Showing posts with label माझी मायमराठी. Show all posts
Showing posts with label माझी मायमराठी. Show all posts

Sunday, March 2, 2025

अभिजात दर्जा आणि मराठी पाट्या

 आपल्या मराठीच्या अनेक बोलीभाषांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे . प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात तिचं रूप, बाज आणि लय वेगवेगळी असते. दोन वाक्यातच बोलीभाषेचा लहेजा उमजून बोलणा-याचा प्रदेश ओळखता येतो. असं वेगळेपण असलं तरी लिहिताना ‘प्रमाण' मराठी भाषाच वापरली जाते  आता,शुद्ध मराठी लिहिणं आणि बोलणं प्रामुख्याने कुठे आढळतं? उत्तर द्यायची गरजच आहे? प्रमाण किंवा शुद्ध मराठी ही पुण्यातच बोलली जाते - हे 'ब्रम्हवाक्य' आहे नाही का? यावर कुणाचं दुमत आहे का? मग आता ही पाटी  बघा आणि त्यातील शुद्धता तपासा. . 



‘पैसे लागेल कणभर’ हे अचूक आहे का हो? दुसरा फोटो बघा. ‘येतीये मेट्रो तुमच्या भेटीला’. ‘येतीये’ - हे कोणतं क्रियापद आहे हो? 



विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अशी भाषा? पुणेकर खपवून घेतात वाटतं हल्ली. अहो, मराठीला अभिजात दर्जा मिळालाय. जागो. पुणेकर जागो.



     आता एक नामवंत मराठी दैनिकात पहिल्याच पानावरची पूर्ण जाहिरात. फोटो बघा. केसांना ‘बनवाते’ निरोगी. हे म्हणजे हिंदीचं भाषांतर. ‘बनवणे’ या हिंदी क्रियापदानं मराठी माणसाला ‘मामा' बनवलं आहे. आम्ही जेवण बनवतो, घरं बनवतो, शिल्प बनवतो..... असा सगळा ‘उल्लू बनाविंग’ प्रकार. असो. ‘ज्यामुळे तुम्ही दिसाल सुंदर आणि आत्मविश्वासाने भरपूर’.. याचा अर्थ मला कुणी सांगेल काय? शाळेत असतांना निबंधात असल्या चुका झाल्या तर मार्क तर कापले जात, शिवाय चुकलेला शब्द पन्नास वेळी लिहून काढावा लागे. (सुधारणा करून हो.) आता आपल्या मायबोलीची अशी दुर्दशा बघून घशात आवंढा दाटतो हो. चूक भाषा लिहिणाऱ्या या महानुभावांना काहीच शिक्षा नाही?

           बरं. हल्ली तर शुध्द मराठीचा आग्रह धरणाऱ्याची टिंगल केली जाते. ‘भावना पोचणं महत्वाचं. व्याकरण नाही’ - ही आजची टॅग लाईन आहे त्यामुळे Jवण, Cमा, Kले, Aकदम, Pवळा… अशा धेडगुजरी शब्दांना समाजमान्यता मिळाली आहे. आता हीच पाटी बघाना.


हे दुकान पंक्चर दुरुस्तीचं आहे हे समजून घेण्याचा सूज्ञपणा मराठी माणसात आहे म्हणून बरंय. आता पाटी लावण्याचा उद्देश जर पूर्ण होत असेल तर शब्द चूक लिहिले तरी काय हरकत आहे? असा आजकाल प्रतिवाद केला जातो. पण याच पाटीवर त्या अज्ञात लेखकाने ‘संपर्क’ हा शब्द मात्र अचूक लिहिला आहे त्याबद्दल त्याची पाठ थोपटली पाहिजे कारण' रफार' या शत्रूने अनेकांचा 'फार्फार' छळ केलाय. हर्षवर्धन, धैर्यवर्धन, सुदर्शन,अंतर्नाद, निसर्ग इ. रफार असणारी शब्दावली काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट हो.) टाकावी अशी पीडितांनी मागणी केल्याचं मी ऐकलंय. आता ‘आशिर्वाद’ शब्दच बघा ना. किती सकारात्मक, उत्साह वाढवणारा शब्द. पण त्याला चूक लिहिला जाण्याचा शाप आहे. ‘आर्शिवाद’ असं सहजगत्या लिहिलं जातं.जे शापित आयुष्य ‘रफाराला’ तेच नशीब अनुस्वाराचंही आहे. आता हा टॅंकर बघा.

