Sunday, May 14, 2023

 



मागच्या वर्षी मदर्स डे ला काढलेला हा फोटो.आई,मी,माझी मुलगी आणि नात......चार पिढ्या एकत्र येण्याचा हा योग दुर्मिळच.म्हणून फोटो टाकला.खरंतर मदर्स डे - हे हल्लीचं फॅड. मग आईबद्दल तीच ठराविक, घासून गुळगुळीत झालेली वाक्य लिहिणं...हे ओघानं आलंच.

         आईबद्दलचं अती   उदात्तीकरण जे केलं जातं त्यामुळे हल्लीची आई सुपरमॉम होण्याच्या नादात विचार न करता धावत असते.

    पण आई ही आईशिवाय एक  व्यक्तीही असते ,तिचीही स्वभाव वैशिष्टे असतात, तिलाही कधीकधी आईपण झुगारून जगावंसं वाटतंच की.मातृत्व ही एक वृत्ती आणि कृती आहे जी सगळ्यांमध्ये असते- - पुरुषांमध्येही असते.

 आज या मातृत्वाला वंदन करुया.

पण ज्यांना आईच नसते त्यांचं काय????

या संदर्भात

मदर्स डे च्या निमित्ताने,

गुलजार यांची स्वतःच्या आईवरची एक विलक्षण हृद्य कविता.......

त्यांची आई त्यांना लहानपणीच सोडून गेली.त्यांचं हे दुःख अतिशय संयतपणे या कवितेत व्यक्त केलं आहे.कुठेही भावनांचा अतिरेक नाही, शब्दजंजाळता नाही की आक्रोश नाही.अगदी सांधे शब्द... पण काळीज चिरत जाणारे...

 या कवितेच्या मराठी अनुवादाचा केलेला एक प्रयत्न.


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

आई..........

तुला ओळखू तरी कसा,

तुला बघितलंच नाही कधी.


शोधत असतो मी तुला,

माझ्या चेहऱ्यावरील रेषेरेषेत.


लोक सांगतात, माझे डोळे.. अगदी माझ्या आईसारखे 

आहेत.


तसे पाणीदार आहेत माझे डोळे

पण...... तृषार्त आहेत .


कानाला एक छिद्र आहे,

जन्मजात असेल बहुतेक.


किंवा नवस फेडण्यासाठी..

तू टोचलास का गं माझा कान?


माझ्या समोरच्या दातात एक 

फट आहे..

तुझ्याही दातात असेल.


तुझ्याही तळपायावर एक

चक्र असेल.


एवढी कशाची घाई झाली तुला,

मला जन्म दिलास....

लगेच निघून गेलीस.


देव दिसला होता तुला????

म्हणून मला सोडून गेलीस??


शोधत असतो सतत...

गवसेल का कुणी?

माझ्या अंगखुणा असलेली ?


तुझ्याशिवाय ही पायाखालची माती .. कधीकधी ,

अनोळखी आणि उपरी वाटते.


आई....

तुला ओळखू तरी कसा,

तुला बघितलंच नाही कधी.


शोधत असतो मी तुला,

माझ्या चेहऱ्यावरील रेषेरेषेत.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

      'धूप आने दो', या पुस्तकातून.

#गुलजार

#धूपआनेदो




Saturday, March 25, 2023

पेंच सहलीतले "पेच"

