Sunday, April 14, 2024

मर्यादा पुरुषोत्तमाची जडणघडण

 


सध्या प्रभू श्रीरामाचे नवरात्र सुरू आहे. जो तो आपल्या परीने श्रीरामाची उपासना करीत आहे. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची पार्श्वभूमी यावर्षीच्या रामनवमीला लाभली आहे. त्यामुळे या रामजन्मोत्सवाला ऊर्जा, भक्ती, पूजन यांचा परमोच्च आविष्कार समाजात दिसून येईल यात शंका नाही.

 प्रभू श्रीरामाला भारतीय जनमानसात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची प्रचिती अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी आलेली आहेच.      रामायण या महाकाव्याची निर्मिती  त्रेतायुगात  झाली आहे. त्यानंतर द्वापार युग सुरू झाले आणि आता आपण कलियुगात आहोत. पण आजही रामायणाचे गारुड तसेच आहे किंबहुना ते वाढतानाच दिसते आहे. याचे काय कारण असावे?      

            प्रामुख्याने भारतीय संस्कृतीची मशागत होण्यामध्ये रामायणाचा सिंहाचा वाटा आहे. दुसरे असे की ही विजय गाथा आहे. धर्माचा अधर्मावर, सद्गुणाचा दुर्गुणावर, सन्नितीचा अनितीवर - विजय तर रामायणात आहेच पण तो केवळ  शस्त्र सामर्थ्याने नाही तर तो श्रेष्ठ सदाचरणाने प्राप्त झाला आहे.  त्यामुळे युगानुयुगे सदाचरणाची प्रेरणा रामायणातून मिळत आलेली आहे. तिसरे कारण म्हणजे रामायणातील पात्रांनी आदर्शांचे मापदंड प्रस्थापित  केलेले आहेत. हे आदर्श व सिद्धांत काळाच्या प्रत्येक लाटेच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. त्यामुळे रामकथा आजही काल सुसंगत आहे. चवथे कारण म्हणजे रामराज्य हे मूल्यांचे राज्य आहे. कर्तव्याच्या तुलनेत वैयक्तिक मोह, भावना, प्रेम यांना महत्त्व न देता, केवळ प्रजाहिताला या राज्या प्राधान्य दिले आहे. आजच्या काळात अशा रामराज्याच्या स्मरणानेही समाजाला आत्मिक समाधान लाभते. पाचवे कारण म्हणजे प्रभू श्रीराम ही एक व्यक्ती किंवा ईश्वर नाही. तर राम ही वृत्ती आहे, विचार आहे, आचरण आहे. एवढेच नाही तर राम हे तत्व आहे. असा हा राम प्रत्येकाच्या हृदयात असतो. रामकथेत तो 'आत्माराम' जागृत करण्याची शक्ती आहे. त्यामुळे रामायण हे भारतीयांच्या रक्त मांसपेशीत रुजले आहे. आणि पिढी दर पिढी ते त्याच उत्कटतेने झिरपते आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, 'माझा राम आधी विश्वनंदन आहे.आणि मागाहून तो दशरथनंदन आहे.

        रामायणातील सगळी पात्रे आपल्याला खूप जवळची वाटतात. यातील राजस्त्रियांच्या चरित्रात डोकावून बघितले तर स्त्रीशक्तीची असामान्य रूपे आपल्याला स्तिमित करतात. मातृशक्ती, त्याग, समर्पण, निष्ठा, संयम इत्यादी गुणांचा उत्तुंग आविष्कार म्हणजे रामायणातील स्त्रिया. रघुकुलातील राजांनी रणभूमीवर आपल्या शस्त्र सामर्थ्याने विजय मिळवला आहे. त्याचवेळी या राजस्त्रियांना देखिल अनेक लढ्यांना सामोरे जावे लागले आहे - तेही राजमहालाच्या चार भिंतीत आणि शस्त्रांशिवाय. कुणी वासनांध वृत्तीशी, कुणी विश्वासघाताशी, कुणी संशय पिशाच्चाशी , कुणी उपेक्षेशी तर कुणी नियतीच्या अगम्य खेळीशी लढा दिला आहे. ही लढाई त्यांना कधी आप्तस्वकीयांशी तर कधी स्वतःशीही करावी लागली आहे. आणि या युद्धात धैर्य, संयम, विवेक, मर्यादा, पातिव्रत्य ,श्रद्धा या शस्त्रांनी त्यांनी यश मिळवले आहे. या विजयाची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रामायणाची उत्तुंगता या राजस्त्रियांमुळे कमालीची उंचावली आहे. वास्तविक या प्रत्येक राजस्त्रियेच्या ललाटावर नियतीने एका अटळ व्यथेचा शिक्का मारून ठेवला आहे. प्रत्येकीच्या राजवैभवी जीवनाला वेदनेची किनार आहे. 

         राणी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रेला सुरुवातीला अपत्यहीनतेचे शल्य उरात बाळगून, जगण्याला सामोरे जावे लागले आहे .यात नियतीचा काय हेतू असावा? पुढे स्वतःच्या गुणांनी रमविणारा आणि योगी जिथे रमतात- असा राम, सुलक्षणांनी युक्त लक्ष्मण, विश्वाचे भरण पोषण करणारा भरत आणि आणि शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघ्न- अशा चार अलौकिक आणि दिव्य पुत्रांची प्राप्ती तीनही राण्यांना झाली. हे चारही पुत्र यथावकाश राजनीती, युद्धनीती, प्रजा धर्म, कर्तव्यनिष्ठा यांचे धडे ऋषीवरांच्या मार्गदर्शनात गिरवीत होते. त्याचवेळी त्यांच्यातला ॠजू ,समंजस, सात्विक, प्रेमळ ,संयमी, निश्चयी- असा माणूस घडत होता तो  त्यांच्या तीनही मातांच्या संस्कारांमुळे. सद्गुणांनी परिपूर्ण अशा पुत्रांची जडणघडण - ज्यांना आज आपण भावनिक बुद्ध्यांक किंवा 'सॉफ्ट स्कील्स' म्हणतो त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे . बालवयात पुत्रांवर या उन्नत भावनांचे रोपण  करण्याचे श्रेय हे या तीनही मातांचे आहे. रामायणातला हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.वाल्मिकी रामायणात रामाचे ७२ गुण सांगितले आहेत.

     राणी कौसल्या ही मातृत्वाचे प्रतिक म्हणून नेहमीच गौरविली जाते. तिरुपती बालाजी मंदिरात देवाला जागे करताना 'कौसल्या सुप्रजा रामा, पूर्वा संध्या प्रवर्तते'- या भूपाळीत प्रथम उल्लेख कौसल्या मातेचा आला आहे. वनवासाला जाणाऱ्या रामाला बघून ती कोसळते, उन्मळून पडते पण रामानेच  तिची समजूत घालून तिला शांत केले आहे.राजधर्म आणि कुलधर्माचे भान ठेवून ती कमालीच्या धैर्याने या प्रसंगाला सामोरी गेली आहे.कैकेयीचा अपराध तिने शांतपणे पोटात घातला आहे.संतप्त झालेल्या भरताला तिने आत्मीयतेने,प्रेमाने त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.१४ वर्षे रामाला तिने आपल्या नजरेत साठवून ठेवले आहे. आणि वनवासातल्या रामाला तिच्या दिव्यदृष्टीतून प्रेम आणि बळ मिळाले आहे. म्हणूनच 'कौसल्येयो दृशो: पातुं'.. असे रामरक्षेत म्हटले जाते.

            राणी कैकेयी ही युद्धनिपूण, बुद्धिमान आणि निग्रही आहे.राजा दशरथाला तिने अनेकदा राज्यकारभारात योग्य सल्ला दिला आहे. .श्रीरामावर तिचे भरता पेक्षाही अधिक प्रेम आहे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वार्तेने ती आनंदून गेली आहे. अशावेळी या असामान्य राजस्त्रीला मत्सराची बाधा कशी होऊ शकते? हा प्रश्न नेहमीच पडतो. पण याचे उत्तर कैकेयीच्या आई मध्ये तर दडले नसावे?? राजा अश्वपती व शुभलक्षणा यांची ही कन्या. राजा अश्वपतीला पक्षांची भाषा अवगत होती. पण या पक्षांचे संभाषण कोणालाही सांगण्याची त्याला अनुमती नव्हती. हे संभाषण सांगितले तर अश्वपतीचा मृत्यू अटळ होता. एकदा राणी शुभलक्षणाने हे संभाषण सांगण्याचा हट्ट राजाजवळ धरला. या हट्टापायी माझा मृत्यू होऊ शकतो - असे राजाने तिला समजावून सांगितले. तेव्हा राणीचे उत्तर होते -

' मग तुम्ही मरा, पण मला संभाषण सांगा '. अशा राणीचा अश्वपती राजाने त्याग केला आहे. त्यामुळे कैकेयीला  मातृसुख मिळाले नाही. पण कदाचित आईचा आततायी, अविवेकी स्वभाव तिच्यात उतरला असावा का? अर्थातच रामायण घडण्यासाठी कैकेयीचा मत्सरभाव जागृत होणे हे विधीलिखितच होते. पण नंतर काही काळाने आपल्या कृत्याचा तिला पश्चातापही झालेला आहे.महत्वाचे हे, की या प्रसंगामुळे भरताने कैकेयीची निर्भर्त्सना केली आहे .मात्र रामाच्या मनातील  तिचे स्थान अजिबात डळमळीत झालेले नाही.

