Sunday, October 3, 2021

नवरात्र आणि आत्मविकास


        हल्ली कळेनासं झालंय की आपल्या समाजाचा चेहरा नक्की कसा आहे?? सप्टेंबर महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनांनी उच्चांक गाठला. तक्रार न झालेल्या अशा घटना आणखी किती असतील देव जाणे. समाजाचा हा हिडीस, विकृत आणि माणुसकीला काळिमा फासणारा चेहरा डोळ्यासमोर असतानाच नवरात्र सुरू होतंय. आता हा समाज 360 अंश कोनातून गर्रकन फिरेल आणि नऊ दिवस देवीच्या भक्तीचा  उन्माद सुरू होईल. उपवास, नऊ दिवसाचे नऊ रंग,ओटी भरणे, सवाष्ण, कुमारीका पूजन, गरबा, अखंड दिवा.... इ. सारी कर्मकांडे समस्त  स्त्रिया यथास्थित आणि रीतसर करतील..... बलात्कार, स्त्रियांवर होणारा हिंसाचार, अन्याय - सगळं विसरून.... दृष्टीआड करून.....भक्तीच्या उन्मादात सगळ्या विकृत वृत्तिंचा सोयीस्कर विसर पडेल.

      नऊ दिवसांची देवीची  ही पुजा, आम्हा स्त्रियांना आत्मभान देत नसेल आणि आमच्या विचारात आणि कृतीत परिवर्तन घडवून आणत  नसेल तर काय अर्थ असल्या पूजेत? देवीमधल्य एखाद्या तरी गुणाचा थोडाफार अंश आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो का आम्ही?मुळात आमची पूजा ही श्रेयसासाठी की प्रेयसासाठी??

      आपल्या  नवरात्र पूजेमागे अनेक पौराणिक कथा आहेत. पण मी जेव्हा सखोल विचार केला, तेव्हा माझ्या बुद्धी आणि तर्कानुसार मला असं लक्षात आलं की स्त्रीचं आयुष्य हे नऊ टप्प्यात पूर्ण होतं. हे नऊ टप्पे आणि  नवरात्राच्या नऊ दिवसांचं देवीचं स्वरूप विलक्षण  मिळतंजुळतं आहे.ही नऊ दिवसाची पूजा म्हणजे आपल्याच जीवनातला एक एक टप्पा डोळस,समृद्ध,सक्षम आणि परिपूर्ण करणं होय.

   पहिली देवी  'शैलपुत्री' म्हणजेच पार्वती. पार्वतीचा  आदिशक्ती म्हणून गौरव केला आहे . आदी म्हणजे आरंभ. घटस्थापना करतांना आपण माती मध्ये धान्य पेरत असतो. म्हणजेच पहिल्या दिवशी स्त्री मधल्या 'सृजनशक्तीची','निर्मिती  क्षमतेची' पूजा असते. त्याच बरोबर गर्भाशयात रूजलेल्या इवलाश्या स्त्री गर्भाची पूजा असते. या दिवशी प्रत्येक स्रीनं देवीसमोर डोकं टेकवताना स्त्री भ्रूणहत्ये विरुद्ध लढण्याची शपथ घेणं गरजेचं आहे.गर्भनिर्मिती करणाऱ्या अवयवांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शैलपुत्री देवीच्या डाव्या हातात कमळ तर उजव्या हातात त्रिशूळ आहे .या त्रिशूळाचा उपयोग केव्हा आणि कसा करायला हवा हे प्रत्येक स्त्रीनं समजून घेणं हे आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल........

       दुसऱ्या दिवशीची देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चरणी म्हणजे तपस्या करणारी. ही देवी शुभ्र वस्त्रांकित असून तिच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे. ही देवी पार्वती असून तिने शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं हे आपण जाणतोच. स्त्री जीवनातला पहिला टप्पा म्हणजे जन्मापासून बारा वर्षापर्यंत.दुसऱ्या दिवसाची पूजा ही 'ध्यासाची' आहे. स्त्रीने आपल्या घरातील, समाजातील बाल्यावस्थेतील मुलींचा विचार करायचा आहे. या मुलींना काही छंद, नाद, ध्यास असेल तर तो त्यांना जोपासू द्यावा, त्यांना पाठिंबा द्यावा. तरच मेरी कोम, पी व्ही सिंधू,मिताली राज घराघरात निर्माण होतील. फक्त या ध्यासामध्ये जपमाळेतील  सातत्य आणि शुभ्रवस्त्रातील सात्विकता जपण्याकडे लक्ष देणं हेच आत्मभानाच्या च्या दिशेने टाकलेलं दुसरं पाऊल......

      तिसऱ्या दिवसा ची देवी ही 'चंद्रघंटा'. हिची कांती सोनेरी असून ही देवी लावण्यवती आहे. तिच्या डोक्यावर चंद्राच्या आकाराची घंटा असून त्या घंटा नादानं असूर भयभीत झाले होते. स्त्री  जीवनातला दुसरा टप्पा म्हणजे तारूण्य. ही पूजा 'सौंदर्य' आणि 'शक्ती'ची असते. तारुण्यावस्थेत स्त्री शरीरातले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सक्रिय असल्याने तिचं सौंदर्य आणि कांती झळाळून उठतं आणि याच हॉर्मोनमुळेच  या वयात धाडसी वृत्ती असते.  देवीसमोर नतमस्तक होताना  मुलींचं खच्चीकरण न करता तिच्यातील स्फुल्लिंग जपणं,धिटाईला योग्य वळण देणं आणि सौंदर्यप्रदर्शनास विरोध करणं - हा संकल्प करणं -  हेच आत्मभानाच्या दिशेनं  टाकलेलं तिसरं  पाऊल........

     चौथ्या दिवसा ची देवी म्हणजे 'कुष्मांडा'. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तिने आपल्या हास्यापासून ब्रम्हांडाची निर्मिती केली अशी कथा आहे.चौथी पूजा ही 'हास्याची' म्हणजेच आनंदाची आहे. स्त्री जीवनातला चौथा टप्पा म्हणजे विवाह. विवाहानंतर स्त्री  आपलं नवीन जग निर्माण करित असते. पण यासाठी तिच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद आहे का, हे बघण्याची जबाबदारी कुटुंबातल्या प्रत्येकाची- नवरा, सासू, नणंद, दीर इत्यादींची आहे. अंतर्मनातून फुलणारंं हास्य,स्वातंत्र्य  आणि आनंद हे प्रत्येक सासुरवाशिणीला, माहेरवाशिणी ला मिळावं यासाठी देवीसमोर संकल्प  करणं- हेच आत्मभानाच्या दिशेने टाकलेले चौथं पाऊल.......

     पाचव्या दिवसाची देवी आहे 'स्कंदमाता'. ही देवी पार्वती असून हिच्या हातात कार्तिकेय आहे. या देवीचं वैशिष्ट्य हे, की तिला चार हात असून एकाही हातात शस्त्र नाही कारण ही पूजा ' वात्सल्याची ' आहे. विवाहानंतर चा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व. मातृत्वाच्या थोरवी बद्दल मी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. पण या देवीसमोर नतमस्तक होताना आजच्या आयांनी काही संकल्प आवर्जून करावे. ते म्हणजे घरातील पुरुषांना (नवरा/मुलगा) स्त्रियांकडे एक 'माणूस' म्हणून बघायला,सन्मान करायला शिकवावं.घरातल्या सगळ्या कामांची- स्वयंपाकाची- सवय लावावी .अशी आई होणं म्हणजेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं पाचवं पाऊल.........

      सहावी देवी आहे , 'कात्यायनी'. हिने महिषासुराला ठार मारले असून, हिच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात कमळ आहे. हिच्या अचाट सामर्थ्याच्या अनेक कथा आहेत. या देवीचं पूजन म्हणजे 'असामान्य सामर्थ्याचं' पूजन आहे. स्त्री जीवनातला पाचवा टप्पा हा मुलांच्या संगोपनाचा,घरकामाचा,नोकरीचा- अत्यंत व्यस्त असा असतो. या काळात ती 'मल्टिटास्किंग' करत असते. या दिवशी देवीची   पूजा करताना, तिचं सामर्थ्य स्वतःसाठी मागायचं आहे. पण ही अफाट क्षमता, ऊर्जा - घरातील आणि समाजातील सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी मागायची आहे. आजच्या कृत्रिम आणि पोशाखी दिखाऊपणा साठी नाही किंवा 'सुपरवुमन' बनण्यासाठी नाही. हे आत्मभानाच्या दृष्टीनं   सहावं पाऊल............

           सातवी देवी म्हणजे 'कालरात्री'. स्त्री जीवनातला सहावा टप्पा म्हणजे चाळिशीनंतरचा. या काळात  मुलं मोठी झाल्यामुळे स्त्री  थोडी निवांत असते. ही कोशातून, चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ असते. तिने आता स्वतःला आणि समाजाला वेळ देणं गरजेचं आहे. कशासाठी?? तर- घरात, घराबाहेर, कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल, तर प्रतिकार करण्यासाठी. कालरात्री  देवी चं स्वरूप बघितलं, तर ते भयावह आहे. काळा रंग, मोकळे केस, तिसरा डोळा- - हे कशाचं प्रतीक असावं? जर काहीही चुकीचं घडत असेल, तर रंगरूपाची पर्वा न करता 'तिसरा डोळा' उघडायचा. या देवीचं वाहन 'गाढव' आहे. का?कशासाठी?? दुष्टांचा संहार करण्यासाठी, जमेल त्या मार्गानं, सुचेल त्या आयुधानं, मिळेल त्या मदतीनं- - धावून जायचं असतं. मग ते वाहन गाढव का असेना. या वयात स्त्रीला परिपक्वता, चांगल्या वाईटाची जाण,अनुभव   असतो. म्हणून देवीला नमस्कार करतांना, समाजातील अपप्रवृत्तींचा नाश करण्याचा संकल्प करणं- हेच आत्मभानाच्या च्या दिशेनं टाकलेलं  सातवं पाऊल.......

     आठवी देवी आहे 'महागौरी'. ही श्वेत वस्त्रांकित आहे. या देवी मधील 'शांती व ज्ञानाची '  पूजा  केली जाते . स्त्री जीवनातला सातवा टप्पा म्हणजे रजोनिवृत्तीचा आणि सेवानिवृत्तीचा.  या काळात शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होतात त्यामुळे बरेचदा  मनात उदासीनता आणि नैराश्य निर्माण होतं. पण याच टप्प्यावर महागौरी देवीची पूजा करून मन स्थिर,शांत आणि समंजस  करणं गरजेचं आहे .देवीच्या हातातील डमरू हे सृष्टीतील उत्पत्ती आणि लय यांचं प्रतीक आहे .हे प्रतीक जीवनातलं अंतिम सत्य आहे हे समजून, सध्याच्या आभासी जगातले अशाश्वत मोह, सुख, मनातून बाहेर काढून, अंतर्मनाच्या शांतीचा व ज्ञानाचा संकल्प करणं- - हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं आठवं  पाऊल........

