Sunday, April 18, 2021

आयुर्वेदातील अभिनव आहार संकल्पना

 आयुर्वेदातील  अभिनव  -   

       आहार संकल्पना

आज संपूर्ण जग कोविडच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी धडपड करीत आहे. आज आपलं आरोग्य ही आपली सर्वोच्च प्राथमिकता झाली आहे. इतकी वर्ष ...ज्या आरोग्याला गृहीत धरून, आम्ही वाटेल तसं स्वच्छंदी वागत होतो.... तेच आम्ही, आता या आरोग्याला जपण्यासाठी काहीही करायला तयार आहोत. हल्ली माझ्या दवाखान्यात कोणत्याही रुग्णाचा हमखास एक प्रश्न असतो,

" मॅडम आहार कसा असावा जेणेकरून आम्हाला कोणतेही आजार  होणार नाहीत?" सोशल मिडीयाद्वारे इम्युनिटी किंवा व्याधी प्रतिकारक्षमता अबाधित ठेवणाऱ्या वेगवेगळ्या आहार/ डाएट च्या माहितीचा  दररोज रतीब असतो.' हाय प्रोटीन', 'लो कार्ब', ' फायबर रिच' , 'शुगर फ्री', क्रॕश डाएट.....असे वेगवेगळे डाएट्स आपल्याला तंदुरुस्त ठेवण्याची हमी देत असतात .पण  काटेकोर आहार आणि नियमित व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे का???

याशिवाय कितीतरी अशा गोष्टी आहेत,ज्यांचा आपल्या आरोग्यावर साधक-बाधक परिणाम  होत असतो . इथे आपल्याला मदत करतं ते आयुर्वेदशास्त्र. कारण आयुर्वेद हा व्याधींचा नाही तर आयुष्याचा वेद आहे .

    मुळात आहार संकल्पना - ही 'भोजन' या क्रियेशीच संबंधित आहे हा आपल्या  सगळ्यांचा गैरसमज आहे. आयुर्वेदाच्या आहार संकल्पनेचा विचार केला तर आपला  आजवर किती संकुचित विचारांचा दृष्टिकोन  होता हे स्पष्ट होईल. 

शरीराचं पोषण, वाढ करणारा - -तो आहार. ही आहाराची साधी ,सोपी व्याख्या.  बाह्य सृष्टीतून शरीर पोषणासाठी ,शरीराच्या आत जे जे काही आहरण केलं जातं ते म्हणजे आहार---ही आहाराची शास्त्रीय व्याख्या .

आता आयुर्वेदानुसार 'शरीर' म्हणजे काय?

 देह, इंद्रिये, मन व आत्मा यांचा समुदाय म्हणजे शरीर.

 देहाचा आहार म्हणजे अन्न पाणी आणि हवा.

 इंद्रियांचा  म्हणजेच कान, त्वचा, डोळे, जीभ, आणि नाक यांचा आहार  (विषय / अर्थ/ senses). म्हणजेच - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध.

 मनाचा आहार -विचार आणि भावना.

 आत्म्याचा आहार- करुणा आणि सहसंवेदना.(compassion ).

आता आजवर, आहार म्हणजे केवळ  भोजन ही समजूत किती एकांगी आणि चुकीची  आहे हे स्पष्ट व्हायला हरकत नसावी .  या सर्वांगीण आहाराचा - अर्थातच देह,इंद्रिये ,मन आणि  आत्मा यांच्या योग्य आणि संतुलित आहाराचा आरोग्याशी अत्यंत जवळचा संबंध  आहे.आम्ही फक्त आणि फक्त भोजनाला आरोग्याशी जोडतो आणि 'चांगलंचुंगलं' खाऊनही आजार का होतात यावरुन डाॕक्टरांशी वाद घालतो. 

या लेखात आपण इंद्रियांच्या आहाराविषयी चर्चा करणार आहोत . इंद्रियांद्वारे आपण वेगवेगळी  माहिती मेंदूत साठवत असतो पण हाच इंद्रियांचा आहार आहे याबद्दल आपण पूर्णपणे  अनभिज्ञ असतो. माणसाचा जन्म होता क्षणी बाह्य वातावरणाशी त्याचा संबंध येतो - तो त्वचेच्या माध्यमातून. म्हणजेच स्पर्शनेन्द्रिय. त्यानंतर लगेच जिभेचं- रसनेन्द्रियाचं काम सुरू होतं.  मूल मोठं होतं जातं तसतसे  डोळे आणि कान सक्रीय  होऊ लागतात .म्हणजे त्या लहान बाळाच्या प्रत्यक्ष भोजनापेक्षा (दुध)  इंद्रियांच्या आहाराचं प्रमाण बरंच जास्त असतं. बाह्य वातावरणाचा जास्तीत जास्त परिणाम किंवा दुष्परिणाम होणारे शरीर घटक कोणते तर ती इंद्रिये आहेत. अविरतपणे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हा आहार आपली इंद्रिये ग्रहण करीत असतात. अगदी झोपेत सुद्धा ही इंद्रियबुद्धी जागृत असते. 

    देहाचा आहार म्हणजे हवा, पाणी, अन्न हा मर्यादित प्रमाणात असतो. श्वासाद्वारे हवेचं ग्रहण निरंतर असलं तरी ते नियंत्रित स्वरुपात असतं पण इंद्रियांचा आहार हा अनियंत्रित आणि  अमर्यादित असतो. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात इंद्रियांचं आयुष्य कमी असतं. इतर शरीर घटकांच्या तुलनेत इंद्रिये ही लवकर कमकुवत होतात. म्हणूनच उपनिषदात, वेदात "जीवेत शरदः शतम्" असं म्हटल्यानंतर,

" पश्येम शरदः शतम्  

श्रुणुयाम शरदः शतम् "

अशी प्रार्थना केलेली आहे. यातूनच इंद्रियांची योग्य जपणूक व्हावी हे अधोरेखित होतं.      भोजन घेतल्यानंतर त्यावर जाठराग्नी चे सोपस्कार होऊन पचन होत असतं ,जे आपल्याला समजतही नाही.  पण इंद्रियांद्वारे जाणता-अजाणता, आवश्यक- अनावश्यक, चांगली- वाईट, उपयुक्त -घातक अशी माहिती सतत ग्रहण केली जात असते. हल्लीच्या काळात तर या इंद्रियांचे विषय अक्षरशः शरीरावर बदाबदा कोसळत असतात. अशावेळी मन आणि बुद्धीचे त्यावर योग्य सोपस्कार आणि संस्कार  झाले नाहीत तर परिस्थिती गंभीर व्हायला वेळ लागत नाही. आपण स्वतः याबाबतीत जाणीवपूर्वक काही करतो का? अजिबात नाही. उलट लहान बाळांना-  ज्यांचं मन म्हणजे  ओल्या मातीचा गोळा असतो आणि ज्यांची बुद्धी  अद्याप प्रगत झाली नसते - - अशा बाळांना त्यांच्या  सहाव्या, सातव्या महिन्यापासून टीव्ही, व्हिडिओ दाखवायला सुरुवात करतो. बाळही ते बघताना रमून जातं आणि त्याची त्याला चटक लागते. आणि आमचं बाळ आत्तापासून कसं 'टेक्नो ' आहे हे भूषण आम्हाला वाटतं. स्वतःवर   आपण नियंत्रण ठेवतच नाही आणि कहर म्हणजे लहान बाळांना ही त्याची सवय लावतो.

