नसतं. आपण  मनाला देतो कधी मुक्ती? उलट आज आम्ही आमच्या  मनाला विकृत विचारांचा आणि बटबटीत भावनांचा अति प्रमाणात आहार देऊन अजीर्णाची स्थिती निर्माण केलीय. त्यामुळे या कोविड महामारीत तर आपल्या विचार आणि भावनांना अक्षरशः चाळणी (फिल्टर्स) या लावायची वेळ आलीय. कोविडबाधितांची आकडेवारी रोज जाहीर होत असते.त्यावरून सांख्यिकीय निष्कर्ष काढले जातात. पण कोविडग्रस्त मनांची आकडेवारी कोण काढणार? कोविडबाधित मनाला कोणती टेस्ट लावणार? आजमितीला कोविडबाधित मनांची संख्या ही कोविड रुग्णांपेक्षा कितीतरी जास्त आहे,जे खरोखरच भयावह आहे. त्यामुळे आपल्या मनाला योग्य आहार देऊन त्याची शक्ती ,क्षमता वाढवणं  आणि योगसाधना, ध्यान, स्वसंवाद याद्वारे मनाला इंद्रियांपासून रोज अलग करण्याची जास्तीत जास्त सवय लावणं हे ही लसीकरणा इतकंच प्रभावी आहे यात शंकाच नाही.


#प्रज्ञापराध

#धीधृतिस्मृति

#धीधृतिस्मृतिभ्रंश

#प्रवरमध्यमअवरसत्व

#चिन्त्यविचार्यऊह्यध्येयसंकल्प

     

      

Sunday, April 18, 2021

आयुर्वेदातील अभिनव आहार संकल्पना

 आयुर्वेदातील  अभिनव  -   

       आहार संकल्पना

आज संपूर्ण जग कोविडच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी धडपड करीत आहे. आज आपलं आरोग्य ही आपली सर्वोच्च प्राथमिकता झाली आहे. इतकी वर्ष ...ज्या आरोग्याला गृहीत धरून, आम्ही वाटेल तसं स्वच्छंदी वागत होतो.... तेच आम्ही, आता या आरोग्याला जपण्यासाठी काहीही करायला तयार आहोत. हल्ली माझ्या दवाखान्यात कोणत्याही रुग्णाचा हमखास एक प्रश्न असतो,

" मॅडम आहार कसा असावा जेणेकरून आम्हाला कोणतेही आजार  होणार नाहीत?" सोशल मिडीयाद्वारे इम्युनिटी किंवा व्याधी प्रतिकारक्षमता अबाधित ठेवणाऱ्या वेगवेगळ्या आहार/ डाएट च्या माहितीचा  दररोज रतीब असतो.' हाय प्रोटीन', 'लो कार्ब', ' फायबर रिच' , 'शुगर फ्री', क्रॕश डाएट.....असे वेगवेगळे डाएट्स आपल्याला तंदुरुस्त ठेवण्याची हमी देत असतात .पण  काटेकोर आहार आणि नियमित व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे का???

याशिवाय कितीतरी अशा गोष्टी आहेत,ज्यांचा आपल्या आरोग्यावर साधक-बाधक परिणाम  होत असतो . इथे आपल्याला मदत करतं ते आयुर्वेदशास्त्र. कारण आयुर्वेद हा व्याधींचा नाही तर आयुष्याचा वेद आहे .

    मुळात आहार संकल्पना - ही 'भोजन' या क्रियेशीच संबंधित आहे हा आपल्या  सगळ्यांचा गैरसमज आहे. आयुर्वेदाच्या आहार संकल्पनेचा विचार केला तर आपला  आजवर किती संकुचित विचारांचा दृष्टिकोन  होता हे स्पष्ट होईल. 

शरीराचं पोषण, वाढ करणारा - -तो आहार. ही आहाराची साधी ,सोपी व्याख्या.  बाह्य सृष्टीतून शरीर पोषणासाठी ,शरीराच्या आत जे जे काही आहरण केलं जातं ते म्हणजे आहार---ही आहाराची शास्त्रीय व्याख्या .