फेब्रुवारीच्या बारा तारखेला नागपूरला प्रजापिता ब्रम्हकुमारी चं डॉक्टरांसाठी एक दिवसीय माईंड बॉडी मेडिसीन कॉन्फरन्स' होती.आमच्या मैत्रिणींनी या शिबीराला जायचं ठरवलं. 
           अगदीच रविवारी सकाळी निघून रात्री वापस येणं..ही कल्पना बऱ्याच जणींच्या पचनी पडत नव्हती.मग खूप चर्चा, वादविवाद करुन शेवटी शनिवारी पेंच ला जायचा कार्यक्रम आखला.सहलीची सूत्रं ज्योती,माया कराळे आणि मेघा ने हातात घेतली.(नेहमीप्रमाणेच). हो.या तिघी जणी आमच्या गृप मधल्या 'लीडर बायका' आहेत. मी, सुनिता,माया ठाकरे आणि मनीषा शांत, समंजस स्वभावाच्या.(गरीब बिचाऱ्या!) बाकी प्रिया,वर्षा बडगुजर,वर्षा राव आणि सीमा मात्र अगदी शाळकरी पोरी.....नाचणाऱ्या, उंडारणाऱ्या ,मस्ती करणाऱ्या, अति उत्साही.त्यात सीमा म्हणजे पुलं चा 'नारायणच'.
          तर अशा आम्ही अकरा जणी दोन इनोव्हा करुन अकरा तारखेला सकाळी पाच ला अकोला सोडणार,वाटेत रामटेक च्या रामाचं दर्शन घेऊन पेंचच्या मृगनयनी रिसॉर्टला दु. एकच्या सुमारास पोचणार.तिथे जेवणार आणि दुपारी साडेतीनला जंगल सफारी करणार, आणि रविवारी नागपूरला शिबीराला हजर राहणार......इतका साधा, सोपा, निरुपद्रवी कार्यक्रम ठरवला होता. 
          पण पेंच सहलीने आम्हाला पेचात टाकायचा चंगच बांधला होता.पहाटे चार वाजता उठून,घरातल्या यच्चयावत मंडळींच्या रीतसर साखरझोपा उडवून आम्ही अकरा जणी ठरलेल्या ठिकाणी चक्क वेळेवर डेरेदाखल झालो. पण हाय रे दैवा! गाड्यांचा पत्ताच नव्हता.एक गाडी गोरक्षण रोड वरुन ज्योती,मेघा माया आणि वर्षाला घेऊन येणार होती आणि दुसरी रामदास पेठेत सुनिता कडे येणार होती. पण दोन्ही गाड्या 'प्रथम ग्रासे मक्षिकापातः' या नियमानुसार वेळेवर उगवल्याच नाहीत.कसाबसा अर्धा तास संयम टिकवण्याचं शिवधनुष्य आम्ही पेललं खरं पण नाईलाजानं रामप्रहरी ड्रायव्हर आणि उशीर यावर तावातावाने चर्चासत्र घडवून घरच्यांबरोबर शेजाऱ्यांच्या झोपा उडवण्याचं सत्कार्यही हातून घडलंच.
          गाड्या ज्योतीने ठरवलेल्या होत्या त्यामुळे भल्या सकाळी तिच्या पत्रिकेत डोकं फिरण्याचा योग अटळ होताच. 
        'हो निघालो ', आणि 'पोचतोच'..... फक्त हीच दोन उत्तरं ऐकून प्रत्येकीची व्यक्तिगत आणि सामूहिक चिडचिड हास्याचे फवारे उडवत पद्धतशीर पार पडली. शेवटी दोन तास उशिरा आम्ही गाडीत स्थानापन्न झालो. 
           पण गाडीत बसताक्षणी सरड्यालाही लाजवणाऱ्या चपळाईने आम्ही रंग बदलले आणि ट्रिप चा माहौल,गाणी,गप्पा मौजमस्ती, खिदळणं,पांचट विनोद.. सगळं शिस्तीत सुरू झालं. 
           तिवसा गावाच्या जवळपास आमच्या गाडीत डिझेलचा वास येऊ लागला.आमच्या ड्रायव्हर शुभम ला हटकलं तर त्याला अजिबात वास येत नव्हता.(कोरोना?? छे छे.सर्दी असेल) पण आम्ही त्याचा पिच्छा सोडला नाही.शेवटी त्यानं दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला - प्रविणला आमची गाडी चालवायला दिली.शुभम जरा अबोल आणि साधा होता. पण प्रविण मात्र नंबरी होता. 
   'रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकच्या डिझेल चा हा वास आहे ' हे अत्यंत तर्कशुद्ध उत्तर देऊन त्यानं वेळ मारुन नेली. पण तिवसा ला नाश्ता करायला थांबलो तेव्हा गाडीच्या मागच्या बाजूने आॉईल गळताना दिसलं आणि गाडीतल्या वासाचा शोध लागला. आॉईल बरोबर आमचंही अवसान गळलं. ड्रायव्हरने गाडी वरून, खालून, उघडून तपासली.आॉईल लीकेज आहे,मायनर फॉल्ट आहे असं आम्हा अज्ञानी पामरांना समजावलं आणि आम्ही नाश्ता करून पुढे निघालो.
         अवघ्या ५/६ किमी नंतर मागून येणाऱ्या गाड्या आम्हाला इशारा करताहेत हे लक्षात आलं.गाडी थांबवून बघितलं तर मागच्या बाजूने धूर येत होता.सगळ्यांच्याच छातीचे ठोके चुकले.आता पुढे काय??? या गाडीत आता क्षणभरही बसायचं नाही यावर एकमतानं शिक्कामोर्तब झालं.
       हा पेच सोडवून पेंच ला कसं पोचता येईल याचे असंख्य पर्याय आमच्या अकरा डोक्यांमधून स्फोटासारखे बाहेर पडत होते.... डोक्यातूनही धूर येणं बाकी होतं. आता ज्योतीने आपल्या भात्यातून तिचं खास 'सौजन्यास्त्र' काढलं आणि गाडीच्या मालकाला फोन करुन तिच्या पद्धतीने यथेच्छ 'सौजन्यास्त्राचा' वापर केला आणि ताबडतोब दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्यास सांगितली.              आता चांगल्या गाडीने १४ किमी पुढे असलेल्या कारंजा घाडगे टोल वर ७ जणींना ड्रॉप करून प्रविण वापस आम्हा चौघींना घ्यायला येईल.त्याचवेळी शुभम मेकॅनिक शोधून आमची गाडी दुरुस्त करेल.दरम्यान गाडीचे मालक पर्यायी गाडी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील. चर्चा करुन हा निर्णय आम्ही घेतला.
         चांगल्या गाडीने सात जणी घेऊन प्रविण ने आगेकूच केले. मी,माया, ज्योती आणि मेघा आमचं गरम डोकं थंड करायला एका टपरीवर टेकलो.आमची दर्दभरी कहाणी मालकाला ऐकवली. डोकं थंड करायला तिथे चहा आणि प्राप्त परिस्थितीत हसणं हाच पर्याय होता. वेळ पुढे सरकत होता आणि घडत काहीच नव्हतं. एव्हाना प्रविण आम्हाला घेण्यासाठी यायला हवा होता.कारंजाला आमच्या सात सख्यांना सोडून तो मेकॅनिक आणि पर्यायी गाडीच्या शोधमोहिमेसाठी तो चक्क अंतर्धान पावला.
    इकडे आमचा शुभम, बाजी प्रभू देशपांडेंच्या थाटात, 'हळूहळू नागपूरला पोचू.काहीही होणार नाही'.... असं म्हणत आमच्यातले विझलेले स्फुल्लिंग चेतवत होता.भरीस भर म्हणजे, आता गिऱ्हाईकी सुरू झाली म्हणून टपरीवाल्याने आम्हाला ,
'आता इथून उठा' असा आदेश दिला.(काय वेळ आली बघा.) 
      मग काय, परिवहन महामंडळाच्या 'यष्टीचा' स्टॉप आला मदतीला.फॉर अ चेंज, तिथेही बसून घेतलं.आम्ही सतत प्रविण ला फोन लावत होतो त्यामुळे की काय,तो फोन उचलेनासा झाला. तिकडे कारंजा टोल जवळ सातही जणी गाडीबाहेर विस्थापित अवस्थेत बसल्या होत्या आणि आली वेळ गाणी गाऊन साजरी करित होत्या .प्रविण अजूनही प्रगटला नव्हता. मधेच मायाच्या डोक्यात काय आलं देव जाणे.आमच्या गळक्या गाडीतून ती तिचा कराओके बॉक्स घेऊन आली.आता ही गाणं म्हणते की काय, या भीतीनं माझ्या पोटात गोळा आला. गोष्टीतल्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो,तसा मायाचा जीव कराओके मधे होता याचा उलगडा मला अर्थातच नंतर झाला. 
      आता मात्र सहनशक्तीचा अंत होऊ लागला. आम्ही मिळेल त्या वाहनाने सरळ कारंजा टोल पर्यंत जायचं ठरवलं.शुभम मागून 'हळूहळू' येणार होता.
     इतक्यात समोर एक निळी कार थांबली.गाडीतून एक तरुण उतरला आणि टपरीवर चहा घ्यायला गेला.गाडीत दुसरं कुणीच नव्हतं.मी आणि माया सगळे शिष्टाचार गुंडाळून त्या तरुणा जवळ धावतच गेलो आणि आमचं रडगाणं ऐकवलं.सुरुवातीला त्याचा चेहरा त्रासिक होता पण स्त्री दाक्षिण्य म्हणून कारंजा पर्यंत सोडायला त्याने होकार दिला.त्याने निवांत चहा नाश्ता केला आणि तो गाडीजवळ आला.
आम्ही चौघी एका पायावर उभ्या होतोच. 
"तुम्ही चौघी आहात?" 
     त्याचा बदललेला आवाज आणि चेहेरा याकडे सपशेल दुर्लक्ष करून कोडगेपणाने आम्ही गाडीत घुसलो.गाडीत बसल्यावर अवघड ही वाटत होतं आणि हसायला ही येत होतं. कारंजा टोल १४ कि.मी.वर होता.आम्ही जवळ जवळ १० कि.मी.समोर गेलो आणि गाडीच्या मालकाला फोन आला.फोनवर बोलता बोलता त्याने गाडी थांबवली. "मॅडम तुमचं काही सामान बस स्टॅंडवर राहिलंय का? तो टपरीवाला माझा मित्र आहे, तो विचारतोय ." 
"कराओके "- आम्ही एकदम ओरडलो आणि कपाळावर हात मारला.आता हसावं की रडावं हे ही कळेना. 
"जायचंय वापस?" 
   गाडी मालक विचारु लागला. बहुतेक त्याला आमची फारच दया आली होती.पण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सौजन्याचा इतकाही फायदा घेणं आम्हाला योग्य वाटलं नाही. टपरी मालकाला फोन करून कराओके व्यवस्थित ठेवायला सांगून आम्ही कारंजा टोल वर उतरलो.मागून शुभम आमची गाडी घेऊन 'हळूहळू' येत होता. आधी पोचलेल्या सात जणींचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु होते.आता त्यांना 'कराओके स्टोरी 'सांगितल्यावर तर त्या रस्त्यावरच बसकण मारतात की काय अशी शंका आली.या मायाचं आता काय करायचं....(हे अर्थातच मनात.... सगळ्यांच्याच)
दरम्यान प्रविण चा पत्ताच नव्हता. आता शुभम ही आमची गळकी गाडी घेऊन पोचला.मायाने स्वतः मधे असलं-नसलेलं सगळं आर्जव शब्दात ओतलं आणि 'चांगली गाडी घेऊन कराओके आणायला वापस जावं लागतं दादा तुला'........ 
   असं सांगता क्षणी शुभम स्तब्ध झाला.याची वाचा गेली की काय?...अशी उगाच शंका डोकावली.पण नाही.भावनातिरेकाने (भावना नेमक्या कोणत्या हे कळलं नाही) तो निःशब्द झाला होता.शांतपणे तो गाडीत बसला आणि गाडी मागे वळवली. 
     तेवढ्यात प्रविण प्रगटला आणि गाडीची व्यवस्था झाली या गुड न्यूजची घोषणा केली. 
 चला,चला ...एकदम सगळ्यांमध्ये उत्साह संचारला...पण आता शुभम ची वाट होती.कराओके आणण्यासाठी इतका वेळ? आज काहीच तर्कसंगत का घडत नाहीय?
     झिंगाट गाण्याने सुरू झालेली ट्रीप आता ' नको देवराया अंत आता पाहू '....या वळणावर येऊन ठेपली होती.घरी फोन करून आपबिती कळवण्याची जोखीम घेणं परवडणारं नव्हतं ... इतकं शहाणपण प्रत्येकीत उपजतच होतं हे सांगणे नलगे. 
     आला.शुभम कराओके घेऊन आला आणि सगळ्यांनी फिनिक्स पक्षाला लाजवेल अशी उभारी घेतली.आता नवीन गाडीत सामान टाकून गजानन महाराजांचा जयघोष करुन आम्ही मार्गस्थ झालो.
   सकाळचा नाश्ता जिरला आहे याची प्रकर्षानं जाणीव झाली आणि वेफर्स,चिवडा , बिस्कीटं बाहेर निघू लागली.खरं तर या वेळी मृगनयनी रिसॉर्टला आम्ही जेवणं अपेक्षित होतं.त्यामुळे फारसं पोटपूजेचं साहित्य असणं अशक्यच होतं.तरीसुद्धा बॅगांमधून तळापर्यंत संशोधन करुन खरमुरे,आवळा कॅन्डी, गूळपट्टी सोप,ओवा, सुपारी,मुखवास,अनारदाना चॉकलेट्स सगळं खाऊन झालं.आता खाण्यासाठी फक्त औषधं शिल्लक होती. 
      एक वाजला होता. रामटेकच्या श्रीरामाने आमचा दर्शनाचा बेत यथासांग हाणून पाडला होता.आता लढाई पेंचची.आमच्या नवीन गाडीचा सारथी खूप समंजस होता.त्याने तीन वाजेपर्यंत पेंचला सोडण्याचं आश्वासन दिलं. 
      आता माया आणि मेघाने परिस्थिती हातात घेतली. मृगनयनी रिसॉर्ट मालकाला मायाचे तर अमोल या कोआॉर्डिनेटरला मेघाचे फोन सुरू झाले.साडेतीन ची सफारी कॅन्सल करुन रात्रीची, पहाटेची सफारी करण्याचा दोन्ही गाड्यांमधून फतवा निघाला.पण हाय रे दैवा! पेंच चे पेच संपायलाच तयार नव्हते.सफारी कॅन्सल केली तर पैसे वापस मिळणार नाहीत असा पेच समोर उभा ठाकला.मेघाने अमोलला आमची करुण कहाणी ऐकवली आणि अशा परिस्थितीत अडकलेल्या पीडितांना माणुसकीने मदत करणं कसं गरजेचं आहे हे ज्ञानामृत पाजायलाही ती विसरली नाही.त्या ज्ञानामृता पेक्षा तिच्या चढलेल्या आवाजासमोर आणि अती बोलण्यासमोर अमोलने शरणागती पत्करली.(हा माझा आपला अंदाज). रिसॉर्ट वरुन दोन जिप्सीत आम्ही बसणार होतो. आता वेळ नसल्याने खुर्सापार गेट जवळ दोन जिप्सी आमची वाट बघणार असं ठरलं.तिथे सुबोध नामक व्यक्तीला संपर्क करा असं सांगून अमोल ने तात्पुरती स्वतः ची सुटका करून घेतली. 