    पूर्वीच्या काळी दृक्श्राव्य माध्यमं अस्तित्वात नव्हती आणि माणसाचं जगणं हे नैसर्गिक असल्याने इंद्रिये आपोआपच नियंत्रणात होती. पण आज परिस्थिती बदलली आहे .माध्यम आणि तंत्रज्ञानाचा गुलाम असल्याप्रमाणे आज आपण बुद्धी गहाण ठेवून वागतो आहोत. पण इंद्रियांच्या या अतिवापराने नेमकं घडतं काय???

 आयुर्वेदात व्याधी निर्मितीची अगदी प्राथमिक आणि सामान्य कारणं सांगताना ,अगदी पहिलं कारण सांगितलं आहे ते म्हणजे 'असात्म्यइंद्रियार्थसंयोग '. म्हणजेच - - -

असात्म्य- म्हणजे न पटणारं, सहन न होणारं, विकृत, सवय नसणारं

 इंद्रियार्थ - म्हणजे इंद्रियांच्या जाणिवा (senses) म्हणजेच शब्द ,स्पर्श, रूप, रस, गंध. आणि संयोग म्हणजे या अनावश्यक घातक विषयांचा इंद्रियांशी सतत येणारा संबंध . घातक, विकृत, अनैसर्गिक विषयांचा  इंद्रियांशी सतत संयोग होत असेल तर व्याधि निर्मितीचं ते अत्यंत महत्त्वाचं कारण असतं. आयुर्वेद शिकताना दुसऱ्याच वर्षी हा संदर्भ आमच्या समोर येतो.  विद्यार्थीदशेत गंमत वाटायची की आजारी पडण्यासाठी अशी  सुद्धा कारणं असू शकतात? पण आज   जेव्हा उत्तम संतुलित भोजन, नियमित व्यायाम आणि सगळ्या तपासण्यांमध्ये 'क्लिनचीट' मिळालेल्या व्यक्तीही आजारी पडताना दिसतात तेव्हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' खुणावू लागतो. कारण इंद्रियांच्या आहाराचं आपण कधीच नियोजन केलं नसतं आणि तो ग्रहण करताना आपल्याला नीरक्षीरविवेकही नसतो .आज जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोविड महामारीला प्रतिकार करताना नेमका हा 'असात्म्येंद्रियार्थसंयोग'  कसा आणि किती कारणीभूत ठरतो आहे हे लक्षात आलंच असेल. शरीराला व्याधींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाक, त्वचा आणि जिभेचा आपापल्या विषयांशी/ अर्थांंशी अकारण,अवाजवी,  अजाणता संयोग व्हायला नको ही कोविडने जगभराला शिकवण दिली जी आयुर्वेदशास्त्रात पाच हजार वर्षांपूर्वी ग्रंथात लिहून ठेवली आहे. तसंच कानाने व डोळ्याने अनावश्यक ,अतिरंजित ,असत्य आणि अति प्रमाणात माहिती ऐकणं, वाचणं, ती दुसऱ्याला सांगणं हे मानसिक आजाराचं प्राथमिक कारण आहे. आज कान आणि डोळ्यांवर अतिरेकी माहितीचा ताण आल्यामुळे नैराश्यात जाणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढते आहे ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं किती भयावह आहे. जे उपाय अत्यंत साधे, सोपे, आपल्या आवाक्यातले आणि निःशुल्क आहेत ते पाळण्याचंही भान आपल्याला राहिलेलं नाही. 

रोज आपण डोळ्यांनी आणि कानांनी किती अनावश्यक आणि घातक माहिती मेंदूत साठवत असतो याचा हिशोब करण्याची  वेळ आता आलीय.रोजच्या जेवणाचा मेन्यू जसा ठरवला जातो तसंच काय आणि किती बघायचं,ऐकायचं हे ठरवणं आपल्याच हातात आहे.या मेन्यूत सकारात्मक, ज्ञानवर्धक,आनंददायक माहितीचीच निवड केली तर त्या आहारानं नक्कीच शरीराचं पोषण होईल.

जिव्हालौल्य तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय.कोविडमुळे बाहेरच्या खाण्यापिण्यावर बंधन  आलंय ही तर इष्टापत्तीच आहे.जिभेचे चोचले आणि गरज यातला फरक समजून रिजनल,सीझनल,आणि ओरिजीनल खाद्यपदार्थ खाण्याची सवय नक्कीच आरोग्यपूर्ण ठरेल यात शंका नाही.

कृत्रिम गंध जितके टाळता येतील तेवढं उत्तम .डिओ, रुम फ्रेशनर्स,उदबत्या,कॉस्मेटिक्स इ.पासून दूरच राहणं योग्य.तसंही मास्क हा एक उत्तम पर्याय आहेच.

जिथे गरज नाही तिथे स्पर्श करायचा नाही हे ही कोविडनंच शिकवलंय आणि ही सवय नेहमीच असावी.तसंही ऊठसूठ 'शेकहँड ' आणि 'हग' करण्याची आपली संस्कृती नाहीच.

थोडक्यात काय,इंद्रियांचा योग्य 'उपयोग' करावा.'उपभोगासाठी' त्यांचा 'वापर' होऊ नये - इतकं सोपं पण तितकंच अवघड तत्त्व आहे हे.

     आपल्या प्राचीन परंतु समृद्ध अशा आयुर्वेद शास्त्राने दिलेले इशारे अप्रगत, अवैज्ञानिक, जुनेपुराणे ठरवून तंत्रज्ञानाच्या आहारी जाणं कितपत संयुक्तिक आहे याचा आता तरी गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे. आज कोविडमुळे आधुनिक वैद्यकीय शास्त्रालाही कोडी पडली आहेत.अनेक घटनांचा कार्यकारणभाव वैज्ञानिक कसोट्यांवर बसवता येत नाहीय.अशावेळी विज्ञानाच्या पलिकडचं सत्य आयुर्वेदाच्या मदतीनं नक्कीच गवसू शकतं. आयुर्वेदात अनेक अमूल्य असे सिद्धांत आहेत ज्यामुळे समाज निरोगी होऊ शकतो. पण प्रश्न विश्वासाचा आहे ,प्रश्न समाज मान्यतेचा आहे , प्रश्न नीरक्षीर विवेकाचा आहे.

इंद्रियांच्या अतिरेकी आहाराचं नियोजन प्रत्येकानं 'मनन', 'चिंतन', 'आकलन' आणि 'अवलंबन' या पायऱ्यांनी केलं तर लसीकरणाइतकाच फायदा होईल याची खात्री आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डाॕ साधना कुळकर्णी,अकोला

9422939510

Wednesday, April 14, 2021

 थोडंसं खटकलेलं.......

