Friday, May 27, 2022

निमाचा सुवर्णमयी इतिहास, भाग १ला.


 एन आय एम ए- एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा

=================

एन आय एम ए चा अमृत महोत्सव नुकताच सुरू झालाय. 75 वर्ष झालीत .शून्यातून निर्माण झालेल्या या संघटनेची ओंजळ आज पूर्णपणे भरलेली आहे .पण 75 वर्षांपूर्वी, रित्या ओंजळी पासून  सुरू झालेला हा प्रवास आज पर्यंत कसा घडला असेल?

 ही संघटना सुरू करण्याची गरज केव्हा आणि कशासाठी भासली असेल? संघटनेचा प्रवास हा खाच खळग्यातून एका पाऊल वाटेपर्यंत... 

पाउलवाटेपासून एका सडके पर्यंत.... 

सडके पासून एका रस्त्यापर्यंत....  

रस्त्यापासून एका महामार्गा पर्यंत .....

आणि महामार्गापासून एक्स्प्रेस हायवेच्या दिशेने जाणारा हा प्रवास कसाअसेल?

 संपूर्ण भारतात या संघटनेचा प्रसार कसा झाला असेल?

     आज हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना दूरदृष्टी ठेवून कार्यक्रमाचं आयोजन करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच इतिहासात डोकावून बघणं,सुद्धा आवश्यक आहे. आज समस्त निमाच्या सदस्यांना निमा चा इतिहास, त्यावेळचा संघर्ष, त्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करणारे निमाचे पदाधिकारी, यांच्याबद्दल  माहिती  देणं... हा सुद्धा अमृत महोत्सवाचा एक अपरिहार्य भाग आहे.इतिहास हा नेहमीच मार्गदर्शन करित असतो. विशेषतः आजच्या तरुण निमा कार्यकर्त्यांना संघटनेच्या इतिहासाची जाणीव असणं फार गरजेचं आहे.

             चला तर मग......

 जाणून घेऊया संघटनेचा हा प्रवास. कधी उत्कंठापूर्ण ...कधी मनोरंजक... कधी व्यथित करणारा... कधी निराश करणारा.... पण नेहमीच प्रेरणा देणारा.......!

 चाळूया संघटनेच्या इतिहासाची पाने....... दर पंधरा दिवसांनी. 

 

एन आय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा ....

. भाग २

===================

        प्रत्येक देशाची काही ना काही वैशिष्ट्ये असतात .आपला देश ही अनेक समृद्ध अशा परंपरांमुळे विश्वात ओळखला जातो. त्यापैकी एक परंपरा म्हणजे 'वैद्यकशास्त्र'- अर्थातच 'आयुर्वेद'. सुमारे चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचं हे शास्त्र आजही समाजाला निरोगी ठेवण्यात अग्रेसर आहे. असं म्हणतात, की काळाच्या ओघात जे टिकून राहतं तेच सत्य होय. सत्याची ही व्याख्या आयुर्वेद शास्त्राला तंतोतंत लागू पडते.

 पण अशा या त्रिकालाबाधित शास्त्राचं अस्तित्व वेळोवेळी सिद्ध का करावं लागतं हा प्रश्न आजच्या पदवीधारकांना पडणं सहाजिकच आहे.

       आयुर्वेद शास्त्र भारतीय जनमानसांच्या दैनंदिन जगण्यात रुजलं आहे. परंपरा, उत्सव, सण आणि संस्कृती यातून आयुर्वेदाची तत्त्वे सहजपणे आचरणात आणली जातात. पूर्वीच्या आजीबाईच्या बटव्यापासून  तर नुकत्याच  कोविडच्या महामारीत आयुर्वेदानं कायम समाजाला आजारपणातून दिलासा दिला आहे.

         पण ............

  पण हेच शास्त्र जेव्हा पाठ्यपुस्तकात बंदिस्त झालं, विद्यापीठातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू लागलं, कायदे ,ठराव, नियम, अधिनियमाच्या चौकटीत अडकलं, विद्यार्थ्यांच्या पदवीत विराजमान झालं तेव्हा मात्र शास्त्राच्या प्रवासात खाचखळग्यांची शृंखला सुरू झाली ती आजतागायत.

      या पूर्ण इतिहासाच्या कालखंडात परिस्थिती बदलत होती, शासनकर्ते बदलत होते, शास्त्राचे पदवीधर बदलत होते,शैक्षणिक धोरणं बदलत होती पणआयुर्वेद पदवीधरांसमोरचे प्रश्न मात्र कायम होते. प्रश्नांचं स्वरूप काळानुरूप बदलत होतं पण प्रश्नांमधून आजपर्यंत सुटका झाली नाही हे मान्य करावेच लागेल. 

 1918 साली महाराष्ट्रात मुंबई,पुणे,नगर, सातारा ,नागपूर, सूरत, नदियाड याठिकाणी आयुर्वेद आणि पाश्चात्त्य वैद्यक एकत्रित शिकवणारी महाविद्यालये सुरू झालीत.

           1920 मध्ये जळगाव जिल्ह्यातील फैजपूरला काँग्रेसचे एक अधिवेशन भरले होते. त्यामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल ,महात्मा गांधी, पंडित नेहरू, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न चर्चेला आला असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक ठराव मांडला.

 "Everything good in Modern Science and Ancient Ayurved should be fused and a new course should be started suitable for the people of this country ".

      हा ठराव म्हणजे पंडित नेहरूंच्या सखोल विचारांचं आणि दूरदृष्टीचं एक उदाहरण आहे. हा ठराव सर्व संमतही झाला .1925 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात तसेच डॉक्टर अजमल अली खान यांनी युनानी- पाश्चात्त्य- आयुर्वेद एकत्रित शिकण्यासाठी अलिगड येथे महाविद्यालय सुरू केले.

 1942 मध्ये मुंबई येथे   डीएएसएफ हा कोर्स सुरू झाला. भारतात अनेक ठिकाणी संमिश्र पॅथीची महाविद्यालयै सुरू झालीत.

        1947 साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वैद्यकीय शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या. चोप्रा कमिटी, उडूपा कमिटी इत्यादींनी पाठवलेले ठराव मात्र आरोग्य समितीकडून नाकारले गेले. परंतु या कालावधीत आपल्या पदवीधारकांकडून मात्र समाजाला उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जात होती. शिक्षणातील सुसूत्रीकरण, नोकर्‍यांमधील समानता,विविध कमिट्यांनी सुचविलेले प्रस्ताव.,पदवीला राजमान्यता......याकडे मात्र शासनाचं होणारं दुर्लक्ष ही अत्यंत व्यथित करणारी बाब होती.

किती काळ हा अन्याय सहन करायचा????

किती काळ ही मुस्कटदाबी सोसायची????

आपले हक्क आणि अधिकार सहजपणे मिळत नसतील तर ते भांडून मिळवायचे असतात ही स्वातंत्र्यसैनिकांची वृत्ती आयुर्वेद पदवीधारकांमधे उपजत होतीच.

सगळ्यांनी एकत्र येऊन आपणच आपले प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न करणे ही त्या काळाची गरज होती. त्यामुळे 13 एप्रिल 1948 रोजी आंध्रप्रदेशचे डॉक्टर सूर्यनारायण राव यांच्या मार्गदर्शनाखाली सभा होऊन नॅशनल मेडिकल असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली.

आणि सुरुवात झाली एका अविरत संघर्षाची......एका अस्तित्वाच्या लढ्याची.......

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

                          ==================

 एनआय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा 

भाग ३

===================

 "नॅशनल मेडिकल असोसिएशनची" मुहूर्तमेढ 1948 साली रोवण्यात आली. आता संमिश्र चिकित्सा पद्धतीची महाविद्यालये संपूर्ण भारतात सुरू झाली होती. एकीकडे समाजाचे आरोग्य मिश्र  चिकित्सकांमुळे उत्कृष्टपणे सांभाळले जात होते तर दुसरीकडे शासनमान्यता, रजिस्ट्रेशन,पदवीधरांचे हक्क... इत्यादी कायदेशीर बाबींमध्ये  मात्र अडचणी वाढत होत्या. अशा परिस्थितीत एकत्र येऊन लढा देणं ही काळाची गरज होती आणि लढण्यासाठी संघटना आवश्यक होती. अनेक समविचारी पदवीधरांनी एकत्र येऊन आपल्यातील नेतृत्व पणाला लावले.अनेक बैठकी,अनेक चर्चांच्या मंथनातून  अखेर नॅशनल मेडिकल असोसिएशन चा पाया हा 1948 साली रचला गेला.

         दिल्ली येथे अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भरली असताना, विजयवाडा येथील डॉक्टर सूर्यनारायण राव यांना अध्यक्षपदावर तर दिल्लीचे डॉक्टर भद्रा सेन यांना सचिव पदावर नियुक्त केले केले. या संघटनेच्या बांधणीमध्ये दक्षिण भारतातील डॉक्टर वाय कुंडल राव, डॉक्टर सी द्वारकानाथ, डॉक्टर महादेव शास्त्री, पंजाबचे डॉक्टर प्यारेलाल गुप्ता, उत्तर प्रदेशचे डॉक्टर आर.डी. ग्रोवर, डॉक्टर पी एन गुप्ता, दिल्लीचे डॉक्टर पी के सेठ, मुंबईचे डॉक्टर पी एन  अवस्थी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

 या संघटनेमुळे शासन प्रणाली शी संघर्ष करण्याचा राजमार्ग आयुर्वेद स्नातकांसाठी मोकळा झाला.

             यापुढे 1950 मध्ये महाराष्ट्रात बॉम्बे मेडिकल असोसिएशन, पुना मेडिकल असोसिएशन, खानदेश मेडिकल असोसिएशन, अहमदनगर मेडिकल असोसिएशन, नाशिक मेडिकल असोसिएशन ,या संघटनांची निर्मिती झाली.

 1952 मध्ये महाराष्ट्रात जी एफ ए एम हा कोर्स सुरू झाला.

 1953 मध्ये महाराष्ट्रा बाहेर म्हैसूर मेडिकल असोसिएशन, मद्रास मेडिकल असोसिएशन, तसेच उत्तर प्रदेशात यूपी नॅशनल मेडिकल असोसिएशन, कलकत्ता येथे असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ कलकत्ता, गुजरात मेडिकल असोसिएशन अशा विविध राज्यांमध्ये संघटनेची पायाभरणी झाली.

  थोडक्यात सांगायचे झाल्यास, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय जनतेने दिलेल्या लढ्याची ठिणगी आपल्या व्यावसायिकांमधेही धगधगत होतीच. त्या ठिणगीचं रूपांतर संघटनेत झालं.

    संघटनेचं महत्त्व, संघटनेत असणारी शक्ती - या काळात प्रकर्षाने अधोरेखित झाली. आयुर्वेद शास्त्राच्या पदवी धारकांच्या उज्वल भवितव्यासाठी संघटनेची भूमिका अत्यंत मोलाची आहे- याची जाणीव सगळ्यांना झाली. .आपले विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटना रुपी हुकुमाचा एक्का अस्तित्वात 

आल्याने आपल्या स्नातकांना खूप दिलासा मिळाला.....आणि सुरुवात झाली एका संघर्षाची...

एका धडपडीची.......

आत्मसन्मान टिकवण्याची......

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


===================

🔆 *एन आय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा* 🔆

*भाग ४*

===================


         "There is no reason why we should not  bring out an alliance of old experience and knowledge as exemplified in the Ayurvedic and  Unani systems, with the  new  knowledge, that the  modern science has  given  us.The question is thus, not of conflict between the various  systems but of sound education in knowledge as it is today and then the freedom to  apply in accounting to  any  system. It is the scientific approach that  is important." 