आता आयुर्वेदानुसार 'शरीर' म्हणजे काय?

 देह, इंद्रिये, मन व आत्मा यांचा समुदाय म्हणजे शरीर.

 देहाचा आहार म्हणजे अन्न पाणी आणि हवा.

 इंद्रियांचा  म्हणजेच कान, त्वचा, डोळे, जीभ, आणि नाक यांचा आहार  (विषय / अर्थ/ senses). म्हणजेच - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध.

 मनाचा आहार -विचार आणि भावना.

 आत्म्याचा आहार- करुणा आणि सहसंवेदना.(compassion ).

आता आजवर, आहार म्हणजे केवळ  भोजन ही समजूत किती एकांगी आणि चुकीची  आहे हे स्पष्ट व्हायला हरकत नसावी .  या सर्वांगीण आहाराचा - अर्थातच देह,इंद्रिये ,मन आणि  आत्मा यांच्या योग्य आणि संतुलित आहाराचा आरोग्याशी अत्यंत जवळचा संबंध  आहे.आम्ही फक्त आणि फक्त भोजनाला आरोग्याशी जोडतो आणि 'चांगलंचुंगलं' खाऊनही आजार का होतात यावरुन डाॕक्टरांशी वाद घालतो. 

या लेखात आपण इंद्रियांच्या आहाराविषयी चर्चा करणार आहोत . इंद्रियांद्वारे आपण वेगवेगळी  माहिती मेंदूत साठवत असतो पण हाच इंद्रियांचा आहार आहे याबद्दल आपण पूर्णपणे  अनभिज्ञ असतो. माणसाचा जन्म होता क्षणी बाह्य वातावरणाशी त्याचा संबंध येतो - तो त्वचेच्या माध्यमातून. म्हणजेच स्पर्शनेन्द्रिय. त्यानंतर लगेच जिभेचं- रसनेन्द्रियाचं काम सुरू होतं.  मूल मोठं होतं जातं तसतसे  डोळे आणि कान सक्रीय  होऊ लागतात .म्हणजे त्या लहान बाळाच्या प्रत्यक्ष भोजनापेक्षा (दुध)  इंद्रियांच्या आहाराचं प्रमाण बरंच जास्त असतं. बाह्य वातावरणाचा जास्तीत जास्त परिणाम किंवा दुष्परिणाम होणारे शरीर घटक कोणते तर ती इंद्रिये आहेत. अविरतपणे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हा आहार आपली इंद्रिये ग्रहण करीत असतात. अगदी झोपेत सुद्धा ही इंद्रियबुद्धी जागृत असते. 

    देहाचा आहार म्हणजे हवा, पाणी, अन्न हा मर्यादित प्रमाणात असतो. श्वासाद्वारे हवेचं ग्रहण निरंतर असलं तरी ते नियंत्रित स्वरुपात असतं पण इंद्रियांचा आहार हा अनियंत्रित आणि  अमर्यादित असतो. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात इंद्रियांचं आयुष्य कमी असतं. इतर शरीर घटकांच्या तुलनेत इंद्रिये ही लवकर कमकुवत होतात. म्हणूनच उपनिषदात, वेदात "जीवेत शरदः शतम्" असं म्हटल्यानंतर,

" पश्येम शरदः शतम्  

श्रुणुयाम शरदः शतम् "