      नवव्या दिवसाची देवी 'सिद्धीदात्री'. ही कमळात विराजमान आहे आणि हिला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत. या टप्प्यावरील स्त्री ही वार्धक्यावस्थेतली असते . साधारण सत्तर वर्षापासून पुढचा हा काळ आहे. या वयातल्या स्त्रीमध्ये समाधान, सामंजस्य, शांती, परिपक्वता, निर्लेपता, निर्मळता, प्रेम आणि आनंद या अष्टसिद्धी असणं अपेक्षित आहे. यासाठी तिनं स्वतः आणि कुटुंबीयांनी जागरूक असायला हवं.  या देवी समोर नमन करताना कुटुंबीयांनी तिला सन्मान देण्याचा आणि स्त्रीने स्वतःला षड्रिपु पासून दूर ठेवण्याचा संकल्प करणं हेच आत्मभानाच्या दिशेनं टाकलेलं नववं पाऊल........

 अशा पद्धतीने नऊ दिवस देवीच्या मूर्तिपूजेबरोबर  देवीचे गुण स्वतःमध्ये आणि आपल्या समाजात रुजवले तर नवरात्राचे श्रेयस आपल्या पदरी पडेल. घराघरांमध्ये दुर्गादेवीचं अस्तित्व निर्माण होऊन स्त्री  ही खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सक्षम होईल. स्त्रीमधील हे आत्मभान जागृत झाल्यावर हा समाजही सुसंस्कृत आणि विवेकी होईल.

स्त्री ही संपूर्ण समाजाला योग्य वळण लावू शकते,त्याचवेळी त्याला वठणीवरही आणू शकते.फक्त स्वतःमधील वैशिष्ट्यांचा नेमका,अचूक आणि  योग्य वापर करण्याचं आत्मभान आलं तरच!!!



Friday, August 20, 2021

'शेल्फी' - एक अदभुत सफर...



       पुस्तक खरेदी करताना सर्वसामान्य  वाचकांचे निकष काय असतात? आवडता लेखक, आवडता विषय, आवडतं प्रकाशन किंवा खूप गाजलेलं वा बेस्टसेलर- यापैकी कोणतेही.

 पण यापैकी काहीही नसताना मी गणेश मतकरींचं  'शेल्फी' विकत घेतलं. गणेश मतकरींचं सिनेमाबद्दलचं लेखन अधून मधून माझ्या वाचनात आलं आहे. 'आवडता लेखक ' होण्याइतपत मी त्यांचं फारसं वाचलेलंच नाहीय.मात्र  माझ्या आवडत्या लेखकाचे- रत्नाकर मतकरी यांचे ते चिरंजीव आहेत हे मला माहीत आहे.   

        मागील आठवड्यात पुस्तकाच्या दुकानात गेले असता 'शेल्फी' नं  माझं लक्ष वेधून घेतलं - ते त्याच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे.माझी पुस्तक खरेदी सुरु असतांना, 'शेल्फी' मला  वारंवार खुणावत होतं. शेवटी  ते पुस्तक चाळण्याचा मोह मला आवरला नाहीच.

 ' मुंबई मराठी संग्रहालय,वसंत वाचनालय, ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी- माझ्यात वाचनाची शिस्त तयार करणाऱ्या या वाचनालयांना'..... ही अफलातून अर्पणपत्रिका वाचतानाच, हे पुस्तक इंटरेस्टिंग असणार असा माझ्या मेंदूने इशारा दिला. 

   चाळताना पुस्तकाची 'जरा हटके' आणि वेगळ्या धाटणीची मांडणी नजरेत भरली. अजून पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे - दर महिन्यात खरेदी केलेली पुस्तकं आणि वाचलेली पुस्तकं यांच्या सूचीनं प्रत्येक लेखाची सुरुवात केलेली. आता तर मेंदूनं     रीतसर नोंदच करुन टाकली पुस्तकाची.पानं पलटवत असतांना इंग्रजी लेखक आणि इंग्रजी  साहित्याशी संबंधित लेख दिसले.या लेखांमधे काय असेल,ही उत्सुकता निर्माण झाली. आणि लगेच मेंदूने  पुस्तक  खरेदी करायची आज्ञाच दिली.

'पण हे संपूर्ण इंग्रजी साहित्या संबंधी आहे'.... मी बचावात्मक  पवित्रा घेतला.

 'काही हरकत नाही'- आता मेंदूचीच आज्ञा- - मी 'शेल्फी' चक्क  विकत घेतलं. 

        'शेल्फी' बद्दल अनेक वाचकांचं असंच होत असावं. हातात घेऊन चाळता चाळताच, वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो आणि मग प्रेमात सगळं क्षम्य असल्यामुळे, 'इंग्रजी साहित्य ना?' वाचून तर बघू - - असं होतं.

      मला वाचनाचा छंद आहे. माझ्या संग्रही अनेक पुस्तकं आहेत.  हा आपल्या सगळ्यांचा एक अभिमानाचा विषय असतो. 'शेल्फी' वाचताना हा अभिमान झरझर गळून जातो. फेब्रुवारी 2016 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत लेखकानं तब्बल  237 पुस्तकं विकत घेतली आहेत. वाचलेली पुस्तकं यापेक्षा वेगळी  आहेत आणि ती 90 आहेत. अबब......... 

      या 90 इंग्रजी पुस्तकांचं-  बेस्टसेलर, कार्टुन्स ,रहस्य, भय, चित्रविचित्र, कॉमिक्स, कल्पना, कविता, चित्रपट, समीक्षा, विनोद ,इत्यादी प्रकारात वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या 90 इंग्रजी पुस्तकांची, त्यांच्या कथानकाची, त्यांच्या गुण दोष वैशिष्ट्यांची माहिती देत असतानाच मतकरी त्या पुस्तकांच्या लेखकांबद्दलही वाचकाला शहाणं करुन सोडतात.पुस्तक लिहिण्यामागची लेखकाची भूमिका,त्यामागच्या काही प्रेरणा,एखादी कहाणी,त्यांची इतर पुस्तकं अशी भरपूर माहिती आपल्या समोर येते आणि ती सुद्धा अत्यंत प्रांजळ आणि मनोरंजक शैलीत. त्यामुळे माझ्यासारख्या मराठी वाचकाला, कधीही परिचित नसणाऱ्या लेखकांबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल वाचताना रस निर्माण होऊ लागतो. माझ्यासाठी हे पुस्तक म्हणजे इंग्रजी साहित्यातली एक अद्भुत आणि अचंबित करणारी सफर होती. केवळ कुतूहलापोटी एका नवीन जगात पाऊल टाकावं आणि विस्मित होऊन पुढे पुढे चालत जावं असं माझं झालं.    '                        

      ' हारुकी मुराकामी','एच पी लवक्राफ्ट', 'स्टीवन किंग', 'आंद्रे वायदा','आशिष राजाध्यक्ष', 'डॕन ब्राऊन', 'सेम्पे'....... कोणाकोणाचा उल्लेख करावा? अशा अनेक लेखकांची, त्यांच्या साहित्याची,वैशिष्ट्याची एक-एक झलक या पुस्तकात वाचकाला मिळत जाते आणि सर्वस्वी अपरिचित अशा इंग्रजी साहित्याच्या दुनियेत वाचक हरवून जातो,गुंतून जातो.

    'गॉडफादर' या कादंबरीचं चित्रपटात रूपांतर करतानाचा दिग्दर्शक - फ्रान्सिस कपोला- (एरवी ही नाव कधी कळली असती?) यांनी 'सिनॉप्सिस', 'द टाईम्स','इमेजरी अँड टोन', 'द पिटफॉल्स','द कोअर'- या पाच घटकांमधे  केलेला  दिग्दर्शनाचा सखोल अभ्यास  वाचताना  त्यांना सलाम करावासा वाटतो. 'ग्राफिक नॉव्हेल्स' या साहित्य प्रकाराची वाचकाला यात ओळख होते. इंग्रजी वाचायची इच्छा असणारे - पण नक्की काय वाचायचं, या संभ्रमात पडणाऱ्यांना- 'अँथनी डोअर' यांची 'आॕल द लाईट वी  कॕनॉट सी'- या पुस्तकाने श्रीगणेशा करावा असा लेखक सल्ला देतात. 

        या इंग्रजी साहित्य सफरीबरोबरच फोर्टमधल्या  'वेवर्ड अँड वाईज', 'किताबखाना', बंगलोर मधील 'ब्लॉसम बुक हाऊस', 'युएस मधील 'कॅपिटल हिल बुक्स' आणि 'कॉमिक बुक्स स्टोअर्स' मध्ये ही लेखक आपल्याला फिरवून आणतात. कॉमिक बुक स्टोअर्स मध्ये मे महिन्यात पुस्तकावर मिळणाऱ्या सवलती बघून आपले डोळे विस्फारतात.                     

              228 पानांच्या या पुस्तकाबद्दल आणखीही बरंच काही लिहिण्यासारखं आहे पण ती गंमत वाचकांनीच अनुभवावी.                            

        या पुस्तकाचं बघताक्षणी नजरेत भरणारं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक मुखपृष्ठ, आगळीवेगळी अर्पणपत्रिका, जरा हटके असलेली पुस्तकाची रचना आणि बांधणी.यामुळे वाचक हे पुस्तक हातात घेऊन चाळायला प्रवृत्त होतो. नंतर विकत घेतलेल्या आणि वाचलेल्या पुस्तकांची यादी बघूनच लेखकाबद्दल विलक्षण आदर निर्माण होतो - हे या पुस्तकाचं बलस्थान. प्रथमदर्मशनी प्रेमात पडल्यामुळे, इंग्रजी साहित्य असलेलं हे पुस्तक, 'वाचू का नको'- या संभ्रमात असणारा वाचक, 'एकदा वाचून तर बघू'- या निर्णयाप्रत येतो. हे या पुस्तकाचं यश आहे. 

नित्यनेमाने आणि  आवडीने इंग्रजी साहित्य वाचणार्यांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे.

        ज्यांना इंग्रजी साहित्य वाचण्याची इच्छा आहे .पण काय वाचावं हे समजत नाही त्यांच्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे गुरुकिल्ली ठरेल.     

