Sunday, December 20, 2020

एका सहभोजनाची गोष्ट ....

 परवा आमच्या जवळच्या एका कुटुंबाकडून त्यांच्या फार्म हाऊस वर एक दिवसाच्या गेट टुगेदर आणि  सहभोजना साठी निमंत्रण आलं. माझ्या अंगात उत्साह संचारला.त्यांच्या फार्महाऊसचं खूप  कौतुक ऐकलं होतं. तेवढंच  त्या कोरोनाच्या उदास वातावरणातून जरा बदल. नवऱ्याने नेहमीप्रमाणेच मीटींगचे कारण सांगून अंग काढून घेतलं आणि चिरंजीव? बाय डिफॉल्ट त्याला घरगुती कार्यक्रमात सहभागी होण्याचं अंगच नाही त्यामुळे सहभोजनाचं निमंत्रण त्याच्या मेंदूपर्यंत शिरण्याचा प्रश्नच नव्हता.

      मीच उत्साहाने तयार होऊन फार्महाऊसवर पोचले. एकदम प्रसन्न  वातावरण होतं. जुन्या धाटणीचं बैठं कौलारू, ऐसपैस घर. चारही बाजूंनी हिरवीगार शेती. बाजूलाच पेरू, लिंबू, आंब्याचा मळा. झाडाला टांगलेले झोके. लहान मुलांसाठी घसरगुंडी , सीसॉ.चुलीवर सुरू असलेला अस्सल गावरान स्वयंपाक. आहाहा..........

 पण मला कोणाची चाहूल लागत नव्हती. मी वेळेआधीच पोचले की काय???

हळूच  घरात शिरले. निमंत्रित मध्यमवयीन मंडळी होम थिएटर वर "चंद्र आहे साक्षीला" सोबत अक्षरशः समाधी अवस्थेत पोचली होती कारण  मी आल्याचं कुणाला  कळलंही नाही.

    दिवसाढवळ्या, निसर्गरम्य वातावरणात,फार्महाऊसच्या घरात बसून त्या  चंद्राला साक्षीला घ्यायचं काय प्रयोजन???

    मी तिथून काढता पाय घेतला आणि मागच्या व्हरांड्यात पोचले.तिथे  अर्ध्या चड्ड्या घातलेल्या, केस विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या, आजूबाजूचं भान नसलेल्या तरुण मुला मुलींचा ग्रुप दिसला. यातील प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्या आयुधांसह - (मोबाईल,टॕब, लॅपटॉप - - -सह) (समाधीच्याही  पुढची अवस्था असते का हो???) - परग्रहावर पोचलेला........

  नाही म्हणायला होस्ट जोडपं जोडपं जागृतावस्थेत असल्यामुळे माझा त्यांच्याशी खराखुरा संवाद झाला.ते कामात असल्याने मी  बाहेर आले.मोकळेपणानं  हिंडले. झाडापानांचा गंध शरीरातल्या रंध्रारंध्रात ओढून घेतला. कुणाचं लक्ष नाही हे बघून, माझं वय विसरून, मी  झोक्यावर मनसोक्त  खेळून  घेतलं.

  दरम्यान चंद्राची साक्ष संपल्याने समाधी अवस्थेतली मंडळी आता भौतिक  जगात परतली असतील म्हणून त्यांच्यात जाऊन बसले. त्यापैकी एका आजीकडून "सांग तू आहेस का"चे  तब्बल तीन एपिसोड्स न बघण्याचा घोर अपराध घडला होता त्यामुळे इतर मंडळींकडून ती ष्टोरी ऐकून त्यांचं पापक्षालन सुरू होतं.

" तू नक्कीच नाही यात"- - असं मी मला स्वतःला सांगून परत बाहेर आले .आता तर डोकं फिरलेल्या अवस्थेत , तिरीमिरीत , मी याही वयात (वय वर्षे साठ) घसरगुंडी खेळायचाही निश्चय केला. (अर्थात त्याबद्दल तपशीलवार पुढे कधीतरी .......)  त्यानंतर स्वयंपाक करणाऱ्या बायकांशी  गप्पा-टप्पा करुन हातावरच्या भाकरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नही करुन झाला .

आता मात्र  सगळी मंडळी भूतलावर परतली होती आणि पाय मोकळे करायला बाहेर आली. मला जरा हुरूप आला.आता गेट टुगेदर घडण्याची आशा निर्माण झाली. पण हाय रे माझ्या कर्मा!!! आता फोटोसेशन सुरू झालं. एका लाईनीत, उंचीप्रमाणे,सगळ्यांनी बाजूच्यांच्या डाव्या खांद्यावर हात ठेवलेले, सगळे पाठमोरे,पण उजवीकडे मान वळवलेले, पायऱ्यांवर एकाखाली एक बसलेले .......अशा हल्लीच्या सगळ्या प्रचलित पोझेस मध्ये यथासांग फोटो झाले. नंतर ड्रेस बदलून हिरव्या रंगात मंडळी अवतीर्ण झाली. मी हिरवा ड्रेस आणला नसल्यामुळे माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक बघूनही झालं. एकंदरीत फोटोंचा तो राष्ट्रीय कार्यक्रम एकदाचा संपला.