     आता लढाई ची सूत्रे मायाने हातात घेतली. रिसॉर्ट मालकाचा आणि तिचा परिचय होता. 'आमचं दुपारचं जेवण तुमच्याकडून होतं.आता आम्हाला भूक लागली आहे.आमची खाण्यापिण्याची व्यवस्था तुम्ही केलीच पाहिजे ". आता मायाने त्यांना पेचात टाकलं. आता रिसॉर्ट एका दिशेला,खुर्सापार गेट वेगळ्या दिशेला,वेळेची ओढाताण चाललेली आणि पोटात कोकलणारे कावळे.सगळीच अटीतटीची परिस्थिती. 
        पण  माया मागे हटायला तयार नव्हती.(तशी ती कधीच हटत नाही)."काहीही करा पण आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था खुर्सापार गेट जवळ झालीच पाहिजे".मायाने अल्टिमेटम दिला. .
         आता तीन वाजले होते.पेंच आवाक्यात आलं होतं.आमच्या सारथ्याने गुगल मॅप लावला होता. त्यानुसार खुर्सापार साठी डावीकडे वळायचं होतं.पण कुणीतरी कुणालातरी फोनवर पत्ता विचारला.(काही गरज होती? पण बायकाच त्या.आगाऊनेस कणाकणात भरलेला- - - मी नाही हो त्यातली) डावीकडे न वळता खवासा पर्यंत सरळ जायचं आणि टोल आला की डावीकडे वळायचं.....असं त्या 'फोनवरच्या 'तज्ञाने' सांगितलं. आता 'पेचात पडणं' हेच अटळ प्रारब्ध असल्यानं आम्ही खवासाच्या दिशेने भरधाव निघालो. मागची गाडी शहाण्या सारखी आधीच डावीकडे वळली. टोल आल्यावर आम्ही डावीकडे वळून थांबलो.तिथे कसल्याच खाणाखुणा नव्हत्या. परत त्याच तज्ञाला फोन केला तेव्हा त्याने दुसऱ्याच गेट चा पत्ता सांगितल्याचं लक्षात आलं. 'खुर्सापार गेट साठी तुम्ही खूप समोर आलात.तुम्हाला परत वापस जावं लागेल'..असा मौल्यवान सल्ला त्याने दिला.               आता 'खाऊ की गिळू ' असं तीव्रतेने वाटलं पण शेवटी मूग गिळून गप्प बसलो आणि गाडीने यू टर्न घेतला. दुसरी गाडी व्यवस्थित पोचली होती आणि आमच्या नावानं ठणाणा सुरू होता.यू टर्न घेतल्यामुळे आता आम्हाला खुर्सापार साठी उजवीकडे वळावं लागणार होतं. रोड डिव्हायडर लांबवर सलग असल्याने उजवीकडे वळताच येत नव्हतं. आमचं खुर्सापारचं वळण आम्हाला दिसत होतं पण वळता येत नव्हतं. खूप समोर जाऊन यू टर्न घेतला आणि डावीकडे एकदाचे वळलो. 
      थोड्या अंतरावरच खुर्सापार गेट होतं.तिथे दोन जिप्सी आमची वाट बघत होत्या.बरोबर साडेतीन वाजले होते. आमच्या गाडीतलं सामान प्रविणच्या गाडीत ठेवून तात्पुरती सोय केलेली गाडी नागपूरला रवाना झाली.शुभम नागपूरलाच थांबून गाडी दुरुस्त करणार होता. 
       सफारी साठी खास आटापिटा करुन ठरवलेल्या ड्रेसकोडचं नशीबच फुटकं.आहे त्या अवतारातच जिप्सीत बसलो कारण जिप्सी ड्रायव्हर घाई करत होते.आधार कार्ड तपासत असताना अलकाच्या नावावर सीमा ला दाखवायचा जुगाडही आम्ही घाईघाईत यशस्वी केला.          ‌    ‌आता त्या सुबोधची उलटतपासणी सुरू झाली.आमच्या नाश्ता जेवणाबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती.पुन्हा फोनाफोनी,चीडचीड ,वैताग आणि शेवटी खिदळणं..... यांचं आवर्तन झालं.आता ठरवलं, खाण्याचा नाद सोडायचा आणि सफारीला सुरूवात करायची.
आता जिप्सी जंगलात शिरु लागली लागली. जंगलातील शांतता, मधूनच येणारे पक्षांचे आवाज, पळत जाणारा हरिणांचा कळप... यांचं मनावर हळूहळू गारुड होऊ लागलं. सकाळपासून पाठीमागे लागलेला वैताग अलगद बाजूला सरु लागला. जंगलाचा रंग,गंध, शांतता शरीरात अलवारपणे झिरपू लागली आणि भूकेचाही विसर पडला. तेवढ्यात फोन आला.खुर्सापार गेटजवळ रिसॉर्ट कडून आमचं जेवण आलं होतं. ( जय हो मायादेवी) आता गेट पर्यंत वापस जाणं आणि जिप्सी तून जेवण घेऊन येणं भाग होतं. मागे असणारी जिप्सी वापस जाऊन जेवण घेऊन आली. 
 ‌‌     जंगल दाट होत चाललं होतं आणि एका पिसारा फुलवलेल्या मोरानं दर्शन दिलं.माकडं तर जशी आमच्या सोबतीलाच होती.मोठ्या शिंगाचं सांबर ऐटीत फिरताना दिसलं. आता सगळ्याच जणी निःशब्द आणि अंतर्मुख झाल्या होत्या. या जंगलाची मूक भाषा समजून घेताआली असती तर???? जंगल सफारी म्हणजे काय फक्त वाघ बघणं असतं? जंगलातील प्रत्येक जीवाकडे एक जबाबदारी असते...अगदी मुंगीची सुद्धा.आणि प्रत्येक जीव न चुकता आपलं नियत कार्य पार पाडत असतो.जंगलातली शिस्त,नियम आणि त्यातलं सातत्य हे अचंबित करणारं आहे - जे माणसाला आपल्या क्षुद्रतेची जाणिव करुन देतं. जंगलाच्या मौनाची आणि आवाजाची भाषा समजून घेणं म्हणजे स्वतःला आतून विकसित करणं ..नाही का?
         जंगलातील कॅम्प चं ठिकाण आलं.आम्ही सगळे उतरलो. जिप्सीत ठेवलेल्या अन्नाच्या गंधानं जंगलात रमलेलं मन क्षणात पोटात शिरलं. पद्धतशीर पॅक केलेल्या रुचकर जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊन थोडावेळ फोटो सेशन केलं, पाळण्यावर झोके घेतले आणि परत जिप्सीत बसलो.आता सूर्य कलल्यामुळे संधीप्रकाशातलं जंगल गूढ वाटायला लागलं. 
      ‌तेवढ्यात आमच्या गाईडला पक्षांचे सिग्नल कॉल्स ऐकू आले.आम्हाला सूचना देऊन त्यानं कमालीच्या वेगाने जिप्सी दामटली.पुढे बघतो तर काय,पाच सहा जिप्सीज उभ्या होत्या.त्यातील सगळे स्तब्ध आणि निःशब्द पणे उभे होते.समोरच ' तो' होता.होय.चित्ता. निवांत बसला होता. कितीतरी वेळ अनिमिष नेत्रांनी हे दृश्य आम्ही बघत होतो.तितक्यात एक चित्त्याचं लहानसं पिल्लू पण दिसलं.हा दुर्मिळ अनुभव डोळ्यात साठवत असताना गाईडनं भानावर आणलं आणि वापस निघायची सूचना दिली. जंगल आणि प्राणी यामुळेच निसर्गाचा समतोल साधला जातो.असं असताना आपण कधीतरी येऊन फक्त ' एन्जॉय ' करायचं या विचारानं आपल्या कोतेपणाची जाणिव आणखी गडद झाली. 
       आता आम्ही जंगलाबाहेर पडलो.दोन्ही जिप्सी आम्हाला रिसॉर्टवर सोडणार हे ठरलं होतं - - -अर्थातच बुकींग करते वेळी.. अंधार पडायला लागला होता.खुर्सापार गेट जवळ ची वर्दळही रोडावली होती.आता आमच्या जिप्सी ड्रायव्हरने आम्हाला 'पेचात ' टाकलं. म्हणाला,'
   मैं आपको छोड दूंगा.एक जिप्सी का एक हजार चार्ज.'- कारण उशीर झालाय. म्हणजे आता परत दोन हजार द्यायचे? 
    परत फोनाफोनी आणि संतापाचं आवर्तन. त्या अवधीत दोन्ही जिप्सी निघून गेल्या.आता तिथे अंधार, आम्ही अकरा जणी आणि एखाद दुसरा फॉरेस्टचा कर्मचारी. शेवटी आमची गाडी होतीच .ती घेऊन प्रविण अर्ध्या जणींना सोडेल आणि परत दुसऱ्या ट्रिप ने उरलेल्यांना घेऊन येईल असा तोडगा काढला. 
    आम्ही पाच जणी गाडीत कशा बसलो असू??? ...ज्या गाडीत अकरा जणींचं सामान खच्चून भरलं होतं!!! या परिस्थितीत ही हास्याचे फवारे सतत उडत होते. 
     रिसॉर्टचा रस्ता स्थानिक लोकांना विचारत निघालो कारण नेटवर्क व्यवस्थित नव्हतं. तो रस्ता नसून पायवाट होती हे लगेच लक्षात आलं कारण अंधार,खड्डे,वळणं,चढाव... याशिवाय काहीच नव्हतं. निर्जन जागा असल्याने कुणाला विचारताही येत नव्हतं. आता मात्र प्रविणचीही सहनशक्ती संपली.तो चिडून म्हणाला, 
 ' बाकीच्यांना मी आणायला जाणार नाही.तुम्ही तुमची सोय करा.मी परत या रस्त्याने येणार नाही.' 
   पेंच आणि पेच यांची जोडी काही तुटायला तयार नव्हती. कोणत्या मुहूर्तावर ही ट्रिप ठरवली, असं वाटायला लागलं. तिकडे आमच्या सहा मैत्रिणी अंधारात तिष्ठत उभ्या होत्या, त्यांची काळजी वाटत होती. मग ज्योती आणि मायाने भात्यातील अस्त्रं बाहेर काढली. ज्योतीने तिच्या खास 'सौजन्यपूर्ण भाषेत' प्रविण ला असं काही समजावलं की त्याची बोलतीच बंद झाली.
  मायाच्या आर्जवास्त्राचा मारा फोनमधून रिसॉर्ट मालकावर अव्याहत सुरु होता.शेवटी आमच्या दुसऱ्या बॅचचा खुर्सापार ते रिसॉर्ट पर्यंत चा जिप्सीचा खर्च करण्याचं त्याने कबूल केलं.झालं.
  मग लगेच तिकडे मेघाला कळवलं.गेट जवळ आता एकही जिप्सी नव्हती.परत पेच. तेवढ्यात रस्त्याने जाताना एक जिप्सी उभी असलेली दिसली.गाडी थांबवून प्रविणला चौकशी करायला पाठवलं .जिप्सीवाला आमच्या मैत्रिणींना आठशे रुपयांत आणायला तयार झाला. फोन नंबर देणे,घेणे,कळवणे पार पडल्यावर आम्ही रिसॉर्ट च्या दिशेने निघालो.खरंतर सकाळपासून घडणाऱ्या पेचप्रसंगांची साखळी पहाता अनोळखी जिप्सी ला मैत्रिणींना आणायला पाठवणं हे सुरक्षित वाटत नव्हतं.पण हा धोका पत्करण्याशिवाय पर्यायच नव्हता. 
     शेवटी आमची पहिली बॅच मृगनयनी रिसॉर्टला पोचली.सकाळपासून आमची चित्तरकथा ऐकल्यामुळे आणि मेघा- मायाच्या धाकामुळे मालकांनी आमचं अगत्याने स्वागत केलं. रिसॉर्ट आणि रुम्स अतिशय मोकळ्या आणि सुंदर असल्याने सगळा थकवा पळून गेला. तेवढ्यात आमची दुसरी बॅच आल्यामुळे जीव भांड्यात पडला.सगळ्यांनी आपापल्या खोल्या ताब्यात घेतल्या आणि सुटकेचा निःश्वास टाकला. 
     आता फ्रेश होणं, कॅम्प फायर साठी आणलेले 'खास आऊटफीट' घालणं, कराओके वर उडती गाणी लावून शेकोटी भोवती नाच करणं.....अर्थात नाचण्यात प्रिया,वर्षा,सीमा, आणि वर्षा या आघाडीवर. रुचकर जेवण......हे सगळं यथासांग, बिना 'पेच ' पार पडलं.शुभम पण गाडी दुरुस्त करुन रिसॉर्ट वर पोचला.
रात्री जागून 'कॉफी विथ गप्पा' तर अविस्मरणीय होत्या. रविवारी सकाळी जंगल सफारी चा ड्रेस कोड (वाया कशाला घालवायचा?) घालून आमच्यातल्या काही अति उत्साही बायका मॉर्निंग वॉक करुन आल्या. मग तयार होऊन, नाश्ता करून, फोटोसेशन चा राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. जातांना रामटेक चा गड चढून गेलो पण रामराया आमच्यावर का रुसला ते कळलंच नाही.देवळाला पडदा लावल्यामुळे दर्शन झालंच नाही.
आता पुढचा पडाव- नागपूर - जामठा.ब्रम्हकुमारीच्या मेडिकल विंगची डॉक्टरांसाठी 'माईंड बॉडी मेडिसीन कॉन्फरन्स'. एकदम ट्रान्स्फर सीन.शांतता! गांभीर्य!! स्व चा शोध!!! 
     व्याख्यानं ऐकताना मी विचार करत होते की माझ्या या मैत्रिणींना खरंच गरज आहे या व्याख्यानांची? कालच्या प्रत्येक पेचप्रसंगाला तोंड देताना कधी धाडसी ,कधी निर्णयक्षम,कधी भांडखोर,कधी दादागिरी,कधी बिनधास्त तर नेहमीच आनंदी , खिदळणारी ,आणि कायम सकारात्मक......अशी त्यांची सगळीच रुपं मी बघितलेली.कोणत्याही प्रसंगातून न घाबरता मजेत राहून योग्य मार्ग काढण्याचं प्रात्यक्षिक तर कालच झालं होतं.            माझ्यातला भित्रा ससा जरी मन लावून व्याख्यान ऐकत होता तरी खरं बळ मिळालं ते कालच्या प्रात्यक्षिकातूनच!! 
      आणि वाघ दिसला म्हणजेच पेंच ट्रिप यशस्वी होते का? आपल्यातली वाघीण जिवंत ठेवून वेळप्रसंगी तिला बाहेर काढून लढणाऱ्या माझ्या दहा मैत्रिणींचं दर्शन हेच आमच्या पेंच ट्रिप चं यश!!!

