२०१६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'आलोक' हा आसाराम लोमटे लिखित कथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या या कथासंग्रहाची पाचवी आवृत्ती मी वाचली. खरंतर बऱ्याच उशिरा माझ्या हाती हे पुस्तक आलं .अनेक वाचकांचं हे पुस्तक वाचून झालं असेल आणि त्यावर प्रतिक्रियाही देऊन झाल्या असतील.उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेतल्यावर त्याबद्दल दुसर्यांना सांगण्याची ऊर्मी निर्माण होणं हा मानवी स्वभाव आहे आणि याच उद्देशानं मी हातात पेन धरलं.
मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एक एक कथा वाचताना एखादा चित्रपट डोळ्यासमोरून सरकतो आहे, असा अनुभव आला- इतकं जिवंत आणि प्रत्ययकारी हे लिखाण आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्तरांवर माणसांचं होणारं शोषण, शोषित व्यक्तिंचा जगण्यासाठीचा संघर्ष, शोषितांच्या मनातले सल,आणि त्यांच्या मनाच्या तळाचा शोध - -हे सर्वसाधारण सूत्र सगळ्या कथांचं आहे.
पांढरपेशा, वातानुकूलित, नागरी समस्यांमध्ये गुरफटून स्वतःच्या अडचणींचं भांडवल करणाऱ्या शहरी वाचकांचा सुरक्षित कोष टराटरा फाडणाऱ्या या कथा आहेत. लेखकाची ग्रामीण पार्श्वभूमी, पत्रकार असल्यामुळे विविध अनुभवांची शिदोरी, घटना- प्रसंग टिपणारं संवेदनशील मन, त्यातून मानवी स्वभावाचं केलेलं चिंतन, अन्याय- शोषण यामुळे मनात साचलेली खदखद आणि अस्वस्थता....... आणि हे व्यक्त करण्याची प्रबळ ऊर्मी यांचं बेमालूम रसायन म्हणजे हे पुस्तक. या सगळ्या अस्सल अनुभवांना मांडणारी ..'भाषा'- हे या पुस्तकाचं बलस्थान आहे.
शहरी सुरक्षित चौकटीत जगणाऱ्यांच्या कल्पनेपलीकडचं एक ग्रामीण जीवन या कथांमधून समोर येतं. ते केवळ समोरच येत नाही तर थेट मेंदूवर हल्ला करतं, हृदयात कळ आणतं. नेहमीची गुळगुळीत घासलेली, मनावरून ओघळून जाणारी भाषा यात नाही. तर अस्सल ग्रामीण प्रतिमा, प्रतीकं आणि लोककथांमधून रुजलेली, मुरलेली शब्दसंपदा आपल्या मनात रुतत जाते.
- 'आभाळातून कणी कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर'.......
- 'हे सरकार शेळीसारखं आस्तंय. कासेत बुक्क्या हाणल्याशिवाय शेळी पान्हा सोडत नाही'....
- 'कापसाचा कोकडा पडावा तसे सगळ्यांचे चेहरे झालेले'.....
- 'आडरानात अब्रू लुटलेल्या बाई सारखं पोरकेपण भवती दाटून आलं'.....
- 'चांगल्या वाड्याला घूस लागावी आणि तिनं रोज उकीर आणून बाहेर टाकावा तसं त्यांच्या टकूर्यात झालं'.....
- 'शंका - कुशंका -अंदाज - आडाखे अशा सगळ्या गोष्टींनी टम्म फुगलेली रात्र एखाद्या बुडून वर आलेल्या प्रेतासारखी तरंगायला लागली '........
अशी थेट मेंदूवर धडका देणारी भाषा वाचतांना वाचक कथांमधे गुंतत जातो.
'चिरेबंद' कथेचा नायक काही काळासाठी, गावी आजोबांच्या वाड्यात आलेला आहे. आजोबा आता हयात नाहीत. एकुलता एक वारस असूनही, नायकाला वाड्याबद्दल कणभरही आस्था, ओल जाणवत नाही. कारण आजोबांनी लोकांचे शोषण करून ही वास्तू उभारली आहे- हा सल त्याच्या मनात आहे. एकीकडे ही बोच असल्यामुळे स्वतःचा हक्क नाकारणारा नातू आणि दुसरीकडे या प्रचंड वाड्यात एकट्या राहणाऱ्या आजीची जगण्याची असोशी याचा धांडोळा या कथेत लेखकाने घेतला आहे.नातवाची अनास्था आणि आजीचा चिवटपणा रंगवणारी ही कथा संथपणे अंगावर चाल करुन येते.
गावात शेती करणाऱ्या मोठ्या भावात आणि शहरात नोकरी करणार्या लहान भावात वाढत जाणारं अंतर .......पण त्याच वेळी मनाच्या तळात दाबून ठेवलेलं प्रेम- यातील अगतिकतेचं वर्णन आतड्याला पीळ पाडणारं आहे. पुढे मोठ्या भावाच्या आत्महत्येमुळे, लहान भावात निर्माण झालेला अपराधी भाव आणि विधवा वहिनीचा जगण्याचा चिवट संघर्ष - 'ओझं' या कथेतून आपल्यासमोर येतो.
आप्पांसारख्या निरलस आणि प्रामाणिक समाजसेवका बरोबर काम करित असताना, 'खुंदळण' या कथेचा नायक, आर्थिक गरजेसाठी, नाइलाजास्तव आप्पांचा हात सोडून, आमदारांच्या पक्षात दाखल होतो. पण क्षणोक्षणी बोचणारा अपराधी भाव त्याला आतून कुरतडत असतो. ही त्याची कुतरओढ अत्यंत परिणामकारकतेने लेखकाने साकारली आहे.