   आता मात्र खूप भूक लागली होती .चुलीवरचा तो गावरान मेनू नाकाला, जिभेला, आणि पोटाला खुणावत होता. गर्द वनराईत मस्त भोजनाची व्यवस्था केली होती. आता निवांत हादडायचं या उद्देशाने मी सरसावले......

तितक्यात ....

 फुगलेल्या भाकरीचा, भरलेल्या वांग्याचा,कांदाभजींचा,  झणझणीत रश्शाचा, केशरी चकचकीत जिलब्यांचा,पापडांचा क्लोज-अप घेण्यासाठी आता तरुण मंडळी सरसावली होती. आता हे पुढ्यातलं सुग्रास अन्न खाऊ ,की या फोटोग्राफर मंडळींना "खाऊ कि गिळू "असा माझा नुसता तिळपापड होत होता. शेवटी पुन्हा  फोटोंचा राष्ट्रीय  कार्यक्रम संपल्यानंतर भोजन सुरू झालं.

 चार घास पोटात गेल्यावर मध्यमवयीन लोकांचा थोडाफार तरी - औपचारिक का होईना पण  संवाद सुरू झाला.

 पण तरुण मंडळी??? जितक्या इंटरेस्ट घेऊन त्यांनी पदार्थाचे फोटो काढले, तितक्याच नीरसतेनं ते समोरचं अन्न चिवडत होते. साक्षात  रुचकर अन्नब्रह्म समोर असतानाही त्यांचं आभासी ब्रम्हांडाशी असलेलं अद्वैत तुटलं  नव्हतं . इतक्या लहान वयात, "सुखदुःखे समे कृत्वा, लाभलाभौ  जयाजयौ" प्रत पोचलेली ही मंडळी बघून मला धन्य धन्य  वाटलं. भाकरी, भजी, रश्शाच्या  सुग्रास चवी पलीकडे जाऊन व्हर्च्युअल जगात गुडूप झालेल्या या तरुणाईचा  आनंद नक्की कशात असावा हा प्रश्न मला छळू लागला. तसंच माझ्यामोरच्या मध्यमवयीन मंडळींना, निसर्गाच्या सान्निध्यातही  टीव्ही सिरीयल आणि सोशल मीडियावर टाकायच्या फोटोंचं इतकं महत्त्व असावं???? 

     त्यांचाही आनंद नक्की कशात  असावा?

   असो. मी मात्र माझा झोक्यावरचा आणि घसरगुंडीवर खेळण्याचा(?) चिमुटभर आनंद मात्र उरी पोटी जपून घरी घेऊन आले.



#गेटटुगेदर

#फार्महाऊस

#सहभोजन

#आनंद

Saturday, November 28, 2020

 "आई एक नाव असतं.

घरातल्या घरात,एक गजबजलेलं गाव असतं."

फ.मु.शिंदेंच्या या दोन ओळीतच आख्खी "आई" सामावली आहे- 

तुमची ,माझी,सगळ्यांचीच.

आयुष्यभर अनेक निरर्थक गोष्टींच्या मागे पळताना आईप्रती साधी कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आम्हाला भासत नाही इतकं त्या माऊलीला गृहीत धरल्या जातं.

       मला मिळालीय संधी.....

      तिच्या वाढदिवसाची........

बघतेय,आभाळभर भावना चिमूटभर शब्दात  मांडता येतात  का????



 "अगं, लवकर इकडे ये"..... आईची भल्या सकाळी आलेली हाक ऐकून मी ताड्कन उठून बसले. क्षणभर  छातीत धस्स झालं. धावत जाऊन बघितलं तर आई खिडकीसमोर उभी. 

"अगं बघ. सूर्योदय किती छान दिसतोय. तो लालभडक गोळा हळूहळू वर येतोय ना,ते बघतांना माझी नजर हटतच नाहीये "- - तिचा उत्तेजित आणि आनंदित स्वर .

"आई काय हे? पहिल्यांदा बघतोय का आपण सूर्योदय ?" - - झोप मोडल्यामुळे माझा  चिडका आणि रागीट स्वर. आणि मी तणतणत परत पलंगावर.

 रोजचा सूर्योदय,सूर्यास्त, रोज झाडावर येणारे पक्षी, रोज फुलणारी फुलं- - ही नक्कीच ऊर्जा देणारी आणि सकारात्मकता जोपासणारी निसर्गाची रूपं असली तरी त्यांना बघून लहान मुलांसारखं उत्तेजित होणं आणि त्याहीपुढे जाऊन फोनवर त्याचं वर्णन दुसऱ्याला ऐकवणं - ही वृत्ती नेमकी कोणत्या वयात असावी? 