Tuesday, November 8, 2022

खरा पुरुषोत्तम

खरा पुरुषोत्तम....
 "आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी निघाली की माझं अंतःकरण दाटून येतं. वाटतं की, आमच्या नंतर आमची पुस्तकं शेकडो मैल मिरवायची गोष्ट सोडा, पण कुणी लायब्ररीतून घरापर्यंत तरी नेईल का ? कुणा अभाग्याच्या मनात मी चार सुखाचे क्षण निर्माण करीन का ? ते मी नाही केलं तर लेखक म्हणून मी पराभूत झालो हे माझं मला कळलं पाहिजे. उद्या का होईना, शंभर वर्षांनी का होईना, मला वाचक हवा आहे"..................
              . हे पु.लं.चेच शब्द. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला अभिमानानं सांगावसं वाटतं की - "पुलं., चार क्षण तर सोडाच पण तुम्ही आमचं अख्खं आयुष्य समृद्ध केलं आहे. आमच्या मनावर नेहमीच तुमचं राज्य असणार आहे आणि तुमची पुस्तकं आम्ही फक्त वाचत नाही तर त्यांची पारायण करीत असतो".
       आज पु .लं .चा जन्मदिवस. म्हणून त्यांचं हे जाहीर स्मरण. अन्यथा त्यांना आठवायला कोणत्याही 'दिनाची' गरज नाही. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्या जगण्यात मुरलेलं आहे - नव्हे मुरुन उरलेलं आहे. पु लं. माहित नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही . पण पु लं. म्हणजे विनोदी लेखक हे समीकरण अनेकांच्या डोक्यात आहे, ते योग्य नाही. लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, गायक, दिग्दर्शक, हार्मोनियम वादक, नट, वक्ता, विचारवंत ,दाता -- - या सगळ्या भूमिका त्यांच्या विनोदा इतक्याच उत्कृष्ट आणि श्रेष्ठतम आहेत. आणि यातला कोण कोणा पेक्षा वरचढ आहे हा यक्षप्रश्न आहे.
            पु लं. चे विनोद जसे प्रसिद्ध आहेत तसेच त्यांचे विचारही प्रसिद्ध व्हावेत हे मला प्रकर्षाने वाटतं. अनेक व्याख्यानं आणि लेखांमधून त्यांनी व्यक्त केलेले विचार वाचताना त्यांना तत्त्वज्ञ म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. कुठेही तत्त्वज्ञानाचा आव न आणता, अत्यंत खेळकर आणि सहज शैलीतले त्यांचे विचार आपलं नेहमीच मार्गदर्शन करतात. "ज्यांना जीवनात खूप काही मिळालं आहे, त्यांनी, ते ज्यांना मिळालं नाही, त्यांना ते कसं मिळेल याची खंत बाळगणे म्हणजे सामाजिक बांधिलकी"- -असं केवळ म्हणून ते थांबले नाहीत तर स्वतःच्या जगण्यातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पदयात्रेत ते सामील झाले होते. बाबा आमटे यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन दरवर्षी आनंदवनात ते कुष्ठरोग्यांच्या सहवासात काही दिवस घालवत असत. "नमस्कारासाठी जुळलेल्या करांपेक्षा समाजहिताच्या कार्यासाठी एकमेकांच्या करात जुळलेले करच माणसांना अधिक समर्थ जीवनाकडे नेत असतात"-- असं म्हणणारे पुलं. अनिल अवचटांच्या मुक्तांगणात, मेधा पाटकर यांच्या बरोबर सक्रियतेने समरस होते. " मी चे 'आम्ही' मध्ये खुबीने समर्पण करण्याची जीवन कला साधण्याला महत्त्व आहे. सुसंस्कृतपणाचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे".- - अशासारखे त्यांचे असंख्य विचार वाचकांना प्रेरणा देणारे आहेत. कलेची साधना करताना अगदी सहजपणे, कुठलीही वाच्यता न करता त्यांनी 'मी' ला मिळालेले धन हे 'आम्ही'ला दान केलं. आपल्या असाधारण दातृत्वा नं अनेकांच्या जीवनातला अंधार त्यांनी उजळला आहे
           . त्यांच्या आयुष्यातल्या श्रद्धा स्थानांची ओळख वाचकांनाही व्हावी ही त्यांची आंतरिक तळमळ होती. रवींद्रनाथ टागोर ,बालगंधर्व, कुमार गंधर्व, जयप्रकाश नारायण,महात्मा गांधी अशा कितीतरी महान व्यक्तींचे चित्रण पुलंनी केलेलं आहे. त्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वातून , विविध कलाकृतींमधून, व्याख्यानांमधून, साहित्यामधून, त्यांच्या सामाजिक कार्यातून,साध्या राहणीतून, दिलखुलासपणे कौतुक करण्याच्या वृत्तीमधून पुलं मधला समृद्ध, सुसंस्कृत, असामान्य माणूस समजत जातो, भावतो, चकित करतो आणि हृदयात विराजमान होतो आणि खऱ्या अर्थानं हा "पुरुषोत्तम "आहे हे पटतं. त्यांच्या कलाकृतींवर मालिका निघाल्या, चित्रपट निघाले. प्रत्यक्ष त्यांचाही जीवनपट दोन भागात निघाला आहे. पण पुलंच्या शब्दांनी आणि एकपात्री प्रयोगांनी जी किमया केली आहे त्याची सर या मालिकांना,चित्रपटांना नाही. इथे दृक-श्राव्य माध्यमाचा दोष नाही तर विलक्षण उंची गाठलेल्या त्यांच्या शब्दसामर्थ्यापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही हेच खरं.
आज व्हॉट्स ॲप वर कोणतेही सवंग विनोद, लेख जेव्हा पुलं च्या नावावर फिरतात तेव्हा खूप वेदना होतात.त्याहीपुढे या विनोदांनााा जेव्हा 'लाईक्स' मिळतात तेव्हा संतापाने तिडीक उठते. आणि मग वाटतं , नवीन पिढीकडे 'पुलं' योग्य आणि अस्सल स्वरुपात पोचवण्याची जबाबदारी आमचीही असायला हवी. माझी समस्त तरुण पिढीला विनंती आहे की त्यांनी सुरुवातीला पुलं चं साहित्य वाचावं.एकदा का या पिढीला त्या साहित्याची गोडी लागली की ही पिढी "पुलकित" व्हायला काहीच वेळ लागणार नाही.

#पुलं
#पुलंवाढदिवस ..................................... 

Tuesday, October 11, 2022

आजच्या महानायकास ् ‌‌

 आजच्या महानायकास.......

प्रिय अमिताभ ‌........

  आज तुझा ८० वा वाढदिवस.काय बोलावं तुझ्याबद्दल? तसाही तुझा आणि 'वयाचा' काही संबंध आहे? 

आमची पिढी पंचविशीत असतांना पासूनच तू आमचा हीरो आहेस.

आज मी साठीत पदार्पण केलंय.

तुझे फोटो भिंतीवर लावणं,

तुझ्या सिनेमाच्या तिकीटासाठी तासनतास लाईनीत उभं राहणं,

तुझ्या सिनेमाची पारायणं (की आवर्तनं?) करणं,

तुझे डायलॉग्ज तोंडपाठ करणं,

तुझ्या अभिनयावर शंका घेणार्यांशी रक्त आटेपर्यंत वाद घालणं,

तुझ्या आजारपणात डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करणं.........हे सगळं आम्ही त्या वयात केलंय.

आता मात्र या कलाकारा पलिकडचा तू जास्त समजू लागला आहेस आणि अधिक भावू लागला आहेस.

केबीसी करताना समोरच्या स्पर्धकाचं बोलणं तू ज्या पद्धतीनं ऐकतोस ना, तिथेच तू जिंकतोस.हा अभिनय नाही हे सांगण्यासाठी तुझी नजर आणि तुझी देहबोली पुरेशी आहे.त्यावेळेस तुझ्या नजरेत काय नसतं? समोरच्या व्यक्तीबद्दल सन्मान, आत्मीयता, कौतुक, सुसंस्कृता, मिष्किलता आणि विलक्षण माणुसकी. तुझं आख्खं व्यक्तिमत्व तुझ्या डोळ्यात प्रतिबिंबित होत राहतं आणि आम्ही परत परत  अमिताभ नावाच्या,कमालीची उंची गाठलेल्या माणसाच्या प्रेमात पडत जातो.

तुझी ऊर्जा,तुझी सकारात्मकता, तुझं कामाप्रती समर्पण,तुझं सामाजिक भान हे सगळं अचंबित करणारं आहे आणि त्यामुळे तुझ्या अभिनयाला एक लखलखीत धार येऊ लागलीय.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व कोण? अर्थातच पुलं.

याच चालीवर भारताचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अमिताभ बच्चन- - -तुझंच नाव घ्यावंसं वाटतं.तुम्ही दोघंही असामान्य आणि एकमेवाद्वितीय कलाकार आहात , त्याबरोबरच "माणूस" म्हणून तुम्ही त्याहीपेक्षा अधिक मोठे आहात.सामान्य माणसाला पुलं अगदी जवळचे वाटतात तसा तू ही हल्ली जवळचा ,आपला माणूस वाटतो.आणि म्हणूनच हे लाडकेपण निर्माण होतं.

पुलंनी ज्या कलाकृती चं कौतुक केलं ती कलाकृती हमखास अमर होत असे.तुझंही तसंच आहे.मिडास राजासारखा हात लावशील त्याचं सोनं करित असतोस.

नायिकेवर प्रेम करावं ते तूच.

व्हिलनला चारीमुंड्या चीत करावं ते तूच.

केबीसी करावं ते तूच.

हरिवंशरायांच्या कविता  म्हणाव्या त्या तूच.

गुजरात ची जाहिरात करावी ती तूच.

पिकू मधला विक्षिप्त म्हातारा रंगवावा तो तूच.

शौचालयाची मिष्कील जाहिरात करावी ती तूच.

अलाहाबादी भाषा बोलावी ती तूच.

बिकाजी नमकीन ची जाहिरात करावी ती तूच.

आणखी काय आणि किती लिहावं?

अरे काय हे?

किती राज्य करशील आमच्या मनावर?

तुला पर्यायच नाही.

तुझा आवाज, तुझी देहबोली, तुझं बोलणं , तुझं प्रतिसाद देणं,तुझं काव्य वाचन,तुझं सगळंच मापदंडाच्या फुटपट्ट्या ठरलेल्या आहेत.

तू म्हटलेले पसायदान आणि ब्रम्हपुत्रेची आरती ऐकताना अक्षरशः कानात जीव गोळा होतो.

आमची पिढी भाग्यवान की आम्ही तुझ्या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार आहोत.

एक उच्च दर्जाचा आनंद देऊन तू आमचं सांस्कृतीक जीवन समृद्ध केलं आहेस.तुला उदंड, निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!


#अमिताभबच्चनवाढदिवस

#महानायकवाढदिवस

Monday, September 5, 2022

लाभले आम्हास भाग्य..... शिक्षक असण्याचे


  


          मध्यंतरी एका व्यासंगी आणि सुप्रसिद्ध व्यक्तिचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. व्याख्यानाच्या आरंभी ते म्हणाले,  'आज मी तुमच्या समोर जो उभा आहे त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना जातं'.....आता या वाक्यात वेगळं असं काहीच नाही. सामान्यतः अनेक विद्वान कर्तृत्ववान व्यक्तींच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतोच. पण खरी मेख पुढेच आहे. वरचं विधान करून दोन क्षण वक्‍त्यांनी विराम घेतला आणि म्हणाले, 'मी त्या शिक्षकांना माझ्या यशाचं श्रेय देतो... ज्यांनी मला कधीच शिकवलं नाही. ज्यामुळे मी स्वतः अध्ययन करण्यास प्रवृत्त झालो'.

          आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला हा प्रसंग आठवला. मी स्वतः एक शिक्षक असल्याने वरिल विधानाचा सगळ्या बाजूंनी सांगोपांग विचार केला. खरंतर प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण करावे असे हे विधान आहे. एक सुसंस्कारित, सुशिक्षित, संवेदनशील नागरिक घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता आपल्यात आहे का? हे आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने अवश्य करायला हवे.

           पण हल्लीच्या 'स्मार्ट' शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही 'स्मार्ट' असल्याने हे आत्मपरीक्षणही स्मार्ट नाही झालं तरच नवल. हे कसे काय??? प्रश्न पडला असेल ना? सोप्पंय. 'ओटीडी' द्वारे हो .आम्हा महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रत्येकाचा एक 'ऑनलाइन टीचर डाटाबेस' असतो. त्यात आपली इत्यंभूत कुंडली मांडलेली असते. वेळोवेळी आपण केलेले उपक्रम - उदा. लेखन, व्याख्यान, प्रकल्प इत्यादी त्यात 'अपलोडायचे'  असतात. जितके जास्त अपलोड तितका शिक्षक भारी. 'ओटीडी' हा शिक्षकाचा आत्माच की हो...'स्मार्ट' आत्मा बरं का.

           खरंच डिजिटल युगाने, वेगवान काळाने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. मग शैक्षणिक क्षेत्र त्याला अपवाद कसे राहणार? शिक्षक केंद्रित शिक्षण आता जुने झाले आहे. त्याऐवजी विद्यार्थी केंद्रित शिक्षण हे योग्य मानले जाते. त्याही पुढे जाऊन आजचे शिक्षण हे परीक्षा केंद्रित शिक्षण आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रचंड संख्येत वाढलेल्या खाजगी शाळा - महाविद्यालये, मोठ मोठ्या शिक्षणसंस्था, संस्था पूरक ध्येयधोरणे, बदललेली शिक्षण पद्धती, शाळांचे कॉर्पोरेट स्कूल आणि पब्लिक स्कूल मध्ये झालेले रूपांतर, सतत चालणाऱ्या परीक्षा, वारेमाप शिक्षणशुल्क, शिकवण्या  व्यतिरिक्त राबवले जाणारे असंख्य उपक्रम...... या सगळ्यांमुळे आजचा शिक्षक हा ओझे वाहणारा भारवाही झालेला आहे. त्याच्यातला खरा प्रामाणिक शिक्षक अर्धमेला होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक विद्यार्थी हे नाते कोरडे आणि रुक्ष होत चालले आहे. शालेय शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात तुलनेने आपुलकी आणि जिव्हाळा आजही टिकून आहे. पण  कोरोनाच्या धुमाकूळामुळे ऑनलाइन शिक्षणाचा शाळेत प्रवेश झाला आणि नात्यातली ही ओलही आता आटते की काय अशी भीती वाटतेय. 'गुगल' सरांनी शालेय शिक्षणातही चंचुप्रवेश केलाय.  महाविद्यालयीन विद्यार्थी तर 'गुगल विद्यापीठच' खिशात घेऊन फिरत असतात. त्यांना शिक्षकाची गरजच नसते. महाविद्यालयीन शिक्षक तर बरेचदा -'उरलो सह्या पुरता' अशा स्थितीत असतात.पूर्वीसारखे शिक्षक आणि पूर्वीसारखे विद्यार्थी आता राहिलेच नाही अशी ओरड हल्ली नेहमीच होत असते.    

            ही वस्तुस्थिती खरी असली तरी सगळेच चित्र नकारात्मक नक्कीच नाही. आजही असंख्य हाडाचे शिक्षक आपलं विद्यादानाचे कार्य तळमळीने करत आहेत. आणि असंख्य विद्यार्थी आयुष्यभर अशा शिक्षकांच्या ऋणात राहत आहेत. शिकवण्याच्या, शिकण्याच्या पद्धती बदलल्या, तंत्र बदलले तरीही शिक्षकाची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. शिक्षण ही एक चैतन्य पूर्ण अशी  सजीवां कडून सजीवांवर घडून येणारी विकासाची प्रक्रिया आहे. तत्व, पद्धती, तंत्र, साधन, साहित्य, पुस्तके या सगळ्या निर्जीवच  गोष्टी. शिक्षक आपल्या स्पर्शाने त्यात चैतन्य निर्माण करीत असतो. त्यामुळे शिक्षकाचे स्थान नेहमीच अनन्यसाधारण होते आणि राहील.

          "The art of giving shape to human powers and  adapting them to social service is the  supreme art of education "  असे प्रख्यात शिक्षण तज्ञ 'जॉन ड्युई' ने म्हटले आहे. मानवी शक्तींना वळण लावून त्यांना समाज कार्यासाठी सक्षम करणे हे शिक्षणाचे सर्वोच्च उद्दिष्ट लक्षात घेण्याची गरज आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने नव्याने समजून घ्यायला हवी.फक्त अभ्यासक्रमाला बांधून न घेता,चौकटीबाहेरच्या शिक्षणालाही अंतर्भूत केले पाहिजे. कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षकाने सकारात्मक राहून, "Successful teaching is a teaching that brings  about effective learning"  या 'मर्सेल' च्या व्याख्येवर विश्वास ठेवून शिक्षक असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे.

         शिक्षक हा राष्ट्रपती पेक्षाही मोठा असतो याचे भान दिले ते 'सर्वपल्ली राधाकृष्णन' यांनी .उत्कृष्ट अध्यापन, इंग्रजी वरील असाधारण प्रभुत्व, अलौकिक वक्तृत्व, तत्त्वज्ञानाचा प्रगाढ व्यासंग असणाऱ्या डॉ.

 राधाकृष्णन यांनी अध्यापनाचा आरंभ मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेज पासून केला. त्या नंतर म्हैसूर, कलकत्ता येथेही त्यांनी विद्यादानाचे कार्य केले. आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू ते १९३१ते १९३५  पर्यंत होते. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात 'स्पाॅडलिंग प्रोफेसर' या पदावर त्यांची नियुक्ती झाली. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होत. १९३८ ते १९४७ पर्यंत त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारून या विद्यापीठाला उंचीवर नेऊन ठेवले. डॉ. राधाकृष्णन हे नुसतेच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते तर श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते. त्यांची मर्मदृष्टी व त्यांचे मूलग्राही चिंतन त्यांच्या विविध देशांमधल्या व्याख्यानांमधून आणि ग्रंथसंपदेमधून निर्विवाद सिद्ध झाले आहे.

 "मी परदेशात शिकायला जाणार नाही तर शिकवायला जाईन"... हे विद्यार्थी दशेतील त्यांचे उद्गार त्यांनी सिद्ध केले. १९४९ साली ते रशियात राजदूत म्हणून गेले. १९५२ सालापासून दहा वर्षे ते उपराष्ट्रपती होते. १९६२ साली ते राष्ट्रपती पदावर आरूढ झाले. राष्ट्रपती झाल्यावर आपला जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून मानला जावा अशी त्यांनी राष्ट्राला सूचना केली. अत्युच्च पदावर असतानाही स्वतःमधल्या शिक्षकाचे विस्मरण त्यांना झाले नाही. चाळीस वर्षे 'शिक्षक' म्हणून आपण केलेले कार्य सर्वात श्रेष्ठ व मौलिक आहे अशी त्यांची धारणा होती .'पाच सप्टेंबर रोजी माझे गुणगान न करता शिक्षकांचा सन्मान करा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा'..... असा संदेश देऊन त्यांनी शिक्षक व शिक्षण व्यवसाय यांना उदात्त ,श्रेष्ठ पातळीवर नेऊन बसविले.

            आज अनेकदा माझ्यातल्या शिक्षकाचे खच्चीकरण होईल असे बरेच प्रसंग येतात.शिकवणं निरर्थक वाटू लागतं.पण अशावेळेस मला माझ्या शाळेतल्या मराठे बाई आठवतात. कॉलेजमधले जोशी सर आठवतात. शिकवतानाची त्यांची तळमळ आताही तीव्रतेने जाणवते. मनातले वैफल्य, उदासीनता नष्ट करण्याची शक्ती त्यांनी केलेल्या संस्कारात आहे याची प्रचिती येते. अगदी पुलंचे चितळे मास्तर ही येतात मदतीला....

 "पहिली, दुसरीच्या वर्गा बाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणत आहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती,  'आय?'  'गो'.  'यू ?'  'गो'. 'वुई?' 'गो'.

 ' ही?'  'गोऽऽऽज' !!.... ची चाल आठवते. मास्तर इंग्रजी साभिनय शिकवायचे. तुरूतुरू चालत , 'आय अ‍ॅम??'..की

 पोरे 'वॉऽऽकिंग'.. म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून, डोळे मिटून पडत आणि म्हणत , 'आय अ‍ॅम??'... 'स्लीऽऽपिंग'... अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून,  'गाढवांनो, माझी झोप मोडलीत ?' म्हणत."

        आजही अनेक शाळांमध्ये असे अनेक चितळे मास्तर आहेत जे जीव तोडून शिकवत आहेत आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या ह्रदयात जिवंत आहेत,आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याने कायम बांधले आहेत.  

      श्रेष्ठ   शिक्षणतज्ञ 'प्लेटो' म्हणतात, " If you ask me what is education,  the answer is easy, that which makes good  men and good men act nobly".

          या महान शिक्षणतज्ञांचा  शिक्षणाविषयीचा व्यापक दृष्टिकोन आज आपल्याला स्वतःमध्ये रुजवायचा आहे.   मी शिक्षक आहे. परीक्षेच्या पलीकडे, अभ्यासक्रमाच्या पलीकडे, पुस्तकांच्या, तंत्रांच्या 

पलीकडे माझ्याजवळ बरंच काही आहे, जे मी माझ्या विद्यार्थ्यांना, प्लेटोच्या व्याख्येनुसार देऊ शकते..... हा आत्मविश्वास आजच्या दिवशी आपण समस्त शिक्षकांनी मनात रुजवू या आणि हा पवित्र व्यवसाय करण्याची जी संधी मिळाली आहे,त्याचे सोने करु या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

डॉ.साधना आशुतोष कुळकर्णी

अकोला

९४२२९३९५१०

Sunday, July 10, 2022

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील......एकदम ओक्केमध्ये

 


          या वर्षीच्या आषाढी एकादशी ची बातच निराळी आहे. तब्बल  दोन वर्ष वारी शिवाय काढताना विठुराया सुद्धा कासावीस झाला असेल. वारकऱ्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. पुढे पडणाऱ्या एकेका पावलागणिक त्यांची ऊर्जा वृद्धिंगत होत असते. आपल्या लाडक्या दैवताचे दर्शन घेताना 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी त्यांची अवस्था घरात बसूनही आपल्याला समजू शकते. वारकऱ्यांची अपार श्रद्धा, निर्मळ आणि निरपेक्ष भक्ती, त्यांचं समर्पण, विठ्ठलाच्या भेटीचा ध्यास, त्यांचा विश्वास-हे सारं काही दरवर्षीच्या आषाढी वारीला तेवढ्याच तीव्रतेने  आपल्या ही हृदयाला भिडतं. हेवा वाटतो त्यांचा. त्यांच्या धमन्यांमधून  रक्ताबरोबर वाहणाऱ्या परमानंदाचा अनुभव आपल्याला घेता येईल कधी ? त्यांच्यातल्या चैतन्याचा, टिकून राहणाऱ्या ऊर्जेचा ओझरता तरी स्पर्श आपल्याला होईल? हे प्रश्न दरवर्षी वारी सुरू झाली की छळतातच. घरबसल्या वारीचे दृश्यं बघताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडणाऱ्या समाधानाचा, निर्लेप सात्विक आनंदाचा अनुभव आपल्यालाही श्रीमंत करतो. वारीच्या या आनंद सोहळ्याचे आपण दुरून का होईना पण साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो मग .आणि यावर्षी तर विचारूच नका. दोन वर्ष मनात दाबून ठेवलेली तळमळ ,असोशी, तो ध्यास.. सारं काही पावलांमध्ये एकवटून चालणारे वारकरी बघून आनंदाचा काटाच येतो अंगावर. गळ्यात टाळ घालून ,भान हरपून मृदंगाच्या तालावर थिरकणारी पावलं बघतांना घशात आवंढा दाटून येतो. डोळ्याच्या कडा पाणावतात. वारीतल्या परमानंदाची मग आपल्यालाही होते लागण.