हे शब्द आहेत भारताचे पहिले पंतप्रधान "पंडित जवाहरलाल नेहरू" यांचे. भारताच्या सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून  अत्यंत अमूल्य आणि मूलभूत असा विचार त्यांनी मांडलेला होता - जो त्या काळातही योग्य होता आणि आजही काळाच्या कसोटीवर तो खराच आहे. परंतु काही सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थापोटी ही सत्याची बाजू कायम झाकून ठेवण्यात राज्यकर्ते यशस्वी ठरले हे नाकारता येत नाहीच. सूर्यप्रकाशा सारखं सत्य सर्वज्ञात असलं, तरी ते पदरी पाडून घेण्यासाठी वर्षानुवर्षे लढा द्यावा लागावा...... हे दुर्दैव नाही तर दुसरं काय???

         संघर्ष तर आपल्या व्यावसायिकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. 1950 मध्ये पंजाब सरकारने आपल्या पदवीधारकांनी नावामागे डॉक्टर लिहू नये असा फतवा काढला. त्यावेळी आपल्या पदवीधारकांना अर्थातच हा अन्याय मोडून काढण्यासाठी शक्ती आणि युक्ती खर्च करावी लागली. अन्यायाला वाचा फोडण्यात यश आल्यामुळे तत्कालीन स्वास्थ्य मंत्री श्री गोपीचंद भार्गव यांनी मध्यस्थी केली व हा अपमानकारक फतवा मागे घेण्यात आला

      1959 साली  लोकसभेत ड्रग रुल्स अंतर्गत टू (ee)(iii) या कायद्याचा समावेश केला. त्यामुळे राज्य सरकार द्वारे अधिकृतरित्या आपल्या स्नातकांना आर. एम. पी. ही पदवी देण्याचा आदेश काढण्यात आला.

       महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात ही राज्ये प्रामुख्याने आपल्या स्नातकांच्या भविष्याबाबत जागरूक होती. या राज्यांमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून सतत स्नातकांच्या न्याय्य मागण्यांचा पाठपुरावा केला जात असे.

 म्हैसूर येथे "गव्हर्मेंट आयुर्वेद अँड युनानी ग्रॅज्युएट असोसिएशन"- ही डॉक्टर गुंडप्पा यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत सक्रिय अशी संघटना होती.

         1958 साली "नॅशनल मेडिकल गॅझेट" या नावाचे मुखपत्र ग्वाल्हेर येथून प्रसिद्ध होऊ लागले. डॉक्टर हणमंतराव मुजुमदार व डॉक्टर अशोक मुटरजाट यांचा त्यात पुढाकार होता.

         1960 मध्ये "इंटिग्रेटेड मेडिकल जर्नल" हे म्हैसूर येथे सुरू झाले .त्यामुळे आयुर्वेद स्नातकांच्या  वैचारिक आदान-प्रदानाला अधिक चालना मिळाली व व्यक्त होण्यासाठी एक सशक्त माध्यम निर्माण झाले.

        1961 साली कर्नाटकात "कर्नाटक आयुर्वेद युनानी रजिस्ट्रेशन ॲक्ट" ची निर्मिती झाली. त्याच वेळी "कर्नाटक आयुर्वेदिक युनानी प्रॅक्टिशनर बोर्ड" ची स्थापना झाली. या घटनेमुळे कर्नाटकातील स्नातकांना विलक्षण दिलासा मिळाला हे काही वेगळं सांगायला हवं??

      याच वर्षी म्हणजे 1961 डिसेंबर मध्ये पुण्यात लक्ष्मी रोड येथील गोखले हॉलमध्ये राज्यव्यापी अधिवेशन भरविण्यात आले. अधिवेशनाचे अध्यक्ष पुण्याचे डॉ. वा.क. साठे हे होते. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री "श्री यशवंतराव चव्हाण" यांच्या हस्ते झाले. डाॅ. वा.क. साठे, डॉ. बा.शं. बिडकर, डॉ.अ.वि. गोहाड, डॉ. मोहन देशपांडे, डॉ. के व्ही शहा, डॉ. व्ही व्ही भागवत, डॉ. ज. के बर्डे या दिग्गजांनी हे अधिवेशन यशस्वी यशस्वी करण्यासाठी जीवापाड परीश्रम केले.

       या अधिवेशनाचं मुख्य फलित म्हणजे या एकत्रीकरणातून महाराष्ट्रात संघटनेचा पाया रचणारी अनेक महनीय व्यक्तिमत्वे उदयास आली.  आयुर्वेद स्नातकांच्या सुरक्षित आणि सन्मान्य भविष्याचा या महान व्यक्तिंनी घेतलेला ध्यास व त्यासाठी केलेले प्रयास.......

 आणि  अमृत महोत्सवानिमित्त आपल्यासमोर येत असलेला हा   गौरवपूर्ण इतिहास.........  

हा इतिहास तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणादायक ठरावा.......हीच अमृतमयी आशा

           

===================

🔆  *एन आय एम ए- एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा* 🔆

*भाग ५*

===================

               मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, १९६१ मध्ये पुण्यात भरविलेले, समन्वित चिकित्सेचा पाठपुरावा करणारे राज्यव्यापी अधिवेशन हे अनेक अनेकार्थाने यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या अधिवेशनाची प्रसिद्धी आणि चर्चा संपूर्ण देशात होऊ लागली आणि मिश्र चिकित्सा पद्धतीच्या चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्राकडे बघण्यात येऊ लागले .अनेक  स्नातकांमधील सुप्त नेतृत्वगुण प्रगट होण्यासाठी या परिषदेने बराच हातभार लावला. तसेच महाराष्ट्रातील चळवळीला एक योग्य दिशा मिळण्यास मदत झाली.

        १२ व १३ मार्च १९६६ रोजी ग्वाल्हेर येथे "अखिल भारतीय चिकित्सा परिषद" आयोजित केली होती. त्यावेळी सर्वानुमते "नॅशनल मेडिकल असोसिएशन" चे नामकरण नव्याने करण्यात आले - म्हणजेच त्यात " इंटिग्रेटेड "या शब्दाचा अंतर्भाव करून, "नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन "हे नामाभिधान करण्यात आले.

       या "इंटिग्रेटेड" शब्दा मागची कहाणी अशी की २१ एप्रिल १९५९ रोजी राज्यसभेत "फार्मसी अ‍ॅक्ट अमेंडमेंट बिल" यावर चर्चा सुरू असताना मिश्र चिकित्सेच्या संदर्भात, तत्कालीन आरोग्य मंत्री माननीय श्री. डीपी करमरकर यांनी "इंटिग्रेशन" हा शब्द उच्चारला होता. हा शब्द आपल्या संघटनेचे नेमकेपणाने प्रतिनिधित्व   करेल असे संघटनेतील नेत्यांच्या मनात आले होते. मिश्र चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या चळवळीला  "इंटिग्रेशन" या शब्दाइतकं अचूक वर्णन दुसरं कोणतं असू शकेल? पण हे नवीन नामकरण होण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली.

      याच दरम्यान देशात "निखिल भारतीय आयुर्वेद" विद्यापीठातून शिकून बाहेर पडणार्‍या, शुद्ध आयुर्वेदाच्या  स्नातकांची संख्याही भरपूर प्रमाणात वाढत होती. शुद्ध आयुर्वेदाचा आग्रह धरणाऱ्या या मंडळींनी "आयुर्वेद महासम्मेलन" ही संघटना निर्माण केली होती. १९६७ साली पंडित शिव शर्मा यांनी लोकसभेत मिश्र चिकित्सा व मिश्र चिकित्सकांना कडाडून विरोध केला. त्यांच्या विरोधाला उत्तर म्हणून एन आय एम ए च्या नेत्यांनी केंद्र तथा राज्य सरकारच्या स्तरावरील सगळ्या खासदारांसमोर आपली भूमिका लेखी स्वरूपात मांडली होती. एकाच पॅथीचा अट्टाहास न करता , इंटिग्रेशन मुळे व्यावसायिकांचा आणि समाजाच्या आरोग्याचा स्तर उंचीवर कसा जाऊ शकतो, यावर लेखी निवेदनात विस्तृत प्रकाश टाकला होता.

       याचाच परिणाम म्हणून, याच  संदर्भात १९६९ मध्ये "इंडियन मेडिसिन" यावर एक बिल संसदेत मांडण्यात आले. हे बिल पुढे चर्चेसाठी स्टॅडिंग

समितीकडे पाठवण्यात आले. हे बिल मिश्र चिकित्सा पद्धतीला पूरक होते आणि अनेक खासदारांचा त्याला पाठिंबा होता. पण त्यावेळी सुद्धा  

महासंमेलनाचे नेते या बिलाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री श्री बी एस मूर्ती व श्री के के शहा यांनी आश्वासन दिले कि शुद्ध आयुर्वेद आणि मिश्र चिकित्सा पद्धती या दोन्हीचे ही वेगवेगळे शेड्युल्स करण्यात येतील. परंतु कायदा व मी विधी मंत्रालयाने यावर आक्षेप घेऊन दोन शेड्युल्स करणे अडचणीचे ठरेल असे जाहीर केले. व असे करण्यासाठी कायद्यात वेगळी तरतूद करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. संसदेत मिश्र चिकित्सा पद्धतीचा पुरस्कार करणारे "श्री व्ही एन गाडगीळ", "श्री बापू काळदाते", "श्री मधु दंडवते" यांच्यासारखे कुशल संसदपटू नेहमीच आपल्या इंटिग्रेशनच्या  भूमिकेचे समर्थन करीत असत.

         शासन स्तरावरील या सगळ्या घडामोडी बघता, संपूर्ण देशात एकच संघटना असणे हे गरजेचे होते कारण त्यामुळे लढ्याला बळ प्राप्त होणार होते. म्हणून  १९६९साली एक फेब्रुवारीला, भोपाळ येथे अखिल भारतीय वैद्यक परिषद भरली असताना, सगळ्या राज्यस्तरीय संघटनांनी एकाच देशव्यापी संघटनेत विलीन व्हावे असा निर्णय घेण्यात आला. आणि देशस्तरावर "नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन" ची निर्मिती झाली.

 संघटनेची घटना याच परिषदेत लिहिली गेली.

 १९६९ एप्रिल मध्ये संघटनेची प्रथम केंद्रीय परिषद दिल्ली येथे संपन्न झाली. "डॉक्टर  पी एन अवस्थी", मुंबई यांचे अध्यक्षपदी आणि "डॉक्टर के एस पोद्दार", दिल्ली यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

   संघटना निर्माण झाल्यानंतर चॅरिटी कमिशनर कडे नोंदणी करणे गरजेचे होते. "डॉ. एस पी किंजवडेकर", मुंबई यांनी २४|४|७२ रोजी, "सोसायटीज एक्ट अँड पब्लिक ट्रस्ट, नं.एफ २४६९, मुंबई येथे नोंदणी केली.

     पाया जितका खोल आणि पक्का, तितकीच वरची इमारत मजबूत आणि टिकाऊ असते.आज,अमृत महोत्सवानिमित्त, संघटनेतील भक्कम पाया रचणाऱ्या शिलेदारांचे स्मरण करणे आवश्यक आहे . याचे पहिले कारण  म्हणजे ते शिलेदार आजही दीपस्तंभासारखे आपल्याला मार्गदर्शन करित आहेत, प्रेरणा देत आहेत. दुसरे कारण म्हणजे, शंभर वर्षानी संघटनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आपण आपल्या पुढील पिढीला काय  संचित देणार आहोत????? याचा अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी...............