 मी रोज सकाळी ६ वाजता फिरायला जात असते. माझ्या फिरण्याच्या  रस्त्यावर श्री गजाननमहाराजांचं मंदिर आहे. तिथे दर्शनासाठी मी  हमखास थांबतेच. तिथे ठराविक भक्त मंडळी आरतीसाठी जमली असतात . तीन मध्यमवयीन महिला तिथे न चुकता असतातच. त्यापैकी एक महिला खूप व्यवस्थित तयार झालेली असते.  रोज नवीन साडी, मॅचिंग बांगड्या,मॕचिंग हेअर क्लिप, हलकासा मेकअप. सगळं अगदी नीटनेटकं आणि टापटीप.  ती महिला मारवाडी असावी असं समजून मी तिचं अग्रवाल भाभी हे नावही ठेवलेलं आहे. तिच्या दोघी मैत्रिणी अगदी साध्या असतात.  त्यांची खूप घट्ट मैत्री आहे असा माझा अंदाज आहे कारण   गेल्या वर्षभरापासून मी  रोज त्यांना बघतेय आणि  त्यांचे काही ना काही संवाद कानावर  पडत असतात . मला त्यांच्या मैत्रीचं  खूप अप्रूप वाटतं. दुसरं म्हणजे अग्रवाल भाभींचं प्रचंड कौतुक वाटतं. इतक्या पहाटे इतकं व्यवस्थित तयार होऊन निघणं, सात जन्मातही  माझ्याकडून होणार नाही. किंबहुना अग्रवाल भाभींकडे बघताना मला माझ्या 'अवताराची' प्रकर्षानं जाणीव होते. सकाळी उठल्यावर तोंडावर मारलेलं पाणी, केसांवरून फिरवलेला हात- (कंगवा नाही), आणि समोर दिसणारा कोणताही कुर्ता चढवला की माझी तयारी पूर्ण होते. नाही म्हणायला, अधून मधून, चांगलं तयार होऊन फिरायला जाण्याचे संकल्प असतातही माझे.... पण सकाळी ते रीतसर ढासळतातच. असो. तर रोज भेटूनही, आमची ओळख फक्त 'स्माईल' पर्यंतच होती कारण मी नेहमी घाईत. आणि त्या तिघीजणी मस्त निवांत.

     परवा मात्र अग्रवाल भाभींची  साडी मला फारच आवडली. न राहवून मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटलं ,

  'भाभी मी रोज तुमच्या कडे बघते. खरंच, खूप सुरेख साड्या असतात तुमच्या .आणि तुम्ही किती व्यवस्थित तयार झालेल्या  असता. मस्त वाटतं तुम्हाला बघून.'

     मी बोलत होते आणि माझ्या शब्दागणिक अग्रवाल भाभींचा चेहरा आनंदाने फुलत चालला होता. माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी ओठांची हालचाल केली तोच त्यांच्या दोन मैत्रिणी  हसत हसत म्हणाल्या,

 ' तिला काय काम आहेत घरी? नुसती बसली असते. इकडची काडी तिकडेही करत नाही. सुना आहेत कामं करायला. रात्रीच, उद्याची साडी , बांगड्या, क्लिप, पर्स काढून ठेवते. तुमच्या माझ्यासारखी मरमर कुठे  करावी लागते तिला घरात?'

  माझ्या रोजच्या  अवतारावरून 'मरमर' हा शब्द त्यांना सुचला असणार नक्कीच .असो.पण  त्या बोलत असतांना अग्रवाल भाभींच्या चेहऱ्यावरुन, आनंद अक्षरशः झरझर उतरतांना मी बघितला.

यावर मी फक्त हसले आणि  माझ्या दिशेने चालू लागले . पण  भाभींचा तो उतरलेला चेहेरा माझ्या  डोळ्यासमोरुन जाईना.    मी त्यांना तशी परिचित नव्हते. त्यांच्या  घरगुती बाबींमधे मला काडीचाही रस नव्हता.माझ्या अगदीच वरवरच्या पण अस्सल प्रतिक्रियेवर त्या दोन्ही मैत्रिणींनी फक्त दुजोरा दिला असता तर काय हरकत होती? 

   जवळच्या-मैत्रिणींमध्ये चिडवणं, थट्टा करणं हे अपेक्षित असतं अणि त्या मैत्रिणी गंमतीनंच ते बोलल्या असाव्यात .भाभींनीही ते बोलणं मजेतच घेतलं असणार.

  पण  एखाद्याला सहजपणे ,अगदी चिमूटभर आनंद मिळत असेल तर त्यावर विरजण घातलंच पाहिजे का?असं विरजण घेऊन फिरणार्या भरपूर व्यक्ती आपल्या आसपास असतात मात्र त्याची जाणीव त्यांना स्वतःलाही नसते. आपण करत नसलेली  एखादी  चांगली कृती दुसरा कुणी करत असेल तर त्याचं कौतुक  करण्याची पद्धतच आपल्यात नाही.उलट ती चांगली कृती करण्यासाठी दुसऱ्या कडे कशी अनुकूल परिस्थिती आहे आणि त्याने ती चांगली कृती करणं म्हणजे 'फार काही विशेष नाही'...असं बेधडक म्हणताना आम्ही काहीही विचार करत नाही. 

आम्हा प्राध्यापकांची हल्ली बरीच प्रशिक्षणं होत असतात.त्यात स्वतःचं आणि सहकारी प्राध्यापकांचं मूल्यमापन करण्याचे अनेक प्रसंग येतात.अशावेळी बोलतांना सुरुवातीला सकारात्मकच बाजू मांडायची व नंतर नकारात्मक बाजूचं मूल्यमापन करायचं अशा कडक सूचना आम्हाला असतात.म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल व्यक्त होताना आधी सकारात्मक चष्मा लावण्याचा तो धडा असतो.दुर्दैवानं समाजात तसं घडत नाही आणि  

  त्या दिवशी अग्रवाल भाभींचा उतरलेला चेहेरा बघून मला ही वृत्ती प्रकर्षाने  खटकली , एवढंच.........

Sunday, March 7, 2021

 "बाई रेखाटताना"

आजच्या लोकसत्तेतील,रविवार वृत्तांत मधील हा लेख.

लेखामधील आशय हा सकारात्मक,आशादायक आणि वास्तवाला धरुन असला तरी लेखकानं दाखवलेलं सुखचित्र हे अर्धसत्य आहे हे खेदानं म्हणावसं वाटतं.

कारण हल्ली मराठी /हिंदीत अत्यंत टुकार आणि अर्थहीन मालिकांचा धोधो रतीब सुरु असतो.त्यातली - सणासुदीच्या स्वयंपाकातल्या बासुंदीत मीठाचा पुडा ओतणारी.....,घरातल्या वाढदिवस समारंभात स्वतःच्या आईला कोंडून ठेवणारी......आयसीयू मधे अत्यवस्थ दिराच्या तोंडावरिल आॕक्सिजन मास्क काढून फेकणारी......मित्राच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला चार पायांवर फिरवणारी.....काळ्या रंगाच्या सुनेचा अनन्वित छळ करणारी.......ई.ई. स्त्रियांच्या रेखाटनाबद्दल लेखकानं मौन साधलं आहे.

मुळात घराघरांमधे अशा महाकारस्थानी,भडक,बटबटीत, हिंसक स्रिया असतात का??

मग अशा काल्पनिक,अतिरंजित ,दुष्ट खलनायिकांना प्रचंड फुटेज देऊन लेखक आणि निर्मात्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा असतो??

भरीस भर म्हणजे नायिका ही अत्यंत प्रेमळ आणि कमालीची सोशिक या दोनच गुणांची असते.याव्यतिरिक्त, बुद्धिमत्ता,व्यवहारज्ञान,

तर्कशुद्धता,धडाडी हे गुण तिच्या आसपासही फिरकत नाहीत .

महत्वाचं म्हणजे प्रथितयश कलावंतही या वास्तवापासून दूर जाणाऱ्या भूमिका रंगवतात आणि त्याचं समर्थन करतात.