 ‘ज्वलनाचं' धगधगतं स्वरुप 'ज्वलनशील' या शब्दात दडलं आहे.पण 'शिल' लिहिल्यामुळे त्यातली दाहकता थंड पडली आहे .आणि 'अंत्यत' विशेषणामुळे उरल्यासुरल्या दाहकतेनं चक्क शरणागती पत्करली आहे. अनुस्वार नेमका कोणत्या अक्षरावर द्यावा, या गोंधळात अनेक जण असतात. त्यात काही चतुर विद्वान दोन अक्षरांमध्ये त्याला बसवून वाचणा-याच्या कोर्टात बॉल टाकतात. ‘अंतरंग, रंगपंचमी जंगल,’इ. ही कमनशिबी मंडळी आहेत. जी आपल्यासमोर अतंरंग,रगंपचंमी, जगंल या स्वरूपात येतात. '
जोडाक्षरं’ ही तर मराठी लिहिणाऱ्यांच्या कुंडलीतील दुष्टग्रह, पापग्रह आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आता एका प्रसिध्द मंदिरातील हीच पाटी बघा ना. 


वास्तविक मंदिरातील पुजारी मंडळींचं मराठीच नव्हे तर संस्कृत अस्खलित, अचूक सुस्पष्ट असतं पण त्या शाश्वताला ‘श्वाश्वताची’ शिक्षा का दिली हे त्या मंदिरातील देवच जाणे. ‘सद्सद्विवेक’ , ‘दृष्टद्युम्न’, ‘तादात्म्य’, ‘पुनरुज्जीवन’ ई. ‘शब्दोत्तम’ अचूक लिहिणं आणि वाचणं ही स्पर्धा ठेवल्यास त्यात भाग घेणा-यांनाच बक्षीस द्यावं लागेल.( कारण कुणी भाग घेण्याची हिम्मतच करणार नाही.)

       परवा आम्ही  एका खेडेवजा भागात सहलीला गेलो होतो.  पोटपूजा करण्यासाठी प्रचंड संशोधन करून शेवटी एक हॉटेल सापडलं. मेन्यू कार्ड समोर आलेलं बघा आता.

'रसगुल्हा’ हा कोल्ह्याचा भाऊबंद तर नसेल ?या शंकेनं भूक घाबरून पळाली आणि ‘मंच्न्युरियन’ वाचल्यावर तर पोटातल्या कोकलणार्या कावळ्यांचीही बोबडी वळली. ’व्हेज फुलावात’ कोणती फुलं घातली असतील हे तो अन्नदाताच जाणे.

'मनचाह सुप’ वाचून तर माझं 'मन' सुपात पाखडल्यागत वरखाली झालं.'टमोटो' हा 'अजिनोमोटो' हा ग्रामीण अवतार असावा का?                          मराठी लिखाणाची अशी दाणादाण उडवलेत्या पाट्या बघतांना मला अमृत मासिकातील ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ आठवतो. कामाच्या दबावामुळे एका ‘दैनिकाची’ आत्महत्या! (सैनिकाची). ‘सर’ नाही त्याला डर कशाला?  (कर). ‘चरावे’ परी कीर्तिरूपे उरावे (मरावे) ... .... अशा गंमती पूर्वी मुद्रण (अर्थातच टायपिंग/ प्रिंटींग) करतांना होत असत. पूर्वी अगदी अपवादाने घडणारे मुद्राराक्षसाचे विनोद हल्ली सर्रास घडताना दिसतात. किंबहुना मुद्राराक्षसांची संख्या आता वेगानं वाढू लागलीय. इंग्रजी आद्याक्षरं वापरून मराठी लिहिणं ही सध्याची फॅशन असल्याने देवनागरी लिपी लिहिण्याची सवय आता मोडली आहे. कोणतीही भाषा ही बोलण्यापेक्षा लिहिणं कठीण असतं.पण दोष मात्र मराठीला दिला जातो. मुद्राराक्षसांमुळे भाषेत विनोद निर्मिती होते हे एका ठराविक पातळीपर्यंत मान्य आहे.पण उपसंपादकांनी डुलकी घेणं हे मात्र अक्षम्य आहे.’प्रुफ रिडींग’ म्हणजे प्रकाशित करण्याआधी तपासलेलं लिखाण.मग ते पुस्तक असो वा चार शब्दांची पाटी. प्रूफ रिडींग टाळलं की चुकीची भाषा समोर येते.

