आज 'शिक्षक दिन'. या निमित्ताने पुलं आणि त्यांचे शिक्षक यांचे स्मरण करु या - -त्यांच्याच शब्दात.
"माझ्या तथाकथित रम्य बालपणाला तडा पाडण्याच्या श्रेयाचे पहिले मानकरी 'दामले मास्तर' हे नाव धारण करणारे कर्दनकाळ होते. आपल्या ताब्यात चार घरची पोरे ही केवळ चिंचेच्या फोकाने फोडून काढण्यासाठीच पाठविण्यात येतात, असे त्यांनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला त्याच दिवशी ठरविले असावे. दामले मास्तर चुकूनसुद्धा आजारी पडत नसत. कवितेला चाल लावणे त्यांना अजिबात मंजूर नव्हते. ते ज्या आवाजाने "भाते पिकून पिवळी झाली" म्हणत , ते ऐकून हिरवी भाते पिवळी झाली असती. शाळेला काही लोक कोंडवाडा म्हणतात. आमचा कोंडवाडा नव्हता, कसाईखाना होता. अनेकांच्या सुऱ्या आमच्या कोवळ्या मानेवरून फिरत. त्या सामुदायिक कत्तलीत तत्कालीन आईबापे आणि पंक्तीचे पाहुणेही मोठ्या हौसेने भाग घेत.
शहाजीचा मुलगा शिवाजी याने मावळे गोळा करून मुघलांचा काटा काढला आणि हिंदूंचे राज्य स्थापन केले एवढ्या एका वाक्यात दामले मास्तरांनी सारा इतिहास समर्पक रीतीने गुंडाळला होता. आमच्या काळात सगळ्या शाळांचे बोधचिन्ह "गप्प बसा" असे होते. माझे बालजीवन होरपळून टाकण्याची पहिली जबाबदारी दामले मास्तरांनी घेतली आणि नंतर अनेक मास्तरांनी तिला हातभार लावला.
भाषा नामक विषयाचे 'गद्य' आणि 'पद्य' असे ठळक दोन हिस्से वाटले होते. गद्य नाही ते पद्य आणि जे पद्य नाही ते गद्य असे. आणि गद्यातले तलाठ्याने काढून दिल्यासारखे उतारे असत. इंग्रजी दुसरीत गोळे नावाचे एक मास्तर आम्हाला कविता शिकवीत. हे गोळे मास्तर सगळ्या कविता "कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की" या सुरावर वाचायचे. सगळे शिक्षक विद्यार्थ्याला विषयाची गोडी लागेल म्हणून भीत असत. आम्हाला इंग्रजी शिकविणारे मास्तर दशग्रंथी इंग्रजी शिकवत त्यामुळे 'यज्ञेन यज्ञ मय जन्त देवा:' या चालीवर 'जॅक अँड जिल' चालत असे. खेळ हा बाल
जीवनातला एक आसरा असतो असे म्हणतात. पण ड्रिल मास्तर नावाच्या शत्रुने तोही उध्वस्त केला. उजवीकडून काही पाहण्यासारखे जात असताना हे मास्तर नेमके 'बाये निघा' करायचे. हिंदी या भाषेशी पहिला संबंध 'दाहिने निघा', 'बाये निघा', 'कदम खोल 'असल्या क्रूर शब्दातून आल्यामुळे, त्या भाषेविषयी मी धास्तीच घेतली आहे.
सगळेच शिक्षक असे नव्हते. काही भले शिक्षकही असत. पण मंगळाच्या मुलीसारखे आम्हाला ते लाभत नसत. भूगोलाच्या मास्तरांनी 'मसाल्याची बेटे कुठली' हा प्रश्न सदैव सुषुम्नावस्थेत असणाऱ्या शामू तळेकरला विचारल्यावर, 'बेडेकर आणि कुबल' असे उत्तर देऊन त्याने मान टाकली होती. मास्तरांनी त्याला धरून कुबल कुबल कुबलला.
अकरा वर्ष चाललेल्या या निरुपयोगी उद्योगात सारे बालपण पायाखालच्या चटके देणाऱ्या वाळू सारखे सरकले. शेवटी काय, आयत्या वेळी उपयोगी पडणारे हाती काहीच लागले नाही. हाती लागला फक्त मार आणि म्हणूनच त्या बालपणाला ज्या कोणी महाभागाने 'विद्यार्थी दशा' म्हटले त्याचे कौतुक करावे असे वाटते".
'हसवणूक'-- यातील "बिगरी ते मॅट्रिक " या लेखातून.
#हसवणूक
#बिगरीतेमॅट्रिक
#शिक्षकदिन
No comments:
Post a Comment