यावर अनेकदा सुचवलेला उपाय  म्हणजे - - - रिमोट तर आपल्या हातात असतो ना????

पण हा वरवरचा उपाय झाला.

आज समाजातला एक ठराविक स्तर नियमित आणि नाईलाजाने या मालिका बघतो.

केवळ करमणूक यापेक्षाही लॉकडाऊन,वृद्धत्व,अपंगत्व एकाकीपणा,उदासीनता,वेळ जात नाही,करमत नाही.....अशी परिस्थिती अनेक घरांमधे असते .  यासाठी  या मालिका नाईलाजाने सुद्धा बघितल्या जातात.अशावेळी या सामान्य प्रेक्षकांसाठी अभिरुचीपूर्ण,दर्जेदार सकारात्मक सामाजिक संदेश देणारी कलाकृती निर्माण होऊ नये?

निर्माते /लेखक /दिग्दर्शक यांचं वैचारिक , बौद्धिक ,सांस्कृतिक दारिद्रय तर यात दिसतंच पण त्या कल्पनाशून्यतेचा फटका स्त्री प्रतिमांना बसतोय याचा विचार जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं  होईल का?

Sunday, February 28, 2021

 जागतिक महिला दिनाचे वारे सालाबादप्रमाणे यंदाही वाहू लागले आहेत ‌‌.


चावून चावून चोथा झालेल्या विषयांना आता ऊत येईल.

समाजानं, पुरुषानं, स्त्रीनं, परंपरेनं, धर्मानं स्त्रीवर केलेल्या अन्यायी कथांच्या शिळ्या कढीला भरभरून ऊत येईल.

भाषणं,सत्कार,पुरस्कार , स्त्रियांचे पोवाडे,समारंभ सारं काही रीतसर साजरं होईल.

तसंही देवीचं नवरात्र,मदर्स डे आणि जागतिक महिला दिन या दिवशी होत असणाऱ्या कौतुक सोहळ्यात आम्ही स्त्रिया  स्वतःला अगदी 'महान ' वगैरे समजायला लागतो आणि स्वतःला फसवत राहतो.


मुळात स्त्रीचं उच्च शिक्षण,तिचं घराबाहेर पडून अर्थार्जन करणं,पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या पदांवर नोकरी करणं , त्यामुळे तिच्या भौतिक जगण्यात झालेला आमूलाग्र बदल..... स्त्री प्रगतीचे हे टप्पे किंवा  पॕरामीटर्स आता कालबाह्य समजायला हवेत.

तिच्या जीवनातल्या भौतिक बदलापेक्षा वैचारिक आणि  वागणूकीतील बदल हा जास्त महत्त्वाचा आहे .


आज स्त्री म्हणून कुटुंबानं आणि समाजानं दिलेल्या भूमिका २४/७ आम्ही कवचकुंडला सारख्या मिरवतो की त्यातून बाहेर निघून एक व्यक्ती म्हणून स्वतःचा विचार करतो??? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा.

आज मी साठी पार केली आहे.  माझ्या लहानपणाचा काळ लक्षात घेता,माझ्यातलं  'स्त्री' हे  ॲप  हे सगळ्यात प्रभावी असणं हे ओघानं आलंच.

आमच्या दैनंदिन जीवनातल्या कोणत़्याही आॕपरेटींग सिस्टीमची किंबहुना अगदी विचार करण्याची सुरुवातच मुळी ' स्त्री' अॕप उघडल्यावर व्हायची.

आत्मभान येईपर्यंत मला स्त्री पुरुषांना दिलेली वेगळी वागणूक खरं तर खटकलीच नव्हती. म्हणूनच मुलींना घातलेली बंधनं  पाळत राहिले- - त्याच समजूतीत जगत राहिले.आणि स्वतंत्र वृत्तीने वागणाऱ्या स्त्रियांना वाईट लेबलं लावीत राहिले .

जसं जसं आत्मभान आलं तसे तसे स्त्री जीवनातल्या अनेकविध भ्रमांचे भोपळे फुटत

 गेले.बरंचसं खटकलं, बरचसं मेंदूला झिणझिण्या आणणारं, कधी संतप्त करणारं, बरेचदा घाव घालणारं........

कळलं सगळंच पण 'वळलं ' का?????

दुर्दैवाने वळलं नाही कारण स्वतःच्या स्त्रीभूमिकेतून बाहेर पडण्याचं धाडस प्रत्येकीत असतंच असं नाही.

 पण 'मी' आज कुठे आहे? माझ्यातल्या 'स्त्री'चं एका व्यक्तीत परिवर्तन झालंय?????

आणि जर झालं असेल तर ते वैचारिक स्तरावर की आचरणातही आलंय?- हा प्रश्न मी स्वतःला हल्ली नेहमीच विचारत असते.

 आज अगदी मनापासून मला हे आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटतेय.

मी वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात 'व्यक्ती ' म्हणून जगतेय????.....की समाजात व्यक्ती  म्हणून आणि घरात मात्र..........

.....की सोयिस्करपणे कधी व्यक्ती आणि कधी स्त्री ..........

म्हणून  आज मला स्वतःलाच आणि माझ्या समविचारी मैत्रिणींना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.


... रोजच्या जगण्यात मी माझ्या बुद्धीचा आणि माझ्या स्वतंत्र विचारसरणीचा किती उपयोग करते? की हे विचार दाबून टाकून  परंपरागत स्त्री 

मानसिकतेत राहणंच मला सोयीचं वाटतं?


....दैनंदिन जगण्यात माझं  स्त्री असणं प्रभावी असतं की एक व्यक्ती असणं?


....एक स्त्री म्हणून समाजाकडून, कुटुंबाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे का?


....माझ्या मुलगी आई, पत्नी, सासू, आजी,इ.इ. भूमिका  भिरकावून कधीतरी फक्त स्वतःसाठी  जगून बघितलं आहे का?? फक्त स्वतःलाच जाणून घेतलंय का?


....मी माझ्या घरातल्या यच्चयावत पुरुषांना स्वावलंबी केलंय का? माझ्याशिवाय त्यांचं काहीही अडणार नाही अशी परिस्थिती मी निर्माण केलीय का?


.... माझ्या मुलीला आणि मुलाला काहीही भेदभाव न करता खरंच वाढवलंय का?भांडी घासणं, केर काढणं, स्वयंपाक करणं इ.घरगुती कामं माझा मुलगा न सांगता करतो का?


.... घराबाहेर एकटी वावरताना माझं स्त्री असणं मला अडचणीचं वाटतं का?


घरातल्या आर्थिक गुंतवणूकीच्या बाबतीत माझी काही ठोस भूमिका असते की 'फुल्यांच्या' जागी सही करण्याइतपतच माझा सहभाग असतो?


स्वतःच्या बाबतीत,कुटुंबातील किंवा अवती भोवतीच्या स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांकडून गैरवर्तन घडत असल्यास मी आवाज उठवला की गप्प बसले?


आसपास एखादी स्वतंत्र विचारसरणीची,मनस्वी,परंपरा झुगारणारी,पुरुषांमध्ये बिनधास्त वावरणारी,सोलो ट्रिप्स करणारी स्त्री असेल तर मी तिच्यावर 'आगाऊ' , 'फॉरवर्ड' असे शेरे मारुन तिच्यापासून चार हात  लांब रहाणंच योग्य समजते?