          विश्वास बसणार नाही पण नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माझ्या आईत हे एक लहान  आनंदी मूल कायम बागडत असतं.

 आणि तिच्यातल्या त्या लहान बालकाच्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी आम्ही तिघीही "पोक्त" वयाच्या तिच्या मुली अगदी सज्ज असतो.

पण तिनं असं कधीच केलं नाही.

 आमच्या लहानपणी सगळ्यात मौल्यवान असं तिनं आम्हाला  काही दिलं असेल तर ते म्हणजे मोकळे श्वास घेण्याचं स्वातंत्र्य.......

सूचनांचा भडिमार नाही किंवा शिस्तीचा बडगा नाही...

संस्कारांचा जाणीवपूर्वक अतिरेक नाही किंवा उपदेशाचे डोस नाहीत ...

एक बंधनमुक्त बालपण तिनं आम्हाला दिलं.

 आजही जगतांना तो मोकळेपणा आम्हाला बळ देतोय .

मी माझ्या मुलांना देऊ शकले असला मोकळा श्वास ???नाहीच बहुतेक .

हात धरून जाणीवपूर्वक तसं तिनं आम्हाला काहीच शिकवलं नाही.

 मात्र तिच्या जगण्यातून कितीतरी महत्त्वाचे धडे आम्हाला मिळाले आणि अजूनही मिळताहेत .पण नेहमीप्रमाणे "आई "जशी गृहीत धरली जाते तसे कितीतरी धडे हे गृहीतच धरले गेले.......

 काही धडे मनापासून अभ्यासले गेले ......

काही धडे रक्तात मुरले...... बरेचसे आचरणातही आले .....

"आई "नावाच्या पाठशाळेला कितीतरी काळ गंभीरपणे घेतलंच नाही कधी.

 हल्ली तर.........

" आई तुला कसं काहीच समजत नाही???"....

 असं म्हणून तिचीच शाळा आम्ही सगळेच घेत असतो. ती सुद्धा शहाण्या विद्यार्थ्याप्रमाणे आमचं ज्ञानामृत शांतपणे पचवते.

  १९३१चा तिचा  जन्म. छिंदवाडा गावातलं लहानपण, लग्नानंतरचं मॕट्रिक ते पीएचडी पर्यंत शिक्षण ,एकत्र कुटुंब , सोवळंओवळं,प्राध्यापिकेची नोकरी ,आम्हा तिघींची शिक्षणं, तिघींची लग्नं,बाबांचं दीर्घ आजारपण,नातवंडं, त्यांची लग्नं,नागपूरहून पुण्याला आणि पुण्याहून नाशिकला स्थलांतर आणि आताचं हे तंत्र युगातलं यांत्रिक जगणं..........ही सगळी स्थित्यंतरं, सुखदुःखाचे चढउतार अनुभवून,सोसून,पचवून तिच्यातलं ते आनंदाचं झाड अजूनही तेवढंच हिरवं आणि टवटवीत कसं आहे  हे मला अजूनही  उमगलेलं नाही.

अंगभूत शांतता ,आनंदी स्वभाव आणि स्थिरचित्त वृत्ती हे तिचे  "इनबिल्ट अॕप्स" मला डाऊनलोड करता आले असते तर????

आई- -आज तुझा एकोणनव्वदावा वाढदिवस .

तुला या वाढदिवसाला काही द्यावं असं माझ्याकडे तरी काहीच नाही.

उलट मीच तुला काहीतरी मागतेय.......

तुझं रक्त तर माझ्या नसानसात आहेच पण.....

तुझ्या शरीरातल्या रक्तासोबत वाहणारा तो निखळ आनंद .....

तो माझ्या  नावावर करुन दे ना एकदाचा.

तुझ्या कपाटात,तुझ्या सामानात मी खूप शोधली ती अक्षय आनंदाची कुपी........

सापडली नाही कधीच .

हल्ली मला खूप गरज भासतेय त्या आनंदाच्या कुपीची...

आजकालच्या आयांसारखा आटापिटा कर,काहीही कर पण माझी  मागणी  पूर्ण करच.

     आणि हो. हे करतांना तुझ्यातलं ते हिरवं आनंदाचं झाड असंच बहरलेलं राहू दे.

       नेहमीसाठीच.

Thursday, November 5, 2020

आज ८ नोव्हेंबर.
 आज पुलंची जयंती.

माझ्या भावविश्वाला आणि  विचारांना समृद्ध करणाऱ्या 'पुलसाहित्याला' कोटी कोटी प्रणाम!!!

पुलंच्या नेमक्या कोणत्या साहित्याची आज उजळणी करायची......हा माझ्या समोर गहन प्रश्न .............

विनोदी की व्यक्तीचित्रण की वैचारिक ??