      मराठी वाचक- जे फक्त 'बेस्टसेलर' ते ही - 'अनुवादित' वाचतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अलिबाबाची गुहा ठरेल. इंग्रजी साहित्यातलं अद्भुत विश्व सहज सुलभ शैलीत त्यांच्यासमोर साकारल्या मुळे भविष्यात त्यांचीही पावलं या दिशेने वळू शकतील.मुळात, इंग्रजी साहित्याबद्दलचं एक अनामिक दडपण घेऊन वावरणारा मराठी वाचक - 'शेल्फी'मुळे जरा आपल्या 'मराठीपणाच्या' कोषातून बाहेर येईल असं वाटतं.

 इंग्रजी वाचन म्हणजे ....??  असं म्हणणाऱ्या मला सुद्धा 'शेल्फी' मधल्या काही लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावं - माझ्या 'प्रस्तावित वाचन यादीत' नोंद करा करून ठेवावीशी वाटली.- - - यापेक्षा  अजून काही सांगायला हवं?



#शेल्फी

#गणेशमतकरी

Friday, August 6, 2021

दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.....


   


   काही व्यक्ति या केवळ व्यक्ति नसून त्या संस्था असतात. आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. श्री गजानन महाराज संस्थान आणि  श्री भाऊ यांना एकमेकांपासून वेगळं करताच येणार नाही. या उत्तुंग, आभाळाची उंची लाभलेल्या,  ऋषितुल्य  आणि कर्मयोगाची साक्षात व्याख्या असणाऱ्या  व्यक्तिचा मलाही एकदा जवळून अनुभव आलेला आहे. तो अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अमूल्य असा ऐवज आहे.आणि मला त्याचा अभिमान आहे.

    2006 साली आम्ही अकोला येथील काही समविचारी डॉक्टर मैत्रिणींनी  'निमा विमेन्स फोरम' या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. 2010 पर्यंतच्या चार वर्षात  महाराष्ट्रात निमा विमेन्स फोरमच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. 2010 साली मी महाराष्ट्र राज्य निमा  विमेन्स फोरमची अध्यक्ष होते. त्यावेळी विमेन्स फोरमची पहिली राज्यस्तरीय  परिषद घेण्याची कल्पना डोक्यात आली. हा प्रस्ताव आम्ही बुलढाणा येथील डॉ. गजानन पडघन यांच्या समोर ठेवला कारण तेव्हा डॉ पडघन महाराष्ट्र राज्य निमाचे अध्यक्ष होते .

'ही राज्यस्तरीय परिषद तुम्ही शेगावला घ्या'... डॉ.पडघन यांनी सुचवले.

 'शेगाव? शेगाव ला का??'

 'तिथे तयारी कशी करणार??'

 'तिथे आमची कुणाशी ओळख नाही.'

'अकोल्यात राहून शेगावला परिषदेचं आयोजन अशक्य आहे.'......हे प्रश्न  मनात होते .

 आमची टीम नकारावर ठाम होती.

  शेगाव संस्थान चे सर्वेसर्वा श्री शिवशंकर भाऊ पाटील डॉ. पडघन यांचे  निकटवर्तीय होते. श्री भाऊंच्या नियोजन कौशल्याची, कामाच्या  पद्धतीची, कामाच्या प्रचंड आवाक्याची डॉ. पडघन यांना कल्पना असल्यानेच त्यांनी शेगाव चा पर्याय आम्हाला सुचविला होता. शिवाय संपूर्ण राज्यातून जास्तीत जास्त प्रतिनिधी हे 'शेगाव ' या नावामुळेच येतील ही मात्र  सगळ्यांना खात्री होती. डॉ. पडघन यांनी  श्री भाऊंना सगळी पूर्वकल्पना आधी देऊन ठेवली आणि आमच्या टीमची श्री भाऊंसोबत मीटिंग ठरवली. श्री भाऊंबद्दल माहिती बरीच होती पण त्यांना कधी बघण्याचा योग आला नव्हता .

  आम्ही भाऊंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मनावर दडपण होतंच. अत्यंत साधं, मृदुभाषी, मितभाषी आणि विलक्षण आश्वासक व्यक्तिमत्व. त्यांच्यासमोर आम्ही परिषदेची कल्पना मांडत असतांना, ते ज्या पद्धतीने प्रतिसाद देत होते तेव्हाच  मनातले सगळे शंकेचे ढग निवळायला लागले होते. प्राथमिक बोलणी झाल्यावर आम्ही खर्चाचा विषय काढला.

'आधी परिषद होऊ द्या ,मग बघू.

बरं ,महाराजांचं दर्शन घेतलं का?

 निघताना श्री भाऊंनी विचारलं. 

'आत्ता घेणार आहोत. कारण आलो तेव्हा बरीच मोठी रांग होती'-आम्ही म्हटलं.

' यांना दर्शनाला घेऊन जा'. श्री भाऊंनी एका सेवेकर्याला सांगितलं. लगेच दोन सेवेकरी आमच्या जवळ आले आणि  म्हणाले,' चला माऊली '.

एका सेवेकर्याच्या हातात पूजेचं ताट होतं. त्यात फुलं, तुळशी, बेलपत्र, प्रसाद ,नारळ, उदबत्ती  हे सगळं अतिशय  कलात्मक पद्धतीने मांडलं होतं. आम्हा सर्वांसाठी ही खास दर्शनाची सोय म्हणजे ........आंधळा मागतो एक....अशीच होती. त्या दिवशी नमस्कार करतांना,  डोक्यात परिषदेची कल्पना,समोर श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि पाठीशी श्री भाऊंचा होकार ....येवढंच हाती होतं पण परिषद यशस्वी होणार याची खात्रीही होती.

    आनंद सागर विसावा येथे दुसऱ्या मजल्यावर चा हॉल आम्हाला परिषदेसाठी देण्यात आला. बाजूच्याच खोल्यांमध्ये प्रतिनिधींची राहण्याची सोय करण्यात येणार होती. आम्हाला श्री भाऊंनी हॉल आणि खोल्या दाखवल्या. आनंद सागर विसावा चे व्यवस्थापक श्री मोरघडे यांच्याशी आमची ओळख करून दिली.

 'तुम्हाला जे काय लागेल ते यांना सांगा आणि काहीही अडचण आली तर मला भेटा'- असं श्री भाऊंनी सांगितलं.

    झालं. आमची दर आठवड्यात शेगाव ची वारी, मोरघडेंं सोबत बैठक ,श्री महाराजांचे दर्शन आणि अगदीच आवश्यक असल्यास श्री भाऊंची भेट असं सत्र सुरू झालं. या सगळ्या सत्रांमध्ये एकच वैशिष्ट्य होतं. आमच्या गरजा आम्ही बारीक-सारीक तपशिलानुसार सांगायच्या आणि  मोरघडे यांनी  रजिस्टर मध्ये लिहून घ्यायच्या.

' नाही ','जमणार नाही', 'शक्य नाही', 'कशाला' 'काय गरज आहे' ,'पाहू' .....हे शब्द आम्ही कधीही,चुकूनही ऐकले नाहीत.

जेव्हा जेव्हा श्री भाऊंची भेट झाली तेव्हा त्यांना परिषदेच्या तयारीचा संपूर्ण तपशील माहित असायचा.आणि खर्चाचा विषय काढला की ठरलेलं उत्तर....

'बघू पुढे'.

     आम्हाला दिलेला हॉल पूर्ण रिकामा होता. परिषदेसाठी स्टेज आवश्यक होतं. धन्वंतरी पूजनासाठी, दीपप्रज्वलनासाठी, परिषदेचं सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी होती. 

त्यांचे सगळे तपशील मोरघडेंना द्यावे लागायचे. म्हणजे, 

उदा.स्टेज ची लांबी रुंदी उंची-

 स्टेजवरच्या खुर्च्यांची संख्या-

 मान्यवरांच्या सोफ्यांची संख्या- 

स्टेज आणि हॉलमधल्या खुर्च्यां मधील अंतर -

हॉलमध्ये खुर्च्या लावल्यावर वावरण्यासाठी मोकळ्या पॕसेजची लांबी रुंदी-

श्री धन्वंतरी आणि श्री गजानन महाराजांच्या फोटोंची लांबी रुंदी -- - -

 हे आणि अशाच कितीतरी बाबी बारकाईने विचारून तशीच्या तशीच त्वरित  अंमलबजावणी करायची - - ही श्री भाऊंची शिस्त आणि पद्धत आजपर्यंत कुठेही अनुभवली नव्हती. समस्त सेवेकर्यांमधील नम्रता आणि सांगितलेलं काम तत्परतेनं आणि चोखपणे करण्याचे श्री भाऊंचे संस्कार पदोपदी जाणवायचे.तिथल्या  स्वच्छतेच्या सवयींनी तर आम्हाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलं.

       परिषदेच्या  सगळ्या प्रतिनिधींना  शेगाव प्रसादालयातील नाश्ता आणि भोजन देण्याचं आधी ठरलं होतं. शेगावचा महाप्रसाद हा उत्तम चवीचा, उत्तम दर्जाचा असतो याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं. पण परिषदेच्या दृष्टीने हे जेवण अतिशय साधं होईल त्यामुळे बाहेरून केटरिंग सेवा घ्यायची का? असा सूर आमच्या  एका बैठकीत  निघाला. मोरघडे यांनी अर्थातच ' भाऊंना विचारून सांगतो'- हे उत्तर दिलं.खरं तर 'प्रसाद नको '- हे सांगणं खूप अवघड वाटत होतं पण मोरघडें समोर कशीबशी  ती हिम्मत केली.आता यावर श्री भाऊंची प्रतिक्रिया काय होईल,या कल्पनेनं जीव धास्तावला होता.शेगाव हून  आम्ही अकोल्यात पोचत नाही तोच मोरघडेंचा फोन आला.   

 'मॅडम,भाऊंशी बोलणं झालंय. प्रतिनिधींच्या भोजनासाठी आपण एक वेगळा हाॕल ठेवणार आहोत. बाहेरचं केटरिंग नको. संस्थान कडूनच भोजनाची आणि  नाश्त्याची व्यवस्था होईल .आणि त्यात हे पदार्थ राहतील.'

पदार्थांंची भली मोठी यादी ऐकताना मी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला.आणखी वर मोरघडे विचारत होते,

'याशिवाय काही वेगळं लागेल का मॕडम?'

माझ्या तोंडून शब्द फुटणं अशक्य होतं त्यावेळी.