      कायम सन्मार्गाने जाणारी- ती राणी सुमित्रा. सौमित्र तिचा पुत्र. पण त्याआधी तो रामाचा उजवा हात, रामाचा बहिश्चर प्राण आणि रामाची सावली आहे, हे ती जाणून आहे. त्यामुळे रामासोबत वनवासात जाण्याच्या निश्चयापासून ती लक्ष्मणाला परावृत्त करित नाही. रामाचे संरक्षण करण्याची क्षमता लक्ष्मणातच आहे हे तिला पक्के ठाऊक आहे‌. कर्तव्य आणि ममता यांच्यात निवड करायची झाल्यास, ममतेला मागे सारणे- हा सुमित्रेचा स्वभाव लक्ष्मणातही पूर्णतः उतरला आहे. विवेकी आणि खंबीर असलेली सुमित्रा राजमहालाच्या एका अभेद्य भिंतीप्रमाणे कुटुंबियांना आधार देत राहिली. पुत्र वियोगाने राजा दशरथाचे प्राण गेले पण तीनही राण्या मात्र पुत्रवियोग व पतीवियोग होऊनही चिवटपणे झुंज देत राहिल्या आहेत. श्रीरामांच्या अस्तित्वातून स्वतःची शक्ती एकवटत राहिल्या आहेत.

            लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही सीतेची लहान बहिण आहे. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यातील अद्वैत समजून घेणे आणि ते पचविणे हे उर्मिलेतील पत्नीला किती अवघड झाले असेल? सीतेप्रमाणे ती देखील वनवासात जाण्याचा हट्ट करू शकली असती पण तिने तसे केले नाही. वनवासात श्रीराम आणि सीतेचे रक्षण करण्याचे लक्ष्मणाचे कर्तव्य आहे, हे ती जाणून आहे. व त्या कर्तव्याच्या आड येण्याचे संस्कार तिच्यावर नाहीत. लक्ष्मणाला उर्मिलाच्या मूकसंमतीची खात्री असल्यामुळे  तिचा पाठिंबा हे त्याचे बळ आहे. लक्ष्मण आणि उर्मिले मधील अव्यक्त असे परस्पर सामंजस्य हे खरे त्यांच्या नात्याचे बलस्थान आहे .उर्मिलेने महालात राहून  वनवास भोगला आहे. शांत तेवणाऱ्या ज्योती प्रमाणे तिने १४ वर्षे अखंड जळून वनवासातल्या  स्वकीयांना आश्वस्त केले आहे.

             रामायणाची महानायिका म्हणजे सीता. 'सहचारिणी' हे नाते तिने सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले आहे.श्रीरामा बरोबर सीता ही काया,वाचा ,मन आणि आत्म्याच्या स्तरावर एकरुप झाली आहे.श्रीराम वनवासाला निघाले त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी सीतेला राजगादी वर बसण्याची सूचना केली होती - यावरुनच तिचे सामर्थ्य लक्षात येते. वनवासात सीता आणि श्रीरामाच्या अनेक तात्विक मुद्द्यांवर चर्चा झाल्या आहेत. अशोक वनात असलेल्या सीतेच्या जवळपासही रावण फिरकू शकला नाही याला कारण सीतेचे  प्रखर तेज.पती श्रीराम आणि राजा श्रीराम यात सीतेने कधीही गल्लत केलेली नाही.पती आणि राजा यातील सीमारेषेची तिला अचूक जाण आहे. 'प्रजेसाठी निर्णय घेताना राजा श्रीरामांनी माझ्यावर अन्याय केलाही असेल कदाचित.. पण पती श्रीरामांनी मला एक क्षणही अंतर दिले नाही '..असे म्हणणारी सीता ही कायम वंदनीय आहे.

      रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांचेही स्मरण करणे गरजेचे आहे कारण 'रामलल्ला' ते  'पुरुषोत्तम' या प्रवासात राजस्त्रियांच्या भूमिकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव - हा पुरुषोत्तमाच्या व्यक्तिमत्वासाठी नक्कीच साह्यभूत ठरला आहे. बालवयात रामाच्या जडणघडणीला तीन मातांनी आकार दिला तर पुढे श्रीरामांनी आपल्या आचरणातून या स्त्रियांना समृद्ध केले.परस्पर पूरक अशी ही नाती आहेत.

    या स्त्रियांच्या आयुष्यात अनेक संकटे, वादळे आलीत.पण त्यावर धैर्याने, निष्ठेने, श्रद्धेने मात करण्याची शक्ती ही पुरुषोत्तमाच्या प्रभावाने त्यांना प्राप्त झाली आहे.त्यांच्या अलौकिक चरित्राचा कालप्रवाहावर पडलेला अमीट ठसा आजही वंदनीय, चिंतनीय आणि मार्गदर्शक आहे.


#रामायण

#रामायणातीलस्त्रीपात्रे

Sunday, November 26, 2023

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी


 

मध्यंतरी आमचा अंगणातला बगीचा साफसूफ करण्यासाठी एक माळी जोडपं आलं होतं.संपूर्ण बगीचा त्यांनी व्यवस्थित ,नीटनेटका केला पण इकडे तिकडे अनेक तुळशीची झाडं कशीही वाढली होती,ती त्यांनी तशीच ठेवली होती.त्याबद्दल मी त्यांना हटकलं तर ती बाई म्हणाली.

    'माऊली ला नाई तोडत आमी.देवी हाय  ती.तुमच्या दारी आली ना ती, मंग राहू द्या नं तिले.रायचं तितके दीस राहील ती.' असं म्हणून तुळशीला हात जोडून ती दोघं निघून गेली.

    का कुणास ठाऊक पण त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला.मला माझीच लाज वाटली.त्यांच्या प्रगाढ श्रद्धेचा मला हेवा वाटला. एक तुळशीवृंदावन पुरेसं आहे की रोज पाणी घालायला आणि दिवा लावायला.... इतपतच माझी भूमिका कम श्रद्धा होती. पण आत खोलवर मला खूप हलवून गेलं त्यांचं बोलणं.मी राहू दिली तशीच ती झाडं.

    आणि नुकतीच बातमी आली की महाराष्ट्रात प्रदूषणाचं प्रमाण कमालीचं वाढलंय आणि त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.मला एकदम तुळस आणि पर्यावरण रक्षण यांचा संबंध आठवला. तुळशीला नैसर्गिक हवा शुद्धीकारक समजलं जातं. दिवसातून बारा तास तुळस ऑक्सिजन सोडत असते.आणि वातावरणातील कार्बन डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड हे घातक वायू शोषून घेत असते.तसंच तिच्यात असलेलं यूजेनॉल हे संयुग डास,कीटकांना दूर ठेवतं.आणि त्यामुळेच तुळस प्रत्येकाच्या घरासमोर असते.

    भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र मानतात,त्याचं कारण पर्यावरणाशी संबंधित असावं का? कारण आपले पूर्वज अत्यंत खुबीने वैज्ञानिक गोष्टींवर धार्मिकतेचं पांघरूण घालून आपल्या कडून योग्य ते करवून घेण्यात तरबेज होते.

    पौराणिक कथा बघितल्यास, तुळशीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आढळतात. प्राधान्याने त्यात तुळशीच्या वाट्याला दुःखच आले आहे .कथा आणि कथानायक वेगवेगळे आहेत पण तुळशीची वेदना मात्र तशीच आहे. कसल्या ना कसल्या व्यथेपोटीच तुळशीची उत्पत्ती झाली आहे. पतीच्या आधी भोजन केले म्हणून एका ऋषी पत्नीला राक्षसी होण्याचा शाप भोगावा लागला. या राक्षसी अवतारात ती ऋषी पत्नी अनेक वर्ष जगत राहिली. सुटकेची वाट बघत आयुष्य कंठत राहिली. अखेर एका भक्ताने केलेल्या कृष्णाच्या नामस्मरणाला ऐकून तिला मृत्यू आला. पण तिचा देह तब्बल वर्षभर जळतच राहिला. शंकर-पार्वतीने  जेव्हा ही चितान बघितली तेव्हा ते स्तिमित झाले. मृतावस्थेतही ही इतकी शोभायमान आहे. 'मृता लसती- सा एव तुलसी' अशी ही तुलसी आहे. म्हणून त्यांनी तिला स्पर्श केला आणि भूतलावर कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रातःकाळी ती उगवली. भगवान विष्णू ने तिला वर दिला की तुळशी शिवाय माझी पूजा संपूर्ण होणार नाही. तुळशीला मिळालेल्या या मोठेपणामागे तिने सोसलेल्या दुःखाचा डोह जाणवल्याशिवाय राहत नाही. 

    दुसऱ्या कथेत तर या तुळशीचा देवांनी

 उपयोग करून घेतलेला आहे .वृंदा नावाच्या राजकन्येचा पती जालंधर हा प्रचंड शक्तिमान होता .त्याच्यापासून देवांना धोका निर्माण झाला होता. कपटाने देवांनी जालंधरच्या शरीराचे हुबेहूब दोन तुकडे करून वृंदेला दाखविले. वृंदा शोकसागरात बुडून गेली. मग देवांनीच साधू वेष घेऊन जालंधरला जिवंत करण्याचे नाटक केले. हा जालंधर म्हणजे भगवान विष्णूच होते. भोळी वृंदा आनंदली. प्रेमभराने तिने जालंधरला मिठी मारली. देवांचं कपट तिच्या लक्षात आलं नाही. आपल्या पतीशी पूर्ण एकनिष्ठ असलेली वृंदा परपुरुषाच्या स्पर्शामुळे भ्रष्ट तर झालीच पण खऱ्याखुऱ्या जालंधराने तिला हे कृत्य करताना बघितले. जालंधर क्रुद्ध झाला. भ्रष्ट झाल्यामुळे वृंदेची पुण्याई संपली आणि खरा जालंधर मरण पावला. संतापानं आणि दुःखानं वृंदेने विष्णूला शाप दिला. तिच्या शापामुळे भगवान विष्णू अस्वस्थ झाले. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंं साठी भूतलावर तुळस लावली. तिलाच वृंदा किंवा विष्णुप्रिया म्हणतात. 