पुलंच्या बालपणातच जाऊ या आपण....

लहानपणी शाळेत असताना .... तुमच्या आमच्या मनात जे काही विचार  यायचे ना,अगदी तसेच ........

पण शब्द मात्र  पुलंचे.........मिष्किल, खोडकर आणि व्रात्य.

हसवणूक पुस्तकातील .....

     बिगरी ते मॕट्रिक......

माझ्या  शालेय जीवनात गणित, भाषा, इतिहास, भूगोल, ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू. त्यातला गणित हा बलाढ्य, पण मला सगळे सारखे होते. मी यापैकी एकाही विषयात गचकलो नाही, पण कोणाशीही मैत्री जमली नाही. एखाद्या  दुबळ्या राष्ट्राने सर्वांशी मित्रभाव  ठेवून असावे ,तसा राहिलो. पण ह्या सार्‍या विषयांची माझ्या बालपणाला वाळवी लागली होती. रात्रंदिवस ती माझे बाल्य पोखरीत होती. मी पाढे धडाधड म्हणत असे ,पण घाबरून. त्यातल्या तेरा,स"तरा, एकोणीस,तेवीस  आणि एकोणतीस या पाढ्यांना मी आजही भितो. त्या संकटातून सुटत सुटत विसाच्या किंवा तिसाच्या पाढ्यावर आलो की आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे, आणि त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर गार वाटते, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे .मॅट्रिक नावाच्या जिवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर पुन्हा माझा कधीही या तेरा,सतरा,तेवीस,एकोणीसशी संबंध आला नाही. पाऊणकी, सवायकी, औटकी यातली प्रत्येक गतजन्मीची चेटकी आहे यावर माझा नितांत विश्वास बसायचा.चेटक्या लहान पोरांना पळवतात म्हणे. ह्या चेटक्यांनी माझे बाल्य पळवले.

आम्हाला डोक्याबरोबर डोळे  बिघडवणार्या बारिक टायपात छापलेले गोखल्यांचे अंकगणित असे.इतके कुरुप पुस्तक  त्यानंतर माझ्या  पाहण्यात नाही.गणित वाले गोखले हेच गोपाळ कृष्ण गोखले हे कळल्यावर पुढच्या सर्व पिढ्या त्यांना सोडून गांधींच्या मागे का गेल्या ,हे गणित मला अचानक सुटले."........


हसवणूक पुस्तकातील शब्द न् शब्द वाचकांना विनोदाच्या झोक्यावर अलवारपणे झुलवत ठेवतो आणि मनावरचं मळभ कधी नाहीसं होतं हे कळतही नाही.

हीच  पुलंची शैली  महान व्यक्तींचं वर्णन करतेवेळी अचूक  विश्लेषणात्मक होते - तेही साध्या सहज शब्दात .


एक शून्य या पुस्तकात गांधीजींबद्दल ते लिहीतात.......

 "गांधीजींच्या लेखी एखादा वैज्ञानिक आणि केवळ अंगमेहनत करणारा भंगी ही दोन टोके नव्हती. समाज पुरुषाच्या शरीरातील समान महत्त्वाची घटके होती .शौचकूप गलीच्छ झाल्यावर मायक्रोस्कोप ऐवजी झाडू हवा आणि मलरोग तपासायला मायक्रोस्कोप वापरता यायला हवा. त्या त्या वेळी ती ती कामे समान महत्त्वाची. म्हणूनच गांधींनी लेखणी,टकळी आणि झाडू एकाच तोलाने वापरला .गांधीजी खरे कर्मयोगी होते. प्रार्थनेची जागा आणि शौचाचा संडास या दोन्ही स्थानांविषयी त्यांनी  तितक्याच उत्कटतेनं विचार  केला."

गांधीजींच्या स्वभाववैशिष्ट्याविषयी लिहिताना ,पुलंनी कुठेही जडपणा येऊ न देता,रंजकशैलीत गांधीजी उभे केले आहेत.पुलंच्या लेखामुळे गांधीजींच्या साहित्याकडे वळणारी बरीच मंडळी आहेत.

        पुलंची निरीक्षण शक्ती अफाट तर आहेच पण ते निरीक्षण खुसखुशीत ढंगानं मांडण्याची सिद्धी तर अलौकिकच आहे.

"पानवाला" या लेखात ते लिहितात...............