..........हे अगदी वैयक्तिक स्तरावरचे प्रश्न मी स्वत:लाच विचारुन माझी परीक्षा घेतली आणि दुर्दैवाने मी त्यात काठावर उत्तीर्ण झाले.


एक दिवस जागतिक महिला दिन साजरा करुन स्वतःला देव्हार्यात बसवून आपलीच आपण किती दिवस फसवणूक करणार?

मैत्रिणींनो.............

माणूस म्हणून जगायला सुरुवात करा.आपणच आपल्यात बदल करायचा आहे.आपल्याला क्रांती घडवून आणायची असेल तर सुरुवात आपल्या पासूनच करणं गरजेचं आहे.

ज्यादिवशी प्रत्येक बाई/मुलगी स्वतःला स्त्रीत्वातून नात्यागोत्यातून पूर्णपणे बाहेर काढून स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेईल तो खरा महिला दिन असेल.

 उत्कृष्ट आई ,उत्तम पत्नी ,आदर्श सून ई.ई.होण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा उत्तम 'माणूस',

उत्तम 'व्यक्ती' होण्याच्या  दिशेनं पाऊल टाकणं.......हे खरं स्त्रीस्वातंत्र्य........

मैत्रिणींनो,नेमका कोणता आतला आवाज आपण दाबून टाकतोय हे माहित नसेल तर शोधा आणि माहित असेल तर तो आवर्जून ऐका.तो आवाजच आपलं भावविश्व उजळून टाकणारा देवदूत असणार आहे याची मला खात्री आहे.




#जागतिकमहिलादिन

Saturday, January 23, 2021

 जाने कहां गये वो दिन......                                                                  


     मी कॉलेजमध्ये शिकत असतानाचा तो काळ. चाळीस वर्षांपूर्वीचा. ते दिवसच वेगळे होते. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन डोसा खाणं ही एन्जॉयमेंट ची परमावधी होती. हो.डोसाच.कारण  सिनेमा आणि डोसा येवढीच चैन आर्थिकदृष्ट्या परवडायची.शिवाय पावभाजी,बर्गर,पिझ्झा या भावंडांचा जन्मही झाला नव्हता त्यावेळी.

   बहुचर्चित असलेला सिनेमा रिलीज झाला की लवकरात लवकर तो थिएटर मध्ये जाऊन बघणं... यातली गंमत...अर्थातच 'थ्रील' आणि 'एक्साईटमेंट'... आजच्या पिढीला कळू शकणार नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा बघण्याचा रेकॉर्ड असणारी अनेक थोर व्यक्तिमत्वं आमच्या पिढीने बघितली आहेत. विशेषतः अमिताभ बच्चनचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं हे तरुण पिढीच्या अनेक ध्येयां पैकी एक महत्त्वाचं ध्येय होतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.

   परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की सेंटर वरून डायरेक्ट थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची परंपराच होती त्यावेळी.  एखाद्या टुकार किंवा सामान्य सिनेमाचीच तेव्हा निवड व्हायची कारण अख्खा वर्ग एकत्र असल्यावर   सिनेमा बघण्यापेक्षा हुल्लडबाजीलाच चेव यायचा.परीक्षा  सुरू असतानाच, अभ्यास सोडून सिनेमाच्या तिकीटांची तजवीज करणारे  काही खंदे सिनेमावीर आमच्यात होते ज्यांचा मला आजही कमालीचा आदर वाटतो.

    सिनेमाची तिकिटं रांगेत उभं राहुन काढण्याचे ते दिवस होते. आणि हाउसफुल सिनेमांसाठी दोन-दोन तास रांगेत उभे राहण्याची आमच्यात  धमकही  होती. काही सुपरहिट सिनेमांचं  तर अॕडव्हान्स बुकिंग असायचं. अशी तिकिटं मिळविण्यासाठी जीवन-मरणाच्या पातळीवर जाऊन जो संघर्ष केलाय ना आम्ही त्याला तोड नाही.  प्रत्येक थिएटरच्या  मॅनेजर पासून डोअरकीपर पर्यंतच्या साखळीतल्या एका एका दुव्याचा सखोल अभ्यास करणारी काही  व्यासंगी,  संशोधक वृत्तीची मित्रमंडळी आम्हाला  माहित होती.वेळप्रसंगी  त्यांना हाताशी धरून ठेवण्याचं कसबही  आम्ही आत्मसात केलं होतं. तिकिटांचा काळाबाजारही त्यावेळी खूप चालत असे पण त्या भानगडीत मात्र आम्ही कधी पडलो नाही. आपला मध्यमवर्गीय पापभिरु बाणा हो.           

      फर्स्ट डे फर्स्ट  शो चा रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवणारा,  उज्वल भवितव्य असणारा ,शूर-वीर लढवय्या - -- असा  आमचा एक वर्गमित्र होता.  सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पाहिला तर त्याच्या मागच्या आणि पुढच्या पाच पिढ्या नरकात जाणार होत्या बहुतेक. 'सिलसिला' रिलीज झाला त्यावेळी महिनाअखेर होती. तिकिटाचे पंचवीस रुपये ही त्याच्याकडे शिल्लक नव्हते. (तिकिटाची किंमत पंचवीस रुपये हा आज विनोद वाटू शकतो पण ते खरं  आहे.)  घरापासून दूर राहणाऱ्या मुलांचा महिनाअखेर पॉकेटमनी संपूर्ण संपणं ही त्याकाळी नित्याची बाब होती. त्यावेळी ही आर्थिक ओढाताण मुलांनी कधीही पालकांच्या कानावर घातली नाही हे विशेष.आणि पालकही त्याबद्दल चौकशी करित नसत- हे त्याहून विशेष .घरुन मनीऑर्डर येईपर्यंत ही मुलं काय काय युक्त्या करीत हे जर लिहून काढलं तर आजच्या काळातलं बेस्टसेलर पुस्तक होऊ शकतं.असो. पंचवीस रुपये जमवण्यासाठी आमच्या बहाद्दर मित्राने  'मदत करा'- असं लिहून वर्गात एक  वही फिरवली. त्या  काळानुसार अवघे  पाच ते दहा रुपये वजन असणाऱ्या आमच्या पाकिटातून आम्ही प्रत्येकाने चार आणे,आठ आणे, एक रुपया, दोन रुपये पर्यंतची त्याला मदत केली आणि त्याचं फर्स्ट डे फर्स्ट शो चं व्रत सुफळ संपूर्ण झालं.

     एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी 'अभिमान' बघायला गेलो. अर्थातच गर्दी, धक्काबुक्की, खेचाखेची- यातून खिंड लढवून आम्ही तिकीटं मिळवलीत पण या लढाईत 'हाऊसफुल्ल'चा मोठा लाकडी बोर्ड मैत्रिणीच्या पावलावर पडला. जखम नव्हती पण पाऊल चांगलंच दुखावलं होतं. पण 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस'..... असा ध्यास असल्याने पायाकडे दुर्लक्ष करून ,आम्ही तहान भूक हरपून, अभिमान बघितला. सिनेमा संपल्यावर उभं राहिल्यावर जाणवलं की तिच्या  पावलावर प्रचंड सूज आली होती. डॉक्टरांनी पावलाच्या फ्रॅक्चरचं  निदान करून दीड महिना तिचा पाय प्लास्टरमध्ये बांधून ठेवला होता. आज सुद्धा, 'फ्रॅक्चर असतानाही मी सिनेमा बघितला'..... हा 'अभिमान' ती बाळगून आहे .