        नुकताच मराठीत ‘ सलाते सलानाते’ या नावाचा चित्रपट आला आहे. चित्रपटाचा विषय नेमका काय आहे याची मला कल्पना नाही पण त्याचं नाव मात्र आगळंवेगळं आहे.त्या नावानं मला एकदम माझ्या शाळेत मराठीच्या व्याकरणाच्या वर्गात नेऊन बसवलं.’सलाते सलानाते’ हे विभक्ती प्रत्यय असून द्वितीय विभक्तीचे एक व अनेकवचनाचे प्रत्यय आहेत. विभक्ती, समास,कर्तरी - कर्मणी प्रयोग,काळ,नाम…हे व्याकरण शिकताना त्या वयात वैताग येत असे.पण आता लक्षात येतं की व्याकरण हे भाषेचं हार्डवेअर असतं.आणि ते जितकं मजबूत, तितकी भाषा अचूक होते.

       मराठी पाट्या आणि विनोद हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा जरी असला तरी भाषेचं हे विडंबन खेदकारक आहे. त्याहीपेक्षा त्यात सुधारणा न करता ते चालवून घेणं… ही वृत्ती अधिकच गंभीर आहे.वर्षोनवर्षे सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या मराठी पाट्या असणं… हे मराठी भाषेला गौणत्व दिल्यामुळे घडतं.मायबोलीला मनात स्थान नसणं, मराठी म्हणजे ‘लो स्टॅंडर्ड' असा गैरसमज बाळगणं…या वृत्तीमुळे आपणच मराठीचा दर्जा खालावण्यास कारणीभूत आहोत. आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.आपण भाषा प्रेमींनी मराठीचे केवळ गोडवे गाण्यापेक्षा शक्य त्याठिकाणी सुधारणा करणं अपेक्षित आहे आणि  प्रमाण मराठीचा आग्रह बाळगणे अपेक्षित आहे.


#मराठीचीदुदर्शा

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 




९४२२९३९५१०

Monday, October 14, 2024


 

सामान्य माणूस आणि अभिजात मराठी

छोटू -'अभिजात' म्हणजे काय रे भाऊ?'

भाऊ - 'तू असे चुकीचे प्रश्न का विचारतोस मला? अरे, अभिजात नाही ते अभिजीत आहे आणि  ते मुलाचे नाव आहे.'

छोटू - 'अरे, नव्हे . नव्हे. . - अभिजित नव्हे. आपल्या मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' मिळाला आहे. असे मी वाचले. म्हणजे काय रे भाऊ?'

-भाऊ -  'हो. मी पण ते वाचले आहे.  छोटू तुला माहित आहे की  फक्त घरात 'मराठी बोलणे ' येवढाच माझा मराठी भाषेशी संबंध आहे. आणि माझ्यासारखे असे असंख्य मराठी लोक आहेत .ज्यांचा मराठीशी  अजिबात संबंध नाही. त्यामुळे तू सांगतो आहेस तो दर्जा का आणि कशासाठी दिला हे मला ठाऊक नाही.'

छोटू-'असं काय करतोस रे भाऊ? हं. हं. म्हणजे ते बहिणीला 'लाडकी बहीण' म्हणतात, सणासुदीला रेशनच्या धान्याला 'आनंदाचा शिधा' म्हणतात, तसंच आहे का रे भाऊ  ?'

 भाऊ - अरे,  वेगळं आहे हे छोटू . हे बघ  मला या मराठी भाषेत एक पर्सेंट ही इंटरेस्ट नाही. आय लव्ह इंग्लीश. त्यामुळे 'अभिजात दर्जा' असे कठीण शब्दांचे कोडे मला घालू नकोस. बाय द वे, दर्जा म्हणजे लेव्हल ना? मराठी भाषेला बेसिकली दर्जाच नाहीय.'