  परिषद चार दिवसांवर आली असताना आम्ही शेवटच्या तयारीसाठी शेगाव ला पोचलो. नेमका आनंद सागर विसावा  समोरचा रस्ता खोदून ठेवलेला होता. रस्त्याचं काम सुरू झालं होतं त्यामुळे आनंद सागर विसावा मध्ये समोरुन प्रवेश करणं शक्य नव्हतं. विसावा च्या मागच्या बाजूला जे फाटक आहे त्यातून रहदारी सुरु होती.  त्यासाठी गोल फिरुन जावं लागणार होतं.रस्त्याचं काम चार दिवसात आटोपणार नव्हतंच.दर्शनी प्रवेशद्वारावर आमचं मोठ्ठं बॕनर लागणार होतं, ते आम्ही मागच्या फाटकावर लावायचं ठरवलं. थोडा विरस झाला पण रस्त्याचं काम आमच्यासाठी का थांबावं?

 आम्ही वर हॉलमध्ये आलो.खुर्च्या लावल्या होत्या. एन्ट्री पासून स्टेज पर्यंत जाण्यासाठी हिरव्या किंवा लाल  मॕट्स टाकायला हव्या असं आमचं आपसात बोलणं सुरू होतं.संस्थानमध्ये अशा मॅट्स उपलब्ध  नसल्याने आम्ही तो विषय वाढवला नाही.

    परिषद 24 जानेवारी 2010 ला होती. 23 जानेवारीला आम्ही दुपारी आनंद सागर विसावा समोर आमची गाडी थांबवली आणि आमचे डोळे विस्फारले. रस्ता व्यवस्थित तयार झाला होता. हा रस्ता कुणाच्या आदेशाने इतक्या लवकर  तयार झाला असावा हे कोणी  सांगायची गरजच नव्हती. या धक्क्यातून सावरत सावरत  आम्ही हॉलवर पोचलो. तिथे खाली टाकलेल्या लाल मॕट्स आमचे स्वागत करायला सज्ज होत्या. आम्ही आणलेल्या  श्री धन्वंतरी आणि  श्री गजानन महाराजांच्या फोटोच्या आकारानुसार एक सुबक लोखंडी स्टॅन्ड कोपऱ्यात विराजमान होता. त्या स्टँडला समई ठेवायची जागा होती. आणि पूजेच्या इत्थंभूत साहित्याने सजलेलं एक तबक सुद्धा होतं. हे सगळं बघून आम्ही अक्षरशः  निशब्द झालो. क्षणभर पुढचं काही दिसेनासं झालं कारण डोळे भरून आले होते. 

     


परिषद कमालीची यशस्वी झाली. दोनशे प्रतिनिधींची अपेक्षा असताना हजार प्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यानंतर अनेक ठिकाणी, अनेक नामवंत हॉटेल्समध्ये परिषदा झाल्या पण शेगावच्या परिषदेचा  अनुभव , त्यामागचं श्री भाऊंचं नियोजन आणि परफेक्शन, आपुलकी,स्वच्छता आणि श्रद्धेने संस्कारित प्रत्येक सेवेकरी.....याची सर  कोणालाच नाही. श्री गजानन महाराजांचा आशिर्वाद आणि श्री भाऊंचं पाठीशी असणं- - ही पुंजी  आजही आमच्या संघटनेला बळ देते आहे. आम्ही कोण, कुठली अनोळखी सामान्य माणसं. नुकतीच निर्माण झालेली आणि धडपडणारी आमची संघटना. का आम्हाला एवढी मदत करावी श्री भाऊंनी???अर्थात  डॉ पडघान यांचं यात 90 टक्के  श्रेय आहे.

      या परिषदेत आम्ही  श्री भाऊंना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली पण अर्थातच  त्यांनी  ते ऐकलं नाहीच. परिषदेत भाषण करताना मी एक वाक्य म्हटलं होतं.

     'श्री भाऊं सारख्या हिमालयाची उंची असलेल्या,  व्यक्तीचे आभार मांडण्याचा मी उद्धटपणा करणार नाही'- आणि  हे म्हणताना माझ्या घशात आवंढा दाटला होता. आता हे लिहितांना आजही माझी  तीच अवस्था आहे. 

श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्यातील देवत्वाचा एक चिमुकला कवडसा माझ्या ओंजळीत आला जो मी प्राणपणाने जतन करुन ठेवलाय. 

श्री भाऊंसारख्या नरश्रेष्ठाचा कधीच मृत्यू होत नसतो. ते आहेतच मंदिराच्या भिंती विटांमधे...,प्रत्येक सेवेकर्यांच्या आचरणामधे......श्री महाराजांच्या मूर्ती शेजारी



#शिवशंकरभाऊपाटील

#श्रीगजाननमहाराजसंस्थान

#शेगाव

Sunday, June 13, 2021

"एक शून्य मी" - पुलंचं निराळेपण


      १२ जून. पुलंचा स्मृतिदिन. पुलंना आठवायला स्मृतिदिन कशाला हवा? ते तर रोजच कुठे ना कुठे तरी भेटतातच. - - हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य असलं तरी ते वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण त्यामुळे स्मृतिदिनाचं महत्त्व कमी होत नाही. या दिवशी या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या आठवणींना,साहित्याला, कर्तृत्वाला व्याख्यानाद्वारे, लेखाद्वारे, काही नियोजित कार्यक्रमाद्वारे उजाळा मिळतो आणि त्या व्यक्तिमत्त्वाची परत नव्याने ओळख होते. नवीन पिढीला  प्रेरणा मिळते. मनात आनंद आणि अभिमानाची भावना जागृत होते.आपल्या श्रद्धेय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक निमित्त असतं.  त्यासाठीच हा लेखन प्रपंच. 

     


योगायोगाने १२ जून २०२१ ला पुलंच्या "एक शून्य मी" या पुस्तकालाही वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुलंच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृतिदिनी मौज प्रकाशनाने हे पुस्तक १२ जून २००१ साली प्रसिद्ध केलं.  अनेक नियतकालिकांमधून  प्रसिद्ध झालेल्या पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात अगदी १९६२, ६४आणि ६९ साली लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे तर काही लेख हे १९९२, ९६ आणि ९९ सालातले आहेत. उर्वरित लेख हे १९७० ते ९० या कालावधीतले आहेत. 

      खरंं तर "एक शून्य  मी" हे पुलंच्या पुस्तकाचं शीर्षक वाचूनच मनात प्रश्न निर्माण होतो आणि यात नेमकं काय असेल ही उत्सुकता ताणल्या जाते.  पुलंचं साहित्य ढोबळमानानं विभागायचं ठरवलं तर, - विनोदी, वैचारिक, व्यक्तीचित्रणात्मक आणि नाटकं -- असं होऊ शकेल. त्यातल्या त्यांच्या वैचारिक आणि व्यक्ती चित्रणाच्या लिखाणाचा बाज नेहमीच सकारात्मक आणि कौतुकाचा आणि गुणग्राहकतेचा राहिलेला आहे. व्यक्तिंविषयी, सामाजिक कार्याविषयी,संस्थांविषयी लिहितांना पुलंनी उत्तम, उदात्त उन्नत, सुंदर  अशा बाजूंवर प्रकाश टाकलेला आहे त्यामुळे ते लिखाण अत्यंत टवटवीत , ऊर्जस्कर  आणि दिशादर्शक झालं आहे. यावर अर्थातच मधून मधून विनोदाचा  तडका असल्यामुळे ते परत परत वाचावंसं वाटतं. त्यांच्या लेखनात कुठेही नकारात्मकता, वैफल्य, निराशा, वैताग असा सूर कधीच नसतो. मग ते कोणतेही लिखाण असो. अशा वेळी "एक शून्य मी" या पुस्तकातून पुलंना नेमकं काय सांगायचं असेल, ही उत्कंठा होतीच.खरंतर, "एक शून्य मी" पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत.आजवर अनेक वाचकांनी त्याची पारायणंही केली असतील. पण या पुस्तकातला "एक शून्य मी" हा लेख नेहमीच मला व्यथित करुन जातो.त्यातून एका निराळ्या पुलंचं दर्शन होतं. स्मृतिदिनाच्या निमित्तानं 'त्या' पुलंचं स्मरण............

      आजच्या या अतिवेगवान तांत्रिक युगामुळे माणसांमधील बोथट होत जाणाऱ्या संवेदना आणि खिळखिळ्या झालेल्या  जाणिवांमुळे पुलं व्यथित झालेले आहेत आणि ती खंत त्यांनी विविध लेखांद्वारे व्यक्त केली आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. 

    आपल्या अनेक व्यथा, विवंचना, वैताग तसंच उदासीनतेवर उत्तर मिळवण्यासाठी किंवा निखळ मनोरंजनासाठी पुलंच्या साहित्याचा आधार घेण्याची सवय लागलेल्या वाचकांना "एक शून्य मी" या पुस्तकात प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं दिसतात, तेव्हा मन खिन्न होतं.  "एक शून्य मी" हा या पुस्तकातील एक लेख आहे आणि  तेच नाव पुस्तकाला दिलेलं आहे.  अर्थात पुस्तकातील  सगळेच  लेख खिन्न करणारे नाहीत.पण "एक शून्य मी" हा लेख अस्वस्थ करतो. 

    आपल्या देशातली ढासळत चाललेली मूल्यं बघून,  

"कधी कधी वाटते,की हे संगीत, साहित्य, नाटके- आनंदनिधाने शोधण्याची हौस आपल्याला मुळातच नसती तर फार बरे झाले असते"- असं पराकोटीचं निराश  विधान  त्यांनी या लेखात केलेलं आहे.

" कारण असल्या क्षणांची झपाझप वजाबाकी होत असते. आणि बाकीचे जे जे काही पाहायला लागते ते मात्र कमालीचे विसंवादी असते."  असं त्यांनी लिहिलेलं आहे. जे वाचतांना पुलंचा कधीही न दिसलेला निराशेचा सूर काळजात कळ आणतो. 

   ज्या श्रद्धास्थानांच्या बळावर  पुलंनी आयुष्यात जगण्याची  दिशा ठरवली होती त्यांच्याबद्दलही कमालीच्या विषण्णतेनं त्यांनी  लिहिलं आहे.

     "कधी कधी  मनापासून चिनी भोजनाचा आनंद लुटल्यावर नेमकं लक्ष रस्त्यावरच्या एखाद्या   चिंध्यांनी अब्रु लपवलेल्या भिकारणीकडे आणि तिच्या अस्थिपंजर पोराकडे का जावं? सगळ्या चैनीची क्षणात वजाबाकी होते. अशा वेळी राग येतो तो फुले, आगरकर, टिळक,  गांधी, साने गुरुजी ह्यांसारख्या मला सतत फसवत गेलेल्या  लोकांचा! मनाचे आणि बुद्धीचे नाही ते कोपरे उजळून जायला ह्या लोकांना कोणी सांगितलं होतं?"                 