     'उमरावजान' मधल्या रेखाच्या नृत्यासाठी,'निकाह'मधल्या 'चुपके चुपके रातदिन' या गुलाम अलीच्या गझलेसाठी,'शक्ती' मधे राखीचा मृत्यू झाल्यावर दिलीपकुमार आणि अमिताभचा अबोल आणि चटका लावणारा सीन बघण्यासाठी, 'अंगूर'च्या शेवटच्या सीनमधली आजी बघण्यासाठी,'शोले' मधला प्रत्येकच सीन बघण्यासाठी .....आणि कशाकशा साठी एकाच सिनेमाचा वारंवार झिजवलेला उंबरठा...........अशी समर्पण वृत्ती असणारे भाविक आमच्यात खूप  होते.

त्याकाळी बाल्कनी आणि बॉक्स मधे बसणारी मंडळी उच्चभ्रू असायची.आम्ही  'रिझर्व्ह क्लास'चे वाटसरू  होतो. 

गच्च भरलेलं थिएटर .....

थर्ड क्लास मधली टपोरी पब्लीक......                                                              


थिएटर मधला काळोख ....

भारतीय सरकारची फिल्म डिव्हीजन प्रस्तुत  ब्लॕक अँड व्हाईट डॉक्युमेंटरी....

विको टर्मेरिक ची जाहिरात....

आणि सिनेमाला सुरुवात .....

हे सगळं  जादुई आणि उत्तेजित करणारं वातावरण असायचं. पुढच्या तीन तासात वेळप्रसंगी पडद्यावरची दुःख आपल्या काळजात ओढून घेऊन आम्ही घळाघळा रडत ही होतो.  जया भादुरी- मनोज कुमारचा 'शोर ',अमिताभ -जया भादुरी चा 'मिली' ,पद्मिनी कोल्हापुरेचा, 'आहिस्ता आहिस्ता', राजेश खन्नाचा 'आनंद ',रेखाचा 'जीवनधारा'.....अशा अनेक सिनेमांमध्ये -  प्रत्यक्ष जीवनातही जेवढं रडणार नाही तेवढं धो धो  रडून झालेलंय आमचं.  

    अगदी लहानपणी घराघरातून, वर्षातून दोन-तीनदा घरातल्या सगळ्या बच्चेकंपनीला पौराणिक किंवा ऐतिहासिक सिनेमा दाखवून आणायचा एक भव्य कौटुंबिक कार्यक्रम असायचा. त्यावेळी  'भक्त प्रल्हाद' बघतांना प्रल्हादाचा होणारा छळ बघून आम्हा सर्व भावंडांनी थिएटरमध्ये भोकाड पसरलं होतं -अशी एक वदंता आहे.....

    'माहेरची साडी'बघतांना तर रडून रडून बाया बापड्यांचे डोळे सुजत होते. गर्दी खेचण्यासाठी त्या सिनेमात ईंटरव्हल मधे लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला एक माहेरची साडी भेट मिळत  होती.

     सिनेमे आजही बघितले जातात. पण ते घरच्या होम थिएटर मधे नेटफ्लिक्स वर किंवा ॲमेझॉन प्राईम वर. मल्टीप्लेक्स मधे जाताना आॕनलाईन बुकींग केल्या जातं.   त्यामुळे  तिकीटं काढण्यासाठी रांग नाही , धडपड नाही इंटरवल मधला कोल्ड्रिंक च्या बाटल्यांचा आवाज नाही. गर्दी नाही, धक्काबुक्की नाही.त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.

 आमच्या काळातील तरुणाईला व्यक्त व्हायला आजच्या सारखी मोकळीक नव्हती आणि तशी साधनंही नव्हती .मग मनातलं खूपसं साचलेलं,बरचसं अव्यक्त असं त्या रुपेरी पडद्यावर जिवंत व्हायचं .पडद्यावरचं उमलून येणारं प्रेम,जीवघेणा संघर्ष , पिळवटून टाकणारं दुःख ,तनामनाला नाचवणारा आनंद आमचाच होऊन जायचा.

तो आमच्यासाठी केवळ सिनेमा नसायचाच मुळी.ते तर  स्वतःचंच जगणं  होतं- - औटघटकेचं का होईना पण .......ते स्वतःचंच जगणं होतं.

         आज पूर्वीसारखे सिनेमाभक्तही आढळत नाहीत .  

'होऊनिया वारकरी,पाहिली आज तुझी पंढरी'.....या ओढीनं थिएटरच्या दिशेनं वळणारी पावलं आता अभावानंच सापडत असतील.

      मला वाटतं ज्यांनी सिनेमावर मनापासून प्रेम केलंय, त्यांना अध्यात्माच्या वाटेवरून चालताना फारशी अडचण येत नाही. कारण अध्यात्मातल्या पायऱ्या - -

 मन निर्विचार करणं......

 'मी' ला विसरणं ......

तहानभूक हरपून समोरच्या पडद्याशी एकरुप होणं...... 

पडद्यावरच्या प्रसंगांमधे समर्पित होऊन.....

समाधी अवस्थेत जाणं......  हे सगळं सिनेमाभक्तांचं अनुभवून झालं असतं. 

'आता कोठे धावे मन', तुझे चरण देखिलेया' अशा ध्यासानं आमच्या पिढीतल्या अनेकांचं या  सिनेमा हॉलमध्ये भावजीवन समृद्ध झालेलं आहे. खूप तरल आणि आनंददायी अशा आठवणींचा तो खजिना आहे ज्यामुळे  आजही मन तेवढंच टवटवीत होतं आणि  म्हणतं- - - 'जाने कहां गये वो दिन........

Saturday, January 2, 2021

 कोविड डायरी...

        एका अस्वस्थ मनाची....

जानेवारी 2020 ....

31 डिसेंबर 2019 ला निरोप आणि जानेवारी 2020 चं स्वागत  रीतसर साजरं झालं. तशी व्यक्तिशः मी असल्या सेलिब्रेशनच्या फंदात फारशी पडत नाही पण राष्ट्रीय कुळाचार असल्याप्रमाणे या उत्सवात थोडं का होईना,नाईलाजास्तव ओढल्या जातेच. मग दरसाल दरवर्षी प्रमाणे  नववर्षाचे थातूरमातूर संकल्पही करून झाले . .........अहो,शास्त्र असतं ते....

 दरम्यान वुहानमध्ये कोरोना नामक नवीनच एका साथीच्या उद्रेकाच्या भीषण बातम्या बघितल्या......

 चीनमधे ना??आपल्याला काय त्याचं ???

शेवटी परदुःख शीतलम्.......

आपल्या झोपेचं खोबरं कशाला?

 फेब्रुवारी 2020...

इटलीमध्ये कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.. स्मशानभूमीत जागा कमी पडते आहे....

 पोटात गोळा उठला जबरदस्त!

 पण भारतातल्या 45 डिग्री सें. तापमानात हा विषाणू कसला तगतोय??

 जीव शांतवला जरासा.

नेहमीसारखीच गाढ  झोप लागली .

 मार्च 2020 ....

पुण्यात पहिला कोरोना रुग्ण.. मुंबईत पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू.......

 जीव धास्तावला आहे....

 बुद्धीला जरा बाजूला ठेवून थाळीनाद केला.

 दिवे उजळले .

सामूहिक कर्फ्यू .....