छोटू- 'तू तर मला बुचकळ्यातच टाकले आहे. मग 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' असे सुरेश भटांनी का म्हटले आहे?'

भाऊ - 'आता कसं सांगू तुला? अरे, असे म्हणण्याची पद्धतच असते. आता तू ते काय आजिबात - सॉरी अभिजात वगैरे म्हणतो आहेस ना, ते फक्त बोलण्यासाठी आणि क्रेडिट घेण्यासाठी असणार आहे.'

छोटू- 'तू मला गोंधळात का टाकतो आहेस भाऊ? मला मराठी विषय खूप आवडतो. मराठी धडे, कविता किती छान असतात. आता अभिजात दर्जा मिळाल्यावर नेमके काय होईल हेच मला कुणी सांगत नाही. हे म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण सारखे आहे का रे भाऊ?'

भाऊ - 'अरे छोटू , माझा आजपर्यंतचा कॉमन सेन्स सांगतो की तुझ्या या मराठी भाषेत काहीही फरक पडणार नाही. जसे औरंगाबाद चे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव ......... यामुळे काही बदलले का? नाही ना? तसेच हे.'

छोटू-’म्हणजे 'अभिजात' ही पदवी का रे भाऊ?

भाऊ - 'तुझ्याच मराठीत बोलतोय ना मी? इंग्लीश मध्ये समजावून सांगू का?

एखाद्या कागदावर  भारतीय शासनाचा शिक्का असला तर ती माहिती ऑथेंटिक  होते  की नाही? तर आता ही  मराठी शासन दरबारी ॲक्सेप्ट झाली आहे. येवढेच तू लक्षात ठेव. बाकी सगळे आहे तसेच राहणार आहे.'

छोटू-’'पण अभिजात म्हणजे ???????’

         यातला विनोदाचा आणि अतिशयोक्ती चा भाग सोडला तर सध्या अशीच परिस्थिती आहे.  जे मराठी भाषाप्रेमी आहेत , त्यांना आनंद तर झालाय पण तो नक्की कशाचा? हेच त्यांना समजत नाहीय. आणि जे मराठी असूनही तिचा तिरस्कार करतात,त्यांना याबद्दल काहीही सोयर सुतक नाही.

           वास्तविक आज प्रश्न हा भाषेचा नसून ती भाषा वापरणाऱ्या जनतेचा आहे. मराठी भाषा 'अभिजात' आहे यावर शिक्कामोर्तब करायला शासनाने अनेक वर्षे घेतली पण भाषाप्रेमींना तिच्या अभिजाततेची प्रचिती येण्यासाठी शासन मान्यतेची गरजच नाही. मराठी भाषेचा हा समृध्द प्रवाह अखंड वाहत राहणे यासाठी मराठी माणसाच्या प्रयत्नांची गरज आहे. असो. पण मराठी च्या हालअपेष्टा निवारण्यासाठी शासनदरबाराने उचललेले - पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे. उलटपक्षी आता मराठी माणसाची जबाबदारी वाढलेली आहे कारण शासनाच्या नावाने बोटे मोडून आता नामानिराळे राहता येणार नाही. 

           आमची पिढी मराठी शाळेतली, मराठी माध्यमातली. मराठी धडे, कविता, गाण्यांवर प्रेम करणारी. 'बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' किंवा ' हा शर गर धर सा पवि सा रवि सा स्मरारि सायक सा। पार्थ भुजांतरि पडला वल्मिका माजी नायक सा'॥ अशा तालबद्ध कविता  म्हणतांना  भान हरपणारी आमची पिढी.  पाढ्यांची तर मजा वेगळीच.  बेंबी च्या देठापासून ओरडून पाढे म्हणायचे. मग दाहोदरसे, पाचोदरसे या संख्या म्हणतांना हसू आवरत नसे.त्यावेळच्या शाळांमधून मराठीचे जे संस्कार झाले, मराठीची जी गोडी लागली ती आजही तितकीच जिवंत आणि टवटवीत आहे. 