        प्रत्येकालाच आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अनेकदा  वैफल्य  येतं, निराशा दाटून येते.  पुलंनाही असे अनुभव   असणारच. पण मनातली ती खळबळ, वाचकांसमोर खुल्या दिलानं मांडण्यासाठी, या प्रसिद्ध लेखकाला काही पायऱ्या उतरुन खाली यावं लागलं - - जे त्यांनी सहजपणे  केल्यामुळे, "एक शून्य मी" हे पुस्तक, पुलंचं एक पारदर्शक रुप वाचकांसमोर घेऊन आलेलं आहे .

     प्रश्नांच्या फेर्‍यात अडकलेले पुलं उत्तर शोधताना, "एक शून्य मी" या लेखात लिहितात, 

 "प्रश्नांचे भुंगे जन्मालाच कशाला येतात? डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे. कुणाचीच नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हा देखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच  निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामचिन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती." 

   स्वतःला शून्य म्हणून घेण्याची ही पुलंची अस्वस्थता आणि सच्चेपणा वाचकांनाही व्याकूळ आणि अंतर्मुख करून सोडते.त्यांचं, हे असं परखड  आत्मपरीक्षण शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवणं किती धाडसाचं आहे - हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य .  अर्थातच या अस्वस्थतेचे मूळ कारण म्हणजे पुलंची टोकदार संवेदनशीलता आणि जीवनातल्या चांगुलपणावरची  प्रबळ निष्ठा. 

     "एक शून्य मी" हा लेख १९७४ साली लिहिलेला आहे. आज ४७ वर्ष उलटली आहेत.  आज परिस्थिती बदललीय पण छळणारे प्रश्न आजही तसेच आहेत. आजही हा लेख कुठेही कालबाह्य वाटत नाही.आजही त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीतच.

 याच पुस्तकात विनोबांबद्दल लिहिताना पुलं म्हणतात,    "विनोबांनी तीन प्रकारच्या संततीचे वर्णन केले आहे. औरस, दत्तक आणि मानस. मानस संतती सर्वात उत्तम कारण ही संतती आपल्या मानलेल्या बाबांच्या विचारांचा आणि आचारांचा वारसा घेऊन तो वाढीला लावते. विनोबांना बाबा म्हणण्याचा अधिकार या मानस संततीचा. हा अधिकार मला नाही"

    विनोबांचा विलक्षण  प्रभाव पुलंवर  होता.विनोबांचं साहित्य हे त्यांचं श्रद्धास्थान. पण त्यांना  बाबा म्हणण्याचा अधिकार मला नाही हे कबूल करण्याचा पुलंचा  मोठेपणा  त्यांच्या स्वभावाची उंची दाखवून देतो. 

   आज या  स्मृतिदिनाच्या निमित्ताने "एक शून्य मी" या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटला कारण त्यातून पुलंचं स्वतःचं परखड मूल्यमापन करणारं  "माणूसपण" पानापानातून डोकावत राहतं.प्रसिद्धीची,मोठेपणाची,लाडकेपणाची झूल उतरवून,सामान्य माणसाच्या पातळीवर उतरुन, समाजातल्या छोट्या छोट्या प्रश्नांचा शोध घेणं.आणि त्याबरोबरच स्वतःचाही शोध  घेणं - म्हणजे "एक शून्य मी". सामाजिक बांधिलकी जपण्याचं तत्व आयुष्यभरासाठी अंगिकारल्यावर,  जगण्यातल्या चांगूलपणावर असलेला विश्वास   जेव्हा डळमळीत होऊ लागतो तेव्हा प्रांजळपणे दिलेला कबुलीजबाब म्हणजे "एक शून्य मी".

पुलंच्या याच उन्नत प्रांजळ स्वभाववैशिष्ट्यांना आज आपण वंदन करु या.




#एकशून्यमी

#पुलदेशपांडे

#मौजप्रकाशन

#विनोबाभावे

Tuesday, May 18, 2021

बाबा - तुमच्या साठी...

     आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांच्या वारसांचा जसा हक्क असतो तसाच  त्यांच्या गुणांवर, प्रतिभेवर, वैशिष्ट्यांवर, सामर्थ्यावर, कौशल्यांवर हक्क असता तर?? पण असं नसतंच. कधी आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये अपत्यांमध्ये जशीच्या तशी उतरतात. कधी थोडी थोडी  झिरपतात तर कधी अजिबात उतरत नाही. याला कोणताही नियम किंवा तर्क लागू होत नाही. यावर काही इलाजही नाही.

      मी लिहीत असताना  कायम मला माझ्या वडिलांची - डॉ म.बा.कुंडले - यांची  आठवण येत असते. ते उत्तम लेखक , प्रभावी वक्ता, हाडाचा शिक्षक  आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ होते. त्यांचं चौफेर वाचन, व्यासंगी लेखन आणि मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व यापैकी   काही थेंब तरी माझ्यात झिरपलेत का अशी शंका  मला येते. असो. एका समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या पोटी माझा जन्म झाला हे ही नसे थोडके.

     आज दिनांक १९ मे. आज त्यांचा वाढदिवस. आज ते असते असते तर ९४ वर्षांचे झाले असते.  ते २०१४ साली आमच्यातून  निघून गेले.  माझ्या कोणत्याही 'लिंबू टिंबू' लेखनाचं - वडील म्हणून त्यांना खूप कौतुक होतं. पण त्यांना अपेक्षित असणारं लेखन माझ्या कडून होतं आहे की नाही देव जाणे.  न सांगता येण्यासारखं आणि  न दाखवता येण्यासारखं - पण माणूस म्हणून समृद्ध करणारं असं खूप काही, आम्हा तिघी बहिणींना त्यांच्याकडून मिळालं आहे. आणि त्या भक्कम पायावरच आज आमची वाटचाल सुरु आहे. 

      आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय  करावं ,याचा मी बराच विचार केला.आणि  माझ्या  एका जबाबदारीची मला जाणीव झाली. बाबांनी अमूल्य असं अक्षरधन समाजातील शिक्षकांसाठी निर्माण करून ठेवलं आहे . ते अक्षरधन  यानिमित्ताने समाजातल्या नवीन शिक्षकांसमोर आणण्याचं काम तर मी नक्कीच करू शकते.कितीतरी शिक्षकांच्या पिढ्या बाबांच्या  पुस्तकांमुळे समृद्ध झाल्या आहेत.पण आजच्या गुगल युगातल्या ,अर्धवट माहितीवर विद्वान होणाऱ्या पिढीला, बाबांच्या पुस्तकांमुळे  जर अस्सल ज्ञान मिळालं,  तर बाबांच्या  लिखाणाचं सार्थक होईल असं मला वाटतं. 

   विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण महाविद्यालयात (एम एड कॉलेज) बाबा प्रोफेसर होते. आणि आई बीएड कॉलेज मध्ये अध्यापक होती.एकत्र कुटुंब असतानाही त्या काळात ,मॕट्रिक झालेल्या आईला, बाबांनी बीए,एमए,बीएड,एमएड ते पीएचडी पर्यंत शिकण्यासाठी उत्तेजन दिलं.आम्ही तिघीही बहिणींनी आपल्या पायावर उभं राहिल्यावरच आमच्या  लग्नाचा विचार करायचा,आणि त्या दृष्टीने, हवं ते शिक्षण पूर्ण करायचं,हे त्यांचं आधीच ठरलं होतं आणि तसं त्यांनी केलंही.


बाबांचं पहिलं पुस्तक म्हणजे 'अध्यापन शास्त्र आणि पद्धती'. १९६२ साली व्हीनस प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलं होतं. त्यावेळी बाबा ३५ वर्षाचे होते. या पुस्तकाच्या आजवर नऊ आवृत्या निघाल्या आहेत. त्या काळात ते बीएड कॉलेजमध्ये शिकवत असत. 'अध्यापन शास्त्र'( Principles of Teaching Methods) यावर मराठी भाषेत पुस्तक नसल्यामुळे बाबांनी हे पुस्तक लिहिलं. शिक्षकांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं.                                                                                                                                       

बाबांचं दुसरं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि शैक्षणिक समाजशास्त्र'. हे पुस्तक १९७३ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या वेळच्या बीएडच्या  अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे. हे पुस्तक बीएड साठी, एक टेक्स्ट बुक म्हणून इतकं उपयुक्त ठरलं की त्याची तेरावी आवृत्ती निघाली आहे. त्या काळात या पुस्तकाला बीएडचा 'दासबोध' असं म्हणायचे. या पुस्तका संदर्भात एक गमतीशीर आठवण आहे. माझी लहान बहीण पुण्याच्या बीएड कॉलेज मध्ये नुकतीच रुजू झाली होती. त्यावेळेस तिची मुलगी लहान होती. तिला सांभाळून कॉलेजचं काम व्यवस्थित जमेल की नाही, हा तिच्या समोर प्रश्न होता. तिची सहाध्यायी तिला म्हणाली, 'अगं टेन्शन घेऊ नकोस, सरळ डॉ. म.बा. कुंडले यांचं शैक्षणिक तत्वज्ञान हे पुस्तक वर्गात न्यायचं आणि वाचून दाखवायचं. मी असंच करते.'  बहिणीनं तिला शांतपणे उत्तर दिलं, '

   'मी त्यांचीच मुलगी आहे'.        



बाबांचं तिसरं पुस्तक म्हणजे 'मराठीचे अध्यापन'. हे १९७४ साली, श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या 'युगवाणी' या मासिकात बाबांची  या विषयावर  लेखमाला प्रसिद्ध होत असे . त्यात काही फेरबदल करून हे पुस्तक जन्माला आलं. या पुस्तकाच्या ही सहा आवृत्त्या निघालेल्या आहेत.
   बाबांच्या मराठी प्रेमावरुन आठवलं.... आमच्या शाळेतले सगळे शिक्षक  बीएड झाले असल्याने, त्यांना 'कुंडले सर' हे जवळून परिचयाचे. मी - सरांची मुलगी. त्यामुळे माझ्यावर सगळ्यांचं बारीक  लक्ष . माझ्या हातून मराठी लिखाणात थोडी जरी चूक झाली तर, 
"तू कुंडले सरांची मुलगी ना? तुझ्याकडून भाषेच्या चुका?" असे टोमणे नेहमीचेच.