           अशा अनेक कथा पुराणात सांगितलेल्या आहेत.स्त्रीरुपात भोगलेली अपरिमित दुःखे आणि परिणामी निर्माण झालेली तुळस.....हे सगळ्या कथांचं सार. म्हणूनच तुळशीचं आणि वेदनेचं  अतूट नातं आहे. 

           या कथा वाचताना आणि तुळशीची वेदना समजून घेताना मला प्रसिद्ध लेखिका श्रीमती दुर्गा भागवतांच्या  'निसर्गोत्सव' पुस्तकाची प्रकर्षाने आठवण आली. तुळशीबद्दल त्या लिहितात, 

           


'अगदी साधी ही तुळस. कधीच डोळ्यात न भरणारी. झाडाची नैसर्गिक शोभा एवढीच की ते नाजूक आहे. मंजिऱ्या तर विचारूच नका. निळी- जांभळी अशी ती अर्धी देठाच्या संपुटात लपलेली फुले  - त्यांचा गंधही वाऱ्यावर पारिजातकाप्रमाणे भिरभिरणारा नाही. झाडाची सळसळ नाही. काही नाही. ना या झाडावर भुंगे झेपावत की पाखरे घरकुल करीत. मग असे काय मनोवेधक या तुळशीच्या रोपट्यात आहे? हातात खुडून घेतले तरच त्याचा गंध येतो. आणि हा गंध मात्र जागच्या जागी बसणारा असला तरी ह्रुद्य असतो मादक नसतो. मंजिरीतले प्रत्येक फूल न्याहाळले तर ते थरथरलेले दिसते. लाजेने लपलेले वाटते. प्रत्येक उमललेले फुल अति नाजुक व निखोड रंगछटांनी नटलेले असते.  घरातल्या वृंदावनाचे सोडा पण रोपही एरवी कधी एकटे दुकटे नसते. त्याचे बी किती काळेभोर व सुंदर असते वाऱ्याच्या लहरी बरोबर ते सहज उडून जाते आणि पहिल्या सरी बरोबरच उगवते. आणि मग तुळशीचे बनच्या बनच उगवते. अनिवार साधेपणाचे तुळशीचे लहानखोरे रूप भारतीय मनात प्रांतोप्रांती वसलेले आहे. विष्णूच्या प्रणयिनीत ही नायिका  लाजाळू असते. ही तुळस हाडामासाची स्त्री नाही तर ते एक झाड आहे. हा  झाडरुपी देह असा आहे की त्याचा कायीक संपर्क कुणाही पुरुषाशी होणारच नाही. तिचे बारोमास फुलणारे पुष्पमय ह्रुदय मात्र प्रियकराचे अखंड सांनिध्य शोधत असते. तुळशीचे लग्नही बाळकृष्णाशी होते. ही सुद्धा तिच्या भोगरहित सौभाग्याची आणि अखंड कौमार्याचीच खूण आहे . लग्नाशिवाय स्त्रीने राहू नये. जी राहील ती पतिव्रता असायची नाही, असे मत पुराणात स्वच्छ दिलेले आढळते म्हणून तुळशीच्या लग्नाचा हा पसारा मांडण्यात आला आहे. तुळस ही उत्कंठित प्रेमला असली तरी ती चिरकुमारी आहे हेच या प्रथेचे अंतिम सार आहे. ही कल्पना महाराष्ट्रात पूर्वापार रुढ आहे. उदाहरणार्थ, कुमारिकेच्या चोळीवर तुळशी शिवाय दुसरा कोणताही कशिदा काढायचा नाही असा नियमच महाराष्ट्रात नागपूरच्या बाजूला अजून पर्यंत रूढ होता. तुळशीबद्दलच्या सर्व कथांचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की त्या भीषण कारुण्याने भरलेल्या कथा आहेत.'    तुळशीबद्दल दुर्गाबाई भागवतांचं हे भाष्य वाचल्यावर मला तुळशीची वेदना मुळापासून जाणवली. किती अवघड दिव्य पार केल्यावर तिला भारतीय संस्कृतीत मानाचं स्थान मिळालं आहे. मला लोकगीतातल्या दोन ओळी आठवल्या. 

तुळशी गं बाई, 

काय तुझं हे जीणं,   गोविंदाच्या संगे, 

वरसा वरसाला लगीन'   दुसऱ्या स्त्रियांची दुःखं ऐकून घेणारी ही तुळस स्वतःच वेदनांचं एक मूर्तिमंत रूप आहे. तुळशीचा विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमे पर्यंत केला जातो.ऊस हा मामा म्हणून तिच्या पाठी उभा असतो. तुळशी विवाहा नंतरच लग्नाचे मुहूर्त काढण्याची पद्धत आहे.

    आयुर्वेदात अनेक औषधात तुळशीचा वापर केला जातो. सर्दी, खोकला,ताप या औषधात तुळस असतेच.त्वचारोग व कृमींवर तुळस अतिशय परिणामकारक आहे. तिच्यात असणारं, 'थायमॉल' हे तत्व डास, कीटकांना दूर ठेवतं.

    अशी ही बहुगुणी तुळस.  तिच्या पानाशिवाय नैवेद्य परिपूर्ण होत नाही.मृत व्यक्तीच्या मुखातही तुलसी पत्र ठेवण्याची प्रथा आहे. धार्मिक, पौराणिक, पर्यावरणपूरक, आरोग्यदायी असणारी आणि स्त्री ची सखी असणारी ही तुळस सगळ्यांच्या घरी प्रवेशद्वारीच असते.

   पूजने कीर्तने ध्याने, 

रोपणे धारणे कलो। 

तुलसी दहते पापं, 

स्वर्गं मोक्षं ददातिच ।।

   अशा या तुळशीचे पूजन प्रत्येक घरात व्हावं असं शास्त्र सांगतं .

श्रीकृष्णासारख्या महानायकाच्या पत्नीचं पद तिला मिळालं आहे पण पूर्वायुष्यात चारित्र्यहीनतेच्या  आरोपातून गेल्यावरच. दरवर्षी विवाह वेदीवर चढून आपलं पत्नीत्व सिद्ध करण्याचं दिव्य तिला करावं लागतं तरीसुद्धा श्रीकृष्ण पत्नीचा पहिला मान रुक्मिणीचा असतो. अशा या तुळशीच्या व्यथा समजून घेऊन प्रत्येक भारतीय स्त्रीने तिला योग्य तो सन्मान देऊन जास्तीत जास्त रोपांचं संगोपन करावं हीच काळाची गरज आहे.

Sunday, November 5, 2023

चला चला, दिवाळी आली

 

चला चला,दिवाळी आली,

मोती साबणाची वेळ झाली"

मोती साबण आणि दिवाळी यांचा नेमका काय संबंध? हा मला नेहमीच छळणारा प्रश्न. बरं,आता हा कुळाचार असल्याप्रमाणे मोती साबणाची  दिवाळीच्या सुमुहूर्तावर बाथरूम मधे  जी प्रतिष्ठापना होते ती पार होळीपर्यंत. कारण दिवाळी संपली की मोती साबणातून हळूहळू आत्मा मुक्त होऊ लागतो आणि त्याचं एका रंगीत गोट्यात रुपांतर होतं.हा गोटा संपेपर्यंत आम्ही त्याने आंघोळ का करतो....हा दुसरा छळणारा प्रश्न. 

      असो.मोती साबणाने  वर्दी दिलीय, 'दिवाळी आली बरं का' .....

    लहानपणी निसर्ग हाळी द्यायचा... दिवाळी आली बरं का' .......

    दसऱ्यापासूनच दिवाळीचे वेध लागत. नुकताच पावसाळा आटोपला असायचा. तृप्त भूमीने अवघ्या सृष्टीला हिरवाईचं दान दिलं असायचं .  वर्षा ॠतूने शरदाला  ओंजळ भरभरून दिलेलं सुजलाम सुफलाम हे दान  स्वीकारून शरद ऋतू कसा टवटवीत आणि ऊर्जादायक झाला असायचा. शेता शेतांमध्ये गच्च भरलेली पिकं डोलताना बघून मन सुद्धा कसं गच्च भरून जायचं. सरलेला पावसाळा आणि येऊ घातलेला हिवाळा यांचा मिश्रण म्हणजे दिवाळी. शरदातली म्हणजेच अश्विन कार्तिकातली पंचमहाभूतं मुळातच विलक्षण जादुभरी असायची. आपलं नवीन समृद्ध रूप बघून ती पंचमहाभूतं हळूच कानात कुजबुजायची.... 'दिवाळी आली बरं का'...... 

         स्वच्छ  मोकळं आकाश. कुठेही मळभ नाही. निरभ्र चांदणं, हलकी गुलाबी थंडी, ओढाळ पहाट वारा,हलक्या धुक्याची चादर लपेटून उगवणारी सकाळ .आमची साखरझोप अलगद ओसरायची ती आजीच्या काकड आरतीच्या आवाजानं. तो वृद्ध, क्वचित बेसूर पण श्रद्धेनं ओतप्रोत भरलेला आवाज कमालीची उब द्यायचा. त्याच्या जोडीला घराघरातून अंगण झाडल्याचा आणि सडा शिंपण्याचा आवाज यायचा. देवघरातला उदबत्ती, कापराचा गंध, अंगणातल्या शेणाच्या सणाचा मृदगंध... हे सगळे नादगंध एकत्र होऊन थेट मस्तकात भिनायचे. ते पहाटेचं वातावरण इंद्रियांना खुळावायचं. आम्ही सगळी भावंडं अंथरुणात उठून बसायचो, खुदकन हसायचो आणि म्हणायचो, 'दिवाळी आली बरं का'.......   

  मग सारवलेल्या अंगणात रांगोळी काढण्याची लगीनघाई. सगळ्यांची अंगणं रांगोळीनं रेखलेली,आणि घरांवर झुलणारे आकाशकंदील बघून मन हरखून जायचं. 