अशी प्रार्थना केलेली आहे. यातूनच इंद्रियांची योग्य जपणूक व्हावी हे अधोरेखित होतं.      भोजन घेतल्यानंतर त्यावर जाठराग्नी चे सोपस्कार होऊन पचन होत असतं ,जे आपल्याला समजतही नाही.  पण इंद्रियांद्वारे जाणता-अजाणता, आवश्यक- अनावश्यक, चांगली- वाईट, उपयुक्त -घातक अशी माहिती सतत ग्रहण केली जात असते. हल्लीच्या काळात तर या इंद्रियांचे विषय अक्षरशः शरीरावर बदाबदा कोसळत असतात. अशावेळी मन आणि बुद्धीचे त्यावर योग्य सोपस्कार आणि संस्कार  झाले नाहीत तर परिस्थिती गंभीर व्हायला वेळ लागत नाही. आपण स्वतः याबाबतीत जाणीवपूर्वक काही करतो का? अजिबात नाही. उलट लहान बाळांना-  ज्यांचं मन म्हणजे  ओल्या मातीचा गोळा असतो आणि ज्यांची बुद्धी  अद्याप प्रगत झाली नसते - - अशा बाळांना त्यांच्या  सहाव्या, सातव्या महिन्यापासून टीव्ही, व्हिडिओ दाखवायला सुरुवात करतो. बाळही ते बघताना रमून जातं आणि त्याची त्याला चटक लागते. आणि आमचं बाळ आत्तापासून कसं 'टेक्नो ' आहे हे भूषण आम्हाला वाटतं. स्वतःवर   आपण नियंत्रण ठेवतच नाही आणि कहर म्हणजे लहान बाळांना ही त्याची सवय लावतो.

    पूर्वीच्या काळी दृक्श्राव्य माध्यमं अस्तित्वात नव्हती आणि माणसाचं जगणं हे नैसर्गिक असल्याने इंद्रिये आपोआपच नियंत्रणात होती. पण आज परिस्थिती बदलली आहे .माध्यम आणि तंत्रज्ञानाचा गुलाम असल्याप्रमाणे आज आपण बुद्धी गहाण ठेवून वागतो आहोत. पण इंद्रियांच्या या अतिवापराने नेमकं घडतं काय???

 आयुर्वेदात व्याधी निर्मितीची अगदी प्राथमिक आणि सामान्य कारणं सांगताना ,अगदी पहिलं कारण सांगितलं आहे ते म्हणजे 'असात्म्यइंद्रियार्थसंयोग '. म्हणजेच - - -

असात्म्य- म्हणजे न पटणारं, सहन न होणारं, विकृत, सवय नसणारं

 इंद्रियार्थ - म्हणजे इंद्रियांच्या जाणिवा (senses) म्हणजेच शब्द ,स्पर्श, रूप, रस, गंध. आणि संयोग म्हणजे या अनावश्यक घातक विषयांचा इंद्रियांशी सतत येणारा संबंध . घातक, विकृत, अनैसर्गिक विषयांचा  इंद्रियांशी सतत संयोग होत असेल तर व्याधि निर्मितीचं ते अत्यंत महत्त्वाचं कारण असतं. आयुर्वेद शिकताना दुसऱ्याच वर्षी हा संदर्भ आमच्या समोर येतो.  विद्यार्थीदशेत गंमत वाटायची की आजारी पडण्यासाठी अशी  सुद्धा कारणं असू शकतात? पण आज   जेव्हा उत्तम संतुलित भोजन, नियमित व्यायाम आणि सगळ्या तपासण्यांमध्ये 'क्लिनचीट' मिळालेल्या व्यक्तीही आजारी पडताना दिसतात तेव्हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' खुणावू लागतो. कारण इंद्रियांच्या आहाराचं आपण कधीच नियोजन केलं नसतं आणि तो ग्रहण करताना आपल्याला नीरक्षीरविवेकही नसतो .आज जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोविड महामारीला प्रतिकार करताना नेमका हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग'  कसा आणि किती कारणीभूत ठरतो आहे हे लक्षात आलंच असेल. शरीराला व्याधींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाक, त्वचा आणि जिभेचा आपापल्या विषयांशी/ अर्थांंशी अकारण,अवाजवी,  अजाणता संयोग व्हायला नको ही कोविडने जगभराला शिकवण दिली जी आयुर्वेदशास्त्रात पाच हजार वर्षांपूर्वी ग्रंथात लिहून ठेवली आहे. तसंच कानाने व डोळ्याने अनावश्यक ,अतिरंजित ,असत्य आणि अति प्रमाणात माहिती ऐकणं, वाचणं, ती दुसऱ्याला सांगणं हे मानसिक आजाराचं प्राथमिक कारण आहे. आज कान आणि डोळ्यांवर अतिरेकी माहितीचा ताण आल्यामुळे नैराश्यात जाणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढते आहे ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं किती भयावह आहे. जे उपाय अत्यंत साधे, सोपे, आपल्या आवाक्यातले आणि निःशुल्क आहेत ते पाळण्याचंही भान आपल्याला राहिलेलं नाही. 