" महात्माजींचे उघडया अंगाचे फोटो कुठेही दिसतात परंतु नेहरू सदरा घालून ,गांधी टोपी घातलेले गांधी अजूनही आमच्या पानवाल्यानेच जतन करून ठेवले आहेत .गांधी जवाहरलालजींच्या मागे शिवाजी महाराज ,राणा प्रताप,कानात  लांब इयरिंग्ज आणि लांब बाह्यांचे पोलके घातलेल्या इ.स.एकोणीसशे सोळातल्या सरोजिनीदेवी - -यांच्यापुढे मारुती आणि  तोसुद्धा छाती फाडून आतला रामपंचायतनाचा सीन दाखवणारा!!इतिहास ,राजकारण ,धर्मकारण यांचा इतका आटोपशीर आविष्कार !! अजून सूर्योदयाचा देखावा तर विचारायलाच नको.आकाशात विमान  आहे ,विमानातून बाहेर डोकावणारा व डोळ्यांपेक्षा रुंद काळा चष्मा लावलेला पायलट आहे .पुलावर आगगाडी आहे .पुलाखाली गलबत आहे ,गलबताखाली खाडी आहे .खाडीत कमळे आहेत.खाडीच्या बाजूला राजवाडा आहे .त्याच्या कमानीवर 'वेलकम' असा बोर्ड आहे .राजवाड्यासमोर बाग आहे .बागेत भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतो आहे आणि  राधाबाला मुग्ध होऊन आगगाडीकडे पहात आहे!!! स्थल,काल,विषय - कसल्याही जुलमी मर्यादा न मानणारे हे कलेचे प्रात्यक्षिक फक्त पानवाल्याच्याच काचेवर दिसू शकते!"

 अशी पुलंची नर्मविनोदी शैली आणि त्यामुळे अजरामर झालेल्या असंख्य व्यक्तिरेखा.

     वुडहाऊस हे पुलंचं दैवत .वुडहाऊस बद्दल लिहिताना ते कमालीचे हळवेही होतात.

"१६फेब्रु.१९७५.सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो  होतो.वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे .त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार नाहीत .माझ्या  प्रवासी बॕगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हा हवाच.तेवढ्यात दाराच्या फटीतून 'सकाळ' सरकला.पहिल्या पानावर वुडहाऊसच्या निधनाची बातमी.एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हातात ९४व्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा  'सकाळ'.त्या क्षणी मला वुडहाऊसच्याच एका उद्गाराची आठवण झाली .'लेओनारा' ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर ६३वर्षाचा वुडहाऊस  उद्गारला होता - - 'आय थॉट शी वॉज इम्माॕर्टल'.आपली  लाडकी  लेओनारा आणि तिचा मृत्यू या  दोन घटना वुडहाऊसच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या .

'मला वाटलं की ती अमर आहे ' - या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणार्या निर्घृण घावाला एखाद्या शोकसूत्रासारखी वाचा फुटली आहे.वुडहाऊसच्या निधनानंतर त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच म्हटलं असेल की,अरे,आम्हाला वाटलं होतं की तो अमर आहे!"..........

पुलं, आम्हीही तुम्हाला असंच  म्हटलंय.......आणि तुम्ही आहातच की.....आमच्या रक्तात ,स्पंदनात आणि श्वासात.कायमचे !!!



#पुलंवाढदिवस

#एकशून्यमी

#हसवणूक

#पानवाला

#बिगरीतेमॕट्रिक

#महात्मागांधी

Friday, October 30, 2020

 माझ्या  मराठीची दुर्दशा...की दुदर्शा की र्दुदशा???

अनेक बारक्या गल्ल्या, अवघड वळणं,डोक्यात जाणारा ट्रॕफिक पार करत शेवटी एकदाचं हवं ते दुकान सापडलं.आणि दुकान सापडल्याच्या आनंदाच्या फुग्याला लगोलग टाचणी पण लागली.  'आर्शिवाद ग्राफिक्स'- हे पाटीवरचं नाव  वाचूनच डोकं फिरलं.  'आशिर्वाद' ला 'आर्शिवाद' लिहिणाऱ्या दुकानात कसल्या ग्राफिक्स ची अपेक्षा करणार? आणि हो - 'ग्राफिक्स' हा इंग्रजी शब्द मात्र अचूक लिहिला होता पाटीवर. दुकानात शिरल्यावर मी टोकलंच त्या मालकाला.

' हो मॅडम.लिहिताना  चूक झाली, हे पाटी लावल्यावर लक्षात आलं. नंतर दुरुस्त करतो करतो म्हणतोय पण कामं इतकी असतात ना............'

       ही खरी माझी डोकेदुखी. लिहीतांना चूक होणं समजू शकते मी. पण ती चूक - पदरी पडलं पवित्र झालं -च्या चालीवर स्वीकारणं - हे मला पटूच शकत नाही.

  ' लिहिल्या गेलं 'आर्शिवाद'.वाचताना 'आशिर्वाद' वाचा की.एवढं  काय  बिघडलं ?'- - -ही जी बेफिकिर वृत्ती असते ना-ती माझ्या  डोक्यात  जाते .