  त्या वेळेची पहाट अशी नादावून टाकायची आणि मग जसा जसा दिवस वर चढायचा तसे तसे आणखी अनेक व्यावहारिक नादगंध त्यात येऊन मिसळायचे. सणासुदीचे जीभेला चाळवणारे, भाजण्याचे तळण्याचे गंध, घराच्या रंगरंगोटीचा उग्र गंध,  कोऱ्या वस्त्र प्रावरणाचे गंध एकत्रित होऊन मनाला वेडावून टाकायचे. एरवी सुस्त, एकलकोंडी, आत्ममग्न असणारी दुपार या काळात कशी जिवंत होऊन जायची. लहान मुलांचा धांगडधिंगा, मातीचा किल्ला करताना होणारी भांडणं, घराघरातून काही कुटण्याचे, ठोकण्याचे, भांडी घासण्याचे आवाज.. हे सगळे ध्वनी कर्कश असले तरी ते खूप भावायचे. त्यात एकच झपाटून टाकणारा विचार असायचा.....'दिवाळी आली बरं का'.......

 मग घराघरात, रस्त्या रस्त्यात, तनामनात  दिवाळी भिनू  लागायची.निसर्गाला,माणसाला चैतन्याचं वाण देत ती उंबरठ्यापाशी येऊन उभी राहायची. 

           नरक चतुर्दशीला तर नरकात पडू नये याची  धास्ती असल्याने झोपच यायची नाही. भल्या पहाटे उठणं, हवेतला किंचित गारवा, दूरवर दिसणारी दिसणाऱ्या पणत्यांची लवलव, आईने केलेलं औक्षण, सुगंधी तेल- शिकेकाई यांनी केलेलं अभ्यंग स्नान हे सगळं आठवलं की आजही अंगावर रोमांच उठतात. घर परिसराच्या स्वच्छतेबरोबर मनही स्वच्छ आणि नितळ होऊन जायचं .लक्ष्मीपूजनाचा दीपोत्सव तर प्रतीकात्मक आहे. कितीतरी सांस्कृतिक, धार्मिक कथा या पूजनाशी जोडल्या  आहेत.त्या आज कालबाह्य वाटू शकतात.पण कालसुसंगत विचार  केल्यास, अज्ञानाच्या अंधारावर विजय मिळवण्यासाठी हा दीपोत्सव आहे.माणसाच्या मनातल्या सगळ्या सद्प्रवृत्तींचा हा उत्सव आहे. जगातलं जे जे उत्तम आहे त्याचा हा उत्सव आहे .शब्द, स्पर्श, रूप,  रस,व गंध या पाच विषयांच्या उत्कटतेचा हा उत्सव आहे. लक्ष्मीपूजनासाठी सुसज्ज असलेले देवघर म्हणजे  समृद्धी व कलात्मकतेचा संगम.  चांदीची लखलखीत भांडी, सुवर्णाचे अलंकार, पिवळ्या केशरी झेंडूच्या फुलांची आरास, हिरव्याकंच  आंब्याच्या पानांचं तोरण, पंचपक्वान्नाचा प्रसाद, रंगाची उधळण करणारी रांगोळी, 

आणि या  कलात्मक दृश्याला तेजःपुंज करणारे दिवे. ते केवळ लक्ष्मीपूजन नसतं तर माणसा माणसातल्या ईश्वरी अंशाचं, सात्विकतेचं पूजन असतं. अशी ही दिवाळी.....

 मनाला तृप्त करणारी,  सगळ्या काळज्या, चिंता नैराश्य ,थोड्या काळासाठी तरी वळचणीला टाकणारी,  स॓पूर्ण घरावर तृप्तीची एक साय पांघरणारी..... 

     अशी ही दिवाळी दरवर्षीच येते. पण तो दिवाळीचा लहानपणीचा माहौल मला सापडतच नाही. हल्ली दिवाळी नुसतीच येते आणि जाते.  रीत  आणि परंपरा म्हणून ती उत्साहाने निभावली जाते तर रेटलीही जाते कधीमधी.  खरंच सणावारांनी आनंद मिळण्याचे दिवस राहिलेत कुठे आता? आता तर आनंदाचे, उत्साहाने निथळून जाण्याचे स्रोत इतके वेगळे आहेत की सण उत्सवांची अडचणच व्हायला लागली आहे.आजकाल दिवाळीत सहली काढण्याची फॅशनच झाली आहे. दिवाळीचा उद्देश, प्रयोजन यांच्याशी फारसं कुणाला सोयरसुतक नसतं. दिवाळीची चाहूल लागते ती बाजारात 'भव्य फेस्टिवल ऑफर ','उत्सव स्पेशल' , फटाके, अनंत भेटवस्तू, आकाश कंदीलांचा झगमगाट, खाद्यपदार्थांची रेलचेल, कपड्यांचे मनोहारी प्रकार, दागिने ,भांडीकुंडी यांनी ओसंडून जाणारी दुकानं यामुळेच. आणि हा आनंद विकत घेण्यासाठी  लोकांची उडालेली जीवघेणी झुंबड  बघून मन धास्तावतं.  मनावर ताण येतो. व्यक्तिगत आयुष्यातले समरसून जगण्याचे काही क्षण या दिवाळीमुळे आपल्या वाट्याला येतात त्यावरही बाजाराचं, धंद्याचं आक्रमण. दिवाळी कशी साजरी करावी याचा विचार करायलाही उसंत मिळत नाही. ही सगळी दिवाळी झगमगटात, पोषाखात,कृत्रिम आनंदात हरवलेली वाटते. ऋतू येऊन सादही घालतात, नाही असं नाही. पण त्यांना प्रतिसाद द्यायला आपल्या मनाची कवाडं उघडी कुठे असतात?     

           आज मी सुद्धा ती लहानपणची राहिलेली नाही. अवतीभवतीचं जगही तसंच राहिलेलं नाही. माझी लहानपणची दिवाळी आता तशीच असणार  नाही हेही मला माहित आहे .तरीसुद्धा पहाटेचा खुळवणारा वारा मी नक्कीच उर भरून घेऊ शकते. अश्विनात फुलणाऱ्या पिवळ्या जर्द झेंडूचा गंध आजही मला, 'दिवाळी आली बरं का' हे सांगायला पुरेसा आहे. कितीतरी हळवे ,उत्कट क्षण

 आजची दिवाळी सुद्धा मला देतेच पण त्यासाठी मनाचा कप्पा उघडा असावा लागतो. त्यातल्या आठवणी मोरपिसासारख्या गालाला लावून अनुभवायच्या असतात. बाकी दिवाळी दरवर्षी येतेच आणि साजरीही होतेच.पण आजच्या दिवाळीतही  चित्तवृत्ती फुलविण्याची शक्ती आहे हे खरंय.दिवाळीचा संचार अंगात हळूहळू होतोच.उत्साहाचं,सकारात्मकतेचं,

आनंदाचं रसायन शरीरातून वाहतं ठेवण्याची क्षमता दिवाळीच्या वातावरणात असतेच असते.

 दिवाळी कशी साजरी करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ही भौतिक दिवाळी आपण नेहमीच अनुभवतो.आता मनातली दिवाळी साजरी करू या.

 "अंतरंग  उजळणारे दिवे,

 सल,द्वेष नष्ट करणारं अभ्यंगस्नान,

 जीवन रंगीत करणारी रांगोळी,

 सदवृत्ति आणि विवेकाचं पूजन  

 आपुलकीनं 'या' म्हणणारा आकाशदिवा,

  स्नेह आणि नाती जपणारा फराळ,

विश्वास आणि मैत्रीची ओवाळणी,

हीच खरी दिवाळी........

Sunday, October 22, 2023

दसरा - गरज वैचारिक सीमोल्लंघनाची

 


हल्ली मोबाईल किंवा टीव्हीवर, ' द ग्रेट इंडियन फेस्टिवल' ही एमेझाॅन सेल ची जाहिरात दिसायला लागली की समजावे - सणासुदीचे दिवस आलेत.म्हणजे सण आले की खरेदी करायचीच हे समीकरण बाजारपेठेने आपल्या मेंदूवर कोरुन ठेवलेय.नखशिखांत दागिन्याने मढलेल्या,उंची तलम वस्त्रे ल्यायलेल्या अत्यंत देखण्या स्त्रिया चुटकीसरशी विविध प्रकारच्या मिठाया स्वतः तयार करुन घरच्यांना आग्रह करुन खाऊ घालणारी जाहिरात दिसली की समजावे सण आलेत.(अशा महान स्त्रिया शोधा आणि हजार रुपये मिळवा.....अशी माझी फार दिवसांची...असो) मुद्दा हा की सध्या समाजात दोन प्रकारचे समूह प्रामुख्याने दिसतात. सण असले की निर्बुद्ध मालिकेत़ बघितलेल्या सणांचे  उत्सवी , पोषाखी अनुकरण करणारा एक समूह.... हे म्हणे संस्कृतीचे (?) जतन करतात. आणि दुसरीकडे कायम अर्ध्या चड्ड्या घातलेला,दाढीचे खुंट वाढलेला, वर्षभरात कंगवा न लागलेले विस्कटलेले केस असणारा , सदैव लॅपटॉप बडवणारा समूह.यांना  दिवस,रात्र, आंघोळ,जेवण, झोप, सणवार....यांच्याशी कवडीचेही देणेघेणे नसते. ओटीटीवर आवडत्या सीरियलचा सीझन येई दुसरा / तिसरा... तोची दिवाळी दसरा......असेच असावे कदाचित.

      आणि या दोन टोकांच्या मधे असणारी आमची मध्यमवयीन पिढी. एकीकडे लहानपणी साजरे केलेल्या सणांचा सात्विक आनंद शोधण्याची धडपड तर दुसरीकडे सणांचे श्रेयस पकडून ठेवण्याची असमर्थता.

      हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकताच येऊ घातलेला दसरा.दसरा दिवाळीची चाहूल हीच मुळात ऊर्जादायक  असते पण ती केव्हा? जेव्हा बदललेला ऋतू याची हळूवारपणे जाणीव करून देतो तेव्हा.

                    सोन पावलांनी येणारा अश्विन महिना येतानाच भक्ति आणि शक्तीचा संदेश घेऊन येतो. अश्विनातले लख्ख केशरी ऊन, मोकळी हवा, निरभ्र आकाश, टिपूर चांदणे, पिवळ्या- नारिंगी झेंडूंनी रंगलेला निसर्ग..... सगळेच कसे मेंदूला  चेतवणारे असते. अश्विनाच्या हवेतच ऊर्जा असते. नऊ दिवस जगदंबेची केलेली उपासना आणि दहाव्या दिवशीचा दसरा...हे सगळेच दिवस  चैतन्याने रसरसलेले असतात.            

          त्यात मनुष्यप्राणी हा उत्सवप्रिय आहे. भारतीय संस्कृतीत अत्यंत कल्पकतेने आणि  योजकतेने या सण उत्सवांची रचना केली आहे. प्रत्येक सणामागे एक निश्चित विचारांची बैठक आढळून येते आणि त्याचवेळी येणाऱ्या ॠतूचे स्वागत केल्या जाते आणि सोबतच आरोग्याचा एखादा नियमही जोडला जातो.जीवनप्रणाली, विचारप्रणाली ,आणि उपासनाप्रणाली  या तिन्हींचे उन्नयन या सणामुळे व्हावे हे अपेक्षित असते. शुष्क उपदेश सांगितले असते तर ते टाळण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते पण सणावारांच्या माध्यमातून आणि प्रतिकांचा उपयोग करून ही संस्कृती आपल्या जीवनात रुजवली गेली आहे.सण उत्सवांद्वारे मन प्रसन्न होते,कौटुंबिक संबंध  दृढ होतात, सामाजिक जाणीवा व्यापक होतात तर प्रतिकांद्वारे बुद्धीचा विकास होतो. भारताचा  सांस्कृतिक इतिहास हा पुस्तकांच्या पानात नाही ,तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिला आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व शास्त्रीय माहात्म्य आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण सणांचा संबंध देहाच्या आणि मनाच्या आरोग्याशी तर आहेच पण आत्मिक समाधानाशीही आहे.मानवी जीवन कौटुंबिक,मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक समृद्ध करायचे असेल तर सण उत्सवा मागचा दृष्टीकोन लक्षात घ्यायला हवा.काळ आणि परिस्थितीनुसार कालबाह्य आणि निरुपयोगी प्रथा मोडीत काढून सणांमागचे तत्व व विज्ञान शाबूत ठेवणे गरजेचे आहे.

     या दृष्टीने दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव आहे. या सणासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराजय करण्यासाठी लंकेवर स्वारी केली आणि अश्विन महिन्यातल्या दशमीला रावणाला ठार मारले म्हणून या दिवसाला विजयादशमी असं म्हणतात. 

            दुसरी कथा महिषासुरमर्दिनी देवीची आहे पृथ्वीवरील जनतेचा छळ करणाऱ्या  महिषासुराचा नि:पात करण्यासाठी देवाने अष्टभुजा देवीचे रूप धारण करून, दहा दिवस युद्ध करून त्या राक्षसाचा वध केला म्हणूनही या दशमीला विजयादशमी म्हणतात.म्हैसूरला याच देवीला चामुंडेश्वरी या नावाने संबोधतात. 

       रघु राजाने विश्वजीत यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. अशात चौदा विद्या पारंगत असलेला कौत्स त्याच्याकडे दान मागायला आला.  याचकाला विन्मुख पाठवणे ही रघु राजाची संस्कृती  नव्हती.  म्हणून द्रव्य संग्रहासाठी त्याने इंद्रावर स्वारी केली .रघु राजाच्या अचाट पराक्रमाची कल्पना असल्यामुळे इंद्राने युद्धाचे कारण जाणून घेतले व कुबेराला रात्री  शमी व आपट्याच्या वृक्षांवर सुवर्ण मोहरांचा वर्षाव करण्याची आज्ञा दिली. रघुराजांनी या संपत्तीचे कौत्साला दान दिले. आवश्यकतेपेक्षा एकही सुवर्णमोहोर जास्त घेणार नाही हा कौत्साचा निश्चय होता तर या द्रव्याने मी माझी तिजोरी भरणार नाही हा रघु राजाचा आग्रह होता. शेवटी हे सोने लुटून घेण्याचा आदेश त्याने जनतेला दिला. लोकांनी त्या झाडाची पूजा करून  ते सोने लुटून घरी आणले, तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमीचा. तेव्हापासून या झाडाची पाने सोने म्हणून लुटण्याचा प्रघात आहे .

             पांडवांनी देखील अज्ञातवासात असताना आपली अस्त्रे शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. इतिहासाचा मागवा घेतल्यास विजयादशमी चा मुहूर्त स्वारी करण्यासाठी किंवा मोहीम सुरू करण्यासाठी फार महत्त्वाचा होता हे दिसून येते. शिवाजी महाराज, पेशवे याच मुहूर्तावर कूच करीत असत अशी इतिहासात नोंद आहे.                     

         हा सण साजरा करीत असताना सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. ईशान्य दिशेला असलेल्या शमी किंवा आपट्याच्या  वृक्षाची पूजा करताना, 

    'शमी शमयते पापम् 

    शमी लोहित कंटका |

    धारिण्य अर्जुनं बाणानाम्      

     रामस्य प्रिय वादिनी |

तसेच, 

'अश्वंतक महावृक्ष, 

महादोष निवारणम् |

इष्टानां दर्शनम् देहि, 

कुरु शत्रुविनाशनम् | 

अशी प्रार्थना म्हणून नंतर शमी तसेच आपट्याची पाने आणायची असतात. ही पाने म्हणजे सुवर्ण मोहरांचे प्रतीक आहे. ही पाने आपण देवाला वाहतो, वडीलधाऱ्यांना, मित्रांना देतो. मला हे जे वैभव मिळाले आहे, त्याचा उपभोग मी एकटा घेणार नाही तर सगळ्यांना वाटून या आनंदाचा गुणाकार करायचा..... ही कल्पनाच किती उदात्त आहे. मित्रांबरोबर शत्रूशी ही प्रेमाचे नाते जोडायचे हा दसऱ्याचा संदेश आहे. या दिवशी शस्त्र लेखणी, वाहनांची पूजा करतात. म्हणजे ज्या साधनांनी आपली शक्ती वाढते त्या साधनांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही किती अभिनव कल्पना आहे.या दिवशी रावण दहन करतात.याद्वारे  मनातली दुष्ट वृत्ती नष्ट होऊन रामप्रवृत्तीचा उदय होण्याची प्रेरणा मिळावी हे अपेक्षित आहे. या सगळ्या पद्धती प्रतिकात्मक आहेत.पौराणिक  कथा या कपोलकल्पित असतीलही. पण लहानपणी अशा कथांवर विश्वास बसतो आणि त्यातून मिळणारा संदेश नकळतपणे संस्काररुपात खोलवर रुजत जातो. हे बालवयात झालेले संस्कार मनाला संयमी आणि विवेकी करतात आणि पुढील आयुष्यात सण साजरे करताना कधी वावगे वागू देत नाहीत. 

आश्विन महिना म्हणजे शरद ऋतू .आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील पित्त प्रभावी असते. पित्त म्हणजे बुद्धी, साहस, पराक्रम. अशावेळी प्रत्येकानेच एका चौकटीत बंदिस्त न राहता

 सीमोल्लंघन  करावे अशी अपेक्षा आहे. महिषासूरमर्दिनीचा पराक्रम, रामाने रावणावर केलेली मात,रघुराजाचे दातृत्व, पर धनाबद्दल विरक्ती,कौत्साची निर्मोही वृत्ति.....यातून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे.

  आजच्या युगात वैचारिक सीमोल्लंघन आणि त्यानुसार  केलेली कृती अपेक्षित आहे. या सणातला उत्साह, उल्हास ,आनंद, प्रेम हे जीवनाचे प्रेयस आहे तर,वैचारिक सीमोल्लंघन  हे आत्मशक्ती, संघटन शक्ती, अन्यायनिवारण यासाठी पोषक ठरणारे म्हणजेच या सणातील श्रेयस आहे. उत्सव साजरा करताना श्रेयस आणि प्रेयसाचा योग्य समन्वय हवा.

दसरा विजयाचा सण असल्यानं षड्रिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे सामर्थ्याचे, मैत्रीचे,परस्पर सामंजस्याचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

सण म्हणजे 'धम्माल ', 'मज्जामस्ती ' हे नक्कीच खरे आहे पण त्याचे रूपांतर   'धांगडधिंगा' व 'उन्मादात ' होऊ नये ..हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची तीव्र निकड आहे.