       पण मराठी बोलणारी , मराठी माध्यमातली मुले ही गावठी, कनिष्ठ आणि बुजरी असतात हा एक सार्वत्रिक समजही त्यावेळी होत. त्यामुळे हा न्यूनगंड सावली सारखा आमची साथसंगत करायचा.  इंग्रजी माध्यमातील मुले ही हुषार, चटपटीत स्मार्ट असतात हा नियमच होता . शालेय विद्यार्थी असतांना मानगुटी वर बसलेल्या या हीन भावनेने आमचा पिच्छा कधीच सोडला नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागला. 

       मी नागपूर विद्यापीठात 'बी. जे' या कोर्स ला प्रवेश घेतला होता. पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात मराठीत लिहिणारे  दोघेच जण.  त्यामुळे साहाजिकच आमच्याकडे लक्ष देण्याचे प्रयोजनच नव्हते. शिकविणारे सगळे शिक्षक मराठी होते पण ते इंग्रजीतूनच शिकवायचे. मराठी ऐकले की अंगावर पाल पडल्याप्रमाणे प्रतिक्रिया असायची. दर महिन्यात होणारे व्याख्यान  मराठीत असले तर संपूर्ण वर्ग रिकामा होई येवढे   आंग्रजाळलेले वातावरण होते. समाजात वावरतांना भाषेच्या संदर्भात असे घाव किंवा अपमान झेलावे लागतात - तेही आपल्या महाराष्ट्रात - ही भावना विलक्षण बोचरी आणि दुखावणारी  होती. भाषेवरून व्यक्तिची गुणवत्ता जोखण्याचा हा प्रकार खच्चीकरण करणारा होता. इंटर्नल परिक्षेत मास कम्युनिकेशन शिकवणाऱ्या श्री. शरद पाटील सरांनी  माझा पेपर वाचला आणि वर्गात तो दाखवून म्हणाले की मराठीत लिहिलेल्या या  पेपरमधले  विचार आणि स्पष्ट भूमिका मला फार आवडली. त्यादिवशी वर्गातल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी मान वळवून माझ्याकडे पहिल्यांदा बघितले - तेही अविश्वासाने. आपल्या मायबोलीत विचार करून ते स्पष्ट मांडणे ही खरी शहाणीव आहे याची मला त्यावेळी जाणीव झाली. आम्ही मराठीच आहोत पण मराठी माध्यमातून शिकणं??? नो वे. इंग्रजी मधून  एक्स्प्रेस होतांना जे वजन येते त्याची सर मराठीला नाही असे वर्ग मित्रांचे ठाम  मत होते.

             दुर्दैवाने हा समज आजही तसाच आहे. आपले मराठी कलाकार पुरस्कार समारंभात ' आय मीन टू से की मला ही भूमिका जगायला मिळाली' किंवा 'इट वॉज अँन युनिक एक्स्पिरियन्स यू नो? अशी 'वजनदार' सुरुवात करून नंतर मराठीतच बोलतात तेव्हा त्यांच्या लांगूलचालनेची चीड येते. प्रतिष्ठित , प्रस्थापित व्यक्तींनी इंग्रजीतच बोलायला हवे किंवा इंग्रजीत बोलणारा व्यासंगी आणि बुद्धिमान असतो ही डोळ्यांवर आणि मनावर लावलेली झापडे मराठी माणूस कधी काढणार? त्यामुळेच मराठी शाळांचे महत्व कमी होऊन इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे . माझ्या दोन्ही मुलांना मी मराठी माध्यमातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी मला वेड्यात काढले. सुरुवातीला मुलांनीही मला दोष दिला पण आज मराठी आणि इंग्रजी साहित्य तेवढ्याच आवडीने ते वाचतात .अचूक इंग्रजी लिहितात. बोलतात.इंग्रजी, मराठीतली प्रसिध्द पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत.  इंग्रजी माध्यमातील मुलांना इंग्रजीही थातुरमातुर येते व मराठीला ते तुच्छ समजतात ही वस्तुस्थिती आहे.

