Sunday, March 16, 2025

Gen baby boomer

 जेन बेबी बुमर आणि लग्न    

        बहिणीच्या मुलाचं लग्न पाच दिवसांवर आलंय. आजपासून रोज भरगच्च कार्यक्रम - साॅरी- 'इव्हेन्ट्स' ठरवले आहेत. त्यानुसार ठराविक ड्रेस - साड्या - दागिने घालून हजर राहायचं आहे. आज कुळाचार असल्याने नऊवारी व धोतर - अशी थीम होती. नऊवारी जांभळ्या रंगाची म्हणजे मस्तानीने  'पिंगा ग पोरी' नाचतांना घातलेला जांभळा रंग बरं का. त्याला जांभळा नाही 'बर्गंडी' म्हणायचं असं हळूच माझ्या कन्येनं कानात ज्ञान ओतलं.

"मावशी, मज्जा आली की नाही? आता सगळ्या थीम्स फॉलो करायच्या बरं " नवरदेवाचा लाडिक? (अट्टाहास) हट्ट.

"तुझ्या थीम्स फॉलो करताना माझा बँक बॅलन्स 'हाॅलो' होतोय त्याचं काय? अरे मी स्वतः च्या लग्नातही इतक्या साड्या घेतल्या नव्हत्या."

"मावशी तुझं लग्न आता हिस्टाॅरिकल इव्हेन्ट  झालंय. त्या १८५७ च्या गोष्टी आणि आमची जनरेशन यात खूप फरक पडलाय."

खरंच. आमची 'बेबी बुम जनरेशन' (४६ ते ६४ मधे जन्म) कुठे     आणि या मुलांची 'जेन वाय' (७७ ते ९५ मधे जन्म) कुठे? जमीन अस्मानाचा फरक आम्ही स्वतःच अनुभवला आहे. नकळत मी इतिहासात शिरले आणि 'जेन बे बु' ची(आमची हो.) लग्नं डोळ्यासमोर आली.

                 त्या काळातील लग्नात कसल्या आल्या थीम्स? त्यावेळी आमच्या जगण्याचीच एक थीम ठरली होती. ती म्हणजे 'जेन सायलेंट' चे आज्ञापालन करणं.

"सदासर्वदा बोध अमुचाच घ्यावा।"

"विरोधाचा सूर कधी ना निघावा॥"

  असं आमच्या मेंदूचं प्रोग्रॅमिंगच करून ठेवलं होतं. (गरीब बिच्चारी आमची पिढी) अपत्य संगोपनाचा  सार्वत्रिक अजेंडा म्हणजे मुलांना धाकात ठेवणं,मुलांचं कौतुक न करणं,त्यांचं ऐकून  न घेणं.......अशा या 'जेन सायलेंटच्या' (२८ ते ४५ मधे जन्म ) धाकात, आमच्या लग्नाबाबत काय बोलावं? लग्न या विषयाची आमची प्रश्नपत्रिका कितीही सोपी वा कठीण असो - सोडवणार कोण? तर वडिलधारे. लग्नसमारंभ म्हणजे मज्जा, धमाल, आनंद, एन्जॉयमेन्ट अशा भलत्याच संकल्पना त्याकाळी नव्हत्या. विशेषतः मुलीचं लग्न असेल तर दडपण, ताण, भिती आणि कष्ट - हीच थीम असायची.  "वरपक्ष हा कायम वरचढ असतो" , "पसंती - नापसंती ठरविण्याचा अधिकृत अधिकार वरपक्षाचा असतो." हे आमच्या मेंदूवर कोरलेलं ब्रम्हवाक्य. त्यामुळे घरात मुलीच्या लग्नाच्या हालचाली सुरु झाल्या की आया बायांच्या डोळ्यातून प्रसंगी टिपं गाळण्याची थीम सुरू व्हायची. एरवी समंजस, सुस्वभावी, सुसंस्कृत असलेली मंडळी 'वरपक्षाची' असली की त्यांची छाती ५६ इंच झालीच समजा.