 'आला आश्विन आश्विन, 

 जाती सीमा उल्लंघून,

 लुटा समतेचं सोनं ,

गात मानव्याचं गाणं '

असा समानतेचा,वैचारिक उन्नतीचा,परस्पर सौहार्दाचा दसरा साजरा करु या.मोबाईलवर 'हॅपी दसरा' हा संदेश जगभरात पाठवणाऱ्या मेंढरांच्या कळपात सामील व्हायचे की नाही हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ. साधना कुलकर्णी

9422939510

drsadhana.k@gmail.com


Tuesday, September 12, 2023

यावे गणराया

 


         


यावे देवा महाराजा.गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुझे हार्दिक स्वागत. आपल्या राज्यात तुझ्या आगमनाची रीतसर आणि जय्यत तयारी झाली आहे. शहराकडून गावाकडे जाणाऱ्या रेल्वे ,बस ,खाजगी गाड्यांचं आरक्षण कधीचंच 'फुल्ल' झालेलं आहे. खाजगी वाहनांचे दर नेहमीप्रमाणे प्रचंड वाढले आहेत. तुझ्या विविध मनमोहक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या भव्य, आकर्षक मूर्ती वाजत गाजत, विजेच्या, केबलच्या तारा तोडत आपापल्या  मंडळात डेरेदाखल झाल्या आहेत. ढोल, ताशा लेझीमची प्रॅक्टिस टिपेला म्हणजेच कानाचे पडदे फाटेस्तोवर पोचली आहे. आधीच खड्डे असलेल्या जमिनीवर आणखी खड्डे खोदून  बाप्पा तुमच्यासाठी ठिकठिकाणी भव्य व्यासपीठे उभारली आहेत. खंडणीच्या वसुलीप्रमाणे  वर्गणीही सगळ्या मंडळांनी 'शिस्तीत' जमवली आहे. आपण यावे गणराया.... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

                      बाप्पा तुझ्या उत्सवात बंदोबस्तासाठी पोलिसांची प्रचंड फौज तैनात केली आहे. आता दहा दिवस त्यांना पाणी प्यायला ही सवड नसणार.तुझ्यासारखे व्हीव्हीआयपी आले की सगळी कामं सोडून कायदा आणि सुव्यवस्था योग्य राखण्यात  पोलिसांची काय अवस्था होते हे तुला सांगायची  गरज आहे? सुरळीत वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद केलेले आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे.पण हरकत नाही. तुझ्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची योजना केली आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी झाला त्यामुळे पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे.शिवाय निर्माल्य पाण्यात शिरवण्याची आपली परंपरा.असो. आपण यावे गणराया..... तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

          महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस पुरेसा नसल्याने पिके करपून चालली आहेत. शेतकरी हवालदिल झालाय.पण बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजली आहे. तिथे दुष्काळाचा मागमूसही नाही बरं बाप्पा. तुझे दागिने ,तुझी रेशमी वस्त्र, तुझं मखर, तुझी आरास, तुझ्यासाठी फुले, हार, दुर्वा, नारळ, फळफळावळ यांनी बाजार ओसंडून वाहतोय. दुचाकी चारचाकी वाहनांची खरेदी तुझ्या आशीर्वादाने व्हावी म्हणून अनेकांनी आगाऊ पैसे भरून ठेवले आहेत.सोने खरेदी पण तुझ्या आगमनाप्रित्यर्थ भक्तांनी केली आहे.  तुझ्या साग्रसंगीत  आणि षोडशोपचार पूजेसाठी समस्त ब्रह्मवृंद सज्ज आहे .हल्ली त्यांची वेळ  चार महिने आधीपासून घ्यावी लागते . नाही  तर ऑनलाईन गुरुजींचा पर्याय आहेच की. त्यामुळे सारं काही 'सुशेगात' आहे.आपण यावे गणराया......तुझं स्वागत नेहमीप्रमाणे दणक्यातच होणार.

           ही झाली सार्वजनिक मंडळाची तयारी. पण आम्ही घरी सुद्धा जय्यत तयारी केलीय बरं बाप्पा. अहो ,दोनशे रुपयांनी सिलेंडर स्वस्त झालाय. मग काय विचारता? घर चकाचक स्वच्छ केलं आहे.तांदूळ धुऊन, वाळवून, दळून उकडीच्या मोदकांची तयारी केली आहे. यूट्यूब वरून चीज मोदक, केक मोदक, पनीर मोदक, चायनीज मोदक, मिलेट्स मोदक यांच्या रेसिपीज डाऊनलोड करून ठेवल्या आहेत. अथर्वशीर्षाची पुस्तकं आणून ठेवली आहेत. दहा दिवसांच्या दहा-साड्या आणि पारंपारिक दागिने ठरवले आहेत. आणि यावर्षी ना बाप्पा, माझ्या मैत्रिणीने सरळ चांदीच्या २१ दुर्वा आणि चांदीचे जास्वंदीचे फुल खरेदी केले आहे. म्हणजे रोज दुर्वा तोडायची कटकटच नाही. त्यामुळे आपण यावे गणराया...... तुझं स्वागत घरोघरी दणक्यातच आणि भक्ती भावाने होणार. 

          बाप्पा तू महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहेस. अग्र पूजेचा मान असल्याने तुझी पूजा तर नेहमी आम्ही करतोच पण भक्तीभावाच्या पलीकडेही तुझं आणि आमचं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं आहे. तुझी घरात प्रतिष्ठापना झाली की आख्खी वास्तू चैतन्यमय होते.घरात तुझ्याशी  हितगुज करता येतं, संवाद करता येतो, मनासारखी पूजा करता येते. घरातल्या हवेला मांगल्य आणि पावित्र्याचा गंध येतो. 

          तसंच आम्ही लहान असताना, आमच्या  जोशीवाडीत तुझी स्थापना व्हायची. मग ठरल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी वाडीतील प्रत्येक घराला ठराविक काम असायचं. एक दिवस हार करायचा. मग त्यासाठी पहाटे उठून फुलं तोडायची आणि चोरायची सुद्धा. आपला हार ,आपला नैवेद्य, आपली रांगोळी सगळ्यात चांगली व्हावी म्हणून सगळी घरं मनापासून आणि आनंदानं तयारी करीत. नैवेद्य रुचकर व्हावा यासाठी आईच्या मागे लावलेली भुणभुण, मी काढलेली मोठी रांगोळी लगेच पावसाने वाहून गेली म्हणून कोसळलेलं रडू, तुझ्यासमोर लहानशा स्टेजवर केलेले बाळबोध नाच, नाटकं, नाट्यछटा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत आणि त्यानंतर मिळणारी छोटी छोटी बक्षीसं.... हे सगळंच खूप गोड, लोभस, सात्विक आणि भाबडं होतं. आजूबाजूच्या मंडळांमध्ये परिसंवाद, व्याख्यानमाला, कीर्तन,तीन अंकी नाटकं...असे दर्जेदार उपक्रम असायचे.थोडक्यात काय, उत्सवाचे दहा दिवस हे आमचं संस्कार शिबीरच होतं.

                    पण....पण आता त्यातलं काहीच उरलं नाही. सार्वजनिक मंडळात तुझी रेखीव, सुंदर, सजवलेली महाकाय मूर्ती असते, तुझ्या अंगावर दागिने असतात, दिव्यांची रोषणाई असते, नयनरम्य देखावा असतो, दानपेटीत देणाऱ्यांचा ओघ असतो, वाद्यांचा दणदणाट असतो. सगळं खूप छान असतं पण बाप्पा, तुझी मूर्ती बघून परकं वाटतं. बरेचदा ती मूर्ती  अलिप्त, तटस्थ वाटते. तू नसतो का तिथे? खरं सांग बाप्पा, तू तिथे नसतोच ना?? 

                    खरंतर, गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. प्रादेशिक उत्सव हे भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करित असतात.हा उत्सव बघायला परदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे अत्यंत प्रगल्भ, परिपक्व ,सात्विक आचार विचारांचं प्रदर्शन होणं गरजेचं असतं. पण सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात शिरलेलं अर्थकारण, राजकारण ,गुंडगिरी ,झुंडशाही, कंपूशाही बघून हा गणेशोत्सव नको असं वाटायला लागलं आहे बाप्पा. तुझ्या उत्सवाचं बाजारीकरण झालं. तुझ्या उत्सवात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होऊ लागली. तुझ्या मंडळात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होऊ लागला. तुझा उत्सव म्हणजे प्रतिष्ठेचं आणि शक्तीचं प्रदर्शन होऊ लागलं .भक्तीची जागा उन्मादाने घेतली. उत्साहाची जागा धिंगाण्याने घेतली .श्रद्धेची जागा अभिमानाने घेतली आणि तुझ्या उत्सवाचा 'इव्हेंट' झाला बाप्पा. 

                        सध्या विलक्षण अस्थिर परिस्थितीत आहे आजचा समाज. एकीकडे  चांद्रयान, विक्रम लँडर, आदित्य एल-वन च्या प्रक्षेपणाने देशाची बौद्धिक उंची वाढते आहे तर दुसरीकडे महिलांना निर्वस्त्र करून, त्यांच्यावर बलात्कार करून, त्यांची धिंड काढणाऱ्या समाजाचा हिंस्र आणि भयंकर चेहरा दिसतो आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे झालेला विकास दिसतो आहे त्याचवेळी त्या महामार्गावर रोज घडणारे अपघात मन सुन्न करताहेत. ज्या देशातले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळवून देशाची मान उंचवतात त्याच देशातल्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार होऊनही त्यांना न्याय मिळत नाहीय. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, नापिकी, प्रदूषण, कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार या सगळ्या विळख्यात आजचा समाज अडकत चालला आहे. बाप्पा, तरीही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आम्ही तुझं जंगी स्वागत करणार आहोत.आपण यावं गणराया...... कारण तुझा उत्सव ही अस्वस्थ समाजाला दिलेली अफूची गोळी आहे. 

                        बाप्पा, तू बुद्धीची देवता आहेस ना? 'त्वं ज्ञानमयो, विज्ञानमयोसि 'असं तुला म्हणतात ना? पण तुला माहित आहे का, सध्या या बुद्धीला कोणीही विचारत नाही, आम्हाला बुद्धी आहे रे पण आम्ही तिचा वापर करित नाही किंबहुना तिचा योग्य वापर केला तर खिल्ली उडविली जाते. आमच्या बुद्धीला गंज चढतो आहे पण आम्हाला त्याचं  काहीही सोयर सुतक नाही .अरे ,आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आता 'बुद्धिमान', 'मठ्ठ', 'ढ' ही विशेषणं निकालात निघालेली आहेत. पुढे मागे, 'बुद्धी म्हणजे काय रे देवा?' असा प्रश्न तुला विचारला, तर वाईट वाटून घेऊ नकोस. आता तुझ्यासमोर हात जोडून कोणीही ,'चांगली बुद्धी दे देवा'... असं म्हणणार नाही, हे लक्षात ठेव आणि आपण बुद्धीची देवता आहोत या भ्रमात राहू नकोस.         