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

          


Sunday, February 6, 2022

आलोक - एक अस्वस्थ करणारा अनुभव



     २०१६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'आलोक' हा आसाराम लोमटे लिखित कथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. २०१०  मध्ये प्रकाशित झालेल्या या कथासंग्रहाची पाचवी आवृत्ती मी वाचली. खरंतर बऱ्याच उशिरा माझ्या हाती हे पुस्तक आलं .अनेक वाचकांचं हे पुस्तक वाचून झालं असेल आणि त्यावर प्रतिक्रियाही देऊन झाल्या असतील.उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेतल्यावर त्याबद्दल  दुसर्‍यांना सांगण्याची ऊर्मी निर्माण होणं हा मानवी स्वभाव  आहे आणि याच उद्देशानं मी हातात पेन धरलं.

       मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एक एक कथा वाचताना एखादा चित्रपट डोळ्यासमोरून सरकतो आहे, असा अनुभव आला- इतकं जिवंत आणि प्रत्ययकारी हे लिखाण आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्तरांवर माणसांचं होणारं शोषण, शोषित व्यक्तिंचा जगण्यासाठीचा संघर्ष,  शोषितांच्या मनातले सल,आणि त्यांच्या मनाच्या तळाचा शोध - -हे सर्वसाधारण सूत्र सगळ्या कथांचं आहे.

       पांढरपेशा, वातानुकूलित, नागरी समस्यांमध्ये गुरफटून स्वतःच्या अडचणींचं भांडवल करणाऱ्या शहरी वाचकांचा सुरक्षित कोष टराटरा फाडणाऱ्या या कथा आहेत. लेखकाची ग्रामीण पार्श्वभूमी, पत्रकार असल्यामुळे विविध अनुभवांची शिदोरी, घटना- प्रसंग टिपणारं संवेदनशील मन, त्यातून मानवी स्वभावाचं केलेलं चिंतन, अन्याय- शोषण यामुळे मनात साचलेली खदखद आणि अस्वस्थता....... आणि हे व्यक्त करण्याची  प्रबळ ऊर्मी यांचं बेमालूम रसायन म्हणजे हे पुस्तक.  या सगळ्या अस्सल अनुभवांना मांडणारी ..'भाषा'- हे या पुस्तकाचं बलस्थान आहे.

    शहरी सुरक्षित चौकटीत जगणाऱ्यांच्या कल्पनेपलीकडचं एक ग्रामीण जीवन या कथांमधून समोर येतं. ते केवळ समोरच येत नाही तर थेट मेंदूवर हल्ला करतं, हृदयात कळ आणतं. नेहमीची गुळगुळीत घासलेली, मनावरून ओघळून जाणारी भाषा यात नाही. तर अस्सल ग्रामीण प्रतिमा, प्रतीकं आणि लोककथांमधून रुजलेली, मुरलेली शब्दसंपदा आपल्या मनात रुतत जाते.

 - 'आभाळातून कणी कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर'.......

 - 'हे सरकार शेळीसारखं आस्तंय. कासेत बुक्क्या  हाणल्याशिवाय शेळी पान्हा सोडत नाही'....

 - 'कापसाचा कोकडा पडावा तसे सगळ्यांचे चेहरे झालेले'.....

  - 'आडरानात अब्रू लुटलेल्या बाई सारखं पोरकेपण भवती दाटून आलं'.....

 - 'चांगल्या वाड्याला घूस लागावी आणि तिनं रोज उकीर आणून बाहेर टाकावा तसं त्यांच्या टकूर्‍यात झालं'.....

- 'शंका - कुशंका -अंदाज - आडाखे अशा सगळ्या गोष्टींनी टम्म फुगलेली रात्र एखाद्या बुडून वर आलेल्या प्रेतासारखी तरंगायला लागली '........

 अशी थेट मेंदूवर धडका देणारी भाषा वाचतांना वाचक कथांमधे गुंतत जातो.

     'चिरेबंद' कथेचा नायक काही काळासाठी, गावी आजोबांच्या वाड्यात आलेला आहे. आजोबा आता हयात नाहीत. एकुलता एक वारस असूनही, नायकाला वाड्याबद्दल कणभरही आस्था, ओल जाणवत नाही. कारण आजोबांनी लोकांचे शोषण करून ही वास्तू उभारली आहे- हा सल त्याच्या मनात आहे. एकीकडे ही बोच असल्यामुळे स्वतःचा हक्क नाकारणारा नातू आणि दुसरीकडे या प्रचंड वाड्यात एकट्या राहणाऱ्या आजीची जगण्याची असोशी याचा धांडोळा या कथेत लेखकाने घेतला आहे.नातवाची अनास्था आणि आजीचा चिवटपणा रंगवणारी ही कथा संथपणे अंगावर चाल करुन येते.

     गावात शेती करणाऱ्या मोठ्या भावात आणि शहरात नोकरी करणार्‍या लहान भावात वाढत जाणारं अंतर .......पण त्याच वेळी मनाच्या तळात दाबून ठेवलेलं प्रेम- यातील अगतिकतेचं वर्णन आतड्याला पीळ पाडणारं आहे. पुढे मोठ्या भावाच्या आत्महत्येमुळे, लहान भावात निर्माण झालेला अपराधी भाव आणि विधवा वहिनीचा जगण्याचा चिवट संघर्ष -  'ओझं' या कथेतून आपल्यासमोर येतो.

    आप्पांसारख्या निरलस आणि प्रामाणिक समाजसेवका बरोबर काम करित असताना, 'खुंदळण' या कथेचा नायक, आर्थिक गरजेसाठी, नाइलाजास्तव आप्पांचा हात सोडून, आमदारांच्या पक्षात दाखल होतो. पण क्षणोक्षणी बोचणारा अपराधी भाव त्याला आतून कुरतडत असतो. ही त्याची कुतरओढ अत्यंत परिणामकारकतेने लेखकाने साकारली आहे.

        'कुभांड' कथेतली साधीसुधी अंगणवाडीत खिचडी शिजवणारी गवळण बाई. तिचं लहान लेकरु खेळता खेळता माली पाटलांच्या बागेतील  मोसंब्या तोडतं. यावरून माली पाटील त्या मुलाला मारतात आणि गवळण बाईला वाटेल तसं बोलतात. ही संधी साधून माली पाटलांच्या विरोधात  असणारे सरपंच तिला पोलिसात तक्रार नोंदवायला सांगतात. खरं युद्ध असतं माली पाटील आणि सरपंच यांचं. पण भरडली जाते गवळण बाई. तिच्या सामान्य आयुष्यात उलथापालथ होऊन तिचं जगणं कठीण होतं. फुकट ओढवून घेतलेल्या संकटाचं ओझं घेऊन जगणारी गवळणबाई वाचकालाही अस्वस्थ करते.

      'जीत' या कथेतली हरी ची विधवा पत्नी, अकाली वैधव्याचा धक्का सहन करून आपल्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करुन, जगण्याचा संघर्ष करण्यास सिद्ध झालीय पण पण गावातले राजकारणी तिला निवडणूक लढविण्यास बाध्य करतात. काळ्या आईकडे दुर्लक्ष करून दारोदार मतं मागताना होणारी तिची घुसमट वाचकांना सुन्न करते. निकालाच्या दिवशी ती सारं सोडून शेतात धाव घेते. भरलेली कपाशीची बोंडं बघून ती इतकी हरखून जाते की निवडणुकीतला विजयही तिला कवडीमोल वाटतो. सत्तेसाठी निष्पाप जनतेच्या  शोषणाची ही कथा व्यथित करुन टाकणारी आहे.

     'वळण' या कथेत लहानगी प्रयाग शाळेतून घरी येताना एका  हत्येची घटना बघते. तिचं चिमुकलं भावविश्व या घटनेनं विस्कटून जातं. खरी साक्ष दिल्याने, तिच्यावर येणारा सत्ताधाऱ्यांचा दबाव तिच्या शिकण्याच्या स्वप्नालाही सुरुंग लावू लागतो. तिच्या इवलाश्या जगण्यातली उलथापालथ वाचताना मस्तकात संतापाची तिडीक उठते.

     ही सगळी ग्रामीण भागातली 'नाही रे' गटातली अतिसामान्य माणसं. जगण्यातील संघर्षाला, ती त्यांच्या पद्धतीने सामोरी जात आहेत. त्यांना शिक्षण नाही. भौतिक समृद्धी नाही. सोयी-सुविधा नाहीत. पण त्यांच्यात असणारा दुःखाचा सहज स्वीकार, जगण्याचा चिवटपणा, पाय रोवून उभी राहण्याची शक्ती, आणि याबरोबरच त्यांच्यात खोलवर असणारा अगम्य ऊर्जास्रोत ....

या सगळ्यांचं मूळ कशात आहे याचा शोध लेखकाने घेतला आहे. मनाचा तळ ढवळून टाकणाऱ्या, वाचकाला सुरक्षित चौकटीतून बाहेर ओढून, ग्रामीण जीवनातील गुंते दाखवणाऱ्या, मेंदू मनावरील- शहरी- चकचकीत- गुळगुळीत समजुतींची ढापणं ओरबाडून काढणाऱ्या या कथा आहेत. आपल्या भावविश्वाच्या चौकटी विस्तारून  समाजभानाच्या कक्षा रुंदावणार्‍या या कथा आहेत.

       याशिवाय या पुस्तकाचा कळस म्हणजे यातील 'परिशिष्ट'. प्रत्येक लेखकानं ते वाचलंच पाहिजे असं. हे परिशिष्ट म्हणजे लेखकांसाठी एक वस्तुपाठच आहे.यात  लेखकानं आपली लेखन प्रक्रिया आणि लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

   " सत्ता, संपत्ती यांची अविवेकी ताकत ज्यांचे जगणे मुळापासून उखडायला निघालेली आहे आणि जी माणसे सामाजिक, आर्थिक विषमतेत, समाजाच्या तळाशी आहेत... अशी सर्व माणसे मला माझ्या आस्थेच्या  परिघात जवळची वाटतात. त्यांच्या जगण्यातले बारकावे ,दुर्लक्षित कंगोरे, त्यांच्या जगण्यातील हर्ष- खेदा च्या जागा शब्दातून व्यक्त करण्याची मला गरज वाटते .त्यांच्या जगण्याची आच माझ्या पर्यंत पोचते आणि तीच लिहायला भाग पाडते".- हा एक लहानसा परिच्छेद लेखकातल्या  'माणसाची' उंची दाखवणारा आहे. 

   "मस्तकातला सगळा ऐवज घेऊन लेखक जेव्हा लिहायला बसतो तेव्हा केवळ अक्षरेच झरतात असे नाही तर त्याच्या उरातूनही काही झरत असते, पाझरत असते". लेखकाचे हे वाक्य 'आलोक'च्या प्रत्येक ओळीगणिक जाणवत राहतं.

     परिशिष्ट वाचल्यानंतर परत नव्याने कथा वाचण्याचा मोह आवरला नाही. आणि लेखकाची भूमिका समजल्यावर कथेत अधिकाधिक खोल शिरण्याचा अनुभव  आला. हा अनुभव सगळ्या वाचकांनाही यावा यासाठीच हा लेखप्रपंच.


#आलोक

#आसारामलोमटे

#साहित्यअकादमीपुरस्कार

Sunday, October 31, 2021

पोषणावर बोलू काही

आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने......



   दरवर्षी दिवाळी आपल्याला तिमिराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देत असते. नेहमीप्रमाणे आपणही दिवे, आकाशकंदील, पणत्या लावून प्रकाशाचा उत्सव साजरा करतो .वास्तविक मनातील अज्ञानाचा अंधःकार ज्ञानाच्या प्रकाशानं उजळणं... ही खरी दिवाळी. एरवीचं ठीक आहे पण यंदाच्या दिवाळीला कोरोना ची पार्श्वभूमी आहे. 'आरोग्य' हे गृहीत धरून बेभानपणे वागणाऱ्या समाजाला कोरोनाने  'जोर का झटका' दिला आहे. त्यामुळे या दिवाळीत मौजमजे  बरोबर चिंतनही करणं गरजेचं आहे.