       अशाच भक्तिमय आनंदात अख्खा महाराष्ट्र डुलत असताना अचानक एक नवीनच आनंदाचं सूत्र धाडकन अंगावर आदळलं......'काय झाडी, काय डोंगार ,काय  हाटील,.... एकदम ओक्के मध्ये'. 'ग्यानबा तुकाराम,ग्यानबा तुकाराम' म्हणता म्हणता महाराष्ट्रातली सामान्य जनता चक्क -'काय झाडी, काय डोंगार........' चा जप करू लागली .अरेच्चा!!!कसलं भारी सूत्र आहे राव. लईच 'क्लिक' झालं. बघा ना. महाराष्ट्राच्या राजकारणात 'भूकंप' होऊ घातला होता. सरकारचं आसन डळमळीत होऊ लागलं होतं .असंतुष्टांची 'वारी'  पार गुवाहाटी ला पोचली होती .इकडे भक्तमंडळी कासावीस. लांबलेला पाऊस, हिंसाचार, महागाई, आणि पुन्हा दार ठोठावणारा  कोरोना ...हे सारं कमी होतं की काय ,तर हा राजकारणातला 'भूकंप '...

अशा कठीण समयी गुवाहाटी च्या दिशेने डोळे लावून बसलेल्या भक्तांना काय मंत्र मिळाला? तर- -' काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...एकदम ओक्के मध्ये'. कुठल्याही जबाबदारीच्या, बांधिलकीच्या,अडचणीच्या गुंत्यात अडकून न पडता, अलगदपणे बाहेर पडून स्वतःची सोय आणि चैन कशी शाबूत ठेवायची, ही आनंदाची गुरुकिल्लीच मिळाली जणू आम्हाला. आणि आम्ही 'एकदम ओक्के' मध्येच गेलो. बघता बघता वारकऱ्यांचा आनंदाचा हेवा वाटेनासाच झाला की हो.

       वारकऱ्यांचं सोडा हो. त्यांची वर्षातून एकदाच वारी असते .पण आपले लोकप्रतिनिधी- - ते तर हाडाचे वारकरी. अध्यात्म धमन्यांमधून वाहतंय हो त्यांच्या. सत्तेच्या देवाची हाक आली की सगळं सोडून धावणार देवापाशी. निष्ठा, तत्त्व, मूल्य, सत्य, सेवा, विवेक या षडरिपूंना सहजतेनं झटकून टाकणारी ही जात. काहीही म्हणा,पण महाराष्ट्रातील जनता भाग्यवान खरीच. यावर्षी एकाच वेळी दोन दोन वार्‍यांचा अनुभव आला की हो. लोकप्रतिनिधींच्या वारीमुळे तर झोपच उडाली आमची .आज काय १५, उद्या काय २०, परवा काय ३५..... अशी आकडेमोड ऐकून ऐकून मेंदूचा पार भुगा झाला. त्यात पंढरपूरच्या वारीचा विसरच पडला हो .आणि मग एकाएकी आनंदाचा मंत्रच हाती आला, 'काय झाडी, काय डोंगार .....'

       देशात, राज्यात काहीही होवो लोकप्रतिनिधी मात्र कायम 'ओक्के' मध्ये .जनतेच्या समस्या, जनतेची दुःखं, जनतेची हतबलता, काहीही अंगाला लावून न घेणाऱ्या या 'ओक्के' मध्ये असणाऱ्या निर्लेप, निस्संग महारथींची वृत्ती तर हेवा करण्यासारखीच. यांच्या धमन्यांमधून कोणतं रसायन वाहतंय,हे त्यांच्या तथाकथित 'देवालाच' ठाऊक. पण काहीही असो, या वारीतल्या वारकऱ्यांनाही त्यांचा 'विठ्ठल' भेटलाच आणि तो सुद्धा पायी चालत जाऊन नाही तर ,'काय झाडी, काय डोंगार ,काय हाटील.... एकदम ओक्केमध्ये' असतानाच भेटला. शेवटी जिवाशिवाची भेट झाली आणि वारी एकदाची सुफळ संपूर्ण झाली.

         यातला विनोदाचा आणि उपहासाचा भाग सोडला, तर सर्वसामान्य जनता सुद्धा हल्ली 'ओक्के' मध्येच असते.सुजलेला चंगळवाद आणि समाज माध्यमांवरील वाढत जाणारं अवलंबित्व यामुळे भल्याभल्यांचा सारासार विवेक पार तळाशी जाऊ लागला आहे. परिणामी, आभासी आनंदालाच  खरं समजून या खोट्या विश्वात माणूस रममाण होत चाललाय आणि 'एकदम ओक्के' मध्ये असल्याचा समजतोय. हल्ली आनंद हा मनात नसतो तर तो दाखवून सिद्ध करावा लागतो. समाज माध्यमांवर ही आनंदाची दिवली सतत तेवत ठेवण्यासाठी मग आम्ही वाहवत जातो. व्हाॅट्सअप वर, फेसबुक वर, इंस्टाग्राम वर ,ट्विटर वर वाढदिवसाचे, सहलीचे ,लग्नाचे, मुंजीचे, केळवणाचे, मेंदीचे, हळदीचे, बारशाचे, पाल्याच्या गुणपत्रिकेचे ......आणि कशाकशाचे शेकडोंनी फोटो टाकून आम्ही आनंदात आहोत, 'एकदम ओक्केमध्ये' आहोत हे दाखवण्याची मग अहमहमिकाच सुरू होते.

              कोरोना च्या पहिल्या आणि दुसर्‍या जीवघेण्या लाटेचा नुकताच भीषण अनुभव असूनही आम्ही त्यातून काहीही धडा घेतलेला नाही. त्यावेळी पाळलेले नियम, त्यावेळी 'साधी राहणी, उच्च विचारसरणी'.. यांचा झालेला साक्षात्कार, त्यावेळी स्वतः मध्ये केलेले बदल..... हे सगळं स्मशानवैराग्य होतं असं आता लक्षात येतंय .आता कोरोना परत उंबरठ्यावर उभा आहे. त्याला पुरेपुर ठेचल्याच्या भ्रमात आणि उन्मादात आम्ही जीवाची चंगळ करायला ऊर फोडून धावतोय, उतावीळ झालोय. कोरोनानं  दिलेल्या भयंकर धक्कयाचा आम्हाला पार विसर पडला आहे.

          म्हणूनच 'काय झाडी, काय डोंगार .......'या वाक्याची जरी खूप खिल्ली उडवली गेली, तरी ते वाक्य आजच्या काळाचं प्रातिनिधीक वाक्य आहे -- लोकप्रतिनिधींसाठी ही आणि सामान्य जनतेसाठी ही-- हे  दुर्दैवानं अधोरेखित करावंसं वाटतं. मूळ समस्या, मूळ प्रश्नांना बगल देत केवळ चंगळवादाच्या भरवशावर आम्ही 'एकदम ओक्के' मध्ये आहोत, ही  स्वतःची फसवणूक नाही तर दुसरं काय?? खरे कर्मयोगी, सच्चे समाजसेवक, शास्त्रज्ञ, सीमेवरील सैनिक आणि प्रत्येकच क्षेत्रातील कितीतरी विद्वान, नामवंत मंडळी -आज प्रसिद्धीपासून दूर राहून, निष्ठेनं आपलं कार्य करित आहेत. ही मंडळी समाज माध्यमांवर कधीही झळकत नाहीत. त्यांचं कार्य हीच त्यांची ओळख असते. उलटपक्षी,

 'काय झाडी ,काय डोंगार .......' असं म्हणणारे लोकप्रतिनिधी मात्र २४ तास डोळ्यासमोर असतात 'कालाय तस्मै नमः' दुसरं काय??

         आज आषाढी एकादशी आहे .आम्ही एसीत बसून, मोबाईल मध्ये चॅटिंग करत,विठ्ठलाचे फोटो टाकत,उपवास 'साजरा' करतोय. खरंतर आमचं शिक्षण, आमची विद्वत्ता,आमचा दर्जा, आमची संपत्ती ,आमच्या सुखसोयी,आमची जीवनशैली... हे सगळं

 त्या वारकऱ्यांच्या पायपीटी समोर मातीमोल आहे. वारीत जाणारा, डोक्यावर गाठोडं 

 घेतलेला वारकरी हा 'माणूस' नाही तर ती एक 'वृत्ती' आहे - - भक्ती आणि श्रद्धेनं ओथंबलेली, भ्रामक सुखांची पुटं गळून पडलेली, विश्वास आणि जिद्दीच्या भरोशावर पुढे जाणारी. लाखो-करोडो वारकरी ही 'संख्या' नाही तर तो - 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस' या उन्नत भावनेचा सागर आहे.

जगण्याची उंची वाढवणार्‍या वारकरी पंथाची परंपरा अभिमानानं मिरवणारे आपण-  काय करायचं,हे आता ठरवायची वेळ आलीय - 'काय झाडी, काय डोंगार ......'म्हणून 'एकदम ओक्के' मध्ये राहायचं की 'तीर्थ विठ्ठल ,क्षेत्र विठ्ठल' म्हणून सच्च्या वारकर्‍याची वृत्ती अंगात रुजवायची?? हे ठरविण्याची बुद्धी आपण आज विठूरायाकडेच मागू या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


#कायझाडीकायडोंगार

#एकदमओक्केमधे


Friday, May 27, 2022

निमाचा सुवर्णमयी इतिहास, भाग १ला.


 एन आय एम ए- एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा

=================

एन आय एम ए चा अमृत महोत्सव नुकताच सुरू झालाय. 75 वर्ष झालीत .शून्यातून निर्माण झालेल्या या संघटनेची ओंजळ आज पूर्णपणे भरलेली आहे .पण 75 वर्षांपूर्वी, रित्या ओंजळी पासून  सुरू झालेला हा प्रवास आज पर्यंत कसा घडला असेल?