             कांदेपोह्यांच्या प्रसंगी मुलीनं मान वर करून बघायचं नाही तर पायाच्या अंगठ्याकडे बघावं अशी आवर्जून सूचना दिली जाई. 'पायाच्या अंगठ्याने माती उकरणं ' ही संस्कारी परंपरा, फरशी किंवा टाईल्समुळे कठीण होऊ लागली होती.  तरी सुद्धा  "प्रयत्ने फरशी रगडता मातीही निघे" असा बाणा असलेल्या मुलींच्या अंगठ्याला नाहक इजा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे अंगठ्याकडे केवळ बघावं....  अशी सूचनेत तरतूद करण्यात आली. तसंच मुलीला हसण्याची बंदी असे. मख्ख, गंभीर किंवा तणावात असलेला चेहेरा 'जेन सायलेंटला' फारच सोयीचा वाटे. 

              एकदाचा होकार आला की दोन्ही कुटुंबातील वृध्द, वृध्दतर वृद्धतम ('जेन ग्रेटेस्ट' हो) व्यक्तींचा अचानक  भाव वाढत असे. हुंडा, सालंकृत कन्यादान, मानपान, देणीघेणी, मुलामुलीचा कपडा, जाण्यायेण्याचं भाडं,वरात,घोडा,.......ही  अस्त्रं , शस्त्रं केव्हा व कशी चालवायची... यात ही मंडळी अनुभवी . त्यांच्या उपस्थितीतच मंडळींची व्यवहाराची बोलणी होत. आणि कुटुंबाच्या जाज्वल्य इतिहासात वृद्धतम खापर पणजोबांच्या खाती नववं लग्न जमवण्याचा विक्रम सुवर्णाक्षरात नोंदविला जाई.

             असो. तर  लग्न जमताक्षणी नवरीसाठी खास आचारसंहिता लावली जाई. हल्ली ' प्री वेडिंग फोटोशूट 'असतं म्हणे.....( हे नेमकं काय? आणि कशासाठी?) . 'जेन बे.बु'.तील भावी वधुवरांमध्ये  जरासंही 'खुट्ट' झालं की 'शूट’असायचं.’शूट बाय साईट' हो........ म्हणजे 'जेन सायलेंटची' जळजळीत नजर!!

        'लग्नाचा बस्ता' ही महत्त्वपूर्ण घटना. दोन्ही पक्षातील महत्वाचे आणि मानाचे - अर्थातच ' जेन ग्रेटेस्ट'...... असा वीस- पंचवीस जणांचा जथ्था 'लग्नाचा बस्ता' खरेदीला जाई कारण विवाह समारंभात 'मानापमान नाट्य ' घडू नये म्हणून . नवरीसाठी फक्त पाच (अरेरे!!) साड्या. त्यापैक दोन घरी नेसायला(अरेरेरेरेरे!!!) आणि तीन लग्नाच्या. त्यावेळी शालूला फार महत्व. समोरच्या ढिगातून नेमका शालूचा रंग कोणता घ्यावा? यावर सासूबाईंचं निळ्याकडे तर , सासरेबुवांचं हिरव्याकडे बोट . आणि  डोळ्याच्या कोपऱ्यातून मुलीनं हळूच मुलाच्या बोटाकडे  बघावं तर ते सद्गृहस्थ शालूंच्या किंमतीचे लेबल बघण्यात गुंतलेले. बाकी मंडळी चहाच्या वाटेकडे डोळे लावून , जांभया दाबत बसलेली. आचारसंहितेमुळे वधुपक्षाला  'ब्र' काढायची परवानगी नसे. चाणाक्ष नोकराला परिस्थितीचा नेमका अंदाज आल्याने  शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे हे समजे. 'ताईला गुलाबी रंग किती खुलतो ' असं म्हणत गुलाबी शालू बाजूला ठेवी. ठराविक रंग, ‘ताईला 'शोभतो ’- हा जप करित कमीत कमी वेळात तो ताईची खरेदी निपटून टाकी. त्यानंतर पोटझाकणी, नणंददुरडी, आजीबोंद्री अशा 'जेन सायलेंटच्या' अगम्य विधीसाठी साड्या खरेदी होई . खरेदी संपल्यावर नेमक्या कोणाच्या पसंतीच्या  साड्या घेतल्या हे कधीच कुणीच सांगू शकत नसे. 

