"आई एक नाव असतं.
घरातल्या घरात,एक गजबजलेलं गाव असतं."फ.मु.शिंदेंच्या या दोन ओळीतच आख्खी "आई" सामावली आहे-
तुमची ,माझी,सगळ्यांचीच.
आयुष्यभर अनेक निरर्थक गोष्टींच्या मागे पळताना आईप्रती साधी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आम्हाला भासत नाही इतकं त्या माऊलीला गृहीत धरल्या जातं.
मला मिळालीय संधी.....
तिच्या वाढदिवसाची........
बघतेय,आभाळभर भावना चिमूटभर शब्दात मांडता येतात का????
"अगं, लवकर इकडे ये"..... आईची भल्या सकाळी आलेली हाक ऐकून मी ताड्कन उठून बसले. क्षणभर छातीत धस्स झालं. धावत जाऊन बघितलं तर आई खिडकीसमोर उभी.
"अगं बघ. सूर्योदय किती छान दिसतोय. तो लालभडक गोळा हळूहळू वर येतोय ना,ते बघतांना माझी नजर हटतच नाहीये "- - तिचा उत्तेजित आणि आनंदित स्वर .
"आई काय हे? पहिल्यांदा बघतोय का आपण सूर्योदय ?" - - झोप मोडल्यामुळे माझा चिडका आणि रागीट स्वर. आणि मी तणतणत परत पलंगावर.
रोजचा सूर्योदय,सूर्यास्त, रोज झाडावर येणारे पक्षी, रोज फुलणारी फुलं- - ही नक्कीच ऊर्जा देणारी आणि सकारात्मकता जोपासणारी निसर्गाची रूपं असली तरी त्यांना बघून लहान मुलांसारखं उत्तेजित होणं आणि त्याहीपुढे जाऊन फोनवर त्याचं वर्णन दुसऱ्याला ऐकवणं - ही वृत्ती नेमकी कोणत्या वयात असावी?
विश्वास बसणार नाही पण नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माझ्या आईत हे एक लहान आनंदी मूल कायम बागडत असतं.
आणि तिच्यातल्या त्या लहान बालकाच्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी आम्ही तिघीही "पोक्त" वयाच्या तिच्या मुली अगदी सज्ज असतो.
पण तिनं असं कधीच केलं नाही.
आमच्या लहानपणी सगळ्यात मौल्यवान असं तिनं आम्हाला काही दिलं असेल तर ते म्हणजे मोकळे श्वास घेण्याचं स्वातंत्र्य.......
सूचनांचा भडिमार नाही किंवा शिस्तीचा बडगा नाही...
संस्कारांचा जाणीवपूर्वक अतिरेक नाही किंवा उपदेशाचे डोस नाहीत ...
एक बंधनमुक्त बालपण तिनं आम्हाला दिलं.
आजही जगतांना तो मोकळेपणा आम्हाला बळ देतोय .
मी माझ्या मुलांना देऊ शकले असला मोकळा श्वास ???नाहीच बहुतेक .
हात धरून जाणीवपूर्वक तसं तिनं आम्हाला काहीच शिकवलं नाही.
मात्र तिच्या जगण्यातून कितीतरी महत्त्वाचे धडे आम्हाला मिळाले आणि अजूनही मिळताहेत .पण नेहमीप्रमाणे "आई "जशी गृहीत धरली जाते तसे कितीतरी धडे हे गृहीतच धरले गेले.......
काही धडे मनापासून अभ्यासले गेले ......
काही धडे रक्तात मुरले...... बरेचसे आचरणातही आले .....
"आई "नावाच्या पाठशाळेला कितीतरी काळ गंभीरपणे घेतलंच नाही कधी.
हल्ली तर.........
" आई तुला कसं काहीच समजत नाही???"....
असं म्हणून तिचीच शाळा आम्ही सगळेच घेत असतो. ती सुद्धा शहाण्या विद्यार्थ्याप्रमाणे आमचं ज्ञानामृत शांतपणे पचवते.
१९३१चा तिचा जन्म. छिंदवाडा गावातलं लहानपण, लग्नानंतरचं मॕट्रिक ते पीएचडी पर्यंत शिक्षण ,एकत्र कुटुंब , सोवळंओवळं,प्राध्यापिकेची नोकरी ,आम्हा तिघींची शिक्षणं, तिघींची लग्नं,बाबांचं दीर्घ आजारपण,नातवंडं, त्यांची लग्नं,नागपूरहून पुण्याला आणि पुण्याहून नाशिकला स्थलांतर आणि आताचं हे तंत्र युगातलं यांत्रिक जगणं..........ही सगळी स्थित्यंतरं, सुखदुःखाचे चढउतार अनुभवून,सोसून,पचवून तिच्यातलं ते आनंदाचं झाड अजूनही तेवढंच हिरवं आणि टवटवीत कसं आहे हे मला अजूनही उमगलेलं नाही.
अंगभूत शांतता ,आनंदी स्वभाव आणि स्थिरचित्त वृत्ती हे तिचे "इनबिल्ट अॕप्स" मला डाऊनलोड करता आले असते तर????
आई- -आज तुझा एकोणनव्वदावा वाढदिवस .
तुला या वाढदिवसाला काही द्यावं असं माझ्याकडे तरी काहीच नाही.
उलट मीच तुला काहीतरी मागतेय.......
तुझं रक्त तर माझ्या नसानसात आहेच पण.....
तुझ्या शरीरातल्या रक्तासोबत वाहणारा तो निखळ आनंद .....
तो माझ्या नावावर करुन दे ना एकदाचा.
तुझ्या कपाटात,तुझ्या सामानात मी खूप शोधली ती अक्षय आनंदाची कुपी........
सापडली नाही कधीच .
हल्ली मला खूप गरज भासतेय त्या आनंदाच्या कुपीची...
आजकालच्या आयांसारखा आटापिटा कर,काहीही कर पण माझी मागणी पूर्ण करच.
आणि हो. हे करतांना तुझ्यातलं ते हिरवं आनंदाचं झाड असंच बहरलेलं राहू दे.
नेहमीसाठीच.