 ही संघटना सुरू करण्याची गरज केव्हा आणि कशासाठी भासली असेल? संघटनेचा प्रवास हा खाच खळग्यातून एका पाऊल वाटेपर्यंत... 

पाउलवाटेपासून एका सडके पर्यंत.... 

सडके पासून एका रस्त्यापर्यंत....  

रस्त्यापासून एका महामार्गा पर्यंत .....

आणि महामार्गापासून एक्स्प्रेस हायवेच्या दिशेने जाणारा हा प्रवास कसाअसेल?

 संपूर्ण भारतात या संघटनेचा प्रसार कसा झाला असेल?

     आज हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना दूरदृष्टी ठेवून कार्यक्रमाचं आयोजन करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच इतिहासात डोकावून बघणं,सुद्धा आवश्यक आहे. आज समस्त निमाच्या सदस्यांना निमा चा इतिहास, त्यावेळचा संघर्ष, त्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करणारे निमाचे पदाधिकारी, यांच्याबद्दल  माहिती  देणं... हा सुद्धा अमृत महोत्सवाचा एक अपरिहार्य भाग आहे.इतिहास हा नेहमीच मार्गदर्शन करित असतो. विशेषतः आजच्या तरुण निमा कार्यकर्त्यांना संघटनेच्या इतिहासाची जाणीव असणं फार गरजेचं आहे.

             चला तर मग......

 जाणून घेऊया संघटनेचा हा प्रवास. कधी उत्कंठापूर्ण ...कधी मनोरंजक... कधी व्यथित करणारा... कधी निराश करणारा.... पण नेहमीच प्रेरणा देणारा.......!

 चाळूया संघटनेच्या इतिहासाची पाने....... दर पंधरा दिवसांनी. 

 

एन आय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा ....

. भाग २

===================

        प्रत्येक देशाची काही ना काही वैशिष्ट्ये असतात .आपला देश ही अनेक समृद्ध अशा परंपरांमुळे विश्वात ओळखला जातो. त्यापैकी एक परंपरा म्हणजे 'वैद्यकशास्त्र'- अर्थातच 'आयुर्वेद'. सुमारे चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचं हे शास्त्र आजही समाजाला निरोगी ठेवण्यात अग्रेसर आहे. असं म्हणतात, की काळाच्या ओघात जे टिकून राहतं तेच सत्य होय. सत्याची ही व्याख्या आयुर्वेद शास्त्राला तंतोतंत लागू पडते.

 पण अशा या त्रिकालाबाधित शास्त्राचं अस्तित्व वेळोवेळी सिद्ध का करावं लागतं हा प्रश्न आजच्या पदवीधारकांना पडणं सहाजिकच आहे.

       आयुर्वेद शास्त्र भारतीय जनमानसांच्या दैनंदिन जगण्यात रुजलं आहे. परंपरा, उत्सव, सण आणि संस्कृती यातून आयुर्वेदाची तत्त्वे सहजपणे आचरणात आणली जातात. पूर्वीच्या आजीबाईच्या बटव्यापासून  तर नुकत्याच  कोविडच्या महामारीत आयुर्वेदानं कायम समाजाला आजारपणातून दिलासा दिला आहे.

         पण ............

  पण हेच शास्त्र जेव्हा पाठ्यपुस्तकात बंदिस्त झालं, विद्यापीठातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू लागलं, कायदे ,ठराव, नियम, अधिनियमाच्या चौकटीत अडकलं, विद्यार्थ्यांच्या पदवीत विराजमान झालं तेव्हा मात्र शास्त्राच्या प्रवासात खाचखळग्यांची शृंखला सुरू झाली ती आजतागायत.

      या पूर्ण इतिहासाच्या कालखंडात परिस्थिती बदलत होती, शासनकर्ते बदलत होते, शास्त्राचे पदवीधर बदलत होते,शैक्षणिक धोरणं बदलत होती पणआयुर्वेद पदवीधरांसमोरचे प्रश्न मात्र कायम होते. प्रश्नांचं स्वरूप काळानुरूप बदलत होतं पण प्रश्नांमधून आजपर्यंत सुटका झाली नाही हे मान्य करावेच लागेल. 

 1918 साली महाराष्ट्रात मुंबई,पुणे,नगर, सातारा ,नागपूर, सूरत, नदियाड याठिकाणी आयुर्वेद आणि पाश्चात्त्य वैद्यक एकत्रित शिकवणारी महाविद्यालये सुरू झालीत.

           1920 मध्ये जळगाव जिल्ह्यातील फैजपूरला काँग्रेसचे एक अधिवेशन भरले होते. त्यामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल ,महात्मा गांधी, पंडित नेहरू, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न चर्चेला आला असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक ठराव मांडला.

 "Everything good in Modern Science and Ancient Ayurved should be fused and a new course should be started suitable for the people of this country ".

      हा ठराव म्हणजे पंडित नेहरूंच्या सखोल विचारांचं आणि दूरदृष्टीचं एक उदाहरण आहे. हा ठराव सर्व संमतही झाला .1925 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात तसेच डॉक्टर अजमल अली खान यांनी युनानी- पाश्चात्त्य- आयुर्वेद एकत्रित शिकण्यासाठी अलिगड येथे महाविद्यालय सुरू केले.

 1942 मध्ये मुंबई येथे   डीएएसएफ हा कोर्स सुरू झाला. भारतात अनेक ठिकाणी संमिश्र पॅथीची महाविद्यालयै सुरू झालीत.

        1947 साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वैद्यकीय शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या. चोप्रा कमिटी, उडूपा कमिटी इत्यादींनी पाठवलेले ठराव मात्र आरोग्य समितीकडून नाकारले गेले. परंतु या कालावधीत आपल्या पदवीधारकांकडून मात्र समाजाला उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जात होती. शिक्षणातील सुसूत्रीकरण, नोकर्‍यांमधील समानता,विविध कमिट्यांनी सुचविलेले प्रस्ताव.,पदवीला राजमान्यता......याकडे मात्र शासनाचं होणारं दुर्लक्ष ही अत्यंत व्यथित करणारी बाब होती.

किती काळ हा अन्याय सहन करायचा????

किती काळ ही मुस्कटदाबी सोसायची????

आपले हक्क आणि अधिकार सहजपणे मिळत नसतील तर ते भांडून मिळवायचे असतात ही स्वातंत्र्यसैनिकांची वृत्ती आयुर्वेद पदवीधारकांमधे उपजत होतीच.

सगळ्यांनी एकत्र येऊन आपणच आपले प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न करणे ही त्या काळाची गरज होती. त्यामुळे 13 एप्रिल 1948 रोजी आंध्रप्रदेशचे डॉक्टर सूर्यनारायण राव यांच्या मार्गदर्शनाखाली सभा होऊन नॅशनल मेडिकल असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली.

आणि सुरुवात झाली एका अविरत संघर्षाची......एका अस्तित्वाच्या लढ्याची.......

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

                          ==================

 एनआय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा 

भाग ३

===================

 "नॅशनल मेडिकल असोसिएशनची" मुहूर्तमेढ 1948 साली रोवण्यात आली. आता संमिश्र चिकित्सा पद्धतीची महाविद्यालये संपूर्ण भारतात सुरू झाली होती. एकीकडे समाजाचे आरोग्य मिश्र  चिकित्सकांमुळे उत्कृष्टपणे सांभाळले जात होते तर दुसरीकडे शासनमान्यता, रजिस्ट्रेशन,पदवीधरांचे हक्क... इत्यादी कायदेशीर बाबींमध्ये  मात्र अडचणी वाढत होत्या. अशा परिस्थितीत एकत्र येऊन लढा देणं ही काळाची गरज होती आणि लढण्यासाठी संघटना आवश्यक होती. अनेक समविचारी पदवीधरांनी एकत्र येऊन आपल्यातील नेतृत्व पणाला लावले.अनेक बैठकी,अनेक चर्चांच्या मंथनातून  अखेर नॅशनल मेडिकल असोसिएशन चा पाया हा 1948 साली रचला गेला.

         दिल्ली येथे अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भरली असताना, विजयवाडा येथील डॉक्टर सूर्यनारायण राव यांना अध्यक्षपदावर तर दिल्लीचे डॉक्टर भद्रा सेन यांना सचिव पदावर नियुक्त केले केले. या संघटनेच्या बांधणीमध्ये दक्षिण भारतातील डॉक्टर वाय कुंडल राव, डॉक्टर सी द्वारकानाथ, डॉक्टर महादेव शास्त्री, पंजाबचे डॉक्टर प्यारेलाल गुप्ता, उत्तर प्रदेशचे डॉक्टर आर.डी. ग्रोवर, डॉक्टर पी एन गुप्ता, दिल्लीचे डॉक्टर पी के सेठ, मुंबईचे डॉक्टर पी एन  अवस्थी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

 या संघटनेमुळे शासन प्रणाली शी संघर्ष करण्याचा राजमार्ग आयुर्वेद स्नातकांसाठी मोकळा झाला.

             यापुढे 1950 मध्ये महाराष्ट्रात बॉम्बे मेडिकल असोसिएशन, पुना मेडिकल असोसिएशन, खानदेश मेडिकल असोसिएशन, अहमदनगर मेडिकल असोसिएशन, नाशिक मेडिकल असोसिएशन ,या संघटनांची निर्मिती झाली.

 1952 मध्ये महाराष्ट्रात जी एफ ए एम हा कोर्स सुरू झाला.

 1953 मध्ये महाराष्ट्रा बाहेर म्हैसूर मेडिकल असोसिएशन, मद्रास मेडिकल असोसिएशन, तसेच उत्तर प्रदेशात यूपी नॅशनल मेडिकल असोसिएशन, कलकत्ता येथे असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ कलकत्ता, गुजरात मेडिकल असोसिएशन अशा विविध राज्यांमध्ये संघटनेची पायाभरणी झाली.

  थोडक्यात सांगायचे झाल्यास, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय जनतेने दिलेल्या लढ्याची ठिणगी आपल्या व्यावसायिकांमधेही धगधगत होतीच. त्या ठिणगीचं रूपांतर संघटनेत झालं.

    संघटनेचं महत्त्व, संघटनेत असणारी शक्ती - या काळात प्रकर्षाने अधोरेखित झाली. आयुर्वेद शास्त्राच्या पदवी धारकांच्या उज्वल भवितव्यासाठी संघटनेची भूमिका अत्यंत मोलाची आहे- याची जाणीव सगळ्यांना झाली. .आपले विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटना रुपी हुकुमाचा एक्का अस्तित्वात 

आल्याने आपल्या स्नातकांना खूप दिलासा मिळाला.....आणि सुरुवात झाली एका संघर्षाची...

एका धडपडीची.......

आत्मसन्मान टिकवण्याची......

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


===================

🔆 *एन आय एम ए - एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा* 🔆

*भाग ४*

===================


         "There is no reason why we should not  bring out an alliance of old experience and knowledge as exemplified in the Ayurvedic and  Unani systems, with the  new  knowledge, that the  modern science has  given  us.The question is thus, not of conflict between the various  systems but of sound education in knowledge as it is today and then the freedom to  apply in accounting to  any  system. It is the scientific approach that  is important." 