             वधूपक्षाकडे आता 'रुखवत' अंगात येई. नवरी मुलगी सर्वगुणसंपन्न आहे याचं प्रमाण म्हणजे रुखवत. युद्धपातळीवर चादरी, उशा, पडदे, टेबल क्लाॅथ, रुमाल, साडी यावर भरतकाम, कापसाचा ससा, पेपरमिंटचे तुळशी वृंदावन, आईस्क्रीमच्या काड्यांची होडी,  पैशाच्या नाण्यांचं देऊळ .... अशा कलात्मकतेशी फारकत घेणाऱ्या, व  प्राथमिक शाळेतील  प्रोजेक्टप्रमाणे बाळबोध कलाकृती  तयार होत. गोळाफेकीतल्या गोळ्या प्रमाणे अगडबंब लाडू, कासवछाप काॅईलशी स्पर्धा करणार्‍या चकल्या, आणि एका हातात न मावणार्‍या  महाकाय करंज्याही रुखवतासाठी सज्ज होत.

                हळदीच्या दिवशी नवरीचा खरा रंग ओळखू येणार नाही आणि पुढील पंघरा दिवस  पिवळा रंग पक्का राहील याची काळजी घेत  घरातील तमाम माऊल्या तिला मुक्तहस्ते हळद लावत. माझ्याच लग्नात माझ्या डोळ्यात,नाकात,कानात गेलेल्या हळदी मुळे मला पंधरा दिवस पिवळ्या रंगाचीच  स्वप्नं पडत होती.

          लग्नाचं कार्यालय म्हणजे एक मोठ्ठा हॉल.  वरपक्षाला दोन , वधूपक्षाला दोन खोल्या व कोठीघर. अशा चार खोल्या. वऱ्हाडी मंडळींची संख्या व शौचालय, बाथरूम, गाद्या, उशा , चादरी, पंखे यांच्या संख्येचे गुणोत्तर  कायम व्यस्त. त्यामुळे इकडे सीमांतपूजन तर दुसरीकडे पंगतीतली जागा आणि पंख्याखालची गादी एकाच वेळी आरक्षित करण्यासाठी  मंडळींच्या कोलांट्या, सूरपारंब्या, लांब उडी, उंच उडी, यांची प्रात्याक्षिकं . जेवावं तर गादी निसटणार. गादी पकडणार तर उपाशी रहाणार- अशी अटीतटीची परिस्थिती. बरं, सीमांत पूजनाचं जेवण तरी कसलं हो? फोडणीचं आंबटगोड वरण, भाजी, पोळ्या, भात. असलाच तर घासभर साखरभात किंवा शिरा. दीड वितीच्या पोटाची खळगी भरणं आणि देहासाठी  साडेतीन हाताची गादी......लागतंच काय माणसाला शेवटी? असा साक्षात्कारही( तात्पुरता !) काही पुण्यवान जीवांना त्याप्रसंगी होत असे. पण काहीही म्हणा. हल्लीच्या ' संगीत' पेक्षा हा रिअँलिटी शो नक्कीच 'अस्सल' असे .

.                लग्नाचा दिवस. लग्नाच्या प्रत्येक विधीत 'जेन बे.बु.' नवरा नवरी जास्तीत जास्त हतबल , केविलवाणे आणि विनोदी कसे होतील ही थीम 'जेन सायलेंट' कटाक्षाने पाळत.'मेकअप,   हेअरस्टाईल' हे शब्द डिक्शनरीतच नसल्यामुळे एखादी चुणचुणीत ( आगाऊ) मैत्रिण नवरीला तयार करायला येई. हळदीचा पिवळा रंग झाकण्यासाठी,  गुलाबी पावडरचा थर फासला जाई. अनेक नवर्‍यांनी वापरलेल्या लिपस्टिकच्या थोटकाने ओठ रंगवले जात. नवऱ्या मुलीने हसू नये अशी थीम असल्याने  वेळोवेळी टिपं गाळण्याचा लघु कार्यक्रम होई. त्यामुळे पावडरच्या थरामधून ओघळांचे निसर्गचित्र तयार होई. लग्न लागलं की नवरदेव अक्षतांची ओंजळ  नवरीच्या डोक्यावर रिकामी करून निसर्गचित्रात जिवंतपणा आणित असे.