      धनत्रयोदशीला भगवान  श्री धन्वंतरी जयंती असते. याच दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' साजरा केला जातो. यंदाचं हे सहावं वर्ष आहे. आणि या वर्षीची संकल्पना आहे- 'आयुर्वेद फॉर पोषण'. धन्वंतरी देवतेचं पूजन करतांना आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजावून घेणं आणि ती आचरणात आणणं हा उद्देश प्रत्येकाच्या मनात असावा अशी अपेक्षा आहे.अत्यंत समर्पक आणि समयोचित अशी ही संकल्पना आहे.

       शरीराचं पोषण उत्तम असेल तर आजार होणार नाहीत. आणि झालेच तर ते लवकर बरे होतील, हा आधीच माहीत असलेला धडा- कोरोनानं  क्रूर पद्धतीनं आपल्याला शिकवलेला आहे. त्यामुळे योग्य पोषण ही काळाची गरज आहे. 'पोषण आणि आयुर्वेद'- या संकल्पनेला समजून घेताना, 'शरीर पोषण' म्हणजे देह, इंद्रिये ,मन आणि आत्मा यांचे पोषण हे स्पष्ट आहे. त्यामुळे फक्त देह पोषणाचा विचार हा आयुर्वेदानुसार मर्यादित विचार आहे.

     आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरांचा आणि आहाराचा पुरातन काळापासूनचा इतिहास बघितला तर त्यांचा पाया हा  आयुर्वेदावर आधारित आहे हे लक्षात येतं. आजवर आपल्या देह, इंद्रिय, मन, आत्म्याचं पोषण हे संस्कृती, परंपरा, कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, सणवार, प्रचलित आहार द्रव्ये, आणि भोजन व्यवस्था यामुळे झालेलं आहे. आजही आपल्या दैनंदिन जगण्याची प्रक्रिया बरीचशी आयुर्वेद शास्त्रानुसार आहे. पण ती जाणीवपूर्वक नाही तर अंगवळणी पडल्यामुळे आहे. पण आज   विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे , चंगळवाद, हॉटेल संस्कृती मुळे आयुर्वेद आधारित जीवनशैली मागे पडू लागली आहे. त्याचे परिणामही आपण भोगतो आहोतच. मधुमेह ,हृदयविकार, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, संधिवात,पीसीओएस.. इत्यादी आजार घरोघरी मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे आयुर्वेदातील पोषण संकल्पना समजून घेणं अगत्याचं आहे.

         खरं तर हा विषय फार व्यापक आहे . आहारासंबंधी विस्तृत विवेचन शास्त्रामध्ये केलेलं आहे .दोन प्रकारचं आपल्याला यात मार्गदर्शन मिळतं. आहार द्रव्यांचे गुणधर्म  आणि आहार कशा पद्धतीने घ्यावा याचे नियम. आहार सेवनाचे नियम जरी आपण काटेकोरपणे पाळले तरी उत्तम पोषणाचा मार्ग सुकर होत असतो. त्यामुळे प्रथम नियमांचा विचार करू. 

    'यत् पिंडी तत् ब्रम्हांडी'- हा पहिला नियम. निसर्गाचं घड्याळ हे कायम अचूकपणे चालत असतं. त्यानुसार शरीरातलं जैविक घड्याळ ही फिरत असतं. या दोन्ही घड्याळांची लय सारखी ठेवली की आपोआप शरीरातील संप्रेरकं योग्य वेळी पाझरू लागतात. उत्सर्जन- विसर्जन क्रिया योग्य वेळी  होतात. सूर्योदयाच्या वेळी उठणं आणि सूर्यास्तानंतर लगेच भोजन करून लवकर झोपणं - ही खरी आदर्श पद्धत. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य याचं पालन करावं हल्ली असं वागणाऱ्यांची- 'बुरसटलेले' म्हणून  खिल्ली उडवली जाते.मात्र हेच अक्षय कुमारने सांगितलं की पटतं.

      दुसरा अत्यंत साधा पण तेवढाच कठीण नियम म्हणजे भूक लागली असतानाच खाणं. पशु पक्षी आणि लहान बाळं  हा नियम पाळतात पण आपलं काय?? केव्हाही आणि काहीही खाण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. पथ्य (हितकर) आणि अपथ्य (अहितकर) एकत्र करून खाणे म्हणजे - 'समशन'. भोजन झाल्यावरही  खाणे म्हणजे -'अध्यशन'. भोजनाची वेळ नसतानाही भोजन करणे म्हणजे - 'विषमाशन'. विरुद्ध  गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे- 

 'विरुद्धाशन'. समशन, अध्यशन, विषमाशन आणि विरुद्धाशन- ही अनेक व्याधींना निर्माण  करणारी कारणं आहेत. या चुका   अनेकदा कळत नकळत आपण करतोच. ही कारणं जर आपण विचारपूर्वक टाळली तर बऱ्याच आजारांना अटकाव होऊ शकतो.

     तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे पोटभरून ,तडस लागेपर्यंत जेवू नये. जेवणानंतर जर सुस्ती, जडपणा, दम लागणे- ही लक्षणं निर्माण होत असतील तर आपलं जेवण प्रमाणापेक्षा जास्त झालं आहे हे समजावं. प्रत्येकाला आपल्या पोटाचा अंदाज असतो. आपल्या पोटाचे आपण चार भाग करावे. दोन भाग- घन आहार, एक भाग- द्रवपदार्थ आणि एक भाग वायूच्या संचारासाठी मोकळा ठेवावा असं शास्त्र सांगतं. 'सावकाश जेवा'- असं म्हणण्याची आपली परंपरा आहे. 'सावकाश' म्हणजे स+अधिक अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी .सावकाश याचा अर्थ -पोकळी सह. म्हणजे पाहुणचार करतानाही आयुर्वेदाचा नियम पाळण्याची परंपरा आहे. पण आपण 'सावकाश' चा अर्थ आपल्या सोयीने घेतला आहे.

       चौथा अगदी साधा नियम म्हणजे- तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं. शरीराला गरज असेल त्यावेळी शरीर पाणी मागतं. हल्ली तासातासाला पाणी पिण्याचं प्रमाण फार वाढलं आहे, ज्यामुळे हे अतिरिक्त पाणी शरीराबाहेर काढताना अवयवांवर ताण वाढून ते कमकुवत होऊ लागतात.

    आतापर्यंत सांगितलेले चार नियम हे सामान्य नियम आहेत जे सगळ्यांनीच आचरणात आणणं आवश्यक आहे. पाचवा नियम हा व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे आजच्या भाषेत तो 'पर्सनल डायट प्लॅन' आहे. याला आहारविधि विशेषायतन  म्हणतात. हे आठ प्रकारचे आहेत. 'प्रकृती'- म्हणजे आहार द्रव्यांचे गुणधर्म . 'करण'- म्हणजे द्रव्यावर होणाऱ्या  प्रक्रिया.  'संयोग'- म्हणजे पदार्थात योग्य द्रव्यांचं मिश्रण. 'राशी'- म्हणजे भोजनातील प्रत्येक पदार्थांची मात्रा. 'देश'- म्हणजे आहारद्रव्यांचं उत्पत्ती स्थान. 'काल'- म्हणजे भोजनाचा योग्य काळ.'उपयोग संस्था'- म्हणजे भोजनाचा अपेक्षित परिणाम बघणे. 'उपयुक्तता'-

 म्हणजे भोजन घेणार्‍या व्यक्तीची प्रकृती. अत्यंत सूक्ष्म विचार करून हे अष्ट आहारविधी विशेषायतन ठरविले आहे. आहाराबद्दलचा पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तिचं आहार नियोजन केल्यास व्याधीप्रतिकारक क्षमतेचा स्तर निश्चितच  उंचावेल.

          आहार सेवनाचे महत्त्वाचे नियम बघितल्यावर, 'काय खायचं?' हा विषय ओघानेच येतो,जो शास्त्रात अत्यंत विस्तृतपणे मांडला आहे. आहार द्रव्यांचं 12 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. 'शुकधान्य', 'शिंबी धान्य', 'मांसवर्ग', 'शाकवर्ग', 'हरितवर्ग', 'मद्यवर्ग', 'अंबुवर्ग', 'फलवर्ग','दुग्धवर्ग, 'ईक्षुवर्ग', 'कृतान्नवर्ग आणि 'आहार योग्य वर्ग'- अशा स्वरूपात, प्रत्येक वर्गात असणाऱ्या समस्त द्रव्यांचे गुणधर्म शास्त्रात लिहून ठेवले आहेत. या प्रत्येक वर्गावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. उदाहरणादाखल शुकधान्य म्हणजे- गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी, राळ, निवार, वरई, शामाक....., इत्यादी. यापैकी बाजरी नंतरची शूकधान्ये ही अनेक व्याधीं मध्ये परिणामकारक आहेत.व्याधीनाशनासाठी त्यांचे अनेक उपयोग लिहून ठेवले आहेत. या अनेक धान्यांची नावं ही आपल्याला माहीत नाही. वापरणं तर दूरच. पण संशोधनाअंती हे स्पष्ट झालंय की, ही धान्ये 'मिलेट्स' या वर्गातली  असून त्यात भरपूर चोथा आहे. ती वर्षानुवर्ष साठवता येतात. आणि गहू तांदळा प्रमाणेच त्यात पोषणमूल्ये आहेत पण ती वजन वाढवत नाही व पचायला हलकी आहेत.ही धान्ये मधुमेह,लठ्ठपणा यावर वापरावीत असं आयुर्वेदानं हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवलंय आणि आजचं संशोधनही तेच सांगतं आहे.विस्मृतीत गेलेल्या  या शूकधान्यांची लागवड, उत्पादन करून ती बाजारात लोकप्रिय करणं - हा विचार करणं आज गरजेचं आहे.

     आज जग जवळ आल्यामुळे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाणं हे 'प्रतिष्ठेचं'मानलं जातं.वास्तविक  हे पदार्थ 'संयोगविरुद्ध,' आणि  'देशविरुद्ध' असतात.   आयुर्वेदातील आहार द्रव्यांच्या संपत्तीला आणि पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लाह्या, सातू ,हळीव,राजगिरा,मुरमुरे फुटाणे,शिंगाडे... इत्यादी स्वस्त पण उच्च पोषणमूल्ये असणाऱ्या पदार्थांना आपण अडगळीत टाकलं आहे. त्याऐवजी ओट्स,केलॉग्ज,आॕलिव्ह आॕईल अशी बरीचशी पाहुणेमंडळी स्वयंपाकघरात विराजमान झाली आहेत.

     देहाच्या पोषणा बद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. मनाच्या पोषणासाठी योगसाधना अत्यंत परिणामकारक आहे. आयुर्वेदात देहाच्या रसायना बरोबर सुदृढ मनासाठी 'आचार रसायन'-  (कोड ऑफ कण्डक्ट) ही सांगितलं आहे. 'सत्वावजय चिकित्सा'- हा मनाच्या पोषणाचा एक उपचार असून त्यामध्ये रोग्याला त्याच्या व्याधि नुसार काय योग्य अयोग्य आहे  हे सांगितलं जातं.

    इंद्रियांच्या पोषणाचा आज विचार केला तर सध्या त्यांचं 'अतिपोषण' होतंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. बाह्य  जग आणि शरीर या मधला दुवा म्हणजे ज्ञानेन्द्रिये असतात .आपण ज्या काही चुका करतो, त्या चुका सर्वप्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांना झेलाव्या लागतात. आज दहा महिन्याच्या बाळाला ही जेवू घालताना व्हिडिओ दाखविण्याची महाभयंकर चूक आम्ही सर्रास करतो आहे. इंद्रियांचं योग्य पोषण केलं पाहिजे- हा विचार ही आज पचणारा नाही इतके आम्ही भरकटलेले आहोत.