      चवथं पुस्तक म्हणजे 'शैक्षणिक समस्यांचा इतिहास' हे पुस्तक १९७८ साली , श्री विद्या प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत.   या पुस्तका पासूनच्या पुढील लिखाणाची मी साक्षीदार आहे. त्याआधी लहान असल्याने,बाबा सतत  काहीतरी लिहीत असतात, एवढंच समजायचं. बाबांना पोटदुखीचा कायम त्रास व्हायचा. त्यामुळे ते जास्त वेळ बसून लिहू शकत नसत. त्यासाठी  त्यांनी डाव्या कुशीवर झोपून लिहीण्याचं कसब आत्मसात केलं होतं. डोक्याखाली उंच लोड घेऊन, डाव्या हाताने रायटिंग पॅड हलू नये म्हणून आधार देत, ते दीड दोन तास सहज लिहू शकत . मी मोठी झाल्यावर  मला जशी मराठी भाषेची आणि शुद्धलेखनाची समज आली, बाबा मला डिक्टेट करित असत. हॉलमध्ये फेऱ्या मारत, एक हात पोटावर ठेवून ते सांगायचे आणि मी लिहायचे. हे लिखाण कशासाठी, कुणासाठी, हा विचार त्यावेळी मला करण्याची गरजच वाटली नाही. पण त्याही वयात बाबांचं एक वैशिष्ट्य  जाणवलं, की खाडाखोड, फेरफार, दुरुस्ती,रफ-फेअर -  हे प्रकार त्यांच्या लिखाणात कधी नव्हतेच. त्यांच्या डोक्यातून थेट फायनल कॉपीच उतरायची. आता विचार केला की आश्चर्य वाटतं-  पुस्तकांची सॉफ्ट कॉपी त्यांच्या डोक्यात कशी काय तयार असायची? कारण  माझी पंधरा वीस पानं लिहून झाली की त्यावर फक्त नजर फिरवून ,ते लिखाण थेट धंतोलीतल्या बनहट्टी प्रेस मधे जायचं.प्रेसमधे लिखाण पोचवणं आणि प्रुफं आणणं - ही आमचीच कामं.

 

त्यांचं पाचवं पुस्तक हे 'टेस्ट ऑफ लिटररी क्रिएटिविटी'. १९७९ मध्ये, साहित्य प्रसार केंद्र नागपूर येथून प्रकाशित झालं. सर्जनशीलतेवर बाबांचा पीएचडीचा प्रबंध - पुस्तक रुपात काढला होता. या पीएचडी च्या प्रबंधासाठी, सायन्स शाखेच्या,दहावीच्या विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेतली सर्जनशीलता किती प्रमाणात आहे,हे संशोधन केलं होतं.

 

सहावं पुस्तक, 'सर्जनशीलता'. हे १९९१ मध्ये नूतन प्रकाशन,पुणे, यांनी प्रकाशित केलं.सर्जनशीलता हा बाबांचा आवडीचा आणि प्रभुत्व  असलेला विषय. या विषयावर मराठीतून एकही पुस्तक उपलब्ध नसल्याने, मराठी विद्यार्थ्यांची ही अडचण या पुस्तकामुळे बऱ्याच अंशी दूर झाली.

सातवं  पुस्तक हे, 'शैक्षणिक  पत्रकारिता'. १९९६ मध्ये, शिक्षण समीक्षा प्रकाशन,  नागपूर, यांनी प्रकाशित केलं.  पत्रकारितेमध्ये शैक्षणिक पत्रकारिता या एका नवीन संकल्पनेचा अंतर्भाव  होणं गरजेचं आहे असा त्यांचा आग्रह होता. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा,उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा  पुरस्कार मिळाला आहे.                                                           


                                                
आठवं पुस्तक हे, 'शिक्षणोपनिषद. २००८ साली प्रकाशित झालं. यात, भगवद्गीतेतील,ज्ञानेश्वरीतील, संत 
वाङमयातील शिक्षणाचा धांडोळा घेतला आहे. धर्मशास्त्रातील शिक्षणाचा ऊहापोह केला आहे. या पुस्तकाच्या आधीपासूनच बाबांची तब्येत बिघडत चालली होती .तब्येतीमुळे हळूहळू ते लेखन, वाचनापासून दूर होत गेले.                                                            

'
शिक्षण समीक्षा' नावाचं द्वैमासिक त्यांनी सुरू केलं  होतं.ते त्यांचं चौथं अपत्यच होतं. चाळीस वर्षे त्यांनी ते निष्ठेनं,जीव ओतून चालवलं. बरेचदा अंक काढण्यासाठी लेख कमी पडायचे. त्यावेळेस स्वतःच एखाद दुसरा लेख दुसऱ्याच्या नावाने लिहून, त्यांनी अंक प्रकाशित केलेला आहे .

ही सगळी बाबांची पुस्तकं, आजच्या पिढीच्या शिक्षकांपर्यंत जायला हवीत असं मला वाटतं.  बाबांची शिक्षणाबद्दल, शिक्षणपद्धती बद्दल  शिक्षकाबद्दल, मराठी भाषेबद्दल असणारी विलक्षण तळमळ  या पुस्तकांमध्ये उतरली आहे. अध्यापन क्षेत्रात सतत प्रयोगशील राहून, नवनवीन संकल्पना  शिक्षकांसमोर मांडण्याची त्यांची पराकोटीची सर्जनशीलता  या पुस्तकांद्वारे व्यक्त झाली आहे.शिक्षण क्षेत्रातील बाबांच्या कार्याची दखल घेऊन 'नगरकर प्रतिष्ठान',पुणे तर्फे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 

     हा लेख आजच्या दिवशी, मी माझ्या बाबांना समर्पित करते आहे. त्यांनी आम्हा बहिणींना सद्विचारांची, तत्वनिष्ठेची,श्रद्धेची,विनम्रतेची अक्षय संपदा प्रदान केलीय.त्याचबरोबर त्यांचं ज्ञानप्रचुर  अक्षरधन  ही समाजातल्या शिक्षकांसाठी त्यांनी निर्माण केलेली  संपत्ती आहे. 


      एक मुलगी म्हणून , मी त्यांना काय देऊ शकले, हा प्रश्न मला नेहमीच छळत आलेला  आहे .आता हा लेख, मी त्यांच्या हयातीत का लिहिला नाही, या प्रश्नाचाही समावेश या छळवादात झाला आहे.शेवटी बाबांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ,

 न्यूनते पुरते,

करुनि घ्येयावे तुम्हाते.

 विनवतु असे' .

 अशी बाबांना विनवणी करते. कारण आम्हा लेकरांमधली न्यूनता वडील समजून घेणार नाहीत असं घडू शकेल कधी??




#अध्यापनशास्त्रआणिपद्धती

#शैक्षणिकतत्वज्ञानआणिशैक्षणिकसमाजशास्त्र

#मराठीचेअध्यापन

#शैक्षणिकसमस्यांचाइतिहास

#Atestofliterarycreativity

#सर्जनशीलता

#शैक्षणिकपत्रकारिता

#शिक्षणोपनिषद

#शिक्षणसमिक्षा







Thursday, May 13, 2021

देव तारी त्याला कोण मारी


त्यादिवशी ओपीडीत बसले असताना, समोर एक मध्यमवयीन स्त्री येऊन उभी राहिली. तिच्या संपूर्ण चेहर्‍यावरुन हास्य ओसंडत होतं. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात येणाऱ्या पेशंटच्या चेहऱ्यावर  इतकं निर्मळ हास्य बघण्याची  सवय नसल्यानं मी क्षणभर दचकलेच आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघू लागले.

' मला ओळखलं नाही मॅडम? मी शांताबाई भिसे -(नाव बदललंय) - बार्शीटाकळी. हा बघा माझा मुलगा. वीस वर्षाचा झालाय.' 

'शांताबाई भिसे ,बार्शीटाकळी' म्हणताक्षणी मेंदूत पटापटा दिवे लागले आणि सगळं लख्ख आठवलं.

' अगं काय शिकतो तुझा मुलगा? किती छान दिसतोय.' मी विचारलं. 

' मॅडम, काॕम्प्युटर चा डिप्लोमा घेतला आणि  आता नोकरी करतोय. अरे पाया पड मॅडमच्या'. हे शेवटचं वाक्य मुलासाठी होतं .

'अगं,किती वर्षाने भेटते आहेस तू?'- मी.

 थोडावेळ हालहवाल सांगून  शांताबाई निघून गेली. ती निघून गेली पण मी वीस वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगात जाऊन पोचले.                         

        वीस वर्षापूर्वी जेव्हा मी आरएमओ म्हणून काम करीत होते, तेव्हाचा हा एक विलक्षण अनुभव. काही काही अनुभव मनात पक्के  रुतून बसतात, त्यापैकीच हा एक.

 त्यावेळी मी हॉस्पिटलच्या क्वार्टरमधे राहत होते. आणि माझा विभाग म्हणजे प्रसुती विभाग . त्यामुळे रात्री ,बेरात्री, अवेळी वाॕर्डमधून कॉल येणं हे नेहमीचंच होतं. त्या दिवशीही असंच मध्यरात्री दोन वाजता दारावरच्या थापांनी आणि 'मॅडम- मॅडम' या हाकेने मी ताड्कन उठले. आताशा मला दारावरच्या थापांवरून पेशंटच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला होता. कॉलबेल एकदाच  सौम्यपणे वाजली, की नुकत्याच हलके हलके कळा सुरू झालेली  पेशंट असणार. 

कॉलबेल न थांबता  वाजत राहिली, की पेशंट च्या प्रसूती कळा वाढलेल्या असणार. 

कॉलबेल न वाजवता दारावर जोरजोरात थापा पडू लागल्या, की - 'मॅडम, चला. पेशंटला टेबलवर घेतलं आहे' हा निरोप असणार. 

दारावर थापांबरोबरच हाका सुद्धा  असल्या, की नक्कीच काहीतरी इमर्जन्सी असणार.  

त्या रात्री तसंच झालं. मी ताड्कन उठून दार उघडलं. 'मॅडम, लवकर चला. पेशंटची रस्त्यात ऑटोतच डिलिव्हरी झाली. खूप ब्लीडिंग होतंय. पेशंट अर्धवट शुद्धीत आहे.' सिस्टर एका दमात बोलल्या.

'पेशंट रजिस्टर्ड आहे का?'- मी.

'हो.दोनवेळा येऊन गेलीय तपासायला'.- सिस्टर.

 'आणि बाळ कसं आहे  ग?'- मी चपला घालता घालता विचारलं. 'मॅडम, ते बाळ गेलेलंच होतं, असं त्या पेशंटची सासू आणि नवरा सांगताहेत.

 'गेलेलंच बाळ?' माझ्या मनात शंका आली. काय कारण असू शकेल?

'बाळ बघितलं तुम्ही?'

'नाही मॕडम.ते गेलेलंच आहे म्हणून ......'