         मराठीची अशी दुर्दशा करण्यात महत्वाचा हात समाज माध्यमांवरिल संदेशांचा. J1 zale ka ? अशी मराठी आणि इंग्रजी भाषेची  लक्तरे बघतांना जीव तुटतो. जाहिरातींमधले, बातम्यांमधले मराठी ऐकतांना अंगावर काटा येतो. भक्ती बर्वे  मुलाखतीत म्हणाल्या होत्या , की दूरदर्शनवर बातम्या देण्यापूर्वी रोज अचूक शब्दोच्चारांचा कसून सराव होत असे. श आणि ष मधला फरक ,  'र्‍हस्व दीर्घ -हे 'उच्चारांवरून ऐकणा-याला समजले पाहिजे हा कटाक्ष होता. आज तर सगळाच आनंदी - आनंद आहे. ' भावना पोचवणे - (याला सुद्धा भा. पो. म्हणायचं ) - हे महत्वाचे. भाषा नाही - हा आजचा परवलीचा मंत्र आहे.

         मराठी माणूसच मराठी भाषेच्या अधोगतीला जबाबदार आहे. मराठी घरात  पाळलेल्या कुत्र्याशी इंग्रजीतूनच का बोलले जाते? इंग्रजी माध्यमातील पाल्यांवर मराठी व इंग्रजीचे धेडगुजरी संस्कार करण्यात काय शहाणपण आहे? सही ही इंग्रजीतूनच केली पाहिजे का? घराचा पत्ता इंग्रजीत लिहिल्या शिवाय समजत नाही का?   कोणताही अर्ज  हा इंग्रजीतच लिहिला पाहिजे का?  माध्यमांवर व्यक्त होतांना अधून मधून इंग्रजी शब्द (आपले साधेच हो - यू नो , ॲक्च्युअली , इव्हेन्च्युअली वगैरे वगैरे ) पेरल्या शिवाय कर्तृत्वाची उंची वाढत नाही का? चांगले मराठी शब्द वापरणाऱ्या व्यक्तिची चेष्टा का केली जाते?  कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील अमिताभ बच्चनचे अस्खलित आणि समृद्ध हिंदी ऐकतांना त्याची चेष्टा केली जाते का? आशुतोष राणा, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी यांचे शुध्द हिंदी कानाला किती गोड वाटते. मग मराठीचीच मानहानी का? - ते ही मराठी माणसाकडूनच? 

             याचे एकच उत्तर मला दिसते, ते म्हणजे न्यूनगंड, इतर भाषांचे लांगूलचालन , स्वतंत्र विचार न करता इतर भाषांची नक्कल आणि गुलामी पत्करण्याची वृत्ती - ही वैशिष्ठ्ये मराठी मनाच्या रक्तात भिनली आहेत हे दुर्दैवाने मान्य करावे लागेल. त्याचवेळी दुसरे टोक म्हणजे मराठीचा आत्यंतिक अभिमान, मराठी हेच विश्व, मराठी हीच उत्कृष्ठ ,असे समजणाराही एक समुदाय आहे.हे आपल्या कूपमंडूक वृत्तीवरच खूष असतात.मग यांचे हसे होते आणि निष्कारण भाषेला दोष दिला जातो.

                दैनंदिन जगण्यातून सामान्य मराठी माणसाला कसे अनुभव येतात हे मी मांडले आहे.  अभिजात दर्जामुळे मराठी साहित्यविश्वात, शासन दरबारात, उद्योगधंद्यात, चित्रपटसृष्टीत , विद्यापीठांमध्ये , जागतिक स्तरावर काय बदल घडणे अपेक्षित आहे याचा उहापोह करण्याची माझी बुद्धी नाही. पण कागदपत्र, कायदे करूनही शेवटी सामान्य जनता प्रत्यक्ष कसे आचरण करते यावरच सारे अवलंबून असते. ज्यादिवशी मराठी माणसाला जाहीरपणे मराठी बोलायची लाज वाटू लागली त्या दिवसापासून मराठी माणसाचा कणा नष्ट झाला. आता ही अभिजातता खेचून आणण्याची व टिकवण्याची जबाबदारी जनतेची आहे. शासनाने कुलूप उघडून आपल्या हातात किल्ली दिली आहे. तिचा कसा उपयोग करायचा हे आपणच ठरवायचे आहे.

"पर भाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी.

मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका.

भाषा मरता देशा ही मरतो संस्कृतीचा ही दिवा विझे.