हे शब्द आहेत भारताचे पहिले पंतप्रधान "पंडित जवाहरलाल नेहरू" यांचे. भारताच्या सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून  अत्यंत अमूल्य आणि मूलभूत असा विचार त्यांनी मांडलेला होता - जो त्या काळातही योग्य होता आणि आजही काळाच्या कसोटीवर तो खराच आहे. परंतु काही सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थापोटी ही सत्याची बाजू कायम झाकून ठेवण्यात राज्यकर्ते यशस्वी ठरले हे नाकारता येत नाहीच. सूर्यप्रकाशा सारखं सत्य सर्वज्ञात असलं, तरी ते पदरी पाडून घेण्यासाठी वर्षानुवर्षे लढा द्यावा लागावा...... हे दुर्दैव नाही तर दुसरं काय???

         संघर्ष तर आपल्या व्यावसायिकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. 1950 मध्ये पंजाब सरकारने आपल्या पदवीधारकांनी नावामागे डॉक्टर लिहू नये असा फतवा काढला. त्यावेळी आपल्या पदवीधारकांना अर्थातच हा अन्याय मोडून काढण्यासाठी शक्ती आणि युक्ती खर्च करावी लागली. अन्यायाला वाचा फोडण्यात यश आल्यामुळे तत्कालीन स्वास्थ्य मंत्री श्री गोपीचंद भार्गव यांनी मध्यस्थी केली व हा अपमानकारक फतवा मागे घेण्यात आला

      1959 साली  लोकसभेत ड्रग रुल्स अंतर्गत टू (ee)(iii) या कायद्याचा समावेश केला. त्यामुळे राज्य सरकार द्वारे अधिकृतरित्या आपल्या स्नातकांना आर. एम. पी. ही पदवी देण्याचा आदेश काढण्यात आला.

       महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात ही राज्ये प्रामुख्याने आपल्या स्नातकांच्या भविष्याबाबत जागरूक होती. या राज्यांमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून सतत स्नातकांच्या न्याय्य मागण्यांचा पाठपुरावा केला जात असे.

 म्हैसूर येथे "गव्हर्मेंट आयुर्वेद अँड युनानी ग्रॅज्युएट असोसिएशन"- ही डॉक्टर गुंडप्पा यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत सक्रिय अशी संघटना होती.

         1958 साली "नॅशनल मेडिकल गॅझेट" या नावाचे मुखपत्र ग्वाल्हेर येथून प्रसिद्ध होऊ लागले. डॉक्टर हणमंतराव मुजुमदार व डॉक्टर अशोक मुटरजाट यांचा त्यात पुढाकार होता.

         1960 मध्ये "इंटिग्रेटेड मेडिकल जर्नल" हे म्हैसूर येथे सुरू झाले .त्यामुळे आयुर्वेद स्नातकांच्या  वैचारिक आदान-प्रदानाला अधिक चालना मिळाली व व्यक्त होण्यासाठी एक सशक्त माध्यम निर्माण झाले.

        1961 साली कर्नाटकात "कर्नाटक आयुर्वेद युनानी रजिस्ट्रेशन ॲक्ट" ची निर्मिती झाली. त्याच वेळी "कर्नाटक आयुर्वेदिक युनानी प्रॅक्टिशनर बोर्ड" ची स्थापना झाली. या घटनेमुळे कर्नाटकातील स्नातकांना विलक्षण दिलासा मिळाला हे काही वेगळं सांगायला हवं??

      याच वर्षी म्हणजे 1961 डिसेंबर मध्ये पुण्यात लक्ष्मी रोड येथील गोखले हॉलमध्ये राज्यव्यापी अधिवेशन भरविण्यात आले. अधिवेशनाचे अध्यक्ष पुण्याचे डॉ. वा.क. साठे हे होते. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री "श्री यशवंतराव चव्हाण" यांच्या हस्ते झाले. डाॅ. वा.क. साठे, डॉ. बा.शं. बिडकर, डॉ.अ.वि. गोहाड, डॉ. मोहन देशपांडे, डॉ. के व्ही शहा, डॉ. व्ही व्ही भागवत, डॉ. ज. के बर्डे या दिग्गजांनी हे अधिवेशन यशस्वी यशस्वी करण्यासाठी जीवापाड परीश्रम केले.

       या अधिवेशनाचं मुख्य फलित म्हणजे या एकत्रीकरणातून महाराष्ट्रात संघटनेचा पाया रचणारी अनेक महनीय व्यक्तिमत्वे उदयास आली.  आयुर्वेद स्नातकांच्या सुरक्षित आणि सन्मान्य भविष्याचा या महान व्यक्तिंनी घेतलेला ध्यास व त्यासाठी केलेले प्रयास.......

 आणि  अमृत महोत्सवानिमित्त आपल्यासमोर येत असलेला हा   गौरवपूर्ण इतिहास.........  

हा इतिहास तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणादायक ठरावा.......हीच अमृतमयी आशा

           

===================

🔆  *एन आय एम ए- एका सुवर्णमयी इतिहासाचा आढावा* 🔆

*भाग ५*

===================

               मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, १९६१ मध्ये पुण्यात भरविलेले, समन्वित चिकित्सेचा पाठपुरावा करणारे राज्यव्यापी अधिवेशन हे अनेक अनेकार्थाने यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या अधिवेशनाची प्रसिद्धी आणि चर्चा संपूर्ण देशात होऊ लागली आणि मिश्र चिकित्सा पद्धतीच्या चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्राकडे बघण्यात येऊ लागले .अनेक  स्नातकांमधील सुप्त नेतृत्वगुण प्रगट होण्यासाठी या परिषदेने बराच हातभार लावला. तसेच महाराष्ट्रातील चळवळीला एक योग्य दिशा मिळण्यास मदत झाली.

        १२ व १३ मार्च १९६६ रोजी ग्वाल्हेर येथे "अखिल भारतीय चिकित्सा परिषद" आयोजित केली होती. त्यावेळी सर्वानुमते "नॅशनल मेडिकल असोसिएशन" चे नामकरण नव्याने करण्यात आले - म्हणजेच त्यात " इंटिग्रेटेड "या शब्दाचा अंतर्भाव करून, "नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन "हे नामाभिधान करण्यात आले.

       या "इंटिग्रेटेड" शब्दा मागची कहाणी अशी की २१ एप्रिल १९५९ रोजी राज्यसभेत "फार्मसी अ‍ॅक्ट अमेंडमेंट बिल" यावर चर्चा सुरू असताना मिश्र चिकित्सेच्या संदर्भात, तत्कालीन आरोग्य मंत्री माननीय श्री. डीपी करमरकर यांनी "इंटिग्रेशन" हा शब्द उच्चारला होता. हा शब्द आपल्या संघटनेचे नेमकेपणाने प्रतिनिधित्व   करेल असे संघटनेतील नेत्यांच्या मनात आले होते. मिश्र चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या चळवळीला  "इंटिग्रेशन" या शब्दाइतकं अचूक वर्णन दुसरं कोणतं असू शकेल? पण हे नवीन नामकरण होण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली.

      याच दरम्यान देशात "निखिल भारतीय आयुर्वेद" विद्यापीठातून शिकून बाहेर पडणार्‍या, शुद्ध आयुर्वेदाच्या  स्नातकांची संख्याही भरपूर प्रमाणात वाढत होती. शुद्ध आयुर्वेदाचा आग्रह धरणाऱ्या या मंडळींनी "आयुर्वेद महासम्मेलन" ही संघटना निर्माण केली होती. १९६७ साली पंडित शिव शर्मा यांनी लोकसभेत मिश्र चिकित्सा व मिश्र चिकित्सकांना कडाडून विरोध केला. त्यांच्या विरोधाला उत्तर म्हणून एन आय एम ए च्या नेत्यांनी केंद्र तथा राज्य सरकारच्या स्तरावरील सगळ्या खासदारांसमोर आपली भूमिका लेखी स्वरूपात मांडली होती. एकाच पॅथीचा अट्टाहास न करता , इंटिग्रेशन मुळे व्यावसायिकांचा आणि समाजाच्या आरोग्याचा स्तर उंचीवर कसा जाऊ शकतो, यावर लेखी निवेदनात विस्तृत प्रकाश टाकला होता.

       याचाच परिणाम म्हणून, याच  संदर्भात १९६९ मध्ये "इंडियन मेडिसिन" यावर एक बिल संसदेत मांडण्यात आले. हे बिल पुढे चर्चेसाठी स्टॅडिंग

समितीकडे पाठवण्यात आले. हे बिल मिश्र चिकित्सा पद्धतीला पूरक होते आणि अनेक खासदारांचा त्याला पाठिंबा होता. पण त्यावेळी सुद्धा  

महासंमेलनाचे नेते या बिलाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री श्री बी एस मूर्ती व श्री के के शहा यांनी आश्वासन दिले कि शुद्ध आयुर्वेद आणि मिश्र चिकित्सा पद्धती या दोन्हीचे ही वेगवेगळे शेड्युल्स करण्यात येतील. परंतु कायदा व मी विधी मंत्रालयाने यावर आक्षेप घेऊन दोन शेड्युल्स करणे अडचणीचे ठरेल असे जाहीर केले. व असे करण्यासाठी कायद्यात वेगळी तरतूद करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. संसदेत मिश्र चिकित्सा पद्धतीचा पुरस्कार करणारे "श्री व्ही एन गाडगीळ", "श्री बापू काळदाते", "श्री मधु दंडवते" यांच्यासारखे कुशल संसदपटू नेहमीच आपल्या इंटिग्रेशनच्या  भूमिकेचे समर्थन करीत असत.

         शासन स्तरावरील या सगळ्या घडामोडी बघता, संपूर्ण देशात एकच संघटना असणे हे गरजेचे होते कारण त्यामुळे लढ्याला बळ प्राप्त होणार होते. म्हणून  १९६९साली एक फेब्रुवारीला, भोपाळ येथे अखिल भारतीय वैद्यक परिषद भरली असताना, सगळ्या राज्यस्तरीय संघटनांनी एकाच देशव्यापी संघटनेत विलीन व्हावे असा निर्णय घेण्यात आला. आणि देशस्तरावर "नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन" ची निर्मिती झाली.

 संघटनेची घटना याच परिषदेत लिहिली गेली.

 १९६९ एप्रिल मध्ये संघटनेची प्रथम केंद्रीय परिषद दिल्ली येथे संपन्न झाली. "डॉक्टर  पी एन अवस्थी", मुंबई यांचे अध्यक्षपदी आणि "डॉक्टर के एस पोद्दार", दिल्ली यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

   संघटना निर्माण झाल्यानंतर चॅरिटी कमिशनर कडे नोंदणी करणे गरजेचे होते. "डॉ. एस पी किंजवडेकर", मुंबई यांनी २४|४|७२ रोजी, "सोसायटीज एक्ट अँड पब्लिक ट्रस्ट, नं.एफ २४६९, मुंबई येथे नोंदणी केली.

     पाया जितका खोल आणि पक्का, तितकीच वरची इमारत मजबूत आणि टिकाऊ असते.आज,अमृत महोत्सवानिमित्त, संघटनेतील भक्कम पाया रचणाऱ्या शिलेदारांचे स्मरण करणे आवश्यक आहे . याचे पहिले कारण  म्हणजे ते शिलेदार आजही दीपस्तंभासारखे आपल्याला मार्गदर्शन करित आहेत, प्रेरणा देत आहेत. दुसरे कारण म्हणजे, शंभर वर्षानी संघटनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आपण आपल्या पुढील पिढीला काय  संचित देणार आहोत????? याचा अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी...............

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

          


  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...