हे बोलणं होईपर्यत पर्यंत आम्ही वाॕर्ड मध्ये पोचलो.

पेशंटचे नातेवाईक डोक्याला हात लावून बसलेले दिसले.पेशंटला बघूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं .  आत टेबलवर शांताबाईला झोपवलं होतं. सगळी  साडी रक्ताने भिजली होती. माझ्या  हाऊस ऑफिसरने बीपी,पल्स बघून सलाईनची तयारी करुन ठेवली होती.  

'शांताबाई , कसं वाटतंय आता?काय त्रास  होतोय?' - तिच्या डोक्यावर थोपटत,नाडीवर हात ठेवत,तिचे डोळे बघून तिच्या हिमोग्लोबिनचा अंदाज घेत, तिला विचारलं.  अर्धवट डोळे उघडणं - एवढाच तिचा प्रतिसाद होता. रस्त्यात होणारी डिलिव्हरी आणि त्यानंतर होणारा रक्तस्त्राव घेऊन येणारा पेशंट  आम्हाला नवीन नव्हता. एक तर, अशा वेळेला प्रसूती मार्ग वेडावाकडा फाटला जातो किंवा प्लॕसेंटा चा एखादा तुकडा  गर्भाशयातच  राहतो. ही दोन मुख्य कारणं रक्तस्रावाची असू शकतात. शांताबाईचं  यापैकीच एक कारण असावं हा माझा अंदाज  होता. पण त्याआधी  तब्येत गंभीर असल्याची लेखी संमती ,आयव्ही सलाईन लावून तिचं पल्स, बीपी नॉर्मल च्या जवळपास आणणं - हे आणि बरेच काही सोपस्कार महत्त्वाचे असतात.  सगळ्या  स्टाफला ही कामं सरावाची असल्यानं,ती लगेचच हातावेगळी झाली. मला प्रामुख्याने रक्तस्त्रावाचं कारण  शोधायचं होतं. सिस्टर ने पेशंट स्वच्छ केल्यावर मी तपासलं तेव्हा तिचा प्रसूती मार्ग  वेडावाकडा फाटलेला आहे, हे लक्षात आलं. त्यासाठी आत पर्यंत व्यवस्थित टाके घालणं आणि ॲनस्थेशिया आवश्यक होता. स्टाफला सगळ्या सूचना देऊन तयारी करण्यास सांगितलं आणि ॲनस्थेटिस्ट ला फोन केला. परत एकदा पेशंटची  अवस्था बघितली आणि ती आपल्या आटोक्यात येणारी आहे हे लक्षात आल्यामुळे जवळजवळ १०मिनीटांनी एक शांत आणि  दीर्घ श्वास घेतला.  

 मी तिच्या नातेवाईकांशी बोलायला बाहेर आले.सासू आणि नवरा खूप  घाबरले होते. तिच्या तब्येतीविषयी सगळी कल्पना तिच्या नवऱ्याला आणि सासूला दिल्यावर  मी बाळाबद्दल चौकशी करु लागले.

' बाळ पूर्ण दिवसाचं होतं की  अपुऱ्या दिवसाचं?आणि ते पोटातच गेलं  होतं की जन्म झाल्यावर लगेच गेलं?आॕटोमधे डिलीव्हरी झाल्यावर कुठे लागलं होतं का बाळाला?'

' मॅडम डिलीव्हरी कधी झाली हे पण समजलं नाही. बार्शीटाकळीहून आॕटोत बसलो.रस्त्याने अंधार होता.शांताची शुद्ध  हरपली म्हणून तिला आम्ही आडवं केलं तेव्हा लक्षात आलं. बाळाचा रडायचा आवाज पण आला नाही. बाळ निपचित होतं. श्वासही घेत नव्हतं. म्हणून आम्हाला वाटलं पोटातच गेलं असेल'.- सासू .

'बाई,तुम्ही बाळ दाखवा बरं'- असं म्हणताच  तिचा नवरा ऑटो जवळ गेला आणि एक कापडी पिशवी घेऊन आला. त्या पिशवीत त्यांनी त्या बाळाचं मुटकुळं ठेवलं होतं. ती पिशवी  बघून मला अक्षरशः ढवळून आलं. सिस्टरने ते बाळाचं गाठोडं बेबी ट्रे मधे ठेवलं.त्याला वरवर पुसून स्वच्छ केलं. पांढरंफट्ट पडलेलं, निपचित झालेलं पण  गुटगुटीत असलेलं बाळ बघून मनातला शंकासुर जागा झाला. बाळाच्या मृत्यूचं नेमकं काय कारण असावं??

       मी सहज त्याच्या छातीवर हात ठेवला. त्या थंडगार स्पर्शाने अंगावर काटा आला. पण  क्षणभरातच त्याच्या हृदयाचा एक मंद ठोका मला जाणवला आणि माझ्या छातीचे ठोके वाढले.स्टेथोने आणखी दोन क्षीण ठोके मला ऐकू आले आणि .........'सिस्टर' - मी जोरात  ओरडले . माझ्या ओरडण्याने  सिस्टर आणि हाऊस ऑफिसर काय समजायचं ते समजल्या. बाळाला उलटं पकडणं, त्याचं सक्शन करणं,त्याच्या पोट/पाठीवर थंड/गरम पाण्याचे सपकारे मारणं, त्याला ऑक्सीजन लावणं, आणि आवश्यक ती इंजेक्शन देणं - - या सगळ्या स्टेप्स आम्ही भराभरा करायला सुरुवात केली आणि लगेच जवळ असणाऱ्या एनआयसीयु मधे  फोन करुन कल्पना देऊन ठेवली. सातव्या मिनिटाला त्या बाळाचा रंग बदलायला लागला. बाळाचे पंजे गुलाबी दिसायला लागले. त्याची छातीची धडधड क्षीण का होईना पण  सुरू झाली. आणि बाळाने डोळे अर्धवट उघडले. बाळाचा सकारात्मक प्रतिसाद बघून त्या बाळाला व्यवस्थित दुपट्यात गुंडाळून एनआयसीयुत भरती करण्यासाठी  नातेवाईकांच्या  सुपूर्द केलं. एनआयसीयु मध्ये  लगेच त्याची ट्रीटमेंट ही सुरू झाली. तोपर्यंत अॕनस्थेटिस्ट आले. पेशंटला व्यवस्थित टाके घातले गेले ज्यामुळे  रक्तस्त्राव नियंत्रित झाला. आणि सलाईन सुरु असल्यामुळे शांताबाई ची तब्येत व्यवस्थित होऊ लागली . हे सगळं आटोपेपर्यंत सकाळचे सहा वाजले . एनआयसीयु मधून निरोप आला की बाळाचा धोका अजून टळलेला नाही. पण आशा आहे की ट्रीटमेंटला  चांगला प्रतिसाद मिळेल. आणि तेव्हा कुठे आम्ही सगळे आमच्या नॉर्मल स्थितीमध्ये आलो.

     संध्याकाळपर्यंत बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित झाले. बाळाला पाच दिवस एनआयसीयु  मध्ये ठेवून मग त्याला सुट्टी दिली.आता मला  भीती ही होती की जन्मानंतर बराच वेळ बाळ रडलं नाही. त्यामुळे त्याच्या मेंदूवर सूज येऊन सेरेब्रल पाल्सी होईल की काही व्यंग निर्माण होईल का? पण याचं उत्तर काळाच्याच हातात होतं. बाळ तर वाचलं होतं .त्यानंतर जवळ जवळ वर्षभर, शांताबाई दर महिन्याला बाळाला घेऊन तपासायला येत असे. त्या वर्षभरात बाळाची वाढ व्यवस्थित होती. नंतर मात्र शांताबाई  कधीच आली नाही. आणि परवा  तो वीस वर्षाचा धडधाकट  मुलगा बघून मला अक्षरशः  भरून आलं. त्यावेळी त्या नातेवाईकांवर विश्वास ठेवून मूल गेलेलंच आहे या समजूतीत मी बाळाला मी हातही लावला नसता तर???

पण "देव तारी त्याला कोण मारी" हेच खरं.त्या मुलाच्या आयुष्याची दोरी बळकट होती  म्हणून देवानं मला त्याला हात लावून तपासण्याची बुद्धी दिली असंच म्हणावं लागेल.

Sunday, April 25, 2021

मनाचा आहार' - आयुर्वेदाची अभिनव संकल्पना

 ' मनाचा आहार' - आयुर्वेदाची    अभिनव संकल्पना 


देहाच्या आहाराबद्दल आपण फार जागरूक असतो. रोज सकाळी उठून न्याहारी , दोन्ही वेळच्या जेवणाचं पद्धतशीर नियोजन आपण करतो. भोजनातल्या पदार्थांमधे  वैविध्य, चव, स्वाद कसा निर्माण होईल याची आपण दक्षता  घेतो. काही आजार झाल्यास लगेच खाण्या-पिण्यात बदल करतो. अपचन झाल्यास हलके भोजन, सर्दी खोकला झाल्यास आंबट,थंड वर्ज्य करतो. डायबिटीस असल्यास शुगर फ्री भोजन..... हे सगळं आपण निगुतीने करतो. पण मग आपल्या शरीरात सर्वशक्तिमान आणि अत्यंत क्रियाशील असणारं जे मन आहे त्याच्यासाठी आपण काय करतो??

    या मनाचा आहार आहे 'विचार' आणि 'भावना' . मग या विचार आणि भावनांचं प्रमाण आमच्या मनासाठी किती असावं, हे आपण कधी ठरवतो का???

   वाटेल तसे भावनांचे चढ-उतार आपल्या मनासाठी किती घातक आहे याचा विचार आपण करतो का ??

  'आज मी  चांगलेच विचार आणि सद्भावना हाच मनाचा आहार घेणार'- असं कधी ठरवतो का??

उपवासाच्या दिवशी कितीही  आवडता पदार्थ समोर आला तरी तो नाकारण्याचा निग्रह आपल्यात असतो. तसंच नकारात्मक विचार आणि वाईट भावना आपण कितीदा ठरवून आणि निग्रहाने नाकारतो?? आपण मनाला  कायम गृहीत धरलेलं असतं. या मनाला आयुर्वेदशास्त्रात 'सत्व' असंही म्हटलं आहे. शास्त्रानुसार 'प्रवर सत्व' , 'मध्यम सत्व' आणि 'अवर सत्व' हे मनाचे व्यवहारातले तीन प्रकार आहेत. शास्त्रामध्ये, रुग्ण  तपासणीसाठी आला की त्याची 'सत्वपरीक्षा' सुरुवातीलाच करण्याचे निर्देश दिले आहेत कारण त्यामुळे उपचार करण्याची दिशा आधीच निश्चित होते.