गुलाम भाषिक होऊ नी अपुल्या प्रगतीचे शीर कापू नका."

कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील एक कडवे आहे. मराठी माणसाची नस ओळखून त्यांनी ह्या ओळी रचल्या असाव्यात. ही संपूर्ण कविता राज्याच्या मंत्रालयात दर्शनी भागी लावली होती.ती पूर्ण वाचणा-याचा ही सत्कार व्हावा अशी आज परिस्थिती आहे. पण घटस्थापनेच्या शुभदिवशी अभिजात दर्जाची पहिली माळ लागली आहे. यातून नक्कीच अभिजाततेचे सोने लुटले जाईल अशी आशा करू या.

#अभिजातमराठी

#मायमराठी

Friday, October 30, 2020

 माझ्या  मराठीची दुर्दशा...की दुदर्शा की र्दुदशा???

अनेक बारक्या गल्ल्या, अवघड वळणं,डोक्यात जाणारा ट्रॕफिक पार करत शेवटी एकदाचं हवं ते दुकान सापडलं.आणि दुकान सापडल्याच्या आनंदाच्या फुग्याला लगोलग टाचणी पण लागली.  'आर्शिवाद ग्राफिक्स'- हे पाटीवरचं नाव  वाचूनच डोकं फिरलं.  'आशिर्वाद' ला 'आर्शिवाद' लिहिणाऱ्या दुकानात कसल्या ग्राफिक्स ची अपेक्षा करणार? आणि हो - 'ग्राफिक्स' हा इंग्रजी शब्द मात्र अचूक लिहिला होता पाटीवर. दुकानात शिरल्यावर मी टोकलंच त्या मालकाला.

' हो मॅडम.लिहिताना  चूक झाली, हे पाटी लावल्यावर लक्षात आलं. नंतर दुरुस्त करतो करतो म्हणतोय पण कामं इतकी असतात ना............'

       ही खरी माझी डोकेदुखी. लिहीतांना चूक होणं समजू शकते मी. पण ती चूक - पदरी पडलं पवित्र झालं -च्या चालीवर स्वीकारणं - हे मला पटूच शकत नाही.

  ' लिहिल्या गेलं 'आर्शिवाद'.वाचताना 'आशिर्वाद' वाचा की.एवढं  काय  बिघडलं ?'- - -ही जी बेफिकिर वृत्ती असते ना-ती माझ्या  डोक्यात  जाते .

 तसंही रफार आणि अनुस्वार या मंडळींचं नशीबच फुटकं. (आता रफार आणि अनुस्वार म्हणजे काय हे कृपया विचारु नका हो)बिचारे  नेहमीच वेटिंग लिस्टमध्ये असतात. लिहिणारा आपल्या सोयीनुसार, ज्ञानानुसार त्यांना शब्दावर कुठेतरी बसवून मोकळा होतो - मग हर्षवर्धन चं हषर्वर्धन झालं काय किंवा आनंदमंगलचं आनदंमगंल झालं तरी कुणाला फारसा फरक पडत नाही.

   ज्या शाळेत उत्कृष्ट मराठी शिक्षक आहेत अशा मराठी शाळेत माझं शिक्षण झालंय. आजच्या पिढीला हे वाचून मी पुराणवस्तु संग्रहालयातली वाटू शकेन कदाचित. आमच्या मराठीच्या बाई शुद्धलेखन आणि व्याकरण याबद्दल विलक्षण आग्रही होत्या.( हे शुद्धलेखन आणि व्याकरण म्हणजे काय रे भाऊ?- - हो. हा प्रश्न अपेक्षितच आहे मला)

 ह्रस्व, दीर्घ, स्वल्पविराम पूर्णविराम, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, या विभूतींना आमच्या डोक्याच्या  हार्डवेअर मध्ये योग्य रीतीने फिट्ट करण्याचं चोख काम आमच्या बाईंनी प्रामाणिकपणे  केलं. आता या ह्रस्वदीर्घादि विभूतींची नावं ऐकून आजच्या पिढीला हडप्पा-मोहंजोदारो उत्खननातून या वस्तू  सापडल्या असाव्यात असा समज होणं सहज शक्य आहे. आणि हो. काना- मात्रा मधील 'काना'ला 'कान्हा' असंही लिहिलं जातं या ज्ञानाची प्राप्ती मला नुकतीच झाली आहे बरं का.