 तसंही रफार आणि अनुस्वार या मंडळींचं नशीबच फुटकं. (आता रफार आणि अनुस्वार म्हणजे काय हे कृपया विचारु नका हो)बिचारे  नेहमीच वेटिंग लिस्टमध्ये असतात. लिहिणारा आपल्या सोयीनुसार, ज्ञानानुसार त्यांना शब्दावर कुठेतरी बसवून मोकळा होतो - मग हर्षवर्धन चं हषर्वर्धन झालं काय किंवा आनंदमंगलचं आनदंमगंल झालं तरी कुणाला फारसा फरक पडत नाही.

   ज्या शाळेत उत्कृष्ट मराठी शिक्षक आहेत अशा मराठी शाळेत माझं शिक्षण झालंय. आजच्या पिढीला हे वाचून मी पुराणवस्तु संग्रहालयातली वाटू शकेन कदाचित. आमच्या मराठीच्या बाई शुद्धलेखन आणि व्याकरण याबद्दल विलक्षण आग्रही होत्या.( हे शुद्धलेखन आणि व्याकरण म्हणजे काय रे भाऊ?- - हो. हा प्रश्न अपेक्षितच आहे मला)

 ह्रस्व, दीर्घ, स्वल्पविराम पूर्णविराम, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, या विभूतींना आमच्या डोक्याच्या  हार्डवेअर मध्ये योग्य रीतीने फिट्ट करण्याचं चोख काम आमच्या बाईंनी प्रामाणिकपणे  केलं. आता या ह्रस्वदीर्घादि विभूतींची नावं ऐकून आजच्या पिढीला हडप्पा-मोहंजोदारो उत्खननातून या वस्तू  सापडल्या असाव्यात असा समज होणं सहज शक्य आहे. आणि हो. काना- मात्रा मधील 'काना'ला 'कान्हा' असंही लिहिलं जातं या ज्ञानाची प्राप्ती मला नुकतीच झाली आहे बरं का.

     एकदा निबंधात हस्तांदोलन च्या ऐवजी हंस्तादोलन - असं मी लिहिलं होतं तेव्हा बाईंनी तो शब्द पन्नास वेळा अचूक लिहिण्याची शिक्षा मला दिली होती.(अशा अनेक शिक्षा त्या कोवळ्या वयात  आम्ही  निमूटपणे भोगल्या आहेत - त्याही पालकांना न समजता)  बरं फक्त लिहिणंच नाही तर उच्चार कसे असावेत यावरही बाईंचं लक्ष असायचं .धडा वाचतांना मी 'भारतात' हा शब्द 'भार्तात' असा वाचता क्षणी बाईंनी डोक्यावर टपली हाणली. 

 'अगं तो काय 'सर्वात', 'मार्गात', 'वर्गात' असा शब्द आहे का? शारदेला शार्दा म्हणशील का?'   

 भाषेच्या लेखना वाचनाचे असे संस्कार झाल्यामुळे कुठेही जरा चूक दिसली की डोकं फिरतंच. माझं शास्त्र जेव्हा 'आर्यूवेद' असं लिहिल्या जातं तेव्हा मस्तकात तिडीक  जातेच. पण हल्ली असल्या चुकांना महत्त्व दिल्या जात नाही किंबहुना त्या चुकाच नाहीत असंही काहींचं म्हणणं आहे. 'भावना पोचणं महत्त्वाचं - -व्याकरण नाही '- ही हल्लीची टॅगलाईन मी काही पचवू शकत नाही .बेफिकीरपणे वाटेल तिथे अनुस्वार आणि रफार देणाऱ्यांची मला खरोखर चीड येते. ज्या शब्दांमध्ये अनुस्वार आणि रफार दोन्ही आहेत ,अशा शब्दांबद्दल मला खूप सहानुभूती वाटते .अंतर्नाद, अंतर्मन, अंतर्यामी ,अंतर्बाह्य अशा शब्दांना विचारा एकदा - त्यांचे कसे हाल केले जातात ते....... 

  'संकर्षण', 'धैर्यवर्धन' अशी नावं असणाऱ्या व्यक्तींना विचारा त्यांच्या व्यथा ..........

 प्रंचड, गुतांगुंत ,वारवांर, ससंर्ग, विर्सजन अशा स्वरूपात येणारे हे नेहमीचे शब्द वाचताना हल्ली सवय करावी लागतेय कारण कोणाला त्याबद्दल फारसं गांभिर्य नसतं. आणि हे मी सध्या फक्त रफार आणि अनुस्वार याबद्दलच लिहिते आहे. बाकी शुद्धलेखना बद्दल लिहायचं तर  ह्रस्वदीर्घादि प्रत्येक  मंडळींवर आणि प्रत्येक  विरामचिन्हावर ( हे आणखी काय  नवीन ?) एक स्वतंत्र लेख होईल .

    बरेचदा असे चुकीचे शब्द वाचताना माझं मनोरंजनही झालेलं आहे .जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण  कंपाउंडवर जवळजवळ  पन्नास वेळा  लिहिलेलं 'छोटं कुंटुब सुखी कुंटुब' वाचताना --काहीही न खटकणाऱ्या  मंडळींजवळ सुखी माणसाचा सदरा आहे याचा हेवाही वाटला आहे.