 प्रवर सत्व म्हणजे 

कोणत्याही परिस्थितीत संतुलित आणि स्थिर व्यक्तिमत्व असणारे,आजार व्यवस्थित समजून घेऊन उपचारांना पूर्ण सहकार्य करणारे,आजाराचा मनावर कोणताही वाईट परिणाम होऊ न देणारे आणि  सकारात्मकता आणि तीव्र इच्छाशक्ती असणारे असतात.

    मध्यम सत्व म्हणजे एरवी स्थिर आणि संतुलित ,पण प्रतिकूल परिस्थितीत अवसान गळणारे,आजाराची सतत चिंता करणारे पण योग्य उपचार घेणारे , आजाराला मनात ठेवून गोंजारणारे,  सकारात्मकता आणि इच्छाशक्ती साठी एखाद्या सपोर्ट सिस्टीम वर अवलंबून असणारे असतात . 

     अवर सत्व म्हणजे 

नेहमीच अस्थिर आणि शंकेखोर व्यक्तिमत्व ,आजार आहे त्यापेक्षा अधिक गंभीर  भासवणारे,कायम आजाराचे रडगाणे गात राहणे व उपचारांवर अविश्वास दाखवणारे, नकारात्मक प्रवृत्ती आणि इच्छाशक्तीचा अभाव असणारे असतात .

   आता यापैकी आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचं परिक्षण करणं ही पहिली पायरी. कुटुंबातील प्रत्येकाचं सत्व एकदा समजलं की त्यानुसार विचारांचा आणि भावनांचा आहार ठरवायचा.

 प्रवर सत्वाचे रुग्ण जीवघेण्या आजारातूनही सहज बरे होतात.पण  कधीकधी अति आत्मविश्वासामुळे.....'मला काहीही होणार नाही'...अशी बेफिकिरी त्यांच्यात असते.अशावेळी त्यांना  तर्कशुद्ध विचारांचा आहार  योग्य मात्रेत देणं गरजेचं असतं.

 मध्यम सत्वाच्या रुग्णांना मनोबल टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.त्यांच्या आहारातून भीतीची भावना वर्ज्य करुन सकारात्मक विचार अधिक मात्रेत दिले तर मध्यम सत्वाच्या व्यक्ती  यशस्वी होतात. पण देहाचा आजार त्यांच्या मनात ठाण मांडून बसला असतो त्यामुळे आजाराचा एकही विचार आहारात नसणे- ही खबरदारी घेणं हे गरजेचं असतं.

 हीन सत्वाच्या रुग्णांना बरे होण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात- त्यांना स्वतःलाही आणि डॉक्टरांनाही. देह निरोगी असला तरी त्यांचं मन आजारीच असतं. त्यांची नकारात्मक वृत्ती ही व्याधीमुक्ती मधला महत्वाचा अडथळा असतो.त्यामुळे सकारात्मक,आश्वासक विचार, आणि सुरक्षित भावना यांचा  रतीबच त्यांच्या आहारात ठेवावा लागतो.

    व्याधी निर्माण होण्याचं पहिलं सामान्य कारण 'असात्म्येंद्रियार्थसंयोग' यावर मागील लेखात आपण चर्चा केली आहे- जी इंद्रियांशी संबंधित आहे. आता शास्त्रात सांगितलेलं, दुसरं सामान्य कारण म्हणजे 'प्रज्ञापराध'. आता प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान अधिक शहाणपणा.( इंटेलिजन्स आणि  अंडरस्टँडिंग). ही प्रज्ञा ज्यावेळी बिघडते , त्यावेळी व्याधी निर्माण होण्याची दाट शक्‍यता असते.  आता हा प्रज्ञापराध नेमका कसा होतो???

   तर मनाच्या तीन वृत्ती असतात. 'धी', 'धृति' आणि 'स्मृती' .या तीन वृत्तींच्या योग्य समन्वयाने मन काम करीत असतं. 

 'धी' म्हणजे बुद्धी. 'जी निर्णय देते ती बुद्धी'- अशी बुद्धीची व्याख्या आहे. ज्यावेळेस 'धीभ्रंश' होतो त्यावेळी हितकर आणि अहितकर यातला फरक समजत नाही. काय नित्य  (परमनंट) आणि काय अनित्य (टेम्पररी) यातला फरक समजत नाही.आज समाजात कोविडचे नियम न पाळणारे सगळे 'धीभ्रंश झालेले आहेत त्यामुळे संसर्गाचा आलेख उंचावतोय.

 'धृती' म्हणजे धैर्य. 'धृतिभ्रंश' म्हणजे धीर सुटणं किंवा मनावर नियंत्रण न राहणं.आज कोविडमधून बरे होत असणाऱ्या रुग्णांचीही अचानक मृत्यू ची बातमी येते.हे सगळे 'धृतिभ्रंशाचे' रुग्ण असतात.

   'स्मृति' म्हणजे स्मरण किंवा अनुभव. स्मृतिभ्रंश म्हणजे ज्या उपयुक्त स्मरणीय बाबी आहेत त्या वेळेवर न आठवणं..  आज कोविडच्या बातम्या वाचताना,ऐकताना केवळ दुर्घटना लक्षात ठेवणं आणि रुग्ण बरे होण्याचा दर,लसीकरणाचे फायदे,ई. विसरणारे ८० टक्के लोक आहेत.अशांची मानसिक खंबीरता कमी होऊन ते सहजतेने कोणत्याही आजाराला बळी पडतात.अशा प्रकारे 'धीधृतीस्मृतिभ्रंश' झालेल्या समाजात व्याधि निर्मिती होणं अटळ असतं. त्यामुळे आज मनाचं आरोग्य व्यवस्थित राखणं ही पहिली प्राथमिकता आहे .आपलं स्वतःचं आणि  आपल्या कुटुंबीयांचं सत्व परीक्षण केल्यास नेमकी सुधारणा कुठे आणि कशी करायची आहे याची दिशा स्पष्ट होते. तसंच धी, धृती, स्मृती या मनाच्या वृत्ति उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी, मनाच्या आहारावर नियंत्रण, उत्तम विचारांचा स्वीकार, संयमित भावना.... असा रोज मनासाठी मेनू ठरवणं आवश्यक आहे.  तर्कशुद्ध विचार आणि  सद्भावनांच्या आहारासाठी प्रार्थना ,योग,प्राणायाम,ध्यान जप,छंद,संगीत ,वाचन,सत्संग अशा कितीतरी पाककृती भारतीय संस्कृतीत आहेत ज्यामुळे मनाला संतुलित विचार ,भावनांचा आहार मिळतो . आपल्या  संस्कृतीतच सुदृढ आणि निरोगी मनाचं संवर्धन होण्याची व्यवस्था  आहे.येवढंच काय,आपल्या कुटुंबव्यवस्थेतील दैनंदिन आचरण देखिल मनासाठी कमालीचं  पोषक आहे . 

आणखी महत्वाचं म्हणजे ,आपलं मन दोन पद्धतीनं काम करतं.पहिलं म्हणजे इंद्रियांशी संलग्न  होऊन काम करणं.त्यामुळे आपल्याला वातावरणातील शब्द ,स्पर्श ,रुप,रस,गंधाचं ज्ञान  होतं.आता  इथे आपण चूक अशी करतो की इंद्रियांच्या आहारी जाऊन त्या मनाला कायम इंद्रियांसोबत गुंतवून ठेवतो.इंद्रियांवर तर अतिरेक होतोच परिणामी मनावरही नको तो आहार थोपविला जातो. 

मनाची काम करण्याची दुसरी पद्धत ही की मन जेव्हा  इंद्रियांपासून मुक्त असतं   त्यावेळी ते अत्यंत पद्धतशीर वागतं.चिन्त्य,विचार्य,ऊह्य,ध्येय आणि संकल्प या पायऱ्यांद्वारे मन निर्णयापर्यंत पोचत असतं.

चिन्त्य  म्हणजे विचारांची योग्य/अयोग्यता ठरविणे.विचार्य म्हणजे  तर्कानुसार त्या विचारांमुळे होणारी लाभ/हानी ठरविणे.ऊह्य म्हणजे उहापोह करुन शक्यतांचा विचार करणे.ध्येय म्हणजे गुण दोषांचा विचार करुन कोणती शक्यता ग्राह्य आहे हे ठरविणे आणि  संकल्प म्हणजे निर्णयाप्रत जाणे.इतकं सुसंगत असं आपल्या मनाचं साॕफ्टवेअर आहे.....अट हीच की ते इंद्रियांपासून मुक्त असावं.हे असं इंद्रिय निरपेक्ष मन अंगिकारणं व्यावहारिक दृष्ट्या कठीण असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही.हा सवयीचा आणि अभ्यासाचा भाग आहे.या अभ्यासामुळे मन स्थिर,शांत  आणि सशक्त होतं.

पण आपल्याला आपल्याच अंतरंगात असणाऱ्या संपत्तीचं भानच नसतं. आपण  मनाला देतो कधी मुक्ती? उलट आज आम्ही आमच्या  मनाला विकृत विचारांचा आणि बटबटीत भावनांचा अति प्रमाणात आहार देऊन अजीर्णाची स्थिती निर्माण केलीय. त्यामुळे या कोविड महामारीत तर आपल्या विचार आणि भावनांना अक्षरशः चाळणी (फिल्टर्स) या लावायची वेळ आलीय. कोविडबाधितांची आकडेवारी रोज जाहीर होत असते.त्यावरून सांख्यिकीय निष्कर्ष काढले जातात. पण कोविडग्रस्त मनांची आकडेवारी कोण काढणार? कोविडबाधित मनाला कोणती टेस्ट लावणार? आजमितीला कोविडबाधित मनांची संख्या ही कोविड रुग्णांपेक्षा कितीतरी जास्त आहे,जे खरोखरच भयावह आहे. त्यामुळे आपल्या मनाला योग्य आहार देऊन त्याची शक्ती ,क्षमता वाढवणं  आणि योगसाधना, ध्यान, स्वसंवाद याद्वारे मनाला इंद्रियांपासून रोज अलग करण्याची जास्तीत जास्त सवय लावणं हे ही लसीकरणा इतकंच प्रभावी आहे यात शंकाच नाही.


#प्रज्ञापराध

#धीधृतिस्मृति

#धीधृतिस्मृतिभ्रंश

#प्रवरमध्यमअवरसत्व

#चिन्त्यविचार्यऊह्यध्येयसंकल्प

     

      

  मनोविकासाचे ध्यासपर्व     “सामाजिक कार्य सुरू करणं सोपं असतं पण ते जिवंत गतिमान, रसरशीत कसं ठेवायचं? कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्...