     मन आणि इंद्रिये यांचं योग्य पोषण करण्यास जर आम्ही असमर्थ असू तर आत्म्याच्या पोषणा बद्दल काय बोलावं? आत्मपोषणासाठी सगळ्या बाह्य प्रवृत्ती  आत खेचून घ्याव्या लागतात. निदान रोज दहा मिनिटे  शांत बसून आपल्या आत डोकावून बघावं आणि आपलाच आतला आवाज ऐकावा. कुणी सांगावं, एखाद्या दिवशी आपल्या 'या' आवाजाची ओढ आपल्याला लागेल आणि आत्म्याच्या पोषणाची ही सुरुवात होईल.

    धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने, आयुर्वेद दिनाच्या मुहूर्तावर आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर - आपण डोळसपणे आयुर्वेद आणि पोषणाचा विचार करूया आणि ते आचरणात आणू या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ साधना कुळकर्णी,अकोला.

#आयुर्वेदफॉरपोषण

#आयुर्वेददिन

#आहारविधीविशेषायतन

Sunday, October 3, 2021

नवरात्र आणि आत्मविकास


        हल्ली कळेनासं झालंय की आपल्या समाजाचा चेहरा नक्की कसा आहे?? सप्टेंबर महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनांनी उच्चांक गाठला. तक्रार न झालेल्या अशा घटना आणखी किती असतील देव जाणे. समाजाचा हा हिडीस, विकृत आणि माणुसकीला काळिमा फासणारा चेहरा डोळ्यासमोर असतानाच नवरात्र सुरू होतंय. आता हा समाज 360 अंश कोनातून गर्रकन फिरेल आणि नऊ दिवस देवीच्या भक्तीचा  उन्माद सुरू होईल. उपवास, नऊ दिवसाचे नऊ रंग,ओटी भरणे, सवाष्ण, कुमारीका पूजन, गरबा, अखंड दिवा.... इ. सारी कर्मकांडे समस्त  स्त्रिया यथास्थित आणि रीतसर करतील..... बलात्कार, स्त्रियांवर होणारा हिंसाचार, अन्याय - सगळं विसरून.... दृष्टीआड करून.....भक्तीच्या उन्मादात सगळ्या विकृत वृत्तिंचा सोयीस्कर विसर पडेल.

      नऊ दिवसांची देवीची  ही पुजा, आम्हा स्त्रियांना आत्मभान देत नसेल आणि आमच्या विचारात आणि कृतीत परिवर्तन घडवून आणत  नसेल तर काय अर्थ असल्या पूजेत? देवीमधल्य एखाद्या तरी गुणाचा थोडाफार अंश आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो का आम्ही?मुळात आमची पूजा ही श्रेयसासाठी की प्रेयसासाठी??

      आपल्या  नवरात्र पूजेमागे अनेक पौराणिक कथा आहेत. पण मी जेव्हा सखोल विचार केला, तेव्हा माझ्या बुद्धी आणि तर्कानुसार मला असं लक्षात आलं की स्त्रीचं आयुष्य हे नऊ टप्प्यात पूर्ण होतं. हे नऊ टप्पे आणि  नवरात्राच्या नऊ दिवसांचं देवीचं स्वरूप विलक्षण  मिळतंजुळतं आहे.ही नऊ दिवसाची पूजा म्हणजे आपल्याच जीवनातला एक एक टप्पा डोळस,समृद्ध,सक्षम आणि परिपूर्ण करणं होय.

   पहिली देवी  'शैलपुत्री' म्हणजेच पार्वती. पार्वतीचा  आदिशक्ती म्हणून गौरव केला आहे . आदी म्हणजे आरंभ. घटस्थापना करतांना आपण माती मध्ये धान्य पेरत असतो. म्हणजेच पहिल्या दिवशी स्त्री मधल्या 'सृजनशक्तीची','निर्मिती  क्षमतेची' पूजा असते. त्याच बरोबर गर्भाशयात रूजलेल्या इवलाश्या स्त्री गर्भाची पूजा असते. या दिवशी प्रत्येक स्रीनं देवीसमोर डोकं टेकवताना स्त्री भ्रूणहत्ये विरुद्ध लढण्याची शपथ घेणं गरजेचं आहे.गर्भनिर्मिती करणाऱ्या अवयवांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शैलपुत्री देवीच्या डाव्या हातात कमळ तर उजव्या हातात त्रिशूळ आहे .या त्रिशूळाचा उपयोग केव्हा आणि कसा करायला हवा हे प्रत्येक स्त्रीनं समजून घेणं हे आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल........

       दुसऱ्या दिवशीची देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चरणी म्हणजे तपस्या करणारी. ही देवी शुभ्र वस्त्रांकित असून तिच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे. ही देवी पार्वती असून तिने शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं हे आपण जाणतोच. स्त्री जीवनातला पहिला टप्पा म्हणजे जन्मापासून बारा वर्षापर्यंत.दुसऱ्या दिवसाची पूजा ही 'ध्यासाची' आहे. स्त्रीने आपल्या घरातील, समाजातील बाल्यावस्थेतील मुलींचा विचार करायचा आहे. या मुलींना काही छंद, नाद, ध्यास असेल तर तो त्यांना जोपासू द्यावा, त्यांना पाठिंबा द्यावा. तरच मेरी कोम, पी व्ही सिंधू,मिताली राज घराघरात निर्माण होतील. फक्त या ध्यासामध्ये जपमाळेतील  सातत्य आणि शुभ्रवस्त्रातील सात्विकता जपण्याकडे लक्ष देणं हेच आत्मभानाच्या च्या दिशेने टाकलेलं दुसरं पाऊल......

      तिसऱ्या दिवसा ची देवी ही 'चंद्रघंटा'. हिची कांती सोनेरी असून ही देवी लावण्यवती आहे. तिच्या डोक्यावर चंद्राच्या आकाराची घंटा असून त्या घंटा नादानं असूर भयभीत झाले होते. स्त्री  जीवनातला दुसरा टप्पा म्हणजे तारूण्य. ही पूजा 'सौंदर्य' आणि 'शक्ती'ची असते. तारुण्यावस्थेत स्त्री शरीरातले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सक्रिय असल्याने तिचं सौंदर्य आणि कांती झळाळून उठतं आणि याच हॉर्मोनमुळेच  या वयात धाडसी वृत्ती असते.  देवीसमोर नतमस्तक होताना  मुलींचं खच्चीकरण न करता तिच्यातील स्फुल्लिंग जपणं,धिटाईला योग्य वळण देणं आणि सौंदर्यप्रदर्शनास विरोध करणं - हा संकल्प करणं -  हेच आत्मभानाच्या दिशेनं  टाकलेलं तिसरं  पाऊल........

     चौथ्या दिवसा ची देवी म्हणजे 'कुष्मांडा'. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तिने आपल्या हास्यापासून ब्रम्हांडाची निर्मिती केली अशी कथा आहे.चौथी पूजा ही 'हास्याची' म्हणजेच आनंदाची आहे. स्त्री जीवनातला चौथा टप्पा म्हणजे विवाह. विवाहानंतर स्त्री  आपलं नवीन जग निर्माण करित असते. पण यासाठी तिच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद आहे का, हे बघण्याची जबाबदारी कुटुंबातल्या प्रत्येकाची- नवरा, सासू, नणंद, दीर इत्यादींची आहे. अंतर्मनातून फुलणारंं हास्य,स्वातंत्र्य  आणि आनंद हे प्रत्येक सासुरवाशिणीला, माहेरवाशिणी ला मिळावं यासाठी देवीसमोर संकल्प  करणं- हेच आत्मभानाच्या दिशेने टाकलेले चौथं पाऊल.......

     पाचव्या दिवसाची देवी आहे 'स्कंदमाता'. ही देवी पार्वती असून हिच्या हातात कार्तिकेय आहे. या देवीचं वैशिष्ट्य हे, की तिला चार हात असून एकाही हातात शस्त्र नाही कारण ही पूजा ' वात्सल्याची ' आहे. विवाहानंतर चा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व. मातृत्वाच्या थोरवी बद्दल मी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. पण या देवीसमोर नतमस्तक होताना आजच्या आयांनी काही संकल्प आवर्जून करावे. ते म्हणजे घरातील पुरुषांना (नवरा/मुलगा) स्त्रियांकडे एक 'माणूस' म्हणून बघायला,सन्मान करायला शिकवावं.घरातल्या सगळ्या कामांची- स्वयंपाकाची- सवय लावावी .अशी आई होणं म्हणजेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पाचवं पाऊल.........

      सहावी देवी आहे , 'कात्यायनी'. हिने महिषासुराला ठार मारले असून, हिच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात कमळ आहे. हिच्या अचाट सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत. या देवीचं पूजन म्हणजे 'असामान्य सामर्थ्याचं' पूजन आहे. स्त्री जीवनातला पाचवा टप्पा हा मुलांच्या संगोपनाचा,घरकामाचा,नोकरीचा- अत्यंत व्यस्त असा असतो. या काळात ती 'मल्टिटास्किंग' करत असते. या दिवशी देवीची   पूजा करताना, तिचं सामर्थ्य स्वतःसाठी मागायचं आहे. पण ही अफाट क्षमता, ऊर्जा - घरातील आणि समाजातील सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी मागायची आहे. आजच्या कृत्रिम आणि पोशाखी दिखाऊपणा साठी नाही किंवा 'सुपरवुमन' बनण्यासाठी नाही. हे आत्मभानाच्या दृष्टीनं   सहावं पाऊल............

           सातवी देवी म्हणजे 'कालरात्री'. स्त्री जीवनातला सहावा टप्पा म्हणजे चाळिशीनंतरचा. या काळात  मुलं मोठी झाल्यामुळे स्त्री  थोडी निवांत असते. ही कोशातून, चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ असते. तिने आता स्वतःला आणि समाजाला वेळ देणं गरजेचं आहे. कशासाठी?? तर- घरात, घराबाहेर, कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल, तर प्रतिकार करण्यासाठी. कालरात्री  देवी चं स्वरूप बघितलं, तर ते भयावह आहे. काळा रंग, मोकळे केस, तिसरा डोळा- - हे कशाचं प्रतीक असावं? जर काहीही चुकीचं घडत असेल, तर रंगरूपाची पर्वा न करता 'तिसरा डोळा' उघडायचा. या देवीचं वाहन 'गाढव' आहे. का?कशासाठी?? दुष्टांचा संहार करण्यासाठी, जमेल त्या मार्गानं, सुचेल त्या आयुधानं, मिळेल त्या मदतीनं- - धावून जायचं असतं. मग ते वाहन गाढव का असेना. या वयात स्त्रीला परिपक्वता, चांगल्या वाईटाची जाण,अनुभव   असतो. म्हणून देवीला नमस्कार करतांना, समाजातील अपप्रवृत्तींचा नाश करण्याचा संकल्प करणं- हेच आत्मभानाच्या च्या दिशेनं टाकलेलं  सातवं पाऊल.......

     आठवी देवी आहे 'महागौरी'. ही श्वेत वस्त्रांकित आहे. या देवी मधील 'शांती व ज्ञानाची '  पूजा  केली जाते . स्त्री जीवनातला सातवा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीचा आणि सेवानिवृत्तीचा.  या काळात शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होतात त्यामुळे बरेचदा  मनात उदासीनता आणि नैराश्य निर्माण होतं. पण याच टप्प्यावर महागौरी देवीची पूजा करून मन स्थिर,शांत आणि समंजस  करणं गरजेचं आहे .देवीच्या हातातील डमरू हे सृष्टीतील उत्पत्ती आणि लय यांचं प्रतीक आहे .हे प्रतीक जीवनातलं अंतिम सत्य आहे हे समजून, सध्याच्या आभासी जगातले अशाश्वत मोह, सुख, मनातून बाहेर काढून, अंतर्मनाच्या शांतीचा व ज्ञानाचा संकल्प करणं- - हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं आठवं  पाऊल........