      आयुष्यात पहिल्यांदाच घातलेला सूट, गळा आवळणारा टाय , त्यावर टोपी आणि मुंडावळ्या या विसंगतीच्या ' थीम' मध्ये नवरदेव 'विदुषक'  दिसे.त्यात उन्हाळा असल्याने घामाच्या धारा वाटेल तिथून वहात. नंतर 'सुलग्न'. यात नवरा नवरीची डोकी एकमेकांवर आपटण्याचा एक अश्मयुगीन लोकप्रिय कार्यक्रम असे. ही प्रथा का? कशी? कुणी?  सुरू केली याचं सूतभरही गम्य नसणारी मंडळी सुलग्न लावतांना, डोकी आपटायचं परमकर्तव्य करून जात. काही तरुण मित्रमंडळी तर शक्ती पणाला लावून डोक्यांची टक्कर करित. मध्येच काही महिलावर्ग हळदी कुंकवाची बोटं नवरीच्या कपाळावर (  बायकांचं कपाळ हे केवळ हळदीकुंकू लावण्यासाठीच देवानं निर्माण केलं आहे!!!)  टेकवून नवरीच्या हातात एखादं  स्टीलचं भांडं सरकवीत.नवरीच्या अंगावर किती आणि कसं सोनं घातलं हे बारकाईनं बघताना, नवरीचे हात , मान ,कान कसेही ओढण्याचा , त्यांना जन्मसिद्ध अधिकार असे. वडीलधा-यांना वाकून नमस्कार..  आणि डोक्यांच्या टक्करेमुळे नवदांपत्याची कंबर व डोकं हमखास ठणकू लागे.  त्यात नवरीच्या मुंडावळ्या घसरून नाकावर येत ,केसांच्या पिसार्‍यात  लोंबकळलेले गजरे ,कपाळावर मळवट, घामाच्या धारा....... नवरदेवाची टोपी उत्तर - दक्षिण, अशी एकंदरित  "आपण यांना पाहिलंत का" ही थीम आपोआप निर्माण होई. नवऱ्याची बहिण आपलं दोन वर्षाचं कारटं नवरीच्या मांडीवर ठेवून, ‘नवीन मामीजवल कोन बशनार?’असं म्हणून निघून जाई. ते बाळ मामीचे केस आणि मुंडावळ्या ओढून तिच्या देखणेपणात भर घाली. महत्वाचं म्हणजे,वधुवरांच्या भुकेची कुणालाही पर्वा नसे.कारण सगळी मंडळी चिवडा लाडूच्या ताटावर ‘आक्रमण’ करण्यासाठी रणांगणात उतरली असत. हो.आमच्या काळात ‘फ्याशनेबल’ नाश्त्याची भानगड नव्हती. ताटं भरुन चिवडा लाडू कोठी घरातून मांडवात पाठवला जाई. पुढची जबाबदारी ही सर्वस्वी वऱ्हाडींची. ताटांभोवती गटागटानं बसून मंडळी ताटं ‘साफ’ करित.  कुणीतरी  कुटुंबवत्सल व्यक्ति एखादी गरम झालेली कोल्ड्रिंकची एक बाटली व दोन पुंगळ्या आणून देई. एकाच बाटलीतून दोघांनी पेय पिण्याचा तो एक तरल, अतिरोमॅंटिक क्षण अनुभवावा तर एक पुंगळी चेपलेली असे. पण पोकळ पुंगळीतून जे बेचव,कोमट पेय तोंडात येई त्यापेक्षा चेपलेली पुंगळी बरी......असं होई. एकूणच नवदांपत्याचं पूर्णतः मानसिक व प्रेक्षणीय खच्चीकरण म्हणजे 'जेन बे बु 'चे लग्नसमारंभ.