                        शेवटी काय, काहीही झालं तरी तुझं दणक्यात स्वागत होणारच. त्यामागे भक्ती, श्रद्धा, पावित्र्य नसलं तरीही. तेव्हा बाप्पा, आता तूच ठरवायचं आहेस की यायचं की नाही? 

  ' त्वमेव केवलम् कर्तासि|     त्वमेव केवलम् धर्तासि| 

त्वमेव केवलम् हर्तासि|'.. असं तुला म्हणतात ना? मग तूच आता निर्णय घे. पण तोपर्यंत आम्ही जयघोष करणारच... 'यावं गणराया'.... आणि हळूच म्हणणार, 

         'गणपती बाप्पा मोरया.... 

         पुढच्या वर्षी नक्की काय ते ठरवा'.



डॉ साधना आशुतोष कुलकर्णी

 #गणेशोत्सव

#गणपतीबाप्पा

 



Sunday, August 13, 2023

जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?

 




१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला  दर वर्षी मला एकच प्रश्न पडतो की या दिवशी सार्वजनिक सुट्टी का असते ? याचे उत्तरही मला अनेकांनी दिले की हे राष्ट्रीय सण आहेत म्हणून. धार्मिक सणांना सुट्या असतात कारण प्रत्येकाच्या घरी सण साजरे केले जातात. काही धार्मिक विधी पार पाडले जातात, विशिष्ट पूजा असते, नैवेद्य असतो, अन्नदान असते. पण राष्ट्रीय सणाला आपण काय करतो? यावर्षी तर १५ ऑगस्टला मंगळवार आहे. १६ ऑगस्टला पारसी न्यू इयर ची सुटी.१२ ला दुसरा शनिवार तर १३ ला रविवार. म्हणजे सोमवारी १४ ला एक सुटी टाकली की आपोआपच पाच सुट्ट्या पदरात पडणार.हा अगदी मणीकांचन योगच. या योगाची पर्वणी साधून  पावसाळी सहलींना या पाच दिवसात नक्की ऊत येणार. सगळी पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून  जाणार.अशा क्वचितच लाभलेल्या संधीचा फायदा न घेणारा करंटाच.ही सगळी मज्जा फक्त एका १५ ऑगस्ट च्या सुट्टीमुळे. आणि आमच्यासारखे सहलीला न जाणारे  - झेंडावंदन करणार. त्यासाठी आठवडाभरापासून कोणता ड्रेस, कोणती साडी, कोणती थीम, यावर गहन चर्चा घडणार. त्यासाठी वेळप्रसंगी नवीन खरेदी ही होणार. झेंडावंदना नंतर फोटो आणि रिल्स काढण्याचा अत्यावश्यक राष्ट्रीय कार्यक्रम होणार आणि मग आपापल्या घरी जाऊन आराम करणार नाही तर मज्जा करणार.

           देशाच्या स्वातंत्र्यदिनी एक  राष्ट्रगीत म्हणण्याशिवाय दुसरं काय करतो आम्ही? नाही म्हणायला काही उपक्रम राबवलेही जातात पण त्यात देशप्रेमाशिवाय प्रसिद्धीचाच हव्यास दिसून येतो. नवरात्रात अंगात देवी येते त्याचप्रमाणे अनेकांच्या अंगात या दिवशी देशभक्तीचा संचार होतो .अचानक  स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांबद्दल उमाळा दाटून येतो. आणि संध्याकाळपर्यंत हे उसने अवसान जिरले की रीतसर श्रमपरिहाराचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडतो.

            दीडशे वर्षाच्या गुलामगिरीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या तन मन धनाची आहुती देऊन लढा दिला त्यांच्यासाठी १५ ऑगस्ट ला आम्ही  वाट्टेल तशी 'धमाल' करतो, 'धांगडधिंगा' करतो, 'एन्जॉय' करतो.......हे खटकतं. कशाला हवी ही सुटी? सकाळी झेंडावंदन करून नेहमीसारखं कामाला लागायचं.म्हणजे निदान राष्ट्रीय सणाचा धिंगाणा तरी होणार नाही. पण मग  देशप्रेम दाखवण्याची अधिकृत संधीच हातची जाईल की हो. 'देशभक्ती म्हणजे काय रे भाऊ?'असा प्रश्न आज सहज पडू शकतो.  समाजाची प्रासंगिक देशभक्ती उफाळून येण्याचे प्रसंग घडतातही अधूनमधून. नुकतेच झालेले चांद्रयानाचे अंतराळातील प्रक्षेपण ,भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पटकावलेली पदके, भारतीय चित्रपटाचे ऑस्कर मध्ये झालेले नामांकन, सर्जिकल स्ट्राईक.. या आणि यासारख्या अनेक प्रसंगात आपली देशभक्ती उफाळून येत असते. अर्थात ती यायलाच हवी पण ही देशभक्ती प्रासंगिक असते आणि  केवळ भावनेच्या स्तरावर असते. देशभक्ती ही केवळ भावना नाही तर ती एक विचारधारा आहे आणि त्यानुसार केले जाणारे आचरण आहे. आणि या देशभक्तीच्या भावना, विचार, कृतीचे एकत्रित रसायन ज्यांच्या नसांमधून नेहमी वहात असते.. तो खरा देशभक्त. 

आज अनेक मंडळी, अनेक संस्था देशासाठी निस्वार्थी वृत्तिने अथक कार्य करताहेत.त्यांच्यामुळे देशाची मान उंचावली आहे.पण लेखाचा हा विषय नाही.                                                    आज  आपला देश ७६ वर्षाचा झाला आहे. आमच्या साठीच्या पिढीने एकोणिसाव्या शतकातली वर्षोनुवर्षे न बदलणारी आणि कष्टाळू जीवनशैली जगली आहे. त्याचवेळी विसाव्या  शतकातली तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत बदलणारी, वेगवान आणि सुखसोयींनी युक्त अशी जीवनपद्धती आज आम्ही अनुभवत आहोत. वयाच्या या टप्प्यावर किंबहुना कोणत्याही वयात, मी देशासाठी काय केले आहे? किंवा काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला निदान राष्ट्रीय सणाच्या दिवशी तरी विचारायला हवा. 

            'आम्ही नियमित मतदान करतो. नोकरी व्यवसाय करतो. सामाजिक कायदे पाळतो. नियमित कर भरतो. कुटुंब व्यवस्था अबाधित राखतो. आपल्या धर्म संस्कृतीचं पालन करतो .आणखी देशासाठी सामान्य नागरिक वेगळं काय करणार?' असेच उत्तर बहुतांशी  दिले जाण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकाची जबाबदारी आम्ही पाळतो या भ्रमात आपण असतो आणि देशातील अराजकता,अव्यवस्था, हिंसाचारादि बाबींना सरकारला दोषी ठरवतो.डोळे उघडून बघितले तर सामान्य नागरिक ही खूप काही करु शकतो. 

            ताजे उदाहरण घ्यायचे तर समान नागरी कायदा . २०१६ साली हा कायदा लागू करावा का यासाठी आयोगाने जनमताची मागणी केली होती. त्यावेळी जनतेकडून ७५३७८ सूचना आल्या. त्या आधारे विधी आयोगाने १८५ पानांचा अहवाल सादर करून समान नागरी कायदा लागू करू नये

 हा निकाल दिला होता. हे सामान्य नागरिकाच्या शक्तीचे उदाहरण आहे. आताही परत या कायद्यावर विचार मंथन सुरू झाले आहे .आणि आयोगाने १४ जून २०२३ पासून जनतेला आपल्या सूचना देण्याचे आवाहनही केले होते.आपल्या लोकसंख्येचा विचार करता अगदी अत्यल्प प्रमाणात जनतेने ही मत /सूचना देण्याची जबाबदारी  पार पाडली आहे.                       

              'गिव्ह इट अप' ही मोदी सरकारने आवाहन केलेली योजना. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर विकत घेतल्यावर ग्राहकाच्या खात्यात सरकारकडून सबसिडी जमा होत असते. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटाने ही सबसिडी न स्वीकारता सरकारला परत केली तर समाजातील गरीब वर्गाला त्याचा फायदा होतो. ही संकल्पना 'गिव्ह इट अप' कॅम्पेनची आहे. २३ एप्रिल २०२३ पर्यंत सबसिडी नाकारणाऱ्यांची संख्या जवळजवळ १.१३ करोड झाली आहे. संपन्न गटाचा विचार करता, वरिल संख्या नगण्य आहे.

              भारतीय संविधानात भारतीयांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांची नोंद आहे हे आपल्याला माहित आहेच पण ३ जानेवारी १९७७ पासून 'कलम ५१-क' द्वारे 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' विशद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे ३ जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळण्यात येतो. किती नागरिकांना याबद्दल माहिती आहे? 

              उदाहरणादाखल, 'ड'- हे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे  -  हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आणि नुकतीच मणिपुर मध्ये घटलेली घडलेली घटना काय सुचवते? 

        'ज' - हे कर्तव्य म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,मानवतावाद ,शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे - हे आहे. या संदर्भात, मध्य प्रदेशातील सिहोर या गावी रुद्राक्ष मिळवण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली व काही भाविक मृत्युमुखी पडले. ही घटना काय दर्शविते?