हलकंफुलकं आणि  हलकफुलक व मोकळंढाकळं आणि मोकळढाकळ यातला नेमका फरक समजणाऱ्यांशी माझी नाळ जुळायला (माझीतरी) हरकत नाही.

    शेवटी मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि माझी मातृभाषा म्हटलं की प्रेम आलंच .प्रेम म्हटलं की  जबाबदारी आलीच. त्यामुळे कुठेही चूक दिसली तर शक्यतो ती दुरुस्त करण्याचा,टोकण्याचा, निषेध नोंदण्याचा प्रयत्न करणं हा माझा खाक्या असतो. तुम्ही काय म्हणाल याबद्दल????#मराठी#शुद्धलेखन#रफार#अनुस्वार#व्याकरण#

Sunday, October 4, 2020

भरतकाम अर्थातच एम्ब्रॉयडरी........ताण व्यवस्थापनाचा माझा उपाय...
गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थिती मुळे प्रत्येकच जण धास्तावला आहे.मी ही त्याला अपवाद नाहीच. त्यात माझा वैद्यकीय व्यवसाय.रोज नवनवीन पेशंटशी संबंध येणार.
कायम डोक्यावर टांगती तलवार.
अनिश्चितता, नकारात्मकता जशा जगण्याचाच भाग झालेल्या.
त्यासाठी 'स्वास्थ्यभान' ही लेखमाला लिहायला सुरुवात केली.
पण लेखमाला जशी संपली तसं लिखाणात गुंतलेलं मन ही मोकळं झालं आणि .......
आता काय????
वेगवेगळ्या रेसिपीज केल्या.पण मनाला हवा तो दिलासा नाही मिळाला.
त्यादिवशी साड्यांचा कप्पा आवरतांना , तळाशी एक रजिस्टर च्या आकाराचं पाकीट दिसलं........
अँकर क्विक स्टिच???
युरेका युरेका- - - असं ओरडायचंच बाकी राह्यलं होतं माझं.
त्या चारही कोऱ्या करकरीत  फ्रेम्स मला खुणावू लागल्या.  लहान मुलीच्या उत्साहानं मी ते भरतकाम करायला घेतलं आणि प्रत्येक टाक्यागणिक नकारात्मकता कमी होऊ लागली.
 

भरतकामाची मला लहानपणापासून खूप आवड.४०/५० वर्षांपूर्वी चा काळ.त्यावेळी मुली आवर्जून भरतकाम करित.मी तर आवड असल्याने रुमाल,कुर्ते,ब्लाऊज,पडदे,टेबलक्लॉथ, बेडशीट,कुशन कव्हर,साड्या........ कुणालाही भरतकामाच्या तावडीतून सोडलं नाही.
 पुढे लग्न, नोकरी, मुलंबाळं यात माझं भरतकाम मागेच पडलं.याचबरोबर भरतकाम आउटडेटेड होण्याचाही तो काळ होता.
   एकदा पंचवीस वर्षांपूर्वी टीव्हीवर मी अँकर क्विक स्टीच ची जाहिरात बघितली आणि माझ्या डोक्यात किडा वळवळू लागला.भरतकाम करुन ती फ्रेम भिंतीवर लावण्याची आयडियाच मुळात भन्नाट होती.
मी या स्टीच कीटचं शोधकार्य सुरु केलं.अकोल्यात कोणत्याही नवीन वस्तूचा नेहमीप्रमाणे नन्नाचाच पाढा होता -जो आजही असतोच.
माझं माहेर नागपूर असल्यानं तिथे बर्डीवरच्या बॉम्बे एम्पोरियम मधे मला अँकर क्विक स्टिच एकदाचं सापडलं.आधाशासारख्या ५ फ्रेम्स विकत घेऊन ,मी जसा वेळ मिळेल तसा, रात्री जागून  त्या पूर्ण केल्या.त्यासाठी घरातल्यांची बोलणी पण खाल्ली.मग प्रश्न आला फ्रेम करण्याचा .......नेहमी प्रमाणे अकोल्यात मनासारख्या फ्रेम्स करुन मिळेनात.झालं ...माझं भरतकाम कित्येक दिवस कपाटातच पडून राहिलं.