थोडासा दिलासा मिळाला.

 होईल सगळं व्यवस्थित.....

साथीचे रोग येतातच की आणि जातातही......

 शांत  झोप लागली.

 एप्रिल 2020....

भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढली.

 जिल्हाबंदी ,शाळा, कॉलेज, ऑफिस, कारखाने, दुकानं, बसेस, रेल्वे, सगळं बंद.

 फक्त आमचे दवाखाने सुरू.. "ऑन ड्युटी डॉक्टर" हे लेबल गाडीवर शौर्य पदका सारखं लावताना ऊर नक्कीच भरुन आला.

 आटोक्यात येणार ही साथ........

फ्लूचा मोठा भाऊ हो......

 उत्साहानं शासनाचे कोविड१९चे ऑनलाईन ट्रेनिंग्ज घेतले. 

सात लेव्हल्सचे सर्टिफिकेट्स जमा झाले.

 कोविडची वैद्यकीय आणि वैज्ञानिक बाजू क्लियर झाल्यामुळे हिरीरीने समाजात ज्ञानवाटप आणि  जनजागरण सुद्धा केलं.

काढे,वाफ,नस्य- दिनक्रमात जोडल्या गेले.

 एसी, कुलर, थंड पाणी, आईस्क्रिम, सरबत, पन्हं,ई. नसतानाही  रात्रीची झोप मात्र निवांत  होती.

  मे -जून-.जुलै 2020 ...

कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतोय.... 

मृत्युदर वाढत चाललाय...

 बरे झालेल्या रुग्णांच्या मोठ्या  संख्येपेक्षा  मृतांचा आकडा कमालीचा छळतोय....

 हा विषाणू आता मनात आलाय वस्तीला ....

कुठेतरी कुणाचा तरी --  श्वासासाठी संघर्ष ......

कुठेतरी भुकेल्यांचा- - अन्नासाठी संघर्ष........

 कुठेतरी एकाकी असहाय व्यक्तिचा- - आधारासाठी संघर्ष....

 सर्व स्तरातील कोविड योद्ध्यांचा - --  कामासाठी घरदार सोडतानाचा संघर्ष......

फॉरिन टूर रद्द झाल्यामुळे कुणाचा तरी- - पंचतारांकित,कोमट संघर्ष ..... 

 आम्ही सुरक्षित आहोत. सगळं कुटुंब एकत्र आहे ..... हा स्वार्थी दिलासा खुपत होता कुठेतरी.. 

आज आश्वस्त वाटतंय पण उद्या?????

 आता रात्री दचकून जाग येतेय.. भीषण सावट आलंय मनावर.. काही लक्षणं नसतानाही, घरातल्यांच्या नकळत  पल्सऑक्सीमीटर उशीखाली लपवून झोपणाऱ्या डॉक्टरांची ही संख्या वाढते आहे.......

ऑगस्ट-सप्टेंबर 2020.... 

आता तर कोरोना विषाणू मनातून अंतर्मनात ही शिरलाय...

 वृत्तपत्र वाचन बंद केलंय..

 बातम्या बघणं बंद केलंय... तरीही येतेच ती दुष्ट, क्रूर बातमी- निकटवर्तीयाच्या मृत्यूची.... 

मृत्यूनं मन हेलावणं हे स्वाभाविकच .

पण या कोरोनानं मृत्यूची थरकाप उडवणारी निष्ठूर बाजू  दाखवली.

प्लास्टिक मध्ये गुंडाळून, एकटेपणाला सोबत घेऊन येणारं मृत्यूचं विदारक रुप..... 

दुःखाला बधीर करणारं....

कुठे आई वडिल दवाखान्यात ...

छोटी मुलं घरी एकाकी.......

वारंवार गळ्याशी आवंढा दाटून येणं वाढलंय आताशा.

मनातला कोरोना धुमाकूळ घालतोय......

 ऑनलाइन गाणी, नाच, रेसिपीज,समुपदेशन, लेक्चर्स योग साधना..... यांनी कसाबसा थोपवलेला हा मनातला विषाणू उचल खातोय परत परत......

हाऊसिंग सोसायट्यांच्या गार्डन मधला शुकशुकाट, स्तब्ध झोपाळे आणि एकाकी  घसरगुंड्या बघून पोटात गोळा  उठतोय.....

 मनातल्या विषाणू साठी कसा करावा लाॕकडाऊन???

मध्यरात्री झोप उघडली की परत डोळा लागतच नाहीय...

आॕक्टोबर - नोव्हेंबर २०२०

.... वरवर तसं सुरळित चाललंय..

मन मात्र धास्तावलेलंच आहे.  दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येणार????

  सण-उत्सव घरच्या घरी होताहेत साजरे.अवतीभोवती बरचसं सकारात्मक,रचनात्मक घडतंय.......

मनातल्या विषाणुचा जोर कमी झाल्यागत वाटतोय..

 पण मनाच्या  चिंधड्या व्हायच्या त्या झाल्याच. 

पण नाही.

आता हतबल व्हायचं नाही.

 डिसेंबर 2020 .....

भारतातील कोविडचं चित्र दिलासादायक... कोरोनाची लस ही येणार........  विषाणूच्या थैमाना पुढे माणसाची जगण्याची धडपड वरचढ ठरली हे निश्चित.

 पण या दहा महिन्यातल्या मनाच्या पडझडीचं काय?? मनात वस्तीला आलेल्या विषाणूला कसं हद्दपार करायचं???

 मानसिक कोविड मधून बरं होणाऱ्यांचं प्रमाण किती टक्के???

मनाच्या कोविडवर आहे का हो लस??? 

नाही....अशा विचारांच्या गुंत्यात अजिबात अडकायचं नाही.

शंभर क्षण  सावरण्याचे आणि  एकच क्षण कोसळण्याचा आहे..

झटकायचा तो क्षण .......

जानेवारी २०२१....

असो.....

 प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार असतेच.मनाच्या कोविडची लस आपली आपल्या जवळच आहे ,हे जाणवतंय... फक्त ती शोधण्याची दृष्टी आणि  वृत्ती  पाहिजे...

.कोविडनंच शिकवलंय ना हे???? पाय रोवून उभं राह्यला....

  "दुःखेष्वनुद्विग्नमनाः 

सुखेषु विगतस्पृहः/

वीतरागभयक्रोधः

स्थितधीर्मुनिरुच्यते//"

ही गीतेतली लस रोज समजून,उमजून स्वतःला टोचत राहणं......हा संकल्प करावा का

 नवीन  वर्षाचा??? 

जमेल???

कारण संकल्प अल्पजीवी असतात ...

असू दे.तो विचार आता  नाहीच करायचा.

पंतप्रधान मोदींच्याच शब्दात सांगायचं तर,


"न अपना न पराया

न तेरा न मेरा,

सबका तेज बनकर

अभी तो सूरज उगा है".

"विकृतिने प्रकृतिको दबोचा

अपनोंसे ध्वस्त होती आज है,

कल बचाने और बनाने

अभी तो सूरज उगा है.

Sunday, December 20, 2020

एका सहभोजनाची गोष्ट ....