 'जनहित याचिका' दाखल करण्याचे धाडस किती नागरिकांमध्ये असते? राजस्थान मधील एका खेड्यात भंवरीदेवी या महिलेने एका वर्षाच्या मुलीच्या विवाहाला विरोध केला त्यामुळे स्थानिक लोकांकडून धमक्या व तिच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला. २२ सप्टेंबर १९९२ ला पाच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. भंवरीदेवीने न्यायालयात धाव घेऊनही ती न्यायापासून वंचितच राहिली. यासंदर्भात भंवरीदेवीच्या वतीने नयना कपूर या वकील महिलेने सुप्रीम कोर्टात राजस्थान सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे भंवरीदेवीला न्याय तर मिळालाच पण या निकालामुळे स्त्रियांच्या हक्कांविषयी उच्च न्यायालयीन स्तरावर देखील सुधारणा झाली . स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल या जनहित याचिकेचा निकाल हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

 आज आपण सामान्य नागरिक हे, 'कळते पण वळत नाही' या परिस्थितीत आहोत. अवतीभवती ची परिस्थिती आणि सत्तेचे गलिच्छ राजकारण यामुळे अस्वस्थता सगळ्यांमध्येच आहे .पण संवेदनशील व बुद्धिमान वर्गाने आपल्या मनाच्या खिडक्या बंद करुन स्वतः च्या कोषात जगणे सुरु केले आहे हे फार गंभीर आहे .आणि या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी हा सामान्य नागरिक दृकश्राव्य माध्यमाच्या आहारी गेला आहे. अन्नावाचून तडफडणारे लोक, रस्त्यावर घडलेला अपघात, डोळ्यासमोर होणारी महिलेची विटंबना..... याकडे दुर्लक्ष करून तो आभासी आनंदात रमला आहे, कायम पार्टी मूडमध्ये राहू इच्छित आहे हे तर अत्यंत भयावह आहे.वाढत जाणारा हा कोडगेपणा पुढच्या पिढीवर काय परिणाम करेल याची कल्पनाही करवत नाही.   

 प्रसिद्ध पोर्तुगाल लेखक 'सारामागो' यांच्या प्रचंड गाजलेल्या ' द इयर ऑफ द डेथ ऑफ रिकार्डो रिस' या पुस्तकात सध्याच्या सामान्य माणसाच्या मनोवृत्तीवर अचूक भाष्य केले आहे. ते लिहितात,  

'वी स्लीप व्हेन वी शुड बी ऑन अवर गार्ड'

 'वी डिपार्ट व्हेन वी शुड बी अरायव्हिंग' 

 'वी क्लोज द विंडो व्हेन वी शुड लीव्ह इट ओपन'

       ‌‌    आजच्या जगातल्या सामान्य समाजाचे हे यथार्थ वर्णन आहे .आज  तांत्रिक प्रगती व आर्थिक सुबत्तेमुळे माणूस सुखी झाला आहे पण नागरिक म्हणून तो आत्मकेंद्रित आणि निष्क्रिय झाला आहे. चंगळवादी वृत्ती आणि निबर मनाचा जबरदस्त पगडा असल्यामुळे मानवी मेंदूच्या सारासार विवेकाची क्षमता कमी होत चालली आहे.    

          पारतंत्र्यात असताना अनेक महान नेतृत्वांनी जनतेमध्ये एक विचारधारा रुजवली,जागरुक केले. पण आज या स्वतंत्र भारतातल्या  बेजबाबदार नागरिकांना योग्य मार्ग दाखविणारे एकही नेतृत्व नाही ही खरी शोकांतिका आहे. आज लोकमान्य टिळक असते तर,'जनतेचे डोके ठिकाणावर आहे का?'असे त्यांनी खडसावून विचारले असते.आणि त्यांच्या या शब्दांनी नक्कीच जादूची कांडी फिरली असती.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी,

अकोला, ९४२२९३९५१०

#स्वातंत्र्यदिन

#भारतीयनागरिक

#गिव्हइटअप

Tuesday, July 11, 2023

बाईपणाचं दळण थांबव रे देवा

  




 जवळपास चाळीस पन्नास वर्षांपूर्वी  जो विषय ज्वलंत होता,ज्या विषयाचा चघळून चघळून चोथा झाला आहे तोच विषय आकर्षक स्वरुपात,कसलेल्या अभिनेत्रींना घेऊन, चुरचुरीत विनोदाची फोडणी देऊन,  तिन्ही त्रिकाळ प्रसिद्धीचा, प्रमोशनचा मारा करुन महाराष्ट्रातील स्त्री प्रेक्षकांवर थोपवलेला सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'.थोडक्यात काय, चित्ताकर्षक वेष्टनात गुंडाळलेली जुनी पुराणी वस्तू.किंवा नव्या बाटलीत जुनी दारु म्हणजे ' बाईपण भारी देवा '.

       बाई असल्यामुळे, सर्वसाधारणतः  कौटुंबिक,  भावनिक गुंत्यात अडकणं हा तिच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतोच.त्यात नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या बाईची तर तारेवरची कसरतच असते.  अशाच सहा सख्ख्या बहिणींच्या आयुष्यातले गुंते ही सिनेमाची मुख्य कथा.आणि त्यातून सुटण्यासाठी या सहा बहिणी जो भन्नाट (अजिबातच न पटणारा, अवास्तव) मार्ग निवडतात , तो म्हणजे 'बाईपण भारी देवा'. 

       मुळात या बहिणीं समोरचे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत.फक्त सुचित्रा बांदेकरच्या घटस्फोटाचा प्रश्न सोडून. त्यातही शिल्पा नवलकर,वंदना गुप्ते आणि रोहिणी हट्टंगडी यांची घुसमट ( जी अतिशय वरवरची आहे) त्यांनी स्वतःच निर्माण केली आहे.खरंतर काहीही कारण नसतांना चोवीस तास चेहऱ्यावर बारा वाजलेल्या रोहिणी हट्टंगडीच्या नवऱ्याचीच घुसमट व्हायला हवी होती.त्याचं पुरुष पण भारी रे देवा! या बहिणींची दु:खं म्हणजे तूप साखरेत घोळवून, लाडावून कुरवाळून मोठी केलेली दु:खं आहेत.अशा दु:खांना फारसं महत्त्व न देता आजची बाई जगण्याचा आनंद घ्यायला शिकली आहे. अशी फालतू दुःखें आम्ही आणि आसपासच्या बायकांनी अनेकदा अनुभवली आहेत आणि त्यातून लीलया बाहेर पडलो आहोत. बाईपणाच्या वास्तव दुःखांच्या आणि कोंडमाऱ्याच्या जवळपासही हा सिनेमा पोचत नाही.नुकतंच बाईपणातून बाहेर निघून एक माणूस म्हणून जगण्याच्या आजच्या काळात बाईला या सिनेमाने परत बाईपणात ढकललं आहे. शिकलेल्या,नोकरी करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या या सहा बहिणी इतक्या दुबळ्या का असाव्यात की, मंगळागौर स्पर्धेचा त्यांना आधार घ्यावा लागावा आणि तो ही एकत्रितपणे? आज समाजात ,भयंकर संकटांना एकटीने सामोरं जाऊन जीवनाच्या लढ्यात यशस्वी झालेल्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी बाईपण भारी आहे हे सिध्द केलं आहे.अशावेळी हा उथळ सिनेमा निव्वळ हास्यास्पद वाटतो.

    मुलांचा वाढदिवसाचा सोहळा सुरु असताना कोणती आई प्रेग्नंसी टेस्ट करेल हो?आणि मेनोपॉज आला म्हणजे आभाळ कोसळलं की काय?(आम्हाला तर हायसं वाटलं बुवा) चिनूच्या ऑपरेशनच्या वेळेस तिचा नवरा आणि सासू कुठे होते? कडक अण्णा एकाएकी मऊ कसे झाले? स्टेशनवरचा नाच म्हणजे निव्वळ मूर्खपणाचा कळस.

       असो.कलाकार सगळेच कसलेले आहेत.वंदना गुप्ते कितीही आवडत असली तरी तिला आता बघवत नाही.  ती स्वतःच्याच प्रेमात आहे."मी- वंदना गुप्ते" याच ऍटिट्युड ने तिने काम करु नये. सुकन्या कुलकर्णी जबरदस्त .तिची बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरचे हावभाव  अप्रतिम. पण नोकरी करणारी बाई इतकी बावळट?असो.

       पण दिग्दर्शक केदार शिंदे खरंच हुशार.त्यांनी आजच्या मध्यमवर्गीय,मध्यमवयीन बायकांची मनोवृत्ती अचूक हेरली आहे. "मज्जा" आणि "एन्जॉय" हा प्राधान्य क्रम असणाऱ्या बायकांची नस त्यांनी बरोबर पकडली आहे. सिनेमातल्या वरवरच्या झगमटाला बाईपणाचं लेबल लावलं आणि त्याला नाव देतांना "भारी" या  जरीची झालर लावली.झालं. तमाम महिला वर्ग खुळावलाच की हो.  थिएटरला तीर्थयात्रेचं स्वरुप आलंय चक्क. बायका झुंडीने सिनेमाला ड्रेस कोड करुन जाताहेत,रील,फोटो काढताहेत. थिएटर मधून बाहेर निघताना आपण "कसल्या भारी" आहोत या आनंदात न्हाऊन निघताहेत. सगळ्याच बायकांचा आत्मविश्वास वाढलाय म्हणे हा सिनेमा बघून - अर्थातच... जमत नसेल, सोसत नसेल तरी सार्वजनिक ठिकाणी नाच करण्याचा हो. हा केदार शिंदे च्या यशाचा फॉर्म्युला. 

      खरंतर "बाईपण किती उथळ देवा"...असा समज या सिनेमामुळे होतोय.पण झापडं बांधूनच वावरायचं असेल तर देव त्यांना सद्बुद्धी देवो !!  असो. डोकं न वापरता सिनेमा डोक्यावर घ्यायचा हे ठरवूनच टाकलं असेल तर प्रेक्षक स्त्रियांचंही "बाईपण भारीच भारी" हो देवा.

     

डॉ साधना आशुतोष कुलकर्णी 

#बाईपणभारीदेवा

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...