रोज आपण डोळ्यांनी आणि कानांनी किती अनावश्यक आणि घातक माहिती मेंदूत साठवत असतो याचा हिशोब करण्याची  वेळ आता आलीय.रोजच्या जेवणाचा मेन्यू जसा ठरवला जातो तसंच काय आणि किती बघायचं,ऐकायचं हे ठरवणं आपल्याच हातात आहे.या मेन्यूत सकारात्मक, ज्ञानवर्धक,आनंददायक माहितीचीच निवड केली तर त्या आहारानं नक्कीच शरीराचं पोषण होईल.

जिव्हालौल्य तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय.कोविडमुळे बाहेरच्या खाण्यापिण्यावर बंधन  आलंय ही तर इष्टापत्तीच आहे.जिभेचे चोचले आणि गरज यातला फरक समजून रिजनल,सीझनल,आणि ओरिजीनल खाद्यपदार्थ खाण्याची सवय नक्कीच आरोग्यपूर्ण ठरेल यात शंका नाही.

कृत्रिम गंध जितके टाळता येतील तेवढं उत्तम .डिओ, रुम फ्रेशनर्स,उदबत्या,कॉस्मेटिक्स इ.पासून दूरच राहणं योग्य.तसंही मास्क हा एक उत्तम पर्याय आहेच.

जिथे गरज नाही तिथे स्पर्श करायचा नाही हे ही कोविडनंच शिकवलंय आणि ही सवय नेहमीच असावी.तसंही ऊठसूठ 'शेकहँड ' आणि 'हग' करण्याची आपली संस्कृती नाहीच.

थोडक्यात काय,इंद्रियांचा योग्य 'उपयोग' करावा.'उपभोगासाठी' त्यांचा 'वापर' होऊ नये - इतकं सोपं पण तितकंच अवघड तत्त्व आहे हे.

     आपल्या प्राचीन परंतु समृद्ध अशा आयुर्वेद शास्त्राने दिलेले इशारे अप्रगत, अवैज्ञानिक, जुनेपुराणे ठरवून तंत्रज्ञानाच्या आहारी जाणं कितपत संयुक्तिक आहे याचा आता तरी गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे. आज कोविडमुळे आधुनिक वैद्यकीय शास्त्रालाही कोडी पडली आहेत.अनेक घटनांचा कार्यकारणभाव वैज्ञानिक कसोट्यांवर बसवता येत नाहीय.अशावेळी विज्ञानाच्या पलिकडचं सत्य आयुर्वेदाच्या मदतीनं नक्कीच गवसू शकतं. आयुर्वेदात अनेक अमूल्य असे सिद्धांत आहेत ज्यामुळे समाज निरोगी होऊ शकतो. पण प्रश्न विश्वासाचा आहे ,प्रश्न समाज मान्यतेचा आहे , प्रश्न नीरक्षीर विवेकाचा आहे.

इंद्रियांच्या अतिरेकी आहाराचं नियोजन प्रत्येकानं 'मनन', 'चिंतन', 'आकलन' आणि 'अवलंबन' या पायऱ्यांनी केलं तर लसीकरणाइतकाच फायदा होईल याची खात्री आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डाॕ साधना कुळकर्णी,अकोला

9422939510

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...