              त्यानंतर होम आणि सप्तपदी मध्ये उरल्यासुरल्या अवयवाची - अर्थातच डोळ्यांची आग होऊन डोळे  आपोआप मिटले जात. तसंही बाजूच्या जोडीदाराचा 'आधार कार्डावरील फोटोप्रमाणे' अवतार असल्याने डोळे मिटणं ही इष्टापत्तीच असे. हे सगळं कमी असे की काय तर अजून शारीरिक ऊर्जेच्या खच्चीकरणाचा प्रकार म्हणजे 'विहीणीची पंगत.' पोटात भुकेने कावळे कोकलत असताना, पानात अन्न वाढलं असतांना, विहिणबाईंचा षोडशोपचार मानसन्मान निवांतपणे केला जाई. मग जरा एखादा घास पोटात जात नाही तोच 'घास भरवा, उखाणा घ्या' हा खेळ सुरू होई. त्यावेळी तर उखाणा ऐकल्यावरच मोक्षप्राप्ती होणार .... या आविर्भावात  दोन्ही कुटुंबांच्या यच्चयावत पिढ्यांचे जीव कानात गोळा होत. आतातरी ते गारगोटी झालेले पदार्थ गिळावे म्हटलं तर कुणीतरी विलक्षण बेसूर आवाजात 'विहीण' म्हणू लागे.जेवण आणि  गाणं या दोन्ही संकटांना सामोरं जाताना पंगतीच्या घशात घास अडकत असे आणि  नवरीच्याही डोळ्यातून गंगा यमुना. आता नवरदेवालाही या करुण भावनोत्कट प्रसंगात भोजनावर आडवा हात मारणं शक्यच नसे. एकंदरित दोघेही अर्धपोटी रहात.शेवटी काय, लग्न हा आनंदी, उत्साही समारंभ नसून डोकं गहाण ठेवून स्वतःचं अप्रेक्षणीय असं प्रदर्शन आहे.... हे अर्थात लग्नानंतरच कळतं.

            असो. पण आजचे लग्नसमारंभ बघतांना, नवरा - नवरी खिदळतांना, फोटोशूटच्या वेळी नको ते चाळे करतांना - प्रत्येक विधीला 'थीममध्ये' बसवलेलं बघताना, संगीतमध्ये आख्ख्या कुटुंबाचं 'न भूतो न भविष्यति' नाचकाम बघतांना........... खरंतर एखादी केविलवाणी विनोदी   एकांकिकेची आठवण येते. वरवर बघतांना आमच्या पिढीतली लग्नं हास्यास्पद नक्कीच होती पण त्यात सच्चेपणा होता.  आजचं लग्न हा एक आभासी आनंदाचा खर्चिक मुखवटा आहे. आणि त्यातली मेख अशी की आपण हा आनंद ओढूनताणून मुठीत पकडून आपलीच फसवणूक करतोय....  समजून उमजूनही....! हाही खरंतर एक केविलवाणा विनोदच!!! विवाह समारंभ हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात अतिमहत्त्वाचा दिवस असतो.पण समस्त लग्न विधींना साग्रसंगीत समाजमाध्यमांवर प्रसिद्धी देण्याइतका तो अभिनव  ही नसतो. अगदी पांढऱ्याशुभ्र घोड्यावरून एखादा देखणा राजकुमार हलकेच प्रगट ह्वावा.....हे स्वप्न अर्थातच प्रत्येक लग्नेच्छु तरुणीचं असतं ,यात वावगं काहीच नाही. अशक्य असणारं स्वप्न बघायला काय हरकत आहे? पण ज्या स्वप्नांचा भविष्यात सुतराम संबंध नाही, ती स्वप्नं एका दिवसा करिता प्रत्यक्षात आणण्यासाठी किती आटापिटा? किती खर्च?, बॉलिवूडच्या,टीव्ही सीरियल मधल्या, किंवा अब्जोपती उद्योगसम्राटांच्या विवाह समारंभांचं अनुकरण आपण सामान्यांनी का करावं? त्यामुळे नेमकं काय सिद्ध होतं? कुणी करेल का विचार???

#marriageceremony

#genbabybumer




__________________________


डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

 ९/१३५, केला प्लॉट, जठारपेठ, अकोला 

४४४००५

९४२२९३९५१०







4 comments:

  1. नेहमी प्रमाणेच नर्मविनोदी शरकरावगुंठित लेख

    ReplyDelete
  2. मस्त!! दोन्ही प्रकारच्या लग्नाचं नेमकं वर्णन. आधी खूप दबावाखाली राहिल्यामुळे आताची पिढी त्यांना वाटेल ते बिनधास्त करत असते. कालाय तस्मै नमः!!!!

    ReplyDelete
  3. लक्ष्मण देशपांडेच्या "वऱ्हाड......"
    ची आठवण झाली.
    विवाह सोहळा डोळ्यासमोर तरळून गेला...

    ReplyDelete
  4. खूप छान
    कालाय तस्मै नमः
    अनुकरण करण्यात धन्यता मानणारी ही पिढी त्यामुळे खरेपणा , सच्चेपणा वगैरे काय प्रकार कळत ही नसेल कदाचित.

    ReplyDelete

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...