'कुभांड' कथेतली साधीसुधी अंगणवाडीत खिचडी शिजवणारी गवळण बाई. तिचं लहान लेकरु खेळता खेळता माली पाटलांच्या बागेतील मोसंब्या तोडतं. यावरून माली पाटील त्या मुलाला मारतात आणि गवळण बाईला वाटेल तसं बोलतात. ही संधी साधून माली पाटलांच्या विरोधात असणारे सरपंच तिला पोलिसात तक्रार नोंदवायला सांगतात. खरं युद्ध असतं माली पाटील आणि सरपंच यांचं. पण भरडली जाते गवळण बाई. तिच्या सामान्य आयुष्यात उलथापालथ होऊन तिचं जगणं कठीण होतं. फुकट ओढवून घेतलेल्या संकटाचं ओझं घेऊन जगणारी गवळणबाई वाचकालाही अस्वस्थ करते.
'जीत' या कथेतली हरी ची विधवा पत्नी, अकाली वैधव्याचा धक्का सहन करून आपल्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करुन, जगण्याचा संघर्ष करण्यास सिद्ध झालीय पण पण गावातले राजकारणी तिला निवडणूक लढविण्यास बाध्य करतात. काळ्या आईकडे दुर्लक्ष करून दारोदार मतं मागताना होणारी तिची घुसमट वाचकांना सुन्न करते. निकालाच्या दिवशी ती सारं सोडून शेतात धाव घेते. भरलेली कपाशीची बोंडं बघून ती इतकी हरखून जाते की निवडणुकीतला विजयही तिला कवडीमोल वाटतो. सत्तेसाठी निष्पाप जनतेच्या शोषणाची ही कथा व्यथित करुन टाकणारी आहे.
'वळण' या कथेत लहानगी प्रयाग शाळेतून घरी येताना एका हत्येची घटना बघते. तिचं चिमुकलं भावविश्व या घटनेनं विस्कटून जातं. खरी साक्ष दिल्याने, तिच्यावर येणारा सत्ताधाऱ्यांचा दबाव तिच्या शिकण्याच्या स्वप्नालाही सुरुंग लावू लागतो. तिच्या इवलाश्या जगण्यातली उलथापालथ वाचताना मस्तकात संतापाची तिडीक उठते.
ही सगळी ग्रामीण भागातली 'नाही रे' गटातली अतिसामान्य माणसं. जगण्यातील संघर्षाला, ती त्यांच्या पद्धतीने सामोरी जात आहेत. त्यांना शिक्षण नाही. भौतिक समृद्धी नाही. सोयी-सुविधा नाहीत. पण त्यांच्यात असणारा दुःखाचा सहज स्वीकार, जगण्याचा चिवटपणा, पाय रोवून उभी राहण्याची शक्ती, आणि याबरोबरच त्यांच्यात खोलवर असणारा अगम्य ऊर्जास्रोत ....
या सगळ्यांचं मूळ कशात आहे याचा शोध लेखकाने घेतला आहे. मनाचा तळ ढवळून टाकणाऱ्या, वाचकाला सुरक्षित चौकटीतून बाहेर ओढून, ग्रामीण जीवनातील गुंते दाखवणाऱ्या, मेंदू मनावरील- शहरी- चकचकीत- गुळगुळीत समजुतींची ढापणं ओरबाडून काढणाऱ्या या कथा आहेत. आपल्या भावविश्वाच्या चौकटी विस्तारून समाजभानाच्या कक्षा रुंदावणार्या या कथा आहेत.
याशिवाय या पुस्तकाचा कळस म्हणजे यातील 'परिशिष्ट'. प्रत्येक लेखकानं ते वाचलंच पाहिजे असं. हे परिशिष्ट म्हणजे लेखकांसाठी एक वस्तुपाठच आहे.यात लेखकानं आपली लेखन प्रक्रिया आणि लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.
" सत्ता, संपत्ती यांची अविवेकी ताकत ज्यांचे जगणे मुळापासून उखडायला निघालेली आहे आणि जी माणसे सामाजिक, आर्थिक विषमतेत, समाजाच्या तळाशी आहेत... अशी सर्व माणसे मला माझ्या आस्थेच्या परिघात जवळची वाटतात. त्यांच्या जगण्यातले बारकावे ,दुर्लक्षित कंगोरे, त्यांच्या जगण्यातील हर्ष- खेदा च्या जागा शब्दातून व्यक्त करण्याची मला गरज वाटते .त्यांच्या जगण्याची आच माझ्या पर्यंत पोचते आणि तीच लिहायला भाग पाडते".- हा एक लहानसा परिच्छेद लेखकातल्या 'माणसाची' उंची दाखवणारा आहे.
"मस्तकातला सगळा ऐवज घेऊन लेखक जेव्हा लिहायला बसतो तेव्हा केवळ अक्षरेच झरतात असे नाही तर त्याच्या उरातूनही काही झरत असते, पाझरत असते". लेखकाचे हे वाक्य 'आलोक'च्या प्रत्येक ओळीगणिक जाणवत राहतं.
परिशिष्ट वाचल्यानंतर परत नव्याने कथा वाचण्याचा मोह आवरला नाही. आणि लेखकाची भूमिका समजल्यावर कथेत अधिकाधिक खोल शिरण्याचा अनुभव आला. हा अनुभव सगळ्या वाचकांनाही यावा यासाठीच हा लेखप्रपंच.
#आलोक
#आसारामलोमटे
#साहित्यअकादमीपुरस्कार