     त्या वेळी  कामानिमित्त माझे यजमान महिन्यातून दोनदा  तरी  मुंबई ला जात.ठराविक गेस्टहाऊस मध्ये त्यांचा मुक्काम  असे.योगायोगाने बाजूलाच एक फ्रेमचं दुकान  होतं.मला जशी हवी होती,तशी फ्रेम ह्यांना तिथे  आढळली आणि त्यांचंही "युरेका- युरेका" झालं.मग काय,  लगोलग आमचं भरतकाम  मुंबईला  गेलं आणि  सुरेख  फ्रेम्समधे सजून घरी  वापस आलं.
त्या फ्रेम्स भिंतीवर लावून वीस वर्ष झालीत.आजही पहिल्यांदा बघणार्याच्या नजरेतलं कौतुक माझ्या अंगावर मुठभर मांस चढवतंच.
 मग हा सिलसिला सुरूच राहिला.नागपूरच्या प्रत्येक ट्रीप मधे २/४फ्रेम्स विकत आणायच्या.माझं बघून माझ्या मुलीलाही हा नाद लागला.त्यावेळी लहान मुलांसाठीही त्यांच्या वयानुरूप डीझाईन च्या फ्रेम्स मिळायच्या.आम्ही दोघींनी भरपूर फ्रेम्स केल्या.आमच्या घरातली एक भिंतच मुळी अँकर स्टीच कीटची आहे.

हळूहळू नागपूर च्या ट्रिप्स कमी झाल्या.बर्डीवर जाणंही व्हायचं नाही.कधी काळी बॉम्बे एम्पोरियम मधे गेलंच की नविन नोकर असायचे.त्यांना मला काय हवंय हे कळायचंच नाही.
मग काऊंटर वरच्या मालकांकडे बघितलं की ते हसून आत जायचे आणि शोधून शोधून धूळभरल्या एखाद दोन फ्रेम्स समोर ठेवायचे.
" मॅडम, चलता नही आजकल ये.हम मंगवाते भी नहीं.मुझे पता है इस लिये मैने ये दो पीस आपको ढूंढकर दिये. बाकी किसीको तो समझता मी नहीं".
आणि मग माझं हे भरतकाम जवळपास विस्मरणातच गेलं.
   एकदा साफसफाई करताना मला  जुन्या कीटचं कव्हर सापडलं.त्यावर बंगलोरचा पत्ता दिसला.पुन्हा  "युरेका".आता  बंगलोरहून काही स्टीच कीट्स मागवायला सुरूवात केली पण  त्यांची  सर्व्हिस व्यवस्थित नसल्याने परत  माझा  छंद  मागे  पडला .

   मध्यंतरी  साऊथ टूरला गेलो होतो .बंगलोर दर्शन करतांना एम जे रोडवरचा "अँकर मदुरा कोट्सचा" पत्ता मला  खुणावत होताच .एम जे रोडवरचं "नल्ली सिल्क" चं दुकान पालथं घालण्याचं परमकर्तव्य आम्ही समस्त  बायकांनी  यथास्थित पार पाडल्यावर मी हळूच  माझ्या  पत्त्याची चौकशी  केली .पत्ता  नेमका बदलला  होता आणि  तिथे  जाण्याचा  मोह ,मला सगळ्यांच्या  कपाळावरच्या आठ्या बघून नाईलाजास्तव आवरावा लागला.
पाच वर्षांपूर्वी मला मुलीनं सांगितलं,
" आई , आपल्या साठी आनंदाची बातमी आहे.आता स्टीच कीट्स अँमेझॉन वर मिळायला लागल्यात ".
मला हर्षवायू होणं बाकी होतं. त्यावेळी आॕनलाईन शॉपिंग चा सराव नसल्याने मुलीनंच पुण्यातून सगळे सोपस्कार करुन चार फ्रेम्सचं पार्सल मला पाठवलं.
खरंतर आता डोळ्यांना त्रास व्हायला लागलाय.पूर्वीसारखी बैठकही होत नाही.त्यामुळे ते पार्सल मी ठेवून दिलं.त्यानंतर मुलीचं लग्न, तिचे सणवार, माझ्या कॉलेजच्या जबाबदार्या, आणि मुलीचं बाळंतपण - - यात ते पार्सल दृष्टीआडच झालं.

आत्ता पंधरा दिवसांपूर्वी हा खजिना माझ्या हाती लागला आणि  भरतकाम करता करता मी जुन्या आठवणीत शिरले.डोळ्यांना त्रास नक्कीच झाला पण त्यापेक्षा मिळणारा आनंद खूप जास्त होता.
मुलीला कळवलं तेव्हा तिलाही खूप  आनंद झाला आणि तिच्या अंगातही उत्साह संचारला. आता आँनलाईन शॉपिंग सुरू झाल्याबरोबर तिनंही फ्रेम्स आँर्डर केल्या आणि सध्या ती एम्ब्रॉयडरी करतेय.
गंमतीची गोष्ट म्हणजे माझी चार वर्षांची नात, रोज त्या फ्रेमवर लक्ष ठेवून आहे.
"ममा लवकर पूर्ण कर आणि ही फ्रेम माझ्या बेडरूममध्ये लावू या".
असं ती म्हणते.
माझा छंद तिसऱ्या पिढी पर्यंत झिरपलाय की काय????

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...