      नवव्या दिवसाची देवी 'सिद्धीदात्री'. ही कमळात विराजमान आहे आणि हिला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत. या टप्प्यावरील स्त्री ही वार्धक्यावस्थेतली असते . साधारण सत्तर वर्षापासून पुढचा हा काळ आहे. या वयातल्या स्त्रीमध्ये समाधान, सामंजस्य, शांती, परिपक्वता, निर्लेपता, निर्मळता, प्रेम आणि आनंद या अष्टसिद्धी असणं अपेक्षित आहे. यासाठी तिनं स्वतः आणि कुटुंबीयांनी जागरूक असायला हवं.  या देवी समोर नमन करताना कुटुंबीयांनी तिला सन्मान देण्याचा आणि स्त्रीने स्वतःला षड्रिपु पासून दूर ठेवण्याचा संकल्प करणं हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं नववं पाऊल........

 अशा पद्धतीने नऊ दिवस देवीच्या मूर्तिपूजेबरोबर  देवीचे गुण स्वतःमध्ये आणि आपल्या समाजात रुजवले तर नवरात्राचे श्रेयस आपल्या पदरी पडेल. घराघरांमध्ये दुर्गादेवीचं अस्तित्व निर्माण होऊन स्त्री  ही खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सक्षम होईल. स्त्रीमधील हे आत्मभान जागृत झाल्यावर हा समाजही सुसंस्कृत आणि विवेकी होईल.

स्त्री ही संपूर्ण समाजाला योग्य वळण लावू शकते,त्याचवेळी त्याला वठणीवरही आणू शकते.फक्त स्वतःमधील वैशिष्ट्यांचा नेमका,अचूक आणि  योग्य वापर करण्याचं आत्मभान आलं तरच!!!



Friday, August 20, 2021

'शेल्फी' - एक अदभुत सफर...



       पुस्तक खरेदी करताना सर्वसामान्य  वाचकांचे निकष काय असतात? आवडता लेखक, आवडता विषय, आवडतं प्रकाशन किंवा खूप गाजलेलं वा बेस्टसेलर- यापैकी कोणतेही.

 पण यापैकी काहीही नसताना मी गणेश मतकरींचं  'शेल्फी' विकत घेतलं. गणेश मतकरींचं सिनेमाबद्दलचं लेखन अधून मधून माझ्या वाचनात आलं आहे. 'आवडता लेखक ' होण्याइतपत मी त्यांचं फारसं वाचलेलंच नाहीय.मात्र  माझ्या आवडत्या लेखकाचे- रत्नाकर मतकरी यांचे ते चिरंजीव आहेत हे मला माहीत आहे.   

        मागील आठवड्यात पुस्तकाच्या दुकानात गेले असता 'शेल्फी' नं  माझं लक्ष वेधून घेतलं - ते त्याच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे.माझी पुस्तक खरेदी सुरु असतांना, 'शेल्फी' मला  वारंवार खुणावत होतं. शेवटी  ते पुस्तक चाळण्याचा मोह मला आवरला नाहीच.

 ' मुंबई मराठी संग्रहालय,वसंत वाचनालय, ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी- माझ्यात वाचनाची शिस्त तयार करणाऱ्या या वाचनालयांना'..... ही अफलातून अर्पणपत्रिका वाचतानाच, हे पुस्तक इंटरेस्टिंग असणार असा माझ्या मेंदूने इशारा दिला. 

   चाळताना पुस्तकाची 'जरा हटके' आणि वेगळ्या धाटणीची मांडणी नजरेत भरली. अजून पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे - दर महिन्यात खरेदी केलेली पुस्तकं आणि वाचलेली पुस्तकं यांच्या सूचीनं प्रत्येक लेखाची सुरुवात केलेली. आता तर मेंदूनं     रीतसर नोंदच करुन टाकली पुस्तकाची.पानं पलटवत असतांना इंग्रजी लेखक आणि इंग्रजी  साहित्याशी संबंधित लेख दिसले.या लेखांमधे काय असेल,ही उत्सुकता निर्माण झाली. आणि लगेच मेंदूने  पुस्तक  खरेदी करायची आज्ञाच दिली.

'पण हे संपूर्ण इंग्रजी साहित्या संबंधी आहे'.... मी बचावात्मक  पवित्रा घेतला.

 'काही हरकत नाही'- आता मेंदूचीच आज्ञा- - मी 'शेल्फी' चक्क  विकत घेतलं. 

        'शेल्फी' बद्दल अनेक वाचकांचं असंच होत असावं. हातात घेऊन चाळता चाळताच, वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो आणि मग प्रेमात सगळं क्षम्य असल्यामुळे, 'इंग्रजी साहित्य ना?' वाचून तर बघू - - असं होतं.

      मला वाचनाचा छंद आहे. माझ्या संग्रही अनेक पुस्तकं आहेत.  हा आपल्या सगळ्यांचा एक अभिमानाचा विषय असतो. 'शेल्फी' वाचताना हा अभिमान झरझर गळून जातो. फेब्रुवारी 2016 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत लेखकानं तब्बल  237 पुस्तकं विकत घेतली आहेत. वाचलेली पुस्तकं यापेक्षा वेगळी  आहेत आणि ती 90 आहेत. अबब......... 

      या 90 इंग्रजी पुस्तकांचं-  बेस्टसेलर, कार्टुन्स ,रहस्य, भय, चित्रविचित्र, कॉमिक्स, कल्पना, कविता, चित्रपट, समीक्षा, विनोद ,इत्यादी प्रकारात वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या 90 इंग्रजी पुस्तकांची, त्यांच्या कथानकाची, त्यांच्या गुण दोष वैशिष्ट्यांची माहिती देत असतानाच मतकरी त्या पुस्तकांच्या लेखकांबद्दलही वाचकाला शहाणं करुन सोडतात.पुस्तक लिहिण्यामागची लेखकाची भूमिका,त्यामागच्या काही प्रेरणा,एखादी कहाणी,त्यांची इतर पुस्तकं अशी भरपूर माहिती आपल्या समोर येते आणि ती सुद्धा अत्यंत प्रांजळ आणि मनोरंजक शैलीत. त्यामुळे माझ्यासारख्या मराठी वाचकाला, कधीही परिचित नसणाऱ्या लेखकांबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल वाचताना रस निर्माण होऊ लागतो. माझ्यासाठी हे पुस्तक म्हणजे इंग्रजी साहित्यातली एक अद्भुत आणि अचंबित करणारी सफर होती. केवळ कुतूहलापोटी एका नवीन जगात पाऊल टाकावं आणि विस्मित होऊन पुढे पुढे चालत जावं असं माझं झालं.    '                        

      ' हारुकी मुराकामी','एच पी लवक्राफ्ट', 'स्टीवन किंग', 'आंद्रे वायदा','आशिष राजाध्यक्ष', 'डॕन ब्राऊन', 'सेम्पे'....... कोणाकोणाचा उल्लेख करावा? अशा अनेक लेखकांची, त्यांच्या साहित्याची,वैशिष्ट्याची एक-एक झलक या पुस्तकात वाचकाला मिळत जाते आणि सर्वस्वी अपरिचित अशा इंग्रजी साहित्याच्या दुनियेत वाचक हरवून जातो,गुंतून जातो.

    'गॉडफादर' या कादंबरीचं चित्रपटात रूपांतर करतानाचा दिग्दर्शक - फ्रान्सिस कपोला- (एरवी ही नाव कधी कळली असती?) यांनी 'सिनॉप्सिस', 'द टाईम्स','इमेजरी अँड टोन', 'द पिटफॉल्स','द कोअर'- या पाच घटकांमधे  केलेला  दिग्दर्शनाचा सखोल अभ्यास  वाचताना  त्यांना सलाम करावासा वाटतो. 'ग्राफिक नॉव्हेल्स' या साहित्य प्रकाराची वाचकाला यात ओळख होते. इंग्रजी वाचायची इच्छा असणारे - पण नक्की काय वाचायचं, या संभ्रमात पडणाऱ्यांना- 'अँथनी डोअर' यांची 'आॕल द लाईट वी  कॕनॉट सी'- या पुस्तकाने श्रीगणेशा करावा असा लेखक सल्ला देतात. 

        या इंग्रजी साहित्य सफरीबरोबरच फोर्टमधल्या  'वेवर्ड अँड वाईज', 'किताबखाना', बंगलोर मधील 'ब्लॉसम बुक हाऊस', 'युएस मधील 'कॅपिटल हिल बुक्स' आणि 'कॉमिक बुक्स स्टोअर्स' मध्ये ही लेखक आपल्याला फिरवून आणतात. कॉमिक बुक स्टोअर्स मध्ये मे महिन्यात पुस्तकावर मिळणाऱ्या सवलती बघून आपले डोळे विस्फारतात.                     

              228 पानांच्या या पुस्तकाबद्दल आणखीही बरंच काही लिहिण्यासारखं आहे पण ती गंमत वाचकांनीच अनुभवावी.                            

        या पुस्तकाचं बघताक्षणी नजरेत भरणारं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक मुखपृष्ठ, आगळीवेगळी अर्पणपत्रिका, जरा हटके असलेली पुस्तकाची रचना आणि बांधणी.यामुळे वाचक हे पुस्तक हातात घेऊन चाळायला प्रवृत्त होतो. नंतर विकत घेतलेल्या आणि वाचलेल्या पुस्तकांची यादी बघूनच लेखकाबद्दल विलक्षण आदर निर्माण होतो - हे या पुस्तकाचं बलस्थान. प्रथमदर्मशनी प्रेमात पडल्यामुळे, इंग्रजी साहित्य असलेलं हे पुस्तक, 'वाचू का नको'- या संभ्रमात असणारा वाचक, 'एकदा वाचून तर बघू'- या निर्णयाप्रत येतो. हे या पुस्तकाचं यश आहे. 

नित्यनेमाने आणि  आवडीने इंग्रजी साहित्य वाचणार्यांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.

        ज्यांना इंग्रजी साहित्य वाचण्याची इच्छा आहे .पण काय वाचावं हे समजत नाही त्यांच्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे गुरुकिल्ली ठरेल.     

      मराठी वाचक- जे फक्त 'बेस्टसेलर' ते ही - 'अनुवादित' वाचतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अलिबाबाची गुहा ठरेल. इंग्रजी साहित्यातलं अद्भुत विश्व सहज सुलभ शैलीत त्यांच्यासमोर साकारल्या मुळे भविष्यात त्यांचीही पावलं या दिशेने वळू शकतील.मुळात, इंग्रजी साहित्याबद्दलचं एक अनामिक दडपण घेऊन वावरणारा मराठी वाचक - 'शेल्फी'मुळे जरा आपल्या 'मराठीपणाच्या' कोषातून बाहेर येईल असं वाटतं.

 इंग्रजी वाचन म्हणजे ....??  असं म्हणणाऱ्या मला सुद्धा 'शेल्फी' मधल्या काही लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावं - माझ्या 'प्रस्तावित वाचन यादीत' नोंद करा करून ठेवावीशी वाटली.- - - यापेक्षा  अजून काही सांगायला हवं?



#शेल्फी

#गणेशमतकरी

Friday, August 6, 2021

दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.....


   


   काही व्यक्ति या केवळ व्यक्ति नसून त्या संस्था असतात. आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. श्री गजानन महाराज संस्थान आणि  श्री भाऊ यांना एकमेकांपासून वेगळं करताच येणार नाही. या उत्तुंग, आभाळाची उंची लाभलेल्या,  ऋषितुल्य  आणि कर्मयोगाची साक्षात व्याख्या असणाऱ्या  व्यक्तिचा मलाही एकदा जवळून अनुभव आलेला आहे. तो अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अमूल्य असा ऐवज आहे.आणि मला त्याचा अभिमान आहे.