     एकदा निबंधात हस्तांदोलन च्या ऐवजी हंस्तादोलन - असं मी लिहिलं होतं तेव्हा बाईंनी तो शब्द पन्नास वेळा अचूक लिहिण्याची शिक्षा मला दिली होती.(अशा अनेक शिक्षा त्या कोवळ्या वयात  आम्ही  निमूटपणे भोगल्या आहेत - त्याही पालकांना न समजता)  बरं फक्त लिहिणंच नाही तर उच्चार कसे असावेत यावरही बाईंचं लक्ष असायचं .धडा वाचतांना मी 'भारतात' हा शब्द 'भार्तात' असा वाचता क्षणी बाईंनी डोक्यावर टपली हाणली. 

 'अगं तो काय 'सर्वात', 'मार्गात', 'वर्गात' असा शब्द आहे का? शारदेला शार्दा म्हणशील का?'   

 भाषेच्या लेखना वाचनाचे असे संस्कार झाल्यामुळे कुठेही जरा चूक दिसली की डोकं फिरतंच. माझं शास्त्र जेव्हा 'आर्यूवेद' असं लिहिल्या जातं तेव्हा मस्तकात तिडीक  जातेच. पण हल्ली असल्या चुकांना महत्त्व दिल्या जात नाही किंबहुना त्या चुकाच नाहीत असंही काहींचं म्हणणं आहे. 'भावना पोचणं महत्त्वाचं - -व्याकरण नाही '- ही हल्लीची टॅगलाईन मी काही पचवू शकत नाही .बेफिकीरपणे वाटेल तिथे अनुस्वार आणि रफार देणाऱ्यांची मला खरोखर चीड येते. ज्या शब्दांमध्ये अनुस्वार आणि रफार दोन्ही आहेत ,अशा शब्दांबद्दल मला खूप सहानुभूती वाटते .अंतर्नाद, अंतर्मन, अंतर्यामी ,अंतर्बाह्य अशा शब्दांना विचारा एकदा - त्यांचे कसे हाल केले जातात ते....... 

  'संकर्षण', 'धैर्यवर्धन' अशी नावं असणाऱ्या व्यक्तींना विचारा त्यांच्या व्यथा ..........

 प्रंचड, गुतांगुंत ,वारवांर, ससंर्ग, विर्सजन अशा स्वरूपात येणारे हे नेहमीचे शब्द वाचताना हल्ली सवय करावी लागतेय कारण कोणाला त्याबद्दल फारसं गांभिर्य नसतं. आणि हे मी सध्या फक्त रफार आणि अनुस्वार याबद्दलच लिहिते आहे. बाकी शुद्धलेखना बद्दल लिहायचं तर  ह्रस्वदीर्घादि प्रत्येक  मंडळींवर आणि प्रत्येक  विरामचिन्हावर ( हे आणखी काय  नवीन ?) एक स्वतंत्र लेख होईल .

    बरेचदा असे चुकीचे शब्द वाचताना माझं मनोरंजनही झालेलं आहे .जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण  कंपाउंडवर जवळजवळ  पन्नास वेळा  लिहिलेलं 'छोटं कुंटुब सुखी कुंटुब' वाचताना --काहीही न खटकणाऱ्या  मंडळींजवळ सुखी माणसाचा सदरा आहे याचा हेवाही वाटला आहे.

हलकंफुलकं आणि  हलकफुलक व मोकळंढाकळं आणि मोकळढाकळ यातला नेमका फरक समजणाऱ्यांशी माझी नाळ जुळायला (माझीतरी) हरकत नाही.

    शेवटी मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि माझी मातृभाषा म्हटलं की प्रेम आलंच .प्रेम म्हटलं की  जबाबदारी आलीच. त्यामुळे कुठेही चूक दिसली तर शक्यतो ती दुरुस्त करण्याचा,टोकण्याचा, निषेध नोंदण्याचा प्रयत्न करणं हा माझा खाक्या असतो. तुम्ही काय म्हणाल याबद्दल????#मराठी#शुद्धलेखन#रफार#अनुस्वार#व्याकरण#

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...