 परवा आमच्या जवळच्या एका कुटुंबाकडून त्यांच्या फार्म हाऊस वर एक दिवसाच्या गेट टुगेदर आणि  सहभोजना साठी निमंत्रण आलं. माझ्या अंगात उत्साह संचारला.त्यांच्या फार्महाऊसचं खूप  कौतुक ऐकलं होतं. तेवढंच  त्या कोरोनाच्या उदास वातावरणातून जरा बदल. नवऱ्याने नेहमीप्रमाणेच मीटींगचे कारण सांगून अंग काढून घेतलं आणि चिरंजीव? बाय डिफॉल्ट त्याला घरगुती कार्यक्रमात सहभागी होण्याचं अंगच नाही त्यामुळे सहभोजनाचं निमंत्रण त्याच्या मेंदूपर्यंत शिरण्याचा प्रश्नच नव्हता.

      मीच उत्साहाने तयार होऊन फार्महाऊसवर पोचले. एकदम प्रसन्न  वातावरण होतं. जुन्या धाटणीचं बैठं कौलारू, ऐसपैस घर. चारही बाजूंनी हिरवीगार शेती. बाजूलाच पेरू, लिंबू, आंब्याचा मळा. झाडाला टांगलेले झोके. लहान मुलांसाठी घसरगुंडी , सीसॉ.चुलीवर सुरू असलेला अस्सल गावरान स्वयंपाक. आहाहा..........

 पण मला कोणाची चाहूल लागत नव्हती. मी वेळेआधीच पोचले की काय???

हळूच  घरात शिरले. निमंत्रित मध्यमवयीन मंडळी होम थिएटर वर "चंद्र आहे साक्षीला" सोबत अक्षरशः समाधी अवस्थेत पोचली होती कारण  मी आल्याचं कुणाला  कळलंही नाही.

    दिवसाढवळ्या, निसर्गरम्य वातावरणात,फार्महाऊसच्या घरात बसून त्या  चंद्राला साक्षीला घ्यायचं काय प्रयोजन???

    मी तिथून काढता पाय घेतला आणि मागच्या व्हरांड्यात पोचले.तिथे  अर्ध्या चड्ड्या घातलेल्या, केस विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या, आजूबाजूचं भान नसलेल्या तरुण मुला मुलींचा ग्रुप दिसला. यातील प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्या आयुधांसह - (मोबाईल,टॕब, लॅपटॉप - - -सह) (समाधीच्याही  पुढची अवस्था असते का हो???) - परग्रहावर पोचलेला........

  नाही म्हणायला होस्ट जोडपं जोडपं जागृतावस्थेत असल्यामुळे माझा त्यांच्याशी खराखुरा संवाद झाला.ते कामात असल्याने मी  बाहेर आले.मोकळेपणानं  हिंडले. झाडापानांचा गंध शरीरातल्या रंध्रारंध्रात ओढून घेतला. कुणाचं लक्ष नाही हे बघून, माझं वय विसरून, मी  झोक्यावर मनसोक्त  खेळून  घेतलं.

  दरम्यान चंद्राची साक्ष संपल्याने समाधी अवस्थेतली मंडळी आता भौतिक  जगात परतली असतील म्हणून त्यांच्यात जाऊन बसले. त्यापैकी एका आजीकडून "सांग तू आहेस का"चे  तब्बल तीन एपिसोड्स न बघण्याचा घोर अपराध घडला होता त्यामुळे इतर मंडळींकडून ती ष्टोरी ऐकून त्यांचं पापक्षालन सुरू होतं.

" तू नक्कीच नाही यात"- - असं मी मला स्वतःला सांगून परत बाहेर आले .आता तर डोकं फिरलेल्या अवस्थेत , तिरीमिरीत , मी याही वयात (वय वर्षे साठ) घसरगुंडी खेळायचाही निश्चय केला. (अर्थात त्याबद्दल तपशीलवार पुढे कधीतरी .......)  त्यानंतर स्वयंपाक करणाऱ्या बायकांशी  गप्पा-टप्पा करुन हातावरच्या भाकरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नही करुन झाला .

आता मात्र  सगळी मंडळी भूतलावर परतली होती आणि पाय मोकळे करायला बाहेर आली. मला जरा हुरूप आला.आता गेट टुगेदर घडण्याची आशा निर्माण झाली. पण हाय रे माझ्या कर्मा!!! आता फोटोसेशन सुरू झालं. एका लाईनीत, उंचीप्रमाणे,सगळ्यांनी बाजूच्यांच्या डाव्या खांद्यावर हात ठेवलेले, सगळे पाठमोरे,पण उजवीकडे मान वळवलेले, पायऱ्यांवर एकाखाली एक बसलेले .......अशा हल्लीच्या सगळ्या प्रचलित पोझेस मध्ये यथासांग फोटो झाले. नंतर ड्रेस बदलून हिरव्या रंगात मंडळी अवतीर्ण झाली. मी हिरवा ड्रेस आणला नसल्यामुळे माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक बघूनही झालं. एकंदरीत फोटोंचा तो राष्ट्रीय कार्यक्रम एकदाचा संपला.

   आता मात्र खूप भूक लागली होती .चुलीवरचा तो गावरान मेनू नाकाला, जिभेला, आणि पोटाला खुणावत होता. गर्द वनराईत मस्त भोजनाची व्यवस्था केली होती. आता निवांत हादडायचं या उद्देशाने मी सरसावले......

तितक्यात ....

 फुगलेल्या भाकरीचा, भरलेल्या वांग्याचा,कांदाभजींचा,  झणझणीत रश्शाचा, केशरी चकचकीत जिलब्यांचा,पापडांचा क्लोज-अप घेण्यासाठी आता तरुण मंडळी सरसावली होती. आता हे पुढ्यातलं सुग्रास अन्न खाऊ ,की या फोटोग्राफर मंडळींना "खाऊ कि गिळू "असा माझा नुसता तिळपापड होत होता. शेवटी पुन्हा  फोटोंचा राष्ट्रीय  कार्यक्रम संपल्यानंतर भोजन सुरू झालं.

 चार घास पोटात गेल्यावर मध्यमवयीन लोकांचा थोडाफार तरी - औपचारिक का होईना पण  संवाद सुरू झाला.

 पण तरुण मंडळी??? जितक्या इंटरेस्ट घेऊन त्यांनी पदार्थाचे फोटो काढले, तितक्याच नीरसतेनं ते समोरचं अन्न चिवडत होते. साक्षात  रुचकर अन्नब्रह्म समोर असतानाही त्यांचं आभासी ब्रम्हांडाशी असलेलं अद्वैत तुटलं  नव्हतं . इतक्या लहान वयात, "सुखदुःखे समे कृत्वा, लाभलाभौ  जयाजयौ" प्रत पोचलेली ही मंडळी बघून मला धन्य धन्य  वाटलं. भाकरी, भजी, रश्शाच्या  सुग्रास चवी पलीकडे जाऊन व्हर्च्युअल जगात गुडूप झालेल्या या तरुणाईचा  आनंद नक्की कशात असावा हा प्रश्न मला छळू लागला. तसंच माझ्यामोरच्या मध्यमवयीन मंडळींना, निसर्गाच्या सान्निध्यातही  टीव्ही सिरीयल आणि सोशल मीडियावर टाकायच्या फोटोंचं इतकं महत्त्व असावं???? 

     त्यांचाही आनंद नक्की कशात  असावा?

   असो. मी मात्र माझा झोक्यावरचा आणि घसरगुंडीवर खेळण्याचा(?) चिमुटभर आनंद मात्र उरी पोटी जपून घरी घेऊन आले.



#गेटटुगेदर

#फार्महाऊस

#सहभोजन

#आनंद

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...