    2006 साली आम्ही अकोला येथील काही समविचारी डॉक्टर मैत्रिणींनी  'निमा विमेन्स फोरम' या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. 2010 पर्यंतच्या चार वर्षात  महाराष्ट्रात निमा विमेन्स फोरमच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. 2010 साली मी महाराष्ट्र राज्य निमा  विमेन्स फोरमची अध्यक्ष होते. त्यावेळी विमेन्स फोरमची पहिली राज्यस्तरीय  परिषद घेण्याची कल्पना डोक्यात आली. हा प्रस्ताव आम्ही बुलढाणा येथील डॉ. गजानन पडघन यांच्या समोर ठेवला कारण तेव्हा डॉ पडघन महाराष्ट्र राज्य निमाचे अध्यक्ष होते .

'ही राज्यस्तरीय परिषद तुम्ही शेगावला घ्या'... डॉ.पडघन यांनी सुचवले.

 'शेगाव? शेगाव ला का??'

 'तिथे तयारी कशी करणार??'

 'तिथे आमची कुणाशी ओळख नाही.'

'अकोल्यात राहून शेगावला परिषदेचं आयोजन अशक्य आहे.'......हे प्रश्न  मनात होते .

 आमची टीम नकारावर ठाम होती.

  शेगाव संस्थान चे सर्वेसर्वा श्री शिवशंकर भाऊ पाटील डॉ. पडघन यांचे  निकटवर्तीय होते. श्री भाऊंच्या नियोजन कौशल्याची, कामाच्या  पद्धतीची, कामाच्या प्रचंड आवाक्याची डॉ. पडघन यांना कल्पना असल्यानेच त्यांनी शेगाव चा पर्याय आम्हाला सुचविला होता. शिवाय संपूर्ण राज्यातून जास्तीत जास्त प्रतिनिधी हे 'शेगाव ' या नावामुळेच येतील ही मात्र  सगळ्यांना खात्री होती. डॉ. पडघन यांनी  श्री भाऊंना सगळी पूर्वकल्पना आधी देऊन ठेवली आणि आमच्या टीमची श्री भाऊंसोबत मीटिंग ठरवली. श्री भाऊंबद्दल माहिती बरीच होती पण त्यांना कधी बघण्याचा योग आला नव्हता .

  आम्ही भाऊंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मनावर दडपण होतंच. अत्यंत साधं, मृदुभाषी, मितभाषी आणि विलक्षण आश्वासक व्यक्तिमत्व. त्यांच्यासमोर आम्ही परिषदेची कल्पना मांडत असतांना, ते ज्या पद्धतीने प्रतिसाद देत होते तेव्हाच  मनातले सगळे शंकेचे ढग निवळायला लागले होते. प्राथमिक बोलणी झाल्यावर आम्ही खर्चाचा विषय काढला.

'आधी परिषद होऊ द्या ,मग बघू.

बरं ,महाराजांचं दर्शन घेतलं का?

 निघताना श्री भाऊंनी विचारलं. 

'आत्ता घेणार आहोत. कारण आलो तेव्हा बरीच मोठी रांग होती'-आम्ही म्हटलं.

' यांना दर्शनाला घेऊन जा'. श्री भाऊंनी एका सेवेकर्याला सांगितलं. लगेच दोन सेवेकरी आमच्या जवळ आले आणि  म्हणाले,' चला माऊली '.

एका सेवेकर्याच्या हातात पूजेचं ताट होतं. त्यात फुलं, तुळशी, बेलपत्र, प्रसाद ,नारळ, उदबत्ती  हे सगळं अतिशय  कलात्मक पद्धतीने मांडलं होतं. आम्हा सर्वांसाठी ही खास दर्शनाची सोय म्हणजे ........आंधळा मागतो एक....अशीच होती. त्या दिवशी नमस्कार करतांना,  डोक्यात परिषदेची कल्पना,समोर श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि पाठीशी श्री भाऊंचा होकार ....येवढंच हाती होतं पण परिषद यशस्वी होणार याची खात्रीही होती.

    आनंद सागर विसावा येथे दुसऱ्या मजल्यावर चा हॉल आम्हाला परिषदेसाठी देण्यात आला. बाजूच्याच खोल्यांमध्ये प्रतिनिधींची राहण्याची सोय करण्यात येणार होती. आम्हाला श्री भाऊंनी हॉल आणि खोल्या दाखवल्या. आनंद सागर विसावा चे व्यवस्थापक श्री मोरघडे यांच्याशी आमची ओळख करून दिली.

 'तुम्हाला जे काय लागेल ते यांना सांगा आणि काहीही अडचण आली तर मला भेटा'- असं श्री भाऊंनी सांगितलं.

    झालं. आमची दर आठवड्यात शेगाव ची वारी, मोरघडेंं सोबत बैठक ,श्री महाराजांचे दर्शन आणि अगदीच आवश्यक असल्यास श्री भाऊंची भेट असं सत्र सुरू झालं. या सगळ्या सत्रांमध्ये एकच वैशिष्ट्य होतं. आमच्या गरजा आम्ही बारीक-सारीक तपशिलानुसार सांगायच्या आणि  मोरघडे यांनी  रजिस्टर मध्ये लिहून घ्यायच्या.

' नाही ','जमणार नाही', 'शक्य नाही', 'कशाला' 'काय गरज आहे' ,'पाहू' .....हे शब्द आम्ही कधीही,चुकूनही ऐकले नाहीत.

जेव्हा जेव्हा श्री भाऊंची भेट झाली तेव्हा त्यांना परिषदेच्या तयारीचा संपूर्ण तपशील माहित असायचा.आणि खर्चाचा विषय काढला की ठरलेलं उत्तर....

'बघू पुढे'.

     आम्हाला दिलेला हॉल पूर्ण रिकामा होता. परिषदेसाठी स्टेज आवश्यक होतं. धन्वंतरी पूजनासाठी, दीपप्रज्वलनासाठी, परिषदेचं सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी होती. 

त्यांचे सगळे तपशील मोरघडेंना द्यावे लागायचे. म्हणजे, 

उदा.स्टेज ची लांबी रुंदी उंची-

 स्टेजवरच्या खुर्च्यांची संख्या-

 मान्यवरांच्या सोफ्यांची संख्या- 

स्टेज आणि हॉलमधल्या खुर्च्यां मधील अंतर -

हॉलमध्ये खुर्च्या लावल्यावर वावरण्यासाठी मोकळ्या पॕसेजची लांबी रुंदी-

श्री धन्वंतरी आणि श्री गजानन महाराजांच्या फोटोंची लांबी रुंदी -- - -

 हे आणि अशाच कितीतरी बाबी बारकाईने विचारून तशीच्या तशीच त्वरित  अंमलबजावणी करायची - - ही श्री भाऊंची शिस्त आणि पद्धत आजपर्यंत कुठेही अनुभवली नव्हती. समस्त सेवेकर्यांमधील नम्रता आणि सांगितलेलं काम तत्परतेनं आणि चोखपणे करण्याचे श्री भाऊंचे संस्कार पदोपदी जाणवायचे.तिथल्या  स्वच्छतेच्या सवयींनी तर आम्हाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलं.

       परिषदेच्या  सगळ्या प्रतिनिधींना  शेगाव प्रसादालयातील नाश्ता आणि भोजन देण्याचं आधी ठरलं होतं. शेगावचा महाप्रसाद हा उत्तम चवीचा, उत्तम दर्जाचा असतो याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं. पण परिषदेच्या दृष्टीने हे जेवण अतिशय साधं होईल त्यामुळे बाहेरून केटरिंग सेवा घ्यायची का? असा सूर आमच्या  एका बैठकीत  निघाला. मोरघडे यांनी अर्थातच ' भाऊंना विचारून सांगतो'- हे उत्तर दिलं.खरं तर 'प्रसाद नको '- हे सांगणं खूप अवघड वाटत होतं पण मोरघडें समोर कशीबशी  ती हिम्मत केली.आता यावर श्री भाऊंची प्रतिक्रिया काय होईल,या कल्पनेनं जीव धास्तावला होता.शेगाव हून  आम्ही अकोल्यात पोचत नाही तोच मोरघडेंचा फोन आला.   

 'मॅडम,भाऊंशी बोलणं झालंय. प्रतिनिधींच्या भोजनासाठी आपण एक वेगळा हाॕल ठेवणार आहोत. बाहेरचं केटरिंग नको. संस्थान कडूनच भोजनाची आणि  नाश्त्याची व्यवस्था होईल .आणि त्यात हे पदार्थ राहतील.'

पदार्थांंची भली मोठी यादी ऐकताना मी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला.आणखी वर मोरघडे विचारत होते,

'याशिवाय काही वेगळं लागेल का मॕडम?'

माझ्या तोंडून शब्द फुटणं अशक्य होतं त्यावेळी.

  परिषद चार दिवसांवर आली असताना आम्ही शेवटच्या तयारीसाठी शेगाव ला पोचलो. नेमका आनंद सागर विसावा  समोरचा रस्ता खोदून ठेवलेला होता. रस्त्याचं काम सुरू झालं होतं त्यामुळे आनंद सागर विसावा मध्ये समोरुन प्रवेश करणं शक्य नव्हतं. विसावा च्या मागच्या बाजूला जे फाटक आहे त्यातून रहदारी सुरु होती.  त्यासाठी गोल फिरुन जावं लागणार होतं.रस्त्याचं काम चार दिवसात आटोपणार नव्हतंच.दर्शनी प्रवेशद्वारावर आमचं मोठ्ठं बॕनर लागणार होतं, ते आम्ही मागच्या फाटकावर लावायचं ठरवलं. थोडा विरस झाला पण रस्त्याचं काम आमच्यासाठी का थांबावं?

 आम्ही वर हॉलमध्ये आलो.खुर्च्या लावल्या होत्या. एन्ट्री पासून स्टेज पर्यंत जाण्यासाठी हिरव्या किंवा लाल  मॕट्स टाकायला हव्या असं आमचं आपसात बोलणं सुरू होतं.संस्थानमध्ये अशा मॅट्स उपलब्ध  नसल्याने आम्ही तो विषय वाढवला नाही.

    परिषद 24 जानेवारी 2010 ला होती. 23 जानेवारीला आम्ही दुपारी आनंद सागर विसावा समोर आमची गाडी थांबवली आणि आमचे डोळे विस्फारले. रस्ता व्यवस्थित तयार झाला होता. हा रस्ता कुणाच्या आदेशाने इतक्या लवकर  तयार झाला असावा हे कोणी  सांगायची गरजच नव्हती. या धक्क्यातून सावरत सावरत  आम्ही हॉलवर पोचलो. तिथे खाली टाकलेल्या लाल मॕट्स आमचे स्वागत करायला सज्ज होत्या. आम्ही आणलेल्या  श्री धन्वंतरी आणि  श्री गजानन महाराजांच्या फोटोच्या आकारानुसार एक सुबक लोखंडी स्टॅन्ड कोपऱ्यात विराजमान होता. त्या स्टँडला समई ठेवायची जागा होती. आणि पूजेच्या इत्थंभूत साहित्याने सजलेलं एक तबक सुद्धा होतं. हे सगळं बघून आम्ही अक्षरशः  निशब्द झालो. क्षणभर पुढचं काही दिसेनासं झालं कारण डोळे भरून आले होते. 

     


परिषद कमालीची यशस्वी झाली. दोनशे प्रतिनिधींची अपेक्षा असताना हजार प्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यानंतर अनेक ठिकाणी, अनेक नामवंत हॉटेल्समध्ये परिषदा झाल्या पण शेगावच्या परिषदेचा  अनुभव , त्यामागचं श्री भाऊंचं नियोजन आणि परफेक्शन, आपुलकी,स्वच्छता आणि श्रद्धेने संस्कारित प्रत्येक सेवेकरी.....याची सर  कोणालाच नाही. श्री गजानन महाराजांचा आशिर्वाद आणि श्री भाऊंचं पाठीशी असणं- - ही पुंजी  आजही आमच्या संघटनेला बळ देते आहे. आम्ही कोण, कुठली अनोळखी सामान्य माणसं. नुकतीच निर्माण झालेली आणि धडपडणारी आमची संघटना. का आम्हाला एवढी मदत करावी श्री भाऊंनी???अर्थात  डॉ पडघान यांचं यात 90 टक्के  श्रेय आहे.

      या परिषदेत आम्ही  श्री भाऊंना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली पण अर्थातच  त्यांनी  ते ऐकलं नाहीच. परिषदेत भाषण करताना मी एक वाक्य म्हटलं होतं.

     'श्री भाऊं सारख्या हिमालयाची उंची असलेल्या,  व्यक्तीचे आभार मांडण्याचा मी उद्धटपणा करणार नाही'- आणि  हे म्हणताना माझ्या घशात आवंढा दाटला होता. आता हे लिहितांना आजही माझी  तीच अवस्था आहे. 

श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्यातील देवत्वाचा एक चिमुकला कवडसा माझ्या ओंजळीत आला जो मी प्राणपणाने जतन करुन ठेवलाय. 

श्री भाऊंसारख्या नरश्रेष्ठाचा कधीच मृत्यू होत नसतो. ते आहेतच मंदिराच्या भिंती विटांमधे...,प्रत्येक सेवेकर्यांच्या आचरणामधे......श्री महाराजांच्या मूर्ती शेजारी



#शिवशंकरभाऊपाटील

#श्रीगजाननमहाराजसंस्थान

#शेगाव

Sunday, June 13, 2021

"एक शून्य मी" - पुलंचं निराळेपण


      १२ जून. पुलंचा स्मृतिदिन. पुलंना आठवायला स्मृतिदिन कशाला हवा? ते तर रोजच कुठे ना कुठे तरी भेटतातच. - - हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य असलं तरी ते वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण त्यामुळे स्मृतिदिनाचं महत्त्व कमी होत नाही. या दिवशी या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या आठवणींना,साहित्याला, कर्तृत्वाला व्याख्यानाद्वारे, लेखाद्वारे, काही नियोजित कार्यक्रमाद्वारे उजाळा मिळतो आणि त्या व्यक्तिमत्त्वाची परत नव्याने ओळख होते. नवीन पिढीला  प्रेरणा मिळते. मनात आनंद आणि अभिमानाची भावना जागृत होते.आपल्या श्रद्धेय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक निमित्त असतं.  त्यासाठीच हा लेखन प्रपंच. 

     


योगायोगाने १२ जून २०२१ ला पुलंच्या "एक शून्य मी" या पुस्तकालाही वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुलंच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृतिदिनी मौज प्रकाशनाने हे पुस्तक १२ जून २००१ साली प्रसिद्ध केलं.  अनेक नियतकालिकांमधून  प्रसिद्ध झालेल्या पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात अगदी १९६२, ६४आणि ६९ साली लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे तर काही लेख हे १९९२, ९६ आणि ९९ सालातले आहेत. उर्वरित लेख हे १९७० ते ९० या कालावधीतले आहेत. 

      खरंं तर "एक शून्य  मी" हे पुलंच्या पुस्तकाचं शीर्षक वाचूनच मनात प्रश्न निर्माण होतो आणि यात नेमकं काय असेल ही उत्सुकता ताणल्या जाते.  पुलंचं साहित्य ढोबळमानानं विभागायचं ठरवलं तर, - विनोदी, वैचारिक, व्यक्तीचित्रणात्मक आणि नाटकं -- असं होऊ शकेल. त्यातल्या त्यांच्या वैचारिक आणि व्यक्ती चित्रणाच्या लिखाणाचा बाज नेहमीच सकारात्मक आणि कौतुकाचा आणि गुणग्राहकतेचा राहिलेला आहे. व्यक्तिंविषयी, सामाजिक कार्याविषयी,संस्थांविषयी लिहितांना पुलंनी उत्तम, उदात्त उन्नत, सुंदर  अशा बाजूंवर प्रकाश टाकलेला आहे त्यामुळे ते लिखाण अत्यंत टवटवीत , ऊर्जस्कर  आणि दिशादर्शक झालं आहे. यावर अर्थातच मधून मधून विनोदाचा  तडका असल्यामुळे ते परत परत वाचावंसं वाटतं. त्यांच्या लेखनात कुठेही नकारात्मकता, वैफल्य, निराशा, वैताग असा सूर कधीच नसतो. मग ते कोणतेही लिखाण असो. अशा वेळी "एक शून्य मी" या पुस्तकातून पुलंना नेमकं काय सांगायचं असेल, ही उत्कंठा होतीच.खरंतर, "एक शून्य मी" पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत.आजवर अनेक वाचकांनी त्याची पारायणंही केली असतील. पण या पुस्तकातला "एक शून्य मी" हा लेख नेहमीच मला व्यथित करुन जातो.त्यातून एका निराळ्या पुलंचं दर्शन होतं. स्मृतिदिनाच्या निमित्तानं 'त्या' पुलंचं स्मरण............

      आजच्या या अतिवेगवान तांत्रिक युगामुळे माणसांमधील बोथट होत जाणाऱ्या संवेदना आणि खिळखिळ्या झालेल्या  जाणिवांमुळे पुलं व्यथित झालेले आहेत आणि ती खंत त्यांनी विविध लेखांद्वारे व्यक्त केली आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. 

    आपल्या अनेक व्यथा, विवंचना, वैताग तसंच उदासीनतेवर उत्तर मिळवण्यासाठी किंवा निखळ मनोरंजनासाठी पुलंच्या साहित्याचा आधार घेण्याची सवय लागलेल्या वाचकांना "एक शून्य मी" या पुस्तकात प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं दिसतात, तेव्हा मन खिन्न होतं.  "एक शून्य मी" हा या पुस्तकातील एक लेख आहे आणि  तेच नाव पुस्तकाला दिलेलं आहे.  अर्थात पुस्तकातील  सगळेच  लेख खिन्न करणारे नाहीत.पण "एक शून्य मी" हा लेख अस्वस्थ करतो. 

    आपल्या देशातली ढासळत चाललेली मूल्यं बघून,  

"कधी कधी वाटते,की हे संगीत, साहित्य, नाटके- आनंदनिधाने शोधण्याची हौस आपल्याला मुळातच नसती तर फार बरे झाले असते"- असं पराकोटीचं निराश  विधान  त्यांनी या लेखात केलेलं आहे.

" कारण असल्या क्षणांची झपाझप वजाबाकी होत असते. आणि बाकीचे जे जे काही पाहायला लागते ते मात्र कमालीचे विसंवादी असते."  असं त्यांनी लिहिलेलं आहे. जे वाचतांना पुलंचा कधीही न दिसलेला निराशेचा सूर काळजात कळ आणतो. 

   ज्या श्रद्धास्थानांच्या बळावर  पुलंनी आयुष्यात जगण्याची  दिशा ठरवली होती त्यांच्याबद्दलही कमालीच्या विषण्णतेनं त्यांनी  लिहिलं आहे.

     "कधी कधी  मनापासून चिनी भोजनाचा आनंद लुटल्यावर नेमकं लक्ष रस्त्यावरच्या एखाद्या   चिंध्यांनी अब्रु लपवलेल्या भिकारणीकडे आणि तिच्या अस्थिपंजर पोराकडे का जावं? सगळ्या चैनीची क्षणात वजाबाकी होते. अशा वेळी राग येतो तो फुले, आगरकर, टिळक,  गांधी, साने गुरुजी ह्यांसारख्या मला सतत फसवत गेलेल्या  लोकांचा! मनाचे आणि बुद्धीचे नाही ते कोपरे उजळून जायला ह्या लोकांना कोणी सांगितलं होतं?"                 

        प्रत्येकालाच आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अनेकदा  वैफल्य  येतं, निराशा दाटून येते.  पुलंनाही असे अनुभव   असणारच. पण मनातली ती खळबळ, वाचकांसमोर खुल्या दिलानं मांडण्यासाठी, या प्रसिद्ध लेखकाला काही पायऱ्या उतरुन खाली यावं लागलं - - जे त्यांनी सहजपणे  केल्यामुळे, "एक शून्य मी" हे पुस्तक, पुलंचं एक पारदर्शक रुप वाचकांसमोर घेऊन आलेलं आहे .

     प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं उत्तर शोधताना, "एक शून्य मी" या लेखात लिहितात, 

 "प्रश्नांचे भुंगे जन्मालाच कशाला येतात? डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे. कुणाचीच नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हा देखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच  निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामचिन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती." 

   स्वतःला शून्य म्हणून घेण्याची ही पुलंची अस्वस्थता आणि सच्चेपणा वाचकांनाही व्याकूळ आणि अंतर्मुख करून सोडते.त्यांचं, हे असं परखड  आत्मपरीक्षण शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवणं किती धाडसाचं आहे - हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य .  अर्थातच या अस्वस्थतेचे मूळ कारण म्हणजे पुलंची टोकदार संवेदनशीलता आणि जीवनातल्या चांगुलपणावरची  प्रबळ निष्ठा. 

     "एक शून्य मी" हा लेख १९७४ साली लिहिलेला आहे. आज ४७ वर्ष उलटली आहेत.  आज परिस्थिती बदललीय पण छळणारे प्रश्न आजही तसेच आहेत. आजही हा लेख कुठेही कालबाह्य वाटत नाही.आजही त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीतच.

 याच पुस्तकात विनोबांबद्दल लिहिताना पुलं म्हणतात,    "विनोबांनी तीन प्रकारच्या संततीचे वर्णन केले आहे. औरस, दत्तक आणि मानस. मानस संतती सर्वात उत्तम कारण ही संतती आपल्या मानलेल्या बाबांच्या विचारांचा आणि आचारांचा वारसा घेऊन तो वाढीला लावते. विनोबांना बाबा म्हणण्याचा अधिकार या मानस संततीचा. हा अधिकार मला नाही"

    विनोबांचा विलक्षण  प्रभाव पुलंवर  होता.विनोबांचं साहित्य हे त्यांचं श्रद्धास्थान. पण त्यांना  बाबा म्हणण्याचा अधिकार मला नाही हे कबूल करण्याचा पुलंचा  मोठेपणा  त्यांच्या स्वभावाची उंची दाखवून देतो. 

   आज या  स्मृतिदिनाच्या निमित्ताने "एक शून्य मी" या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटला कारण त्यातून पुलंचं स्वतःचं परखड मूल्यमापन करणारं  "माणूसपण" पानापानातून डोकावत राहतं.प्रसिद्धीची,मोठेपणाची,लाडकेपणाची झूल उतरवून,सामान्य माणसाच्या पातळीवर उतरुन, समाजातल्या छोट्या छोट्या प्रश्नांचा शोध घेणं.आणि त्याबरोबरच स्वतःचाही शोध  घेणं - म्हणजे "एक शून्य मी". सामाजिक बांधिलकी जपण्याचं तत्व आयुष्यभरासाठी अंगिकारल्यावर,  जगण्यातल्या चांगूलपणावर असलेला विश्वास   जेव्हा डळमळीत होऊ लागतो तेव्हा प्रांजळपणे दिलेला कबुलीजबाब म्हणजे "एक शून्य मी".

पुलंच्या याच उन्नत प्रांजळ स्वभाववैशिष्ट्यांना आज आपण वंदन करु या.




#एकशून्यमी

#पुलदेशपांडे

#मौजप्रकाशन

#विनोबाभावे

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...